तितीर्षु: दुस्तरं मोहात् आणि उद्बाहुरिव वामन:|
मध्यंतरी एका याहू ग्रूपावर "तितीर्षु: दुस्तरं मोहात् (पाठभेद - स्नेहात्) उडुपेनास्मि सागरम् ||" या ओळींचा अर्थ काय अशी पृच्छा झाली होती. मूळ श्लोक असा आहे -
क्व सूर्यप्रभवो वंश: क्व चाल्पविषया मति: |
तितीर्षुर्दुस्तरं मोहादुडुपेनास्मि सागरम् || - (रघुवंश: सर्ग १, श्लोक २ )
रघुवंशातला हा दुसरा श्लोक आहे. रघुवंश ही कालिदासाने इक्ष्वाकू वंशाला दिलेली काव्यरूपी मानवंदना म्हणता येईल. या कुळातील देदीप्यमान राजांच्या कहाण्या हा या महाकाव्याचा विषय आहे. तेव्हा विषयप्रवेश करताना वरील श्लोक येतो. याचा सरळसोट अर्थ काहीसा असा होईल -
कोठे हा (काव्याचा विषय असलेला) सूर्यवंश (आणि त्याचा भव्य विस्तार वगैरे) अन कोठे माझी अल्पमती (जी या इतिहासास शब्दात पकडू पाहत आहे),
हे म्हणजे (मी) अथांग पसरलेला समुद्र एखाद्या होडक्यात बसून पार करण्याचा मोह धरण्यासारखं आहे.
कालिदासाची शब्दरचना अत्यंत अचूक असते असं आमच्या संस्कृतच्या प्राध्यापकांकडून वारंवार ऐकलं होतं. तेव्हा सहज प्रश्न पडला की कालिदासाने 'मोहात् (किंवा स्नेहात्)' असा शब्द का वापरला? वरवर पाहता कवी आपल्यासमोरील उत्तुंग आव्हानाचे वर्णन करीत आपल्या बुद्धीच्या मर्यादा स्पष्ट करीत आहे असे दिसते, पण थोडं बारकाईने पाहिलं तर यात कवीचा दुर्दम्य आत्मविश्वासही दिसतो. त्याने दिलेली उपमाच पहा ना - होडक्यातून समुद्र पार करणे हे 'येरागबाळ्याचे काम नोहे'! आजच्या घडीलाही असे लोक आपण पाहतोच की..(उदा. कमांडर दिलीप दोंदे - http://sagarparikrama.blogspot.com/) तद्वतच कवीला हा आंतरिक विश्वास आहे की तो हा रघुवंशरुपी सागर तरुन जाईल. (तितीर्षु - अर्थात तरण्याची इच्छा धरणारा) किंबहुना हा सागर तरुन जाण्याच्या मोहापायी/स्नेहापायी (सोप्या मराठीत, थ्रिल) त्याने हा संकल्प धरला आहे. रघुच्या वंशाची कीर्ती कालिदासाच्या आधीही दुमदुमत होती. पण तिला शब्दात पकडण्याचा प्रयत्न तोपर्यंत झाला नव्हता. कालिदासाला हा मोह झाला, आणि आपल्याला हे महाकाव्य मिळाले!
आता हा पुढचाच श्लोक पहा -
मन्द: कवियश:प्रार्थी गमिष्याम्युपहास्यताम् |
प्रांशुलभ्ये फ़ले लोभादुद्बाहुरिव वामन: || - (रघुवंश: सर्ग १, श्लोक ३ )
सरळ अर्थ -
(जसा) केवळ उंच लोकांना उपलब्ध असणारी फळे एखादा बुटका माणूस (केवळ) हात उंचावून मिळवू पाहतो, (तसा) साधारण वकुबाचा असूनही प्रसिद्धीची इच्छा धरणारा असा मी (हे काव्य लिहून) स्वत:चे हसे करुन घेणार आहे.
पुन्हा एकदा कवी स्वत:च्या क्षमतांची खिल्ली उडवताना दिसतो, पण उभ्या जगात बुटक्या माणसास खंडीभर शब्द उपलब्ध असताना त्याने वापरलेला शब्द - 'वामन'!
(बहुदा मल्लिनाथाच्या मते) या योजनेमागे कवीचा असीम आशावाद दिसतो - वामनाची गोष्ट आठवा जरा, दोन पावलांत अख्खे जग व्यापलेन् की त्याने, तसाच कवी हे शिवधनुष्य (लीलया) पेलणार आहे असा याचा ध्वन्यार्थ!
प्रतिक्रिया
सुंदर गर्भीतार्थ!!!
सुंदर गर्भीतार्थ!!! विनम्रतेच्या आड केवढा दुर्दम्य आत्मविश्वास दडला आहे. हे म्हणजे - आयर्न फीस्ट इन वेल्व्हेट ग्लव्ह झालं की.
छान
छान.
जमल्यास "गमिष्याम्युपहास्यताम्" असा सुधार करावा.
"मोह" शब्दाचा चांगला अर्थ संस्कृतात फारच कमी आढळतो. साधारणपणे "मूर्खपणा" किंवा "बेशुद्धी/बधिरता" अशी काहीशी अर्थच्छटा प्राथमिक आहे. "मूढ"="मोहलेला". मल्लिनाथापर्यंत "स्नेहात्" असा पाठभेद दिसत नाही.
"वामन" शब्द वापरून कवीने विष्णूचा वामनावतार ध्वनित केला आहे, ही रसिक-कल्पना छान आहे. (मल्लिनाथाच्या टिप्पणीत ही कल्पना सापडली नाही.)
पुढच्या श्लोकात "वल्मिकि-वगैरे मातब्बरांसारखा मी नसलो, तरी माझ्यात नाविन्य आहे" असे सांगतो :
अथ वा कृतवाग्द्वारे वंशेऽस्मिन्पूर्वसूरिभि: ।
मणौ वज्रसमुत्कीर्णे सूत्रस्येवास्ति मे गति: ॥ रघु. १. ४
या वंशा(च्या कथे)त पूर्वसूरींच्या भाषेने दारे उघडलेली आहेत. मण्यांमध्ये वज्रासारखी/सुईसारखी त्यांनी छिद्रे पाडली आहेत. त्यांच्यातल्या धाग्यासारखा मी आहे.
म्हणजे एकीकडे धाग्याला जमणार नाही, ते वज्रासारख्या पूर्वकवींनी केलेले आहे. पण आज त्या मण्यांना माळण्यासाठी कठोर सुई नको, मऊ धागा हवा आहे! (आदले माझ्यापेक्षा महान, तरी माझे कामही हवेच आहे!)
उपमा कालिदासस्य
ह्या पुढील श्लोक तितकाच उत्तम आहे:
अथवा कृतवाग्द्वारे वंशेऽस्मिन् पूर्वसूरिभि:।
मणौ वज्रसमुत्कीर्णे सूत्रस्येवास्ति मे गति॥ १.४
"किंवा असे असावे की पूर्वसूरींनी आपल्या वाणीने ह्या वंशाचे द्वार उघडलेले आहे आणि म्हणून हिर्याने छिद्र पाडलेल्या रत्नामध्ये दोरा सहज शिरावा तसा माझा आत प्रवेश होईल."
अज-इन्दुमती विवाहाच्या संदर्भातील उत्कृष्ट उपमेचे हे पुढील उदाहरण पहा. इन्दुमतीच्या स्वयंवरासाठी राजसभा भरलेली आहे आणि सखीने वर्णन केल्याप्रमाणे एकाहून एक उमदे आणि शूर राजे आणि वीर वरमाला आपल्या गळ्यात पडावी ह्यासाठी अधीर झालेले आहेत. एकेकाकडे दुर्लक्ष करून इन्दुमती वरमाला घेऊन पुढे गेली म्हणजे
संचारिणी दीपशिखेव रात्रौ यं यं व्यतीयाय पतिंवरा सा।
नरेन्द्रमार्गाट्ट इव प्रपेदे विवर्णभावं स स भूमिपाल:॥ ६.६७
"रात्री राजमार्गावर चूड पुढे पुढे जाते तसे तसे एकेक घर पुनः अंधारात बुडते त्याप्रमाणे पतीच्या शोधात ज्या ज्या राजाच्या पासून ती पुढे गेली तो तो राजा निराशेने विवर्ण झाला."
अशा अनेक उदाहरणांमुळेच 'उपमा कालिदासस्य' ही सार्थ उक्ति निर्माण झाली आहे.
अरे वा!
इन्दुमती पुढे सरताना काळवंडलेल्या - राजांच्या मुद्रा अगदी स्वच्छ उभ्या राहिल्या. चर्चेत आलेला हा श्लोक म्हणजे कळस आहे. कालीदासच तो!
असेच आणखी श्लोक यावेत.
छान
वा!
"अट्ट" म्हणजे बुरूज हा नवीन शब्द कळला.
कालीदास - कालिदास
अज्ञपणाने माझ्याकडून पाणि'नि'प्रमाणेच का'लि'दासाचाही अवमान झाला. क्षमस्व!
धनंजय किंवा कोल्हटकरांनी एकदा 'इतिहासातील प्रसिद्ध व्यक्तींची विशेषनामे योग्यप्रकारे कशी लिहावीत?: (कारणमिमांसेसह) ' असा लेख लिहावा अशी नम्र विनंती.
थोडासा गुंतागुंतीचा प्रश्न
This comment has been moved here.
खालची चर्चा हलवली आहे.
खालची चर्चा इथे हलवली आहे.
छान
लेख आणि प्रतिसाद आवडले.
ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायातल्या ह्या ओळी आठवल्या:
हें अपार कैसेनि कवळावे । महातेज कवणें धवळावे । गगन मुठीं सुवावे । मशके केवीं॥
...
येर्हवीं तरी मी मुर्खू । जरी जाहला अविवेकु । तरी संतकृपादीपु । सोज्वळु असे॥
समस्त
लोकांना प्रतिक्रियांसाठी धन्यवाद!
धनंजय -
आपले 'मोह' शब्दावरील निरीक्षण अचूक आहे. होडके घेउन समुद्र ओलांडायला निघालेल्यांना 'मूर्ख' म्हणणारे लोक असतातच की...
अरविंद कोल्हटकर-
संचारिणी दीपशिखेव... या श्लोकाने कालिदासास 'दीपशिखा कालिदास' ही उपाधि मिळवून दिली..
वा!
मस्त लेख आणि प्रतिक्रिया! असेच आणखी येऊ दे!
वा!
लेख व प्रतिसाद आवडले.
अरविंद कोल्हटकर यांचे प्रतिसाद नेहमीच माहितीपूर्ण असतात.
अस्त! "राजहंसाचे चालणे जगी
अस्त! "राजहंसाचे चालणे जगी झालीया शहाणे.. म्हणौनी काय कवणे चालुची नये' मधे जी बंडखोरी आहे त्याविरुद्ध केवळ 'वामन' शब्दामुळे डोकावलेला आत्मविश्वास आवडला.
माझे संस्कृत काव्याचा अभ्यास काय (शाळेतल्या सुभाषितमाला सोडल्यास) थोडेही वाचन नाही. त्यामुळे असे रसग्रहणात्म धागे माहितीत आणि भरच घालतात. अजून येऊ देत!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अप्रतिम लेख, श्लोक आणि चर्चा.
अप्रतिम लेख, श्लोक आणि चर्चा.
बिपिन कार्यकर्ते