माझाही वेटलौस- मुक्तचिंतन
प्रथम; मी काही ह्या विषयातला तज्ज्ञ नाही. खालील मजकुरामागे फक्त स्वानुभव आणि इंटरनेट ज्ञान कारणीभूत आहे. बरीचशी वाक्यं सपशेल चूकही असू शकतात. असतीलच. माझा शास्त्रशुद्ध म्हणावा असा घंटा काही अभ्यास नाहीए ह्यामागे. पूर्ण फिटनेस जगताचा मी काढलेला लसावि इथे मांडत आहे.
तरीही, वाढणाऱ्या स्व-विषुववृत्ताचा आकार कमी करण्यासाठी मी ब.रा.च. शोध घेतलेला आहे. एकेकाळी चतुरंगमध्ये कुठल्यातरी लेखात दोन तत्त्वं कोणत्यातरी विलायतीच माणसाने मांडलेली दिसली- दोनच प्रकारच्या गोष्टी खाऊ नयेत: जे तुमची आजी खायची नाही ते, आणि ज्याची व्यावसायिक जाहिरात होते ते.
ढोबळपणे प्रत्येक व्हिडो/वेबपेज/आहारतज्ज्ञ हेच सांगतात की प्रमाणात आणि सकस खा, आणि थोडुसा व्यायाम दररोज करा. शिवाय निरनिराळ्या व्हिडो/सायटींवर ३० दिवसात वजन कमी वगैरे करण्यच्या अघोरी प्रतिज्ञा केलेल्या असतातच. अघोरी ह्यासाठी, की ३० दिवसांत तुमचा स्टॅमिना-शक्ती (थोडक्यात स्नायूंची घनता) खरंच जबरदस्त वाढू शकते. वजन कमी होणं ही जऽरा पुढची पायरी आहे.
मी जाऊन व्यायामशाळेत नाव नोंदवलं. मी पट्टीचा बुद्धीजीवी आहे. साठसाठवेळा जड काठ्या आणि तबकड्या उचलायच्या, इथून तिथे ठेवायच्या हा प्रकार प्रच्च्च्च्चंड बोअरींग होता. शिवाय तिथे जायला लागणारी तयारी वेगळीच. ते अजून कंटाळवाणं, थोडक्यात, तिथे जाणं म्हणजे काही फार आनंददायी प्रकार नव्हता. प्रचंड कंटाळवाणा. नंतर सुमारे एका वर्षाने मी किकबॉक्सिंगची जाहिरात पाहिली. किकबॉक्सिंग मला प्रचंड आवडतं. ते मी शिकायला सकाळी ६ वाजता जायचो. एक तास 'भयानक' व्यायाम व्हायचा. ४० मिनीटे-अगदी दहा सेकंदांचे २-३ ब्रेक घेऊन अविरत तो व्यायाम चालायचा, आणि २० मिनीटे सराव. तो सरावही तितकाच भयानक. पहिल्या दिवशी काही लोकांना चक्कर आली, काहींना उलटी झाली. दुसऱ्या दिवशी निम्मे लोक आले. एका महिन्यानंतर ३ लोक उरले. ४ महिन्यांनंतर मी एकटाच उरलो. मग बाकी लोक नसल्याने त्यातली मजा संपल्याने ते सुटलंच. पण वेट ट्रेनिंग नियमित सुरु होतं.
ह्या महिन्यांत मी जमेल तेव्हढं डाएटींग केलं. ॲव्हरेज भारतीय तरुणांच्या तुलनेत मी अतिशय कमी जंक फूड खातो- साधारण महिन्यातून ३-४वेळा इ. पण इतका व्यायाम करून वजन काही कमी होईना.
मग व्यायाम जात होता कुठे?
माझं पोट बरंच कमी झालं होतं. जुने टीशर्ट घातले की चक्क चांगले दिसत होते. दंड आणि अग्रबाहू साधारण दीडपट रुंदीचे झाले. खांदे रुंद आणि गोलाकार झाले होते. इ. वजन काही हललं नाही. पण मस्त वाटत होतं. आधी रेल्वेचा ब्रिज एकेक पायरी ओलांडत चढला की धाप लागायची. आता पूर्ण ब्रिज, जड बॅगेसकट घेऊन; चढून, परत उतरून ट्रेनच्या मागे थोडं जॉगिंग करुन आत घुसल्यावर लागते. वजन तेव्हढंच आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? तर माझ्या हाडांचं आणि स्नायूंचं (आणि उरल्यासुरल्या चरबीचं) वजन हे तितकंच आहे. पण इतकं ते असताना, माझं आयुष्य सुखी झालंय का? तर हो! मला आधीसारखं धावता येतं, जरा बरा दिसायला लागलो, स्टॅमिना प्रचंड वाढलाय, शक्तीही वाढली आहे, अरे फिर किसको मंगताय वेटलॉस?
(अवांतर: हे शिकवणारा जो मनुष्य होता, तो हे सगळे व्यायाम प्रचंड वेगात आणि अचूक करु शकायचा. त्याचे काही दंड कमरेहून जाड नी पोटावर पन्नास ॲब्ज वगैरे नव्हते. त्याचं वजन वेल विदीन बीएमआय होतं.)
(ह्यानंतर इथल्या एक बीएएमएस, एक एमबीबीएस, एक डाएटीशीअन डिप्लोमाधारी लोकांना विचारलं तर त्यांनीही हेच सांगितलं, की वजन कमी होणं हे ध्येय नसावंच, वर लिहीलेल्या गोष्टी ध्येय असाव्यात, आणि जे झालंय तेच खरंतर व्हायला पाहिजे.)
(अर्थात, एव्हढं किंवा ह्याहून चांगलं स्नायू-वस्तुमान तुम्ही कमावलंत आणि व्यायाम करत राहिलात तर तुमचं वजन कमी होणार हे नक्की. पण त्यानंतरची वाट खडतर आहे. तो तेव्हढा व्यायाम करुन तुम्हाला कार्डीओ केला पाहिजे, (जे जवळपास अशक्य आहे.) असं बरेच ठिकाणी लिहीलेलं आढळतं.)
तर मित्रहो, मी माझ्या अल्पमतीप्रमाणे काढलेलं अनुमान हे, की सरळ कॅलरी आत आणि कॅलरी बाहेरचा हा हिशोब आहे. तुम्ही व्यायाम कमी (म्हणजे वर लिहीलेल्या आक्रस्ताळेपणापेक्षा कमी: फक्त चालणं/भरभर चालणं इ. करत असाल) तर तुम्हाला कॅलरी अतिशय कमी खाव्या लागतील.
ह्याचंच एक व्हर्शन म्हणजे दिवसातून दोनदा खाणे.
आता; खाणे ह्या प्रकारात आपल्याला वाटतो त्याहून बराच जास्त मानसशास्त्राचा भाग आहे.
पहिलं म्हणजे आपण फक्त कंटाळा आलाय म्हणून खातो.
दुसरं म्हणजे खरंतर तहान लागली असताना खातो.
तिसरं म्हणजे, काहीतरी पाहत/ऐकत असताना खातो. तंद्रीत आपण भुकेच्या अनेकपट पलीकडे खातो.
चौथं म्हणजे, आपल्या साधारण पदार्थांत अनेक कर्बोदके असतात. जी वरच्या थिअरमप्रमाणे आजीने खाल्लेली असतात. पण आजीचा व्यायामही तेव्हढाच होता हे आपण विसरतो. आजीकडे लादी पुसायला मॉपर किंवा रुम्बा नव्हते, डिशवॉशर आणि वॉशिंग मशीन नव्हते, कामाला बाया यायच्या नाहीत. आपण इतक्या सोयीसुविधा वापरुन परत तिच्याइतकी कर्बोदके खात असू, तर अर्थातच विषुव आणि सगळ्याच वृत्तांचा घेर वाढेल नाहीतर काय! ह्याशिवाय दुसऱ्या थिअरमच्या विरुद्ध आपण अनेक वर्षानुवर्षे जाहिरात होत असलेले पदार्थ खातो, प्रच्चंड साखर असलेली शीतपेये पीतो.
बरं, आता आपण समजूया की वरीलपैकी आपण काहीच्च करत नाही. तरीही आपण जास्त खातोय बा. मग काय करायचं? तर सरळ उपास करायचे. आपले उपासही एकेक दिव्यच. ते असो. बाकी उपवास, दोनदाच्च खाणं, इंटरमिटंट फास्टिंग, हे काही नवीन नाही, आणि ह्याहून एक्स्ट्रीम प्रकार आहेत. तुम्ही एकदाच खायला बसलात की जातायेता जे दळण चालू असतं ते होत नाही आणि त्या निमित्ताने रिकाम्या कॅलरीज पोटात जात नाहीत.
आता, ही बाबही चिंतनीय आहे. बुद्धिजीवी लोकांचं स्ट्रेस-इटींग हे होतंच असतं. शिवाय ताण-तणाव चिंता वगैरे पाहिल्यास जास्त खाणं वगैरे साहजिक आहे. शिवाय, इतक्या वर्षांची सातत्याने खात रहायची सवय मोडायची कशी?
तर मोडू नये. बऱ्याच ठिकाणी हे वाचायला मिळालं, की उलट तुम्ही बऱ्याच कालावधीनंतर खायला लागलात की शरीराची; कर्बोदके चरबीरुपाने जपून ठेवण्याची प्रक्रिया खरंतर सुरु होते. मग हे टाळण्यासाठी उलट वारंवार- पण सकस खावं, म्हणजे उर्जाही मिळत राहते. भुकेने जडणारे आजारही होत नाहीत. ह्याबाबत हा आणि हा, हे दोन व्हिडीओ मस्त आहेत. हा माझा फिटनेसबद्दलचा अत्यंत आवडता युट्यूबर. त्याचे बाकीचे, तयार उत्पादनांबद्दलचे, नाश्ता आणि त्यातल्या उर्जेबाबतचे व्हिडीओही पहावेत. त्यानेही अघोरी दावे केले आहेत जरा क्लिकबेटसाठी म्हणा, पण ते बरेच परवडले. (पहा म्हणजे कळेल! :P) हे झालं डाएटबाबत. बाकी कॅलरीज खर्च करण्याबाबतीत सांगायचं झालं, तर; घरी करण्यासाठीच्या व्यायामाचे असंख्य व्हिडीओ युट्यूबवर उपलब्ध आहेत, ते पहावेत. उदाहरणच द्यायचं तर हा एक पहा.
आपल्या बुद्धीजीवींसाठी, उपवासांमधलं, व्यायामांमधलं गुपीत काय आहे; की तुमच्याबरोबर हे करणारे खूप लोक असले, की तुम्हालाही हे करत राहण्याची ऊर्जा मिळत राहते. नाहीतर ते ३० दिवसांत वेटलॉस पाहून, आणि आपले काहीच रिझल्ट न दिसत असलेले पाहून परत डिमोटीव्हेट झालेले तुम्ही परत स्ट्रेस-इटींग करता, व्यायामाची टाळाटाळ करता, नको त्या गोष्टी खाता आणि सगळे कष्ट फोल ठरतात. तसंच कॅलरी खर्च करण्याचं. तुमच्या बरोबर चालणारे/धावणारे मित्र, जिम पार्टनर/मित्र इत्यादी असतील तर तुमचा प्रवास आनंददायी होतो आणि मुळात हेच ध्येय असलं पाहिजे. प्रत्येक जिममध्ये लिहून लिहून अतिक्लिशे झालेलं वाक्य- Fitness is not a destination, it's a pursuit of life. त्याचा मथितार्थ इतक्या कष्टांनंतर कळला!
"व्यक्ती तितक्या प्रकृती"
वजन कमी करणे ह्या विषयावर शारीर पातळीवर करण्यासाठी अनेक उपाय पद्धती असल्या तरी मानसिक पातळीवर "व्यक्ती तितक्या प्रकृती" हे घोषवाक्य माझं जास्त आवडतं आहे. लेख चांगला आणि पुष्कळसे गैरसमज दूर करणारा आहे. धन्यवाद !!!
अजून एक शारीरिक वजन आणि सामाजिक वजन याचं काही गुणोत्तर कुणाला सापडलं आहे काय ?
मानसिकच
वजन कमी करणं हा प्रकार आधी मानसिक पातळीवरच सुरू करावा लागतो. आपलं वजन, खरं तर अंगावरची अनावश्यक चरबी, कशामुळे वाढतात किंवा कमी होत नाहीत, हे शोधण्यासाठी आधी बौद्धीक कष्ट करणं. नंतर नको ते आणि नको तेवढं खाणं कमी करणं, शरीराची गरज किती आणि काय याचा अंदाज घेत राहणं आणि या सगळ्यांत सातत्य बाळगणं या महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
अगदी अगदी
कालच बऱ्या अर्ध्याला माझं मत सांगत होते. विंबल्डन बघत होतो आणि येलेना ऑस्तपेंकोला प्रथमच खेळताना बघितलं. त्यानं सहज विचारलं, "हिचं वय काय असेल?"
माझं मत, "ही विंबल्डनच्या सेमीफायनलमध्ये पोहोचल्ये. म्हणजे चिकार व्यायाम करत असणार, व्यवस्थित खात असणार. तरीही तिचे गाल फुगीर आहेत. फार तर २२ वर्षांची असेल. ते बेबीफॅट आहे. त्याउलट तिच्याशी खेळणारी अँजेलिक कर्बर पाहा. तिचा चेहरा एकदम V आकाराचा आहे. ती तिशीची असणार."
दोन्ही अंदाज बरोबर होते.
---
मीही बऱ्यापैकी व्यायाम करते; तरीही अंगावर अनावश्यक चरबी आहे. चरबी निराळी, वजन निराळं.
बरेच विचार लोकांनी व्यक्त
बरेच विचार लोकांनी व्यक्त केले आहेत वजन कमी करण्याबद्दल - मी माझे एक मत बनवलय. सुस्तपणा नसणे आवश्यक आहे. परदेशी लोकांनी दिलेली उंची- वजन आकडेमोड डोळेझाकपणे का स्विकारायची?
शाळेत सहावी सातवीत योगासने होती आणि ती मी भराभर करत असे, कोणी पाहुणे शाळेत आले की प्रात्यक्षिकाला मला बोलवत. मयुरासनही करायचो॥ पण तेव्हाही मला योगासने केलीच पाहिजेत असं कधीच वाटलं नाही. हा एक साधुलोकांसाठीच व्यायाम आहे जागच्याजागी करण्याचा, सामान्य काम करणाय्रा जनतेसाठी नाही याबद्दल तेव्हापासून ठाम विचार आहे.
.
पोटावर असणारी चरबी अनावश्यक आणि घातकही असते यात परदेशी लोकांच्या वजन-उंचीच्या गुणोत्तराचा काही संबंध नाही. याउलट मांड्या-बुडावर असलेली (प्रमाणात असणारी) चरबी उपयुक्त असते.
सुस्तपणा थंडीत जास्त येतो, पण स्नायूंची झीज लवकर भरून येते. उन्हाळ्यात सुस्तपणा कमी येतो पण स्नायू लवकर भरून येत नाहीत. जिथे टोकाची हवा असते, तिथे हे आणखी तीव्रतेनं समजतं. मुंबईत एवढे हवेतले बदल होत नाहीत.
ठरावीक व्यायाम किंवा ठरावीक आकार अशी मोजकी आणि सरसकट परिमाणं वापरून आरोग्य मोजता येतं, हे मला पटत नाही.
?
पोटावर असणारी चरबी अनावश्यक आणि घातकही असते यात परदेशी लोकांच्या वजन-उंचीच्या गुणोत्तराचा काही संबंध नाही. याउलट मांड्या-बुडावर असलेली (प्रमाणात असणारी) चरबी उपयुक्त असते.
उलट मी तर वाचले होते, की (१) बुडावरची चरबी ही पोटावरच्या चरबीच्या तुलनेत (अ) (हृद्रोगसंभवाच्या दृष्टीने) अधिक घातक आणि (ब) घालवायला अधिक अवघड असते, तथा (२) पुरुषांत पोटावर तर बायकांत बुडावर चरबी वाढण्याची टेंडन्सी अधिक असते, म्हणून.
अर्थात, माझी माहिती ही (१) 'परदेशी'१ स्रोतावर आधारित तथा (२) सांगोवांगीची असल्याकारणाने ऑपॉप डिस्कौंटेबल असूही शकेल म्हणा!
...........
१ बोले तो, अमेरिकन. म्हणजे (माझ्या दृष्टीने) टेक्निकली स्वदेशीच. परंतु तरीही.
गुंतागुंत
पोटावरची चरबी घातकच.
बुडावरची चरबी किती आहे, त्यानुसार ती घातक आहे की नाही हे ठरणार. त्यातही तुम्ही म्हणता तसं बायकांच्या अंगावर अधिक चरबी असणंही नॉर्मल. त्यापुढे बॉडी टाईप वगैरे गुंतागुंत.
मुद्दा असा की बीएमआय आणि अनावश्यक चरबीचा संबंध फार नसतो. बीएमआयचा इतिहास शुद्ध वैद्यकीय नसून विमासंबंधित आहे. ते आकडे 'चान चान' असले तरीही अंगावर अनावश्यक चरबी असू शकते.
भर
ह्या गुंतागुंतीमध्ये आणखी भर.
उन्हाळ्यात माझे वजन आणि आकार वाढतात, हे गेली तीन वर्षं बघत्ये. ते आता निष्कर्ष आहे की शरीर 'अनावश्यक' पाणी धरून ठेवतं. संपूर्ण उन्हाळाभर, चार-पाच (४५ नाही, ४-५) महिने. फार थंडी पडली आणि हीटर जोरजोरात चालायला लागले की हेच होतं. आहारात बदल करायचा म्हटलं तर उन्हाळ्यात खाणं कमीच होतं.
आता मी हेच आपलं भागध्येय म्हणून दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे. ह्या उन्हाळ्यात साधारण अडीच किलो वाढ झाली आहे. बाहेर हवा वा-वा-चान-चान झाली की ते सगळं आपसूक उतरेल.
गंमत म्हणजे माझ्या जीन्सचा घेर आता शॉर्ट्सपेक्षा कमी आहे; एवढा आकारात फरक पडतो.
नबा, उंची-वजनाचा तक्ता (
नबा, उंची-वजनाचा तक्ता ( आदर्शवगैरे) मनुचा असता तर हा मुद्दा -
मनु म्हणजे फार मागे गेलात. तरीही तो तक्ता परदेशींचा नसून 'आपल्याकडचा' हे तुलनेसाठी धरल्यास मी म्हणेन की मनुऐवजी मौर्यकालापासून ( संदिग्ध रामायण महाभारतही सोडा) अधिक वजनदार व्यक्तीच युद्धासाठी लागत. पन्नाशीनंतर त्यांचे काहीही होवो.
आता दुरूनच गोळ्या घालता येत असल्याने माणसे मारण्याची वृत्ती फक्त जोरकस हवी.
पैज
ऑफिसमध्ये अॅब्जपैज लागली आले. झालं असं की दोन नौजवानांनी एकमेकांना चार अॅब्जचं चॅलेंज दिलं. नंतर त्या दोघांवर बाकीच्यांनी पैसे लावले आहेत. आणि जवळ जवळ १५ जण या पैजेत समाविष्ट झाले आहेत. विरुद्ध बाजुच्या खिलाडूला लालूच दाखवणे, मुद्दामहून डब्यात अतिगोड आणि लाळस्त्रावक पदार्थ आणणे, आपल्या खिलाडूला प्रोत्साहन देणे, त्याच्या जिमचर्येवर बारीक लक्ष ठेवणे, त्याला लागेल ती मदत करणे असे बरेच मनोरंजक प्रकार चालले आहेत. त्यातल्या काहीजणांनी उचकावून मी हे चॅलेन्ज घेईन का नाही यावरसुद्धा पैज लावली होती.
मी चॅलेन्ज घेण्यासाठी त्यांनी मलाच प्रतिअॅब १० हजार इतका रेट दिला. किती अॅब करायचे याला काही लिमिट नाही.
त्या निमित्ताने अॅब्ज नाही झाले तरी पोट कमी होईल म्हणून चॅलेन्ज स्वीकारले.
सगळ्यात आधी टॅनोबाचा धागा वाचला.
सतत काही ना काही चरण्याची सवय जवळ जवळ घालवून टाकली आहे, चहा सिगारेट एकत्रच व्हायच्या तेही पूर्णपणे थांबवलंय. दोनदा उत्तम आहार/ किंवा आधीचं अन्न पूर्ण पचल्यावर कडकडून भूक लागेपर्यंत काहीही खात नाही. आंबवलेले पदार्थ/ बेकरीतले पदार्थ आधीपासूनच पोटाला मानवत नाहीत म्हणून त्यांचं सेवन तीव्रपणे मर्यादितच आहे.
आहाराच्या मर्यादेमुळे पोट परत सपाट होत आहे. घराजवळच एक नो नॉन्सेन्स जिम आहे, तिकडे जातोय आठवडाभर. जिममध्ये सध्या अवजड उद्योग अजूनही करू दिले जात नाहीत. त्यांच्या मते पोटावरची चरबी हळू हळू घालवणे हेच पहिले धोरण आहे. वजन अतिशय नॉर्मल आहे त्यामुळे पोटावरच्या लेअर्स कमी करणे आणि मांसा-स्नायुचे प्रमाण वाढवणे इतकंच मुख्य ध्येय आहे.
१५ जानेवारीपर्यंत पैजेची मुदत आहे.
तोवर आधी किती फॅट कमी होतंय हे पाहून नंतर काय करायचं हे ठरवायचं आहे. इंटरनेट तर मायाजाल असल्याने, आतापर्यंत शिकलेल्या बेसिक बायोलॉजीवर कॉमन सेन्स वापरून खाणं, तोंडाला ताब्यात ठेवणं इतकंच करतोय. बाकी सब अल्लाह जाने!
धन्यवाद
तुमचे ॲब्जसहित फोटो पाहण्यास उत्सुक आहे.
ॲब्ज दिसण्यासाठी बॉडी-फॅट पर्संटेज अतिशय कमी, साधारण २०%च्या आत असावं लागतं. हे जऽऽरासं कठीण आहे. ह्यासाठी जऽरासं एक्स्ट्रीम डाएट लागेल, जसं की पापड लोणची बाद, चिकन लॉलीपॉप बाद इ. तुम्ही पिणारे आहात, पिणं तर बंदच. कधीमधी व्हिस्की चालते असं ऐकून आहे, पण बीअर-व्होडका बंद. 'कीटो' करा जमलं तर. महिन्यात ५ किलो घटवाल. पण ते दिवसरात्र चिकन आणि चीज मी तरी खाऊ शकत नाही. (अरे माणूस आहे की उंदीर? इ.इ.)
तुम्हाला अबव्ह ॲव्हरेज 'फिट' रहायचं असेल तर एकाग्रतेने खाणं ही अक्षरश: गुरुकिल्ली आहे. सगळं लक्ष जेवणात पाहिजे. जेवताना काहीही पहायचं नाही. प्रत्येक घास मेंदूत रजिस्टर झाला पाहिजे. जमलं तर चावा ३२वेळा. जिम जॉईन केलीत हे बरं केलंत. त्या ट्रेनरला सांगा स्ट्रेन्थ ट्रेनिंग दे बाबा. वजनं उचलणं हे महत्त्वाचं आहे, ते कार्डीओ करताना तुमचं वजन अधिक वेगाने घटवतं. भरपूर पाणी प्या. वेड्यासारखे पाणी प्या. जेवणाआधी पाणी प्या. भूक लागल्याची भावना झाली की पाणी प्या. कंटाळा आला की पाणी प्या. पाण्याचा कंटाळा आला की ताक प्या. ताकाचा पेला अर्धा झाला की तो पाण्याने पूर्ण भरा आणि ते प्या.
सकाळी अनोशापोटी कार्डीओ फार उत्तम असतो असं चांगल्या स्रोतांकडून ऐकून आहे. झेपत असल्यास करावा. इंटर्मिटंट फास्टींगही करू शकता.
मुख्य म्हणजे
चायलेंजच्या निमित्ताने वेगवेगळे प्रयोग करून एक 'सस्टेनेबल' प्रोग्राम बनवा. म्हणजे इंमि फास्टिंग करावं का, सकाळी अनोशापोटी कार्डिओ करावा का, वेट ट्रेनिंग जमतंय का इ. एक महिना तुम्ही हे कराल, दुसऱ्या महिन्यात मजा येऊ लागेल, तिसऱ्या महिन्याला महिलावर्ग तुमच्याकडे बघून शिट्ट्या वाजवू लागेल, पण तेव्हाच तुम्ही हे सगळं सोडून द्याल. हे झालं नाही पाहिजे. हे सध्या माझं झालंय. अर्थात ताण वगैरे गोष्टी आहेतच. त्यातून सुटका नाही बाबा. तरी जशी अंघोळ आपण करतोच्च, तसा व्यायाम हा 'करतोच्च' झाला, की वर्षा-दीडवर्षांत तुमचे ॲब्ज दिसतील. उपरोक्त एक्स्ट्रीम गोष्टी केल्यास चारपाच महिन्यांत.
आणि प्लीज. प्लीऽज. बिड्या थांबवा. संपवा. सोडून द्या. कायमच्या. सगळा व्यायाम व्यर्थ आहे हे नाही केलंत तर.
बिअर प्याल्यावर भूक लागते ?
बिअर प्याल्यावर भूक लागते ?
मी शुद्ध पवित्र मद्य या विषयावर लिहिले. कॉकटेल्सवर नाही.
पायात क्रँप्स वगैरे येणे याचे कारण डीहायड्रेशन असावे ( जे सहज टाळता येऊ शकते. सर्व मद्यप्रकार हे डाययुरेटिक असतात. जलसेवन करावे, बरोबर, व नंतर , व्यवस्थित व खूप) व क्वचित फार प्याल्यानंतर खाणे टाळल्याने हायपोग्लायसेमिया मुळे. चांगला वरणभात खावा आणि सुमडीत झोपून टाकावे. हाकानाका
वयानुसार...
मद्यपानानंतर झोप, भूक अशा बाबींवर परिणाम होतो. दारूनंतर चिकार पाणी प्यायलं असं वाटतं; सकाळी झाली की खरं काय ते समजतं. दारूमुळे चरबी थेट वाढेलच असं नाही; शरीर पाणी धरून ठेवतं, आळस येतो, व्यायामाची मानसिक तयारी नसते, थोडक्यात one thing leads to another.
माझ्या दृष्टीनं शरीराचं तंत्र फार "शुद्ध विज्ञान" - भौतिकशास्त्रासारखं almost deterministic - नसतं; जेवढ्या वाईट सवयी टाळू तेवढं ते शुद्ध/सोपं होत जातं एवढंच. दारू, बिड्या, जाग्रणं, साखर, मैदा, मसालेदार पदार्थ, तळकट पदार्थ, कोणत्याही प्रकारची अनियमितता वाईट. वयानुसार ही यादी वाढत जाते.
(हीच गोष्ट बागकामाची. हवा चांगली असताना गोष्टी सोप्या होतात, एवढंच.)
किंवा शरीराच्या बाबतीत विदाविज्ञानाच्या भाषेत - there are too many variables and not enough data to constrain the model, असं व्यक्तिगत पातळीवर दिसतं.
.
हाॅर्मोन्समुळेही शरीर पाणी धरून ठेवतंय तेव्हा जास्त वेळा शू करून फरक पडत नाही. ह्यामागचं शरीरशास्त्र मला माहीत नाही; पण दारवांनंतर मला ब्लोटिंग जाणवतं.
मी दारूसोबत बहुतेकदा तळकट-खारट गोष्टी चरत नाही. तरीही ब्लोटिंग जाणवतं, वजनकाट्यावर दिसतं, वगैरे.
शरीराला कमी पाणी उपलब्ध असणं आणि ब्लोटिंग एकसमयाच्छेदेकरून होऊ शकतं.
बरे, आजोबा!
तुमचे ॲब्जसहित फोटो पाहण्यास उत्सुक आहे.
नाही म्हणजे, तुम्हाला असल्या हौशी असतील, असे वाटले नव्हते.१ हल्ली कोणाचे काही सांगता येत नाही. असो चालायचेच.
तुम्ही पिणारे आहात, पिणं तर बंदच.
आँ!
नाही म्हणजे, ते पीत असतीलही. पण म्हणून कोल्ड प्रिंटमध्ये असले विधान टाकायचे???
नाही म्हणजे, मीही पितो कधीमधी. ('कधीमधी'चा अर्थ बऱ्यापैकी फ्लेक्झिबली घेता यावा.) पण म्हणून माझ्याबद्दल कोणी कोल्ड प्रिंटात 'मी पिणारा आहे' असे विधान केले, तर मी तलवार उपसेन! (मग भले त्याकरिता अगोदर तलवार विकत आणण्यासाठी जुन्या बाजाराकडे - किंवा सेकंडहँड तलवारी जेथे कोठे मिळत असतील तेथे - धाव घ्यावी लागली, तरी बेहत्तर.)
पण ते दिवसरात्र चिकन आणि चीज मी तरी खाऊ शकत नाही. (अरे माणूस आहे की उंदीर? इ.इ.)
उंदीर झाला, तरी दिवसरात्र चिकन आणि चीज???
नाही म्हणजे, पुण्यात असताना आमच्याही घरी भरपूर उंदीर होते.२ मात्र, ते निमूटपणे आमच्या घरातील कागद खायचे. (त्यांनाही नुसते प्रोटीन नाही, कार्बोहायड्रेट्ससुद्धा लागत असावेत.) कधीमधी खास त्यांच्याकरिता लावलेले विषही खायचे.३ (जंक फूड!) चिकन तसेही आमच्या घरात बनत नसे४, ५, त्यामुळे ते आढळण्याचा प्रश्न नव्हता. चीज (अमूलचे, एकाच प्रकारचे ६) आढळायचे, परंतु एक तर ते बहुतकरून फ्रिजमध्ये असायचे, आणि तसेही उंदरांनी त्याला कधी दात लावल्याचे आढळले नाही. तर ते असो.
ताकाचा पेला अर्धा झाला की तो पाण्याने पूर्ण भरा आणि ते प्या.
ताकाचा खरकटा पेला? त्यातून पाणी प्यायचे??? ताकात मिसळून?????? ईईईईईईईईईई!!!!!!
त्यापेक्षा, ताकाचा पेला अर्धा झाल्यावर, तो अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे, यावर तासन् तास चिंतन का करू नये?
तिसऱ्या महिन्याला महिलावर्ग तुमच्याकडे बघून शिट्ट्या वाजवू लागेल, पण तेव्हाच तुम्ही हे सगळं सोडून द्याल. हे झालं नाही पाहिजे. हे सध्या माझं झालंय.
काय??? तमाम महिलावर्ग तूर्तास तुमच्या ॲब्ज़कडे बघून शिट्ट्या वाजवतो??? मनोराज्ये तरी किती करावीत माणसाने?
दुसरे म्हणजे, एकीकडे महिलावर्गाने आपल्या ॲब्ज़कडे बघून शिट्ट्या वाजवण्याची (ओली?) दिवास्वप्नेही पडतात, नि दुसरीकडे नील लोमसांचे ॲब्ज़ पाहण्याचीही उत्सुकता आहे. याला काय म्हणावे?७
तिसरी गोष्ट:
हे झालं नाही पाहिजे.
नील लोमसांचे ॲब्ज़ बघून जर महिलावर्गाने शिट्ट्या वाजविल्या, तर तुम्हाला इतके जेलस का वाटावे बरे? आँ?
आणि प्लीज. प्लीऽज. बिड्या थांबवा. संपवा. सोडून द्या.
नाही म्हणजे, त्यांना बिड्या सोडून द्यायला सांगणे ही एक गोष्ट झाली. परंतु त्यात इतके 'प्लीज, प्लीऽज' करण्यासारखे नि बोल्ड फाँटात टाकण्यासारखे काय आहे? इतके अतिरेकी वैयक्तिक आस्थाप्रदर्शन कशापायी? आँ?
(त्या 'प्लीज. प्लीऽज'च्या पुढे 'माझ्यासाठी!' किंवा 'तुम्हाला माझी शपथ!' यासारखे एखादे वाक्य लिहायचे राहून गेले आहे काय? की संकोचास्तव टाळले आहे?
परंतु मग इतके सारे निःसंकोचपणे लिहिल्यावर मग नेमका तेथेच संकोच कशापायी?)
असो. तूर्तास इतकेच.
.........
तळटीपा:
१ मला (केवळ उदाहरणादाखल) बापटअण्णांबद्दल (पुन्हा, केवळ उदाहरणादाखल) वाट्टेल तेवढा जिव्हाळा वाटत असेल. पण म्हणून त्यांचे ॲब्ज़ पाहण्यास नजीकच्या भविष्यकाळात निदान या जन्मी तरी मी उत्सुक नाही१अ. (तसे जाहीर विधान करणे ही फार पुढची गोष्ट.)
१अ तसेही, कोणाचे ॲब्ज़ हा ज्याचात्याचा खाजगी अवयव असावा, नाही काय?
२ पालीही होत्या. परंतु, का कोण जाणे, पालींबद्दल जसा जिव्हाळा२अ वाटायचा नि वाटतो, तसा उंदरांबद्दल कधीच वाटला नाही. असो चालायचेच.
२अ नाही. पालींचे ॲब्ज़ बघण्यातही मला यत्किंचितही स्वारस्य नाही.
३ नि मग घरातील एखाद्या दुर्गम ठिकाणी जाऊन मरून पडायचे. मेलेत याचा पत्ताही लागायचा नाही. मग काही दिवसांनी दुर्गंधी येऊ लागली, की शोधाशोध करावी लागायची. परंतु ते असो.
४ पु.लं.नी म्हटलेच आहे, "कारण शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार?"
५ कधी खायची इच्छा झाली, तर पुण्यात (डेक्कनच्या बाजूला) मुबलक रेष्टारण्टे होती. कधी अडले नाही.
६ तत्कालीन समाजवादी भारतात चीजमध्ये विविधता नव्हती; फक्त एकता६अ होती.
६अ कपूरांची नव्हे. (ती जर माझ्या चीजमध्ये आढळली असती, तर मी ते चीज न खाता तसेच फेकून दिले असते. तशीही कपूरांची एकता तेव्हा बहुधा चड्डीत शू करण्याच्या वयातली असावी; चूभूद्याघ्या. असो, हे फारच अवांतर झाले.)
७ अवांतर: आमच्यात 'एसी-डीसी' असा एक वाक्प्रचार आहे.
सध्या जिमला जाते आहे.
सध्या जिमला जाते आहे. अनियमितच आहे पण सुरु आहे. बी एम आय तर ओबेसिटीतच मोडतो. ३४ आहे. तो तीसावर आला की युहु!!! फकस्त ओव्हरवेट!!!
_________
मशिन्स आवडतात. पायाची मशिन्स करते कारण आर्थ्रायटिसमुळे सध्या डावा पाय जायबंदी अवस्थेत आहे. त्याच्या सुधारणेकरता फिझिकल थेरपी लागते. मी नेटवरुन पायाचे व पाठीचे सर्व व्यायाम उतरवुन त्याचे प्रिंट आऊट्च ठेवलेले आहे. खूप फायदा झाला त्याचा. २ महीन्यात १० पौंड झपाट्याने खाली गेले पण आता प्लॅटु (पठार) आला आहे.
__________
माझा व्यायाम, मूडवरती फार अवलंबून आहे आणि मग काय एक्स्क्युजच मिळते आज अप्रेझल रिव्ह्यु झाला, उदास वाटतय = व्यायाम नको करु. उद्या काय उगाचच डाउन वाटतय = व्यायाम नको करु.
अशाने कसे होणार बरं पगारातून जिमचे पैसे तर मूड कसाही असो वळते होताहेतच. तेव्हा ते एक सुधारायला हवे.
__________
मात्र पाण्याचा इनटेक उत्तम आहे. पाणी दिवसभर सिप करते. एकदम ढसाढसा पीत नाही. त्यामुळे त्वचा हायड्रेटेड रहाते.सांध्यांकरता - hyaluronic acid च्या गोळ्या घेते ज्या की सांधे ल्युब्रिकेटेड (वंगणयुक्त) ठेवतात. त्यामुळेही त्वचेला फायदाच होतो म्हणतात. त्वचेची इलॅस्टिसिटी वाढते. मज्जनु बात! आमके आम गुठलीके दाम.
व्यायाम नही टाळने का.
माझा अनुभव असा आहे की व्यायाम करून मूड सुधारायला मदत होते. फार दमले असेन, शरीराला झेपणार नाही असं वाटलं तरच मी व्यायाम बुडवते. कितीही कंटाळा आला तरी व्यायाम केल्यामुळे कंटाळा कमी होतो, बहुतेकदा जातोच.
ज्या दिवशी शरीर तक्रार करतंय म्हणून व्यायाम टाळते त्या दिवशी लक्ष केंद्रित करणं कठीण जातं. त्यामुळे शक्यतोवर, आज छान वाटतंय म्हणून केला जास्त व्यायाम, असा प्रकारही मी करत नाही.
हे पण पहा
Jeet selal
Gaurav Taneja