विनोद हा भेदक सत्यकथनासाठी खरंच परिणामकारक फॉर्मॅट आहे का?
सुरुवातीलाच महत्वाचं.
विनोद हा विनोद म्हणून म्हणजेच निव्वळ हसवण्यासाठी केला की शोभून दिसतो हे सर्वांनाच मान्य असावं.
तस्मात, विनोद या लेखनपद्धतीबद्दल जनरलाईझ्ड मत असण्याचं कारणच नाही. चार घटका हसून आपल्या जगण्यात आनंदच भरतो आणि त्याबद्दल सरळसोट प्रकारच्या विनोदाचे आभारच मानले पाहिजेत.
मी पुलंना वाचत, ऐकत मोठा झालो. अन्य खूप जणांचं लिखाण वाचण्यात आलं पण पुलं हे सर्वात प्रसिद्ध उदाहरण घेऊन माझा प्रश्न मला पुढे ठेवायचा आहे.
चिंवि जोशी हे माझे आवडते लेखक, खरंच, पुलंपेक्षा कांकणभर जास्तच आवडते. चिं.विं.च्या मुख्यत्वे विनोदी लिखाणातून त्यांनी जाताजाता खूप काही भाष्य केलं असं मला वाटतं.. किंवा वाटायचं. तेच काही प्रमाणात पुलंचं. पुलंच्या वेळी आजूबाजूची परिस्थिती चिंविंच्या काळापेक्षा बरीच पुढे आली होती.. पुलंनी विनोदी लिखाणाइतकंच गंभीर सुरातही खूप लिहिलं.
आजरोजी चिंवि आणि पुलं हे दोघेही काळाच्या बरेच मागे पडले आहेत असं साध्या सरळ अर्थाने म्हणता येईल. त्यांच्या काळाच्या पडद्यावर आपण त्यांचं साहित्य पाहतो तेव्हा ते चपखलच वाटतं हे खरंच.
तरीही मी या दोघांची मिळून काही उदाहरणं घेऊन हल्लीच मला पडलेला प्रश्न पुढे ठेवतोय.
चिंवि जोशींनी चिमणराव हे पात्र बनवून लिहीलेल्या अनेक कथांमधे विनोदी अंगाने त्या वेळच्या सरळसरळ दुरित प्रथांवर बोट ठेवलं आहे.
"अखेर लग्न ठरले" मधे चिमूचं लग्न ठरवताना घडणार्या सतराशे विघ्नांची हिस्टरी घेऊन अखेरीस लग्न पार पडल्याचं "हुश्श" आहे. यात हुंड्याची मागणी, वधूपक्षाला मिळणारी खरोखर हीन बोलणी आणि पिळवणूक, खालच्या पातळीवर उतरुन होणारी मांडवातली भांडणं हे सगळं आहे.. आणि चिंवि ते मिश्कीलपणेच मांडत राहतात.
"बोळवण"मधे चिमीचा पती तिला सरळसरळ सोडून देतो आणि दुसरीकडे गाठ बांधू पाहतो. गुंड्याभाऊ अनेक युक्त्याप्रयुक्त्या करुन वन स्टेप अॅट अ टाईम आणि कधीकधी सोट्याच्या जोरावर चिमीला परत तिच्या नवर्याच्या घरात घुसवतो.. त्यासाठी चिमीवरही ओरडत राहतो. तिच्या नवर्याला "बायको घरात असली म्हणजे सकाळी सकाळी आणा खर्च न करता, न मागता चहा मिळतो" असे बायकोचे फायदे पटवून देतो.
कशी का होईना तिला तिच्या सासरच्या घरात नेऊन सोडली (आत शिरवली) हाच विजय असल्याप्रमाणे गुंड्याभाऊ पुण्याला परत येतो. आता हे कालबाह्य असेल.. पण तेव्हा ते मांडलं होतं विनोदाच्या माध्यमातून सामाजिक दुरित दाखवण्यासाठीच.
पुलंच्या असामी मधेही मध्यमवर्गीय चाळकरी माणसाच्या आयुष्यातल्या अनेक पीडा आणि स्थित्यंतरं विनोदाच्या अंगाने दाखवली आहेत. सिनेमाचं बदलतं स्वरुप, एकामागे एक अनेक पोरं, पोरवडा झाल्याने होणारी मिझरेबल अवस्था या आणि अशा बर्याच गोष्टी ते दाखवतात..(आठवा, धोंडो भिकाजी जोशी आपल्या एका मुलाचा भावंडांमधील क्रम बोटं मोडून पुटपुटून आठवत राहतात)
अशीच बरीच उदाहरणं देता येतील.. ठळकपणे सांगायचं तर राम नगरकरांची रामनगरी. इथे तर न्हावी म्हणून समाजात होणारा सरळसरळ घृणास्पद अपमानही त्यांनी वाचकांना हसवत सांगितला आहे. जातपातीमुळे आणि अंधश्रद्धांमुळे होणारी गलिच्छ फरपटही स्वतःच हसून सांगितली आहे.
आता मूळ प्रश्न..
विनोद हे माध्यम म्हणून किंवा "हत्यार" म्हणून वापरुन अन्याय, अनिष्ट प्रथा, दुरित, विरोधाभास हे सर्व दाखवायला गेलं तर त्याचा टोकदार परिणाम (जसा समजला जातो तसा) खरंच होतो का याबद्दल मला जबरदस्त शंका आहे.
उपरोक्त सर्व लेखनाचा माझ्या मनावर झालेला परिणाम फक्त विनोदाने धमाल हसण्याइतकाच झाला आहे की काय अशी शंका..शंका नव्हे खात्रीच आहे.
त्यापेक्षा कारुण्य हे सरळसोट कारुण्य म्हणून, क्रूरता ही सरळसोट क्रूरता म्हणून दाखवली तर ती मूळ हवा तसा परिणाम करेल का?
विनोदी अंगाने अनिष्ट रूढींवर मारलेले फटके हे हलक्या चापट्या ठरत असावेत का? की नुसत्याच गुदगुल्या?
विनोदाच्या शालजोडीतून खरोखर "भेदक" म्हणता येईल असं भाष्य होतं का? अगदी प्रसिद्ध ब्लॅक कॉमेडी म्हणून जे काही असतं त्यातही..?
विनोदातून एखाद्या गोष्टीची काळी बाजू हसतखेळत मांडलेली वाचून कोणी पेटून उठतो का? की करमणूक करुन घेऊन स्मितहास्य करुन मस्त, खुसखुशीत असं म्हणून सोडून देतो..?
याउप्पर जाऊन अशीही एक भीती वाटते की विनोदी अंगाने अनिष्ट गोष्टींची चंपी करण्याच्या प्रयत्नात त्यांचं जनरलायझेशन तर नाही होत?
उदा.
-अमुक काम करायला गेलो तर माझ्याकडून सर्व अधिकार्यांनी पैसे कसे खाल्ले हे विनोदी लेखात सांगितलं.
-छोट्याश्या आजारासाठी डॉक्टरकडे गेलो तर त्यांनी तपासण्या आणि स्पेशालिस्टांचा फेरा मागे लावला आणि वीस हजाराचा फटका बसला (आद्य लेखः गुंड्याभाऊचे दुखणे, पण अजूनही असे लेख येतात..)
असे लेख वाचून तिडीक येण्यापेक्षा जास्त इफेक्ट जनरलायझेशनचा आणि त्यामुळे दिलासा मिळण्याचाच होत असेल का?
म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातल्या रॅकेटची तीव्रतेने जाणीव होण्यापेक्षाही जास्त "अरे म्हणजे सगळीकडे हे असंच आहे. मी एकटाच नाही लुटला गेलो.. वा" हा दिलासाच जास्त प्रभावी तर होत नसेल? थोडक्यात "हे असं नको.." यापेक्षा, "हे असंच असतं" आणि "चालायचंच" हा अगदी उलटा इफेक्ट तर होत नाही??
माझं म्हणणं मला नीट मांडता आलंय किंवा नाही याविषयी मला शंका आहे. पुलं किंवा चिंवि यांचं मूल्यमापन किंवा त्यांची मिडिऑक्रसी किंवा त्यांची तुलना, अशा अंगाने चर्चा गेली तर मी अयशस्वी झालो की काय असं म्हणावं लागेल.
छान विषय. सविस्तर
छान विषय. सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखून ठेवतो.
----
विनोदामुळे समाजमन कितपत बदलतं - हा प्रश्न एकंदरीतच लेखनाने किंवा भाषणांनी समाजमन कितपत बदलतं, याचा उपप्रश्न आहे. कुठच्यातरी लिखाणाने (किंवा अभिव्यक्तीने) अत्यंत प्रत्यक्षरीत्या जग बदलण्याची उदाहरणं थोडीच आहेत. मार्क्स आणि एंजेल्सचा जाहिरनाम्यासारखी क्रांतीची बीजं ठरलेली उदाहरणं मोजकीच. तेव्हा 'समाज बदलणं' यातून अपेक्षा नक्की काय आहेत यावर या चर्चेच्या प्रश्नाचं उत्तर ठरतं.
वॉर ऍंड पीस मध्ये टॉलस्टॉय म्हणतो की इतक्या प्रचंड युद्धासारख्या घटना कोणाच्या एकाच्या विचारामुळे ठरत नाहीत. ती घटना घडण्यासाठी, किंवा विशिष्ट प्रकारे घडण्यासाठी हजारो कारणं आपापल्या परीने कार्यरत असतात. शेवटचा परिणाम हा सद्यस्थितीवर असलेल्या अनेक परस्परविरोधी, भिन्न भिन्न दिशांच्या बलांचा एकत्रित परिणाम असतो.
तेव्हा सत्यकथनासाठी विनोद याकडेही त्याच परिप्रेक्ष्यात पहायचं. लेखनाच्या किंवा कथेच्या गाभ्यातले विचार स्वीकारण्यासाठीची मानसिक परिस्थिती निर्माण करणं यात विनोदाची परिणामकारकता दडलेली असते. त्या प्रसिद्ध कथेतल्या माणसाचा कोट उडवण्यासाठी झंझावाती वारा पुरेसा ठरत नाही, त्यापेक्षा हलका, सौम्य सूर्यप्रकाश यशस्वी होतो. याउलट हिटलरच्या भाषणांमध्ये विनोदाचा वापर केल्याचं ऐकिवात नाही. जनतेच्या मनातल्या त्वेषाची ठिणगी फुलवून तिचा भडका उडवून देण्यासाठी त्याने झंझावाती फुंकरीच वापरल्या.
चिं.वि. जोश्यांचीच टीकात्मक व्यंगाची उदाहरणं आहेत. 'माझे स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग' (आधी त्या लेखाचं नाव माझे सत्याचे प्रयोग असं ठेवलं होतं, ते प्रकाशकांनी बदलायला लावलं) 'गुंड्याभाऊचा उपास' यातून गांधीजींच्या विचारसरणीवर टीका आहे. गांधींची उच्च तात्विक भूमिका आणि प्रत्यक्ष जीवनाच्या रणभूमीवर लढणाऱ्यांसमोर असलेली परिस्थिती यातली तफावत स्पष्टवक्तेपणाच्या प्रयोगात दाखवली आहे. एखादा जडजंबाल लेख लिहून तेच सांगता आलं असतं, अनेकांनी सांगितलंही असेल. पण विनोदी लेखन असल्यामुळे साठ-सत्तर वर्षांनंतर अजूनही लोकांच्या लक्षात आहे. त्या कथेत/लेखात एकदाही गांधीजींचा उल्लेखही नाही.
चिं. विं. चा सगळ्यात कडवट विनोद हा चिमणरावांच्या कथांमध्ये येतो. त्याकाळच्या ब्राह्मणी मध्यमवर्गीयाला काय प्रश्न होते, त्याच्या पळपुट्या, कातडीबचावू वृत्तीने परिस्थितीतून वाट काढतानाही विनोदबुद्धी जागृत ठेवतो, हसत जगतो. हातात काहीही न मिळताही झगडा दिल्याचं समाधान पदरात पाडून घेतो. ('माझे काटकसरीचे प्रयोग' मध्ये पगारात २५% कपात झाल्याने त्यांच्या ऑफिसमधल्या कारकुनांनी कॅंटिनवाल्याकडे चहा २५% ने स्वस्त करण्याची मागणी केली. पुरेशी वादावादी झाल्यानंतर कपाच्या आकारात २५% कपात करून किंमत २५% कमी करण्याची तडजोड होते...)
असो, थोडा भरकटलो. पण मुद्दा असा आहे की उत्तम विनोदी लेखन हे बहुतेक वेळा काहीतरी विचार सांगणारं असतं असा माझा दावा आहे. तो विचार सांगितला जातो, वाचकांपर्यंत पोचतो, आणि कुठेतरी घर करून राहातो. एखाद्या बदलासाठी लागणाऱ्या शेकडो कारणांमध्ये आपलं योगदान देतो.
अप्लाईड मेकॅनिक्स
गवि,
तुम्ही अभियांत्रिकी क्षेत्रातले असल्याने त्याच भाषेत हे असेही सांगता येईल. ज्यावेळी सरळ दिशेने बल लावणे शक्य नसते त्यावेळी जरा तिरक्या दिशेने बल लावले जाते. तुम्ही म्हणताय तशी त्या त्या विसंगतींवर थेट टीका करणे अनेकदा शक्य नसते म्हणून जरा तिरक्या दिशेने हा बलप्रयोग होतो. तसेच त्याच त्याच पद्धतीने टीका केली तर वाचकवर्ग मर्यादित असतो. विनोदी पध्दतीने टीका केली तर वाचकवर्ग वाढण्याची शक्यता असते. शिवाय तिरके बल कधी कधी जास्त चांगला परिणाम घडवून आणते.
उदाहरणार्थ,
ह
क्ष --------> य ळ---------- ज्ञ
क्ष ला य ही वस्तू ज्ञ या ठिकाणा पर्यंत पोचवायची आहे, परंतु मध्ये ळ हा महाप्रचंड अडथळा आहे. म्हणून क्ष ने आधी जरा तिरक्या दिशेने बल प्रयोग करून य ला ह या स्थानी ढकलावे व नंतर ज्ञ पर्यंत पोचवावे. थोडे अधिक अंतर व वेळ खर्ची पडेल परंतु इप्सित साध्य होईल.
अनेकदा, जनतेवर रुढी परंपरा आदींचा पगडा इतका जबरदस्त असतो की ती अंधश्रद्धा, बालविवाह, सती, हुंडा, कर्मकांड इत्यादी विषयांवर जराही टीका ऐकून घेण्यास राजी नसते. तेव्हा विनोदाचा आधार घेतला जातो. त्याचप्रमाणे आजच्या जमान्यात थेट टीका करणे म्हणजे न्यायालयांचे शुक्लकाष्ठ मागे लावून घेण्यासारखे असते. अशा वेळी विडंबनयुक्त विनोदाचा आधार घेतल्यास टीकाकार सुरक्षित राहतात. याच संकेत स्थळावर खवचट खान यांनी पामेरियन कुत्र्यांच्या संमेलनाचा जो मजेदार धागा उघडला आहे तोच त्यांनी थेट पद्धतीने लिहीला असता तर त्यांना किती त्रास झाला असता याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
चेतन, तुमचा प्रतिसाद अगदी
चेतन, तुमचा प्रतिसाद अगदी पटण्यासारखाच आहे, किंबहुना तर्कशुद्धही आहे, आणि त्याविषयी शंका नाहीच.
मी परिणामकारकतेविषयी शंका व्यक्त केली आहे..
विनोदी लिखाणाच्या फायद्यातील बाजू पटल्या.. पण परिणामाचं काय? खासकरुन दुरितावर आघात करण्याच्या.. (जड झाला शब्द ..!! )
अनिल अवचट यांच्या साध्या समोर बसून बोलल्यासारख्या रिपोर्ताज शैलीत वाघ्या मुरळी प्रथेविषयी किंवा जातींजमातींविषयी (बलुतेदारी) वाचून जितका धक्का बसतो तितका रामनगरीने (त्यातही न्हावी जमातीमुळे येणार्या हीन वागणुकीचे उल्लेख आहेतच) नाही बसला. बलुतेदारीवरचं अवचटांचं लिखाण वाचून कदाचित दहाहजारातला एक उठेल आणि काहीतरी त्या समस्येविरुद्ध उभं करेल. पण रामनगरी वाचून लोक फक्त "काय धमाल माणूस आहे, बिनपाण्याने केलीन अगदी" असा शेरा मारून हसतील.
जो जे वांछील तो ते लाहो...
नक्कीच परिणाम कारकता कमी असणार कारण हा डायरेक्ट फोर्स नाही. दरेकवेळी अधिक परिणामकारक उपायच उपयोगी पडतो असे नव्हे. डॉ. अवचटांची पुस्तके तुम्ही आम्ही वाचतो. जनरल पब्लिकला झेपतीलच असे नव्हे. त्याचप्रमाणे त्यांना एका पुस्तकातुन डबल इफेक्ट हवा असतो तेव्हा एकाच ठिकाणी विनोद आणि समाज परिवर्तन चालुन जाते. काही शिक्षक उत्तम पद्धतीने विषय शिकवितात तर त्यांच्या वर्गात काही हुषार विद्यार्थी सोडल्यास इतरांचे घोरणे चालु असते. याउलट अधुनमधून विनोदाची पेरणी करत शिकविल्यास क्लिष्ट विषयातही विद्यार्थी रस घेतात. कडू गोळी न खाणार्या रुग्णास गोड औषधे पाजली जातात. गोड औषधांमुळे परिणाम कमी होत असला तरी जो रुग्ण कडू गोळी अजिबातच घेणार नसतो त्यापेक्षा त्याने कमी परिणाम कारक असे गोड औषध निदान घेतले तरी हा एकप्रकारचा फायदाच नव्हे काय?
तेव्हा अभ्यासूंकरिता थेट (अधिक परिणामकारक) आणि सामान्यांकरिता विनोदाच्या माध्यमातून (कमी परिणामकारक) अशा दोन्ही प्रकारच्या प्रवाहांची गरज आहेच आणि ती तशी पूर्णही होतेय.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
प्रतिसाद आवडला.
प्रतिसाद आवडला. संतुलित.
केवळ चर्चा करतो आहोत, वादासाठी वाद नव्हे म्हणून तरीही अट्टाहासाने तुमच्या प्रतिसादातल्या भागावर आधारित मुद्दा परत समोर आणतो.
मला माझा प्रश्न पुढे रेटण्याची संधी इथे मिळाली आहे.
अभ्यासू लोक तर शोध घेतात आणि जे करायचे ते करतातच. लिखाणाचा उद्देश सामान्यांतून असे अभ्यासू नव्याने उद्भवावेत असा असतो ना ?
जनरल पब्लिक, जे उदा. ९८ टक्के आहे ते विनोदाचा आनंद घेत आहे आणि त्याच मार्गावर राहात आहे.. हे जनरल पब्लिक कदाचित माझ्या मूळ धाग्याच्या शेवटच्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे उलट इफेक्ट होऊन पेटून उभे राहण्याऐवजी नुसताच "जनरलायझेशनचा दिलासा" मिळवत आहे.."चालायचंच" मार्गावर जात आहे..
आणि जे मुळात ईंटरेस्टेड आहेतच (पक्षी: अभ्यासू) ते लोक अगदी संदर्भग्रंथ काढूनही अभ्यास
करताहेतच.
यात विनोदी लेखनाची गोळी लागू पडून काही प्रमाणात सामान्य टू असामान्य कन्व्हर्जन कुठे आलं..
इन अ नटशेल, पुलं / नगरकर वाचत राहून किंवा वाचल्यामुळे खरंच परिणाम होऊन कोणी अवचटांच्या दिशेत वळला असेल असं असेल?
अत्यंत महत्त्वाचे: पुलं, अवचट, नगरकर हे फक्त आणि फक्त त्या प्रकारच्या लिखाणाचे प्रतिनिधी आहेत.
अवघड प्रवासाची सुरुवात ही सोप्या वाटेवरूनच ...
<< इन अ नटशेल, पुलं / नगरकर वाचत राहून किंवा वाचल्यामुळे खरंच परिणाम होऊन कोणी अवचटांच्या दिशेत वळला असेल असं असेल? >>
हीच गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. असं असूही शकेल किंवा नसेलही. त्याविषयी काही विदा नाही. मी स्वतः कळत नकळत कमर्षिअल कडून आर्ट कडे (पुस्तके / चित्रपट ह्यांबाबत) वळलो. मला वाटते आधी कमर्षिअलचा आनंद घेतला नाही तर थेट आर्ट कडे तरी कसे वळणार?
बोबडे बोलणे चूकच आहे. योग्य परिणाम साधायचा असेल तर स्पष्टच बोलायला हवे. परंतु सुरूवातीला "बोलणे" या प्रकाराची गोडी निर्माण याकरिता तरी पालक आपल्या पाल्यांसोबत बोबडे बोल बोलतात. पुढे त्यास संभाषण गोडी लागली की हेच पालक स्पष्ट उच्चार ही शिकवितात.
विनोदातून आवश्यक परिणाम साधला जाण्याचे मला दिसलेले उदाहरण म्हणजे चार्ली चॅप्लीन यांचा मॉडर्न टाईम्स हा चित्रपट.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
सहमत आहे
शामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत ही चिंतामण मोरेश्वर आपटे यांच्या १८९३ सालातील कादंबरी फलज्योतिषातील निरर्थकता दाखवताना याच तत्वाचा वापर केला आहे.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
चर्चेसाठी फार रंजक असला तरी
चर्चेसाठी फार रंजक असला तरी मला यावर चर्चा करणे कितपत झेपेल कल्पना नाही.
तुर्तास इतकेच म्हणतो की विनोद हा एक फॉर्मॅट आहे, व तो वापरणार्याच्या ताकदीवर अवलंबून आहे, मात्र नीट वापरल्यास कारूण्य दाखवण्यासाठी विनोदाइतके धारदार शस्त्र नाही हे पुलं, चिवी तर आहेतच त्याहीपेक्षा अधिक परिणामकपणे चार्ली चॅप्लीनने दाखवून दिलेच आहे
याऊप्पर +१ लिहिता येईल असा प्रतिसाद येण्याची वाट पाहत बसतो आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
विरोधाभास दाखविण्याचे अस्त्र
उत्तम धागा. निर्मीतीतला विनोद, हा भेदक सत्यकथनासाठी वापरणे लेखकाला अपेक्षित असेल तर नक्कीच असा परिणाम साधता येईल. माझ्या मते विनोद हे विरोधाभास दाखविण्याचे एक धारधार शस्त्र आहे पण ते वापरणे लेखकाला अपेक्षित आहे का, हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे. विनोदाचा उद्देश्यच जर रंजन असेल (ज्यातही मला काहीच चुकीचे वाटत नाही) तर मात्र हे साधणार नाही.
दृक्श्राव्य माध्यमात याचा उपयोग खूप परिणामकारकरित्या केला गेला आहे. उदाहरणार्थ, 'नो मॅन्स लॅंड' नावाचा चित्रपट जो अतिशय गंभीर विषयावर (बोस्नीयन युद्ध) भाष्य करतो आणि ज्याचा शेवटही अगदी गंभीर, विचार करायला लावणारा आहे, त्या चित्रपटात अगदी विनोदी, मनापासून हसू येणारे अनेक प्रसंग आहेत पण हे सारे विरोधाभासांवर नेमके बोट ठेवतात आणि अपेक्षित परिणाम साधतात. हिंदीतला 'जाने भी दो यारो' हा देखिल याच सदरात मोडतो.
अवांतर : विनोदासारख्या विषयावरही, विनोदबुद्धी अभावी अतिशय रटाळ भाषेत मुद्दा मांडताना बराच आत्मक्लेश होतो आहे.
विनोदाचा उद्देश्यच जर रंजन
हा मुद्दा गृहीत धरुनच चर्चा सुरु केली आहे. विनोद हा खदखदून हसण्याच्या सरळसोट उद्देशाने केलेला आनंददायक असतोच आणि ती एक उच्च निर्मितीच आहे.
विनोदाविषयी जडजंबाल चर्चा करायला नको वाटते आणि याच भीतीने बराच काळ हा विषय मनातच ठेवला होता.
पण जेव्हा लक्षात आलं की ही चर्चा "विनोदावर" नाहीये तर एका विशिष्ट रोखाने त्याचा "शस्त्र" म्हणून वापर करण्याबाबत आहे.
"रामनगरी"वर पुलंनी लिहिलेल्या प्रस्तावनेत असं म्हटलंय की विनोदी लेखन हे दाढी केल्याप्रमाणे असावं.. ज्याची दाढी झाली आहे त्यालाही स्वच्छ वाटावं. फक्त दाढी साफ व्हावी, रक्त येऊ नये.."
शब्द अगदी असेच नसतील पण अर्थ तत्सम आहे. हे वाचायला छानच वाटलं. पण कधीतरी थोडं रक्त निघालं तरी चालेल किंवा निघावंच अशी गरज असते तेव्हा हे गुळगुळीत शस्त्र चालवावं का?
विनोदाने आपलं हसवण्याचं शुद्ध काम करत राहण्याविषयी मनात किंतु नाहीच आहे.
गवि, 'विनोद हा भेदक
गवि,
'विनोद हा भेदक सत्यकथनासाठी खरंच परिणामकारक फॉर्मॅट आहे का?'
फक्त शिर्षक वाचून अर्थ लावला तर, विनोद हा 'परिणामकारक फॉरमॅट' भेदक सत्यकथनासाठी होऊ शकतो. त्याची उदाहरणे तुम्हीच दिली आहेत(पु.ल. आणि चिवि) तसेच ऋषिकेशचे चार्ली चॅप्लीनचे उदाहरण. इथे मी 'परिणाकारक' हे विषेशण फॉर्मॅट साठी लावले.
पण पुढे लेख वाचता असे लक्षात आले की जी परिणामकारकता प्रश्नांकित आहे ती त्या विनोदी अंगाने केलेल्या सत्यकथनानंतर होणार्या जनमानसावर होणार्या परिणामांची. त्यानुसार बोलायचे झाले तर ते जनमानसाच्या मानसिकतेवर अबलंबून असते. जर आपण सुधारित राष्ट्रांचा विचार केला तर तिथले जनमानस त्याच्या हक्कांविषयी पुरेसे जागरूक आहे आणि वेळप्रसंगी त्यासाठी लढा देण्याची तिथे सामुदायिक भावनाही प्रबळ आहे. त्यामुळे तिथे परिणाम टोकदार होऊ शकतो, विनोदी आणि थेट मार्गांनीसुद्धा. आपला भारतीयांचा विचार केला जाता आपण आपल्या हक्कांविषयी जागरूक आहोत का? त्यासाठी लढा देण्याची मानसिकता आहे का? तेवढा वेळ आपण वैयक्तिकरित्या देऊ शकतो का? हे महत्वाचे मुद्दे आहेत परिणामकारकता शोढण्यासाठी.
माझ्या मते जनरलायझेशन इफेक्ट आणि दिलासा मिळणेच म्हणजेच 'चला! आपल्या भावना मांडल्या कुणीतरी' असाच आणि एवढाच परिणाम होतो. त्याचं मुळ आपल्या भारतीयांच्या मानसिकतेत आणि नाईलाजाने म्हणावे लागते आहे की आपल्या 'सिस्टीम'मध्ये दडलेले आहे.
विश्वास पाटलांनी लिहीलेल्या 'झाडाझडती'मध्ये भेदक सत्यकथन थेट मार्गाने केले होते. त्यामुळे जनमानस किती ढवळून निघाले? परिणाम झाला नाहीच असे नाही पण तो वैयक्तिक पातळीवर, त्याने तो 'टोकदार' होऊ शकत नाही. तसेच, हा विषय विनोदी अंगाने मांडला असता(तसे होऊ शकत नाही, पण चर्चेकरिता) तरीही परिणाम 'टोकदार' होऊ शकला नसता. माझ्यापुरता परिणाम म्हणाल तर मी पुन्हा असले काही वाचायचे नाही असे ठरवेल. पण विनोदी फॉरमॅट मध्ये असा विषय आलाच तर नक्की वाचू शकेन.
त्यामुळे ते भेदक सत्यकथन जर जास्तित जास्त लोकांपर्यंत (चेतन म्हणाला तसे) पोहोचवायचे असेल तर विनोदी फॉरमॅट परिणामकारक आहे असे माझे वैयक्तिक मत. शेवटी तुम्ही म्हणालात तसे, माझं म्हणणं मला नीट मांडता आलंय किंवा नाही याविषयी मला शंका आहे!
- (विनोदी फॉरमॅटवर विश्वास असाणारा) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
सुधारित राष्ट्रांचा विचार
.
परफेक्ट मांडलंस रे.. चपखल प्रतिसाद... जियो...
+१
नेमक्या श्ब्दांत सुयोग्य आशय.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
परिणामकारकते विषयी
बलुतेदारी आणि रामनगरी यांची सरळ तुलना करता येणार नाही...
वाचकांच्या संख्येवरून तुलना करायची झाल्यास रामनगरी सरस ठरेल
पण करमणूक हा "मुख्य" उद्देश असल्याने "तुम्ही म्हणता तशी" परिणामकारकतेमध्ये कमी...
थोडक्यात काय की एकूण निकाल एकच..
परिणामकारक पण काहीसा अन्यायकारक
परिणामकारक फॉर्मॅट नक्कीच आहे पण टीका व्यक्तीवर असेल तर ज्या व्यक्तीवर टीका केली आहे त्यासाठी काहीसे अन्यायकारक* असते.
*अन्यायकारक अशासाठी की विनोदासाठी मूळ वस्तुस्थितीपेक्षा अतिशयोक्ती (क्वचित विपर्यास) केलेली असते. परंतु विनोदाच्या आवरणाखाली असल्याने टीकाविषयाला प्रतिवाद करणे अशक्य/अवघड होऊन बसते.
(धागा वर आला आहे म्हणून प्रतिसादाकडेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न. )
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
एका जुन्या लेखाचा दुवा
दुव्यातील लेख आणि त्याला आलेल्या प्रतिक्रिया या संदर्भात वाचनीय आहेत.
http://www.misalpav.com/node/16971
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
श्रेणीची दडपशाही
इथल्या श्रेणीची निरर्थक आणि कैच्याकै दडपशाही बघता काही मुठभर लोकांच्या शाहीलाही (ऑलिगार्कीला) विनोदाचं वावडं असतं असं म्हणायला पुरेपुर वाव आहे. या दडपशाहीबाबत एक प्रवर्तक म्हणुन तुम्हाला काय वाटतं? इथे ऑलिगार्की आहे की लोकशाही आहे?
मला उधळायला फार फार आवडतं
अरे...
ही चर्चा कशी काय सुटली आजवर?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मनोबाशी सहमत
कसे काय सुटले कळले नाही.
विनोदी, तिरकस लिखाण ही एक
विनोदी, तिरकस लिखाण ही एक प्रकारची कला आहे. वात्रट विडंबनं लिहून लिहीणार्याला आपला वैताग सकारात्मकरित्या व्यक्त करता येतो. विनोदी पद्धतीने भाष्य केल्यामुळे मनःपरिवर्तन वगैरे बहुदा होणार नाही, पण क्षणिक करमणूक निश्चितच होते. स्वतःवर केलेले विनोद सगळ्यांनाच पचवता येतात असं नाही म्हणून त्या लिखाणातचं महत्त्व कमी होतं असं मला वाटत नाही. गंभीर लिखाण वाचूनही (चित्रपट, नाटकं पाहून) लोकं किती बदलतात याबद्दल मला थोडी शंकाच आहे. 'सत्यमेव जयते'मुळे स्त्रीभ्रूणहत्या कमी होईल का, अशाप्रमाणेच.
हीच गोष्ट कोणी गंभीरपणे नाटक, सिनेमा, कादंबरीच्या माध्यमातून गंभीरपणे दाखवली असती तर कितपत लोकप्रिय राहिली असती याबद्दल शंका आहे. कालबाह्य मूल्यांचं महत्त्व नाही म्हणून कचर्यात जाण्याऐवजी शुद्ध विनोदी लिखाण म्हणूनही चिं.विंच्या लिखाणाकडे पहाता येतं. वात्रट लिखाण करणं वाटतं तेवढं सोपं नाही. कलेसाठी कला म्हणून का होईना विनोदी लिखाण अधिक टिकाऊ वाटतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
+१
गंभीर लिखाण वाचूनही (चित्रपट, नाटकं पाहून) लोकं किती बदलतात याबद्दल मला थोडी शंकाच आहे.
प्रभाकर पणशीकर "एकूण सामाजिक स्थिती आणि तुमचा नाट्यप्रवास" ह्याबद्दल बोलताना वैतागून म्हणाले होते
"नुसत्या श्ब्दांनी क्रांती होत नाही आणि नाटकं पाहून माणसं बदलत नाहीत. तो मी नव्हेच मध्ये आम्ही चाळीस वर्षांपूर्वीही तीच समस्या* मांडायचो आणि आजही दुर्दैवाने तेच करावं लागतय. नावं बदलतात पण घटना त्याच राहतात."
*समस्या = फार उशीर झाला बुवा; मुलगी लवकर कुणाला तरी "देउन" टाकली पाहिजे असा विचार करुन फारसा तपास न करता घाई घाईत लग्न "उरकणारी" कुटुंबे. पूर्वी कुणी स्थिर स्थावर घराचे आमिष दाखवून पोरगी लाटायचा; आता कुणी एन आर आय म्हणून. ह्या अर्थाचं काहीसं त्यांना म्हणायचं असावं.
जाललिखाणाबद्दलः-
विनोदी, तिरकस लिखाण ही एक प्रकारची कला आहे. वात्रट विडंबनं लिहून लिहीणार्याला आपला वैताग सकारात्मकरित्या व्यक्त करता येतो. विनोदी पद्धतीने भाष्य केल्यामुळे मनःपरिवर्तन वगैरे बहुदा होणार नाही, पण क्षणिक करमणूक निश्चितच होते.
नेहमीच असे होते असे नाही. एक साचा बनतो, व तिरकसपणाचा वैताग येउ लागतो.
विनोद, व्यंगात्म्क लिखाण ह्या पायर्या ओलांडून मग उपहास आणि सर्वात शेवटी उपरोधिक ह्या शैलीत लिखाण होउ लागतं. खुद्द तुझच बरचसं जालिय लिखाण आणि पूर्वीच्या काळात दोन एक वर्षापूर्वीपर्यंत सर्किट लिहायचे ते, हे इतकं जास्त उपरोधिक होतं की वाचताना वैतागायला होतं. लिखाण जsssरा खुसखुशीत ठेवता आलं तर बरं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
छान चर्चाप्रस्ताव आणि चर्चा.
छान चर्चाप्रस्ताव आणि चर्चा. वाचत आहे.
निखळ विनोद काही काळ बाजूला ठेवला, तर एखाद्या गोष्टीची खिल्ली उडवणारा विनोद हा त्या गोष्टीच्या तिटकारा असेल आणि त्याविरुद्ध प्रत्यक्ष काही करता येत नसेल तर त्या तिटकार्याचा निचरा म्हणून येत असावा. ज्या लोकांना हा विनोद भावतो त्यांनाही अर्थातच त्या गोष्टीचा तिटकारा असतो आणि त्याविरुद्ध थेट काही करता येत नसते. असा विनोद वाचून त्यांना समदु:खी भेटल्याचे समाधान मिळत असावे फारतर, सत्य आधीच माहित असल्याने त्यातून भावनांच्या निचर्याशिवाय बाकी काही निष्पन्न होत नाही असे वाटते. ज्यांचा दृष्टीकोन विनोदकर्त्यापेक्षा वेगळा आहे त्यांना अर्थातच तो विनोद भावत नाही.
खिल्ली उडवणारा विनोद हा सुप्त आक्रमकतेतून येत असावा असे म्हणण्यास वाव आहे. त्यासंदर्भात ही बातमी पाहा.
वर "हुकूमशहांना विनोदाचं वावडं का असतं" या लेखाचा दुवा दिलेलाच आहे.
द इन्स्पेक्टर जनरल
गोगोलने झारशाहीविरोधी म्हणून लिहिलेल्या ह्या नाटकाचा प्रयोग झाला तेंव्हा लोकांची ह्ह्पुवा झाली आणि गोगोलला स्वतःलाच जाणवले की आपला प्रयत्न यशस्वी होत नाहीय्ये. विनोद हा भेदक सत्यकथन करू शकेलच असं नाही. ते बरेचदा लेखकाच्या हिंमतीवर आणि वाचकाच्या समजूतदारपणावर अवलंबून आहे. माझ्यापुरतं म्हणायचं झालं तर गंगाधर गाडगीळांच्या कथा विशेषतः बंडू मला पुरेश्या भेदक आणि उपहास्/उपरोध ह्याला योग्य वाटतात. ओठावर हसू उमलतं आणि काळजात सल येते. इतर कोणाचे हे सामर्थ्य इतक्या प्रभावीपणे मला जाणवले नाही. बहुतांशी हास्यरस जास्त प्रभावी वाटला.
=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....
नुकतीच 'रागदरबारी' ही
नुकतीच 'रागदरबारी' ही हिंदीतील उपहास-साहित्याची जननी समजली गेलेली कादंबरी वाचली (नंदनचे आभार :)). आणि उपहासात्मक विनोद भेदक सत्यकथनासाठी किती बेमालूमपणे वापरता येतो हे पुन्हा एकदा जाणवलं
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सहमत
+१
=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....