झांशीची राणी!
आजकाल मानसीचा दुपारचा वेळ फारच चांगल्या प्रकारे जात होता. मस्त जेवण, (अधून मधून चायनीज), थोडीशी वामकुक्षी, सटर फटर वाचन, व नंतर 42 इंची फ्लॅट स्क्रीनसमोर बसून आलटून पालटून दोन - तीन टीव्ही चॅनेल्सवरील पुनर्जन्मावरील मालिका बघणे यात वेळ कसा भुर्रकन उडून जात होता याची ती कल्पना करू शकत नव्हती. पोटात मूल वाढत असल्यामुळे डॉक्टरानी सक्तीच्या विश्रांतीची शिक्षा सुनावली होती. 12-15 तास (तेही ऑफिसचे काम न करता!) कसा घालवावा याची तिला पहिल्या पहिल्यांदा धास्ती होती. परंतु या टीव्ही सिरियल्सने तिचा प्रश्न चुटकीसरशी मिटवला. कुतूहल म्हणून मानसी या मालिका पाहू लागली. व त्या तिला चक्क आवडू लागल्या. एवढेच नव्हे तर हे सर्व खरे असावे यावर तिचा हळू हळू विश्वासही बसू लागला. आत्मा अमर आहे व हा आत्मा एका शरीरातून दुसर्या शरीरात जाऊ शकतो यात शंका घेण्यासारखे काय आहे, याचे तिला आश्चर्य वाटू लागले. शंका घेणारे मूर्ख, बावळट वा मुद्दाम खोड्या काढणारे असावेत व त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे या निष्कर्षाला ती पोचली. भगवदगीतेत खुद्द श्रीकृष्णाच्या मुखातूनच या गोष्टी सांगितल्याचे तिला अंधुकसे आठवत होते. (गाइड या चित्रपटातील शेवटच्या दृश्यातील देव आनंदचे ते 'स्वगत' भाषण ती विसरू शकत नव्हती.)
परंतु मानसी स्वस्थ बसणारी तरुणी नव्हती. पुनर्जन्माचे भूत तिच्या अंगी संचारले होते. इंटरनेटवर तिने शोधाशोध केल्यानंतर त्या शहरातील पुनर्जन्म'तज्ञां'चे काही पत्ते तिला मिळाले. चला, आपण पूर्वजन्मी कोण होतो याचा एकदा सोक्षमोक्ष तरी लावू या या उद्देशाने (बाहेर जाण्यासाठी डॉक्टरांची पूर्व परवानगी घेऊन) ती एका तज्ञाच्या ऑफिसात येऊन धडकली. पर्समध्ये पैसे खुळखुळत होते. 'कहानी' चित्रपटातील विद्या बालन टाइपची तिची स्थिती बघितल्यावर अपॉइंटमेंट नसतानासुद्धा तज्ञानी चेंबरमध्ये तिला बोलविले. तज्ञाच्यापुढे दक्षिणेची रक्कम ठेवून त्याच्यासमोर जाऊन बसली. तज्ञ या 'विषया'वर भलताच तरबेज होता. काही जुजबी प्रश्न विचारल्यानंतर आपले डोळे मिटून तोंडातून काही तरी पुटपुटत मानसीला तू पूर्वजन्मी झांशीची राणी होती म्हणून सांगितले. क्षणभर तिला स्वत:वर विश्वासच बसेना. मानसी आणि झांशीची राणी... हे कसे शक्य आहे? हातात तलवार व पाठीला एक मूल बांधून घोड्यावर बसलेल्या झांशीच्या राणीशी व मानसीच्या सौम्य, मध्यमवर्गीय व्यक्तिमत्वाशी कशी काय सांगड घालता येईल? हा विचार तिच्या मनात येत राहिला. आणि पुनर्जन्माबद्दलच्या तिच्या मतात फरक पडू लागला.
Source: An Essay Concerning Human understanding by John Locke (1706)
जगभरात असंख्य लोकांना पुनर्जन्म वा पूर्वजन्म यावर विश्वास आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. या संकल्पनेचे अनेक पैलू असले तरी मूळ संकल्पना अनेकांना आकर्षित करत राहते. ही संकल्पना पूर्णपणे चुकीची आहे असे म्हणण्यास भरपूर वाव असूनही हा विषय अधून मधून चर्चेला येतच असतो. एक क्षणभर आत्म्याचे अस्तित्व मान्य करून हा आत्मा पुनरावतार घेऊ शकतो यावर विश्वास ठेवला तरी पुढे काय? हा प्रश्न तसा अनुत्तरितच राहतो. जनुकासारखे आत्म्यात काही कोडिंग असते का? कुठे पुनरावतार घ्यावे यासाठी अंतर, काळ, वेळ, जाती-प्रजाती, भाषा, वर्ग, वर्ण इत्यादींचे बंधन असते का? एका शरीरातून दुसर्या शरीरात प्रवेश करण्यासाठीच्या मधल्या काळात हा आत्मा कुठे भरकटत असतो? कुठल्या शरीरात जावे हे तो कसे काय ठरवतो? एकच आत्मा एका निर्दिष्ट क्षणी दोन - चार शरीरात जाऊ शकतो का? हत्तीचा आत्मा मुंगीच्या शरीरात कसे काय जाऊ शकतो?असले असंख्य प्रश्न व या प्रश्नासंबंधीचे विचार मानसीच्या डोक्यात भुणभुणत होत्या. मुळात स्वत:च्या पुनर्जन्माची हकीकत लोकांना एवढे का आवडते? त्या नेहमीच बोलबाला असलेल्या व्यक्ती, वा सत्ताधारी वा प्रतिभावान, वा सौंदर्याचे पुतळे, वा नुकत्याच मृत्यु पावलेले जवळचे नातेवाइक ... असे का असतात? आपण कुणी तरी ग्रेट होतो या मानसिक समाधानापायी कदाचित आपण या पुनर्जन्माच्या आहारी जात असावे. मागच्या जन्मी तू हिप्पोपोटोमस वा डुक्कर म्हणून जन्माला आला होतास असे तथाकथित तज्ञ सांगू लागल्यास तज्ञांना उपाशीच मरावे लागेल.
मानसीला अशा प्रकारच्या आत्म्याच्या पुनर्जन्माच्या विविधतेबद्दलही वैषम्य वाटायचे कारण नव्हते. मात्र माझ्या आताच्या आत्म्याचा संबंध त्या झांशीच्या राणीच्या आत्म्याशी कसे काय जोडता येईल याबद्दल तिच्या मनात शंका होत्या. खरे पाहता स्त्रीचा आत्मा स्त्रीच्या शरीरात व पुरुषाचा पुरुषाच्या शरीरात या लिंगभेदभावाची जाण आत्म्याला कशी काय आली हे तिच्या दृष्टीने न सुटलेले कोडे होते.मानसीला यात काही काळेबेरे असावे असे वाटू लागले. पहिल्याच झटकेला हे सर्व खोटे, रचलेले, लुबाडणूक करणारे आहे हाच विचार तिच्या मनात आला.
यातही आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. आपण आपल्या पूर्वजन्माऐवजी याच जन्मातील आपल्याच भूतकाळात जेव्हा डोकावतो तेव्हासुद्दा आपलाच आपल्यावर विश्वास बसत नाही. लहानपणी केलेली मौजमजा, त्या काळातील आपले अनाकलनीय वर्तन, आपले समज - गैरसमज इत्यादींची आजच्या आपल्याशी तुलना केल्यास भूतकाळातील त्या व्यक्तीशी आपला संबंध नाही असेच वाटण्याची शक्यता जास्त असते. मुळात मानसिकरित्या आपण बालपणीच्या 'त्याच्या वा तिच्या'शी जोडलेलो नसल्यामुळे वा त्यातील मानसिक सातत्याच्या अभावामुळे आताचे आपण दुसरेच कोणी तरी आहोत ही भावना मूळ धरू लागते.
ऐन तारुण्यात 20-25 वेळा पाहिलेले चित्रपट आज पाहताना त्यावेळी असले भिकार चित्रपट कसा काय पाहू शकलो याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. त्या काळात चोरून मिटक्या मारत, वाचलेल्या कथा-कादंबर्यांकडे आज आपण ढुंकूनही पाहणार नाही. जॉय मुखर्जी, विश्वजित, शम्मीकपूर यासारख्या बेढब हीरोंच्यावर आपण कसे काय फिदा झालो होतो हा प्रश्न वारवांर विचारावासा वाटल्यावाचून राहणार नाही. त्याचवेळी आपण आपल्या मागच्या पिढीतील बालगंधर्व, वीर वामनराव, के एल सायगल यांच्या भक्तगणांना वा भारत भूषणसारख्या मख्ख चेहर्याच्या हीरोंच्या चाहत्यांना शिव्या घालत होतो याचीही आठवण आल्यावाचून राहणार नाही. फक्त आपले आजचे व्यक्तिमत्व या प्रकारच्या आठवणीतून, अनुभवातून बाहेर येत येत आज आपण जे आहोत तिथपर्यंत पोचलेले आहे.
याच आयुष्यातील आत्म्याचे हे थेर लक्षात आल्यावर पूर्वजन्मीच्या आत्म्याशी आपली कशी काय नाळ जोडता येईल? मानसी ही एके काळी झांशीची राणी होती हे पुराव्यानिशी सिद्ध करणे गरजेचे आहे असे तिला वाटू सागले. तिच्या आजच्या आयुष्यात झांशीच्या राणीच्या किमान काही छटा जरी आढळले तरी तिचा त्या तज्ञाच्या विधानावर विश्वास बसला असता. झांशीची राणी व ती फक्त स्त्री आहेत याशिवाय दुसरे कुठलेही सबळ कारण तिच्यासमोर नव्हते. मुळात मानसीला झांशीच्या राणीच्या गत इतिहासाबद्दल काहीही माहित नव्हते हेही कबूल करायला हवे.
परंतु आपण योग्य प्रकारे तर्कनिष्ठ पद्धतीने आत्म्याविषयी विचार करत असल्यास जरी आत्मा शरीराच्या मृत्युपासून स्वत:ची सुटका करून घेत असला तरी शारीरिक मृत्युनंतर आपली मात्र कायमची सुटका होते. आपले स्वत्व हरवून जाते. स्वभान नष्ट होते. आपले स्वभन आपल्या मानसिक सातत्याचा भाग असल्यामुळे त्याला शरीरापासून वेगळे करता येत नाही. स्वत्व वा स्वभान ही काही वेगळे काढून ठेवता येण्यासारखी वस्तू नव्हे. आत्म्याचे अमरत्व आपल्या स्वभानाचा पुरावा होऊ शकत नाही. आत्म्याचेच नव्हे तर आपले हृदय, हात, पाय वा इतर कुठलेही अंग हजारो वर्षे कृत्रिमरित्या जिवंत ठेवण्यास वैज्ञानिक यशस्वी झाले तरी त्यांच्यात आपले 'स्वभान' शोधता येत नाही.
आपण आपल्याच बालपणीचा फोटो पाहिला तरी आपला आणि त्या फोटोचा काही संबंध नाही ही गोष्ट लक्षात येईल. घरातील वडील मंडळीनी हा तू रांगत असताना काढलेला फोटो असे ठासून सांगितल्याशिवाय आपण त्यात आपला चेहरा बघू शकत नाही. मी खरोखरच अशी होती का असेच मानसीला फोटो बघून वाटले असेल. मुळात बालवयातील गोष्टीत आपल्या मानसिकतेचे सातत्य क्षीण होत गेलेले असते व काही वेळा ती अस्तित्वातच नसते.
म्हणूनच आताची मानसी ज्या प्रकारे तिच्या बालपणातील 'मी'ला नाकारते तसेच ती आपल्या पूर्वजन्मीच्या झांशीच्या राणीला नाकारत नसेल ना?
पूर्वी सर्वकाही महान होतं आणि
पूर्वी सर्वकाही महान होतं आणि आता त्याचा र्हास होतो आहे अशा कल्पना बहुसंख्यांना आवडतात का? काही प्रमाणात, आपण (आपली पिढी, आपली पुढची पिढी इ) अन्यायग्रस्त किंवा उपेक्षित आहेत या प्रकारच्या दु:ख कुरवाळण्याच्या स्वभावातून असं होत असेल का? पूर्वीच्या जन्मात तुम्ही कोणीतरी महान होतात असं सांगितलं तरच असले व्यवसाय सुरू रहातील.
एकेकाळी आवडायच्या त्या गोष्टी आता अगदीच टाकाऊ वाटतात किंवा न आवडणार्या गोष्टी आवडतात यामागच्या मानसिकतेबद्दल प्रसिद्धीचे गौड्बंगाल - एका प्रयोगाची गोष्ट या धाग्यात थोडा उहापोह आहे. प्रत्येक वेळा अशाच कारणांमुळे आवड बदलते असं नाही. कॉलेजच्या मुलांना जोरदार आवाज असणार्या पब्जमधे पार्टी करायला मजा येते. हीच मुलं थोडी मोठी झाली, नोकर्या वगैरे करायला लागली की एखाद्या शांत ठिकाणी बसून कॉफी-स्नॅक्सच्या जोडीला निवांत गप्पा मारण्याच्या जागा त्यांना आवडतात. कपड्यांच्या फॅशनच्याही बाबतीत हेच होतं. (भारतात स्त्रियांना जीन्स खरेदी करताना ही अडचण अनेकदा येते. "कॉलेजच्या मुली घालतात तसले फंकी प्रकार दाखवू नका" असं सांगूनही पसंत पडेल अशा जीन्स मिळत नाहीतच.)
(काही लोकांचे लहानपणाचे फोटो पाहून चेहेरा अजिबात बदललेला नाही असं लक्षात येतं. माझ्या भावाचा चेहेरा होता तसाच आहे असं त्याचे दोन-चार जुने फोटो पहाता लक्षात आलं. चेहेर्यावरचा निरागसपणा तेवढा गेला.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
एकदा आत्मा मानला, पुनर्जन्म
एकदा आत्मा मानला, पुनर्जन्म मानला की झाशीची राणीच काय पण आणखी कितीतरी पर्याय पुढे येतात
***
अब्द शब्द
चांगलं
तुम्ही आणखी चांगलं लिहू शकाल.
मान्य
मान्य. एका क्षणापासून दुसर्या क्षणापर्यंतसुद्धा पिंड बदलते. परंतु बहुतेक अवयव/अणू क्षणा-क्षणाच्या गतीत त्याच पिंडात राहातात. (बहुतेक, पण सर्व नव्हेत.) म्हणून त्या थोड्याच बदललेल्या पिंडाला आपण मागील नावच पुढे चालू ठेवतो.
या क्षणी एका पिंडाला मी "मानसी" नाव दिलेले आहे. पुढच्या क्षणी मला असे एक पिंड दिसते, त्यात आदल्या क्षणातल्या मानसीमधील बहुतेक सर्व अवयव/अणू/गुण आहेत - पण सर्व नव्हेत. सोय म्हणून त्या पुढच्या क्षणी दिसणार्या पिंडाला सुद्धा मी "मानसी" हेच नाव देतो. आणि असे क्षणाला क्षण जोडता बाळपणीचे रांगते "मानसी"-पिंड उफाड्या युवतीचे पिंड होते. अर्थात या युवतीचे बहुतेक अवयव/अणू आदल्या रांगत्या बाळात नव्हते. फक्त एका क्षणापासून दुसर्या क्षणापर्यंत बहुतेक अवयव अणू अगदी हळूहळू बदलणार्या पिंडात होते, इतकेच.
मात्र पिंड मागे ओढत-ओढत नेता काय होते? मला ते गर्भधारणेच्या अलीकडे नेता येत नाही. मात्र जे पिंड पुढे मानसी झाले, त्यातील अणू आणि त्या अणूंची हालचाल पूर्वी कुठूनतरी आली, हेसुद्धा खरे. आदले अणू आणि हालचाली बघता त्यांचे धागे इतिहासात उभे-आडवे दूर-दूर पोचतात. तस्मात् मानसी ही एकाच वेळी झांशीची राणी आणि सर ह्यू रोझ होती, संत ज्ञानेश्वर आणि ग्यानू रेडा सुद्धा होती. (आणि मी "धनंजय"देखील हे सर्व लोक, जनावरे, वनस्पती, सूर्यमंडल आणि दगड-माती होतो.)
पण या सर्वांपैकी एकटी झांशीची राणीच का निवडली?