रिकामी घंटा, लोलक गायब
वरील शीर्षक माझे नसून एका कल्पक नाटककाराच्या डोक्यातून निघालेले हे घोषवाक्य आहे. नाटकाचे नांव आहे 'शेवग्याच्या शेंगा'. नाटकात विस्तार केलेली मध्यवर्ती कल्पना, 'एकटेपणा', खूपच चांगली आहे. स्वाती चिटणीस, संजय मोने सारखे गुणी कलाकार आहेत. पण....
रविवारी दुपारी आम्ही पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहात स्थानापन्न झालो आणि थोड्याच वेळांत, आमच्या मागे एक ग्रुप येऊन बसला. बसल्या क्षणापासून त्यांचा कलकलाट चालू झाला. त्यांत ते सहा जणांची सेल्फी काढत होते. आम्ही आपले, नाटक सुरु झाल्यावर तरी ही बडबड संपणार की नाही, या विवंचनेत होतो.
नाटक सुरु झाले, कादंबरी कदमने स्टेजचा ताबा घेतला. हळुहळू नाटक पुढे जात राहिले तसे नाटकाचे नेपथ्य कल्पक व छान आहे हे जाणवले. पण तो आनंद जास्त टिकला नाही कारण नाटकातली भाषा! आजकाल, गंभीर प्रसंगातही शक्य तेवढे, 'हंशा आणि टाळ्या' मिळवलेच पाहिजेत, अशी बहुधा दिग्दर्शकांची अपेक्षा असावी. त्यानुसार सर्व अनुभवी व नवीन कलाकारही वावरत होते. प्रत्येक पीजेला आमच्या मागचा ग्रुप सातमजली हंसून आपली अभिरुची दाखवून देत होता.
स्वाती, आतिषा आणि संजय यांना वेगवेगळ्या परिस्थितीमुळे आलेला एकटेपणा, आणि त्यावर त्यांनी शोधून काढलेले उपाय, या सर्वांचे निरीक्षण करत असलेली नव्या पिढीची प्रतिनिधी म्हणून कादंबरी कदम आणि जोडीला तिचा प्रियकर, त्यांचे प्लान्स, त्यातील एकटेपणाचा संभाव्य धोका या मुद्द्यांभोवती नाटक फिरते. पण,
मॉडर्न आर्टने तयार केलेल्या पॉट ला पॉटी म्हणणे आणि उगाचच येताजाता मॉडर्न आर्टवर घसरणे
प्रत्येक पात्राच्या तोंडी,' रिकामी घंटा, गायब लोलक' हे वाक्य पुन्हा पुन्हा घालणे
मी आता पागे बाई (पाळी गेलेली बाई) झालीये असे म्हणणे
फेसबुकवरच्या LOL चा, 'तू तिथे लोळ मी इथे लोळते' असा अर्थ काढणे
असे अनेक पीजे संवादात पेरले आहेत आणि असल्याच विनोदांना सरावलेले प्रेक्षक ते डोक्यावर घेतात.
नाटकाचा गोषवारा, लेखकाच्याच भाषेत सांगायचा म्हणजे, बर्वेबाई(स्वाती) आणि आरती(आतिषा} यांनी, आपण रिकाम्या घंटा आहोत हे जाहीर केलेले असते. त्यातील बर्वेबाईंच्या लोलकाने अनेक घंटांबरोबर घंटानादाचा आनंद घेऊन, फोटोत जाऊन बसण्याचा पर्याय निवडलेला असतो, तर आरतीचा लोलक हा मॅन्युफॅक्चरिंग मधे डिफेक्ट असल्याने, पण चांगल्या स्वभावाचा असल्याने, स्वतःहूनच तिच्यापासून दूर गेलेला असतो. ससाण्यांची(संजय) घंटा पण फोटोत जाऊन बसल्याने तो एकाकी लोलक झालेला असतो. विनयाचा(कादंबरी) लोलक महत्त्वाकांक्षी असल्याने, ज्या घंटेशी हिशोब जुळेल तिचाच घंटानाद करायचे ठरवतो. सर्वात ज्युनिअर विनयाच शेवटी सगळ्यांना 'ताईचे सल्ले' देते आणि मार्ग दाखवते. वडिलांनी त्या महत्त्वाकांक्षी तरुणाबरोबर लग्न करु मोकळी हो, असा पारंपारिक सल्ला दिल्याने तिच्यातला स्त्रीस्वातंत्र्याचा विचार उसळी मारुन वर येतो आणि ती सहजपणे आपल्या प्रियकराला(लोलकाला) मोकळे करते. आणि सगळीकडे कसा आनंदीआनंद होतो.
आम्ही, कोल्हटकरी नाटकांपासून बाळ कोल्हटकरी नाटकांपर्यंत आणि कानेटकरी नाटकांपासून तेंडुलकरी, एलकुंचवारी नाटके आत्मीयतेने बघितली आहेत. मराठी नाटकाने अनेक वेळा कात टाकलेली बघून, त्या कात टाकलेल्या नागाच्या नावीन्यपूर्ण सळसळीने वेडावलो आहोत. पण या सगळ्या प्रवासांत भाषेचा अभिजातपणा मात्र तसाच टिकून राहिलेला अनुभवला आहे. हल्लीची अनेक उठवळ नाटके आणि प्रस्तुत नाटक बघितल्यावर मात्र, 'कात रिकामी, नाग गायब' असे काहीसे मनांत आले.
प्रतिक्रिया
तुम्ही आख्खे नाटक पाहिलेत?
तुम्ही आख्खं नाटक पाहिलंत? धन्य आहे तुमची. 'शेवटचं कधी जेवला होता, बाईच्या हातचं?' हा हृद्य इत्यादी संवाद बर्विणीच्या तोंडी ऐकला आणि मी सभात्याग केला. बाकी लोक खरंच सातमजली वगैरे हसत होते. काय व्हनार या म्हाराष्ट्राचं काय म्हाईत.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
लोळ! (हा पूर्वी विजेचा असायचा
लोळ! (हा पूर्वी विजेचा असायचा आता हसण्याचा असतो). बाकी विट्टी विट्टी म्हणता म्हणता विनोदाच्या अंगाने (अंगावरून कोण म्हणतंय रे?) जाणारी मराठी नाटके अगदीच शिट्टी व्हायला लागलेली दिसतात. "लोल"क प्रेक्षक मोकाट सुटल्याने मराठी नाटकांची (मृत्यु)घंटा वाजतीये बाकी काही नाही.
हा हा.
पण तुम्हाला लोलक म्हणायचंय की लंबक?
लंबक(र्ण) ऊर्फ 'लोल'क असं
लंबक(र्ण) ऊर्फ 'लोल'क असं म्हणायचं असेल काय?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तो शब्द
लोलक हा शब्द लेखकाचा आहे.
चांगला पंचनामा! ळॉळ!
चांगला पंचनामा! ळॉळ!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
झकास परिक्षण !
गाजलेले विनोदी (!) नाटक असेल तर अजिबात हसायला येत नाही असे बरेचदा अनुभवले .वंदना गुप्ते तिच्या विशिष्ट प्रकारच्या उच्चारणामुळे विनोदी बोलते आहेसे वाटून लोक हसतात आणि ते पाहून आपल्याला अनावर रडू येत .
प्रत्यक्ष
प्रत्यक्ष नाटकापेक्षाही त्याच जो प्रमोशन कार्यक्रम असतो तो जास्त विनोदी वाटतो कारण तिथे दस्तुरखुद्द लेखक महाशयही आलेले असतात, हातवारे करुन आपली निर्मिती प्रक्रिया लोकांना समजावून सांगायला.
माझ्या लेखांत नाटकातील भाषेबद्दल आक्षेप आहे तो तितकासा बरोबर नाही. भाषा ही नाटकाच्या गरजेप्रमाणे अगदी 'बाईंडरी' ही असू शकते. जास्त आक्षेप हा त्यातल्या चीप विनोदांना आहे. पण हल्लीच्या प्रेक्षकांना बहुतेक (पुलंच्या भाषेत) असलाच माल लागतो. म्हणून तर एवढे मोठे सभागृह गच्च भरले होते.
+१
हे ट्रेंड्स आहेत का?
उदा. मध्यंतरी धम्म्म्म्माल विनोदी नाटुकल्यांमधे छान छान गाणी वगैरे गायची साथ होती आणि जवळपास प्रत्येक नाटकात वंदना गुप्ते, मोहन जोशी, सविता प्रभुणे इ. मंडळी वयाला न शोभणार्या हालचालींसकट ती गाणी गात मंचावर फिरत.
आता तो ट्रेंड जाऊन विनोदी पिंका टाकायचा ट्रेंड आला असावा.
पण धम्म्माल विनोदी नाटकांना महाराष्ट्रात मरण नाही.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
मराठी चित्रपटांचीपण तीच रड
मराठी चित्रपटांचीपण तीच रड आहे.
ते एकतर विनोदी असतात नाहीतर एकदम गंभीर सोशल इश्यूवर असतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.