कॉकटेल लाउंज : गाथा कॉफीची (भाग १)
हजारों वर्षांपूर्वीची एक दुपार, इथियोपियाच्या वाळवंटी प्रदेशातील एका झुडपाळ भागात एक मेंढपाळ त्याच्या शेळ्या-मेंढ्या चरायला घेऊन गेला होता. त्या दुपारी त्याच्या असे लक्षात आले की १-२ शेळ्या नेहमीपेक्षा जरा जास्तच 'लाडात' येऊन उड्या मारत आहेत. त्याने सुरुवातीला तिकडे दुर्लक्ष केले. पण काही वेळाने त्याच्या असे लक्षात आले की आणखीन बर्याच शेळ्या लाडात येऊन उड्या मारू लागल्या आहेत. तो जरा चकितच झाला आणि त्या ज्या झुडुपांमध्ये चरत होत्या तिकडे गेला. त्या शेळ्या त्या झुडुपाची लाल बोरं किंवा बोरांसारखी छोटी छोटी फळे खात आहेत असे त्याला दिसले. इतके दिवस तो, ती फळे बघत होता, पण त्याने ती फळे खायचा कधी विचार केला नव्हता. त्याच्या लगेच लक्षात आले की ही फळे खाल्ल्यामुळेच बहुदा ह्या शेळ्या लाडात आल्या आहेत. त्यानेही लगेच ती फळे खाउन बघितली आणि अहो आश्चर्यम! त्यालाही एकदम उत्तेजित झाल्यासारखे वाटून 'लाडात' यावेसे वाटले. पण त्याचे घर दूर असल्यामुळे त्याने त्या उर्जितावस्थेत फक्त नाच करण्यावरच समाधान मानून घेतले. ;)
संध्याकाळी गावात परत गेल्यावर त्याने त्या गावातल्या मुल्लाला हा प्रकार सांगीतला. मुल्ला जरा चौकस होता; त्याने त्या फळांवर जरा संशोधन केले. शेवटी त्या फळाला उकळवून बनलेले पेय प्यायल्यावर येणार्या उत्तेजित अवस्थेमुळे, भल्या पहाटेच्या प्रार्थनेला नेहमी येणारी झोपेची पेंग येत नाही आणि प्रार्थना मनःपूर्वक करता येते हे त्याच्या लक्षात आले. लगेच त्याने त्या भागातल्या मौलवींना ते पेय प्यायला दिले. सर्वांनी त्याचा परिणाम बघून त्या पेयाला प्यायची मान्यता दिली, हो... हो, तुमच्या मनात आले तसेच, 'फतवा' काढला. :)
मग हळूहळू ह्या मौलवींकडून ह्या पेयाचा प्रवास सुरू झाला. ते सर्वात आधी येमेन आणि इजिप्त ह्या अरबस्तानच्या बाजूच्या देशांमध्ये थडकले. तिथे मान्यता पावल्यावर ते हळूहळू मध्यपूर्वेतील अरब राष्ट्रांमध्ये परिचीत होऊन लोकप्रिय झाले. तो पर्यंत वेगवेगळ्या देशात ह्याला वेगवेगळ्या नावानी संबोधले जायचे. अरब राष्ट्रांमध्ये, अरबीमध्ये, ह्या पेयाला काहवा, 'बीयांची वाइन', असे म्हटले जाउ लागले. अरब देशांतुन तुर्कस्तानात पोहोचल्यावर त्या काहवाचे काहवे नामकरण झाले. तुर्कस्तानातून ह्याचा प्रवास झाला इटलीमध्ये आणि मग इटलीतून पूर्ण युरोपभर झाला. पुढे डचांनी काहवेचे नामकरण कोफी असे (koffie) केले. त्यानंतर इंग्रजांनी त्या कोफीचे कॉफी (Coffee) असे केलेले नामकरण आजतागायत टिकून आहे. डचांनी ह्या कोफीला दक्षिण अमरिकेत नेऊन रूजवले तर ब्रिटीशांनी त्यांच्या वसाहतींमध्ये. असा हा कॉफीचा अद्भुतरम्य प्रवास इथियोपियापासून सुरू होऊन, आता माझ्या हातातल्या वाफाळत्या कॉफीच्या कपात येऊन पोहोचला आहे. :)
मला खरंतर कॉफीची एवढी चाहत नव्हती. कॉफीच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे (इन्स्टंट, फिल्टर, लाटे, मोका, जावा, कप्युचिनो ई.) बावचळून जायला व्हायचे. त्यात स्टारबक्स किंवा सीसीडी सारख्या उच्चभ्रू ठिकाणच्या त्या कॉफीच्या किमतीमुळे म्हणा किंवा तिथे जाउन काय ऑर्डर करायचे हे न कळल्यामुळे म्हणा, कधी कॉफीच्या वाटेला गेलो नाही. पण आता चेन्नैला यायच्या आधि माझे एक मित्र, विवेक मोडक, यांच्याबरोबर एक 'बैठक' झाली होती. त्यांनी चेन्नैमध्ये मिळणार्या फिल्टर कॉफीसारखी फिल्टर कॉफी पूर्ण भारतात कुठेही मिळत नाही तेव्हा आवर्जून टेस्ट कर असे बजावले होते. नवनविन काहीतरी टेस्ट करायला आणि रसग्रंथींना वेगवेगळ्या चवींनी समृद्ध करण्यावर माझा भर असल्यामुळे इथे फिल्टर कॉफी ट्राय केली. त्यानंतर माझा एक तमिळ मित्र, आनंद वेंकटेश्वरन, ह्याने त्याच्या घरी गेल्यावर 'इंस्टन्ट' कॉफी पाजली. तीही फिल्टर कॉफी इतकीच चवदार होती. त्यानंतर मी कॉफीच्या प्रेमात पडलो आणि वेगवेगळ्या तमिळ हॉटेलातली कॉफी ट्राय करण्याचा छंदच जडला. इंस्टन्ट कॉफी आणि फिल्टर कॉफी मधला फरक कळण्या इतपत रसग्रंथी तयार झाल्या. पण मग चौकस बुद्धीला (?) प्रश्न पडू लागले की नेमके हे कॉफीचे प्रकार काय आहेत, काय फरक आहे त्यांच्यात? मग थोडा शोध घेणे सुरू केले...
चला तर मग, ह्या नमनानंतर बघूयात गाथा कॉफीची!
![]() |
कॉफीची व्यावसायिक लागवड करण्यासाठी लागते कसदार जमीन, उबदार हवामान, भरपूर पाऊस आणि दमट व ढगाळ वातावरण. ह्या सर्व पोषक गोष्टी विषुववृत्ताच्या साधारण २०-२५ डीग्री वर-खाली उपलब्ध असतात, त्यामुळे बाजुच्या चित्रात दाखवलेल्या प्र-देशांत कॉफी तयार केली जाते. जगात दरवर्षी साधारण ५,०००,००० टन कॉफी तयार केली जाते आणि ह्यात सिंहाचा वाटा एकट्या ब्राझीलचा असतो. त्या खालोखाल कोलंबियाचा नंबर लागतो. भारताचाही नंबर टॉप १० देशांमध्ये येतो. भारतात तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक ह्या राज्यांमध्ये कॉफीची लागवड मोठ्याप्रमाणावर केली जाते. |
कॉफीच्या बर्याच प्रजाती आहेत, त्या वेगवेगळ्या ठिकाणी वाढतात. पण व्यावसायिकरित्या लागवड केल्या जाणार्या आणि प्यायल्या जाणार्या मुख्य प्रजाती दोनच.
१. अरेबिका (Arabica)
२. रोबस्ता (Robusta)
|
अरेबिका
|
रोबस्ता
|
| ही कॉफी, उच्च दर्जाची कॉफी समजली जाते. कॉफीत असलेला मादक घटक 'कॅफीन', ह्याचे प्रमाण ह्या कॉफीत कमी असते (रोबस्ताच्या मानाने). अरेकिबा कॉफीच्या फुलांचे परागीकरण स्व-परागीकरण (Self Pollination) प्रकाराने होते. |
रोबस्ता ही प्रजात कॉफीच्या झाडावर पडणार्या रोगावर प्रतिकार करण्यास अरेबिकापेक्षा जास्त सक्षम असते. अरेकिबा कॉफीच्या फुलांचे परागीकरण पर-परागीकरण (Cross Pollination) प्रकाराने होते. बहुतेक कॅन्ड आणि इंस्टंट कॉफी बनवण्याकरिता अरेबिका आणि रोबस्ता ह्यांचा ब्लेंड वापरला जातो. |
![]() |
![]() |
कॉफीची हिरवी फळे लाल झाल्यावर, म्हणजेच पिकल्यावर कॉफीच्या सुगीचा हंगाम सुरु होतो. ही लाल झालेली फळे यांत्रिक पद्धतीने तसेच मनुष्यांकरवी झाडांवरून काढली जातात. अर्थातच माणसांकडून काढले गेलेल्या पद्धतीत अफाट श्रम लागत असल्यामुळे (त्याने कॉफीच्या फळांना कमी क्षती पोहोचते) त्या कॉफीचा भाव हा चढा असतो.
कॉफीचे पिकलेले फळ :
![]() |
![]() |
(सर्व चित्रे आंजावरून साभार)
(क्रमशः)
पाणी केव्हा पाजणार?
आधी दारू, आता कॉफी. यापुढे चहा, दूध असे अनुक्रमे थेट पाण्यावर येणार का? इतर पेयांबद्दल क्षमस्व. मी केवळ पाण्याबद्दलच हक्काने प्रतिक्रिया देऊ शकतो. http://www.aisiakshare.com/node/415#comment-5811
'कॉफीन'? ..."कॉफीन म्हणजे ...
...ख्रिस्ती लोकांची शवपेटिका" !! साभार - पु.लं.च्या म्हैस मधले मास्तर :-)
सोक्या, दारूत काहिच गती नाहि त्यामुळे तुझे लेख मुकाट वाचले. पण चहा-कॉफीबद्दल लिहिशील तेव्हा मात्र 'नीट' वाचणारे, कांय समजलास?. कायरे, कॉफीचं पिकलेलं फळ थोडं आपल्या कोकमासारखं नाहि दिसत?
हा लेख थोडा शाळेतल्या धड्यासारखा झालाय - कीती टन उत्पादन, उष्ण हवामान, यांत्रिक पद्धत वगैरे. तुझं खरं प्रेम दारूवर आहे. त्यामुळे असं लेखन 'घोटभर' घेउनच करावं म्हणजे ते नेहेमीसारखं मस्त वठेल. असो. पुढल्या भागाच्या प्रतीक्षेत........
चुक दर्शवल्याबद्दल धन्यवाद!
चुक दर्शवल्याबद्दल धन्यवाद! दुरूस्ती केली आहे. :)
सोक्या, दारूत काहिच गती नाहि त्यामुळे तुझे लेख मुकाट वाचले. पण चहा-कॉफीबद्दल लिहिशील तेव्हा मात्र 'नीट' वाचणारे, कांय समजलास?.
आता मात्र धास्तावलोय, पुढचा भाग टंकताना खरंच 'घोटभर' घेऊन बसावे लागेलसे दिसते. :(
हा लेख थोडा शाळेतल्या धड्यासारखा झालाय
पॉईंट नोटेड, ह्या मुद्द्याबद्दल खरच धन्यवाद!
- (धास्तावलेला) सोकाजी
कॉफीचं माहित नाही पण दारू
कॉफीचं माहित नाही पण दारू पिताना/प्यायल्यानंतर शारीरिक श्रम, व्यायाम, मिरवणूक-टाईप नाच वगैरे केल्यास कमी चढते किंवा उतरते असा स्वानुभव आहे.
फार वाईट हँगओव्हर आल्यास कॉफीचा फायदा होतो तो म्हणजे डोकेदुखी वगैरे थांबते, तेवढ्यापुरता मसल-फटीग वगैरे कमी होतो. तेवढ्या वेळात बर्यापैकी शारीरिक हालचाल करणे आणि भरपूर पाणी पिणे या दोन गोष्टी केल्यास खरोखरच फायदा होतो.
गाळायच्या सर्वच पेयांबद्दल
गाळायच्या सर्वच पेयांबद्दल तुला प्रेम दिसतंय.
कॉफीचा शोध कसा लागला वगैरे इतिहास माहित नव्हता. मागे कधीतरी कॉफीच्या फळांतल्या बियांपासून शेवटी कपातली कॉफी बनण्यातल्या सगळ्या प्रक्रियांबद्दल एक रोचक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम टीव्हीवर पाहिला होता. पहिला भागही तसाच फ्लेवरी झालाय. पुढच्या भागांची वाट पहाते आहे.
सध्या एका मित्राच्या रेकमेंडेशनवरून दक्षिण अमेरिकन कॉफ्यांची चव चाखते आहे.
अरबस्तानातील कॉफी
कॉफी हे अरबस्तानातील वाळवंटात संचार करणार्या बेदूंचे 'राष्ट्रीय' पेय आहे आणि त्यांचा मूळ शब्द 'काहवा' हा तेथूनच वेगवेगळ्या अपभ्रंशात जगभर पसरला आहे. हे होतांना कॉफीचे रूप मात्र पार बदललेले आहे.
रुब-अल-खाली (Empty Quarter ह्या नावाने ओळखले जाणारे वाळवंट, जे सौदी अरबस्तानाचा बहुतेक भाग व्यापते) मध्ये उंट आणि शेळ्या-मेंढ्या घेऊन भटकणारे बेदू जेव्हा वाळवंटात भेटतात तेव्हा कॉफी आणि खजूर हा त्यांच्या आतिथ्याचा एक भाग असतो. कॉफीच्या बिया उकळून केलेले दाट कडवट पाणी, वेलची आणि कधीकधी लवंग ह्यांचा स्वाद दिलेले, असे हे पेय छोटया बिन-कानाच्या कपातून सुमारे दोन चमचे अशा प्रमाणात पाहुण्याला दिले जाते. कॉफीचे भांडे सुरईच्या आकाराचे असते. सर्वमान्य उपचार असा आहे की पहिले दोन कप प्यावेच लागतात, तिसर्या कपापासून पाहुणा नको म्हणू शकतो. नको म्हणणे म्हणजे कप हलवून दाखविणे - कसे? तर भारतात लोक होकार दाखविण्यासाठी मान एका खांद्यापासून दुसर्यापर्यंत हलवतात तसे.
लॉरेन्स ऑफ अरेबियाचे Seven Pillars of Wisdom किंवा विल्फ्रेड थेसिगरचे Arabian Sands वाचल्यास त्यात अशा कॉफीपानाचे अनेक उल्लेख सापडतील.
भारतात कॉफी बाबा बुदन ह्या सूफी संताने १७व्या शतकात आणली असा समज आहे. पहा http://en.wikipedia.org/wiki/Baba_Budan
(चित्रश्रेय mideastposts.com)
व्हॉट गोज़ इन...
...मष्ट कम औट१, त्यामुळे ते एक वेळ समजू शकतो.
पण मुळात, हातात (स्वच्छ) चार आणे असताना, ते सरळ गोळ्या विकत आणण्यासाठी वापरण्याऐवजी अगोदर ते प्रोसेस कशासाठी करायचे, ते कळले नाही.
प्रोसेस्ड२ चार आण्यांतून आणलेल्या गोळ्यांच्या स्वादात व्हर्जिन चार आण्यांतून आणलेल्या गोळ्यांच्या तुलनेत काही फरक पडतो काय?३
----------------------------------------------------------------------------------------------------------
१ सम टैम ऑर द अदर. 'पेशन्स' इज़ द नेम ऑफ द गेम.
२ करप्शन (बोले तो, पैसे खाणे), (२) मनी लॉण्डरिंग, आणि (३) सर्क्युलेशन (बोले तो, लॉण्डर्ड पैशाचे बाजारात वितरण) अशी ही थ्री-ष्टेप प्रोसेस आहे.
३ या प्रश्नाकरिता 'खाओ तो जानो' या उत्तराची अपेक्षा नाही.
कहाणी
अलिकडेच कोणत्याशा कार्यक्रमात अशीही कहाणी ऐकली की काहवा, अर्थात कॉफी, कोणे एकेकाळी फक्त अरबस्थानातच होती. तिथून ती बाहेर नेण्यासाठी धर्मगुरुंनी मनाई केली होती. त्या काळात अरब-भारतीय असा व्यापार उदीम होता. कोणत्याशा भारतीय धर्मगुरूने कॉफीच्या बिया (का रोप) तस्करी करून भारतात आणल्या. भारतात लागवड सुरू झाली आणि तिथून पुढे कॉफी सगळ्या जगभर पसरायला मदत झाली.
तिथून ती बाहेर नेण्यासाठी
तिथून ती बाहेर नेण्यासाठी धर्मगुरुंनी मनाई केली होती.
ह्याबद्दल माहिती नाही.
त्या काळात अरब-भारतीय असा व्यापार उदीम होता. कोणत्याशा
भारतीयधर्मगुरूने कॉफीच्या बिया (का रोप) तस्करी करून भारतात आणल्या. भारतात लागवड सुरू झाली आणि तिथून पुढे कॉफी सगळ्या जगभर पसरायला मदत झाली.
पण हे खरे आहे!
- (कपर) सोकाजी
अच्छा !
अच्छा ! म्ह्णजे तुम्ही कॉफी देखील पीता वाटतं ! नाही मला वाटलं की नाना सकाळ, दुपार, संध्याकाळ आपल्या कॉकटेल लाऊंज मधून वेगवेगळे द्रव्य पीत असणार ! :)
नेहमी स्कर्टमधे फिरणार्या पोरीला सहावारी साडीत बघीतल की कस वाटेल अगदी तस्सच तुमचा लेख वाचून वाटलं.
तुम्हाला माझ्यातर्फे द्रव्याचार्य ही पदवी देत आहे.
...
अहो, छुपे रुस्तुम आहेत ते! मला तर शंका आहे की ते अधूनमधून चोरून पाणीसुद्धा पीत असावेत.
------------------------------------------------------------------------------
यावरून एक विनोद आठवला.
एकदा एक मद्यपि, खूप बरे वाटत नाही म्हणून डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर सर्व प्रकारच्या तपासण्या करतात, नि जलोदराचे निदान होते.
"जलोदर? च्यामारी, मी व्हिस्कीशिवाय कधी काही प्यायलो नाही, आयुष्यात पाण्याच्या एका थेंबालासुद्धा शिवलो नाही, मग हे 'जल' माझ्या 'उदरा'त आले कोठून?"
मग, थोडा वेळ विचार केल्यानंतर: "अरे हो! व्हिस्कीत टाकलेल्या बर्फाचे असेल."
सांगण्याचा मुद्दा: व्हिस्कीत कधीही बर्फ टाकून पिऊ नये. प्राणघातक सवय!
अहो, छुपे रुस्तुम आहेत ते!
अहो, छुपे रुस्तुम आहेत ते! मला तर शंका आहे की ते अधूनमधून चोरून पाणीसुद्धा पीत असावेत.
यावरोन किस्सा आठवला.
स्थळः जिथे काय उणे, पुलंचे घर.
सुनीताबाईंना स्वयंपाक करताना पाहोन कोणा एका चाहत्याने "अजि म्यां काय पाहिले" असा चेहरा करून इच्यारले-"म्हंजे तुम्ही स्वैपाकसुद्धा करता??????"
सुनीताबै म्हणाल्या: "कोणाला सांगू नका हो, आम्ही जेवतोसुद्धा!".
+ (फाटा क्र. ३)
खुद्द पु.लं.च्या तोंडून हा किस्सा ऐकलेला आहे.
('आमच्या काळा'त - बोले तो, ब्ल्याक-अॅण्ड-व्हाईट (दूरचित्रवाणी प्रक्षेपणा)च्या जमान्यात, आणि 'न्याशनल नेटवर्क' नावाचा महारोग दूरदर्शनला लागण्यापूर्वीच्या काळात, जेव्हा ('ला इलाहा इल्लल्ला, मुहम्मदुर्रसूलल्ला'च्या चालीवर) 'मुंबई (ब्याण्ड १, च्यानेल ४)व्यतिरिक्त दुसरे दूरचित्रवाणी केंद्र नाही, आणि पुणे (ब्याण्ड ३, च्यानेल ५) हेच त्याचे सहक्षेपण केंद्र आहे' हे किमानपक्षी कोंकणपट्टी नि पश्चिम महाराष्ट्रातील१ तरी अंतिम सत्य२ होते, आणि कार्यक्रमांच्या बाबतीत मुंबई केंद्र भारतातील इतर केंद्रांपासून (आणि मुख्यतः दिल्लीपासून) स्वतंत्र होते, जेव्हा ३१ डिसेंबरच्या रात्रीचा मध्यरात्रीपर्यंत चालणारा कार्यक्रम मराठीतून असायचा, आणि मुंबईव्यतिरिक्त उर्वरित भारतात किंवा इतरत्र कोठेही झालेली टेष्ट म्याच मुंबईने चुकून जर 'लाइव' दाखवलीच, तर ती फार मोठी तांत्रिक झेप वगैरे ठरत असे३, त्या युगात - एकदा दोन लागोपाठच्या रविवारी सकाळी मुंबई दूरदर्शनने पु.लं.ची एक मुलाखत दोन भागांतून प्रक्षेपित केली होती. त्या मुलाखतीत खुद्द पु.लं.नी हा किस्सा आपल्या काळ्यापांढर्या तोंडाने सांगितला होता, तो (आमच्या एका शेजार्यांच्या घरी असलेल्या आम्ही तेव्हा राहत असलेल्या बिल्डिंगीतील एकमेव टीव्हीसमोर बसून) ऐकण्याचे नि पाहण्याचे भाग्य आम्हांस लाभले होते. गेले ते दिवस, सा रम्या नगरी, इ.इ.)
----------------------------------------------------------------------------------------------------------------
१ बोले तो, मुख्यत्वेकरून मुंबई/ठाण्यातील नि पुण्यातील. उर्वरित कोंकणपट्टीवर नि पश्चिम महाराष्ट्रात बहुतकरून टीव्ही-नास्तिकत्वच होते, परंतु काही तुरळक ठिकाणच्या लोकांना आपल्या घराच्या गच्चीवर हीऽऽऽ भली मोठ्ठी अँटेना (याकरिता 'एरियल' असा शब्द अधिक लोकप्रिय असे) लावून यांपैकी एखादे केंद्र पकडता येत असे, असे ऐकलेले आहे.
२ नाही म्हणायला, पावसाळ्याच्या दिवसांत कराची (पुन्हा ब्याण्ड १, च्यानेल ४, नि सिंहगडापासून साधारणतः मुंबईच्याच दिशेने) आपल्या अस्तित्वाची जाणीव पुणेकरांना करून देऊन पुणेकरांच्या तौहीदीवर कयामत आणत असे. पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी.
३ एकदा कधीतरी - मला वाटते १९७८मध्ये - भारताचा क्रिकेटदौरा पाकिस्तानात गेला होता. फैसलाबाद, लाहौर नि कराची येथे प्रत्येकी एक अशा तीन टेष्टम्याचेस झाल्या होत्या. मुंबई दूरदर्शनने कधी नव्हे ते त्या तीन्ही म्याचेस (पाकिस्तान टेलेव्हिजन आणि इस्रोच्या सहकार्याने) उपग्रहाद्वारे थेट पाकिस्तान टेलेव्हिजनकडून लाइव सहक्षेपित केल्या होत्या. (आपले लाला अमरनाथ तेव्हा एक्स्पर्ट कमेंटेटर म्हणून पाकिस्तान टेलेव्हिजनवर गेले होते.) मोठ्ठी घटना ठरली होती ती तेव्हा.
अन्यथा, भारतात मुंबईव्यतिरिक्त इतर कोठेही घडलेली टेष्टम्याच मुंबईने लाइव दाखवणे हा 'चान्सिल्ले'चाच मामला होता. तांत्रिक क्षमता म्हणा, ऐपत म्हणा, कशाचा तरी अभाव होता. नाही म्हणायला, एका कोणत्यातरी सीझनमध्ये, बंगलोरला झालेली एक म्याच (त्या काळात बंगलोरला दूरदर्शन केंद्र नसताना) मुंबई दूरदर्शनने आपला क्रू पाठवून व्यवस्थित लाइव कव्हर केली होती. मात्र, एकदोन वर्षांनी पुन्हा एकदा बंगलोरला म्याच झाली असता, ती न दाखवता येण्याकरिता ऐन वेळी 'तांत्रिक अडचणी'चे कारण पुढे केले. आता, दोन वर्षांपूर्वी जर तांत्रिक अडचण आड येत नव्हती, तर याच वेळेला का यावी? याचे (नंतर ऐकिवात आलेले) कारण: 'तांत्रिक' अडचण म्हणे तशी काहीच नव्हती. मागच्या वेळेस बंगलोरहून प्रक्षेपणासाठी मुंबईला दळणवळणाकरिता म्हणे पोष्ट आणि तारखात्याचे (केबल वगैरे जे काही असेल ते) इन्फ्रास्ट्रक्चर वापरले होते. त्याच्या (मागच्याच वेळच्या) पैशांची म्हणे थकबाकी राहिलेली होती, त्यामुळे पोष्ट/तारखात्याने म्हणे ती या वेळेस वापरू देण्यास नकार दिला. परिणाम: या वेळेस दाखवता येणे शक्य नव्हते. (डिस्क्लेमर: ऐकीव माहिती; चूभूद्याघ्या.)
असो.
अहोभाग्यम्!!! स्वयम्
अहोभाग्यम्!!! स्वयम् कुरुक्षेत्रावर गीता ऐकण्याचे भाग्य लाभले तर.
बाकी तांत्रिक अडचणीचा किस्साही रोचकच. पण मुंबै केंद्र तसे एकूणच फॉर्वर्ड म्हणावयास पाहिजे. टीव्हीपूर्व जाहिलियतच्या काळात, १९३८ साली मिरजेत झालेल्या अब्दुल करीम खां साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तचा गानकार्यक्रम क्रू इ. पाठवून थेट मिरजेस्नं मुंबैपर्यंत प्रसारित केला होता असे वाचनात आलेले आहे.
श्रेयअव्हेरः मिरज इतिहास संशोधन मंडळाची ही बातमी.
...
अहोभाग्यम्!!! स्वयम् कुरुक्षेत्रावर गीता ऐकण्याचे भाग्य लाभले तर.
'स्वयम् कुरुक्षेत्रावर' नाही म्हणता येणार, पण तेथे कुरुक्षेत्रावर भगवंत त्या गाढवापुढे गीता गात असता संजयाने हस्तिनापुरात१ बसून जेणेंकरून ते पाहिले नि खुद्द भगवंतांच्या तोंडून ऐकले (नि त्यावरून नंतर मग धृतराष्ट्रास आँखों देखा हाल सुनविला), तद्वत म्हणू या.
(अवांतर: संजयास भगवंतांचे थोबाड जे दिसले, ते काळेपांढरे, की रंगीत, हे कुतूहल फारा दिवसांपासून भेडसावत आहे.२ याविषयी काही खात्रीलायक माहिती कोठून मिळू शकेल काय? जेणेंकरून तत्कालीन तंत्रज्ञानाच्या ष्टेट-ऑफ-द-आर्टसंबंधी काही उद्बोधन होऊ शकेल.)
पण मुंबै केंद्र तसे एकूणच फॉर्वर्ड म्हणावयास पाहिजे. टीव्हीपूर्व जाहिलियतच्या काळात, १९३८ साली मिरजेत झालेल्या अब्दुल करीम खां साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तचा गानकार्यक्रम क्रू इ. पाठवून थेट मिरजेस्नं मुंबैपर्यंत प्रसारित केला होता असे वाचनात आलेले आहे.
रोचक माहिती. पण ते (मुंबईचे) आकाशवाणी केद्र, तर हे (मुंबईचेच) दूरदर्शन केंद्र. बोले तो, ते डिपार्टमेंट वायले, अन हे डिपार्टमेंट वायले. अर्थात, सुरुवातीची काही वर्षे दूरदर्शन हे आकाशवाणीचाच एक उपविभाग/उपक्रम म्हणून आकाशवाणीच्या आधिपत्याखाली कार्यरत होते म्हणा. परंतु, (माझ्या आठवणीप्रमाणे) उपरोल्लेखित कार्यक्रमांचे वेळेपर्यंत (बोले तो, पु.लं.ची मुलाखत काय, किंवा भारताचा पाकिस्तानदौरा काय, किंवा भारतातीलच इतर उपरोल्लेखित टेष्टम्याचेस काय), दूरदर्शन हे आकाशवाणीपासून विभक्त होऊन एक स्वतंत्र विभाग म्हणून कार्यरत झाले होते.
(अतिअवांतर: 'जाहिलियत'बद्दल. 'त्या' जाहिलियतमध्ये आणि या जाहिलियतमध्ये एक तितकासा-सूक्ष्म-नाही-असा फरक आहे. म्हणजे, दोहोंमध्ये अंधःकार होता, एवढे एकमेव साम्य. मात्र, 'ती' जाहिलियत ही बहुआस्तिकत्वाकडे झुकणारी होती, आणि पुढे साक्षात्कारानंतर एकआस्तिकत्वाकडे येऊन तेथेच स्थिरावली, नास्तिकत्वाकडे गेली नाही. उलटपक्षी, या जाहिलियतीत नास्तिकत्व हे प्रस्थापित तत्त्व होते, तर तिचे निर्मूलन झाल्यावर त्याची जागा प्रथम एकआस्तिकत्वाने घेतली, आणि पुढे काही काळानंतर पुन्हा स्थित्यंतर होऊन त्या ठिकाणी बहुआस्तिकत्व हे प्रस्थापित तत्त्व बनले.
थोडक्यात, मूलस्थिती, स्थित्यंतराची दिशा आणि स्थित्यंतराची मर्यादा, या तिन्ही मूलभूत बाबींत 'ती' जाहिलियत आणि ही जाहिलियत पूर्णत्वेकरून भिन्न आहे, असे वाटते. सबब, त्यांची तुलना तितकीशी पटली नाही, परंतु मुद्दा लक्षात आला. असो.)
--------------------------------------------------------------------------------------------------------------
१ चूभूद्याघ्या.
२ संजयास बहुधा ते संपूर्ण दृश्य ब्ल्याक-अॅण्ड-व्हाइटमध्ये दिसले असावे - किंबहुना, तत्कालीन तंत्रज्ञानाच्या मर्यादेत बहुधा ते ब्ल्याक-अॅण्ड-व्हाइटमध्येच दिसणे शक्य असावे - अशी शंका आहे. भगवंतांचे (तंत्रज्ञानाच्या मर्यादेमुळे दिसणारे) काळे तोंड पाहून त्याचे वर्णन धृतराष्ट्रास करताना सदैव ते 'कृष्ण', 'कृष्ण' असे केले गेल्याने पुढे तेच नाव पडून गेले असावे, नि मूळ नाव जे काही असेल, ते विस्मरणात गेले असावे, अशी आमची नम्र अटकळ आहे. (चूभूद्याघ्या.)
=)) =)) =))
कॉफी ह्या विषयावरचा लेख Kopi Luwak वरून चाराणे -> माझे चोरून पाणी पिणे -> पु.ल. -> दूरदर्शन -> महाभारतातील संजय असा फिरून चक्क हेरगिरीवर येऊन थबकल्याचे पाहून भावना ओथंबल्या आहेत आणि भरून पावलो आहे!
सर्वांना त्रिवार साष्टांग दंडवत! _/!\__/!\__/!\_
:)
- (हेर बनावे का असा विचार करणारा) सोकाजी
अमुक ह्यांनी लिहिले आहे
अमुक ह्यांनी लिहिले आहे -
--------------------------------
'दूरदर्शन' चे उच्चारी 'दुर्दर्शन' होणार हे ओळखून पुलंनी ('आकाशवाणी'च्या चालीवर) 'प्रकाशवाणी' असे नांव 'टेलिव्हिजन'साठी सुचविले होते, असे वाचल्याचे आठवते.
------------------------------
त्यापुढची कथा अशी आहे -
"प्रकाश वाणी" नावाच्या एका गृहस्थांना पुलंच्या त्या सूचनेची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी लगेच कॉपीराइट्स्च्या कायद्यांन्वये आपले नाव '’टेलिव्हिजन’'करता "देशी" प्रतिशब्द म्हणून वापरण्याकरता एक कोटी रुपयांचा मोबदला मागितल्यामुळे तो प्रतिशब्द वापरण्याचा विचार रद्द झाला होता.
मग कोणीतरी "सुदर्शन" असा प्रतिशब्द सुचवला होता. त्या सूचनेची गत अगदी "प्रकाशवाणी"सारखीच झाली होती हे चाणाक्षांच्या चटकन् लक्षात येईलच.
पण शेक्स्पिअरने म्हटल्याप्रमाणे "नावात काय आहे?" "चंद्रभागेमाजीं स्नानें जे करिती ॥ दर्शन हेळामात्रे तयां होय मुक्ती" ह्या चरणद्वयात नमूद असल्याप्रमाणे जे कोणी आपल्या आयुष्यात कधी ना कधी चंद्रभागेत (निदान दोन) "स्नाने" करतात आणि "दूरदर्शन"वर सोनिया गांधी वगैरे "थोर" असामींचे नित्य दुरून "दर्शन" घेतात त्यांची "पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननीजठरे शयनम्" ह्या चक्रावणार्या चक्रातून मुक्ती होते.
स्वयम् कुरुक्षेत्रावर' नाही
स्वयम् कुरुक्षेत्रावर' नाही म्हणता येणार, पण तेथे कुरुक्षेत्रावर भगवंत त्या गाढवापुढे गीता गात असता संजयाने हस्तिनापुरात१ बसून जेणेंकरून ते पाहिले नि खुद्द भगवंतांच्या तोंडून ऐकले (नि त्यावरून नंतर मग धृतराष्ट्रास आँखों देखा हाल सुनविला), तद्वत म्हणू या.
अरे हो की. मुद्दा लक्षात आला होता पण नंतर विसरून गेल्तो. धन्यवाद.
(अवांतर: संजयास भगवंतांचे थोबाड जे दिसले, ते काळेपांढरे, की रंगीत, हे कुतूहल फारा दिवसांपासून भेडसावत आहे.२ याविषयी काही खात्रीलायक माहिती कोठून मिळू शकेल काय? जेणेंकरून तत्कालीन तंत्रज्ञानाच्या ष्टेट-ऑफ-द-आर्टसंबंधी काही उद्बोधन होऊ शकेल.)
प्राचीन भारतीय तंत्रज्ञानाबद्दल शंका उपस्थित करण्याचे धार्ष्ट्य मानलेच पाहिजे. अहो ज्या काळात दिव्य अस्त्रे होती, नुसत्या स्मरणमात्रे एखाद्या दर्भातही ब्रह्मास्त्र संचारायचे, त्या काळात ब्लॅकँडव्हाईट प्रक्षेपण असेलच कसे? वायफायची ताकद किती होती ते सांगायचे एकक म्ह. अक्षौहिणी होते. म्हंजेच आजच्या भाषेत 'जी'. सबब ते १८-जी इतक्या क्षमतेचे नेट वापरीत असत, आहात कुठे? त्याशिवाय का कुठल्या योद्ध्याने कुणावर किती बाण सोडले ते पर्फेक्ट मोजता यायचे? अन अक्षौहिणी म्ह. सैन्याचे एकक जरी असले तरी इतक्या मिनिमम नेटक्षमतेवरच नीट दिसू शकणारे सैन्य म्हणूनही त्याला तसे म्हटले असावे असा एक तर्क एका अप्रकाशित नाडीपट्टीत मांडलेला ऐकला आहे.
बाकी जाहिलियतच्या तौलनिक विवेचनाशी सहमत आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी हे वेगळे असले तरी-इतक्या-लांब-जाऊन-प्रक्षेपण-करणे-हे-लै-नवीन-नाही हे सांगण्याकरिता ते उदा. दिले इतकेच.
संजयास बहुधा ते संपूर्ण दृश्य ब्ल्याक-अॅण्ड-व्हाइटमध्ये दिसले असावे - किंबहुना, तत्कालीन तंत्रज्ञानाच्या मर्यादेत बहुधा ते ब्ल्याक-अॅण्ड-व्हाइटमध्येच दिसणे शक्य असावे - अशी शंका आहे. भगवंतांचे (तंत्रज्ञानाच्या मर्यादेमुळे दिसणारे) काळे तोंड पाहून त्याचे वर्णन धृतराष्ट्रास करताना सदैव ते 'कृष्ण', 'कृष्ण' असे केले गेल्याने पुढे तेच नाव पडून गेले असावे, नि मूळ नाव जे काही असेल, ते विस्मरणात गेले असावे, अशी आमची नम्र अटकळ आहे. (चूभूद्याघ्या.)
पुन्हा एकदा साफ चुकलात. अहो, भगवंतांच्या ठायी इतकी एनर्जी होती, की दुरून पाहणारांना तिथे एनर्जी डेन्सिटीमुळे केवळ एक मिनी ब्ल्याक होल दिसत असे म्हणून तसे नाव पडले इतकेच. ब्लॅक होलही प्रत्यक्ष दाखवू शकणारे प्रक्षेपण-तंत्रज्ञान मागास असेल कसे? असेलच कसे????
म्हणा, गर्वसे कहो...






अहा! आवडते पेय आणि
अहा! आवडते पेय आणि (सोकाजींच्या यादीत असूनही चक्क) प्यालेले देखील :)
अभ्यास नसला तरी बर्याच प्रकारची कॉफी प्यालेलो आहे.. त्यामुळे पुढील भागांसाठी उत्सूकतेने विषेश सरसावलो आहे..
छान सुरवात.. येऊ देत पुढचा भाग