'स्टोलन किसेस' आणि मनातली ठसठस
'क्रायटेरियन कलेक्शन'ने वितरण केलेल्या कोणत्याही डीव्हीड्या आणून पाहिल्या तर 'वेळ फुकट गेला' असा मनस्ताप कधीही होत नाही. मागे ग्रंथालयात गेले होते तेव्हा फ्रान्स्वां त्रूफॉचा 'स्टोलन किसेस' दिसला; सहज उचलला. ह्या वेळेस निराळा मनस्ताप झाला.
'४०० ब्लोज' या त्रूफॉच्या जुन्या चित्रपटातलं मुख्य पात्र, अंत्वान द्वानेल आणि ते साकार करणारा नट जाँ-पियार लेऑ यांनाच घेऊन 'स्टोलन किसेस' बनवला आहे. थोडक्यात '४०० ब्लोज'मधला इदरकल्याणी अंत्वान तरुण झालेला दाखवलेला आहे. पण '४०० ब्लोज' न बघताही हा चित्रपट बघितला म्हणून फरक पडू नये.
चित्रपटाबद्दल अगदी थोडके शब्द सांगितले तरीही माझा मनस्ताप पोहोचेल अशी आशा आहे. चित्रपटाची रूपरेषा अशी की अंत्वान द्वानेल हा तरुण इसम नोकरी टिकवून ठेवू शकत नाही. त्याला तोफखान्यातून हाकललं जातं, हॉटेलाचा रात्रपाळीचा कारकून म्हणून हकालपट्टी होते आणि पुढे डिटेक्टिव्ह एजन्सीमधूनही हेच होतं. ह्याला नोकरी करायची नसते, टिकवायची नसते असंही नाही. पण जगात टिकून राहण्यासाठी जे शहाणपण लागतं ते अंत्वानकडे नाही. नोकरी गेल्यामुळे अंत्वान कडवट बनत नाही. 'तू नही तो और सही', 'एक गेली तर दुसरी मिळेल' असा त्याचा नोकरीकडे बघण्याचा दृष्टीकोन असावा. थोडक्यात, ह्या इसमाकडे सर्व्हायव्हल स्किल्स नाहीत आणि असं असूनही पोटापाण्याची काळजी करावी अशीही परिस्थिती नाही.
असा तरुण इसम चारचौघं राहतात त्या जगात सज्ञान इसम म्हणून जातो तेव्हा त्याला काही स्त्रिया भेटतात; त्यांच्याशी आणि एकूणच जगात हा कसा वागतो, त्याबद्दल हा चित्रपट.
चित्रपटातली पहिली दहा मिनीटं झाल्यावरच मला (मेघनाचा लाडका) 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' आठवला. आठवा, तो राजसुद्धा गुड फॉर नथिंग आहे. साधी पदवी नाही मिळवता येत त्याला! आणि त्यालाही पोटापाण्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही; बाप चिक्कार मालदार आहे. अंत्वान आणि राज दोघंही तरुण आहेत. अंत्वान खरंच हँडसम दिसतो आणि राज ... हं, तो शारुक खान आहे. चिकणेपणा असेलच तर तो काही वर्षांपूर्वी 'फौजी' आणि 'सर्कस' या मालिकांबरोबर संपून गेलाय. अंत्वानचा खट्याळपणा बालपणाबरोबर संपून गेला आहे. लहान मुलांनी मेलोड्रामा केला तर तो क्यूट वाटतो, मोठ्या माणसांनी केला तर त्याला सास-बहू मालिका म्हणतात; हे त्रूफॉला कधीच समजलं असावं. मात्र राजचं बालपण अजून उतू गेलेलं नाही.
बालपणी आपल्या लीलांनी लोकांना विचारात टाकणारा अंत्वान जगापेक्षा निराळा आहे हे खरंच. आता तरुण वयात, थोडक्यात स्वतःची जबाबदारी स्वतःवर आल्यावर त्याला जगात सामावून जाण्यासाठी त्रास होत आहे. म्हणूनच नोकरी मिळाली तरी धरून ठेवता येत नाहीये. डोक्यात चिकार वैचारिक गोंधळ आहे; आजूबाजूच्या लोकांशी बोलताना ज्या गोष्टी तो ऐकतो, त्या प्रसंगी तो खऱ्याही मानतो आणि तशी कृती करतो. त्यातून कधी गोत्यात येतो, कधी गोत्यात येत नाही. पण या गोंधळामुळे नक्की कोणत्या स्त्रीवर आपलं प्रेम आहे हे तो ठरवू शकत नाही. जगाची रीत आत्मसात करू न शकणारा माणूस गोंधळलेला असणं नैसर्गिकच आहे.
पण राज तसा नाही! तो हिंदी चित्रपटाचा हीरो आहे. तो थोर आहे. (त्याला भारतीय पुरुष प्रेक्षकांच्या खिशात हात घालून धंदा करायचाय, त्यामुळे तो सगळ्यांपेक्षा थोर असलाच पाहिजे.) त्याला पदवी मिळवता येत नाही पण त्याला सिनेमाची हिरॉईन कोणाला बनवायचं, कोणावर सॉलिड्ड लाईन मारायची आणि कोणाशी नुस्तंच फ्लर्ट करायचं हे समजतं. तिच्या खोड्या काढल्याबद्दल तो आपण होऊन सॉरी म्हणण्याएवढा थोरही आहे. (मग भो***, असले बालिश चाळे करतोसच कशाला, हा प्रश्न तेव्हा पडला नव्हता तरी 'स्टोलन किसेस' बघून पडला.)
अंत्वानच्या गोंधळाबद्दल दोन्ही स्त्रिया त्याची लावतात. त्याच्या वयाची, तरुण मैत्रीण सरळच 'तुला माझ्यात रस नाही म्हणतोस तर जा **त' असा अॅटिट्यूड दाखवून देते. त्याच्यापेक्षा अनुभवी न-मैत्रीण त्याला सिड्यूस करते. (स्त्रियांनी माज करणं म्हणजे स्त्रीवाद, तो हा असा!) ती स्वतः अटी ठरवते आणि अंत्वान तिच्यासमोर दबून अटींना होकार देतो.
राजचं मात्र तसं नाही हो! त्याची प्रेयसी ही बावजींच्या विरोधात एक शब्द काढणार नाही. ती चांगली रीतभात असलेली, आदर्श भारतीय नारी बनायच्या जोरदार प्रयत्नात आहे. ती कॉलेजात जाते, कविताबिविता करते हे दाखवलेलं आहे, पण राज नापास झाला तशी ती पास झाली का नाही याचा आपल्याला पत्ता लागू देत नाहीत. बायांनी विद्यापीठीय शिक्षण मिळवून काय फायदा, शेवटी पोळ्याच लाटायच्या आहेत ना! तसंही बाई शिकलेली सिनेमात दाखवली काय आणि नाही दाखवली काय, सिनेमा धो-धो चालणारे कशाने, ते महत्त्वाचं.
तर हा बालिशोत्तम आणि बिनपदवीचा राज प्रेमात पडतो तेव्हा मात्र त्याला उच्च नैतिक भूमिका काय ते समजतं, तसं वागायला जमतं आणि एवढे दिवस जगापेक्षा निराळं वागल्यामुळे जगाच्या डोक्यात जाणारा इसम अचानक जगाला हवाहवासा वाटू लागतो. प्रेमात पडल्यामुळे अक्कल येत असती तर मी आत्तापर्यंत दहाअकली आणि महापॉप्युलर झाले नसते! मी तर हुश्शार पुरुषांच्या प्रेमात पडल्ये. तरीही ढ आणि टिप्पिकल भारतीय नारीच्या प्रेमात पडून राजला आलेली अक्कल मला का येत नाही! मला अक्कल आली असती तर 'स्टोलन किसेस'ची तुलना 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'शी केली असती का मी? तशी तुलना केली नसती तर बॉलिवूड एवढं दळिद्री का, आणि त्या दळिद्रासाठी लोक एवढे पैसे का खर्चतात ही ठसठस मनात निर्माण तरी झाली असती का! आणि मी महापॉप्युलर असते तर मी हे असले लोकांना तुफान आवडलेले सिनेमे मी मुकाटपणे आवडून घेतले नसते का!
प्रतिक्रिया
हे आवडलं एवढंच म्हणेन आता
हे आवडलं एवढंच म्हणेन आता कारण ते पुस्तक मिळवायची उत्सुकता वाढलीय.माझा एक मित्र मला सिनेमे सुचवायचा मला आवडतील असे आणि काम कमी व्हायचं.असाच एक सुचवलेला चाइनिज.गावातल्या वेड्याला सगळं माफ असतं यावर."तू बघच तुलाही हपिसात सगळं माफ असतं." तो म्हणाला होता.
स्टोलन किसेस पाहीला नाही. वेळ मिळाला तर नक्कि बघेन.
पण आता दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे बघुन घ्यावा म्हणतो... कारण मला ठसठस न्हवे मनोरंजन हवे असते म्हणून चित्रपट बघतो.
actions not reactions..!...!
:)
तुझ्या डीडीएलजे वरच्या कमेंट्रीवरुन भडकमकर मास्तरांचा हा मिश्किल धागा आठवला :-
काही सुधाराव्याशा वाटणार्या ( प्रसिद्ध) सिनेमांच्या कथा...
आणि त्या धाग्याचा विषय निघाला की मला हा धागा हमखास आठवतोच -
जोधा अकबर
चोरलेल्या चुंबनांबद्दल काही
चोरलेल्या चुंबनांबद्दल काही बोलू शकणार नाही, कारण अजून चुंबनं चोरायला मिळालेली नाहीत. पण येता जाता आमच्या लाडक्या डीडीएलजेला लेखिकेनं ज्या लाथा मारलेल्या आहेत, त्यांच्याबद्दल बोलणं क्रमप्राप्त आहे.
डीडीएलजेपूर्वी हिंदी सिनेमे एका भल्या थोरल्या दिवाणखान्यात घडत. या दिवाणखान्यात दोन बाजूंनी दोन जिने येत असत. एकाच मजल्यावरून येणारे दोन जिने दोन खोल्यांच्यात उतरत असते, तरी गोष्ट निराळी होती. पण एकाच खोलीत दोन जिने आणून कितीतरी जागा फुकट घालवली जाई. बाकी त्या जिन्यां(च्या उपयोगां)वर कणेकर आणि तत्सम लोकांनी त्यांची कारकीर्द घडवली ते सोडून देऊ. पण ते तसे घरातल्या लोकांना उगाचच दिलेले असत. या जिन्यांवरून गाणार्या नि रडत धावणार्या हिरविणी सहसा पळून जात किंवा पार्ट्यांमध्ये हीरो गात असताना नटूनसजून सल्कत बसत. बापावर त्यांचं प्रेम असल्याची वदंता असे, पण बापाच्या अंगचटीला जाण्याची पद्धत नव्हती. प्रेमप्रकरण घडल्यावर (घडलं तर नव्हे, घडल्यावर) आईबापाची परवानगी मागण्याची पद्धत असे. पण परवानगी न मिळाल्यास काय, याचा निराळा अभ्यासक्रम असे. बाप हाच त्या अभ्यासक्रमातली मुख्य पार्टी असे. पण डीडीएलजेमध्ये पहिल्यांदाच आईस हिरविणीला सांगत होती की बाप वेडसर आहे, तू आपली पळून जा. हे काहीतरी नवीन आणि छान होतं. पुढे हीरो-हिरविणींनी 'आमी नाई जा' असं म्हणून दिवे लावले ते सोडा. पण दुसरी महत्त्वाची बाब अशी की हे असं 'आमी नाई पळून जाणार' असं म्हणणं हेही हिंदी सिनेमात नवीनच होतं. (मला वाटतं, सुनील कर्णिकांनी कुठेसं लिहिल्याप्रमाणे) पाचव्या वेतन आयोगाचा फायदा आणि राहत्या जागांच्या / जमिनीच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती यांच्यामुळे एकाएकी चलतीत आलेल्या आईबाप पिढीचा माजोरडेपणा दिसायला तिथून सुरुवात झाली असं म्हणता येईल. त्याचबरोबर वंशवृद्धीचं महत्त्वाचं काम सोडून, अमिताभनं समृद्ध केलेलं 'यंग अँग्री'पण सोडून, आईबापाच्या मर्जीवर डोळा ठेवणारी लाचार आणि गिडगिडखोर तरुण पिढीही तिथूनच दिसायला लागली असं म्हणता येईल.
अर्थात डीडीएलजेच्या उत्तरार्धात ते दोन जिने जरी नाही, तरी एक जिना आलाच. त्यामुळे त्यांची क्रांतीही माफक आणि झेपेल तितकीच होती हे स्पष्ट झालं. त्याचं एक्स्टेंशन म्हणजे हिरविणीच्या डीग्रीबद्दल अवाक्षर नसणे आणि तिच्या आयुष्यातल्या सगळ्या आकांक्षा योनिशुचितेभोवती आणि 'ख्वाँबो का राजकुमार' या आचरटपणाभोवती फिरणे.
पण नोंदण्याजोगी अजूनही एक गोष्ट होती. ती म्हणजे परदेशाचं व्यक्तिमत्त्व बदलणं. तोवर परदेश हा कुठलातरी 'गॅरी इम्लो गॅल्संटाक'छाप नाव असलेला परग्रह असे. तिथे यच्चयावत लोक दारू पिऊन पोरींवर बलात्कार करण्यात आणि पार्ट्यांमधून अत्यंत अनैतिक असे, गरिबांचं शोषण करणारे, कॉरपोरेटीय निर्णय घेण्यात मग्न असत. वेळ उरलाच, तर पोरांसोबत महागड्या गाड्यांतून शर्यती खेळत. डीडीएलजेमधून प्रथमच परदेशात राहणारे भारतीय मध्यमवर्गीय लोक दिसले. ते परदेशातल्या मध्यमवर्गीय भारतीयांचं इतकं सुखद वास्तवदर्शी प्रतिबिंब होते, की बस. त्यांनाही तिथले फायदे उपटून मिट्टीची खुशबू येई, ती स्वदेशातल्या. स्थानिक संस्कृतीशी त्यांनाही यत्किंचितही देणंघेणं नसे. आपापले घेट्टो करून राहणे आणि वीकान्ताला मंडळात जाऊन देशी सण साजरे करणे हा मुख्य कार्यक्रम असे. परदेशात तोकडे कपडे घालणे, देशी आल्यावर लोकांना भेटी देऊन खूश करणे व भारतात स्वतः भारतीय खमीसात वावरणे हा तिथल्या स्त्रियांचा विशेष डीडीएलजेमध्ये दिसल्याचं पाहून अनेकांना गहिवरून आलं असेल. अशा प्रकारच्या लोकांना एक प्रतिनिधित्व देण्याचं आणि नवीन विधा सुरू करण्याचं काम डीडीएलजेनं केलं, त्यामुळेही तो अतिशय महत्त्वाचा ठरतो.
हे पथदर्शी चाळे लक्षात न घेता नुसत्या लाथा मारल्याबद्दल लेखिकेचा तीव्र निषेध करून मी खाली बसत आहे. (टाळ्यांचा कडकडाट.)
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
+१
DDLJ ने तत्कालीन भारतिय स्त्रीच्या अभिव्यक्तीच्या कक्षा नक्किच रुंदावल्या.
actions not reactions..!...!
समीक्षा
समीक्षा आवडली. पण त्यांत तोंडी लावायला घेतलेले डीडीएलजे, फार फार मधे येत राहिलं. त्यामुळे स्टोलन किसेसचा रसभंग झाला. पुढे मेघनाने केलेले डीडीएलजे चं विच्छेदन खूपच करमणूक करुन गेलं.
असेच म्हणतो, धाग्यापेक्षा
असेच म्हणतो, धाग्यापेक्षा मेघनाचा प्रतिसाद जास्त आवडला.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सहसा अॅक्टींग्/सिनेमे/ग्लॅमर
सहसा अॅक्टींग्/सिनेमे/ग्लॅमर हे नेपच्युनच्या अधिपत्याखाली येतात जसे मेडिटेशन, माध्यम (मिडीअम) बनणे, हिप्नॉटिझम, स्वतःला एखाद्या कलेमध्ये हरवुन टाकणे मुख्य म्हणजे बाऊन्ड्रीज (मर्यादा, सीमा) विरघळून अधित व्यापक तत्वाशी एकरुप होणे वगैरे तसे. सिनेमा पहाताना जर तू विरघळून गेली नसशील, ट्रान्स मध्ये गेली नसशील, पाहील्यांनतर त्या अनुभवाने रिजुव्हनेट झाली नसशील तर ती कला तुझ्यापुरता फेल झाली.
नेपच्युन मीनेचा अधिपती याउलट अगदी मीनेच्या बरोब्बर विरुद्ध रास कन्या. कन्या राशीचा स्वभाव विश्लेषण, चिकीत्सा, च्छल करणे, चिरफाड करुन किस काढणे, बौद्धिक आणि व्यवहारी. पृथ्वी रास असल्याने ज्यात त्यात सार शोधुन ते स्वतःकडे ठेवणारी.
.
तेव्हा जर कन्येची चिकीत्सक वृत्ती गहाण टाकून, त्या त्या कलास्वादात झोकुन देऊ शकलीस तर ती कला (सिनेमा) एकदम रिफ्रेशिंग ठरेल.
.
अर्थात सर्वांनी बुद्धी गहाण टाकुन, इन्ट्युइशन जागृत ठेऊन, प्रतिकात्मक अन्वयार्थ लावतच सिनेमे पहावे असे मी म्हणत नाही. फक्त वरील समीक्षा वाचल्यावर जे विचार आले ते मांडले आहेत. अर्थात सिनेमेही त्या कसोटीला उतरायलाच हवे पण बघे व कला दोघही एका विशिष्ठ भाववृत्ती/मनोवृत्तीत लागतात. बरेचदा मला सिनेमा पहाताना प्रचंड रिसेप्टिव्ह आणि सौंदर्याशी अट्युन झाल्याचा अनुभव येतो जो की कविता वाचतानाही येतो. ते माझे एस्केप्स आहेत, परत एस्केप्=वरुण(नेप्च्युन) ग्रहच. आणि तो अनुभव नवा देवदास पहाताना येतो तितकाच जुना दो आंखे बारह हाथ किंवा नवरंग पहातानाही येतो. खरं तर अनेकांच्या मते, देवदास मध्ये बरेच दोष असूही शकतील पण मला मदत होते.
.
माझा मीन-कन्या अक्ष दाखविणारा लेख मुख्य त्यातील कविता - http://www.aisiakshare.com/node/3204?destination=node%2F3204 (झैरात)
बापरे हे नवीनचं आहे! म्हणजे
बापरे हे नवीनचं आहे! म्हणजे तुमच्या राशीवर डिपेंड असतं का पिक्चर आवडला का नाही ते?
असं मी कुठे म्हटलय?
असं मी कुठे म्हटलय?
कन्या मीन राशी नाहीत का? (
कन्या मीन राशी नाहीत का?
( स्माय्ल्या कशा द्यायच्या इथे शिकवा. )
मी एवढच म्हणू शकते की तो
मी एवढच म्हणू शकते की तो प्रतिसाद नीट वाचा. बस्स.
एकदाच वाचला आणि डोक्यावरुन
एकदाच वाचला आणि डोक्यावरुन गेला.पुन्हा नक्को.बस्स.
हाहाहा. मला वाटतं ज्योतिषात
हाहाहा. मला वाटतं ज्योतिषात रस असणार्यांनाच तो कळेल की काय! पण आता तो एक्स्प्लेन करत बसायची इच्छा नाही.
नको शुचिताई अंत असा पाहू
नको शुचिताई अंत असा पाहू
माझं म्हणणं हे होतं की -
माझं म्हणणं हे होतं की - सिनेमाचा कीस काढत बसण्यापेक्षा बुद्धी ( = बुध = कन्या= मीनच्या १८० अंश विरुद्ध रास) विसरुन, स्वतःला विसरुन जा, त्यामध्ये कलेत हरवुन जा.
काही लोकांना फक्त मारधाड
काही लोकांना फक्त मारधाड सिनेमे आवडतात काहींना गोड्गोड. काहींना गंभीर काहींना डॉक्युमेंटरी तर अशा वेगवेगळ्या जॉनरांचे सिनेमे आवडणार्या लोकांच्या पत्रिकेत कशा कुणाच्या युत्या झालेल्या असतात यावर आपण प्रकाश टाकू शकाल काय. म्हणजे एखादा मनुष्य कोणते सिनेमे पहातो यावरून त्याची रास गेस करता येईल काय? रेकमेंडेड फॉर यू साठी नेट्फ्लिक्स अॅमझोन तत्सम कंपन्या जे आल्गरिदम लिहतात त्यात त्यांना रास हे अजून एक वेरीएब्ल आणून ऑप्शन रिफाइण करता येतील का? म्हणजे कुठल्या राशीचा कुठला काळ चालू आहे वगैरे माहितीवरून. हम्म.
च्यामारी! हे रोचक आहे. तुमची
च्यामारी! हे रोचक आहे.
तुमची जन्मतारीख सांगा तुम्हाला आवडणारे चित्रपट सुचवतो अशी वेबसाईट काढावी काय?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
काढायची का स्टार्टअप?
काढायची का स्टार्टअप?
नेकी और पूछ पूछ ! फाय्नॅन्स
नेकी और पूछ पूछ ! फाय्नॅन्स कोण करणार? मी माझ्या ज्ञानाचे योगदान देइन. कोणीतरी तीसर्याने पब्लिसिटीचे मनावर घ्या.
बाकी खफवर बोलु
बाकी खफवर बोलु
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
एकदम आ ऊट ऑफ बॉक्स थिंकिंग
एकदम आ ऊट ऑफ बॉक्स थिंकिंग आहे हे. मी यावर जरुर विचार करेन, तशी मी "ब्युटी & द बीस्ट" ची सांगड वृश्चिक रास व प्लुटो शी घातलेला लेख लिहीलेला आहेच. गाण्यांबद्दलही लेख लिहीला नसला तरी गाण्याचा फ्लेव्हर आणि रास असा संबंध जोडत असते.
आपले विचार किती जुळतात ना? ग्रेट मेन(वीमेन) थिंक अलाइक
डीडीएलजे कडून परफेकशन ची अपेक्षा का ?
डीडीएलजे काहीही झाले तरी शेवटी बॉलीवुड सिनेमा होता हे विसरून कसे चालेल ? कुठलाही सिनेमा हा त्या वेळच्या समाजाचे थोडे न थोडे प्रतिबिंब असतेच (and vice a versa.) आणि कमर्शियल बाबतीत ते समाजातल्या सध्याच्या वास्तवाचे प्रतिबिंब नसले तरी मानसिकतेचे असते. ती मानसिकता आपली तरी विकसित देशांपेक्षा बर्याच अंशी वेगळी होती. सिनेमातून आदर्शवाद पब्लिक ला आवडायचा . नंतर हळूहळू ते बदलत गेले . (हळुहळू या शब्दावर विशेष जोर.)
त्या काळी डीडीएलजे हा क्रांतिकारीच होता . त्या वेळी भावेल असा क्रांतिकारी. हीरो ने आदर्श असणे डीडीएलजे ने नाकारले . राज च्या मध्ये काही दोष , स्वार्थ , चलाखी हे गुण आहेत आणि ते कुठेही सुधारले नाहीत किंवा पश्चाताप झाला नाही . त्याचे उदाहरण म्हणून काजोल च्या घरातून मार खाऊन निघतानाच्या srk चे डायलॉग आठवा. त्यात खरे प्रेम असले तरी चलाखी आणि सूचक manipulation होते. अमरीश पुरी काजोल ला अचानक 'जा सिमरन' म्हणत नाही . त्या मागे एसआरके ची हुशारी आहे . आणि राज अचानक प्रेमात पडून नीतीमत्ता दाखवत नाही . त्याच्यात ती जाणीव पहिल्यापासून आहे . तो फ्लर्ट करतो इतरही अनेक गोष्टी करत असेल पण फसवून किंवा गैरफायदा घेऊन नाही . प्रेमाचा साक्षात्कार त्याला सिमरन निघून गेल्यानंतरच होतो. पण तरी आदल्या रात्री संधि असतांनाही तो गैरफायदा घेत नाही . आणि म्हणतो " मुझे पता है एक हिंदुस्तानी लाडकी की इज्जत क्या होती है" (फक्त हिंदुस्तानी ?? तेव्हाही खटकला होता . पण पुन्हा आपल्या प्रेक्षकांना गोंजारयला नको का ? असो ! )
डीडीएलजे चा बराचसा सेकंड हाफ मलाही खटकतो . माझ्या मित्रांनाही . पण त्यांना मी हेच सांगतो की त्या वेळच्या नुसार सिनेमा नक्कीच एक पाथ ब्रेकिंग होता. ग्रेट नसेलही . नाहीच . पण खूप चांगला नक्कीच .
डीडीएलजे पहिल्यांदा पाहिला
डीडीएलजे पहिल्यांदा पाहिला तेव्हा मुलींची खूप गर्दी झाली होती आणि त्यात आम्हाला आवडणारी मुलगी होती म्हणून पाहिला असे स्पष्ट आठवतेय. तसा स्वतःला कधीच आवडला नाही. स्टोलन किसेसही आवडेल असे वाटत नाही.
बाकी बायकांच्या माजाला आमचा दुरुनच सलाम.
हे सगळं कुठून येतं?
लहानपणी, जेव्हा फारसं कसलंच स्वातंत्र्य नव्हतं तेव्हा खेळायला कधी मिळणार यावरून आई-वडलांशी भांडायचे, रडायचे प्रसंग येत. 'प्राप्ते तु षोडशे वर्षे' झाल्यावर जबाबदारीची जाणीव झाली; ही भांडणं कमी झाली. खेळायचे नाही असं नाही, पण अभ्यास, वाचन, पैसे मिळवणं, आणि एकंदरच आयुष्याचं नियोजन ह्या गोष्टी समजायला लागल्या. थोडक्यात, अक्कल आल्यावर, जरा बाहेरचं जग बघितल्यावर करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात आणि वेळ फुकट घालवू नये याची अक्कल आली. भारताबाहेरचे चित्रपट बघण्याची सवय नसणाऱ्यांना इतरत्र काय सुरू आहे याची जाणीव आली नाही तरी समजण्यासारखं आहे. पण चोप्रा किंवा जोहर कुटुंबात जन्म घेऊन, जिथे ह.पा. गाण्यांच्या निमित्ताने लोकं परदेशप्रवास घडत असे, त्या लोकांनाही खेळायचा वेळ मिळण्यासाठी रडारड, भांडाभांड करावी लागते ही तक्रार आहे.
आजूबाजूचे चित्रपट गाळसाळ आहेत म्हणून मी ही जरा कमी(?) गाळसाळ सिनेमा काढणार याला काही अर्थ नाही. एकेकाळी फक्त एखादं गाणं परदेशात घडायचं. हे राज आणि सिमरनचं आख्खेच 'मेड इन युके' होते. हे लोक, विशेषतः ती सिमरन, शाळेत, कॉलेजात आजूबाजूच्या लोकांशी कधी, काही बोललीच नाही? आजचे एनाराय कसे वागतात, ते बघून अमरीश पुरीचं पात्र जरा ताणलेलं, पण अतर्क्य वाटत नाही. पण याच एनारायांची पुढची पिढी बघून सिमरन ही व्यक्ती इंग्लंडमध्ये न राहता स्वतःच्या घरात राहते, एवढंच म्हणावंसं वाटतं. सर्वसामान्य टीनेजरांमध्ये जी बंडखोर वृत्ती असते ती हिच्याकडे नाही, अधिक परिपक्वता आहे; मग आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्याची बुद्धी हिला कशी येत नाही? तो राज अचानक शहाण्यासारखा कसा काय वागायला लागतो? सिमरनचा बाप मनाने पंजाबातच राहिलाय, पण ही सिमरन अनेकानेक वर्षं भारतात न जाऊनही, इंग्लंडात राहूनही एवढी भारतीय आदर्श नारी कुठून बनली? मिडीओकर बुद्धी आणि कर्तबगारीच्या लोकांना सिनेमात मुख्य भूमिका देण्याबद्दल आक्षेप नाही. पण मग ते लोक अचानक आपली मिडीओकरी कशी काय सोडून देऊ शकतात? हे सगळं खोटं आणि अवास्तव वाटत नाही का? 'हे सगळं कुठून येतं' असा प्रश्न पडत नाही का?
'स्टोलन किसेस'सारखे सिनेमे मला तरुण वयातच बघायला मिळाले असते तर फार बरं झालं असतं. आयुष्यात प्रेम आणि लग्न सोडून इतर महत्त्वाच्या बऱ्याच गोष्टी आहेत, आणि असा विचार करणारे बरेच लोक आहेत, मी एकटीच वेडपट नाही, हे मला समजलं असतं. राज आणि सिमरनच्या असण्यावर फार आक्षेप नाही; असे बरेच दिवटे आजूबाजूला असतात. पण 'स्टोलन किसेस'सारखं, गोंधळ दाखवणारं, काहीही ठोस विधान न करणारं काहीही का दिसत नाही? मी कॉलेजात असताना अनुराग कश्यपसारखे लोक कुठे होते? ('अग्ली'मध्ये शेवटी हातात काहीच राहत नाही; लोक स्वार्थी असतात; हेच लोक प्रेमळही असतात; ह्या संदर्भात अनुराग कश्यप आणि 'अग्ली'.) हीरो किंवा हिरॉईन नसलेले, पण ठराविक पात्रांची मुख्य भूमिका असलेले सिनेमे तेव्हा का बनले नाहीत? (उदा: 'आंखो देखी'मध्ये बाबुजी हा हिरो नाही, ते मुख्य पात्र आहे.)
एवढं सगळं म्हटल्यावर दिदुलेजा हा व्यावसायिक सिनेमा होता, 'मला व्यक्तिगत पातळीवर तो आवडला' असं कोणी म्हणायला काहीच ना नाही. पण ते वेडे चाळे जेवढे खपले ते पाहता आपण समाज म्हणून एवढे का ढ आहोत, असा प्रश्न पडतो. 'मी एकटीच वेडपट नाही' हे समजायला बरीच वर्षं लागली, पण निदान समजलं तरी!
हा उद्वेग समीक्षा म्हणून लिहिला आहे, पण ही समीक्षा 'स्टोलन किसेस'ची नाही. ही स्वतःचीच, स्वतःच्या एकेकाळच्या भोवतालाची समीक्षा आहे. 'स्टोलन किसेस' मला आवडला, असं ठोस विधानही मी करू शकत नाही. इच्छा असेल तर जरूर बघा, मला वेळ फुकट गेल्यासारखं वाटलं नाही, असं काही व्यावहारिक विधान फारतर करेन.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आजूबाजूचे चित्रपट गाळसाळ आहेत
असले सर्व प्रश्न मला पडतात अदिती तै म्हणुन मी हे टुच्चे सिनेमे बघतच नाही.
एखादे गाणे किंवा एखादा संवाद किंवा ३ तासामधली ५ मिनिटे चांगली होती म्हणुन उरलेले २ तास ५५ मिनिटे स्वताला मूर्ख बनवुन घ्यायचे हे काही जमणारे नाही.
गाळसाळ सिनेमे पाहील्याशिवाय ,
गाळसाळ सिनेमे पाहील्याशिवाय , चांगल्या सिनेमांची किंमत कशी कळणार अनुताई?
ते बाय डीफॉल्ट लहानपणी पाहीले
ते बाय डीफॉल्ट लहानपणी पाहीले आहेतच ना, तेंव्हा काही पर्यायच नसायचा. जे दुरदर्श्न वर येइल ते गप्चुप बघायचे.
गाळसाळ बघायचा आयुष्याचा कोटा संपवुन टाकला तेंव्हाच.
हाहाहा गावचं पाटील अन त्याची
हाहाहा गावचं पाटील अन त्याची वंगाळ नजर.
“Uber Ex,”
इथे एवढी मोठी प्रतिक्रिया टंकल्यानंतर हे वाचलं - “Uber Ex,” a Rom-Com Spec Script साधारण बॉलिवुडी सिनेमे हे असेच वाटतात; आणि दुर्दैवाने ते फक्त रोम्यांटिक म्हणूनच गणले जातात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
डीडीएलजे आणि नमस्ते लंडन
डीडीएलजे आणि नमस्ते लंडन हे सिनेमे एकमेकांचे inverse आहेत.
हा शोध मला फार पूर्वीच लागलाय, आत्ता हे सगळं वाचून परत आठवला.
गोष्ट सारखीच : मुलीचं प्रेम परदेशातल्या मुलावर. म्हणून आई बाप देशात येवून ओळखीच्या कुटुंबातल्या देसी/देहाती मुलाबरोबर लग्न ठरवतात.
आता डीडीएलजेमध्ये परदेशातला मुलगा हा हिरो असल्याने तो जिंकतो ( जिंकतो की दुसरा मुलगा वाचतो हा वादाचा मुद्दा ) पण म्हणजे परदेशातल्या बिघडलेल्या मुलाला त्याचं प्रेम मिळतं.
उलट नमस्ते लंडनमध्ये देसी/देहाती मुलगा हा हिरो असल्याने मुलगी तिच्या फिरंगी प्रेमाला सोडून ह्याच्याकडे धावत येते.
तात्पर्य : गाणी ऐका, ऐश करा. कथेवर फारसा विचार करू नका.
-सिद्धि
अगदी!
सिमरन इंग्लंडमध्ये न राहता स्वतःच्याच घरात राहते, असं म्हणताना मला 'नमस्ते लंडन'मधलं कत्रिनाचं पात्रच आठवत होतं. ती निदान नॉर्मलतरी वाटते. सिनेमा साधारण त्याच कारणांसाठी गचाळ, कारण १. आयुष्याची इतिकर्तव्यता प्रेम आणि लग्न यांतच आणि २. हीरो थोर दाखवण्यासाठी दुसऱ्याला थेट वाईट-व्हिलन बनवून टाकायचं; पण निदान माफक बंडखोरी आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आयुष्यात प्रेम आणि लग्न सोडून
हम्म्म.. आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते खरी. बहुतेक भारतीयांच्या आयुष्यात बहुतेकवेळा वेळ निघून गेल्यावर येते. तरुणपणी आतून मारल्या जाणार्या धडकांचा निचरा व्हायची अधिकृत अशी एकमेव सोय असते. तो निचरा झाला की कळतं हे; पण उशीर झालेला असतो.
यथावकाश, आयुष्यात काहीच महत्त्वाचं नसतं आणि जन्मल्यापासून मरेपर्यंतच्या वेळात काहीतरी करण्याचं फक्त कम्पल्शन असतं, हेही कळतं. त्या बळजोरीच्या उद्योगातही करोडो लोक करतात ते आपण केलं नाही; करोडो लोक पाहतात ते आपण पाहिलं नाही; करोडो लोकांना आवडतं ते आपल्याला आवडलं नाही तर उगीचच स्वतःच्या अस्तित्वाला अर्थाचा एक एक्स्ट्रा पदर जोडला गेल्याची भावना येते व आपल्याला दुसर्यांची कीव करता येते. इतर लोकही दरम्यान ते करतात तेच अर्थपूर्ण आणि बाकीच्यांचं वाया गेलेलं आयुष्य हे कलेक्टिव्हली ठरवून आपली कीव करण्यात मग्न असतात. अशा लोकांची संख्या जास्त आहे म्हणून आपली चिडचिड जास्त होते; पण त्याला इलाज नाही. आपल्या सारखे जास्त झाले तर स्पेश्शल आणि बंडखोर असल्याचा क्षुल्लकसा आनंदही जाईल सगळा. म्हणून अशा करोडो लोकांचे आभार.
आपल्या सारखे जास्त झाले तर
क्या बात है ननि. या लायनीबद्दल मजकडून तुम्हांस एक स्क्विसितो पिझ्झा लागू.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
यथावकाश, आयुष्यात काहीच
ये बात, ननि, ये बात! वाखू साठवण्याजोगा प्रतिसाद. तुमच्या या प्रतिसादात (कमीतकमी) एक कथा आहे, ती लवकरात लवकर लिहावी.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
+१
अगदी सहमत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आयुष्यात काहीच महत्त्वाचं
अगदी हेच्च. आयुष्य एक पोकळी असते जी आपण भरत जातो कोणी कशाने तर कोणी कशाने. अगदी हेच्च काल माझ्याही मनात येत होतं.
मस्त
मस्त प्रतिसाद ननि..
(आबांना) अनुमोदन आणि (ननिंचं
(आबांना) अनुमोदन आणि (ननिंचं या थोर प्रतिसादाकरता) अभिनंदन.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
श्रेणी देऊन भागले नाही म्हणून..
प्रतिसाद ऑव्ह द मन्थ.
क्रेक्ट...!
आणी बंडखोर असल्याचा हा क्षुल्लकसा आनंद जाउ नये म्हणून मी तरी अंजावर फार मोठी किंमत मोजतो. बट इट इज वर्थ
actions not reactions..!...!
त
त
"स्टोलन किसेस" पाहिला नाही.
"स्टोलन किसेस" पाहिला नाही. "दिलवाले दुल्हनिया.." पाहिला आहे. "४०० ब्लोज" पाहिला आहे.
लेखातलं परीक्षण/चिंतन मजेशीर वाटलं.
राज आणि अंत्वान यांची तुलना ही दोन वेगळ्या प्रतलांवरची वाटते. राजचं चित्रण स्टिरिओटिपिकल आहे. इतकं की उदाहरणार्थ परवा ते "दिलवाले" नावाच्या २०१५च्या सिनेमामधलं "गेरुआ" हे गाणं पाहिलं आणि ते १९९५च्या "दिलवाले दुल्हनिया.."मधे ते चांगलंच फिट्ट बसलं असतं असं वाटलं. (२०१५ चा "दिलवाले" पहाण्याची शामत केलेली नाही. त्यामुळे त्यातल्या "हिरो"चं त्यात कायकाय होतं त्यावर भाष्य करू शकत नाही.)
त्रुफोंने जाँ-पियार लेऑ याला घेऊन तीन सिनेमे काढले आणि ते तीन्ही निम्न-आत्मचरित्रात्मक होते असं ऐकलं आहे. चूभूद्याघ्या. त्यातलं मी पाहिलं त्यात मध्यमवर्गातल्या मुलामुलींना स्वप्नील दुनियेत घेऊन जाण्याचा, परदेशातल्या टुरिस्ट्लक्ष्यी स्थळांच्या दर्शनाचा लाभ करून देण्याचा, प्रतिगामी वाटतील अशा रूढींना पाळून किंवा खोटं वागून, व्यक्तींची प्रतारणा करून हवं ते साध्य करण्याच्या वृत्तीला उचलून धरण्याचा प्रयत्न दिसला नाही.
राज आणि अंत्वान यांची तुलना ही दोन वेगळ्या प्रतलांवरची वाटते.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
मर्त्य पण गोड
तुलना दोन प्रतलांवरची असू शकेलही, पण त्यासाठी दिलेलं वरचं विश्लेषण फारसं पटलं नाही.
माझ्या मते हा तुलना करण्यामागचा महत्त्वाचा घटक आहे. आयुष्यात काहीही अचिव्ह केलेलं नसतानाही सर्वगुणसंपन्न असलेला आणि वर नैतिक अधिष्ठानही बाळगणारा हिंदी सिनेमाचा नायक म्हणजे एक चकचकीत बेगडी स्वप्नरंजन असतं. तो कुणाला आवडूही शकतो. पण, त्या तुलनेत ऑन्त्वान द्वानेल पाहिला तर काय दिसतं?
असा मर्त्य पण गोड माणूस एखाद्याला अधिक हृदयस्पर्शी वाटू शकतो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
लेखही आवडला अन
लेखही आवडला आणि प्रतिसादसुद्धा. दोन्ही तुल्यबळ.
स्टिरिओटाईप हीच तक्रारींची सुरुवात
बहुतांश चित्रपट कोणत्यातरी व्यक्तीच्या आयुष्यातला काही काळ दाखवणारे तुकडे असतात. दिदुलेजा किंवा स्टोलन किसेस हे चित्रपट दोन तरुणांच्या आयुष्यातलं थोडं तारुण्य, तेव्हाची धडपड दाखवणारे आहेत. तो काळ एवढा कमी आहे की ह्या वर्ष-दोन वर्षांत कोणतीही व्यक्ती आमूलाग्र बदललेली दिसत नाही. ऑन्त्वान सुरुवातीला गोंधळलेला आहे, नंतरही तसाच मर्त्य आणि लूजरछाप इसम आहे. त्याचा गोड स्वभावही बदललेला नाही. बदलण्यासाठी त्याच्या आयुष्यात 'हिला के रख दूंगा' छाप काही घडलेलंच नाही.
मग दिदुलेजामधला राज सुरुवातीला लूजर, किंचित डोक्यात जाणारा आणि बालिश असतो; तो अचानक 'हीरो' कसा बनतो? माणसांचा स्वभाव बदलतो, विचार करण्याची, व्यक्त होण्याची पद्धत बदलते पण हे सगळं एका दिवसांत होतं का? राजचं चित्रण स्टिरिओटिपिकल आहे इथेच तर तक्रारीला सुरुवात होते. १९९० च्या दशकात स्टिरीओटाईप वगळता दुसरं काही का नव्हतं, स्टिरीओटाईप आणि अतर्क्य राज एवढा कसा खपला, जगाचा अनुभव नसणाऱ्या तरुणांना तो काही प्रमाणात आवडला हे ठीक पण धो-धो चालण्याएवढा का आवडतो, ह्या गोष्टी मला त्रास देतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आपल्याला न आवडलेल्या गोष्टी
आपल्याला न आवडलेल्या गोष्टी दुसर्याला आवडलेल्या पाहून तुम्हाला त्रास होतो??? कमाले!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
काही सांगता येत नाही हो या
काही सांगता येत नाही हो या मासोकीस्टांचं! सगळीकडे स्वतःला त्रास करवून घेतात मेल्या!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
दिदुलेजा ची तुलना स्टोकि सोबत करावी वाटणे
इज कंपेरींग अॅपल विद ऑरेंजेस...! हिंदी चित्रपट सृष्टी भारतीय परंपरांशी सलग्नता राखत नायक नायीकेचे आदर्शीकरण करणारी आहे, त्याचे बदलत्या काळानुसार पडलेले प्रतिबींब म्हणजे म्हणजे DDLJ (णॉट दिदुलेजा प्लिज).
तिथला सुपरमॅन वेगळा आपला क्रीश वेगळा. तिथला ट्र्मीनेटर जजमेंट डे वेगळा आणी आपला त्याकथेचे अक्षरशः विडंबन करणारा RA ONe वेगळा. तिथल्या सेवींग प्रायवेट रायनमधे संदेसे आतेहे गाणे कधीच असणार नाही आणी आपल्या इथे बॉर्डमधे ते आहे म्हणून मी स्वतःवर कधीच चिडचिड करु शकणार नाही कॉ़ज इट डसंट मॅटर हाउ चाइल्डीश आय बिहेव... डीप डाउन इन्साइड देर्र्र्र्र्र्र्र्र्र्र.. इज अ कॉर्नर हु नोज वेरी वेल व्हॉट ग्रोनप पिपल डु नॉट डू...
actions not reactions..!...!
जग वाचवणं = विनोदाचं भांडार
टर्मिनेटर आणि असले 'जग वाचवणारे' हॉलिवूडपट मी अत्यंत आनंदाने बघते; त्यांतले डायलॉग्जही मी पाठ करते. हे सिनेमे बघून मला काहीही त्रास होत नाहीत. विनोदी सिनेमे बघून त्रास कसा करून घेणार?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
जग वाचवणं = विनोदाचं
जग वाचवणं = विनोदाचं भांडार
अगदी अगदी त्याच पातळीवरची एक कन्सेप्ट मला वाटते ती ही की - आपण खर्च करणं म्हणजे इकॉनॉमी वाहती ठेवणं.