मानवी जीवनात धर्माचे स्थान काय?
ऐसी अक्षरे चे वाचक मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देतील अशी अपेक्षा आहे.
मिसळपाववरील शंकराचार्यावरचा धागा आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचल्या. त्या धाग्यात म्हटले आहे की आपल्या सर्वोच्च धर्मगुरूंविषयी किंवा धर्माविषयी हिंदूंइतके औदासिन्य दाखविणारा दुसरा समाज नसेल!! खरे तर मला "मानवी जीवनात धर्माचे स्थान काय" हा मुद्दा त्याच चर्चेत मांडायचा होता.पण चर्चा अजून भरकटायला नको म्हणून नवा धागा काढत आहे.
मुळात धर्माची स्थापना का झाली असावी?माणूस गुहेतून बाहेर आला, समुदाय करून राहायला लागला, शेती करायला लागला त्यावेळी समाजात अर्थातच राजसत्ता नव्हती.जर कोणी दुसऱ्यावर अन्याय केला तर त्याबद्दल जाब विचारायला काही यंत्रणा नव्हती.बळी तो कान पिळी असाच न्याय त्यावेळी असायची शक्यता जास्त.अशा वेळी समाजातील जाणत्या लोकांना अशा प्रकारचा लगाम घालणारी एखादी यंत्रणा असावी असे वाटायला लागले तर ते नवल नाही. यातूनच नक्की कोणती वर्तणूक योग्य आणि कोणती अयोग्य याबद्दल नियमावली पुढे आली. समाजातील ज्या घटकांना अशी नियमावली मान्य नसेल त्या घटकांसाठी "तू नियम मोडलेस तर तुला पाप लागेल" या धर्तीवर पाप-पुण्याची आणि सगळ्यांच्या पाप-पुण्याचा हिशेब ठेवणारी शक्ती म्हणून देवाची संकल्पना पुढे आली. नंतरच्या काळात या नियमांमध्ये कालपरत्वे बदल करून, त्यात भर टाकून एक प्रकारची आचारसंहिता तयार झाली असावी आणि यालाच धर्म असे म्हटले गेले. तेव्हा धर्म म्हणजे समाजात वावरताना पाळायचे नियम. आणि हे नियम अनेक शतकांच्या अनुभवातून तयार झालेले असून अपरिवर्तनीय अजिबात नाहीत.
सध्याच्या काळात माणसाची मोबिलिटी आहे तेवढ्या प्रमाणात पूर्वीच्या काळी नव्हती.तसेच सर्व कामे हातानेच करायला लागत. केस कापण्यापासून कपडे शिवण्यापर्यंत अनेक गरजा पूर्ण करायला यंत्रे नाहीत की बाहेर कुठे जाऊन काम होणाऱ्यातले नाही की बाहेरचे कोणी येऊन ते करायची शक्यता नाही. तेव्हा ही कामे गावातल्या गावातच करून द्यायला जीवनाची एक गरज म्हणून सुतार, लोहार, सोनार आणि इतर कामे करणारे बलुतेदार आले.लिहायला-वाचायला शिकविणे हा एक पेशा झाला. तसेच परकीय आक्रमणांपासून संरक्षण करायला सैनिकी पेशा आला आणि इतर कामे करायला विविध पेशे आले. आणि या सगळ्या पेशातील लोकांनी काय करावे यासाठी नियमावलीत बदल केले असायची शक्यता आहेच.
या सगळ्या व्यवस्थेत तक्रार करण्यासारखे फारसे काहीच नाही.पण नंतरच्या काळात हे सगळे व्यवसाय पिढीजात झाले. म्हणजे झाडूवाल्याच्या घरी जन्माला आलेल्याला आयुष्यभर झाडू मारायचेच काम करायचे!! मला वाटते की अवनतीला सुरवात त्यापासून झाली. म्हणजे एखाद्याला वेगळे काही करायचे असेल तरी ते कसे करणार? आपल्या नियमावलीत (धर्मात) ते म्हटलेले नाही ना? यातूनच अत्यंत रिजिड अशा जाती निर्माण झाल्या.मग त्या जातींचे अभिमान आले. नियम मोडले तर शिक्षा करायला देव बसला आहे त्या देवाची आराधना करून त्याला खूष ठेवायला हवे हा विचार पुढील काळात बळावला.मग त्यासाठी विविध पूजा-अर्चा, कर्मकांडे, व्रतवैकल्ये आणि इतर अनेक प्रकार आले आणि सगळेच कडबोळे झाले. बरं हे सगळे काही हजार वर्षांच्या काळात evolve झालेले.मुळातले काय आणि घुसडलेले काय हे तपासायला गेले तर त्याचे उत्तर सापडणे केवळ अशक्य.तेव्हा समाजात नितीमत्ता राहावी या उद्देशाने तयार केलेल्या नियमांबरोबरच देवाला खूष करायला केलेली कर्मकांडे, जातीपाती या सगळ्यांची भेसळ "धर्म" या प्रकारात झाली.
सध्याच्या काळाचा विचार केला तर आपल्याला दिसून येईल की समाजात नितीमत्ता ठेवायला योग्य प्रकारे बनविलेले कायदे आणि ते कायदे योग्यपणे राबविणारी पोलीस आणि न्यायसंस्था ही घराबाहेरील जीवनासाठी आणि घरातील जीवनासाठी भारतातच पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या चांगल्या गोष्टी: कुटुंबियांची एकमेकांविषयीची कर्तव्ये वगैरे गोष्टी पुरेशा आहेत. मुळातला धर्म तरी काय वेगळा होता? संपूर्ण महाभारताचे सार व्यासांनी एका ओळीत सांगितले आणि ते म्हणजे "दुसऱ्याच्या उपयोगी पडणे म्हणजे पुण्य आणि दुसऱ्याला त्रास देणे म्हणजे पाप". मुळातला धर्म यापेक्षा वेगळा असेल असे वाटत नाही.
तेव्हा ऐसी अक्षरे सारख्या वेबसाईटवर लेखन करणाऱ्या (म्हणजे सुशिक्षित आणि चांगले-वाईट काय याचा विचार करायची क्षमता असलेल्या) वर्गाच्या दृष्टीनेतरी ज्याला सध्या धर्म म्हटले जाते त्या कडबोळ्याचा उपयोग काय?देव म्हणावा तर तो पण "पाप-पुण्याचा अकाऊंटंट" म्हणून माणसानेच जन्माला घातलेला.तेव्हा त्याला खूष ठेवायला केलेल्या पूजा-अर्चा पूर्णपणे निरर्थक.समाजात वावरायचे नियम म्हणाल तर सध्याच्या काळाला अनुसरून असलेले जास्त योग्य नियम सध्याच्या कायद्यात बघायला मिळतील. (कायदा चुकीचा आहे असे कोणाला वाटत असेल तर अधिक योग्य कायदे आपल्यालाच बनवता येऊ शकतात/शकतील). आणि एखाद्या घरी जन्माला आल्यामुळे ते कडबोळे खायला मिळत असेल तर त्याबद्दल वाटणारा अभिमान ही आणखी अनाकलनीय गोष्ट.कारण त्या कडबोळ्याचा गाभा (सद्वर्तनाचे नियम) इतर घरात जन्माला आलेल्यांकडे नसतो हे म्हणणे अतिशय चुकीचे आहे.
तेव्हा सध्याच्या काळात धर्म आणि देव हा प्रकारच रद्दबादल केला तर नक्की काय बिघडेल?व्यक्तिश: माझे तरी त्यामुळे अजिबात काहीही बिघडणार नाही.कारण कोणतेही प्रलोभन किंवा कोणतीही भिती नसेल तरी इतर कोणालाही त्रास देऊ नये आणि शक्य तेवढे इतरांच्या उपयोगीच पडावे असे मला मनापासून वाटते (ते अंमलात किती आणणे शक्य होते ही गोष्ट वेगळी). आणि ही गोष्ट फार स्पेशल अशी नक्कीच नाही तर माणसामध्ये असलेला हा किमान चांगुलपणा आहे. तो धर्म या संकल्पनेचे नावही न ऐकलेल्या लहान मुलांमध्येही बघायला मिळतो. तसेच देवाला खूष ठेवायचे म्हणाल तर गणेशोत्सवात आमच्या पुण्यात होणाऱ्या कर्णकर्कश धांगडधिंग्याचा किंवा कधी मुंबईला गेलो तर लोकल ट्रेनमध्ये म्हटल्या जाणाऱ्या भजनांचा मला स्वत:ला तर त्रासच होतो आणि हे प्रकार नसते तर किती बहार आली असती असेच मला वाटते.मी कधीही कोणतीही पूजा करायला जात नाही की कोणतेही स्तोत्र म्हणत नाही.
तेव्हा धर्म आणि देव या दोन्ही गोष्टी कॅन्सल करून टाकल्या तरी मला स्वत:ला त्याचा काहीही फरक पडणार नाही (किंबहुना वैयक्तिक पातळीवर मी या दोन गोष्टी कधीच कॅन्सल केल्या आहेत). इतर ऐसी अक्षरेकरांना याविषयी काय वाटते? धर्माचे आपल्या जीवनातील नक्की स्थान काय?
बैलपोळ्याला पूजा आणि एरवी सजा
बैलपोळ्याला पूजा आणि एरवी सजा हीच जोवर बैलाच्या माथी तोवर हा बैल नास्तिक.
मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.
देव आणि धर्म "कॅन्सल" केला
देव आणि धर्म "कॅन्सल" केला म्हणजे नक्की काय केलं?
देव "कॅन्सल" (रद्दबातल म्हणू शकतो का?) केला म्हणजे समजू शकतो की देवळात जात नाही, देवाला नमस्कार करत नाही, देवाचे अस्तित्व मानत नाही. पण धर्म "कॅन्सल" केला म्हणजे नक्की काय केलं?
" धर्म म्हणजे समाजात वावरताना पाळायचे नियम" ही जर तुमची वैयक्तिक व्याख्या असेल तर धर्म "कॅन्सल" कसा केलात हे जरा समजावून सांगाल काय?
"कॅन्सल"
धर्म "कॅन्सल" केला म्हणजे सध्या जे धर्माचे स्वरूप दिसते (कर्मकांडांपासून सगळ्या गोष्टी) ते मी वैयक्तिक पातळीवर "कॅन्सल" केले. खरा धर्म म्हणजे "इतरांना त्रास देऊ नये आणि इतरांच्या उपयोगी पडावे" असे मला वाटते आणि हा प्रत्येक माणसात जन्मतः असलेला चांगुलपणा झाला. लहान मुलांमध्ये तो आढळतो. पण मोठे झाल्यानंतर किंवा होताना आलेल्या अनुभवांमुळे म्हणा की इतर काही कारणांमुळे म्हणा तो काही लोकांमध्ये आढळत नाही. तेव्हा जी गोष्ट अगदी जन्मतः काही न करता मिळत असेल त्या गोष्टीसाठी इतके मोठे कडबोळे कशाला?
???
हे पण खूपच मोघम झालंय. कर्मकांडांपासून सगळ्या गोष्टी म्हणजे नक्की कोणत्या? मला कर्मकांडे ही देवाशी संबंधितच वाटतात. तुम्ही म्हणता "इतरांना त्रास देऊ नये आणि इतरांच्या उपयोगी पडावे" म्हणजे धर्म. परत म्हणता मी धर्म सोडला. कुठेतरी काहीतरी गफलत होत आहे असं नाही वाटत?
शब्दच्छल
ठिक आहे. लिहिताना गफलत झाली असे समजा. मी नक्की काय ठेवले? "इतरांना त्रास देऊ नये आणि इतरांच्या उपयोगी पडावे" आणि नक्की काय सोडले? इतर सगळ्या गोष्टी. निदान असे वागायचा प्रामाणिक प्रयत्न तरी नक्कीच आहे. तेव्हा उगीच शब्दच्छल नको.
मला जाणून घ्यायचे आहे धर्म म्हणजे नक्की काय, धर्माचा अभिमान धरणारे लोक नक्की कशाचा अभिमान धरतात, त्याचे कारण काय आणि धर्म या संकल्पनेची सध्याच्या काळातील युटिलिटी काय (कारण "इतरांना त्रास देऊ नये आणि इतरांच्या उपयोगी पडावे" ही गोष्ट म्हणजे मूलभूत मानवी चांगुलपणा झाला. तो जन्मतः सगळ्यांकडे असतोच. मग त्यासाठी इतके अवडंबर, इतका अभिमान कशाबद्दल?) आणि जर त्या गोष्टीची युटिलिटी नसेल तर ती रद्दबादल केली तर नक्की काय बिघडेल?
धर्माचे आपल्या जीवनातील नक्की स्थान काय?
डोके दोन खांद्यावर व्यवस्थित शाबूत असेल तर धर्माची काहीही गरज नाही. हिंदू धर्मात तर धर्म सुधारण्यासाठी कोणतीही आकारिक (फॉर्मल) व्यवस्था नाही. आपल्या धाडसी निर्णयाबद्दल आपले अभिनंदन.
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
अगदी असेच
यू सेड इट. अगदी असेच. धन्यवाद तर्कतीर्थ.
कुठल्या धर्मात आहे?
>>हिंदू धर्मात तर धर्म सुधारण्यासाठी कोणतीही आकारिक (फॉर्मल) व्यवस्था नाही.
तशी कुठल्याच धर्मात नाही. उलट हिंदू धर्मात तर "एनिथिंग कॅन पास ऑफ अॅज धर्म" अशी परिस्थिती आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
कर्मकांडे ही देवाशी संबंधित?
धागाप्रवर्तकाला काय म्हणायचे आहे ते मी सांगू शकत नाही, पण कर्मकांडे ही अज्ञेयवादी (किंवा देव न मानणार्या) धर्मविचारांमध्येही आढळतात. आपल्या परिचयातील उदाहरणे ही जैन किंवा बौद्ध धर्मांत सापडतील. त्यामुळे देवाशी संबंध नसलेली कर्मकांडे अस्तित्वात आहेत हे सहज सिद्ध करता येते आणि म्हणून वरील विधानात तथ्य नाही. (अर्थात, तरीही ते कुणाचे व्यक्तिगत मत असूच शकते.)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
धागाकर्त्याशी पूर्ण
धागाकर्त्याशी पूर्ण सहमत.धर्मामधील विसंगती आनि धर्माच्या नावाखाली चालणारे गैरप्रकार यांमुळे देव आणि धर्मावरचा विश्वास उडतो हे खरय.
सुरक्षेची भावना
रूढ अर्थानी धार्मिक म्हणता येईल असं काहीच मी करत नाही.
पण आपण हिंदू आहोत ही जाणीव मनात आहे. आणि ती असल्यामुळे एक सुरक्षेची भावना आहे असं वाटतं.
जेव्हा मी एखादी गोष्ट नाकारतो
जेव्हा मी एखादी गोष्ट नाकारतो (कॅन्सल करतो) तेव्हा तीचे अस्तित्त्व कुठेतरी कबूल करत असतो.
जर अस्तित्त्वच नसेल तर काय स्विकारायचे आणि काय नाकारायचे? नाहि का?
तेव्हा देव आणि धर्म यापैकी किमान देव अस्तित्त्वात आहे की नाही, याचाच मला पत्ता नाही. त्यामुळे मी तो स्विकारण्याचा किंवा नाकारायचा - कॅन्सल करण्याचा- प्रश्नच येत नाही.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
विसंगती
व्यवस्था भ्रष्ट असेलच असे नाही, राबवणारे लोक दुरुपयोग करु शकतात, कॅन्सल करताना हे लक्षात असू द्यात म्हणजे नविन व्यवस्था(तुमची) अबाधित कशी राहील ह्याचा विचार कराल.
!! हा तुमचा धर्म कितपत भ्रष्ट आहे?
चांगल्या गोष्टी कोणत्या हे कसे ठरवणार....त्याच घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या धर्माला तुम्ही फाटा देताय.
असे असेल तर गोव्याच्या कार्निवलचा किंवा जर्मनीच्या बिअरफेस्टचा, हॉलंडच्या क्विन्स डेचा, इंग्लंडच्या फुटबॉल मॅचेसचा पण तुम्हाला त्रास होईल न हो? हे सगळेच कॅन्सल करावेत का?
असे असेल तर गोव्याच्या
आवाज, गोंगाट आहे म्हणून कर्णकर्कश असायलाच हवं असं नाही. भारत-पाकीस्तान मॅच भारताने जिंकल्यावर आणि भारताने क्रिकेटचा विश्वचषक जिंकल्यावर झाला तो जल्लोष (आवाज, गोंगाट असेल कदाचित पण निदान) कर्णकर्कश नव्हता, निदान मी होते त्या भागात. त्याच भागात गणेशोत्सव, शिवजयंती हे उत्सव कर्णकर्कशच होतात. अर्थात त्याचा आणि देव, धर्माचा फारसा संबंध नसावा.
पण कर्णकटू आवाज करणारे ठराविक लोकं देवा-धर्माच्या नावाखाली दादागिरी, ब्लॅकमेलींग इ प्रकार करतात आणि बाकीचे हे ब्लॅकमेलिंग सहन करतात आणि/किंवा हीच देवभक्ती असं मानतात. अशा धर्माचा साहजिकच कंटाळा येतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सापेक्ष
बरोबर, कर्णकर्कश सापेक्ष असावे, पुण्यातील गणेशोत्सवातील ढोल-लेझिम प्रत्यक्ष जवळून ऐकताना बर्याच लोकांना ते कर्णकर्कश वाटते, तर बर्याच लोकांना त्याने झींग(युफोरिआ) येते, अर्थात चित्रपटाची गाणी, स्पिकरच्या भिंती ह्या गोष्टी कमाल लोकांना त्रासदायक वाटू शकतातच.
दादागिरी करणार्यांना लागणार्या अनेक कारणांपैकी एका कारणाची गरज सध्या धर्म पुरवितो आहे, तो कॅन्सल झाल्यावर दादागिरी कॅन्सल होइल काय? वृत्ती बदलण्यासाठी साधन बदलून कितपत फरक पडू शकेल? कंटाळा धर्माचा येतो की त्याच्या सद्य स्वरुपाच्या गैरसोयीचा येतो?
कोणाला कोणता आवाज कर्णकटू
कोणाला कोणता आवाज कर्णकटू वाटतो हा प्रश्नच नाही. धर्माच्या नावाखाली दुसर्याला कर्णकटू वाटणारे आवाज होतात. जी गाणी सहसा मला त्रासदायक वाटत नाहीत तीच गाणी पहाटे पाच वाजता माझ्या कानापर्यंत येतील इतपत मोठ्याने लावायचे तेव्हा डोकं फिरायचं. सकाळी दहा वाजता अर्थातच तेवढ्या आवाजाचा त्रास झाला नसता.
नक्की कोण सांगणार धर्म म्हणजे काय ते? दादागिरी करणारे आणि ती सहन करणार्यांसाठी त्यांचा हिंदू, बौद्ध जो कोणता असेल तो धर्म हा होता. धर्माचं जाहीर स्वरूप हे असं होतं. आणि धर्म ही व्यक्तिगत आयुष्यापुरती मर्यादित ठेवण्याची गोष्ट नाही. आपण (किंवा इतर कोणी) हे कोण त्यांना सांगणारे की हिंदू किंवा बौद्ध किंवा जो कोणता असेल तो धर्म हा असा नाही!
त्या लोकांचा जो कोणता धर्म आहे त्याचा मला (आणि इतर काहींना) ताप होत असे आणि आमचा त्या धर्माला त्या एकमेव कारणास्तव विरोध होता/आहे.
अशा काही प्रकारचं धर्माचरण करणार्यांच्या धर्माला हत्ती यांचा विरोध असावा आणि त्यांनी त्यांच्यापुरता स्वतःचा धर्म काय त्याची व्याख्या दिलेली आहे. त्याचं नाव काही का असेना, त्याचा मला फरक पडत नाही. सेक्यूलर देशात आपल्या धर्माला काय हवं ते नाव देऊन, तो धर्म आपल्याला हवा तसा पाळण्याची मुभा प्रत्येकाला असते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सहमत
सहमत, पण असे मानून धर्म ह्या संकल्पेनेला विरोध केल्याने त्रास देणार्याच्या वृत्तीमधे बदल कसा काय होईल? कर्णकटू आवाज होण्याचे/करण्याचे रुटकॉझ धर्म आहे काय? अर्थात ते एक लक्षण आहे व त्या लक्षणामुळे धर्माला होणारा विरोध मी समजु शकतो पण तो विरोध स्वसमाधानचा एक मार्ग आहे असे मी समजतो, त्याने समस्येचे समाधान होईल अशी अपेक्षा गैर वाटते.
आपल्याला पटत नसलेल्या
आपल्याला पटत नसलेल्या गोष्टींचा विरोध करून काय साधतं? आमीर खानने स्वत: स्त्रीभ्रूणहत्या केली नसेल, तिचे समर्थन केले नसेल आणि आता तो त्याला विरोधच करतो आहे. त्यातून जे साधतं, तेच काहीसं अशा प्रकारच्या धर्माचा त्याग करून(!) किंवा आपण त्यातले नाही अशा विचारांतून होत असावं.
थोडक्यात अमक्या प्रकारचे लोकं इतरांना माझ्याच गटातले वाटत असतील, पण मी त्यातून स्वतःला वेगळा काढतो आहे अशा काही प्रकारे स्वतःच्या अस्तित्त्वाबद्दल विचार करणे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मुद्दा समजला पण उदाहरण थोडे
मुद्दा समजला पण उदाहरण थोडे अप्रस्तुत वाटते, आमीर खान पैसे, प्रसिद्धी मिळवून टोचणी(गिल्ट) दूर करतो आहे(काही अंशी), ते साधणं वेगळं आहे.
बरोबर, गट बनवण्याची प्रक्रिया अधिकाधिक निर्दोष बनत जावी असे मला वाटते, प्रथम माणसाचा तिरस्कार वाटतो, मग घडलेल्या घटनेचा, मग धर्म/व्यवस्थेचा, मग विचारांती परिस्थितीचा तिरस्कार वाटतो, त्याचबरोबर निदान मला तरी वृत्तीचा तिरस्कार वाटतो, अगदी तर्कट विचार केला तर कॉज-इफ्फेक्ट शिवाय दुसरे काहीच हाती लागत नाही पण ती टोकाची भुमिका प्रत्येकवेळेस घेता येतेच असे नाही.
गट बनवण्याच्या प्रक्रियेत
गट बनवण्याच्या प्रक्रियेत सुरूवातीला मनुष्यांचा तिरस्कार वाटणे (अपवादात्मक महात्मे वगळता) होतच असणार. पण पुढे घटना, धर्म-व्यवस्थेचा तिरस्कार वाटलाच पाहिजे असं नाही. कारण धर्म-व्यवस्था (विशेषतः सेक्यूलर देशात) एकजिनसी असते असं वाटत नाही. अगदी धर्माधिष्ठित देशांमधेही समाज एकजिनसी असण्याची शक्यता कमीच. बाहेरून बघणार्या माणसाला धर्म-व्यवस्था एकजिनसी वाटू शकते, बर्याचदा वाटतेही. पण प्रत्यक्षात असा एकजिनसीपणा असणं व्यावहारिक पातळीवर कठीण जातं.
अशा वेळेस सकृतदर्शनी स्वतःसारखे दिसणार्या लोकांसारखे आपण नाही, त्यांच्या विचारांत आणि आपल्या विचारांत अंतर आहे हे लक्षात आल्यावर अजिबातच न पटणार्या विचारांचाच तिरस्कार वाटतो.
प्रस्तुत धागाकर्त्याने या संदर्भात घेतलेली टोकाची भूमिका प्रत्येक वेळेस घेता येणार नाही. माझी मतं धागाकर्त्यापेक्षा फार वेगळी नाहीत. (कदाचित अधिक टोकाचीही असतील) पण अनेकदा मलाही टोकाची भूमिका अनेक व्यवहार्य अडचणींमुळे घेता येत नाही. पण वैचारिक स्पष्टतेसाठी टोकाची उदाहरणं मला फार उपयुक्त वाटतात. 'सत्यमेव जयते'चं उदाहरण टोकाचं वाटलं म्हणूनच मुद्दाम दिलं होतं. भौतिकशास्त्रातल्या thought experiments सारखं. संपूर्ण निर्वात पोकळी तयार करता येत नाही, कोणतेही दोन ट्रान्झिस्टर कधीच एकमेकांसारखे नसतात, पण संकल्पना समजून घेताना अशा गृहीतकांचा उपयोग होतो.
(प्रतिसाद अंमळ विस्कळीत झाला आहे. भावनाओं को समझो।)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धन्यवाद. >धर्म-व्यवस्थेचा
धन्यवाद.
>धर्म-व्यवस्थेचा तिरस्कार वाटलाच पाहिजे असं नाही. कारण धर्म-व्यवस्था (विशेषतः सेक्यूलर देशात) एकजिनसी असते असं वाटत नाही
सहमत.
>त्यांच्या विचारांत आणि आपल्या विचारांत अंतर आहे हे लक्षात आल्यावर अजिबातच न पटणार्या विचारांचाच तिरस्कार वाटतो.
+१ सहमत. विचारांचाच तिरस्कार करावा.
>माझी मतं धागाकर्त्यापेक्षा फार वेगळी नाहीत. (कदाचित अधिक टोकाचीही असतील) पण अनेकदा मलाही टोकाची भूमिका अनेक व्यवहार्य अडचणींमुळे घेता येत नाही. पण वैचारिक स्पष्टतेसाठी टोकाची उदाहरणं मला फार उपयुक्त वाटतात.
भुमिका विचारांबद्दल असेल तर ती टोकाची असली तरी घ्यावी असे मी म्हणेन, बाकी सर्व(माणूस, घटना आणि व्यवस्था) माध्यमं आहेत, त्यांच्याबद्दल तात्पुरती कामचलाऊ विरोधी भुमिका(तुम्ही म्हणता ती व्यवहार्य ते हेच बहुदा) उपयोगी पडते हे मान्य, पण तत्व म्हणून विरोध विचारांना करावा, तसे केल्यास परिस्थितीतील "न आवडलेले टाकून देता येते, व आवडलेले/निरुपद्रवी तसेच ठेवता येते".
भावना पोचल्या.
उत्तर
मी धर्माला भ्रष्ट नव्हे तर निरूपयोगी म्हणत आहे कारण धर्माची जी भूमिका (मला वाटते ती) इतर उपकरणांद्वारे अधिक चांगल्या पध्दतीने पार पाडली जाऊ शकेल. दुसरे म्हणजे प्रचलित धर्म हजारो वर्षांपूर्वी डेव्हलप झाला आहे. त्या काळी कदाचित तो योग्य असेलही पण आजच्या परिस्थितीत तो कितपत उपयुक्त आहे याची खातरजमा करायला नको का?
आपल्याला कोणत्या गोष्टी चांगल्या वाटतात हे आपणच ठरवावे. ५-१० हजार वर्षांपूर्वीचे ठोकताळे वापरून ते ठरविण्यापेक्षा सध्याचे मापदंड वापरून ते ठरवावे हे माझे मत आहे.
जिथे जिथे बेशिस्तीचा कारभार असतो त्या सगळ्या गोष्टींचा मला त्रास होतो. इतर देशांमधल्या परिस्थितीशी माझे काही घेणेदेणे नाही.पण आज पुण्यात लक्ष्मी रोड आणि जवळच्या भागात अनंत चतुर्दशीच्या दिवशी धांगडधिंगा चालू असतो त्यात एखाद्याला हृदयविकाराचा झटका जरी आला तरी तिथे रूग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकणार नाहीत अशीच परिस्थिती असते.विशेषतः देवाची भक्ती व्यक्त करताना असा प्रकार होत असेल तर त्याचा संतार येणारच.
आज ज्याला धर्म म्हटले जाते ती
आज ज्याला धर्म म्हटले जाते ती व्यवस्था त्या त्या धर्माच्या मूळ तत्वांशी कितपत निष्ठा राखून आहे हा संशोधनाचा विषय आहे. सामाजिक जीवनात हा धर्म केवळ गणेशोत्सव, नवरात्र, ईद इ. साजरे (?) करणे अन देवळात उत्सव पार पाडणे यापुरताच मर्यादित आहे. वैयक्तिक जीवनात धर्माच्या शिकवणीनुसार आचार, विचार, आहार अन विहार कोण करतो ? माझा धर्म माझ्या जीवनाचे अंग आहे असं समजणारे अन त्या धर्माचे संस्कार माझ्या मुलांवर झाले पाहिजेत असा आग्रह धरणारे कनिष्ठवर्गीय अन उच्चभ्रू समाजात कितीजण आहेत ? आज आमच्याजवळ काही एक धार्मिक अन सांस्कृतिक धारणा, मनाची दृढ बैठक अभावानेच दिसते.
धर्म काय केवळ विचारांमध्ये अन परंपरांमध्ये असतो ? लहान-मोठया प्रत्येक कृतीमध्ये अन जीवनाच्या महत्वाच्या निर्णयांमध्ये जर धर्माची शिकवण दिसून येत असेल तर त्याला धार्मिक म्हणावे. असे न करणारे नुसते धर्माचे नामधारी टिळे मिरवतात. परंपरा म्हणून किंवा कार्यामध्ये शोभा म्हणून किंवा इतर लोक काय म्हणतील म्हणून.
या दृष्टीने विचार केला तर आजच्या काळात खरोखरच धर्माची काही आवश्यकता दिसत नाही.
पण एक गोष्ट मात्र जाणवते. काळात जसजसे मागे पाहू तसे लक्षात येते की पूर्वी धर्माचा पगडा जेव्हा जनमानसावर अधिक होता तेव्हा समाजात नैतिकता बऱ्यापैकी टिकून होती. गुन्हेगारीचे प्रमाण कमी होते. मनोविकृतींचे प्रमाण कमी होते. आज धार्मिकता कमी झाली आहे अन हे सगळे उलटे झाले आहे.
धन्यवाद
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. दोन दिवस कामानिमित्त बाहेरगावी जाणे होणार आहे आणि उद्या पहाटे लवकर निघणार असल्याने आता प्रतिसाद लिहित नाही. सर्व प्रतिक्रियांना उत्तर दोन दिवसांनी परत आल्यानंतर देईन.