Skip to main content

लक्ष्मीनारायणाचा महिमा.

कवयित्री कविता प्रांतात कायम "ढ" राहिल. इतकी वर्षे नेटावर वावरून तिने कवितांमध्ये कोणतीही प्रगती केलेली नाही हे जाणून खालील कविता वाचावी. कविता कळत नसतानाही उगीच कवितेच्या फंदात पडायचा हा तिचा दोष सर्वांनी गोड मानून घ्यावा. कवितेची प्रेरणा येथे आहे. अनेक प्रयत्नांनंतरही कवयित्रीला कविता करणे जमेलच असे नाही याची जाणीव ठेवावी.


मोठ्या माणसात दडलेलं
लहान मूल
लहान मुलात दडलेला
मोठा माणूस
तत्वतः सारखेच

निळ्या फिल्मचा
आस्वाद
दोघे आनंदाने घेतील
एकाचा कळत आनंद
दुसर्‍याचा नकळत

बाईला बाई का म्हणावं?
आणि पुरूषाला पुरूष?
प्रत्येक बाईतही पुरूष दडलेला
आणि पुरूषात बाई

घट, बाक, गोलाई
शब्द खेळ आणि शब्दच्छल मेले!
ती, तो आणि ते
क्याटेगर्‍यांच्या जंजाळात अडकलेले

दिसत नसेल गोलाई
म्हणून लेबल चिकटवावं?
ट्रान्स, होमो, बाय, स्ट्रेट
लक्ष्मीनारायणाचा महिमा सारा


कविता करायला लागलेला टैम (टैपिंगसकट): ४ मि.

लक्ष्मीनारायण त्रिपाठी: http://youtu.be/eEW_OCpNL3k - यांच्या मुलाखती कौतुकास्पद वाटतात.

श्रावण मोडक Sat, 29/10/2011 - 18:16

कॉलिंग, घासू - चिंतू... :)

प्रियाली Sat, 29/10/2011 - 18:19

In reply to by श्रावण मोडक

आम्ही पामर, लय गरीब (पक्षी: अखंड कल्पनाविश्व दारिद्र्य). स्वच्छ शब्दांत कविता लिहिली आहे. अर्थ असलाच (अरे देवा!) तर तो सहज उलगडतो आहे.

श्रावण मोडक Sat, 29/10/2011 - 18:29

In reply to by प्रियाली

तुझ्याकडं कल्पनांचं दारिद्र्य, माझ्याकडं आकलनशक्तीचं दारिद्र्य. म्हणूनच आपली दरिद्री जोडी जमते. ;)

नंदन Sat, 29/10/2011 - 22:57

विविध फ्रॉयडियन कॉम्प्लेक्सेसच्या संदर्भात ह्या व्यामिश्र कवितेचे रसग्रहण होणे, ही काळाची गरज आहे.

प्रत्येक बाईतही पुरूष दडलेला
आणि पुरूषात बाई

अलम दुनिया मॅकिन्सीबद्दलच्या बातम्यांत गुंतली असताना किन्सी स्केल सारख्या सनातन (पण सनातनी नव्हे) गोष्टींकडे लक्ष वेधून घेणे आणि तरीही कवितेची अल्पाक्षररमणीयता अबाधित राखणे, हे येरागबाळ्याचे काम नोहे.

आधुनिक प्रश्न उपस्थित करून, स्मिता तळवलकरांच्या 'कळत नकळत' सारख्या अर्वाचीन चित्रपटांचा संदर्भ देत ही कविता शेवटच्या ओळीवर 'लक्ष्मीनारायणाचा महिमा सारा' ह्या शाश्वत समेवर येऊन थांबते. 'सर्वदेवनमस्कारं केशवं प्रति गच्छति' म्हणजे तरी काय हो? बापूभैय्या देवासकर म्हणतात तसे...बेटा श्याम, सारं शेवटी सबगोलंकारच हो.

राजेश घासकडवी Sun, 30/10/2011 - 07:22

कविता महत्त्वाचा मुद्दा मांडते. प्रश्न असा आहे की 'कशाले काय म्हनू नाई'? किंवा त्याचं दुसरं टोक घेतलं तर कशालाही काहीही म्हणावं का? शब्दांच्या व्याख्या ताणता येतात. पण त्या किती ताणाव्यात? त्या शब्दांच्या बबलगमचा फुगा विश्वविस्तारी होऊ शकतो का? की मध्येच तो फुटतो?

एखाद्या रचनेला कविता म्हणता येण्यासाठी काही घाट अपेक्षित आहे का? एके काळी कवितासुंदरी आपल्या अर्थाच्या अंगापेक्षा मोठा यमक, वृत्त अलंकारांचा बोंगा घेऊन येत. आता आधुनिक जमान्यात अर्थाची गोलाई दिसण्यासाठी सुटसुटीत, मोजके कपडे घालूनही हिंडू फिरू शकतात. मग हे कपड्यांचं ओझं उतरल्यानंतर पुरुष कोण आणि स्त्री कोण असा भेद करावा का? लघुकादंबरी ही कविता असू शकते का?

या प्रश्नांची उत्तरं वाटतात तितकी सोपी नाही. मला वाटतं वेगवेगळ्या घाटातल्या कलाकृतींना आपण वेगवेगळ्या पद्धतीने सामोरं जातो. आणि तसं सामोरं जाता येणं हे सोयीचं असतं. चाट हाउस आणि स्टेक हाउस ही दोन वेगवेगळ्या प्रकारची रेस्टॉरंट्स झाली. त्यापैकी कुठच्या एका ठिकाणी जाऊन काय प्रकारचा अनुभव मिळेल याची अपेक्षा ठेवता येते. एके ठिकाणी भेळ खाता येते, एके ठिकाणी स्टेक खाता येतो. (यातलं कुठचं अन्न मूलतः चांगलं या वादात न शिरता) जर असं म्हटलं की 'शेवटी सगळं अन्नच, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स. मग हे भेद हवेच कशाला?' तर आपल्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटेल.

आता स्टेकहाउसमध्ये मिळणारा एखादा पदार्थ अगदी डोश्यासारखा लागू शकेल. पण याचा अर्थ हे भेदच मिटवून टाकावे असा नाही.

श्रावण मोडक Sun, 30/10/2011 - 17:13

In reply to by राजेश घासकडवी

शब्दांच्या व्याख्या ताणता येतात. पण त्या किती ताणाव्यात? त्या शब्दांच्या बबलगमचा फुगा विश्वविस्तारी होऊ शकतो का? की मध्येच तो फुटतो?

ताणू नयेत, बबलगमचा फुगा विश्वविस्तारी होत नसतो, तो मध्येच फुटतो.
हेच आणि एवढेच. म्हणूनच प्रतिसाद रोचक आणि मार्मीक. :)

प्रियाली Sun, 30/10/2011 - 17:26

In reply to by राजेश घासकडवी

शब्दांच्या व्याख्या ताणता येतात आणि त्या ताणल्याही जाव्यात. सीमारेषेवरील वस्तू किंवा कलाकृतींबद्दल मनात नेहमीच संभ्रम उत्पन्न होतो पण सीमारेषा कोणी ठरवायच्या? सर्वांच्या सीमारेषासारख्या असाव्या की त्या व्यक्तीसापेक्ष असाव्या? काव्य हे गेय असावे का? यमक, वृत्त, अलंकारांनी भरलेले नसले तरी मुक्तछंदात असावे का? पण मग मुक्तछंद म्हणजे काय? त्याच्या सीमारेषा कोणत्या? मुक्तछंद हे गद्यच आहे का? असल्यास सर्व साहित्यच काव्य झाले का? इंग्रजी शब्दांचा भडिमार झाला तर त्याला नवकाव्य म्हणावे? या प्रश्नांनी गोंधळायला होते.

आता स्टेकहाउसमध्ये मिळणारा एखादा पदार्थ अगदी डोश्यासारखा लागू शकेल. पण याचा अर्थ हे भेदच मिटवून टाकावे असा नाही.

भेदांच्या व्याख्या आणि परिमाणे बदलत असतात. इथिओपियन खाण्यातील इंजेरा मला डोश्यासारखा वाटू लागतो पण डोसा आणि इंजेरा दोन्ही शाकाहारी राहतात. स्टेक मांसाहारीच.

धनंजय Sun, 30/10/2011 - 21:21

चांगली सुरुवात आहे.
राजेश घासकडवी यांचा प्रतिसादही मार्मिक.

आकृती आणि आशय हे दोन्ही मिळून येतात, आणि त्यांचा अनुभव वेगवेगळा करता येत नाही, अशी वस्तू कला होऊ लागते.

शब्दांच्या बाबतीत आकृती आहे ध्वनी. आजकाल बरेच लोक मूकवाचन करतात. डोळ्यासमोरील दिसणारी शब्दांची छापील आकृतीसुद्धा असू शकते. काही का असेना या आकृतीला काही रचना असते. अशा रीतीने (शब्दार्थाचा) आशय आणि (आकृतीतून होणारा) नि:शब्द भावनिक परिणाम या दोघांची घट्ट वीण असायला हवी.

कवितेमध्ये आकृतीच्या पॅटर्नचे काल-अवकाश-स्केल त्या मानाने लहान असते. लघुकादंबरी किंवा लघुकथेमध्ये काल-अवकाश-स्केल हे त्या मानाने लांब असते. कादंबरीमध्ये आणखी मोठे असते.

स्केलमुळे सुलयबद्दता (रिद्मिसिटी)वर मर्यादा पडतात. ("मर्यादा" म्हणजे कुठल्या प्रकारची लय शोभून दिसते, त्याविषयी आपोआपच वेगवेगळी निवड होते.) काल-किंवा-अवकाशाचे स्केल लांब असले, तर यमके फार दूरदूरपर्यंत मनात गुंजन करणार नाहीत. ठेक्यात बदल होत गेला, तर एकसंधता जाणवणार नाही. अशा परिस्थितीत रचनाकार शब्दध्वनींची सुलयबद्धता साधत नाही. कादंबरीत बहुतेक करून कथानक आणि उपकथानकांच्या गुंफणाची आकृती ही कथेच्या शाब्दिक आशयाशी विणलेली असते. पण नियम असा काही नसतो.

विक्रम सेठने "गोल्डन गेट" कादंबरी ही सॉनेटां-सॉनेटांनी लिहिलेली आहे. परंतु तिला दीर्घकविता न म्हणता "नॉव्हेल इन व्हर्स" म्हटलेले आहे. रामायण महाभारत यांना सुद्धा मराठीत "कविता" म्हणत नाहीत. (त्यांच्यासाठी "महाकाव्य" हा शब्द आहे. नाहीतरी संस्कृतात "कविता" असा काही साहित्याचा उपप्रकार नाही.) कोलेरिजच्या "राइम ऑफ दि एन्शन्ट मॅरिनर"ची लांबी पुष्कळ असली, तरी त्याला कविता म्हणतात.

त्याचे कारण असे असावे, की "राइम"मध्ये ध्वनि-लयीची आकृती ही बहुतेक रसिकांना एकसंध भासत असावी. गोल्डन गेट मधील सॉनेट, रामायण-महाभारतातील अनुष्ठ्भ् छंद हे वातावरणनिर्मितीसाठी आवश्यक आहेत, परंतु कलाकृतीमध्ये दुय्यम आहेत.

अर्थातच ध्वनीची सुलयबद्धताही दीर्घ-रचनेत मनात ठसत राहावी अशीसुद्धा एखादा रचनाकार वापरू शकतो. दान्तेच्या "दिवीना कोम्मेदिया"मध्ये दीर्घ रचनेमध्ये तीन-तीन ओळींची कडवी आहेत. प्रत्येक कडव्यातली पहिली-तिसरी ओळ एकमेकांशी यमक जुळवतात. दुसरी ओळ मात्र पुढल्या कडव्यातल्या पहिल्या-तिसर्‍या ओळीशी यमक जुळवते. त्यामुळे एका कडव्यातून दुसर्‍या कडव्यात ध्वनि-लयबद्धता रेटा देत जाते. पण ही लयबद्धता दूरदूरपर्यंत रसिकाच्या लक्षात राहाणार नाही याचा तोटासुद्धा होत नाही.

1 Nel mezzo del cammin di nostra vita (अ)
2 mi ritrovai per una selva oscura (ब)
3 ché la diritta via era smarrita. (अ)

4 Ahi quanto a dir qual era è cosa dura (ब)
5 esta selva selvaggia e aspra e forte (क)
6 che nel pensier rinova la paura! (ब)

...

ही रचना "पद्य कादंबरी" आणि "दीर्घ कविता" या दोहोंच्या सीमारेषेवर तोल धरून बसते.

- - -
पुन्हा स्पष्ट करू इच्छितो : "सुलयबद्धता" म्हणजे यमक किंवा वृत्त नव्हे.

मुक्तछंदातही ध्वनीची सुलयबद्धता असते. यमक-वृत्त नसतात. याबाबत माधव जूलियन यांनी चर्चा केलेली आहे.

सारांश : माझ्या मते ढोबळमानाने कवितेत "शॉर्ट-रेंज-युनाइटिंग-स्ट्रक्चर" असते. मग ते यमक-वृत्त असेल, छापील शब्दांची दृश्य रचना असेल, कुठलीतरी अस्फुट लय असेल, वगैरे.

- - -
"लक्ष्मीनारायण त्रिपाठी" लघुपटाचा दुवा दिल्याबाबत प्रियाली यांचे आभार मानतो.

प्रियाली Sun, 30/10/2011 - 22:59

In reply to by धनंजय

माझ्या मते ढोबळमानाने कवितेत "शॉर्ट-रेंज-युनाइटिंग-स्ट्रक्चर" असते. मग ते यमक-वृत्त असेल, छापील शब्दांची दृश्य रचना असेल, कुठलीतरी अस्फुट लय असेल, वगैरे.

धन्यवाद! लक्षात येते आहे. :-)

रामायण महाभारत यांना सुद्धा मराठीत "कविता" म्हणत नाहीत. (त्यांच्यासाठी "महाकाव्य" हा शब्द आहे. नाहीतरी संस्कृतात "कविता" असा काही साहित्याचा उपप्रकार नाही.)

मला वाटत होतं की संस्कृतात गद्य असा साहित्यप्रकार नाही. जे आहे ते काव्य किंवा पद्य आहे.

सुबोध साने Tue, 01/11/2011 - 21:02

शीर्षक आणि त्यामुळेच

बाईला बाई का म्हणावं?
आणि पुरूषाला पुरूष?
प्रत्येक बाईतही पुरूष दडलेला
आणि पुरूषात बाई

या चार ओळी आवडल्या. क्वचितकवयित्री असूनही छान.