Skip to main content

अवघे चाळीस वयमान

6 minutes

तसे तर वेध अगदी पस्तीशीपासूनच लागलेले होते. या वयाबद्दल अनेक पुस्तकातून वाचून होते इतकेच काय ज्योतिष्यांनाही या वयाने दखल घेण्यास भाग पाडलेले होते तेव्हा चाळीशी काहीतरी "Fun age" आहे आणि आपल्या चाळीशीत काहीतरी सनसनाटी घडणार आहे अशा हृदय धडधडवणर्‍या काहीशा अपेक्षा निर्माण झालेल्या होत्या. आमचं धोक्याचं सोळावं वरीस केव्हा आलं आणि केव्हा चालतं झालं ते कळलेच नव्हते तेव्हा निदान चाळीशीने काहीतरी रंग दाखवावे अशी अपेक्षा होती. पुस्तकांतून खूप ऐकले होते की व्यक्ती बंडखोर होते, सरळ, सामोपचाराने चाललेल्या आयुष्यात उलथापालथ घडविण्याच्या मागे लागते. कोणाला अवदसा सुचते तर कोणे स्वतःला रि-इन्व्हेन्ट करते. जसे कोणी १००% वेळ गृहीणीपद सांभाळणारी एखादी स्त्री एकदम वेगळीच वागू लागते. लहानपणीच्या स्वप्नाची पूर्ती आतातरी व्हावी म्हणऊन एकदम पी एच डी होऊ घालते, तर कोणी स्वतःला मनस्वी आवडणार्‍या छंदाकडे वळते आणि काहीतरी चमकदार करुन जाते. अनेक पुस्तकांमध्ये या वयाचे अगदी उदात्तीकरण केलेले नसले तरीही हे वय हायलाईट केलेले आढळलेले होते. ज्योतिषांनी चाळीशीमध्ये होणार्‍या या अचानक बदलांचे खापर युरेनस या अतोनात सणकी, विक्षिप्त ग्रहावर फोडले आहे. जातकाच्या नेटल म्हणजे कुंडलीतील युरेनस जेव्हा भ्रमण करणार्‍या युरेनसच्या १८० अंशात जातो तेव्हा जातकाच्या आयुष्यात काहीतरी मोठा बदल घडून येतो आणि हे प्रत्येकाच्या चाळीशी एक्केचाळीशीत होते म्हणे. जंग यांच्या "शॅडो परसनॅलिटीच्या" विश्लेषणाबद्दलही ऐकून होतेच. ज्या काही उर्मी, इच्छा , छंद, आवडीनिवडी आपण दाबून टाकतो त्यांनी मिळून आपला एक "शॅर्डो पर्सोना" बनतो, जे काही आपण नाकारतो ते ते या शॅडो व्यक्तीमत्वाचे बिल्डिंग ब्लॉक्स असतात. हा पर्सोना मध्यम वयात प्रकाशात येतो कारण सबकॉन्शस लेव्हलवरती माणसास माहीत असते की "अभी नही तो कभी नही", हेच वय आहे इच्छापूर्तीचे, स्वप्ने साकार करण्याचे, आत्ता माघार घेतलीस तर या इच्छांवरती पाणी सोडावे लागणार. आणि मग अशी दडपली गेलेली स्वप्ने डोके वर काढतात जे की मॅनेज करणे म्हणजे कसोटी असते, व्यक्तीची तसेच तिच्या आसपासच्यांचीही कारण त्यांनाही झळ लागतेच. असो. तर अति वाचनामुळे या वयाबद्दलच्या माझ्या अपेक्षा उंचावलेल्या होत्या.
.
चाळीशी लागली, त्या काळात मी कुटुंबापासून दूर होते तेव्हा हा माईलस्टोन (मैलाचा दगड) मला मैत्रिणीबरोबर साजरा करावा लागला, नव्हे करणे अतिशय आवडले. बरोब्बर ४० व्या वाढदिवशी, शनिवारी माझ्या रुममेटबरोबर मी "टर्निंग फॉर्टी" नावाच्या सिनेमाचा शो पाहीला. ही तिचीच आयडीया होती की बरोबर त्या दिवशी आम्ही हा सिनेमा पहायचा. आता या सिनेमाबद्दल, जोडप्यातील स्त्रीचे चाळीस वय पूर्ण होते त्या वाढदिवसाच्या तयारीवरती बेतलेला हा सिनेमा आहे. आणि मग ही तयारी करत असतानाच, तिची टीनएजर मुले, नवरा, मैत्रिणी वगैरे पात्र येत जातात आणि चाळीशीवरती काही एक भाष्य होत जाते. या जोडप्याची मुले टीनएजर्स आहेत त्यांचे विश्व हळूहळू वेगळे होत चालले आहे. चाळीशी लागली की मधुमेह, साखर, हृदयाचे आरोग्य, रक्तदाब वगैरे बाबींबाबत लोक जागरुक होऊ लागतात.हे जोडपे देखील अपवाद नाही. दोघे एकमेकांच्या आहारावरती, धूम्रपानावरती कडक नजर ठेऊन आहेत की कोण डाएटमध्ये चुकारपणा करतोय. तस्मात दोघेजण हे लहान आनंद एकमेकांपासून लववुन छपवुनच घेतायत. जसे एकदा नवरा घराबाहेरच्या कचर्‍याच्या डंपस्टरजवळ ऊभा राहून सिगरेट ओढत असतो आणि नेमकी बायको अर्धा खाऊन अर्धा राहीलेला कपकेक फेकण्याकरता त्या डंपस्टरपाशी येते आणि दोघे एकमेकांची चोरी पकडतात. करीयरचे म्हणायचे तर करीयरचे शिखर पस्तिशीच्या सुमारास पार केलेले आहे, आता आपापल्या क्षेत्रात नवीन बदल होऊ लागले आहेत आणि त्या नव्या बदलांशी जुळवुन घेण्याची कसरत दोघांना करावी लागत आहे. पैशाची तर निकड आहे कारण घेतलेल्या मोठ्या घराच्या मॉर्टगेजचे हप्ते संपण्यास अजुन बराच अवधी आहे. निवृत्ती निधीमध्ये बर्‍यापैकी माया जमा झालेली आहे त्यामुळे भविष्याची तरतूद झालेली आहे. फक्त करीअरमधील बदलांना तोंड कसे द्यायचे हा प्रश्न आ वासून ऊभा आहे. दोघांना एकमेकांच्या आवडीनिवडी माहीत झालेल्या आहेत, एकमेकांची इतकी सवय लागलेली आहे की जणू व्यसनच लागलेले आहे. यामुळे सेक्स लाइफ अत्यंत स्पॉन्टेनिअस आणि आरामदायी म्हणजे कमी तडजोडीचे असे आहे. अर्थात चाळीशी मधील कामजीवन, करीअर, आर्थिक घडी, आरोग्य, संतती, सामाजिक जीवन (सोशल लाइफ), जाबाबदार्‍या अशा सर्व अंगांचा या सिनेमात व्यवस्थित आढावा घेतलेला आहे. सिनेमात नयिका वय सतत चोरताना दाखवली आहे, पण शेवटी तिच्या वडीलांच्या तोंडून ते फुटते अशी मजा दाखवली आहे. खरं तर हा सिनेमा परत पहायचा आहे.
.
अधिक आता आठवत नाही. हा सिनेमा पाहून एकदम प्रकर्षाने जाणीव झाली की खरच हे थोड्याफार प्रमाणात मला (आम्हाला) ही लागू आहे. चाळीशी म्हणाल तर डोंगर माथा असतो. एका बाजूला जोमाने, आपल्याच धुंदीत ही चढण चढणारी मुलं तर दुसर्‍या बाजूला एकमेकांच्या संगतीत, डिमेन्शिआ म्हणा वार्धक्यास तोंड देत उतरत जाणारी आधीची पीढी आणि हे दोन्ही समजून घेऊ शकणारे आपण मध्ये डोंगरमाथ्यावरती ऊभे. अजुन ना तारुण्याचा जोम पूर्ण ओसरलेला आहे ना अजुन उतारवयातील चिंता सतवत आहेत. तीशीचे fun age, उत्साही वय तर ओसरलेले आहे पण मेनापॉजसारखे बदल आणि दुखणी अजुन पुढे आहेत. एखादा फोरम त्यावरी वावर आणि मित्रमैत्रिणींचे नेटवर्क, आवडीनिवडी छान सेट झालेल्या आहेत. करीयरमध्ये आपण रुळलो तर आहोत पण आपल्या वाढणार्‍या वयामुळे, येणार्‍या तरुण पीढीमुळे किंचीत असुरक्षिततेची भावना मनात रुजु पहाते आहे. जोडीदारा बरोबर तरुणपणी होणारा संघर्ष, तडजोडी या खूप कमी होऊन, मैत्रीकडे वाटचाल होते आहे. मैत्री न करुन सांगतो कुणाला ; ). आपल्याला परोपरीने ज्याने झेलले आहे, सांभाळले आहे, ज्याला आपल्या प्रत्येक सवई, स्वभावातले बारकावे माहीत आहे अशी दुसरी व्यक्ती सापडूच शकत नाही. खरं तर लोणचं मुरल्यावरती त्याची खरी चव कळते, आयुष्याचेही तसेच आहे, चाळीशीपर्यंत व्यक्तीचे छंद, प्रेफरन्सेस, आवडी अगदी सेट झालेल्या असतात.
.
या विषयावरील Rupert Holmes यांचे गाणे फार फार छान आहे - Pinacolada. मध्यमवयीन नवरा पेपरात पत्नीच्या नकळत्,निनावी जाहीरात देतो "मला हे आवडते, अमके आवडते, तमके आवडत नाही. मला पावसात भिजायला आवडते, शँपेन आवडते, योगा आवडत नाही वगैरे वगैरे. या अगदी याच आवडी निवडी असलेली कोणी स्त्री असेल तर तिने मला भेटावे, मजेकरता, फॉर फन. आणि काय आश्चर्य तश्शी अगदी तश्शी टेलरमेड स्त्री त्याला भेटायला म्हणुन येते आणि गंमत म्हणजे ती त्याची पत्नी निघते." पतीपत्नी दोघेही चाळीशीपर्यंत एकमेकांना डिफाइन करत करत इव्हॉल्व्ह होत असतात. आणि शेवटी एक स्टेज अशी येते की एकमेकांना इतक्या उत्तम तर्‍हेने ओळखू शकणारे, तळहातावरच्या रेषांप्रमाणे वाचू शकणारे, एकमेकांचे इतके जिगरी दोस्त बनू शकणारे असे ते दोघेच जगात एकमेकांकरता एकमेव व्यक्ती रहातात. मजेशीरच वाटते की नाही?
.

.
जरुर ऐका. एकदम धमाल गाणे आहे.
.
फेसबुकवरील शाळकरी मैत्रिणी देखील चाळीशीच्या पुरंध्री होऊ लागलया आणि जे जाणवलं ते हे की किती आत्मविश्वास आणि भारदस्तपणा, एक पूर्वी कधीही न जाणवलेले प्रकारचे लोभस सौंदर्य ल्यालेल्या आहेत. पूर्वीचा अनसर्टनटी मधुन येणारा निरागसपणा कुठच्या कुठे पळून जाऊन, "येस! ब्रिंग इट ऑन" आत्मविश्वास संपादन केलेला आहे. अनेकजणी करीअरमध्ये उच्च पदाला पोचलेल्या आहेत जसे गायनॅक अथवा मॅनेजोरिअल पोझिशन तर अनेक जणी स्वतःच्या ब्लॉगवरती स्वतःच्या क्रिएटीव्हिटीला वाव देत आहेत. कदाचित समानशीलव्यसनेषु अशा आम्ही एकसारख्या उत्तम शिक्षण घेऊन, नाकासमोर चालून, सुस्थळी पडलेल्या असल्याने असेल , काही का असेना, पण सगळ्याचजणी साधारण सारख्याच आयुष्य एन्जॉय करत आहोत हे लक्षात आले. एकेकीचे नवरेही टक्कल पडण्यास सुरुवार झालेले, थोडे पोट सुटू लागलेले, लौकिकार्थाने यशस्वी असणारे. फेसबुकचे तोटे काहीही का असेना, फेसबुकवरचे हे फोटो एक प्रकारचं सोशल भान देतात, आपली जागा दाखवतात असे मला वाटते. पुण्यात तिकडे शाळकरी मैत्रिणींचा मेळावा भरत असे, दर फोटोत एक तरी मैत्रिण अशी सापडेच जिला फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवलेली नसे. सगळ्या एकंदर सुटवंग होत होत्या, आणि हा सुटवंगपणा, संसारात अडकलेला पाय निघणं ही त्यांना मानवत होते. माझ्या पूर्वीच्या मैत्रिणी आता यशस्वी व्यक्ती झालेल्या पहाणे, त्यांचा आत्मविश्वास अनुभवणे हा निव्वळ आनंद होता, आहे. आयुष्यभर "योग्य आणि विवेकी" निर्णय घेण्याच्या तपश्चर्येनंतरच इतके सुंदर दिसता यावे, जगता यावे.
.
ज्यांनी कोणी चाळीशी पार केलेली आहे त्यांना हा पडाव माहीतच आहे पण ज्यांना अजुन बरीच बरीच वेळ आहे आणि आम्हाला जे "काका-मामा-मामी-काकी" म्हणतात त्यांना खास सांगावेसे वाटते - तुम्ही अजुन पाहीलच काय. अजुन तर तुम्ही अंड्यातच आहात
हाच तर पडाव अतिशय रोचक आहे. तुम्हीही पोचाल आणि मग त्यातील खुमारी तुम्हाला कळेल पण तोपर्यंत -

हाय कंबख्त तूने पी ही नही !!

हेच खरे.
__________________________________ समाप्त __________________________________________________________________

Node read time
6 minutes

.शुचि Mon, 26/09/2016 - 03:44

बाकी काही नाही तरी या लेखावरुन चाळीशी रोचक वाटणार्‍या आमच्या टिपिकल म म व आयुष्याची कल्पना यावी ;)

चिमणराव Mon, 26/09/2016 - 05:38

ताई,लेख छान झाला आहे.लहानपणापासून शरीर आणि मन एकाच वेगाने धावत असताना चाळीशीत शरीर थोडं मागं पडतंय असं वाटू वागण्याचं वय असं वाचून ऐकून होतो ते खरंच आहे पण प्रत्यक्ष चाळीशीत आल्यावर लक्षात येतं मनही सुस्तावलेलं आहे आणि फाजीलपणे नसलेल्या उद्या कसं होणार याचा विचार करू लागलंय. धाडकन निर्णय घेतले जात नाहियेत.ज्या गोष्टी करण्यात हुरहुर होती ते करताना निर्ढावलेलो आहोत. जोमाचा कारक मंगळ या ग्रहाची बारा राशिंतून दहा आवर्तने पूर्ण झालेली असतात आणि तो फिरायचं म्हणून फिरत असतो.वर्तमानपत्र वाचताना थोडं लांब धरायला लागतंय. आता चाळीशी लावावी लागणार.(गुजराथीत बेताळा -बेचाळीशी)-वा अजून दोन वर्ष बाकी आहेत तर चाळीशी उलटायला!

.शुचि Mon, 26/09/2016 - 06:47

In reply to by चिमणराव

धन्यवाद अचरटजी.

फाजीलपणे नसलेल्या उद्या कसं होणार याचा विचार करू लागलंय. धाडकन निर्णय घेतले जात नाहियेत.ज्या गोष्टी करण्यात हुरहुर होती ते करताना निर्ढावलेलो आहोत.

हे एकदम बरोबर बोललात आपण.

बिटकॉइनजी बाळा Mon, 26/09/2016 - 10:40

>>आमचं धोक्याचं सोळावं वरीस केव्हा आलं आणि केव्हा चालतं झालं ते कळलेच नव्हते तेव्हा निदान चाळीशीने काहीतरी रंग दाखवावे अशी अपेक्षा होती.
तुमच्या वयात पंचविशीचा टप्पा नाही आला का??

.शुचि Mon, 26/09/2016 - 18:21

In reply to by बिटकॉइनजी बाळा

आली कधी गेली कधी कळले नाही. करीअर घडविण्याच्या मागे व्यस्त होते आणि एकंदर तडजोडींचा तीव्र संघर्ष होता.

तिरशिंगराव Mon, 26/09/2016 - 11:13

चिंतन आवडले. 'सुटवंग' हा शब्द नवीन कळला. आम्ही मात्र, चाळीशीला एवढा विचार केला नव्हता. आयुष्याकडे पहिल्यांदा गंभीरपणे पाहिलं , ते मुलाने रुढ वाट सोडली तेंव्हा ! त्यातून बाहेर आलो खरा ! पण, तेंव्हापासून एक झाले. 'एखादी गोष्ट केलीच पाहिजे', ही उर्मी हरवून बसलो. एक फायदा झाला. तेंव्हापासून सर्व काही मर्यादित झालं. आनंद, दु:ख, उत्साह ...... एकूण सगळ्याच भावना! खर्‍या अर्थाने, 'मोजून मापून कोकणस्थ' ! ! !

रेड बुल Mon, 26/09/2016 - 11:25

आता हळु हळु बॅटरी उतरायला लागणार व्यवस्थीत चार्ज होणार नाही... आता योगा करायलाच हवा

बाकी ती उर्वशी उपवर होउन तिचा विवाह ४० वय असताना जाह्ला होता म्हणतात... अर्थात तो काळ वेगळा त्या स्त्रियाही वेगळ्याच म्हणा

रेड बुल Mon, 26/09/2016 - 19:23

In reply to by .शुचि

प्रौढ़ कुमारिका हां विषयही मनी न्हवता... तरीही त्यांची कृती कमी कौतुकास्पद ठरत नाही कारण जसे वय वाढते तसे आपली पर्सनल स्पेस रिजिड होत जाते अन मग मी च्या जागी आपण हे समर्पण अवघड बनते तरीही केवळ तडजोड न्हवे तर इछ्चा म्हणून त्याना नवा संसार माँडावासा वाटणे म्हणजे खरेच त्यांना माझ्या कडून एक कडक फ्री लाइफ सेल्यूट लागू होतो _/\_

अंतराआनंद Mon, 26/09/2016 - 17:28

सुंदर लिहीलय. ऑफिसमध्ये पन्नाशी आणि घरीदारी पंच्याहत्तरी हीच साजरी करण्याची वयं म्हणून माहिती असल्यानं असेल चाळीशी अशी काही साजरी केली नाही. अर्थात ही लक्षणं एकदमच सही मांडली आहेस.
आयुष्य केवळ बाहेरूनच स्थिरावतं असं नाही तर मनालाही स्थिरपणा येतो. अ‍ॅक्सेप्टन्स वाढतो. आतापर्यंत "जग पुढे धावतय आणि आपण मागे पडलोय" ही भावना जाऊन "जगाला जाऊदे जायचय तिथे आपण आपले बरे आहोत निवांत" असं वाटायला लागतं. अचानक घरात आपण महत्वाचे होऊन जातो. कारण मागच्या पिढीने कारभार, दुराग्रह वैगेरे सोडलेला असतो आणि पुढची पिढी कितीही गमजा मारल्या तरी आपल्यावरच थोडीबहुत अवलंबून असते. "आपल्याबरोबर एवढी वर्षे रहात असलेल्या या प्राण्यालाही थोडीबहुत अक्कल, आपली काळजी वैगेरे आहे" अशी आपली जोडीदाराबद्द्ल आणि त्याची आपल्याबद्दल खात्री होऊ लागलेली असते. त्यामुळे घरात शहाणपणा काय जो आहे तो आपल्याकडेच हा आजवरचा गैरसमज खात्रीत रुपांतरीत व्हायला लागतो.

आपल्याला परोपरीने ज्याने झेलले आहे, सांभाळले आहे, ज्याला आपल्या प्रत्येक सवई, स्वभावातले बारकावे माहीत आहे अशी दुसरी व्यक्ती सापडूच शकत नाही. खरं तर लोणचं मुरल्यावरती त्याची खरी चव कळते, आयुष्याचेही तसेच आहे, चाळीशीपर्यंत व्यक्तीचे छंद, प्रेफरन्सेस, आवडी अगदी सेट झालेल्या असतात.

मस्तच.
चाळीशीपर्यंत जोडीदाराचा स्वभाव, सवयी बदलण्याचे प्रयत्न सोडून नुसतंच स्वीकारलेलं नसतं तर त्याच्या सवयी, समज या सगळ्यांचं आपल्यावरही कलम झालेलें असतं.

हाच तर पडाव अतिशय रोचक आहे. तुम्हीही पोचाल आणि मग त्यातील खुमारी तुम्हाला कळेल

पण हे तू ज्यांना म्हणतेयस त्यांना तसं वाटेल का माहित नाही कारण "आमच्या वेळी असे,आमच्या वेळी तसे" ही चाळीशीतली भाषा आताच बोलत आहेत.

.शुचि Mon, 26/09/2016 - 18:32

In reply to by अंतराआनंद

चाळीशीपर्यंत जोडीदाराचा स्वभाव, सवयी बदलण्याचे प्रयत्न सोडून नुसतंच स्वीकारलेलं नसतं तर त्याच्या सवयी, समज या सगळ्यांचं आपल्यावरही कलम झालेलें असतं.

जियो!! हेच्च हेच्च!
.

"आपल्याबरोबर एवढी वर्षे रहात असलेल्या या प्राण्यालाही थोडीबहुत अक्कल, आपली काळजी वैगेरे आहे" अशी आपली जोडीदाराबद्द्ल आणि त्याची आपल्याबद्दल खात्री होऊ लागलेली असते. त्यामुळे घरात शहाणपणा काय जो आहे तो आपल्याकडेच हा आजवरचा गैरसमज खात्रीत रुपांतरीत व्हायला लागतो.

होय अंतरा अगदी हेच्च!! :)

अतिशहाणा Mon, 26/09/2016 - 18:43

मस्त लेख. आवडला. सुटवंग म्हणजे काय?

मारवा Fri, 30/09/2016 - 15:05

In reply to by .शुचि

नविन शब्द वापरुन पाहतो.
एक सुरेश भटांच्या ओळी आहेत.

रंगात रंगुनी सार्‍या
रंग माझा वेगळा
गुंत्यात गुंतुनी सार्‍या
पाय माझा मोकळा ( फ्रँकली स्पीकींग सर्व लफडी कुलंगडी करुन कुशलतेने त्यातुन बाहेर मी कसा पडतो ही आत्मप्रौढी यात जाणवते आता लावायचा तर लावा आध्यात्मिक बिध्यात्मिक अर्थ आमची ना नाही )

तर सुटवंग वापरुन अशी होइल

गुंत्यात मांज्याच्या गुंतुनी माझा पतंग
तरीही भरारीत दंग माझा पतंग
सुटवंग माझा पतंग
सुटवंग !