अत्युत्कृष्टतेचा पाठलाग करणे हितावह ठरेल का?

जे जे काही आपण करतो ते अत्युत्कृष्ट (perfect) असायलाच हवे, आपल्या जीवनाची घडण उच्च श्रेणीचीच असायला हवी, असे एक आपले स्वप्न असते. परंतु प्रत्यक्ष जीवनात टक्के टोणपे खात असताना आपला स्वप्नभंग होतो, पदरी निराशा येते, आपण दुःखी होतो व कुढत कुढत जीवन जगू लागतो. त्यामुळे उत्कृष्टता, प्राविण्य, उच्च श्रेणी, परिपूर्णता या गोष्टी बकवास वाटू लागतात व आपणही चार चौघासारखे सुमार, सामान्य प्रतीचे राहिल्यास बिघडले कुठे म्हणत, आहे त्यात समाधान मानून आयुष्याची पानं उलगडू लागतो. कदाचित या मागे आपण उच्च श्रेणीचा बळी ठरू नये ही एक सुप्त इच्छा असेल. अशा प्रकारे समाधान मानून घ्यावे की नको हा आपल्यासमोरचा यक्ष प्रश्न आहे.

एक मात्र खरे की उत्कृष्टतेची आस नसल्यास आपण आळशी होण्याची भीती असते. कुठलीही गोष्ट करत असताना चूक केल्यास काही बिघडत नाही ही वृत्ती बळावते. कमीत कमी श्रम करण्याची, निष्काळजीपणाची सवय जडते. परंतु ‘हे’ किंवा ‘ते’ असे काही असू शकते का? कदाचित उत्कृष्टता की सुमार हा आपल्या विचारातलाच द्वैत असावा की काय असे वाटू लागते. उत्कृष्टता नसल्यास आपले आयुष्य विफल अशी एक मानसिकता विकसित होऊ लागते.

विवेकी जीवन पद्धतीचे (रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी – REBT) आल्बर्ट एलिस नेहमीच ताठरपणा व परिपूर्णता (perfection) यांच्या मागे लागून कशा प्रकारे आपले हाल होतात याबद्दल सावधानतेचा इशारा देत असतात. आपले जीवन सार्थकी होण्यासाठी आपण शंभर टक्के यशस्वी व्हायलाच हवे हा समज समर्थनीय नाही वा विवेकशीलही नाही. परिपूर्णता ही अशक्यप्राय गोष्ट आहे, हे जितके लवकर समजेल तितके बरे होईल. कारण परिपूर्णतेसाठी कितीही प्रयत्न केले तरी ते अपुरेच पडतील. मुळात अमुक अमुक केल्यास परिपूर्णता गाठेन ही अपेक्षाच अत्यंत चुकीचे ठरेल. अंतिम परिणामाचा ध्यास आपली विचारशक्ती कुंठित करू शकते.

म्हणूनच ग्रीक तत्वज्ञ, तुम्हाला धनुर्विद्येत पारंगत व्हायचे असल्यास जास्तीत जास्त कौशल्य वापरून बाण सोडा, परंतु सुटलेला बाण लक्ष्य भेदू शकेल याची खात्री बाळगू नका, हा सल्ला देत असत. बाण सोडणे आपल्या हातात आहे, परंतु एकदा धनुष्यातून बाण सुटला की त्यावर तुमचे नियंत्रण असणार नाही. आपण नेहमीच आपल्या बळाचे नियंत्रण व त्याच्या परिणामांचेही नियंत्रण करण्याची अपेक्षा धरत असतो. आपल्याला जे काही करायचे आहे ते उत्कृष्ट करून दाखविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवे, परंतु ते करत असताना थोडीशी तरी चूक राहू शकेल याचेही भान ठेवावे. धनुर्विद्येच्या बाबतीतच नव्हे तर इतर अनेक बाबतीतसुद्धा फिनिशिंग लाइनपेक्षा त्यासाठीचे उचललेले पहिले पाऊल केव्हाही महत्वाचे ठरते.

काही गोष्टींच्या बाबतीत कितीही डोकेफोड केली तरी मनासारखे घडत नाही म्हणून आपण वैतागत असतो. अशा वेळी तात्विक चिंतनाला शरण जाणे योग्य ठरू शकेल. काही तत्वज्ञ बरेच काही सांगून जातात. उदाहरणार्थ, कांट या तत्वज्ञाने ought implies can म्हणून सांगितलेले आहे. (अजून एका तत्वज्ञाने ought implies cannot म्हणूनही सांगितले आहे!) तुम्हाला शक्य होत असेल तरच त्या कामाला हात घालावे, नाहीतर सोडून द्यावे. उंटाचा मुका घेण्याच्या भानगडीत पडू नये. एखाद्या भिकाऱ्याला लाख रुपये देणगी देशील का म्हणून विचारण्यात अर्थ नाही. याचा अर्थ अत्युत्कृष्टतेचा ध्यास धरायचाच नाही असे नाही. कारण जेव्हा आपण आपल्या कृतीबद्दल समाधानी असतो तेव्हा आपण संपलेलो असतो. असमाधानातूनच काही तरी सुचू शकते, प्रश्न विचारता येतात, व समस्यांना उत्तरं शोधण्यासाठी धडपडायला संधी मिळते. परंतु काही गोष्टींच्या बाबतीत अंतिम असे काही नसते हेही लक्षात ठेवायला हवे. उदाहरणार्थ, शेजाऱ्यावर प्रेम करा याबाबतीत आपण कधीच समाधानी होऊ शकत नाही. आई-वडिलांच्या बाबतीतील कर्तव्यसुद्धा असेच अपूर्ण असते.

आपण करत असलेल्या गोष्टीत उत्कृष्टता असावी याचा प्रयत्न करणे म्हणजे अशक्यप्राय गोष्टींना हात घालणे असा होत नाही. अशक्यप्राय गोष्टीसाठी टप्प्या टप्प्याने प्रयत्न करून ते मिळवता येणे शक्य असल्यास प्रयत्न करायला हरकत नसावी. तुम्हाला एखाद्या ठराविक ठिकाणी ठराविक वेळी हजर राहायचे असल्यास अर्ध्या वाटेपर्यंत पोचलो यात समाधान मानून घेण्याला काही अर्थ नाही. तुम्ही जर सर्वोत्कृष्टतेचे उद्दिष्ट ठेवून उत्कृष्टतेपर्यंत मजल मारली तरी प्रयत्न सार्थकी लागले असे म्हणता येईल. एक मात्र खरे की सर्वोत्कृष्टतेच्या मागे लागलेल्यांना दुसरा क्रमांक मंजूर नसतो. मुळात ते एक आव्हान म्हणून स्वीकारत असतात. आणि त्यांना स्वतःच्या क्षमतेबद्दल खात्री असते. अशक्यप्राय गोष्टीसांठी प्रयत्न करत असताना मध्येच केव्हातरी हे अशक्य आहे याचा विसर पडल्यास आपण गोत्यात येऊ शकतो. मारलेल्या उडीच्या अर्ध्या वाटेवरून मागे परत येता येत नाही. त्यानंतर मात्र आपण स्वतःला माफ करू शकत नाही. नंतरचे जीवन नीरस वाटू लागते.
उत्कृष्टतेच्या मागे लागणाऱ्यांची उत्कृष्टतेसाठीचे प्रयत्न कमी पडत आहेत म्हणून उद्दिष्ट सफल होत नाही असे नसून त्यांचा आपल्या कतृत्वावर अनाठायी विश्वास असतो म्हणून त्यांना हार मानावी लागते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नक्की काय म्हणायचंय हे कळलं नाही. :-o

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिकूल तेच घडेल असे समजून अनुकुलतेसाठी प्रयत्न करणे व प्रतिकूल ही घडू शकते याचे भान ठेवून अनुकुलतेसाठी प्रयत्न करणे यातला फरक जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर असे लक्षात येईल की हा च जो आहे तो घोटाळा करतो. कुठले तरी एक आदर्श मानता येत नाही. सदा सर्वदा आदर्श असे खर तर काही नसते. आज आदर्श वाटणारी गोष्ट उद्या सामान्य वाटू शकते.उत्कृष्टतेच्या मागे लागणाऱ्यांची उत्कृष्टतेसाठीचे प्रयत्न कमी पडत आहेत म्हणून उद्दिष्ट सफल होत नाही असे नसून त्यांचा आपल्या कतृत्वावर अनाठायी विश्वास असतो म्हणून त्यांना हार मानावी लागते. या तुमच्या लेखातील शेवटात लेखाचे सार आहे असे मला वाटते.जेव्हा आपण आपल्याच प्रतिमेत बंदिस्त असतो तेव्हा होणारी घुसमट किंवा कोंडी ही सहन ही होत नाही व सांगताही येत नाही अशी असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

लेख वाचून शाळेत शिकलेल्या एका कवितेच्या ह्या ओळी कित्येक दशकांनंतर आपोआप आठवल्या:

"I am content with what I have,
Little be it or much;
And, Lord, contentment still I crave
Because thou savest such."

आत्ताच शोध घेतल्यावर समजले की जॉन बन्यन (१६२८-८८) ह्या कवीच्या The Shepherd Boy’s Song in the Valley of Humiliation ह्या कवितेचा हा एक चरण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किती आंग्लाळलेलं लिहिता हो.... जरा धडकं लिहा की .. वाचतील लोक !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता आपलं वय झालं केलं इतकं खूप झालं म्हटलं की सारंच संपलं.
आपल्या आजुबाजूस सदैव नवनाविन्यात रमणारे लोक हवेत.
यंत्र,शोधाच्या बाबतीत सदैव असमाधानी राहायला हवे त्याच्या निर्मात्याने.
परवडत नसेल तर ध्येय थोडे अलिकडे सरकवा पण पायाखाली कधीच नको.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चं काय मग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

++परंतु काही गोष्टींच्या बाबतीत अंतिम असे काही नसते हेही लक्षात ठेवायला हवे. उदाहरणार्थ, शेजाऱ्यावर प्रेम करा याबाबतीत आपण कधीच समाधानी होऊ शकत नाही. ++

म्हणजे कसं? उधार उसनवार मागणारे शेजारी? त्यांना आपल्याच घरी राहायला बोलावले तर ते शेजारी म्हणता येणार नाहीत.

आइवडिलांना सुखी ठेवायचे याबाबत तो विचार फारच उत्तम आहे पण व्यवहारात तसे करायला गेल्यावर त्याची बायको म्हणेल तुम्हीच मक्ता घेतलाय का?

यंत्राच्या निर्मात्यानेच ते यंत्र पर्फेक्ट केलं पाहिजे असं नाही, यामध्ये हे दोष आहेत ते काढायचे आहेत असं नोंदवणेही पुरेसं आहे.

वाफेच्या एंजिनाने क्रांती झाली पण एक गणिती म्हटला बैल घोड्यांची सुटका झाली हे ठीक आहे हो याची कार्यक्षमता १७ टक्केच आहे. कोळसा एवढा आणायचा कुठून?
इलेक्ट्रिक मोटर ठीक आहे, ९५ टक्के का० आहे, वीज स्वस्त हवी, वॉटरप्रुफ हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0