आपले वाङमयवृत्त – एप्रिल २०१२
मार्च अंकाचा परिचय - http://aisiakshare.com/node/719
या महिन्याच्या अंकाच्या मुखपृष्ठावर आणि मलपृष्ठावर ऑगस्ट रोदँ या शिल्पकाराची शिल्पं आहेत आणि ती अर्थातच दीपक घारे यांच्या रोदँविषयीच्या लेखाच्या अनुषंगानं आहेत. अरुण खोपकर आपल्या लेखात व्हेनिसबद्दल लिहितात. भूपेन खक्कर, आईझेनश्टाईन आणि इटालियन रनेसान्स यांचा आपल्या संवेदनशीलतेशी सुरेख मेळ घालणारा हा लेख म्हणजे पुन्हा एकदा मराठी ब्लॉगलेखकांना धडा म्हणून वापरता येईल असा आहे. केवळ माहिती देण्याऐवजी खरा शहाणा माणूस जेव्हा आपलं ज्ञान, आपली व्यक्तिगत अनुभूती आणि आपली संवेदना यांमधून झालेली आपली जडणघडण उलगडून दाखवतो तेव्हा तो सगळ्या ज्ञानेंद्रियांनी आस्वादायचा एक अनुभव कसा बनू शकतो त्याचं हे प्रात्यक्षिक आहे.
मुकुंद टाकसाळे ‘खसखशीचे मळे’ या लेखात राजकारण्यांच्या विसंगती वापरून आपल्या नेहमीच्या तिरकस शैलीत कोपरखळ्या मारतात. कवितांच्या विभागात या वेळी नागनाथ कोत्तापल्ले, प्रकाश खरात आणि सुधीर देवरे यांच्या कविता आहेत.
गो. पु. देशपांडे यांच्या ‘सत्यशोधक’ या महात्मा फुल्यांवरच्या नाटकाचे अतुल पेठे दिग्दर्शित प्रयोग सध्या गाजत आहेत. या नाटकाची दुसरी आवृत्ती लोकवाङमय गृहानं प्रकाशित केली आहे. ‘भारतीय समाजातील वर्ण/वर्गाचे विश्लेषण’ हा गो. पु. देशपांडे यांचा लेख या आवृत्तीच्या परिशिष्टात आहे. त्यातला निवडक मजकूर ‘महात्मा फुले यांचे विचारविश्व’ या मथळ्याखाली या अंकात आहे. लिंगभावविषयक हक्कासाठीचा लढा हा शूद्रातिशूद्रांच्या लढ्याचा एक अविभाज्य भाग आहे हा फुल्यांचा क्रांतिकारक विचार आणि फुल्यांची साहित्यिक कामगिरी यांची थोडक्यात ओळख यातून होते. महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं ‘उत्खनन’मध्ये यावेळी फुल्यांच्या लिखाणातला ‘याला धर्म कोणी म्हणावा?’ हा एक अंतर्मुख करणारा उतारा आणि त्यांच्या ‘सार्वजनिक सत्यधर्म’मधले काही अखंड आहेत.
नाशिकला फेब्रुवारी महिन्यात संतसाहित्य संमेलन झालं. संमेलनाचं प्रयोजन सांगणारा संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे यांच्या अध्यक्षीय भाषणातला निवडक मजकूर अंकात आहे.
नोव्हेंबर २०११च्या अंकात र. बा. मंचरकर यांचा ‘जातिवास्तवाविषयी मध्ययुगीन संतांचे पवित्रे’ हा लेख प्रकाशित झाला होता. त्याविषयी काही मतभेद व्यक्त करणारं पत्र अवधूत परळकर यांनी लिहिलं होतं. ते डिसेंबरच्या अंकात दिलं होतं. मंचरकर यांनी त्याला दीर्घ उत्तर पाठवलं आणि तेवढ्यात त्यांचं निधन झालं. या अंकात मंचरकर यांच्या मुद्द्यांचा सारांश आणि त्याला परळकर यांचं उत्तर दिलं आहे. ‘आजच्या अहंकारी आणि आक्रमक वर्तनाच्या काळात हा दुर्लभ तऱ्हेचा सौजन्यशील पत्रसंवाद वैचारिक क्षेत्रातील वादविवाद कसे घडायला हवेत याचा आदर्श ठरावा’, अशी संपादकांची टिप्पणीही त्यासोबत आहे. संपूर्ण पत्रव्यवहार http://www.lokvangmaygriha.com/avb/Patra%201.pdf इथे वाचता येईल.
एप्रिलचा अंक आणि आधीचे अंक या दुव्यावर वाचता येतील - दुवा
प्रतिक्रिया
वा!
आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
एक शंका
इथे पान क्र २२ वरील म. फुल्यांच्या उत्तरात एक वाक्य आहे
यावरून म.फुल्यांच्या काळात गोमांसभक्षण चालत असे असा घ्यायला हवा. शिवाय तत्कालीन ब्राहमण यज्ञ-श्राद्धाला सर्रास मांसभक्षण करीत असत असाही घ्यायला हवा.
मग हे निषिद्ध कधी झाले?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
गायीगुरे आणि मांसभक्षण
माझा या बाबतीत विशेष अभ्यास नाही, पण 'गायीगुरे' हा शब्द 'पाळीव जनावरे' या अर्थानं वापरला जातो. उदा : दुष्काळात 'गायीगुरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे' असं म्हटलं तर यात शेळ्या-मेंढ्या-घोडी-खेचरं असे सर्व येतात. बाकी मांसभक्षण म्हणाल तर काही पेशवे आणि पेशवेकालीन ब्राह्मण मांसभक्षण करत होते असे उल्लेख येतात. म्हणजे धर्म काय सांगतो आणि प्रत्यक्ष वर्तन कसं होतं यात फरक होता.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अधिकचे स्पष्टीकरण
गायीगुरे सामान्य नामाप्रमाणे वापरले असावा असा अंदाज होता.. मात्र खात्री हवी म्हणूनच तर हा प्रश्न विचारला आहे.
अन्यत्र कुठे गोमांसभक्षण चालत असे असे म्हटलेले कोणी ऐकले आहे का?
बाकी दुसरा प्रशन मांसभक्षणापुरता होता, (त्यावर ते चालत असे तुम्ही सांगितले आहेच) त्याच बरोबर फुल्यांच्या वाक्यात ते अगदी राजरोसपणे -काही ठराविक कार्यात एखादा विधी असल्यासारखे- सर्रास चालत होते का हा प्रश्न आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
काव्य-शास्त्र-विनोद
माझ्या मते त्यात थोडा काव्य-शास्त्र-विनोद आहे. ते शब्दशः घेऊ नये. पेशव्यांच्या राज्यात या ना त्या निमित्तानं जेवणावळी झडत असत. निमित्तं धार्मिक असतील किंवा नसतील. त्यात जे जे रुचकर वाटे ते रांधलं जात असे. त्यातल्या काहींत अभक्ष्याचा समावेश असे.
(अर्थात, वेद आणि मनूच्या लिखाणात धार्मिक कार्य आणि गोमांसभक्षण यांचं नातं दिसतं. ते आंबेडकरांच्या The Untouchables: Who Were They and Why They Became Untouchables? या लिखाणात मिळेल.)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||