मैने गांधीको नही मारा
'मैने गांधीको नही मारा' अशा शीर्षकाचा एक चित्रपट नुकताच नेट्फ्लिक्सवर पाहिला.
अनुपम खेर आणि उर्मिला माताँडकर ह्यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ह्या चित्रपटात डिमेन्शिया झालेल्या व्यक्तीला त्यातून बाहेर काढण्यासाठी खोटे नाटक रचले जाते अशी कथा आहे. हा एक वेगळाच चित्रपट फार प्रकाशात कसा आला नाही ह्याचे आश्चर्य वाटले. हा चित्रपट पाहिला नसल्यास अवश्य पाहावा अशी सूचना करीत आहे. यूट्यूबवर http://www.youtube.com/watch?v=T_RT_AnN61w येथे अल्प दरात तो उपलब्ध आहे.
अशाच प्रकारचे कथानक असलेले एक मराठी नाटक पूर्वी पाहण्यात आले होते. ९५-९६च्या सुमारास दूरदर्शन चॅनल सर्वांना खुले झाले असता 'प्रभात' नावाचा एक चॅनल एक-दोन वर्षे दिसत असे. (तो चॅनल लवकरच बंद झाला.) त्यांच्याकडे थोडाच मालमसाला होता आणि तोच फिरूनफिरून दाखविला जात असे असे आठवते. त्यामध्ये दोन नाटके मला खूप आवडली होती.
त्यांपैकी एकात अशी कथा होती की एका व्यक्तीला आपण नाना फडणीस आहोत असा भ्रम झाला होता. त्या भ्रमातून त्याला बाहेर काढण्यासाठी त्याच्या आसपास पेशवाईचे वातावरण आणि पात्रे निर्माण केली जातात. पेशवाईत वावरणारी ही पात्रे त्यातून बाहेर पडली की सर्वसामान्य माणसे होतात आणि त्यातून मजेदार घटना निर्माण होतात.
हे नाटक कोणते होते हे जाणून घेण्याची आणि यूट्यूबसारख्या जागी हे दिसत असल्यास पुन: पाहण्याची मला फार इच्छा आहे.
दुसरे नाटकहि विनोदी होते आणि त्यात विजय कदम ह्यांचे अप्रतिम काम होते असेहि आठवते.
ह्याविषयी कोणास काही माहिती असल्यास प्रतिसादातून अवश्य कळवावे अशी विनंति करण्यासाठी हे लिहिले आहे.
तो चित्रपट आहे Good Bye
तो चित्रपट आहे Good Bye Lenin. अधिक माहिती खालील दुव्यावर मिळेल. माझा एक आवडता चित्रपट.
http://www.movie-gurus.com/content/reviews/g/1409/index.html
चित्रपट - फिफ्टी फस्ट डेट्स
50 First Dates या चित्रपटातही अशाच प्रकारच्या स्मृतिभ्रंशाविषयी मांडणी केली होती. सुंदर चित्रपट!
मीच एक शहाणा
एकात अशी कथा होती की एका व्यक्तीला आपण नाना फडणीस आहोत असा भ्रम झाला होता. त्या भ्रमातून त्याला बाहेर काढण्यासाठी त्याच्या आसपास पेशवाईचे वातावरण आणि पात्रे निर्माण केली जातात. पेशवाईत वावरणारी ही पात्रे त्यातून बाहेर पडली की सर्वसामान्य माणसे होतात आणि त्यातून मजेदार घटना निर्माण होतात.
हे नाटक कोणते होते हे जाणून घेण्याची आणि यूट्यूबसारख्या जागी हे दिसत असल्यास पुन: पाहण्याची मला फार इच्छा आहे. >>
सदर नाटकाचे नाव मीच एक शहाणा असे होते. उदय टिकेकर व अंशुमाला पाटील यांनी त्यात अभिनय केला होता.
अधिक माहितीकरिता -
http://www.esakal.com/esakal/20100721/5307370744819516166.htm
http://anshumalapatilactress.com/home.html
http://www.esakal.com/esakal/20110704/5545446220475385656.htm
बाय द वे, मैने गांधी को नही मारा मी पाहिलाय आणि बोमन ईराणी, प्रेम चोप्रा, वहिदा रेहमान व परवीन डब्बास यांच्या भूमिका आवडल्या. या चित्रपटात एकही खलनायक नाही तरी मोठा संघर्ष आहे.
सुंदर चित्रपट
हा एक वेगळाच चित्रपट फार प्रकाशात कसा आला नाही ह्याचे आश्चर्य वाटले.
याउलट मला मुळीच आश्चर्य वाटले नाही. हिंदी चित्रपटांचा साचा नि प्रेक्षकवर्ग ठरलेला आहे. गुंडगिरी नि पोरकट प्रेमकथेच्या बाहेरची कोणतीही कथा असलेला चित्रपट टिकत नाही. त्यामुळे 'या चित्रपटात माझी भूमिका फार चॅलेंजिंग आहे' असं एखादी हिरविण म्हणते तेव्हा मी पूर्वी खो: खो: हसायचो, आता हसूही येत नाही. हिंदी चित्रपटात हिरविणीला 'रोल' असतो 'भूमिका' नसतेच. तरीही समाजात ५०%च्या आसपास असलेल्या स्त्रिया असले चित्रपट पाहतात त्यांना यात काही खटकत नाही हे दुर्दैव म्हणायचे, आत्मविस्मृती की आणखी काही? अलिकडचे विद्या बालनचे चित्रपट अपवाद ठरावेत. अर्थात त्यातील इश्किया हा गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवरचाच होता नि डर्टी पिक्चर तिचा अभिनय वगळला तर उघड मसाला चित्रपट होता. कहानी अजून पाहिला नाही.
हे 'वेगळ्या वाटेवरचे' चित्रपट पेलण्याची ताकद जशी निर्मात्यांमधे नाही तसेच प्रेक्षकांमध्येही. हिंदी चित्रपट हा 'धंदा' आहे हे विसरू नका. मेलेल्या चित्रपटकलेचे कातडे बसवून त्यांचा ढोल जोराजोरात वाजतो इतकेच.
असाच एक चित्रपट आठवला. नाव आठवत नाही. सचिन खेडेकर नि नेहा धुपिया होते. एका डोंगरावरील फार्महाऊस मधे घडलेले नाट्य (घटना जवळजवळ नाहीच म्हणाव्यात अशा)आहे. बंदिस्त अवकाशात एखाद्या नाटकासारखा आहे चित्रपट. फाळणीच्या वेळी ट्रान्सिट कॅम्पमधे डॉक्टरनेच बलात्कार केलेली स्त्री, केवळ त्याच्या देहगंधावरून त्याला ओळखते नि अखेर आपला सूड पूर्णत्वाला नेते. ज्याला बॅटल ऑफ नर्वज् म्हणतात तसा प्रकार आहे. कोणत्याही घटनांशिवाय दोन तास तुम्हाला पूर्ण खिळवून ठेवणारा चित्रपट. चक्क नेहा धुपियादेखील सुसह्य वाटली होती त्यात, ती भूमिकाच इतकी सशक्त होती.
तुम्हाला २००५ चा सिसकियां म्हणायचे आहे काय?
असाच एक चित्रपट आठवला. नाव आठवत नाही. सचिन खेडेकर नि नेहा धुपिया होते. एका डोंगरावरील फार्महाऊस मधे घडलेले नाट्य (घटना जवळजवळ नाहीच म्हणाव्यात अशा)आहे. बंदिस्त अवकाशात एखाद्या नाटकासारखा आहे चित्रपट. फाळणीच्या वेळी ट्रान्सिट कॅम्पमधे डॉक्टरनेच बलात्कार केलेली स्त्री, केवळ त्याच्या देहगंधावरून त्याला ओळखते नि अखेर आपला सूड पूर्णत्वाला नेते. ज्याला बॅटल ऑफ नर्वज् म्हणतात तसा प्रकार आहे. कोणत्याही घटनांशिवाय दोन तास तुम्हाला पूर्ण खिळवून ठेवणारा चित्रपट. चक्क नेहा धुपियादेखील सुसह्य वाटली होती त्यात, ती भूमिकाच इतकी सशक्त होती. >>
तुम्हाला २००५ चा सिसकियां म्हणायचे आहे काय? सोनु सूदने नेहाबरोबर त्याच वर्षी पुन्हा शीशा नावाच्या अजुन एका थ्रिलर मध्येही काम केले होते. अशा चित्रपटांकडे कोणी फारसे लक्ष देत नाही कारण हे विदेशी चित्रपटांची नक्कल असतात.
अच्छा?
अशा चित्रपटांकडे कोणी फारसे लक्ष देत नाही कारण हे विदेशी चित्रपटांची नक्कल असतात.
मग कोणता हिंदी चित्रपट विदेशी चित्रपटांची नक्कल नसतो हो? आणि ही नक्कल असेल तर निदान अस्सल नक्कल तरी म्हणावी लागेल. नाहीतर एका सेवन सामुराईच्या इतक्या भ्रष्ट नकला पाहिल्यात की त्या करणार्याला निदान एकदा मूळ चित्रपट नीट समजावून का घेत नाहीस रे बाबा? असे विचारायची तीव्र इच्छा होते. (अनावृत पत्र लिहावे काय? ) असल्या भिकार नकला चालतातच ना?
अवांतर: दाक्षिणात्य चित्रपट अधिक दर्जेदार असतात असे एक मत मध्यंतरी ऐकण्यात आले होते? तुम्हाला काय वाटते?
<< तरीही समाजात ५०%च्या आसपास
तरीही समाजात ५०%च्या आसपास असलेल्या स्त्रिया असले चित्रपट पाहतात त्यांना यात काही खटकत नाही हे दुर्दैव म्हणायचे, आत्मविस्मृती की आणखी काही? >>
ही अपेक्षा फक्त स्त्रियांकडून असण्याच काही विशेष कारण आहे का?
हाच प्रश्न पुरुषांच्या बाबतीतही विचारता येईल.
काही लोक (स्त्रिया आणि पुरुष) असे चित्रपट का पाहतात, आवडीने का पाहतात - असा मूळ प्रश्न आहे का?
कारण
मी दिलेल्या उदाहरणात चित्रपटातील स्त्रियांचे दुय्यम स्थान हा मुद्दा होता. तो पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक खटकायला हवा असे मला वाटते. तुमचे मत तुमच्यापाशी माझे माझ्यापाशी.
पुढचा संभाव्य प्रश्न नि आगाऊ उत्तरः चित्रपटाबद्दल बोलताना स्त्रियांचेच उदाहरण का घेतले (अन्य एखादे का घेतले नाही?) तर याचे उत्तर तो प्रतिसाद लिहिला त्याच दिवशी एका दुय्यम नटीचे अतिशय टुकार अशा मसाला चित्रपटातील भूमिकेबद्दल ती फार चॅलेंजिग असल्याचे विधान वाचले (आणि जे एकाहुन अधिक नट्यांनी याआधी केलेले वाचण्यात आल्याने आणिवास्तवातील चित्रपटात स्त्रियांना काहीही चॅलेंजिंग भूमिका नसतात हे माझ्यापुरते विदारक सत्य (तशा असतात असे तुम्हाला वाटत असल्यास तुमचे मत तुमच्यापाशी) ठाऊक असल्याने मला ते हास्यास्पद वाटले, डोक्यात ताजे होते म्हणून. तुम्ही मुद्दा लिहिताना पुरूषांबद्दल असा मुद्दा घेतला (जसे वारंवार गुंडांच्या भूमिका करून स्वतःला अभिनेता म्हणवणे वगैरे) तर त्यात मी तरी स्त्री-पुरूष वाद आणणार नाही. कारण माझ्या दृष्टीने मुद्दे महत्त्वाचे असतात. तपशीलावर, उदाहरणांवर निष्कारण वाद घालण्याची माझी तरी सवय नाही. इत्यलम्.
<< तरीही समाजात ५०%च्या आसपास
तरीही समाजात ५०%च्या आसपास असलेल्या स्त्रिया असले चित्रपट पाहतात त्यांना यात काही खटकत नाही हे दुर्दैव म्हणायचे, आत्मविस्मृती की आणखी काही?>>
ही अपेक्षा फक्त स्त्रियांकडून असण्याच काही विशेष कारण आहे का?
हाच प्रश्न पुरुषांच्या बाबतीतही विचारता येईल>>
खरे आहे. मी श्री. रमताराम यांच्या वतीने उत्तर देत नाही परंतु वरील वाक्याच्या आधीच त्यांनी हिंदी चित्रपटात हिरविणीला 'रोल' असतो 'भूमिका' नसतेच.>> हे वाक्य टाकले आहे.
पुरुष सिनेमे का बघतात हे मी सांगु शकत नाही ( मी स्त्री आहे) पण त्यांच्या एकंदर रिअॅक्शन वरून सहज अटकळ बांधता येते. श्री. रमताराम यांनी जे सिनेमे निर्देशित केले आहेत, अशा सिनेमांमध्ये जे घाऊक प्रमाणात स्त्री शरिराचे शोषण चालते ते ( समाजाच्या जवळपास ५०% वारी असलेल्या ) स्त्रियांना खटकत नाही असे त्यांना म्हणायचे असावे असे वाटते ( किमान मी तसा अर्थ घेतला ). पुरुषांना खटकावे / नये हा प्रश्न सुद्धा आहेच.
हा विषय सदर धाग्याला अवांतर असावा.. म्हणून येथे अधिक चर्चा करत नाही ......
दिलेली लिंक चालत नाही
तुम्ही दिलेली लिंक चालत नाही पण तो चित्रपट येथे ही उपलब्ध आहे
http://www.youtube.com/watch?v=c2UlxeiQJI4&feature=related
~ वाहीदा
तरीही समाजात ५०%च्या आसपास
तरीही समाजात ५०%च्या आसपास असलेल्या स्त्रिया असले चित्रपट पाहतात त्यांना यात काही खटकत नाही हे दुर्दैव म्हणायचे, आत्मविस्मृती की आणखी काही
रमताराम यांच्या वरील मुद्याशी प्रचंड सहमत. ( आणि त्याबद्दल काही करत नाही म्हणून स्वतः बद्दलही खरेतर एकाच वेळी चीड आणि शरम ही वाटते.... )
अशा चित्रपटांकडे कोणी फारसे लक्ष देत नाही कारण हे विदेशी चित्रपटांची नक्कल असतात.
मग कोणता हिंदी चित्रपट विदेशी चित्रपटांची नक्कल नसतो हो?
ह्या मुद्द्याशी देखील सहमत.
या धाग्यातला मूळ व ज्यांचा उल्लेख आला आहे असे काही बघण्याच्या यादीत टाकले आहेत.
मी हा चित्रपट काही
मी हा चित्रपट काही वर्षांपूर्वीच पाहिला होता आणि प्रचंड आवडला होता. अनुपम खेर आणि उर्मिला दोघांनीही या चित्रपटात सुरेख काम केलं आहे. उर्मिलाने झकास काम केलेला एक चांगला थरारपट म्हणजे 'एक हसीना थी'. सर्वसामान्य घरातली, परिस्थितीची मुलगी फसवली जाते, पोलिस कोठडीची हवा खाते आणि हसीना प्रतिशोध घेणारी व्यक्ती बनते. अशा प्रकारचे चित्रपट आवडत असतील तर 'एक हसीना थी' आणि 'The girl who lives down the lane' हा जोडी फोस्टर अभिनीत चित्रपट जरूर पहा. उर्मिला आणि जोडी फॉस्टर यांनी अनुक्रमे या दोन्ही चित्रपटांत फार सुरेख कामं केलेली आहेत.
असे चित्रपट फार प्रसिद्ध होत नाहीत या बद्दल मलाही आश्चर्य वाटत नाही. आणि असे चित्रपट पहाणारे स्त्री-पुरूष दोन्ही प्रकारचे लोक आहेत याचा खेद वाटतो.
तुम्ही विचारलेलं नाटक म्हणजे बहुदा "मी तर बुवा अर्धाच शहाणा" असावं. स्वतःला नाना फडणवीस समजणार्या पात्राचं काम करणार्याचा चेहेरा डोळ्यासमोर येतो आहे, पण नाव प्रमोद पवार (बहुतेक).
त्यातला एक विनोद आठवतो. नाटकात एका स्त्रीला हा रमाबाई (माधवरावांची पत्नी) समजतो. ती मधल्या वेळात चहा बिस्कीटांचा आस्वाद घेत बसलेली असते. पतीनिधनांनंतर तिला शिळ्या भाकरीचे तुकडे मचूळ पाण्यात बुडवून खावे लागतात याचं त्याला फार दु:ख होतं. एकेकाळी प्रभात नामक चॅनलवर हे नाटक अनेकदा लागत असे.
+१
हो. मी तर बुवा अर्धाच शहाणा. आणि प्रमोद पवार. दोन्हीही अचूक उत्तरे. *च्यायला आमचा करेक्ट माहिती देउन भाव खायचा चान्स गेला*
त्याच नाटकातील इंग्रज वकीलाचे (शेखर नवरे) व राघोबादादाचे पात्र आवडले होते.
हे कथेतील पात्र्-पात्र बनण्याचा खेळ दिलीप प्रभावळक्र ह्यांची प्रमुख भूमिका असलेला "रात्र आरंभ" ह्या चित्रपटातही दाखवला होता. पण तिथे स्किझोफ्रेनिया झालेला रुग्ण होता. कथा शेवटी कारुण्यमय अन भल्तीच सेंटी बनवली होती.
मेमरीज ऑफ मार्च
'अस्पृश्य' मानल्या जाणार्या विषयावरील अजून एक अलीकडे पाहिलेला उत्तम चित्रपट 'मेमरीज ऑफ मार्च'. भारतात निर्माण झालेला हा चित्रपट इंग्रजी भाषेत आहे आणि दीप्ति नवल आणि ऋतुपर्ण घोष ह्यांची त्यात कामे आहेत.
अपघातात वारलेल्या मुलाच्या वस्तु गोळा करण्यासाठी आई कलकत्त्याला पोहोचते. तेथे तिला आपल्या मुलाच्या समलिंगी आयुष्याची प्रथम कल्पना येते. ह्या गोष्टीचा धक्का येथपासून तिचा स्वीकार असा तिचा भावनिक प्रवास हा चित्रपट दर्शवितो.
यूट्यूबवर उपलब्ध आहे:
http://www.youtube.com/movie?v=2u1EJOuWqRk&feature=mv_sr
+१
नितांतसुंदर चित्रपट. मागच्या वर्षी पिफ्फ मधे पाहिला होता. ऋतुपर्णो घोष यांची पटकथा नि संजोय नाग यांचे दिग्दर्शन असलेला. दुर्दैवाने बहुसंख्य प्रेक्षक चित्रपटाचा बाज जाणून न घेता - समलिंगी संबंधाबाबत आहे म्हणजे कॉमेडीच असणार या गृहितकातून बहुधा - अस्थानी हसत होते त्याने रसभंग झाला. दीप्ती नवल नि स्वतः ऋतुपर्णो यांचा अभिनय अप्रतिम. अतिशय नाजूक विषयाचा तरीही तोल ढळू न देता प्रेक्षकांपर्यंत यशस्वीपणे पोचवलेला चित्रपट.
प्रभात
'प्रभात' वरील कार्यक्रम तेच तेच असले तरी रंजक असत. श्री. कोल्हटकर यांनी उल्लेख केलेले दुसरे नाटक म्हणजे विजय कदम आणि रसिका जोशी यांचा अप्रतिम अभिनय असलेले - बहुदा गंमत जंमत या नावाचे असावे.
'मैने गांधी को नही मारा' पाहिल्याचे आणि आवडल्याचे आठवते. त्या निमित्ताने आवडलेले पण फारसे न गाजलेले इतर चित्रपट आठवले. सेहर, कुछ मीठा हो जाये, हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि., खोसला का घोसला ही अलीकडची उदाहरणे. एक रुका हुवा फैसला, मैं आजाद हूं, एक डॉक्टर की मौत वगैरे पूर्वीची उदाहरणे.
धन्यवाद.
सन्जोप रावांनी सेहर सारख्या सुंदर चित्रपटाची आठवण काढली म्हणून. ह्या चित्रपटातील अर्शद वारसी, सुशांत अशा सगळ्यांचाच अभिनय अतिशय सुरेख होता आणि चित्रपट देखील वेगळ्याच धाटणीचा होता.
असेच आणखी काही आवडलेले चित्रपट म्हणजे मनोरमा सिक्स फिट अंडर*, उडान, शोर इन द सिटी,मकबुल, कॅरम इ.
* हा चित्रपट दिल्याबद्दल अदितीचे धन्यवाद.
'इस रात की सुबह नही' हा
'इस रात की सुबह नही' हा माझाही आवडता चित्रपट आहे. त्या चित्रपटात गुंडांच्या, स्टीरिओटीपिकल, करवादणारी बायकोची भूमिका करणार्यांनी (आणि इतरही कलाकारांनी) उत्तम काम केलं आहे. सुधीर मिश्रा हे याचे दिग्दर्शक. त्यांचा 'हजारों ख्वाईशें ऐसी'ही अतिशय सुरेख चित्रपट आहे. त्यांचे इतर दोन 'धारावी' आणि 'चमेली' अजून पाहिलेले नाहीत. पण इच्छा आहे.
"हजारों ख्वा़हिशें ऐसी" फारच
"हजारों ख्वा़हिशें ऐसी" फारच सुरेख चित्रपट!! केके मेननच्या तेव्हापासून प्रेमात... शाइनी अहूजाने सुद्धा मस्त अभिनय केला होता त्यात. "इस रात की सुबह नहीं" पाहिलेला, आणि आवडलेला तेवढा आठवतो, पण कथानक वगैरे नाही लक्षात - निर्मल पांडे आणि तारा देशपांडे (का स्मृती मिश्र?) होते नं त्यात? मिश्र चा "येह साली जि़ंदगी" नाही पाहिला अजून.
आता अगदीच रहावत नाहीये.
आता अगदीच रहावत नाहीये. म्हणून थोडक्यात काय होतं ते लिहून टाकते. पण यात माझ्या मते काहीही स्पॉयलर नाही. खुशाल वाचा.
बर्यापैकी सांपत्तिक स्थिती असणार्या निर्मल पांडेच्या बायकोला, तारा देशपांडेला त्याचं स्मृती मिश्राबरोबर असलेलं प्रेमप्रकरण समजतं. दोघांचं भांडण होतं. निर्मल पांडे घरातून संध्याकाळी उशीरा बाहेर पडतो. एका बारमधे बसलेला असताना तिथे त्याचं भांडण आशिष विद्यार्थी या लोकल दादाशी होतं, दादाचे दोन गुंड, (आपले) संदीप कुलकर्णी, उपेंद्र लिमये आणि इतरही त्याच्या मागे लागतात. सौरभ शुक्लाला (दुसरा लोकल दादा) आशिष विद्यार्थीचा त्याच संध्याकाळी झालेल्या एका घटनेमुळे प्रतिशोध घ्यायचा असतो. आशिष विद्यार्थीला काही प्रमाणात चूक मान्य असल्यामुळे तो भांडण टाळण्यासाठी तिथून सटकलेला असतो. पुढे काय होतं हे मी दोन वाक्यांत सांगू शकते, पण त्यात मजा नाही. एकाची तंगडी दुसर्याच्या पायात अडकून संध्याकाळी अंधार पडताना सुरू झालेली गोष्ट सकाळी सूर्योदयाला थांबते. अगदी गाण्यांचाही उपयोग करून घेत गोष्ट पटापट सरकत रहाते. अगदी फुटकळ भूमिकांमधल्या लोकांनीही उत्तम काम केलेलं आहे. सुधीर मिश्रा लाजबाबच.
मिश्रांचा 'ये साली जिंदगी' विसरलेच होते. तो ही यादीत आहे.
अलिकडेच आलेला 'जॉनी गद्दार'ही मस्त आहे. 'एक हसीना थी' आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक एकच, श्रीराम राघवन. जॉनी गद्दारचं रहस्य पहिल्या काही फ्रेममधेच उघड झालेलं असलं तरीही चित्रपट खिळवून ठेवणारा थ्रिलरपट आहे.
इस रात की सुबह नही
हा चित्रपट अशाच जालीय गप्पांतून समजला होता. विषय निघालाच आहे तर अजून एक अनवट चित्रपट सापडालाय, तो अवश्य बघावा असे सुचवतो.
"हल्ला" अगदि हल्का फुल्का, लो बजेट्,नर्मविनोदी असा कुठल्याही मध्यमवर्गीय भारतीयानं पाहिलाच पाहिजे असा.
कलाकर आहेत प्रशांत्,रजत कपूर व इतरांची नावे मला ठाउक नाहित, पण तेही भन्नाटच आहेत.
http://www.youtube.com/watch?v=HZdahne3evQ&feature=watch-now-button&wid…
हागोरोलोइ बोहु दूर
बरुआंचा "हागोरोलोई बोहु दूर" (समुद्र खूप लांब आहे) चित्रपट खूप वर्षांपूर्वी दिल्लीतल्या फेस्टिवल मध्ये पाहिला होता - तेव्हाच कुठलेतरी पारितोषिक मिळाले होते त्याला. तेव्हा खूप आवडला होता, पण आता आठवला तर थोडा फार सेंटिमेंटल वाटतो. तेव्हाच ऋतुपर्ण घोषचा "उनिशे एप्रिल" ही पाहिला होता.
"खागोरोलोई / हागोरोलोई" शब्दावरून पिकलेला पोरकट हशा पण आठवला(हे अवांतर झालं, आणि ते वयही होतं तशाच विनोदाचं....)
मागे मीच त्याची ओळख करून दिली
मागे मीच त्याची ओळख करून दिली होती आता कुठे ते आठवत नाहिये आणि दुवाही मिळत नाहिये.
या ऋषिकेशच्या प्रतिसादाला उप-प्रतिसाद देता येत नाही, म्हणुन ईथे लिहितो.
तुझ परिक्षण वाचल नाही पण गुडबाय लेनिन या चित्रपटाची ओळख बिपिनने करुन दिली होती मिसळपाववर*.
*दुसर्या संस्थळाची लिंक चालत नसल्यास संपादकांनी लिंक उडवली तरी हरकत नाही.
मध्यंतरी अश्याच प्रकारच्या
मध्यंतरी अश्याच प्रकारच्या एका चित्रपटाची ओळख कुणीतरी करून दिल्याचे आठवते. त्यात कम्युनिझमच्या पाडावापूर्वी कोमात गेलेली म्हातारी नंतर शुद्धीवर येते आणि तिला कम्युनिझम नाही याचा धक्का बसू नये म्हणून कम्युनिझम अजून असल्याचे नाटक कुटुंबीय वठवतात असे कथानक होते.