FTII संपाविषयी श्री. अरुण खोपकर यांचे अनावृत पत्र
एफटीआयआयमध्ये सुरू असलेल्या संपाबद्दल लिहिण्याआधी मी माझ्या माफक पात्रतेबद्दल थोडं बोलतो.
माझा एफटीआयआय या संस्थेबरोबरचा १९७१ पासून संबंध आहे, प्रथम विद्यार्थी म्हणून, पुढे चाळीस वर्षे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून. त्याशिवाय मी एफटीआयआयच्या अकॅडमिक काऊन्सिलचा सहा वर्षे आणि तसेच संस्थेची सर्वोच्च संघटना, एफटीआयआय सोसायटी हिचा मी तीन वर्षे सदस्य होतो. दिग्दर्शनाच्या अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थ्यांच्या निवडीच्या पॅनलचाही मी अनेकदा सभासद होतो. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटसंशोधन करणाऱ्या संस्थांशी माझा सिनेविद या नात्याने संबंध आला आहे. माझ्या होमी भाभा फेलोिशपच्या संशोधनाचा विषयही सिनेमा आणि इतर कला यांचा परस्परसंबंध आणि त्याचा सिनेशिक्षणाशी असणारा संबंध हा होता. ह्या संबंधी मी देशोदेशीच्या संशोधनपत्रिकांत संशोधनविषयक लेखन केले आहे तसेच त्यावर पुस्तकेही लिहिली आहेत. तेव्हा माझ्या दीर्घ विचारांती इथे नोंदलेल्या विचारांचा आपण सहानुभूतीपूर्वक आणि अधीर न होता विचार करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे.
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांमधे उमेदवारांच्या बुद्धिमत्तेची आणि माहितीची कसून तपासणी घेतली जाते (कित्येक विद्यार्थ्यांकडे आणि राजकारण्यांकडे आज सर्रास दिसणाऱ्या नकली आणि बनावट प्रमाणपत्र-शपथपत्रांसारखं हे प्रकरण नाही.) हे विद्यार्थी बुद्धिमान, सज्ञान आहेत आणि जबाबदार आहेत. कनिष्ठ किंवा मध्यमवर्गांतून आलेल्या ह्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आर्थिक धोका पत्करून, काळजीपूर्वक हा व्यवसाय निवडला आहे. अतिशय स्पर्धात्मक व्यवसायात त्यांना आपलं आयुष्य घालवायचं आहे आणि या व्यवसायात मौलिक भर घालावयाची आहे. निरर्थक कारणांसाठी घालवायला त्यांच्याकडे वेळ नाही.
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी केलेले बरेच संप मी पाहिलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या बाजूने आणि शिक्षकांच्या बाजूनेही. आधीच्या आणि आत्ताच्या सर्व संपांबद्दल माझी निरीक्षणं येथे नोंदवतो.
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या आधीच्या आणि आत्ताच्या संपांवर टीका करणारे लोक पुष्कळ लोक आहेत. वरवर पहाणाऱ्या ह्या लोकांना यांतला एकही संप व्यक्तिगत किंवा फुटकळ कारणांसाठी झालेला नाही याची मुळीच जाणीव नसते. कारण बहुतेक माध्यमे ही एकतर सनसनाटी बातम्यांमागे असतात किंवा सरकारी मतं मांडतात.
चित्रपटनिर्मिती संदर्भात आंतरराष्ट्रीय दर्जाचं उत्कृष्ट काम करणाऱ्या या केंद्रासंदर्भात आजवरच्या अनेक सरकारांनी बेपर्वाई किंवा सरळसरळ दुष्प्रवृत्ती दाखवल्या आहेत, प्रस्तुत संप हा जणू त्या सर्व गोष्टींवरची बोलकी प्रतिक्रिया आहे. विद्यार्थ्यांना काय दर्जाचं शिक्षण मिळावं हे ठरवण्याचा अधिकार त्यांना असलाच पाहिजे. त्याकरता जागरूक असलेल्या त्यांच्या संघटनेने उठवलेला हा आवाज आहे. जागतिक पातळीवर चित्रपटांमध्ये सध्या काय सुरू आहे हे जेव्हा इंटरनेटच्या जमान्यात सहज समजतं त्या काळात तर अशा प्रकारची जागरूकता अधिकच आवश्यक ठरते. चित्रपटांबद्दल प्रगत शिक्षण मिळावं हा एफटीआयआय अस्तित्त्वात येण्यामागचा पायाभूत विचार होता. जेव्हा सत्ताधाऱ्यांनी त्याच्या मुळाशीच कुऱ्हाड चालवली तेव्हा संप हा एकच पर्याय शिल्लक राहिला होता.
सध्याच्या संपाला विशेष महत्त्व आहे. कारण ज्या कारणांसाठी संप होत आहे ती कारणं सहजसहजी दिसत नाहीत. हा संप एका मोठ्या हिमनगाचं समुद्राच्या वर दिसणारं शिखर आहे. इतर कारणं हा एक हिमनग आहेत. आपली लोकशाही आणि देशाची घटना यांच्या रक्षणासाठीही हा संप अतिशय महत्त्वाचा आहे. श्री. गजेंद्र चौहान आणि त्यांच्याच वकुबाच्या, सरकारची मेहेरनजर असणाऱ्या लोकांची नियुक्ती करण्यामागचं एकमेव कारण त्यांची हांजीहांजीगिरी हे आहे. राष्ट्रीय संस्थांवर नियुक्ती होण्यासाठी सुमारपणा आणि हांजीहांजीगिरी हे फक्त दोन गुणच सध्याच्या राज्यकर्त्यांना अत्यावश्यक आणि पुरेसे आहेत. जे सुमार कुवतीचे नाहीत, इमानदारी दाखवण्यासाठी तत्पर नाहीत, ज्यांच्याकडे गुणवत्ता आणि बुद्धी आहेत असे जानु बारूआ, पल्लवी जोशी आणि संतोष सिवन यांच्यासारखे लोक या तिसऱ्या दर्जाच्या, टुकार होयबांबरोबर काम करू शकत नाहीत.
गजेंद्रांसारखे लोक त्यांची गुणवत्ता जितकी कमी तितके सत्ताधाऱ्यांसमोर लवचिक वेतासारखे मागेपुढे वाकतात. सुमारबुद्धीचे होयबा दुसरे काय करू शकणार? एफटीआयआय संस्थेच्या नियुक्त सदस्यांपैकी एकाने बनवलेल्या प्रॉपगंडा व्हिडीओमध्ये१ मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळे एकाच मुखवट्याने चेहेरा झाकलेले लोक दिसतात. दरवेशाला जे हवंय तेच हे लोक करतात. खरंतर तुम्ही त्यांना एकदा बोलायची संधी दिलीत की उंच झाडावर चढणाऱ्या मर्कटाप्रमाणे त्यांचंही सत्य रूप उघडं पडतं. श्री. गजेंद्र चौहानांना तुम्ही जर एकदातरी टेलिव्हीजनवर बोलताना ऐकलंत तर त्यांच्या अपात्रतेबद्दल तुम्हाला कोणतीही शंका रहाणार नाही. परीकथेतल्या बोलताना तोंडातून फक्त बेडूक पडणाऱ्या राजकन्येप्रमाणे त्यांचा प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य हे अविस्मरणीय असते.
काँग्रेस पक्षाच्या कारकीर्दीत प्रचंड भ्रष्टाचार झाले यात काही संशय नाही. त्यांच्या शेकडो चुका काढता येतील. पण त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात विज्ञान आणि संस्कृती यांच्यासाठी संस्थाही काढल्या. त्या संस्था चालवण्यासाठी विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळवलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गुणवंत लोकांची नेमणूक केली. या नियुक्त्यांसाठी सुमारपणा आणि लाचारी हे आवश्यक आणि पुरेसे गुण मानले नाहीत.
गुणवत्ता असणारे आणि प्रावीण्य मिळवलेले लोक जर एफटीआयआय, सेन्सॉर बोर्ड, टीआयएफआर, आयआयएम, नालंदा विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उत्तम, राष्ट्रीय संस्थेच्या प्रमुखपदी नेमले तर त्यांच्यामुळे एकाधिकारशाही सरकारला धोका उत्पन्न होऊ शकतो. कारण अशा व्यक्ती स्वतःची मूल्यं आणि धोरणं यांच्यानुसार संस्थांना आकार देतात. सत्ताधाऱ्यांना आपण नियुक्त केलेल्या लोकांकडून संपूर्ण आणि निव्वळ होकारच हवा आहे. खरं तर हा "सुमारपणा" हाच आजच्या समाजपुरूषाच्या वेगवेगळ्या अवयवांना पोखरणारा कॅन्सर बनलेला आहे. विज्ञानाच्या क्षेत्रातले असोत वा सांस्कृतिक-कलेच्या क्षेत्रातले असोत, सर्व गुणवंत लोकांनी एकत्र येऊन या बिनकिंमतीच्या कळीच्या बाहुल्यांच्या राज्याला आव्हान देण्याची वेळ आलेली आहे.
आज देशावर एक टोळधाड आली आहे. तिने आपला स्वातंत्र्यसूर्यदेखील आपल्याला िदसेनासा झालेला आहे. जागरूक विद्यार्थ्यांनी आपल्या लोकशाही आणि न्याय्य हक्काकरता केलेला हा संप ही ह्या प्रचंड काळ्या ढगाच्या कडेची एक छोटी रूपेरी प्रकाशरेषा आहे. हा प्रकाश जर आपण वाढवू शकलो, इतर क्षेत्रांपर्यंत पोचवू शकलो, मानव, पशू आणि वनस्पती ह्यांना नष्ट करू पहाणाऱ्या ह्या टोळधाडीच्या प्रतिकारात आपण सहभागी झालो, तर अंधारापासून प्रकाशज्योतीकडे जाणाऱ्यांचे आपण सहप्रवासी होऊ.
- अरुण खोपकर.
© कोणतेही हक्क राखून ठेवलेले नाहीत.
संदर्भ १ - शपथ मोदी की - शैलेश गुप्ता
(व्यवस्थापकीय नोंद - विचित्र दिसणारी अक्षरं सुधारली आहेत.)
इथे कशासाठी?
हे पत्र इथे देण्यामागे काही उद्देश आहे का? केवळ माहितीसाठी दिले असेल तर त्यासाठीच्या अन्य खास धाग्यामध्ये लिंक देऊन चालले असते. कारण धागाकर्त्याने यावर आपले मत व्यक्त केलेले नाही.
लिंक नाही
हे पत्र जालावर इतरत्र (सध्या तरी) उपलब्ध नाही. त्यामुळे लिंक देणं शक्य नाही. पत्रलेखकाचं भारतीय चित्रपट संस्कृतीतलं महत्त्वाचं स्थान पाहता पत्राला स्वतंत्र धाग्याचं स्वरूप देणं 'ऐसी' व्यवस्थापनाला उचित वाटलं.
--
माहितगार
बरीसची विनोदी विधाने वाचुन
बरीसची विनोदी विधाने वाचुन करमणुक झाली.
काँग्रेस बद्दल बोलताना
सिवन का शिवन ह्या माणसाचा असोका का अशोका हा सिनेमा १ तास बघितल्यावर जी शुद्ध हरपली ती सिनेमा संपल्यावरच परत आली. नवरा खोपकरांच्या ह्या पत्रा सारखी उघडीवाघडी करीना असल्यामुळे अजुन थोडा वेळ सिनेमा बघु शकला. तिने स्वताला झाकुन घेतल्यावर त्याची सुद्धा शुद्ध हरपली.
ही दोन तर खतरनाक वाक्य आहे. रागांना सुद्धा सुचली नसती.
मोदींना किंवा फडणवीसांना माझी कळकळीची विनंती आहे की ह्या असल्या लोकांसमोर पण तुकडे फेकावेत म्हणजे मला असली पत्र तरी वाचावी लागणार नाहीत.
न वाचण्याचा पर्याय
न वाचण्याचा पर्याय प्रत्येकाकडे आहेच. त्यासाठी फडणविसांना आवतन कशासाठी? हे म्हणजे मुंगीला मारायला भीमाची गदा किंवा /नेमके/आणखी समर्पक जे काही असेल ते.
अरुण खोपकर म्हटल्यावर कळतेच ना काय लिहिले असेल ते.
तुकडे चघळायला सगळ्यांनाच आवडते असे नाही.
तुकडे चघळायला सगळ्यांनाच
हा मोठ्ठा गैरसमज आहे, प्रत्येकाचे तुकडे वेगळे आणि ते फेकणारे वेगळे इतकाच काय तो फरक. तुकडे मिळवण्यासाठीच असले पत्रप्रपंच केले जातात अशी माझी तरी ठाम समजुत. नाहीतर असले बालिश विचार चारचौघात मांडायचे धाडस कसे होईल कोणाचे.
आता समजा ४ वर्षानी सोगा, रागा, लालू, मुलायम आणि आमचे काका असे सरकार आले की मी कसे भारी पत्र लिहीले होते आणि म्हणुन मला कुठल्यातरी जनतेच्या पैश्यावर चालणार्या बोर्डावर नेमा हे सांगता येइल.
याला 'निरर्थक' श्रेणी का
अनु राव यांच्या प्रतिसादाला 'निरर्थक' श्रेणी का?
हे तर होतेच ना!
कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||
संतोष सिवन
संतोष सिवनच्या नावावर माझ्या माहितीनुसार मल्ली आणि टेररिस्ट (आयेषा धारकर) या दोन उत्कृष्ट चित्रपटांचाही समावेश आहे. दिग्दर्शन वगळले तरी रोजा, इरुवर, दिल-से अशा अनेक चित्रपटांचं उत्कृष्ट चित्रीकरण त्याने केलं आहे. अर्थात उघडीवाघडी करीना हा आवडत्या मनोरंजनाचा तुमचा निकष असेल तर संतोष सिवन तुम्हाला न आवडणे अाणि 'खुली खिडकी'वाला गज्जूबाबा आवडणे हे साहजिक आहे.
आज देशावर एक टोळधाड आली आहे.
बाकी सगळं ठीक आहे.
पण हे काहीही लिहिलंय.
टाळू-गंडस्थळ तुलनेची आठवण
टाळू-गंडस्थळ तुलनेची आठवण झाली. असं कैतरी फुगवून चढवून लिहिलं की लै कैतरी भारी करतोय असं वाटतं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
असेच
शेवटचा परिच्छेद वगळता पत्र आवडले. निदान मूग गिळून बसणाऱ्या इतरांपेक्षा खोपकर बोलले हे अधिक आवडले.
अरुण खोपकर यांच्या कामाविषयी
अरुण खोपकर यांच्या कामाविषयी प्रचंड आदर आहे. फिल्म इन्स्टिट्यूटमधल्या संपाला माझा पाठिंबा आहे. या संपाचं महत्त्व अनेक अंगांनी मोठं आहे, हे मला मान्य आहे. पण तरीही या पत्राचा सूर अजिबातच आवडला नाही.
फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये येणार्या विद्यार्थ्यांची कसून परीक्षा घेतली जाते, या विधानाला काय अर्थ आहे? बाकीच्या शिक्षणसंस्थांमधले आणि क्षेत्रांमधले विद्यार्थी हरहमेशा खोटी प्रमाणपत्रं घेऊन येतात का की त्यांना प्रवेशपरीक्षा नसतात? की त्यांच्याकडे फुकट घालवायला चिकार वेळ असतो? त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांना गूळखोबरं घेऊन बोलावणं सरसकट तयारच असतं? या पत्रातून तसं कळत नकळत दर्शवलं जातं आहे असं वाटलं. हे अनावश्यक आहे.
कॉन्ग्रेसनं संस्था उभारल्या, हे दुसरं विधान. तेव्हा सत्तेत कॉन्ग्रेस होती. त्यांनी उभारणीची अनेक पायाभूत कामं केली. त्यात या संस्थाही आल्याच. शिवाय तेव्हाचे कॉन्ग्रेसमधले नेतेही कॉन्ग्रेसचे नेते या लेबलापेक्षाही देशाचे नेते या लेबलाखाली चपखल बसतील असे होते. तसं पुढे कॉन्ग्रेसमध्ये उरलं का? मग कॉन्ग्रेसला या गोष्टीचं फुकाचं श्रेय देण्याचं कारण? वाईट राज्यकर्ता - मग तो कोणत्याही रंगाच्या पक्षातला असो - या संस्था बळकावण्याचा प्रयत्न करतो आणि ते केव्हाही निषेधार्हच आहे. इथे उगाच कॉन्ग्रेसची ओढूनताणून भलामण करणं अनावश्यक आहे. या विषयाशी त्याचा मला काही संबंध दिसत नाही.
'होयबा वृत्ती' आणि 'सुमारपणा' या दोन्ही गोष्टी एकच नव्हेत. कमालीचे बुद्धिवान, कर्तृत्ववान आणि प्रतिभावान लोकही होयबा असू शकतातच या मुद्द्याकडे लेखकाचं दुर्लक्ष होतं आहे का, असंही वाटलं.
संपाला पाठिंबा देणारं हे पत्र नको त्या वादांचं मोहोळ तेवढं उठवेल, आणि त्यातून संपाचं नुकसानच होईल, अशी भीती हे पत्र वाचून वाटली.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
कठीण परीक्षा
माझ्या माहितीतल्या चित्रपटशिक्षण देणाऱ्या अनेक खाजगी संस्थांमध्ये पैसे भरेल त्याला प्रवेश असा प्रकार असतो. भरमसाट फी आणि शिवाय भरपूर डोनेशन वगैरे देऊन लोक तिथे प्रवेश मिळवतात. अशा संस्था आता देशभरात बोकाळलेल्या आढळतात. मुलांना चित्रपटक्षेत्राबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाचा गैरफायदा ह्या संस्था घेतात. ह्या पार्श्वभूमीवर 'फिल्म इन्स्टिट्यूट'मधली प्रवेशप्रक्रिया प्रचंड चुरशीची असते. तिथे प्रवेश मिळवणं कठीण असतं. आणि क्लासेस वगैरे लावून काहीही फायदा होणार नसतो. कारण, लेखी परीक्षा आणि मुलाखतीमध्ये तुमची चित्रपटमाध्यमाविषयीची ज्ञानलालसा आणि जाण, इतर कलांमधली तुमची जाण आणि रुची, सभोवतालच्या राजकीय-सामाजिक वातावरणाविषयीची तुमची जाण आणि रुची वगैरे अनेक अंगांना स्पर्श करत तुमच्या व्यक्तिमत्वाचीच सखोल परीक्षा घेतली जाते. पोपटपंची करून तिथे फायदा होत नाही. अशा प्रक्रियेतून पार गेलेले विद्यार्थी आपल्या शिक्षकांकडूनही विशिष्ट दर्जाचं शिक्षण मिळावं ही रास्त अपेक्षा ठेवतात आणि प्रसंगी त्यांनाही कठीण प्रश्न विचारून भंडावून सोडतात. ही सगळी पार्श्वभूमी गजेंद्र चौहानांसारख्या टिनपाट नटाला आपल्या बोकांडी बसवून घ्यायला विद्यार्थी का तयार नाहीत ते स्पष्ट करतं. त्यामुळेच जेव्हा 'संस्थाप्रमुखपदी कोण असावं हे विद्यार्थी ठरवत नसतात' असे प्रतिवाद केले जातात तेव्हा ह्या विद्यार्थ्यांना ते खूपच झोंबतं कारण 'असल्या गोष्टी फुटकळ संस्थांमध्ये चालवल्या जात असतील; आमच्याकडे आम्ही ते सहन करत नाही' अशी त्यांची धारणा असते. कुणी ह्याला आगाऊपणा म्हणेल, पण त्या संस्थेच्या दर्जाचा तो एक अविभाज्य भाग आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हं. तुम्ही म्हणताहात त्यातलं
हं. तुम्ही म्हणताहात त्यातलं अवाक्षरही पत्रातून स्पष्ट होत नाही. इतकंच कशाला, ते फक्त चित्रपटशिक्षण देणार्या संस्थांबद्दल बोलताहेत की एकूणच शैक्षणिक संस्थांबद्दल बोलताहेत हेही स्पष्ट होत नाही.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
भारतीय शिक्षणव्यवस्था
समजा ते एकूणच शैक्षणिक संस्थांबद्दल बोलत असले, तरीही फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पाहता पुष्कळशा भारतीय शैक्षणिक संस्था त्या निकषांवर उभ्या राहू शकणार नाहीतच. तुमच्या दृष्टिकोनानुसार मग फिल्म इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आगाऊ ठरतात किंवा डिमांडिंग.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तुमच्या दृष्टिकोनानुसार मग
काहीही! असं अजिबात म्हणणं नाही. पण आपल्या शिक्षणाच्या दर्जात ज्यांच्या नेमणुकीमुळे फरक पडू शकतो, अशा लोकांच्या नेमणुकांबद्दल बोलायचा हक्क जगातल्या कोणत्याही विद्यार्थ्याला आहेच - किमान असावाच. त्यासाठी त्या विद्यार्थ्याची प्रवेशपरीक्षा किती कसून झाली आहे, याची तपासणी कशाला करायला हवी?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
तुलना करण्यासठी.
तुलना करण्यासठी. विद्यार्थ्याना एवढी कठिण परिक्षा असेल तर चेअरमन ला का नको.
हे युक्तिवादाला चुकीच्या
हे युक्तिवादाला चुकीच्या दिशेनं भरकटवणारं आहे. विद्यार्थ्यांची एवढी कसून परीक्षा घेतली जात नसती समजा, तर गजेंद्रसिंगांची नेमणूक योग्य ठरली असती का?
मुळात गजेंद्रसिंग यांची या पदावर बसण्याची लायकी नाहीे हे विरोधाला पुरेसं कारण आहे. फिल्म इन्स्टिट्यूटची परंपरा किती थोर, विद्यार्थी किती गुणाचे, त्यांची प्रवेशपरीक्षा किती भारी, त्यांना किती कष्ट करून स्वत:चं करियर मार्गी लावायचंय, कॉन्ग्रेस किती भारी, त्यांनी कशी फिल्म इन्स्टिट्यूट स्थापली - हे मुद्दे इथे गैरलागू आहेत.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मुळात गजेंद्रसिंग यांची या
यू सेड इट.
बाकी रागांची लायकी नाही म्हणून त्यांची खूप टवाळी करणारे लोक या गज्याबद्दल एकही अवाक्षर काढत नाहीत कारण निव्वळ मोदीभक्ती. एका व्यक्तीला असं डोक्यावर बसवणे हे निव्वळ किळसवाणे आहे आणि ७० वर्षांमध्ये आपल्या देशाचे मानसिक वय ७ वर्षेच राहिले याचे निदर्शक आहे.
या गज्याबद्दल एकही अवाक्षर
वर्षानुवर्षे तिथे विद्यार्थी राहूनही त्यांना प्रोजेक्ट पूर्ण करता येत नसेल आणि संचालकांबरोबर हुल्लडबाजी करण्याची गुंडगिरी हे विद्यार्थी तिथे बाळगून असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी कोणी शाम बेनेगल तिथे पाठवणे म्हणजे बेनेगलांच्या टॅलेन्टचा अपमान होईल. असल्या सुमार दर्जाच्या विद्यार्थ्यांना गज्यासारखाच सुमार दर्जाचा मनुष्य प्रमुख म्हणून हवा.
रच्याकाने ही इन्स्टिट्यूट बंदच करून टाकली तर देशाचे काय नुकसान होईल? आमच्या मराठी चित्रपट सृष्टीत या इन्स्टिट्यूटमधून न शिकलेले पण क्षेत्रात दिग्गज असलेले असे अनेक लोक होऊन गेले. राजा परांजपे घ्या, निळूभाऊ फुले घ्या, श्रीराम लागू घ्या आणि इतर अनेक घ्या. दिग्दर्शकांमध्ये महेश कोठारे घ्या, महेश मांजरेकर घ्या. दरवर्षी १३-१३ लाख रूपये सरकार या विद्यार्थ्यांवर खर्च करते (आय.आय.टीमधील विद्यार्थ्यांपेक्षा बरेच जास्त). हे सरकारी पैशावर मजा आणि माज दोन्ही करणार, हवेत कशाला हे लोक?
विनोदी प्रतिवादाचा कहर आहे
विनोदी प्रतिवादाचा कहर आहे हा!
रीती वर्तमानकाळात बोलण्याचं कारण काय आहे हत्तीमहाशय? हे विद्यार्थी कायम अशीच तथाकथित गुंडगिरी आणि तथाकथित हुल्लडबाजी करतात आणि आपापले प्रकल्प पूर्ण करण्याची त्यांची क्षमता नाही, हे तुम्ही कोणत्या आधारावर बोलताय? कमालेय! गजाची लायकी नाही आणि तर्री त्याला आम्ही डोक्यावर बसवू देणार हे न म्हणायसाठी किती वळणं-वाकणं घ्यायची ती? इन्स्टिट्यूट बंद करून टाकायची भाषा? रूढ न शिकलेल्या पण कर्तृत्ववान दिग्दर्शकांमध्ये महेश कोठारेंचं नाव? सरकारी पैसे काढून दाखवणं? (बादवे, सरकार पैसे खर्च करतं म्हणजे उपकार नाही हां करत. त्यांचं सांस्कृतिक कर्तव्य आहे ते. ठाकरी भाषा आवरा.)
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
२००८ पासून तिथे
२००८ पासून तिथे राहणार्यांबद्दल काय मत आहे? टाळी बहुधा एकाच हाताने वाजत असावी. असले डीटेल्स समोर आले की लोक ओरडणारच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
गजाची लायकी आहे की नाही, यावर
गजाची लायकी आहे की नाही, यावर काय मत आहे? विरोध करणार्या माणसाची प्रेमपात्र उकरून काढायची युगत लै जुनी आहे. ते प्रेमपात्र नैतिक आहे की अनैतिक आहे की मुळात प्रेम करणं हा गुन्हा आहे की नाही - या वादात मला शिरायचंच नाही. गजाची लायकी आहे की नाही?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
गजाबद्दल मत अगोदरच दिले आहे.
गजाबद्दल मत अगोदरच दिले आहे. गजा नालायक आहे म्हणून २००८ पासून तिथे राहणारे फुकटे समर्थनीय ठरतात का, इतके सांगा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
नाही, अजिबातच नाही. पण हा
नाही, अजिबातच नाही. पण हा मुद्दा मुळात इथे यावाच का? काय संबंध आहे?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
एक मुद्दा आला की असे अजून
एक मुद्दा आला की असे अजून हजारो मुद्दे समोर येतात. पांडोराची पेटीच म्हणा जणू. त्यातला कुठला मुद्दा रिलेव्हंट आणि कुठला नाही, हे ज्याच्या त्याच्या चॉईसवर ठरतं. या संपाच्या अनुषंगाने जी माहिती समोर आली त्याला अनुसरून एक मुद्दा दिसला जिथे कुणाचं लक्ष जाणं तर राहोच, त्याच्याकडे बोट दाखवणं हेही जणू महापाप असल्याच्या आविर्भावात जी सेल्फरायचस तुणतुणेबाजी सुरू आहे त्या परिस्थितीत हाही मुद्दा नक्कीच रिलेव्हंट आहे. स्पॉटलाईटमध्ये आल्यावर प्रत्येक मुद्याची चिरफाड होणारच. तेव्हा चिरफाडीकरिता अमुकच मुद्दा पाहिजे वगैरे निकषावरही हा मुद्दा कसा रिलेव्हंट नाही? ३-४ वर्षांच्या कोर्सला ७ वर्षे लावणार्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहणे अगदी स्वाभाविक आहे. तेव्हा "डायरेक्टर नालायक असेल्/आहे, पण हे संपकरी तरी काय मोठे कुरासोवा लागून गेलेत" असा प्रश्न मनात येणे आणि त्यामुळे विद्यार्थांबद्दलची सिंपथी कमी होणे हेही ओघाने आलेच. अशा फुकट्यांबद्दल सिंपथी का आणि कुणाला वाटेल? पण इथे पाहतोय तर उलटाच न्याय. चालायचंच. लोकांचे पोटशूळ सिलेक्टेड वेळीच का उठतात हे आता समजलंच आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मुळात तुझा निष्कर्ष काढून
मुळात तुझा निष्कर्ष काढून झालेलाच आहेसा दिसतो. त्यामुळे वादात काय गंमत? असो!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
तेच म्हणणार होतो मी. तुमचे जे
तेच म्हणणार होतो मी. तुमचे जे चाललेय तेच आमच्यावर आरोपिले जाण्याची ही पहिलीच वेळ नव्हे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ठाकरी भाषा आवरा.खाली (सदस्य)
खाली (सदस्य) असं लिहायचं राहिलं का?
मला कळलं नाही.
मला कळलं नाही.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
दिग्दर्शकांमध्ये महेश
मेघनातै - खोपकरांना "असोका" कार शिवन ( तेजायाला, त्याचे नाव सिवन नाही शिवन आहे इतके कळायची पण बुद्धी नाही ) आणि पल्लवी जोशी जर महान कलाकार वाटत असतील तर कोठार्यांनी काय घोडे मारले आहे?
कोठार्यांची जमेची बाजू म्हणजे सर्व सिनेमे स्वताच्या बळावर काढले, सरकारी खर्चानी नाहीत.
हे कुठले हो तर्कट? ह्या पॅरेसाईट्स ना पोसणे म्हणजे सांस्कृतिक कर्तव्य होय?
त्या पेक्षा गजेंद्र बरा, बिचारा तोंड तरी उघडत नाही. बिचार्यानी जमेल ते सिनेमा केले आणि आपले पोट भरले. ह्यांच्या सारखी फुकटेगिरी केली नाही.
तुमच्याशी वाद घालायची माझी
तुमच्याशी वाद घालायची माझी प्राज्ञा नाही हां अनुताई! तुमचं चालू द्या कोसबाडच्या टेकडीवरून.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
बरोबरच आहे हो तै. आमचे पैसे
बरोबरच आहे हो तै. आमचे पैसे जातात ना ह्या फुकट्यांवर त्यामुळे मानसिक त्रास होतोच.
एक असोका धरुन बसलात तुम्ही
एक असोका धरुन बसलात तुम्ही अनु राव, संतोष सिवनच्या सिनेमॅटोग्राफीबद्दल तुमचं काय मत आहे? इथे यादी आहे बघा. दिल से, रोजा, तहान असे सिनेमे पण आहेत लिस्ट मधे.
केतकी - का अशोकाच धरुन बसु
केतकी -
का अशोकाच धरुन बसु नये? एखादा ग्रेट माणुस खाली उतरला म्हणुन इतका खाली उतरु शकतो? बादवे, रोजा आणि दिलसे हे सिनेमे गाणी सोडली तर टुकार आहेत हे माझे वैयक्तीक मत.
आणि महत्वाचे म्हणजे शिवन साहेबांना अशोका ग्रेटच वाटतो हे विसरु नका.
माझे काही संतोष शिवन शी वैर नाही, रादर मला घेणे देणेच नाही.
एकमेव मुद्दा म्हणजे सरकारनी असल्या गोष्टी चालवाव्यात का? ह्याचे उत्तर जर हो असेल तर सरकार ( जे निवडुन आले आहे ) ज्याला नेमेल त्याला मुकाट्याने सहन केले पाहिजे.
दुसरा सायडी मु़द्दा म्हणजे ह्या फुकट्यांचे सिलेक्टीव्ह बॅशिंग. गेल्या १० वर्षात शेकड्यानी उदाहरणे मिळतील ज्यात सरकारने अगदी तिय्यम दर्जाच्या माणसावर मेहरबानी केली आहे. तेंव्हा ह्या खोपकरांसारखी लोक गप्प बसतात आणि आताच कंठ फुटतो हे अत्यंत रोचक, भोचक आणि टोचक आहे.
आठवा - काही वर्षापूर्वी सोगांनी कोणाला देशाच्या सर्वोच्च पदी बसवले होते ते आठवते आहे का? एका ट्टुच्च्या इंस्टीट्युट च्या वर नाही बर का, एकदम राष्ट्रपतीपदी. आता कावळ्यासारखे कावकाव करणार्या कीती लोकांनी तेंव्हा निषेध वगैरे केला होता?
मी दुसरीकडे लिहील्याप्रमाणे, ह्यांची मजेत चालणार्या दुकानांची काँट्रक्ट दुसर्यांना दिली त्यामुळे पोटशूळ उठला आहे. आपली निष्ठा दाखवून ४ वर्षानी तरी पुन्हा ती काँट्रॅक्ट आपल्याला मिळावी ह्यासाठी हा खटाटोप आहे.
ह्यांच्या आजाराचे प्रोग्नॉसिस पण सांगते.
१. पहील्या फेज मधे पोट्शू़ळ, राग आणि मग असली पत्रे, संप वगैरे
२. दुसर्या फेज मधे - हे सरकार बधत नाही आणि बदलत पण नाही आणि आपले दुकान बंदच रहाते, ह्यातुन येणारी निराशा
३. तिसरी फेज - चार वर्षानी हेच मोदी सरकार पुन्हा निवडुन आले, तर युरेका, परिस्थितीची जाणिव होऊन मोदी महान आहेत हे पटल्यासारखे दाखवुन पुन्हा कॉट्रॅक्ट मिळावे म्हणुन लाळघोटे पणा चालू करणार.
.
.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
का अशोकाच धरुन बसु नये? एखादा
तुम्ही काय धरून बसावे आणि काय नाही हे इतर कोणी सांगू शकत नाही. पण अशोकाच धरुन बसून तोच संपूर्ण संतोष सिवन आहे असा दावा केला तर त्याचा प्रतिवाद होणारच. उद्या संतोष सिवन दहावीला गणितात नापास झाला होता हा मुद्दा घेऊन, तेच त्याच्या आयुष्याचे इतिकर्तव्य आहे असाही दावा कराल. पण एखाद्या कलाकाराचे संपूर्ण मूल्यमापन करताना त्याने चांगलं काय केलंय याकडे दुर्लक्ष करुन तो कुठं गंडलाय हेच सांगू पाहता असाल तर तुमचा मुद्दा गांभीर्यानं घेणं कठीण आहे. अशोका संपूर्ण गंडण्यामागं संतोष शिवन आहे हा एक जावईशोध आहे. 'अशोका'चं प्रॉडक्शन शाहरुख खानचं होतं. मला आठवतं त्यानुसार त्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी त्यानं दिलेल्या मुलाखतीत असंही आलंय की त्याला 'क्लब'मध्ये वगैरे नाचण्यासाठी लावता येतील अशी गाणी हवी होती त्यामुळं त्यानं अनु मलिकला तशा चाली लावण्यासाठी कन्विन्स केलं. शाहरुख खानसारख्याच्या हाताखाली सिवनने काम केलेच नाही तर कदाचित अशा गोष्टी टाळता येतील. रोजा आणि दिलसे हे चित्रपट (तुमच्यामते) टुकार असले तरी त्याचं चित्रीकरण त्यावेळी खूपच दर्जेदार मानलं गेलं होतं.
सिवनच्या टेररिस्ट या संपूर्ण त्याच्याच सिनेमाचं रॉजर एबर्ट यांनी लिहिलेलं परीक्षण वाचण्यासारखं आहे.
http://www.rogerebert.com/reviews/great-movie-the-terrorist-2000
अनु राव यांनी बेनेगल फालतू
अनु राव यांनी बेनेगल फालतू होते असं आधीच सांगितलं असल्यावर सिवन यांचा काय पाड?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
फाल्तु नाही "सुमार"
फाल्तु नाही "सुमार"
बिचार्यानी जमेल ते सिनेमा
जमेल ते करुन पोट भरणे ही लायकी कशी काय होउ शकते हो अनुताई? तेवढंच त्यांना जमतय हाच तर आक्षेप आहे ना.
लोल
महेश मांजरेकर आणि महेश कोठारे हे दिग्गज! आता बरीच संगती लागली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तुमच्या लाडक्या खोपकरांना
तुमच्या लाडक्या खोपकरांना पल्लवी जोशी आणि संतोष शिवन ग्रेट फिल्ममेकर वाटले. ते चालले तुम्हाला?
बाकी वादात इंट्रेस्ट नाही पण
बाकी वादात इंट्रेस्ट नाही पण या दोघांमध्ये काय वाइट आहे?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
'वाईट नाही' आणि 'दिग्गज' या
'वाईट नाही' आणि 'दिग्गज' या दोन्हींचा अर्थ प्रमाण मराठीत एक नाही. दिग्गज म्हणवून घेण्याइतकं या दोघांनी काहीही केलेलं नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
एक खरा प्रसंग
एक प्रत्यक्षात घडलेला प्रसंग सांगतो. गजेंद्र चौहान यांना एका टीव्ही शो वर विचारलं होतं की चांगल्या सिनेमाची त्यांची व्याख्या काय आहे. त्यावर 'बॉक्स ऑफिस'वर चालला तर 'खुली खिडकी'सुद्धा चांगला सिनेमा ठरेल असा काही तरी त्यांचा युक्तिवाद होता. त्यावर तिथे बसलेले अनुपम खेर उसळले. ते म्हणाले, की प्रत्येक नटाला आपल्या करिअरमध्ये वाईट भूमिका करायला लागतात; मलाही कराव्या लागल्या. त्यामुळे तू त्या केल्यास ह्याविषयी माझा काहीही आक्षेप नाही. मात्र, तू तुझं तोंड उघडून स्वतःचं जे भलभलतं समर्थन करतो आहेस ते प्लीज बंद कर, कारण त्यात तुझीच केस कमजोर होते आहे.
महेश मांजरेकर आणि महेश कोठारे ह्या दोघांमध्ये काय वाईट आहे ह्याविषयी ह्यातून प्रत्येकानं आपापलं तात्पर्य काढावं. अधिक वाद घालायला आता सवड नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मुद्दा हा आहे की लोक महान,
मुद्दा हा आहे की लोक महान, दिग्गज अशा अत्यंत सब्जेक्टिव टर्म्सवर वाद घालत आहेत. गजेंद्र चौहान आणि उदा: नसीरुद्दीन शाह हा फरक जितका स्वच्छ आहे तितका मांजरेकर-दुसरा दिग्गज दिग्दर्शक यांच्यात नाही हे म्हणायचं आहे.
बाकी चालू द्या.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
सोदाहरण प्लीज
तुमच्या मते एखादा दिग्गज दिग्दर्शक कोण ते सांगा.
तुमच्या मते महेश मांजरेकरचा दिग्दर्शक म्हणून सर्वोत्तम सिनेमा कोणता?
आणि महेश कोठारेचा?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
वास्तव हा त्याचा सर्वोत्तम
वास्तव हा त्याचा सर्वोत्तम सिनेमा आहे माझ्यामते.
माझा आवडता दिग्दर्शक क्वेंटिन टॅरेंटिनो आहे. भारतीयमध्ये दिबाकर बॅनर्जी, केतन मेहता, कश्यप हे महान आहेत माझ्यामते.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
तुमच्या मूळ प्रश्नाचं उत्तर
मला वाटतं की तुमच्या मूळ प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलं आहे. महेश मांजरेकरचा 'वास्तव' हा तसा बरा होता. 'अस्तित्व'सुद्धा बरा होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र भारतीय सिनेमा म्हणूनदेखील त्यांना काहीही स्थान नाही. टॅरॅन्टिनोचा तर प्रश्नच नाही, पण तुमच्या यादीतल्या इतर प्रत्येक भारतीय दिग्दर्शकाला ते आहे. तरीही, दिबाकर बॅनर्जी किंवा अनुराग कश्यप सत्यजित राय ह्यांच्यासारखे दिग्गज मात्र अद्याप तरी झालेले नाहीत. राय ह्यांना जागतिक सिनेमाच्या इतिहासात स्थान आहे; निव्वळ एक चांगला भारतीय सिनेदिग्दर्शक म्हणून नाही.
आणि महेश कोठारे?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
महान/दिग्गज याची व्याख्या जर
महान/दिग्गज याची व्याख्या जर केवळ आंतरराष्ट्रीय ख्याती अशी केली तर तुम्ही म्हणता ते खरं पण माझ्यामते दिग्गज/महान यामध्ये केवळ हा फ्याक्टर नाही. पॉप्युलॅरिटी हाही अॅडिशनल मुद्दा आहे. (मला ते आवडो ना आवडो.) आयदर तुम्ही रे/बेनेगल/टॅरंटिनो आहात किवा तुम्ही खुली खिडकीवाले आहात ही डिकॅटॉमी पटत नाही. खुली खिडकी हा सिनेमा पॉप्युलर नाही. त्यामुळे त्याचा दिग्दर्शक यात कुठेच बसत नाही.
महेश कोठारेचे सिनेमे मला खूप आवडतात. अजूनही रिलीज होउन २०-२५ वर्षांनी मी ते टीव्हीवर लागले तर आवर्जून पहातो. असे पहाणारे अनेक लोक माझ्या माहितीत आहेत. करमणूक करता येणं आणि २० वर्षांनतरही लोकांना आवडतायत ते सिनेमे असे सिनेमे बनवणं हे स्कील नक्की आहे. मला ते अप्रिशिएट करावसं वाटतं. (काही जुने सिनेमे आज पाहिले तर अत्यंत बोर होतात. हे त्याकाळी भारी होते असं लोकांना सांगावं लागतं)
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
एरवी मी "व्यक्तिगत आवडीनावडी
एरवी मी "व्यक्तिगत आवडीनावडी पलिकडे काही वस्तुनिष्ठ कारणं सांगा" असं बरेचदा म्हणते. पण कोठारे-मांजरेकरांच्या चित्रपटांमध्ये काय आवडतं, काय भावतं असा निदान व्यक्तिनिष्ठ दृष्टीकोन मांडणारा लेख का लिहित नाही? (तिरप्या, दोनोळी प्रतिसादांमधून फार कष्ट करून काही समजून घ्यावं लागतं आणि हातात काही पडतंच असं नाही.)
अतिअवांतर - कोठारे-मांजरेकर यांना दिग्गज म्हणण्याबद्दल महागुरूंनी नापसंती व्यक्त केल्याचं व्हॉट्सअॅपवर समजलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अनुमोदन. जोरदार अनुमोदन.
अनुमोदन. जोरदार अनुमोदन. आपल्याला जे सिनेमे स्मरणरंजनात्मक मूल्यांमुळे थोर वाटतात त्यांबद्दल जिव्हाळ्यानं लिहिण्याबोलण्यात पाप नाही. पण सविस्तर आणि रास्त आणि प्रेमानं लिहा बा.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
पॉप्युलॅरिटी आणि प्रपोर्शन
लोकप्रिय सिनेमा अर्थात बनावा. ती प्रत्येक समाजाची गरज असते. मात्र, 'मला लोकप्रिय सिनेमा बनवता येतो' ह्या भांडवलावर कुणी जर असा दावा करू लागलं की मला आता सिनेमाविषयी तत्त्वचिंतनात्मक किंवा मूलगामी अशी काही सैद्धांतिक मांडणी करता येईल, किंवा ती जे करू इच्छितात अशा डिमांडिंग विद्यार्थ्यांना मी सामोरा जाऊ शकेन, तर गोंधळ होऊ लागेल. किंवा ''मला दादासाहेब फाळके किंवा लाइफटाईम ऑस्कर हवं' असं जर ते म्हणू लागले तर गोंधळ होईल. असा दावा महेश मांजरेकर किंवा कोठारे अर्थात करत नाहीत. आपल्या लोकप्रियतेचा फायदा घेत ते फार तर एखाद्या पारितोषिक सोहळ्याला किंवा रिअॅलिटी शोमध्ये जाऊन चमकतात. तेवढं त्यांनी करणं ठीकच आहे. तेवढं अप्रीसिएशन त्यांना मिळतं आहे. ते त्यांच्या कर्तृत्वाला साजेसं आहे. मुद्दा 'प्रपोर्शन'चा आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मला एफ्टीआयायच्या वादात पडायच
मला एफ्टीआयायच्या वादात पडायच नाही. माझा मुद्दा केवळ इतकाच होता की आयदर तुम्ही रे/बेनगल सारखे दिग्गज आहात किंवा खुली खिडकीवाले आहात असं नाही. दिग्गज/थोर याच्या व्याख्येत पॉप्युलॅरिटी (याहून पुढे अशी पोप्युलॅरिटी जी सायझेबल लोकांसाठी लाँगलास्टींग आहे) हा देखील मुद्दा आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
दिग्गज या शब्दाचा
दिग्गज या शब्दाचा मोल्सवर्थमधला अर्थ -
दिग्गज (p. 412) [ diggaja ] m [S] An elephant of a quarter or point of the compass. There are eight attached severally to the eight quarters N., N.E. &c., supporting the globe. Hence applied to a large, fine, handsome man; or to one mighty in knowledge: also, jocosely, to a huge, monstrous man, a colossus.
व्याख्येतला शेवटचा भाग फारच आवडला. भंकस करताना गजासारखा आकार असणाऱ्यांनाही दिग्गज म्हणतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पॉइन्टाचा मुद्दा
आणि माझा मुद्दा असा आहे की लोकप्रियतेला आपली जागा आहे आणि रसिकप्रियतेला आपली. लोकप्रियतेतला दिग्गज दिग्दर्शक (उदा. राज कपूर - महेश मांजरेकर त्याच्या जवळपासही पोहोचलेला नाही.) आणि रसिकप्रियतेतला दिग्गज दिग्दर्शक (उदा. सत्यजित राय) ह्यांच्या चित्रपटसृष्टीमधल्या स्थानातला फरक बराच स्पष्ट आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
दोन दिवसांपूर्वीच
दोन दिवसांपूर्वीच 'स्क्रोल.इन'वर शांता गोखलेंनी 'सामना'बद्दल लेख लिहिला. चित्रपट १९७४ सालचा. आज, ४० वर्षं उलटून गेल्यानंतरही त्या चित्रपटाची गोखल्यांना आठवण होत्ये. (आणि ते फक्त 'शोले'च्या आठवणींसारखं स्मरणरंजन नाही.) गोखले त्या लेखातून काही सामाजिक वास्तवाचा धांडोळा घेतात. असे किती चित्रपट कोठारे-मांजरेकर यांनी बनवले?
--
या विषयावर येणारी अनभ्यस्त मतं वाचल्यामुळे असेल किंवा दिग्गज दिग्दर्शकांचा विषय निघाला म्हणून असेल. लुईस बुन्युएलच्या एका चित्रपटातला प्रसंग आठवला -
एका प्राध्यापकाला एका कुटुंबाकडून संध्याकाळी भेटण्याचं आमंत्रण येतं. तिथे टेबलाभोवती सगळे बसतात ते टॉयलेट बोलवर. तो थोड्या वेळाने हळूच उठतो, चेंबरमेडला काहीतरी कुजबूजत विचारतो. ती तशाच आवाजात उत्तर देते. तर हा टोकाला एका बारकुड्या क्यूबिकलमध्ये जाऊन हळूच जेवून येतो.
या प्रसंगाचा अर्थ आता थोडाथोडा लागला असं वाटायला लागलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
राजा परांजपे, श्रीराम लागू
राजा परांजपे, श्रीराम लागू आणि निळूभाऊंच्या उल्लेखाकडे दुर्लक्ष का बरं?
म्हणजे तुमच्या यादीतल्या
म्हणजे तुमच्या यादीतल्या दिग्गजांपैकी एखाद्याला त्या संस्थेचा अध्यक्ष केला तर तुम्ही (पक्षी: मोदीभक्त) "फुकट्या विद्यार्थ्यांना काय करायचेत दिग्गज अध्यक्ष" म्हणून आंदोलन करणार तर!
फुकट्यांना शिक्षा म्हणून गज्यासारखाच नालायक तिथे बसवला पाहिजे असे म्हणून गज्या नालायक आहे हे किमान मान्य तर केलेत! बाकी २०१३ मध्येच संस्था बंद पाडा म्हणून आंदोलन का केले नाही ते कळले नाही. तेव्हा सोनिया गांधी पदरचे पैसे घालून संस्था चालवत होत्या की काय?
किती कोलांट्या माराव्या त्याला काही मर्यादा?
कोलांट्या कोण मारत आहे?
तुमचेच वरील प्रतिसादातील वाक्य आहे: "बाकी रागांची लायकी नाही म्हणून त्यांची खूप टवाळी करणारे लोक या गज्याबद्दल एकही अवाक्षर काढत नाहीत कारण निव्वळ मोदीभक्ती."
आणि या प्रतिसादातील वाक्य आहे--"फुकट्यांना शिक्षा म्हणून गज्यासारखाच नालायक तिथे बसवला पाहिजे असे म्हणून गज्या नालायक आहे हे किमान मान्य तर केलेत!"
म्हणजेच गज्याबद्दल अवाक्षर न काढणारे मोदीभक्त आणि गज्या नालायक आहे हे म्हणणारेही मोदीभक्तच? आता कोलांट्या कोण मारत आहे ते सांगा.
बादवे मोदीभक्त हा शब्द इतका गुळगुळीत झाला आहे--आपल्या मताशी सहमत नसलेले सगळेच मोदीभक्त असे काहीसे दिसते. आणि इतरांना सतत मोदीभक्त वगैरे म्हणून बोलणार्यांना ऐसीवरील एकाहून एकेक स्वयंघोषित लिबरल प्रतिसाद देणारे लोक आणि त्याला पॉझिटिव्ह श्रेणी देणारे अहो रूपम अहो ध्वनीम छाप प्रतिसाद किंवा श्रेणी देणारे लोक सोडून रस्त्यावरचे कुत्रंही तंगड वर करायचे नाही काही दिवसांनी.
आणि हो. ऐसीवर ज्यांना वारंवार ऋण श्रेणी मिळते त्या लोकांशीस माझे जमते. तुमच्या त्या ऋण श्रेण्या मी दागिना म्हणून मिरवतो. अशा लोकांकडून ऋण श्रेणी मिळणे म्हणजेच आपण योग्य मार्गावर आहोत याची पावती आहे.
तुम्ही मोदीभक्त नसाल तर
तुम्ही मोदीभक्त नसाल तर मोदीभक्त गजेंद्राबद्दल अवाक्षर काढत नाहीत हा माझा मुद्दा सिद्ध होतो. माझा मुद्दा सिद्ध होत नाही असे तुम्हाला म्हणायचे असेल तर तुम्ही मोदीभक्त आहात हे तुम्हाला मान्य करावे लागेल.
काहीही असो, फुकट्या विद्यार्थ्यांना नालायक अध्यक्ष हवा हे २०१३ मध्ये का सुचले नाही याचे उत्तर शिताफीने टाळले आहे. की फुकट्या विद्यार्थ्यांना उघडे पाडण्याचा हा तुम्ही ज्यांचे भक्त नाहीत त्यांचा दैवी प्लॅन होता?
बाकी, लायक नसलेल्या माणसाला पद मिळू नये इतकेही तुम्हाला मान्य करता येत नसेल तर तुमचे कोणाशी जमते आणि तुम्ही काय मिरवता त्याला माझ्यामते काडीचीही किंमत नाही.
कमाल आहे
परत तेच. मीच गजेन्द्रला नालायक म्हटले आहे ते वाचूनही परत हा मुद्दा उभा करायचा? आणि मी मोदीभक्त आहे की कोणाचा समर्थक आहे की कोणाचा विरोधक आहे हे मला चांगलेच माहित आहे.त्याविषयी इतर कोणाच्याही सर्टिफिकेटची मला गरज नाही.आणि मी ज्याचा कोणाचा समर्थक की भक्त की विरोधक आहे ती माझी मते आहेत. ते माझ्याकडून इतरांनी मान्य्/अमान्य करून घ्यायची गरज आहे असे वाटत नाही आणि इतरांना त्याची गरज वाटत असली तरी त्याची पर्वा मला नाही.
कमाल आहे. म्हणजे अशा सगळ्या संस्थांमध्ये नक्की नालायक विद्यार्थी आहेत का, असल्यास किती, त्यांचा अध्यक्ष कोण आहे, त्या अध्यक्षाची लायकी काय वगैरे गोष्टींचा विचार करण्यापेक्षा इतर अनेक चांगल्या गोष्टी करण्यासारख्या आहेत मला. एफ.टी.आय.आय च्या रस्त्यावरून शेकडो नाही तर हजारो वेळा गेलेलो आहे. जवळच्या सीसीडी, कोबे सिझलरमध्ये कित्येकवेळा गेलेलो आहे.पण एफ.टी.आय.आय या संस्थेविषयी कधीच आकर्षण वाटले नाही की तिथे काय चालते हे आत जाऊन बघायची उत्सुकता वाटली नाही (जशी आय.आय.टी विषयी नेहमी वाटते). तेव्हा एफ.टी.आय.आय मध्ये गज्याची नियुक्ती आणि मग तिथे १९९७ पासून की २००८ पासून कित्येक वर्षे लोक विद्यार्थी म्हणून आहेत आणि तिथून हलायला तयार होत नाहीत या सगळ्या गोष्टी या बातम्या येऊ लागल्या त्याप्रमाणेच समजल्या. २०१३ मध्ये एफ.टी.आय.आय मध्ये काय चालले आहे हे समजून घ्यायचा काहीच संबंध नव्हता.निदान असल्या गोष्टी करण्यापेक्षा इतर अनेक चांगल्या गोष्टी मला करायला आहेत लाईफमध्ये. आणि हो एफ.टी.आय.आय वर का थांबा? आय.आय.टी मध्ये किती सुमार विद्यार्थी आहेत, आय.आय.एम मध्ये किती सुमार विद्यार्थी आहेत, नॅशनल लॉ कॉलेजांमध्ये किती सुमार विद्यार्थी आहेत, त्यांचे अध्यक्ष कसे आहेत या गोष्टींची छाननी तुम्ही स्वतः करता का? नसल्यास २०१३ मध्ये हा मुद्दा आमच्या लक्षात का आला नाही हे विचारण्याचा काहीच संबंध नाही. कारण समजा आय.आय.एम कलकत्यामध्ये भविष्यात कोणी सुमार प्रमुख आल्यास आणि त्याला विरोध केल्यास २०१५ मध्येच तो मुद्दा का मांडला नाही असा प्रश्न तुम्हालाही विचारला जाऊ शकतो.तुम्ही २०१५ मध्ये आय.आय.एम कलकत्ता आणि आय.आय.टी खरगपूर आणि इतर अनेक संस्था ट्रॅक करत नसाल तर २०१३ मध्ये आम्ही एफ.टी.आय.आय ट्रॅक करून ते उत्तर आम्हाला त्यावेळी सुचायला पाहिजे होते असे वाटायला काहीच आधार नाही.
हू केअर्स?
कमाल आहे
परत तेच. मीच गजेन्द्रला नालायक म्हटले आहे ते वाचूनही परत हा मुद्दा उभा करायचा? आणि मी मोदीभक्त आहे की कोणाचा समर्थक आहे की कोणाचा विरोधक आहे हे मला चांगलेच माहित आहे.त्याविषयी इतर कोणाच्याही सर्टिफिकेटची मला गरज नाही.आणि मी ज्याचा कोणाचा समर्थक की भक्त की विरोधक आहे ती माझी मते आहेत. ते माझ्याकडून इतरांनी मान्य्/अमान्य करून घ्यायची गरज आहे असे वाटत नाही आणि इतरांना त्याची गरज वाटत असली तरी त्याची पर्वा मला नाही.
कमाल आहे. म्हणजे अशा सगळ्या संस्थांमध्ये नक्की नालायक विद्यार्थी आहेत का, असल्यास किती, त्यांचा अध्यक्ष कोण आहे, त्या अध्यक्षाची लायकी काय वगैरे गोष्टींचा विचार करण्यापेक्षा इतर अनेक चांगल्या गोष्टी करण्यासारख्या आहेत मला. एफ.टी.आय.आय च्या रस्त्यावरून शेकडो नाही तर हजारो वेळा गेलेलो आहे. जवळच्या सीसीडी, कोबे सिझलरमध्ये कित्येकवेळा गेलेलो आहे.पण एफ.टी.आय.आय या संस्थेविषयी कधीच आकर्षण वाटले नाही की तिथे काय चालते हे आत जाऊन बघायची उत्सुकता वाटली नाही (जशी आय.आय.टी विषयी नेहमी वाटते). तेव्हा एफ.टी.आय.आय मध्ये गज्याची नियुक्ती आणि मग तिथे १९९७ पासून की २००८ पासून कित्येक वर्षे लोक विद्यार्थी म्हणून आहेत आणि तिथून हलायला तयार होत नाहीत या सगळ्या गोष्टी या बातम्या येऊ लागल्या त्याप्रमाणेच समजल्या. २०१३ मध्ये एफ.टी.आय.आय मध्ये काय चालले आहे हे समजून घ्यायचा काहीच संबंध नव्हता.निदान असल्या गोष्टी करण्यापेक्षा इतर अनेक चांगल्या गोष्टी मला करायला आहेत लाईफमध्ये. आणि हो एफ.टी.आय.आय वर का थांबा? आय.आय.टी मध्ये किती सुमार विद्यार्थी आहेत, आय.आय.एम मध्ये किती सुमार विद्यार्थी आहेत, नॅशनल लॉ कॉलेजांमध्ये किती सुमार विद्यार्थी आहेत, त्यांचे अध्यक्ष कसे आहेत या गोष्टींची छाननी तुम्ही स्वतः करता का? नसल्यास २०१३ मध्ये हा मुद्दा आमच्या लक्षात का आला नाही हे विचारण्याचा काहीच संबंध नाही. कारण समजा आय.आय.एम कलकत्यामध्ये भविष्यात कोणी सुमार प्रमुख आल्यास आणि त्याला विरोध केल्यास २०१५ मध्येच तो मुद्दा का मांडला नाही असा प्रश्न तुम्हालाही विचारला जाऊ शकतो.तुम्ही २०१५ मध्ये आय.आय.एम कलकत्ता आणि आय.आय.टी खरगपूर आणि इतर अनेक संस्था ट्रॅक करत नसाल तर २०१३ मध्ये आम्ही एफ.टी.आय.आय ट्रॅक करून ते उत्तर आम्हाला त्यावेळी सुचायला पाहिजे होते असे वाटायला काहीच आधार नाही.
हू केअर्स?
मस्त
ननिंशी सहमत. निव्वळ मोदीभक्तीसाठी कशाचेही समर्थन करणारे लोक पाहून मजा येते.
अनुभव
एक तर इतर अनेक संस्थांमधले विद्यार्थी असे नसतात असा माझा अनुभव आहे. शिवाय, तू मांडते आहेस तो (अधोरेखित) मुद्दा आज जनमानसाकडून येताना दिसत नाही. 'Correlation does not imply causation' मान्य केलं तरीही स्वतः ह्या प्रकारच्या प्रक्रियेतून न गेलेले लोक कदाचित 'विद्यार्थ्यांनी असा आग्रह धरणंच गैर आहे' असं म्हणायलाही धजत असतील असं वाटतं. अनेक मराठी वर्तमानपत्रांत स्वतःला हुशार समजणाऱ्या लोकांकडूनही असे प्रतिवाद झालेले दिसत आहेत. शिवाय, विद्यार्थ्यांचं चारित्र्यहनन किंवा निंदानालस्ती अशा अनेक स्तरांवर चालू आहे. त्यामुळे कदाचित हा मुद्दा अधोरेखित करण्याची गरज भासत असावी.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
विद्यार्थ्यांचं चारित्र्यहनन
हे कारण रास्त आहे. पण ते स्पष्ट करायला पत्रलेखकाखेरीज दुसर्या कुणाला तरी इतके शब्द खर्ची घालावे लागले, हे मुळात पत्राचं अपुरेपण अधोरेखित करणारं आहे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
चुकल्या दिशा तरीही
असं वास्तव पुष्कळ लोकांना दिसत असतं तर एवढा वाद चिघळलाच नसता. सध्या बरेच लोक जो प्रतिवाद करत आहेत तो - 'गजेंद्र चौहानला आपली लायकी सिद्ध करण्याची संधी द्या' आणि 'विद्यार्थ्यांना अशा मागण्या करण्याचा हक्क नाही' ह्या दोन गोष्टींवर आधारित आहे. दोन्ही मुद्द्यांना सार्थ ठरवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पात्रतेबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यासाठी कदाचित हा मुद्दा गरजेचा वाटला असावा.
अनावृत पत्र एखाद्या प्रदीर्घ लेखाची जागा घेऊ शकत नाही हे खरंच आहे, पण बातम्या आणि लोकांचे प्रतिवाद वाचूनच मला ह्या प्रकारच्या प्रतिवादाची गरज जाणवते आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
१९९७ पासून तिथे विद्यार्थी
१९९७ पासून तिथे विद्यार्थी असलेला एक महाभाग तिथे आहे असे फेसबुकवर फिरत आहे. खरेखोटे माहित नाही.पण २००८ पासून तिथे असलेले विद्यार्थी आहेतच. ७ वर्षे झाली तरी प्रोजेक्ट पूर्ण करू न शकणार्या सुमार दर्जाच्या विद्यार्थ्यांविषयी खोपकरांचे मत काय आहे? आणि प्रशांत पाठराबेंबरोबर हुल्लडबाजी करणार्या विद्यार्थ्यांविषयी खोपकरांचे मत काय? अरेरे फार अपेक्षा केली का खोपकरांकडून?
असे लिहिणार्या लोकांकडून अपेक्षा करणे हीच चूक आहे असे दिसते.
एफ्टीआयायमधले सगळे संत आहेत
एफ्टीआयायमधले सगळे संत आहेत असा जो कांगावा सुरू आहे तो धादांत खोटा आणि तितकाच संतापजनक आहे. पण माध्यमं यांचीच आणि यांच्या निष्ठाही विशिष्ट ठिकाणी विकलेल्या आहेत तेव्हा ते किमान त्यांच्या विकाऊ अजेंड्याशी प्रामाणिक आहेत असे तरी नक्कीच म्हणता यावे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बॅट्या - प्रतिसाद टाकला रे
बॅट्या - प्रतिसाद टाकला रे टाकला की "निरर्थक" श्रेणी मिळते. :O
मी जेंव्हा शाळेत होते तेंव्हा त्याच सोसायटीच्या दुसर्या शाळेत एक भारी मुख्याध्यापक आले होते, दिवसा सुद्धा त्यांच्या तोंडाला दारूचा वास यायचा म्हणे. पण ८-९ रुपये महिना फी म्हणजे जवळ जवळ फुकटच शिक्षण मिळते इतकी समज असल्यामुळे ना मुलांना किंवा त्यांच्या पालकांना संप वगैरे सोडा, साधी तक्रार सुद्धा कराविशी वाटली नाही.
"भिकार्याला ओकारी येऊ शकत नाही" किंवा बेगर्स कॅन नॉट बी चुजर्स ह्या म्हणी त्या फुकट्यांना कोणीतरी पुन्हा शिकवायची गरज आहे. ( खरे तर ती सो कॉल्ड इंस्टीट्युट बंद करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे ).
ह्या लोकशाही च्या नावाने गळा काढणार्यांना हे दिसत नाही की ह्या देशाच्या लोकांनीच गजेंद्र ला तिथे नेमायचा बहुमताचा मँडेट दिला आहे. नाही लोकांना गजेंद्र आवडला तर अजुन साडेतिन वर्षानी रागा ला आणतील
आणि सोगा नी लीलाताईंना सेंसरबोर्डावर बसवले होते तेंव्हा ह्या सर्वाचा गळा कोणी आवळला होता.
बॅट्या - प्रतिसाद टाकला रे
अशा संदर्भात अशी श्रेणी मिळणे म्हणजेच आपले बरोबर असणे होय असे आता लक्षात आले आहे. कसा विचार करू नये हे या लोकांइतके चांगले कोणीही शिकवणार नाही. त्याकरिता तरी त्यांचे आभारच मानले पाहिजेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आज देशावर एक टोळधाड आली आहे.
प्यारासाईटांचा माज ही या गोष्टीची दुसरी बाजूही त्यानिमित्ताने उजेडात आली हेही नसे थोडके. मागे आयायटी वाल्यांना भारतात नोकरीचा बाँड पायजे वगैरे वर सगळे पित्त खवळून मते मांडत होते, आता का वाचा बसली म्हणे? ऊप्स विसरलो, सरकारला विरोध केला म्हणजे संतमहात्मे झालो हा भ्रम प्रोप्यागेट करायचा याहून भारी चान्स कुठे गावणार म्हणा. अगदी बरोबरे.
अन हो, गजेंदर चौहानचा मी समर्थक वगैरे नाही. म्हणजे जे सरसकटीकरण करायचं त्यात हा मुद्दा नको, बाकीचे मुद्दे टाका नेहमीचे जे काय असतील ते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बॅट्या - ह्या लोकांचे एकमेव
बॅट्या - ह्या लोकांचे एकमेव दु:ख इतकेच आहे की वर्षानुवर्ष मजेत चालणारी दुकाने बंद पडली आहेत. पोटशूळ उठला आहे कारण त्यांच्या ऐवजी दुसर्यांना दुकाने टाकता आली आहेत.
वर ज्यांच्या कडे बघुन कुत्सीतपणे हसत होतो ( गब्बर सारखे आयव्हरी टॉवर मधे बसुन ), ती लोक आता सरकारी मजा उपभोगत आहेत हे बघुन झोप उडाली आहे.
अगदी सहमत.
अगदी सहमत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
विनाकारण निरर्थक श्रेण्या
विनाकारण निरर्थक श्रेण्या देऊन प्रतिसाद हाईड करवण्याचा प्रयत्न आवडला नाही.
एकतर तो त्या श्रेणीबरोबर येणार्या सुविधेचा गैरवापर आहे आणि इतरांनी ज्यांनी प्रतिसाद वाचला नाही त्यांच्यावर थेट अन्यायकारक आहे (उघडून वाचता येतो हे मान्य पण या धाग्यावर किती तरी प्रतिसाद मग तसेच वाचावे लागले आधी).
ज्यांचा प्रतिसाद आहे त्यांना ही हे वैतागवाणेच असणार.
सदैव शोधात..
प्रतिसादांची
प्रतिसादांची श्रेणी
श्रेणीसंकल्पनेची माहिती
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धन्यवाद.. हेच खफवर पण लिहिलं
धन्यवाद..
हेच खफवर पण लिहिलं होतं. पण आता ते अवांतर आहे. असो.
सदैव शोधात..
आज देशावर एक टोळधाड आली आहे.
असे कोण म्हणते? टोळधाड म्हणजे काय? संसदेत महुमताने निवडूण आलेल्या लोकनियुक्त सरकारचे निर्णय म्हणजे हुकुमशाही किंवा एकाधिकारशाही असे कसे म्हणता येइल?
Mandar Katre
एफटीआयआयच्या
मग इतरत्र सरकारी /खाजगी शिक्षणसन्स्थामध्ये किंवा नोकर्यामध्ये डुप्लिकेट सर्टिफिकेट वाले लोक भरले जातात असा तुमचा आरोप आहे का? पुरावे देवू शकल का?
Mandar Katre
श्री. गजेंद्र चौहान आणि
त्यांची नियुक्ती झाल्यानन्तर एक दिवसदेखिल काम न करु देता पूर्वग्रहदूषित आरोप लावून आन्दोलन करणे हे शहाणपणाचे लक्षण आहे ,असे कसे म्हणता येइल? त्याना वर्षभर काम तर करु द्या. नन्तर काय ते मूल्यमापन करा की....
Mandar Katre
१. माझा संपाला पाठिंबा आहे,
१. माझा संपाला पाठिंबा आहे, कारण सद्य गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीमुळे -माझ्या कररूपी पैशावर जी संस्था चालते- त्या संस्थेचे महत्त्वाचे उद्देश पूर्ण करण्यास ती संस्था लायक राहिलेली नाही असे माझे मत आहे.
२. मात्र वरील पत्रातील कित्येक मुद्दे चर्चा अनावश्यक ठिकाणी वळवणारी आहेच शिवाय सूर काहीसा आढ्य आणि अभिनिवेशी आहे.
२अ. माझ्यालेखी विद्यार्थी कसे आहेत (कित्ती कित्ती ग्रेट किंवा फुकटे किंवा कसेही) याचा आणि त्या संस्थेत कोणत्या लायकीची लोकं नेमावी याचा काहीही संबंध नाही. माझ्या कररुपी पैशावर एका उत्तम रितीने चालणार्या या चांगला इतिहास असणार्या संस्थेवर एक उत्तान चित्रपट बनवणार्याला बसवणे एक करदाता म्हणून मला मंजूर नाही. तेव्हा तिथे सिलेक्शन प्रोसेस कित्ती छान आहे वगैरेचा संबंध खोपकरांनी का लावावा? इथे नुसता "आम्ही कित्ती ग्रेट" अशी आत्मस्तुती वाटते. (असालही किंवा नसालही इथे तो मुद्दा यावाच का?)
२ब. काँग्रेसचा इथे संबंध कुठे आला? काँग्रेसेतर सरकारांनीही चांगल्या व्यक्ती नेमल्या आहेत. एन्डीए सरकारने एका वैज्ञानिकाला राष्ट्रपती बनवले आहे. तर कित्य्तेक काँग्रेसेतर राज्यसरकारांनीही त्यांच्या अखत्यारीत सुयोग्य नेमणूका केल्या आहेत. इथे चौहान नियुक्ती होणे गैर आहे, त्याबद्दल सद्य सरकारला जरूर जाब विचारायला हवा. पण त्यासाठी काँग्रेसची भलामण कशाला?
२क.
हा परिच्छेद निव्वळ मुठी आवळून अभिनिवेश व्यक्त करणारा आहे. त्यामागील भावना सच्ची असली (आहेच) तरी खोपकरांसारख्या व्यक्तीने असे लिहिणे फारच भडक वाटते. अश्या अभिनिवेषामुळे सध्याची भक्तमंडळी, भाजपेयी आणि खोपकरांसारख्या व्यक्तीमध्ये फरक करण्याची एक संधी कमी का होऊ द्यावी?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
(चक्क) सहमत. माझ्यालेखी
(चक्क) सहमत.
करदाता म्हणून बोलण्याचा अधिकार आहेच, पण या निमित्ताने विद्यार्थ्यांचा फुकटेपणाही समोर आला हेही नसे थोडके. गजा चौहानच्या निमित्ताने आनुषंगिक मुद्द्यांमधूनही उद्बोचक सत्य बाहेर पडलं ते असं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
प्रसिद्धी
चोप्रांचे महाभारत पाहिले तेंव्हा युधिष्ठिराचे काम करणारा कोण, हे माहीतच नव्हते. तो पुढे कधीतरी इतका प्रसिद्ध होईल असे वाटले नव्हते. आज मोदी सरकारने आणि ऐसीने त्याला इतकी प्रसिद्धी मिळवून दिली आहे की त्या जोरावर तो काही नवीन सिनेमे मिळवून आयुष्याची (रहायलेली) कमाई करु शकेल.
मोदी तुमचे भले करो.
आज मोदी सरकारने आणि ऐसीने
नाही सिनेमे तर निदान पुढच्या 'बिग बॉस' मधे तरी नक्कीच झळकेल आणि जिंकेल ही आणि ते ही प्रेक्षकांच्या मताने.
मा. अरुण खोपकर साहेब
मा. अरुण खोपकर साहेब,
आपण पहिल्या परिच्छेदात आपली जी माफक पात्रता सांगीतली ती खरोखरीच माफक आहे याचा प्रत्यय लेखातील पुढील परिच्छेद वाचून आलाच.
करोडो भारतीयांप्रमाणे मी देखील एक बालबुद्धी असलेला प्रेक्षक आहे आणी काही काही वेळा मला तद्दन गल्लाभरु चित्रपट आवडतात तसेच कधी कधी काही काही दर्जेदार चित्रपट देखील आवडतात (आता मला स्वतःची स्तुती करणे आवडत नाही पण मला काहीजण गाढवदेखील म्हणतात. कारण गाढवाला उकीरडा काय आणि पंचपक्वान्न काय सगळे सारखेच.) असो. हे झाले माझ्या पात्रतेबाबत.
सुरुवातीला सुरुवातीला जेव्हा एफटीआयआय बद्दल तुरळक बातम्या येत होत्या तेव्हा मला एफटीआयआय म्हणजे आयटीआयप्रमाणेच एखादी तालुका / जिल्हा पातळीवरची संस्था असावी असे वाटत होते. पण जेव्हा गदारोळ जास्त वाढत गेला तेव्हा या संस्थेबद्द्ल वाचणे क्रमप्राप्त झाले. ( क्रमप्राप्त झाले म्हणजे सगळीकडे तीच चर्चा चालू असल्यामुळे ती टाळणे शक्य नव्हते एवढेच). इथे या संस्थळावर देखील अगदी झडझडून चर्चा झाली. जणु काही दिवस हा भारतीयांचा जीवनमरणाचा प्रश्न झाला होता.
'गजेंद्र' या व्यक्तीच्या पात्रतेबद्दल इतका गहजब का झाला ते मला अजून न उलगडलेले कोडे आहे. ते अध्यक्ष झाले आहेत ना ?
म्हणजे ते संस्थेच्या आवारात नीट झाडू मारु शकणार नाहीत की पाण्याची टाकी भरल्यावर नळ नीट बंद करु शकणार नाही म्हणून ? नक्की काय चिंता भेडसावतेय तुम्हाला ? नक्की काय कार्य असते अध्यक्षांचे ? त्यापेक्षा सचिवांना जास्त अधिकार असतात ना ? की सचिव पद नाहिये या संस्थेत ? अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असती तर बरे झाले असते.
आम्ही लहान होतो तेव्हा शाळेत १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला स्टेजवर एक कधीही न बघीतलेली व्यक्ती यायची. तिची ओळख अध्यक्ष म्हणून करुन देण्यात यायची. सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यावर गोळ्या चॉकलेट वाटणे आणि झालच तर एक दोन मानचिन्हे वाटणे या पलीकडे त्या व्यक्तींचा वावर जाणवायचा नाही. तेव्हापासूनच कोणत्याही संस्थेचा 'अध्यक्ष' म्हणजे 'शोभेचा बाहुला' किंवा 'गुळाचा गणपती' असेच समीकरण माझ्या मनात पक्के रुजले. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या उच्च संस्स्थांमधील अध्यक्षांची नावे बघीतली आणि एक रोपटे म्हणून रुजलेल्या विचाराचा बघता बघता वटवृक्षच झाला. नाही म्हणायला काही अपवाद आढळले पण अपवादानेच नियम सिद्ध होतात असे म्हणतात ना ! मग अश्या बाहुल्यांना घाबरण्याचे तुम्हाला कामच काय ?
संसद चालू असतांना झोपणारे सदस्य, लोकसभेत / राज्यसभेत जाहिरपणे पॉर्नचे समर्थन करण्यासाठी पॉर्न बघणारे आमदार / खासदार, शोभेचेच असले तरी पदाचीच शोभा करणारे राष्ट्रपती, बुवा बायांच्या नादी लागलेल्या महनीय व्यक्ती. एक ना दोन. ढिगाने उदाहरणे देता येतील. एवढी सगळी होलसेल मधे गेलेली इज्जत किरकोळ वागण्यातून परत कशी आणणार ?
पण अशी कैक उदाहरणे डोळ्यासमोर असतांनादेखील आम्ही निराश झालो नाही. 'दिस जातील दिस येतील, भोग सरलं, सुख येईलं' किंवा 'एक धागा सु:खाचा नी शंभर धागे दु:खाचे' या टुकार गाण्याच्या ओळींना आम्ही तत्त्वज्ञानाचा दर्जा देऊन पुढे वाटचाल करत राहिलो. विश्वास ठेवा, पण हे तत्त्वज्ञान माझ्यातरी कामी आलयं.
तुम्ही म्हणताय तसं ही संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाचं उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करतेय म्हणजे नक्की काय करतेय आणि गजेंद्रांच्या अध्यक्ष बनण्यामुळे ती कशी रसातळाला जाईल त्याचा धावता आढावा जरी तुम्ही घेतला असता तरी पत्र वाचण्याचे चीज झाले असते ही सल माझ्या मनास लागून राहिलेला आहे. आणि असा आंतराष्ट्रीय दर्जा असलेले काम जेव्हा सेन्सॉर बोर्डाच्या गावपातळीवर जगणार्या सदस्यांच्या पुढ्यात येते तेव्हा तुमच्या कामाचे कितपत चीज होते ? पण तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे त्यामुळे त्याची चर्चा इथे न केलेलीच बरी.
तुम्ही म्हणता की 'गजेंद्रांसारखे लोक त्यांची गुणवत्ता जितकी कमी तितके सत्ताधाऱ्यांसमोर लवचिक वेतासारखे मागेपुढे वाकतात.' हे वाक्य तर माझ्या पचनीच पडत नाहिये. उलट कित्येक गुणवंत माणसे अजिबात लायकी नसलेल्यांपुढे लाळ घोटीत असतात याचे दाखले पदोपदी आढळतात. ज्या वृक्षाला जास्त फळे असतात ती नेहमीच वाकलेली असतात किंवा महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती असे आमच्या कानीकपाळी ओरडून सांगीतले जाते ते सर्व आज खोटेच ठरायची वेळ आलीय हे या संस्थेच्या बाबत चाललेल्या गदारोळातून लायकी असलेल्या आणि नसलेल्या दोन्ही बाजूच्या लोकांनी दाखवून दिले आहे.
किंवा तुम्ही म्हणता तसेही होऊ शकेल. पण मग ही शक्यता आहेच की ते तुमच्या संस्थेतील तुमच्यासारख्या गुणवंतांच्या तेजाने दिपून जातील. तुम्ही म्हणता त्याच मार्गावर चालतील. फक्त तुम्ही त्यांना आपलेसे करुन घेण्याचीच तर वेळ आहे. सर ! इतक्या लवकर भ्रुणहत्येचा निर्णय घेऊ नका. सरकार देतय तसं कायद्याने कमीत कमी २० आठवडयांचा तरी कालावधी द्या की.
जानु बारूआ, पल्लवी जोशी आणि संतोष सिवन यांच्यासारखे लोक या तिसऱ्या दर्जाच्या, टुकार होयबांबरोबर काम करू शकत नाहीत हे मान्य करुया. पण मग ही सगळी लोक त्यांचा चरीतार्थ चालविण्यास समर्थ आहेत हे सिद्धच आहे. पण मग सरकार दुर्बल घटकांच्या विकासाठीही कटीबद्ध असते हे विसरुन नाही चालणार ना ! की सबका साथ, सबका विकास ही घोषणा फक्त कागदावरच राहू द्यायची ?
श्री. गजेंद्र चौहानांना तुम्ही जर एकदातरी टेलिव्हीजनवर बोलताना ऐकलंत तर त्यांच्या अपात्रतेबद्दल तुम्हाला कोणतीही शंका रहाणार नाही हे जे तुम्ही म्हणता ते एकदम मान्य. किंबहुना प्रेक्षकांनी त्यांना सिनेमातून नाकारलच आहे. ते कधीही चांगला हिरो किंवा चांगला व्हिलन बनलेत असा एकही चित्रपट आठवत नाही. पण मग हाच न्याय लावायचा ठरला तर एखादया सॉफ्टवेअर कंपनीत फक्त कोडींग करणाराच अध्यक्ष होऊ शकतो असे म्हणता येते काय ? किंबहूना गजेंद्र यांना पुरेपुर उघडं (किंवा नागडं, किंवा कलात्मक दर्जाच्या भाषेत अनावृत्त, यापैकी तुम्हाला जो आवडेल तो शब्द घ्या.) करण्याच्या मोठमोठ्या संधी चालून येण्याच्या अगोदरच तुम्ही त्यांची झाकली मुठ सव्वालाखाची असं का करत आहात ?
गुणवंत माणसे एकत्र येणे, त्यांनी आपली संस्था स्थापन करणे आणि ती यशस्वीपणे चालविणे ही दिवास्वप्न आहेत हो सर ! आणि हे काय मी तुम्हाला सांगायला हवे ?
आता एवढे सगळे वाचून तुम्ही म्हणाल, 'काय सुमार दर्जाचा प्रतिसाद आहे !!' वाचण्याच्या देखील लायकीचा नाही. पण मग तुमच्यासारख्या पात्र माणसाकडून केवळ चार ओळी खरडलेला लेख आणि माझ्यासारख्याकडून दिला गेलेला प्रतिसाद यात काही दर्जात्मक फरक आहे काय याचा विचार तुम्ही करायचाय सर !
पत्रापेक्षा उत्तर जास्तच मोठ्ठं झालयं. थांबतो आता.
काही वेडेवाकडे लिहिले गेले असल्यास लहान तोंडी मोठा घास समजून दिलदारपणे माफ करा !
खोपकरांबद्दल अतीव आदर आहे.
खोपकरांबद्दल अतीव आदर आहे. त्यांचे गजाविषयीचे म्हणणे एकदम बरोबर असले तरी संस्थेच्या विद्यार्थ्याला लै भारी म्हणणे अजिबात बरोबर वाटले नाही.
माझे जंतुना प्रश्न: डिप्लोमा फिल्म्स ह्या किती मिनिटं असतात?
वर्षाकाठी किती डिप्लोमा फिल्म्स तयार होतात?
मागील दहाबारा वर्षातल्या किती फिल्म्स आंतरराष्ट्रिय स्तरावर नावजल्या गेल्यात? डिप्लोमा फिल्म्समधील तुमच्या मते रिमार्केबल फिल्म्स कोणत्या? सुमार फिल्मसचा रेशो किती आहे? सरकारी,सरकाराश्रयी फ़िल्म फेस्टिवलांत एका सेक्शन मध्ये लागण्याव्यतिरिक्त या फिल्म्स अजून कुठे रिलीज होतात? (भारतीय सरकारी पुरस्कार नकोत. त्यांचे जॅक् लागू शकतात.) सर्व सोपस्कार पार पाडून अंतिमः संस्थेत सिलेक्ट झालेले बहुतेक विद्यार्थी सर्वसामान्य/कनिष्ठ मध्यम आर्थिक स्तरातले आहेत याचा काही विदा आहे का?
याचे प्रिपेरशन नसते;विद्यार्थ्याची अनेक अंगाने तपासणी करूनच त्याला प्रवेश दिला जातो यावरून एका पब्लिक विचारवंतपुत्राची आठवण आली. साउंड डिजाईन मध्ये प्रवेश हवा होता तेव्हा मुलाखतीत काय विचारतील याची ज़रा आतल्या गोटातून अदमास घेत ह्रदयनाथांची भावगीते,शास्रीय गायक नातेवाईकांकडून काही प्रश्नोत्तरे घोटून वगैरे त्यांनी प्रवेश मिळवून दाखविला होता. असो. ही काही शितावरुन भाताची परीक्षा नाही, पण मुलांची निवड ही काही इतकीहि भारी नाहीय. गेल्या काही वर्षात बरीच मुले सुमार निघाली आहेत हे माझं मत होत आहे. रसूल पोकट्टी आणि उमेश कुलकर्णी(हाही संस्थेत येणयपूर्वीपासूनच चित्रपटशी निगडित होता) सोडता ही संस्था किती जण त्यांच्या नोटेबल एलुमनीमध्ये दाखवू शकेल?
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
फुकटे
एकुणात फुकटे विद्यार्थी वगैरे प्रतिसाद वाचल्यावर "सीओईपी या संस्थेविषयी काहीही बोलण्याचा अधिकार मला नाही" एवढे नव्याने समजले.
मी शिकत असताना मी (माझे वडील) वर्षाला ३६० रु फी सीओईपीला देत होते. त्यावेळी सरकारला माझ्यामागे किती खर्च करावे लागत होते हे ठाऊक नाही पण त्याच वेळी चालू झालेले ज्ञानेश्वर विद्यापीठ वर्षाला ८००० रु फी घेत होते. आणि नंतर दोन-तीन वर्षात सुरू झालेली एमाअयटी/भारती विद्यापीठ ही कॉलेजे सुद्धा ८-१० हजार फी घेत होती. त्या अर्थी तितका खर्च सरकारला येत असावा. हे पाहता मी "फुकट्या विद्यार्थी" या सन्मानास पूर्णपणे लायक होतो.
एक प्राध्यापक सबमिशनसाठी विध्यार्थ्यांना फार हॅरॅस करतात अशी तक्रार घेऊन आम्ही काही विद्यार्थी प्राचार्यांना भेटलो होतो या गोष्टीची मला हा धागा वाचून फार लाज वाटू लागली आहे. शिवाय प्राचार्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले या घटनेने आज इतक्या वर्षांनी त्या प्राध्यापकांविषयीचा आदर कमी झाला आहे. त्यांनी त्याचवेळी आम्हाला फुकटे असल्याची जाणीव करून दिली नाही आणि आम्हाला तक्रार करण्याचा हक्क आहे असे आपल्या वागण्यातून दर्शवून आमच्यावर कुसंस्कार केले असे खेदाने म्हणावे लागते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पाय कुठायत? __/\__
पाय कुठायत? __/\__
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पण मी फुकट्या विद्यार्थी
पण मी फुकट्या विद्यार्थी असल्याने प्राचार्यांनी कुसंस्कार केले असं म्हणण्याचा अधिकारसुद्धा मला नाही म्हणून मी माझ्या वरच्या प्रतिसादातला तेवढा भाग मागे घेतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
एक प्राध्यापक सबमिशनसाठी
थत्तेकाका - खरे तर तुम्हीच मी लिहीले आहे त्याला सपोर्ट करत आहात.
तुम्ही आधी बघितलेत ना की ते प्राध्यापक तुम्हाला हॅरेस करतात. कॉलेज च्या पहील्याच दिवशी ते प्राध्यापक हॅरेस करतात की नाही हे न बघताच तुम्ही तक्रार केली नाहीत ना.
वर तक्रार स्पेसिफिक होती तुमची आणी ती सुद्धा शिक्षणा बाबत. तुम्ही अशी नाही तक्रार केलीत की ते प्राध्यापक क्ष जातीचे आहेत, "य" विचारसरणीचे आहेत म्हणुन आम्हाला नकोत. तुम्ही सरकारचा त्यांना नेमण्याचा अधिकार मान्य केलात, त्यांच्या बरोबर काम करण्याचा पण प्रयत्न केलात, जेंव्हा तुम्हाला उदाहरणे दिसली, तेंव्हाच तुम्ही तक्रार केलीत.
ह्या फुकट्यांना सरकारचा अधिकारच मान्य नाहीये ( गेली दिड वर्ष फक्त, पुर्वी त्यांना कोणीही चालायचे अगदी राष्ट्रपतीपदी सुद्धा )
गजेंद्र चा दर्जा काय आहे वगैरे हे सर्व चर्चेला फाटे फोडण्याचे प्रकार आहेत. खरे तर एक मस्त गोरीला बसवला पाहीजे गजेंद्र च्या जागी आणि एक ओरांगउटान सेंसरबोर्ड च्या अध्यक्षपदी.
आम्ही प्राध्यापकांबाबत काम
आम्ही प्राध्यापकांबाबत काम करून पाहिल्यावर तक्रार केली कारण ते प्राध्यापक आधी आमच्यासाठी अनोळखी होते. गजेंद्रप्रमाणे आपली (अ)योग्यता सिद्ध केलेले नव्हते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
गजेंद्रनी तरी कुठे केली आहे
गजेंद्रनी तरी कुठे केली आहे त्याची अयोग्यता सिद्ध?
कोणी प्राध्यापक फाटका लेंगा घालुन रात्री हिंडतो म्हणुन तुम्ही त्याला काढुन टाका म्हणणार का?
तुमच्या तक्रारी नंतर पण ते प्राध्यापक राहीलेच, पण तुम्हाला समज असल्यामुळे आणि शिकायचे असल्यामुळे संप वगैरे करत बसला नाहीत. हाच फरक आहे, तो समजुन घ्या.
फुकटे कुणाला म्हटले आहे तेही
फुकटे कुणाला म्हटले आहे तेही जरा बघावे थत्तेचाचा. डिग्री पूर्ण करायला जितकी वर्षे लागतात त्याहून अनेक वर्षे अधिक काळ प्रिमायसेस मध्ये राहणार्यांना ते उद्देशून आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तक्रार
प्राध्यापकांविरुद्ध तक्रार केलीत ना? ते प्राध्यापक नालायक आहेत असे म्हणत उपोषण/संप तर केला नाहीत ना?
आणि पुढे काय झाले? प्राचार्यांनी तुमचे म्हणणे ऐकून घेतले आणि नंतर बोळवण केली, तर ते सहन केलेत ना?
>>प्राचार्यांनी तुमचे म्हणणे
>>प्राचार्यांनी तुमचे म्हणणे ऐकून घेतले आणि नंतर बोळवण केली, तर ते सहन केलेत ना?
त्याविषयीच आता तक्रार आहे. "तुम्ही फुकटे विद्यार्थी आहात. जे आहेत ते प्राद्यापक चालवून घ्यायला लागतील". असं स्पष्ट न सुनावून आमच्यावर कुसंस्कार केले. ते केले नसते तर या वेळी मी अकारण प्रतिसाद देत बसलो नसतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
माझ्या प्रतिसादाला उत्तर देणे
माझ्या प्रतिसादाला उत्तर देणे अवघड वाटते म्हणून नेहमी प्रमाणे काल दिलेला प्रतिसाद हि उडविल्या गेलेला वाटते.
कोणता प्रतिसाद? काल कोणताही
कोणता प्रतिसाद? काल कोणताही प्रतिसाद उडवलेला नाही. नक्की याच धाग्यावर दिलेला का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
काका तुमचा काहीतरी गैरसमज
काका तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. आम्ही व्यवस्थापक नाइलाजाशिवाय प्रतिसाद उडवत नाही. हीन पातळीवरती काहीतरी वैयक्तिक अगर जातिभेद भडकावण्यासारखे प्रतिसादच फक्त उडवतो. गेल्या सुमारे चार वर्षांत अशी पाळी केवळ तीनदा आलेली आहे. तुमच्यासारख्या सज्जन व्यक्तीकडून असं काही येणार नाही याची खात्री आहे. तेव्हा तुमचा प्रतिसाद कदाचित अपलोड नीट झाला असेल.
उगीच
उगीच आखाडा पेटला आहे झालं. गजेंद्र चौहान सुमार कर्तृत्वाचे आणि एफ टी आय आय ला साजेसे नसलेले असे गृहस्थ आहेत हे मान्य करण्यासाठी इतके रण माजण्याची गरज नव्हती. मुंबई विद्यापीठात वाइस चॅन्सेलर (कुलगुरू, चॅन्सेलर म्हणजे कुलपती ना?) म्हणून संजय देशमुखांची नेमणूक झाली त्याविरुद्ध एक चकार शब्दही निषेधाचा उमटला नाही, कारण ती निवड योग्यच होती. डॉ. देशमुख तर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे मुख्य होते. तरीही कोणी विरोध केला नाही. आताही भाजपचा माणूस म्हणून विरोध नाहीय तर सुमार माणूस म्हणून आहे. डॉ. वेळूकरांनाही खूप विरोध झाला, त्यांच्या कारकीर्दीतल्या सुरस चमत्कारिक कथा म.टा. आणि लोकसत्तातून सतत येत होत्या. पण मुंबईकर जरा ढीलम् ढालच रणकंदन माजवण्याबाबत.
:)
शिवाजी महाराजांच्या घोडीचा स्पीड इत्यादी आठवले
कारण
सहमत आहे. पण विद्यार्थ्यांनी या प्रमुखांचे क्वालिफिकेशन आणि आरेसेस बॅकग्राऊंड या दोन गोष्टी वेगळ्या ठेवायला हव्या होत्या. दोन्ही गोष्टी एकत्र आणल्यामुळे गज्यासमर्थक (इथल्या काहींच्या मते मोदीभक्त) मंडळींना गज्या आरेसेसचा असल्यामुळे क्वालिफिकेशनवर प्रश्न उभे केले जात आहेत हे बोलायची सोय झाली.या विद्यार्थ्यांनी आरेसेस बॅकग्राऊंडवर अवाक्षरही उच्चारले नसते तर रण इतके पेटले नसते. आणि त्यातच राहुल गांधी तिथे जाऊन आरेसेस वर गरळ ओ़कून आला.आणि गेलाबाजार केजरीवाल त्यात उडी मारायला तयार होताच.मग या गोष्टीला विनाकारण राजकीय रंग आला. वन रॅन्क वन पेन्शन साठी आंदोलन करणार्या त्या निवृत्त लष्करी अधिकार्यांनी राहुल गांधीला तर तिथून पिटाळूनच लावले आणि केजरीवाललाही फाट्यावर मारले. त्यामुळे या राजकारण्यांचा त्या आंदोलनाला राजकीय रंग द्यायचा प्लॅन फसला. बहुदा त्या एफ.टी.आय.आय च्या विद्यार्थ्यांना तेवढी समज नसावी किंवा त्यांनाही राजकीय रंग चढावा असे वाटत असावे. मग यातूनच दुसरी बाजूही इरेला पेटली.
भविष्यात कुणाही आंदोलकांनी असा राजकीय रंग चढू नये याची काळजी घेतलेली बरी.
काहीही हां पि...
खूपच विनोदी विधानं आहेत. विद्यार्थ्यांनी अनेकदा माहिती प्रसारण खात्याचे मंत्री अरुण जेटलींना जाहीर विनंती केली आहे की इथे या आणि आमचे प्रश्न जाणून घ्या. जर जेटलींना वेळ मिळत नसेल किंवा इच्छाच नसेल, आणि त्याचा लाभ घेत जर इतर राजकीय पक्षांनी त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचं खापर विद्यार्थ्यांवर कशाला फोडायचं? ही शुद्ध नालस्ती आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
नालस्तीचा स्रोत - माध्यमांतून
नालस्तीचा स्रोत - माध्यमांतून समजतं ते. (झालंच कालविसंगतीची फोडणी.)
कारण संस्थेच्या दारातून अनेकदा जाऊनही संस्थेबद्दल काहीही कुतूहल वाटत नाही.
जंतू, तुमच्यासाख्यांना बरंच काम करायची गरज आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
शंभरी भरली
प्रतिसादांचे शतक झाले. ही घ्या बातमी
बापरे! लेखकाचे विचार वाचून
बापरे! लेखकाचे विचार वाचून हादरलोच.
या दोन वाक्यातूनच लेखकाची एकंदरीत विचारसरणी स्पष्ट झाली आणि लेखकाचा विरोध नक्की कोणाला आहे हे देखील स्पष्ट झाले.