नैसर्गिक शेती - भाग ४
नैसर्गिक शेती हा शब्दप्रयोग अलिकडे बराच ऐकण्यात-वाचण्यात येतो. ही नेमकी काय भानगड आहे, आणि त्यातल्या तज्ञ म्हणवणाऱ्या लोकांनीही त्यात कसे वैचारिक गोंधळ घालून ठेवले आहेत, त्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा या टिपणांमधून प्रयत्न करते आहे. या मालिकेतील माहिती ही बव्हंशी माझे वडील डॉ. आनंद कर्वे यांनी गेल्या साठेक वर्षांत केलेल्या कामावर आधारित आहे. कार्यबाहुल्यामुळे जेव्हा वेळ होईल तेव्हा छोट्या छोट्या टिपणांमधून विषय पुढे पुढे नेत राहीन.
....
अनुक्रमणिका: नैसर्गिक शेती - भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८
...
वनस्पतींच्या वाढीत मातीची नेमकी काय भूमिका आहे, या विषयाकडे वळू या.
कृषिशास्त्रातला एक सर्वमान्य नियम आहे की मातीतल्या सूक्ष्म जीवांची संख्या जेवढी अधिक तेवढी त्या मातीची सुपीकताही अधिक असते, म्हणजेच अशा मातीत वनस्पतींची उगवण व वाढ जास्त चांगली होते. पण सुपीक म्हणजे नेमके काय?
वनस्पतींच्या चांगल्या वाढीसाठी सूर्यप्रकाश, कार्बन डायॉक्साइड व पाणी या प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक गोष्टींबरोबरच इतर काही पदार्थांचीही (नायट्रोजन, पॉटेशियम, फॉस्फरस, लोह, इ.) आवश्यकता असते. पण हे पदार्थ पाण्यात विद्राव्य स्वरूपात असतील तरच मुळांनी शोषलेल्या पाण्यावाटे वनस्पतींना ते घेता येतात. सुपीक जमिनीत या झाडांच्या योग्य पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या पदार्थांचे प्रमाण नापीक जमिनीच्या तुलनेने जास्त सापडते. आता याच्याशी मातीतल्या सूक्ष्म जीवांचा काय संबंध आहे? कृषितज्ञ याचे जे स्पष्टीकरण देतात ते असे आहे -
ज्या मातीत वनस्पती वाढतात, तिथे त्यांची गळून पडणारी फुले, फळे, पाने, काटक्या-कुटक्या, फांद्या, इ. सेंद्रिय पदार्थ सहजगत्या उपलब्ध असतात. हे अन्न उपलब्ध असल्याने मातीत सूक्ष्म जीव राहू शकतात. या बाहेरून मिळणा-या सेंद्रिय अन्नातली कर्बोदके सूक्ष्म जीवांनी ग्रहण केली की इतर घटक बाहेर पडून मातीत मिसळले जातात. अशा त-हेने मातीतल्या या घटकांचे प्रमाण वाढल्याने मातीची सुपीकता वाढते.
जीवशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर ही कारणमीमांसा चुकीची आहे. ही पोषणद्रव्ये वनस्पतींसाठीच आवश्यक आहेत असे नाही, तर सर्वच सजीवांच्या पोषणासाठीही ती आवश्यक आहेत. वनस्पतींपासून अन्नसाखळी सुरू होते, आणि एकदा वनस्पतींमध्ये हे पदार्थ आले, की ते इतर सजीवांनाही कर्बोदकांच्या जोडीने उपलब्ध होतात. इतर सजीवांमध्येच सूक्ष्म जीवही आले. त्यामुळे मातीतले सूक्ष्म जीव जेव्हा सेंद्रिय पदार्थ खातात तेव्हा ते या पदार्थांमधील कर्बोदकांबरोबरच इतर घटकांचेही ग्रहण करतात. इतकेच नाही, तर वनस्पतींमध्ये हे पदार्थ त्यांच्या शुष्कभाराच्या केवळ पाच टक्के असतात, तर सूक्ष्म जीवांमध्ये पंधरा टक्के. म्हणजे सूक्ष्म जीव हे पदार्थ मातीत तसेच मागे ठेवत तर नाहीतच, उलट कोणत्यातरी दुसऱ्या स्रोतातून आणखी पोषक द्रव्ये मिळवतात असे दिसते. मग सूक्ष्मजीवांमुळे जमिनीची सुपीकता वाढण्याचे काय कारण असावे?
अनेक वर्षे अभ्यास केल्यानंतर डॉ. आनंद कर्वे यांना हे कोडे उलगडले.
मृद्शास्त्रानुसार पाण्यात लीलया विरघळणारी खनिजे पावसाने कधीच वाहून नेली आहेत. आता जी खनिजे मागे राहिली आहेत ती पाण्यात फारच कमी प्रमाणात विरघळतात (उदा. एक लिटर पाण्यात सुमारे पाच मिलिग्रॅम). इतक्या कमी विद्राव्यतेची खनिजे वनस्पतींना मातीतून घेता येत नाहीत. पण मातीतल्या सूक्ष्म जीवांना मात्र पाण्यात अत्यल्प प्रमाणात विरघळलेली खनिजेसुद्धा ग्रहण करता येतात, हे सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासातून दिसून आले आहे. त्यामुळे या सूक्ष्म जीवांना जरी फक्त कार्बनचा स्रोत ठरेल असे अन्न मिळाले (उदा. शुध्द साखर – यात कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्याखेरीज दुसरे काहीच असत नाही), तरी आपल्याला लागणारी पोषणद्रव्ये ते मातीच्या कणांनी केशाकर्षणाने पकडून ठेवलेल्या पाण्यात विरघळलेल्या खनिजांवाटे मिळवू शकतात. सूक्ष्म जीवांच्या पेशिकांमध्ये कार्बन आणि या पदार्थांचा वापर करून पेशिकेतील जैवरासायनिक पदार्थ तयार केले जातात.
अर्थात पुढचा प्रश्न हा आहे, की सूक्ष्म जीवांच्या पेशींमध्ये असलेली ही पोषक द्रव्ये वनस्पतींना कशी उपलब्ध होतात?
जमिनीत एक अन्नसाखळी असते. आपण आत्ता जीवाणू किंवा बॅक्टिरियांच्या जीवनव्यवहाराची चर्चा करतो आहोत. त्यांना मातीत रहाणारे अमीबा हे एकपेशीय प्रणी खातात. काही कृमी आणि गांडुळे हे अमीबांना खातात तर जमिनीत राहणारे काही संधिपाद प्राणी (कीटक, गोम, कोळी, खेकडे इ.) या कृमी आणि गांडुळांना खातात. चिचुंद्र्या आणि काही पक्षी हे सुध्दा गांडुळांना आणि संधिपादांनाही खातात. या अन्नसाखळीतला कोणताही घटक आपले स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही. पण श्वसनामुळे प्रत्येक घटकाच्या शरीरातील कार्बनचे प्रमाण सतत कमी होत असते आणि कार्बनच्या तुलनेत एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असणारे हे इतर पदार्थही मलमूत्राच्या रूपाने शरिराबाहेर टाकले जात असतात. प्राणी मेल्यावर त्यांच्या कलेवरांमधूनही कार्बनबरोबरच इतर पदार्थ मातीत मिसळले जातात. मातीतल्या खनिजांपेक्षा या जैवरासायनिक पदार्थांची पाण्यात विरघण्याची क्षमता अधिक असल्याने ते वनस्पतींना मातीतून घेता येतात. अशा त-हेने सूक्ष्म जीवांनी ग्रहण केलेली मातीतली पोषक द्रव्ये या अन्नसाखळीद्वारे वनस्पतींना उपलब्ध करून दिली जातात.
वनस्पती आणि मातीतले इतर सजीव हे असे सुंदर सहजीवन जगत असतात. वनस्पती इतर सजीवांच्या अन्नसाखळीला कार्बन पुरवतात, तर इतर सजीवांची अन्नसाखळी मातीतील पोषक द्रव्ये वनस्पतींना उपलब्ध करून देण्याचे काम करते.
या साऱ्या प्रक्रियेत इतरही काही बारकावे आहेत, त्यांची चर्चा पुढे येईलच.
...
अनुक्रमणिका: नैसर्गिक शेती - भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८
...
प्रतिक्रिया
आभार
अहा! अगदी समजेल अशा भाषेत लिहीले आहे.
आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
रोचक.
रोचक.
आणि
या वाक्यांमध्ये इतर पदार्थ म्हणजे नायट्रोजन, पॉटेशियम, फॉस्फरस, लोह, इ. असंच ना?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हो बरोबर आहे. इतर पदार्थ
हो बरोबर आहे. इतर पदार्थ म्हणजे पोषणासाठी आवश्यक असलेली मातीतून मिळवलेली इतर द्रव्ये.
प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ
एका बंद काचेच्या पेटीत चांगली
एका बंद काचेच्या पेटीत चांगली भाजलेली माती,डि० पाणी देऊन झाडे वाढतात का पाहायला हवे.आता अवकाशात शेवंतीला फुल आले तसं काहीतरी.
सॉरी ... पण या प्रतिक्रियेचा
सॉरी ... पण या प्रतिक्रियेचा धाग्यातल्या मजकुराशी काय संबंध, ते मला समजलं नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
माझ्या वडिलांच्या
माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्मजीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी याच्या जवळ जाणारा प्रयोग केला होता. प्रयोगशाळेत निर्जंतुक वातावरणात, भाजलेल्या आणि निर्जंतुक करून घेतलेल्या मातीत, मातीत सापडणाऱ्या जीवाणूंचे कल्चर टाकले. टिशुकल्चर प्रयोगशाळेची निर्जंतुक यंत्रणा यासाठी वापरलेली होती. यात बाहेरून फक्त शुध्द साखर आणि निर्जंतुक पाणी घातले. एका दिवसात जीवाणूंची संख्या कित्येक पटीने वाढली. मातीशिवाय फक्त साखरेवर जीवाणू वाढू शकले नाहीत.
प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ
मातीशिवाय फक्त साखरेवर जीवाणू
याचा कार्यकारणभाव काय असतो; अन्य पोषणद्रव्यांचा अभाव?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अगदी बरोबर. केवळ शुध्द
अगदी बरोबर. केवळ शुध्द साखरेवर कोणीच सजीव तगू शकत नाही.
प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ
माती आणि हवा निर्जंतूक असली
माती आणि हवा निर्जंतूक असली तरी झाडे वाढतात का असं म्हणायचं आहे.अथवा बाजूलाच अशा एका पेटीतले नेहमीचीच माती वगैरे असलेले रोप अधिक जोमदार वाढते का बघायला पाहिजे.एकमेका सहाय्य करू जीव मातीत असणे/नसणे याचा फरक बघण्यासाठी.अवकाशात गुरुत्वाकर्षण नसणे हा अधिक मुद्दा सोडून देऊ.
माती आणि हवा निर्जंतुक ठेऊनही
माती आणि हवा निर्जंतुक ठेऊनही झाडे वाढवता येतात - पण त्यासाठी पाण्यात विद्राव्य अशी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशिअम, लोह, जस्त, इ.ची संयुगे - म्हणजेच खते - मातीत घालावी लागतील.
प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ
पण त्यासाठी पाण्यात विद्राव्य
हे वाचून मुळात माती म्हणजे काय? हा प्रश्न पुन्हा उफाळून आला.
हे घटक 'मातीत' असतातच ना किंबहूना माती म्हणजेच या घटकांचे मिश्रण ना? तुमच्या मते हे जीव फक्त त्यांना विद्राव्य बनवतात! असे मला समजले होते. ते बरोबर का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अगदी बरोबर. पण निर्जंतूक
अगदी बरोबर. पण निर्जंतूक मातीत अविद्राव्य रसायने घेऊन विद्राव्य रसायने तयार करण्याचे काम करायला जंतूच नसतील. त्यामुळे अशा मातीत विद्राव्य स्वरूपातील रसायने बाहेरून घालावी लागतील.
प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ
माती हा आधार आहे.वाळूही आधार
माती हा आधार आहे.वाळूही आधार आहे.
म्हंजे? वाळू ही एकप्रकारची
म्हंजे? वाळू ही एकप्रकारची मातीच ना?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हो. वाऴू म्हणजेही मातीचाच एक
हो. वाऴू म्हणजेही मातीचाच एक प्रकार. पण त्यात पाणी टिकून रहात नसल्याने वनस्पतींच्या वाढीला अडसर निर्माण होतो. वाळूच्या वाफ्यात पाणी राखून ठेवता आले तर शेती करता येऊ शकते, यावरही आम्ही पूर्वी काही काम केले आहे.
प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ
सॉईल क्रिस्टल किंवा वॉटर बॉल
सॉईल क्रिस्टल किंवा वॉटर बॉल वर पण झाडे लावता येतात.
मस्त असतात.
फ्लॉवरपॉट मधे वापरायला पण छान असतात ,पण फ्लॉवर पॉट पारदर्शी पाहिजे खरी मजा येण्यासाठी.
महत्वाचा मुद्दा हा आहे की,
महत्वाचा मुद्दा हा आहे की, वनस्पतींना उभे रहाण्यासाठी आधार असेल, आणि पाणी व पाण्यावाटे आवश्यक पोषण द्रव्ये पुरवण्याची सोय असेल, तर मातीचीही गरज नसते. हाय़ड्रोपॉनिक्स किंवा मातीविना शेतीमध्ये हेच तत्व आहे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या इतर कृत्रीम आधारांवरही याच तत्वानुसार वनस्पतींची वाढ केली जाते. मी इथे मुख्यतः निसर्गात वनस्पती कशा वाढतात, त्यासाठी त्यांना लागणारी वेगवेगळी आदाने कोठून येतात, याचे विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ
क्ृपया रासायनिक खतांमुळे
क्ृपया रासायनिक खतांमुळे मातीचे नुकसान कसे होते यावरही प्रकाश टाका. एरवी हे असे नुकसान होते, म्हणून रासायनिक खतांचा वापर टाळावा अशी विधाने स्वैरपणे केली जातात.
त्यातही रासायनिक खते नकोतच का की त्यांचा योग्य प्रमाणात वापर ठीक असतो हेही सांगावे.
उदाहरणादाखल युरिया, अमोनियम नायट्रेट अशा सामान्यपणे वापरल्या जाणा-या खतांमुळे जो दुष्परिणाम होतो असे म्हटले जाते म्हणजे नेमके काय होते हे सांगितले जात नाही. त्यातूनही नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटायला हरकत नाही.
बाकी श्रीपाद दाभोळकरांनी शेतीविषयक गणिते दिली आहेत. ती आडाखे बांधायला व उत्पादनात प्रगती करण्यासाठीचे निकष ठरवण्यासाठी मार्गदर्शक आहेत. या दाभोळकरांचे नावही फार कोणाला माहित नसते, काम माहित असण्याबद्दल तर प्रश्नच नाही.
खते जोपर्यंत पाण्यात
डॉ. प्रियदर्शिनी यावर अचूक आणि खुलासेवार लिहितीलच, पण तोपर्यंत.
खते जोपर्यंत पाण्यात विद्राव्य असतात तोपर्यंत ती जमिनीत साचून राहात नाहीत. पण जमिनीतल्या कॅल्शिअम, लोह वगैरेसारख्या धातूंच्या अणूंसोबत संयोग पावून या खतांतून अविद्राव्य किंवा नाममात्र विद्राव्य अशी सल्फेट्स, फॉस्फेट्स, क्लोराइड्स वगैरे संयुगे निर्माण झाली तर जमिनीत त्यांचा क्षारांसारखा थर तयार होतो. त्यात भरपूर पाणी आणि निचरा न होणे यामुळे जमीन खारपड होते, नापीक बनते.
कै.श्रीपाद दाबोलकर आणि त्यांचा प्रयोगपरिवार यांचे नाव माहीत नाही असा प्रयोगशील शेतकरी सापडणे कठिण. निदान सातारा-सांगली-कोल्हापूर परिसरात तरी. शहरी भागाची गोष्टच वेगळी. तिथे नाचणी, वरई आणि बाजरी यातला फरकही समजवावा लागतो.
अतिच अवांतर आणि स्वतःच स्वतःला अभिव्यक्तिस्वातंत्र्य बहाल करून : या निमित्ताने दाबोलकर भावंडांना एक विनंती करावीशी वाटते. त्यांनी त्यांच्या घराण्याचे महाराष्ट्राच्या आर्थिक, कार्षिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक इतिहासात योगदान' या दृष्टीने दस्त-ऐवजीकरण करावे. तो एक अनमोल ठेवा होईल. न जाणो, डॉ.दत्तप्रसाद किंवा अन्य कुणाच्या हे योगायोगाने वाचनात येऊ शकले (डॉ. प्रियदर्शिनींप्रमाणेच) तर त्यांनी हे मनावर घ्यावे.
जसे कर्वे-परांजप्ये विस्तारित परिवाराला डावलून महाराष्ट्राच्या अनेक पैलूंचा इतिहास लिहिता येणार नाही, तसेच काहीसे. (इथे कुणाचीही तुलना अजिबात अपेक्षित नाही. ओघाने आठवले म्हणून.)
दाभोळकर यांच्याबद्दलचा हा
दाभोळकर यांच्याबद्दलचा हा पलीकडल्या वर्षीच्या दिवाळी अंकातला लेख.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
कर्वे बाई आपण समुचीतवाल्या
कर्वे बाई आपण समुचीतवाल्या कर्वे ना! फलटणला आरती संस्था तुमच्या वडीलांचीच ना? मी फलटणचाच व शेती करतो.
™ ग्रेटथिंकर™
हो. तीच मी. आरती संस्था
हो. तीच मी.
आरती संस्था (अप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलजी इन्सटिट्यूट माझ्या वडिलांनी आणि काही सहकाऱ्यांनी सुरू केली, आता त्यांनी संस्थेच्या दैनंदिन कामकाजातून निवृत्ती घेऊनही काही वर्षे झाली आहेत. २००५ साली आरतीच्या एका प्रकल्पाचा भाग म्हणून मी समुचित एन्व्हायरो टेक ही कंंपनी सुरू केली. २०१० पासून कंपनी आरतीच्या टेकूशिवाय स्वतंत्रपणे काम करते आहे.
प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ