मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६९
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----
ब्राऊनी पॉइंट्स या इंग्रजी शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत का ? असल्यास काय ?
त्याचा वापर कसा कसा होतो ?
याचे मुळ काय आहे
हो.
रोवळी म्हणजे बांबूची टोपली. पण उभट करंड्यासारखी. उथळ नव्हे. तांदूळ धुण्यासाठी पूर्वी रोवळी वापरत. आता कडधान्यांना मोड येण्यासाठी वापरतात. शिवाय तळाचे चार कोपरे सुबक विणलेले असतील तर जेवणाच्या मेजावर वस्तू ठेवायला छान दिसते. पाव, फळे वगैरे. आता अर्थात धातूची असते. टिकाऊ.
खासियत
टेपर्ड कडा ही रोवळीची खासियत नव्हे तर तळ सच्छिद्र असणे ही आहे. टोपली ही रोवळीहून भिन्न आहे. टोपली उथळ पसरट (मोठी परडी किंवा परळासारखी) असते. रोवळी उभट असते. रोवळ्या वेगवेगळ्या आकारात असू शकतात, गोल, चौकोनी बुडाच्या वगैरे. पूजेचे अक्षत तांदूळ धुवून ठेवण्यासाठी चांदीच्या रोवळ्या मिळतात त्या छोट्याश्या चौकोनी उभट करंडीसारख्या असतात. मूळ बांबूच्या रोवळ्यातल्या बांबूच्या पट्ट्या अगदी कमी रुंदीच्या,(हीरकाड्यांपेक्षा थोड्या अधिक रुंदीच्या) सारख्या तासून घेऊन घट्ट विणत ज्यामुळे सछिद्रता तर राही शिवाय बळकटपणा येई. आतला जिन्नस (उदा. तांदूळ) धुताना वाहून जात नसे. पूर्वी अनेक धान्ये धुवून वाळवून दळून वापरत म्हणून पायलीभर धान्याचे वजन घेऊ शकणार्या मोठ्या रोवळ्यांची आवश्यकता भासे. अलीकडे रोवळ्या बेळाच्या चटईसारख्या पट्ट्यांच्या आणि छोट्या असतात.
परफेक्ट!
एकदम परफेक्ट वर्णन केलंय राही.
बांबूच्या अश्या प्रकारच्या वस्तू बनवणं ही आमच्या आजीची खासीयत होती.
त्यातही रोवळी बनवणं महाकठिण असतं.
टोपली किंवा हारा बनवणं सगळ्यात सोपं.
हारा बनवायला मलाही येतो.
रोवळीच पण बांबूच्या जरा रूंद पट्ट्यांनी आणि आणि मोठाली बनवली की कणगी.
आमच्या गावात म्हणजे रत्नागिरीत आमच्या कम्तुनिटीच्या बायकांना बांबूकाम (आवता वळणं) आलंच पाहिजे असा अलिखित नियमच होता.
बुराडी कामापेक्षा हे काम नाजूक आणि नीटस म्हणून घरात वापरायच्या वस्तू आमच्या लोकांकडून घ्यायचे (घेतात) लोक.
आजीच्या हातची सूपं आणि रोवळ्या अजून गावात कित्येकांच्या घरी आहेत आणि आमच्या घरी तर आहेतच.
आम्ही गंमत म्हणून मेच्या सुट्टीत आजीला मदत करायचो.
आजीपण हौस म्हणून सगळ्या नविनच वाडीत लग्न होऊन आलेल्या मुलींसाठी विनामूल्य क्लासेस घ्यायची.
आमची आई नोकरी करत असल्याने ती हे कधी शिकली नाही.
माझी लहान बहिण सूपं सुद्धा करायला शिकली.
मात्र आईने वाडीतल्या बायकांचा बचत गट बनवून त्यांना एकत्र घाऊकमध्ये बांबू आणणे (यात दोन प्रकार असतात , एक कापसाळ नावाची जात मला आठवत्येय, दुसरी कडक हीरांची जात आठवत नाहीये.), प्रॉडक्टस मार्केटमध्ये न्यायला छोटा टँपो बोलावणे, आलेल्या पैशातून थोडी बचत करणे असं चालायचं.
'बचतगट' हा शब्दही माहित नव्हता तेव्हापासून आई या बायकांचा बचत गट चालवायची आणि त्यांना पोस्टाची पासबुके देऊन सेविंग शिकवायची.
बांबूचं काम (आम्ही बांबू नाही म्हणत-चिवे म्हणतो) चालू असताना मस्तं गोडसा वास असायचा अंगणात.
चिवे तासताना निघणारा चिवार भांडी घासायला वापरतात स्क्रबिंग स्पाँज सारखा.
आता गौरी आल्यात तर छोट्या छोट्या हवश्याच्या सूपल्या (आम्ही शिपल्या म्हणतो)करायचं कामम्हणतो)चालू असणार जोरात.
तुमच्या प्रतिसादामूळे आज कित्ती जुने शब्द पुन्हा लिहिले आणि आठवले.
कठिण काम
माहितीपूर्ण प्रतिसाद. सातींचा प्रतिसाद आला की कोणत्याही धाग्याला चार चाँद लागतात.
रोवळी आणि सुपांचे कोपरे व्यवस्थित जुळवणं कठिण काम असतं. सुपांचे दोन्ही बाजूंचे कोन आणि उतार नीट बेतायला लागतात नाही तर दोन्ही बाजू समसमान होत नाहीत. रोवळीला तर चार कोपर्यांचा व्यवस्थित (बहुतेक वेळी चौरस) आकार डोळ्यासमोर धरावा लागतो. आणि तो तसाच वर चढवत करंडा बनवावा लागतो. कधी कधी तळ चौरस पण वरचे काठ गोल असे सुबक बटवेही बनवत असत. सुमारे तीन पिढ्यांपूर्वींपर्यंत अशी पद्धत होती की पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आलेली लेक जेव्हा बाळाला घेऊन सासरी जायला निघे तेव्हा बाळबाळंतिणीला लागणार्या खूपशा औषधी वेली, पाळं, मुळं, कांडं, सालं, मुरुडशेंगेसारख्या शेंगा, बेहडा, हरडा, काटेमायफळ, बिब्बे यासारखी फळं अशा अनेक वनस्पती ताज्या तोडून धुवून सुकवून एका छोट्या करंडीतून तिच्याबरोबर देत. या करंडीला सांगशी किंवा सांकशी म्हणत. ही सांगशीसुद्धा ताज्या तोडलेल्या चिव्यांपासून नवीन केलेली असे. ह्यात बाळबाळंतिणीचा सुमारे वर्षभराचा औषधपुरवठा असे.
साती, छोट्या सुपल्या म्हणजे गौरी 'ववसायला' लागतात त्या सुपल्या ना? त्यात पाच फळं, खारीक. बदाम वगैरे घालून गौरीपुढे ठेवतात. ह्यालाच बहुतेक गौरी ववसणं किंवा हवसणं म्हणतात. म्हणजे बहुतेक वसा फेडणं असावं. हे व्रत थोडंसं मंगळागौरीसारखं पाच वर्षं करावं लागणारं असतं. मुंबईतही गौरी यायच्या आधी या सुपल्या बाजारात दिसतात. कोणी या व्रताबद्दल अधिक लिहील का?
होय!
उर्मिला पवारांच्या कथेत आहेत तीच ही आयदानं.
रत्नागिरीत अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर पण आमची गावे नाहीत.
पण त्यांच्या फणसावळ्यात आयदान म्हणतात आणि आमच्या शिरगावात आवतं म्हणतात.
त्या 'आयदान' पुस्तकात आमच्या गावाचा उल्लेख पण आहे.
त्यांच्या भावाशी ज्या मुलीचं लग्नं होतं तिला लग्नाची म्हणून मुलीचे वडिल अंगणातला एक आंबा (आंब्याचे झाड) भेट देतात असा काहिसा उल्लेख आहे.
तर ते झाड आणि अंगण आमचं आणि ती मुलगी म्हणजे उर्मिला पवारांची मोठी वहिनी म्हणजे माझी आत्ते.
बोले तो (साध्यासोप्या शुचितैंना कळण्यासारख्या अमेरिकन) मराठीत...
...'कोल्याण्डर' काय?
अलीकडे रोवळ्या बेळाच्या चटईसारख्या पट्ट्यांच्या आणि छोट्या असतात.
आमच्याकडे स्वस्तातल्या मिळतात त्या प्लाष्टिकच्या नि पांढऱ्या रंगाच्या (नि बहुधा मेड इन चायना) असतात. (गेला बाजार, निदान आमच्यात तरी त्यांनाच 'रोवळ्या' म्हणतात ब्वॉ!)
गुगलला अजून रोवळी माहिती
गुगलला अजून रोवळी माहिती नाही. रोवळी शब्दावरील चित्रशोधात एकही रोवळीसदृश चित्र दाखवता आले नाही गुगलला :-)
मुंजीत भिक्षा गोळा करायला रोवळी होती ते आठवतयं..
अजुनही आठवडा बाजारात कोकणात सुपं, रोवळ्या दिसतात.. खासकरून गणपतीच्या दिवसात खूप असतात.
बाकी रोवळीचं वर्णन साती यांनी परफेक्ट केलयं..
लोकांना हि ऊर्जा कुठून येते ?
माझा एक वर्गमित्र अनंत काकतकर याचा मेसेज आला कि तो पुढच्या महिन्यात केप ते कैरो बाय रोड हौस म्हणून प्रवास करणार आहे. ( गेल्या १ -२ वर्षात तो सपत्नीक नॉर्थ आणि साऊथ पोल जाऊन आला ) सर्वसामान्य मध्यमवर्गातून येऊन रुटीन इंजिनिअर होऊन नोकरी मग व्यवसाय मग यशस्वी व्यवसाय अशी रुटीन वाटचाल करतानाच एकदम पन्नाशीनंतर लोकं अशी adventourous कशी होतात , यातील ऊर्जा त्यांच्याकडे कुठून येते . अमरिका यूरोप न्यू झीलंड ऑस्ट्रेलिया ( फार तर फार मसाई मारा , सेरेंगीती , क्रुगर ) अश्या मळलेल्या वाटा सोडून मंडळींना हे असे करण्याकरिता उत्साह आणि ऊर्जा कुठून येते . मी व्यवसायानिमित्त आफ्रिकेतल्या काही ठिकाणी जाऊन आलो आहे . पण ते वेगळे . तेथील अनेक देशात अशांतता आहे तरीही जाण्याची हौस कशी येते हा एक प्रश्न पडतो . ( साला कॉम्प्लेक्स च येतो ) असो.
मानसिक उत्साहाबद्दल असावं मग
मानसिक उत्साहाबद्दल असावं मग शरीर साथ देतंच.विवाहितांचा उत्साह चाळीशीनंतरच वाढतो.-
-एकमेकांचं बोलणं फारसं मनावर घ्यायचं नसतं हे कळू लागतं.-
-पन्नाशिनंतर आपलं बोलणं तो/ती मनावर घेणारच नाहीये याबद्दल ठाम खात्री झालेली असल्याने अतिउत्साह येतो.( माझे मत,विदा नाहीये इक्सेलशीटमधला.)
एकमेकांचं बोलणं फारसं मनावर
एकमेकांचं बोलणं फारसं मनावर घ्यायचं नसतं हे कळू लागतं.
अगदी अगदी वर्क अराऊंड सापडलेले असतात. उदा - एक बोलायला लागला की दुसर्याने हेड्फोन लावणे, हो ला हो करुन, स्वतःला हवे तेच करणे (;)) याला काही लोक खोटे बोलणे म्हणतात.
ते वाक्य आहे ना “Marriages maybe made in heaven, but a lot of the details have to be worked out here on earth. ” पैकी बरेचसे डिटेल्स मास्टर करुन झालेले असतात.
.
मला तर नवल वाटतं काही लोक परत दुसरं लग्न करण्याइतकं फुलहार्डी ऑप्टिमिझम आणतात कुठुन? ;)
या प्रश्नावर उहापोह झालेला
या प्रश्नावर उहापोह झालेला आहे अथवा नाही माहीत नाही. पॉलिगमी (बहुपत्नी/पतीत्व) नक्की का चालत नाही? याबद्दल कायदा का झालेला आहे? जेव्हा कायदा होत होता तेव्हा त्यास कडवा विरोध झाला का? न झाल्यास का नाही, झाल्यास का - अर्थात पॉलिगमीचे "जास्त विकल्प" हा फायदा सोडून अन्य काय फायदे आहेत?
हा व्हिडीओ पहा.प्रश्न :
प्रश्न : तुम्हाला अशा जगात रहायला आवडेल का की जिथे प्रत्येक जण चढाओढीने त्याची/तिची (आपापली) जात, धर्म, वंश, राष्ट्रीयत्व हे सगळ्यात कनिष्ठ आहे असा दावा करतो ? व कसे/कशी कनिष्ठ आहे त्याचा युक्तीवाद प्रस्तुत करतो ?
( जात, धर्म, वंश, राष्ट्रीयत्व यावरून मारामार्या, हिंसा होणे चूक आहे - हा अतिबेसिक मुद्दा आहे. )
शुद्ध
'शुद्ध शाकाहारी', अशा पाट्या लहानपणापासून वाचल्या आहेत. पण 'शुद्ध मांसाहारी' अशी पाटी अजूनपर्यंत कुठे बघितली नाही.
कुठल्याही मांसाच्या पदार्थात पीठ, मसाला, कांदा इत्यादि शाकाहारी गोष्टींची अपरिहार्य भेसळ असते, हे त्याचे कारण असते का ?
उपप्रश्नः सामिष वा निरामिष भोजन अशी रेल्वे कँटिनबाहेर पाटी असायची.
त्यातले आमिष काय ? आणि ते सगळ्यांनाच कसे लागू होईल ?
'शुद्ध मांसाहारी'
फक्त मांस खाऊन पूर्ण पोषण मिळणार नाही; त्यामुळे जेवण पूर्ण मानत नसावेत. मांसाहारी पदार्थ बनवताना वापरलेले पीठ, मसाला, कांदा हे जिन्नस तर झालेच, पण शिवाय त्यासोबत पोळी/भात असे काही पदार्थ लागतातच. मांसाहारी लोक बहुदा भाज्या खातातच, नव्हे, त्यांना भाज्याही हव्या असतात. त्यामुळे उगाच धंदा कमी करायचा? तो ही पैसेवाल्या पण संख्येने कमी असणाऱ्या जैनांची नक्कल करत!
शुद्ध शाकाहार
आमिषचा एक अर्थ मांस. स+आमिष = मांससहित, निर्+आमिष = मांसरहित
'शुद्ध शाकाहारी' मधल्या 'शुद्ध'तेचा संबंध शाकाहाराशी निगडित असलेल्या उच्चनीचतेच्या, सोवळ्या-ओवळ्याच्या कल्पना यांच्याशीही असावा. शुद्ध शाकाहारी जेवण याचा अर्थ केवळ मांस-मासे नसलेले जेवण एवढाच नाही, तर त्या स्वयंपाकघरात, भांड्यांत सामिष पदार्थ शिजवलेले नाहीत अशा बाबींकडेही निर्देश करतो.
आज हे झकास विचार मौक्तिक
आज हे झकास विचार मौक्तिक मिळाले :
A comment in the Washington Post (after an article about Glennon Doyle Melton of ‘Momastery’ blog):
“There definitely is something wrong with the relationship my wife and I have with each other . . . because:
-- we have been married for 50 years
-- neither of us has felt the urge to spill our every thought and action onto the 'net or into a book
-- neither of us has been unfaithful
-- neither of us has food, body, friendship, or relationship fixations
-- neither of us has been in therapy
Where have we gone wrong?”
वैचारिक विरोधी जोड्या जुळवा !!
स्वतःची नेमकी विचारसरणी नक्कीच आणि खात्रीने उमगलेले काही अतिशय इंटरेस्टिंग आय डी ऐसी वर आहेत . स्वतःची स्वतःबद्दलची ही खात्रीची मते या आय डिज नि ठोसपणी स्वतःच्या कुठलीही पोस्ट खाली ( अभिमानाने ? ) लिहिलेली आढळते . मला स्वतःला यांच्या या खात्री बद्दल फार आदर वाटतो . ( हे विधान उपहासाने लिहिलेले नाहीये)
असा विचार करा कि यातले , कमालीचे विरोधी विचार सरणीचे लोक समोर आले तर त्या कळीच्या मुद्द्याबद्दल ते नक्की काय चर्चा करतील ?
उदा बॅटमॅन म्हणतात कि ते राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी असावेत त्यांच्या समोर नवी बाजू आले , ज्यांचे मत ठाम मत असावे कि हिंदुस्थानचे जर काही भले व्हायचे असेल, तर सर्वप्रथम पारंपरिक हिंदू थेरडेशाहीचा नि:पात झाला पाहिजे
तर ते हिंदुत्ववाद आणि हिंदू थेरडेशाही यावर किती जबरदस्त चर्चा करतील !!!!
किंवा नितीन थत्ते जे mcp आहे असे प्रमाणित करतात आणि अदिती ताई यांना स्त्री पुरुषवाद यावर चर्चा करायला सांगितली तर ....
आता या सगळ्यांचा समोरासमोर कट्टा घडवून आणणे हे थोडे अवघड आहे , तेव्हा त्यांना ऐसी वरच एक धागा काढून देऊन आपापल्या ठाम मतावर चर्च करायला सांगावे . आयड्या कशी आहे folks ?
तरी उरलेल्या अभिनिवेश विरहित पब्लिक ला अशी विनंती आहे कि त्यांनी अश्या व वैचारी विरोधी जोड्या जुळवाव्यात आणि त्यांना चर्चा विषय ( भिडायला : ) सुचवावेत !!! कसें
आणि माझे शेवटचे चार आणे ..... मॉडेरेटोर म्हणून अर्थातच चिंतातुर जंतू असावेत ... त्यांचे सर्व्या बद्दल मत काय आहे ते त्यांच्या पोष्टी खाली लिहिलेले असतेच ....
>>नितीन थत्ते जे mcp आहे असे
>>नितीन थत्ते जे mcp आहे असे प्रमाणित करतात आणि अदिती ताई यांना स्त्री पुरुषवाद यावर चर्चा करायला सांगितली तर ....
त्या विषयावर चर्चा घडल्यावर समोरील पार्टीकडून ज्या प्रकारचे प्रतिसाद येतात त्याला अनुसरून हे आयडीज असे "सेल्फ सर्टिफिकेशन" करतात. निदान माझ्या बाबतीत हे खरे आहे आणि बॅटमॅन यांच्याबाबतीत तरी हे खरे असावे.
अहो बापटअण्णा - ते पोस्ट खाली
अहो बापटअण्णा - ते पोस्ट खाली लिहीलेले एमसीपी वगैरे मार्केटींग / टीआरपी गिमीक असतात. फार सिरीअसली घेऊ नका.
उदा, थत्तेकाका आणि बॅटमॅन हे एम्सीपी दुरदुर पर्यंत नाहीत. बॅट्या स्वताला राइटीस्ट म्हणुन घेत असला तरी तो पुरेसा राइटीस्ट नाही. गब्बरसिंग असा आयडी घेणारा माणुस एकदम कनवाळु वगैरे आहे ( त्याचा अतिउजवेपणा फक्त प्रतिसादापुरता आहे ). मनोबा स्वताला सगळीकडे भाबडा, बिचारा , व्यवस्थापीडीत ( बॅट्याचा शब्द ) पोट्रे करत असतो तसा तो अजिबात नाही.
ज्जे बात! प्रत्येकाचा घेतलेला
उदा, थत्तेकाका आणि बॅटमॅन हे एम्सीपी दुरदुर पर्यंत नाहीत. बॅट्या स्वताला राइटीस्ट म्हणुन घेत असला तरी तो पुरेसा राइटीस्ट नाही. गब्बरसिंग असा आयडी घेणारा माणुस एकदम कनवाळु वगैरे आहे ( त्याचा अतिउजवेपणा फक्त प्रतिसादापुरता आहे ). मनोबा स्वताला सगळीकडे भाबडा, बिचारा , व्यवस्थापीडीत ( बॅट्याचा शब्द ) पोट्रे करत असतो तसा तो अजिबात नाही.
ज्जे बात! प्रत्येकाचा घेतलेला आय डी हा त्याचा त्याचा "शॅडो पर्सोना" आहे. स्वतःला डिनाय केलेला. ;)
:प
बॅटमॅन म्हणतात कि ते राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी असावेत त्यांच्या समोर नवी बाजू आले , ज्यांचे मत ठाम मत असावे कि हिंदुस्थानचे जर काही भले व्हायचे असेल, तर सर्वप्रथम पारंपरिक हिंदू थेरडेशाहीचा नि:पात झाला पाहिजे
नितीन थत्ते जे mcp आहे असे प्रमाणित करतात ...
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
' विचारमंथन '
वाद घालण्याच्या जोड्या चुकल्या कि कसं होतं बघा , वेगळ्याच धाग्यावर वेगळ्याच जोडीचा वेगळाच वाद चालू झाला ( hopefully म्हणतो ... होता ).
म्हणून म्हणतो की यातील परस्पर विरोधी विचारसरणीच्या जोड्यांचा उदा . बॅटमॅन आणि न वि बाजू , थत्ते चाचा आणि अदिती तै , मनोबा आणि गब्बर /अनु तै
यांच्यात त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक वैचारिक बाजूच्या बद्दल जोरदार ' विचारमंथन ' झाले तर इतरांचे ज्ञान व समज वाढू शकेल ( उदात्त हेतू : ) , शिवाय करमणूक होईल तो बोनस ... रा. घा . नंतर binary पोल घेऊन ग्राफ्स पण काढू शकतील !!! ज्ञानी चिंतातुर जंतू * मॉडरेटर .... गेला बाजार ऐसी वरचे नवीन चर्चाविषय हि वाढतील आणि पिवळा डांबिस काकांचे समाधान पण होईल ...
संपादक आणि मालक मंडळी लक्ष घाला सिरिअसली
काय म्हणता मंडळी ? ( बघा ... लावा काड्या आता ... आणि विषय सुचवा )
ज्ञानी चिंतातुर जंतू * ( ओ ... कुठे आहे तुम्ही , एकदम गप्प गप्प सध्या , कट्ट्याचा एवढा धसका घेतलात का काय ? )
प्रथम ते एमसिपि काय ते
प्रथम ते एमसिपि काय ते सांगा.बय्राच दिवसांपासून विचारायचे होते.इथे कुणी शुद्ध आस्तिक ,भाविक असेल तर मला त्याबद्दल नितांत आदर आहे आणि चर्चेला समोर आल्यास त्याची मुलाखतच घेईन अथवा कुठल्या भटकंतीत बरोबर घेईन म्हणजे त्याचे देवदर्शन होईल तेव्हा मला खांबावरची नक्षी न्याहाळता येईल.
इथे कुणी शुद्ध आस्तिक ,भाविक
इथे कुणी शुद्ध आस्तिक ,भाविक असेल तर मला त्याबद्दल नितांत आदर आहे आणि चर्चेला समोर आल्यास त्याची मुलाखतच घेईन अथवा कुठल्या भटकंतीत बरोबर घेईन म्हणजे त्याचे देवदर्शन होईल तेव्हा मला खांबावरची नक्षी न्याहाळता येईल.
मला प्रसाद म्हणुन मस्त जेवण देणारी देवस्थाने आवडतात ( उदा गोंदवले ). तुम्ही नक्षी न्याहाळत बसा, तेव्हड्यावेळात मी प्रसादाच्या जेवणाची व्यवस्था कुठे आहे ते शोधुन ठेविन.
मला प्रसाद म्हणुन मस्त जेवण
मला प्रसाद म्हणुन मस्त जेवण देणारी देवस्थाने आवडतात ( उदा गोंदवले ). तुम्ही नक्षी न्याहाळत बसा, तेव्हड्यावेळात मी प्रसादाच्या जेवणाची व्यवस्था कुठे आहे ते शोधुन ठेविन.
अगदी अगदी. मला सुद्धा गोंदवले खूप आवडते. किमान सात आठ वेळा तिथले जेवण प्रसाद खाऊन तृप्त झालेलो आहे. आमच्या कराडापासून जेमतेम ८० किमी वर आहे.
जगातल्या काही( च) भाषा विशेष खास उच्चभ्रू का समजल्या जातात ?
वारंवार छळणारा प्रश्न हा कि जगातल्या काही( च) भाषा विशेष खास उच्चभ्रू का समजल्या जातात ? उदाहरणार्थ फ्रेंच किंवा बंगाली ?
त्याच असं झालं कि फार्फार वर्षांपूर्वी मी एकदा कानडी शिकण्याच्या क्लास ला जाण्याचा ( अयशस्वी) प्रयत्न केला होता . उगाचच . हे कळल्यावर माझ्या एका जवळच्या मित्राने " अरे कानडी काय , बंगाली तरी शिकायचीस" अशी पिंक टाकल्यावर मी त्याला उलटा घेतला कि बाबा असे का ब्रे ? तर तोही थोडा विचारात पडला . ते बंगाली उच्चं दर्जाचे साहित्य ( म्हणजे नक्की काय आणि कोण ठरवतो हे ? आणि कानडीत ते नाही का ? ) वगैरे चर्चा झालीच . पण ठोस उत्तर काही मिळालं नाही . हां आता लोकं ( इंग्लीस ) , जर्मन , जपानी आणि आता कोणी कोणी चिनी भाषा पोटापाण्याला कामाला येते ( म्हणे ) म्हणून शिकतात , ते ठीक .
पण फ्रेंच आणि बंगाली ला खास विशेष उच्चभ्रू दर्जा कोणी आणि कशाच्या आधारावर दिला आहे ?
बर या दोन्ही 'जेत्यांच्या ' वगैरे हि भाषा नाहीत ( ज्यामुळे त्यांचे उच्चपण फ़डतूसांच्या गळी उतरवले गेले वगैरे)
मला यातले काही कळत नाही , पण असं तर नाही ना की त्या त्या भाषक समाजांनी स्वतःच्या भाषेची टिर्या बडवून लाल केली म्हणून त्या उच्चं ?
जाणत्यांनी आपाप्प्ले विचारमोती इथे ढाळावेत ...
( आत्ताच 'चांगली art म्हणजे काय आणि कोण ठरवतं ते ' या सनातन प्रश्नाला हात घालत नाही . ते पुढच्या वेळेला .... ;)
विचारमोती नं १
एखादी भाषा उच्चभ्रू समजली जाण्याचे मुख्य कारण, बहुतांशी, ती बोलणारा समाज उच्चभ्रू, बलवान असतो हेच असते. बलवान म्हणजे राजकीय किंवा सामाजिक दृष्ट्या.
* फ्रेंचांचे भारतावर राज्य नव्हते, पण फ्रेंच हे जेते होतेच! त्यांच्या वसाहती होत्या. पण फ्रेंच भाषेचे उच्चभ्रूपण त्याही आधीचे आहे. वेगवेगळ्या कारणांनी युरोपातल्या अनेक राजघराण्यांची, उमरावांची वगैरे भाषा फ्रेंच होती. उदा. इंग्लंडमधे फ्रेंच भाषा बलवंत असण्याचे एक कारण फ्रेंचभाषी नॉर्मन लोकांच्या हातात राजकीय व धार्मिक सत्ता असणे. तसेच फ्रेंच ही बराच काळ युरोपात आंतरराष्ट्रीय करारमदारांची भाषा होती.
* भारतीय प्रबोधनात (रेनेसाँ) बंगाली लोकांचा लक्षणीय सहभाग आणि बंगाली साहित्यात समाजसुधारणा व राष्ट्रीयत्व यांचे पडलेले प्रतिबिंब यामुळे बंगाली भाषा व साहित्य ब्रिटिशकाळात भारताच्या विविध भागात लोकप्रिय झाले. तेच उच्चभ्रूत्वाचे कारण असावे. अनेक बंगाली कादंबर्या १९/२० व्या शतकात मराठीत भराभरा भाषांतरित होत होत्या. दिवाळी अंकांची संकल्पनाही (दुर्गा)पूजा-विशेष अंकावरून घेतली गेली.
१९०९ साली रघुनाथ मित्र यांनी
१९०९ साली काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी मासिक मनोरंजनाचा दिवाळी अंक काढला, तो पहिला दिवाळी अंक. २००९ साली त्याला १०० वर्षे झाली त्या वर्षीच्या दिवाळी अंकांत याविषयी माहिती आली होती. मित्रांवर एक लेखही होती, पण नेमक्या कुठल्या अंकात ते आठवत नाही. (मौज, लोकसत्ता, अंतर्नाद पैकी एक असू शकेल). (मित्र हे त्यांचे टोपण-आडनावही त्यांनी बंगाली आडनावावरून घेतले होते बहुधा)
भाषा उच्चभ्रू ठरण्यामागे २
भाषा उच्चभ्रू ठरण्यामागे २ कारणे:
१. पोलिटिकल जेत्यांची भाषा-उदा. इंग्लिश.
२ कल्चरल बॉस लोकांची भाषा- उदा.बंगाली, फ्रेंच.
इंग्रजांचे भारतावर राज्य असल्याने त्यांच्या भाषेचा प्रसार झाला आणि इंग्रजांकरवी भारताला युरोपची मोठ्या प्रमाणावर ओळख झाली. युरोपात फ्रेंच भाषेचा दबदबा खूप मोठा होता. चौदावा लुई (शिवाजीमहाराजांचा समकालीन) च्या काळात युरोपमध्ये फ्रान्स एकदम दादा राष्ट्र बनले, इथवर की युरोपमधील अनेक देशांचे हुच्चभ्रू आपसांत फ्रेंच बोलत. टॉलस्टॉयची प्रसिद्ध कादंबरी वॉर & पीस मध्ये पाहिल्यास दिसून येईल. सगळे रशियन लॉर्ड वगैरे लोक्स आपसात बोलताना फ्रेंचाळलेली रशियन बोलतात, कायम फ्रेंच फ्रेजेस वगैरे वापरतात इ.इ.
एक अतिशय जुने उदा. घ्यायचे तर रोमन लोकांचे साम्राज्य अख्ख्या पश्चिम व दक्षिण युरोपावर होते त्यामुळे तिकडे लॅटिन भाषेचा प्रसार झाला. परंतु रोमनांवर ग्रीक संस्कृतीचा खूपच प्रभाव असल्याने सोबतच ग्रीकचाही युरोपात सडकून प्रसार झाला.
भारतापुरते बोलायचे तर ब्रिटिश काळात बंगाल भारतभर फेमस झाले. तिथले क्रांतिकारक, लेखक, विचारवंत सगळेच फेमस झाले. भारतातला सर्वांत अगोदर आंग्लीकृत झालेला भाग म्ह. बंगाल, त्यामुळे तत्रस्थांनी ब्रिटिश/युरोपियन कल्चरल प्याकेज लौकर आत्मसात केले व त्यावर आधारित क्रांती इ. त्यांच्याकडे पहिल्यांदा झाली. रवींद्रनाथ, विवेकानंद, बंकिमचंद्र वगैरेंची देशभरात लै हवा झाली. बंगाली कल्चरचा अनेक पिच्चरांमधूनही दणकून प्रसार झाला- ती कॉफीहाऊसेस, त्या मोठे कुंकू लावलेल्या स्त्रिया, ते रसगुल्ले, ती लाडिक वाटणारी भाषा, इ.इ. त्यामुळे बंगाली भाषेला प्रेस्टीज लाभले.
तुलनेने 'नॉर्थ'वाले 'साउथ' वाल्यांना नेहमीच खालचे समजत आलेत, शिवाय आज ज्याला उत्तर कर्नाटक म्हणतात त्याला ब्रिटिश काळात 'सदर्न मराठा कंट्री' असेच नाव होते त्यामुळे आपण भारी आणि कन्नड फालतू असा गंड मराठी लोकांना होता. अजूनही आहे.
त्यामुळे काही राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक घडामोडी, त्यांतून तयार झालेल्या पब्लिक मेमरीज व स्टिरिओटाईप्स यांचे कंटिन्युएशन यांमधून अशा धारणा तयार होतात.
>>भारतातला सर्वांत अगोदर
>>भारतातला सर्वांत अगोदर आंग्लीकृत झालेला भाग म्ह. बंगाल, त्यामुळे तत्रस्थांनी ब्रिटिश/युरोपियन कल्चरल प्याकेज लौकर आत्मसात केले >>
ब्रिटिशांनी ते करवले.जे श्रीमंत सावकार ,जमीन मालक होते मोजकेच त्यांनी गरीब जनतेला अगोदरच ताब्यात ठेवलेले होते.त्या मोजक्यांना ब्रिटिशांनी धाकात घेतले.पुढचे काम बंगाल ताब्यात ठेवणे आपोआपच झाले.सावकारांची पोरे गेली विलायतेला आणि कॅाम्युनिस्ट जनतावाले गेले जर्मनीत.हे बरोबरे का?
समाजातला वरचा /श्रीमंत वर्ग
समाजातला वरचा /श्रीमंत वर्ग पुढे उच्च शिक्षणासाठी लवकर सरकला,मागचाही लवकर सरकला.इकडे कोकणात तर अजूनही होळी रे होळी सयबाच्या ***बंदुकीची गोळी अशीच विचारसरणी होती.तिकडे सायबाकडे शिक्षण वगैरे फार हलकटपणा.वरच्या थरातच विरोधाचं वातावरण किती काळ होतं यावर पुढे समाज हलणार.
ऐसीकरांनो.. तुमच्या एरियातला
ऐसीकरांनो.. तुमच्या एरियातला गणपती उत्सव काय म्हणतोय. आमच्याइथे हनी सिंगच्या लुंगी डॅन्स नंतर पोलीस सायरनचं म्युझिक लावलंय. अतिशय बिभत्स म्युझिक लागोपाठ सुरू आहे..4 वाजल्यापासून.. आता 5 तास झाले, साधारण अकरा वाजेपर्यंत अजुन सुरू राहील..तुमच्या इथला काय हालहवाल?
ऐसीवरील काही सदस्यांचे लिखाण
ऐसीवरील काही सदस्यांचे लिखाण हे "प्रथिनयुक्त/lean meat/पौष्टिक" असते. कमी असले तरी आरोग्यास लाभदायी. तर काहींचे अर्थात इन्क्लुडिंग मी, फॅट म्हणजे चरबीयुक्त असते. अति प्रमाणात वाईट, संवादरुपी ब्लड सर्क्युलेशनच्यामधे (रक्ताभिसरण) मधे क्लॉट्स निर्माण करु शकणारे. सुदैवाने ऐसीवरील वादविवाद, संवादरुपी रक्ताभिसरण उत्तमच असल्याने या चरबीयुक्त गाठींचा प्रादुर्भाव, दुष्परीणाम कमी जाणवतो ;)
.
वाह वाह! रुपकांच्या काय लडीच्या लडी उलगडल्यात. ज्ञानेश्वरांनंतर मीच ;)
अर्र्र स्वारी बर्का मधे दवणे येतात ;)
कोणीही व्यक्ती शिंकल्यानंतर
कोणीही व्यक्ती शिंकल्यानंतर "ब्लेस यु" म्हणण्याची पद्धत पश्चिमेत रुढ आहे. या पद्धतीचा "ब्लेस यु" म्हणणार्याला होणारा एक फायदा माझ्या लक्षात आला तो असा - तुम्ही जर अंतर्मुख असाल, खरच भित्रेच असाल, तर या पद्धतीत अनोळखी लोकांचे अभिष्ट्चिंतन केल्यामुळे , नंतर आय-कॉन्टॅक्ट करुन स्मितहास्य द्यावे लागल्याने किंचित आत्मविश्वास येतो.
मला तर संवादाचा, आत्मविश्वासाचा खूप प्रॉब्लेम येतो तेव्हा मी या लहान लहान साध्या साध्या गोष्टी करायलाही घाबरते, चाचरते. पण यापुढे ही "ब्लेस यु" सवय अंगवळणी पाडून घेणार आहे.
_____
वॉव आज खालच्या साईटवरती वाचलं - Switch to dyslexia-friendly font
http://www.factsandarts.com/essays/robert-hass-poet-meaning-and-form-an…
म्हणजे
असा फॉन्ट निघाला आहे तर - https://www.dyslexiefont.com/en/dyslexia-font/
'ब्लेस यू'च्या उगमाबद्दल...
एका थियरीनुसार, कोणी शिंकल्यावर 'ब्लेस यू' म्हणण्याची पद्धत ही युरोपातील प्लेगाच्या साथींच्या काळात सुरू झाली. बोले तो, (प्लेगाच्या साथींच्या काळात) कोणास शिंक येणे हे त्यास/तीस प्लेगाची लागण झाल्याचे आद्यलक्षण. सबब, कोणी शिंकल्यास, 'हा/ही लेकाचा/ची आज संध्याकाळपर्यंत गचक(तो/तेय) की नाही पाहा, लिहून घ्या!' या निष्कर्षापर्यंत त्वरित पोहोचून, मरणोत्तर त्यास/तीस सद्गती प्राप्त व्हावी या सदिच्छेप्रीत्यर्थ मंडळी 'ब्लेस यू' म्हणून मोकळी होत.
सांगण्याचा मतलब, कोणी शिंकल्यावर 'ब्लेस यू' म्हणण्याची सवय अतिशय चांगली नि अर्थपूर्ण. जरूर अंगीकारावी!
+१ -१
सर्ज प्रायसिंग लावायचच असेल तर सर्व्हिस प्रोव्हायडरला स्पर्धेपासून क्रुत्रिम संरक्षण देणं बंद करावं. फ्री मार्केट पायजेल तर फुल्ल फ्री मार्केट करा की. माझ्या माहितीप्रमाणे सध्या चालवण्यास सक्षम अशा सर्वच व्यक्तिंना ऑटो ,ट्याक्सी(मुंबैवाली ट्याक्सी) लायसन्स वगैरे मिळत नाही.
ती दिल्यास स्पर्धेतून नि फ्री मार्केटमधून जे काय व्हायचं ते होइल. ऑटोवाल्याने दादर ते सायन पाच लाख कोटी रुपये मागितल्यासही ते इल्लिगल ठरु नये. कोणीतरी चार लाख कोटीमध्ये नेण्यास आनंदाने तयार होइल. कुणी अजून चार लाख कोटी ऐवजी चार लाखात न्यायला तयार होइल. पुरेसे स्पर्धक असले तर खरोखर मार्केटच्या मागणी-पुरवठा तत्वावर तरी चालेल.
रेल्वेर्बाबत तर विचित्र परिस्थिती आहे. रेल्वेची फुल्ल्,जगड्व्याळ आकाराची मोनापोली आहे. (ती असावी की नसावी ह्याबद्दल आपलं काहिच म्हण्णं नाही.)
तसाही freight- passenger रेश्यो भारताचा फारच जास्त आहे. freight चे चार्गेस वाढवून passenger ना सवलत देतात म्हणे. मला त्यातलं नेमकं समजत नाही.
फुल मोनोपोली असलेल्या रेलवेला
फुल मोनोपोली असलेल्या रेलवेला अलाउड असेल तर रिक्षांना का नाही?
थत्ते चाचा, तुम्ही कुठल्या देशात रहाता?
आमच्या इथे तरी, रिक्षांना सर्ज, सुपर सर्ज सर्व प्रकारचे प्रायसिंग अलाउड आहे. बरं ते ही फक्त पाउस असताना नाही, तर अगदी आल्हाददायक वातावरणात आणि अनेक रीक्षा रीकाम्या चौकात उभ्या असताना पण अलाऊड आहे.
इतकेच काय, पॅसेंजर ला तिरस्कारयुक्त हाड म्हणायचा पण अधिकार आहे, जो पूर्ण मोनोपॉली असलेल्या रेल्वेला पण नाही.
थिओरेटिकली असे केल्यास
थिओरेटिकली असे केल्यास आरटीओकडे तक्रार करण्याचा नागरिकांना अधिकार असतो आणि त्यावर थिओरेटिकली आरटीओ कारवाई करते.
हा थिओरेटिकल अधिकारसुद्धा काढून घ्यावा असे माझे म्हणणे आहे.
---------------------------------------------------------------------
रिक्षावाल्यांच्या मुजोरीविरोधात गेल्या काही वर्षांत नागरिकांना एक दिवसाचा संप करणाची आवाहने मुंबईत तीनचार वेळा केली गेली. त्या आवाहनांना मुळीच प्रतिसाद नागरिकांनी दिला नाही. त्या अर्थी रिक्षावाले जे काही वागतात ते फार जाचक नाही असे नागरिकांचे म्हणणे असलेले दिसते.
थत्ते चाचा - तुमचा मुद्दा
थत्ते चाचा - तुमचा मुद्दा मुळात चुकत आहे.सर्ज प्रायसिंग म्हणजे आर्बीटरी/ मनमानी प्रायसिंग नाही. जसे रीक्षावाल्यांचे असते. त्यामुळे तुमचे उदाहरण चुक आहे.
बॉम्बे दिल्ली जितके तिकीट आज असेल तितकेच तिकीट उद्या पण असेल. सर्ज चार्जिंग चे नियम पण डॉक्युमेंटेड असणार. मनमानी चार्जिंग नसणारे.
रीक्षेवाल्यांनी पण पीक्/ऑफपिक असे चार्जींग केले तर काहीच हरकत नाहीये.
जेव्हा डिमांड जास्त
जेव्हा डिमांड जास्त असतो-सकाळच्या आणि संध्याकाळच्या पीक वेळेत- तेव्हा जास्त चार्ज करणे म्हणजे सर्ज प्राइसिंग.
रात्री सेवा देणे म्हणाजे स्पेशल सेवा म्हणून हाफ रिटर्न* (या नावाने जास्त चार्ज).
*सायंकाळी ठाणे स्टेशन ते घोडबंदर रोड जायला तयार असलेले शेकडो ग्राहक असतात पण एका ग्राहकाला सोडल्यावर घोडबंदर रोडवरून ठाणे स्टेशनच्या दिशेने येणारे ग्राहक नसतात. तेव्हाही खरे तर हाफ रिटर्न चार्ज घ्यायला पाहिजे.
-----------------------------
लोकलगाडीचे तर उलटच आहे. पीक अवरला प्रवास करणारे बहुतांश लोक डिस्काउंटेड दराने प्रवास करतात.
हो, पण पीक, ऑफपीक ची
हो, पण पीक, ऑफपीक ची व्याख्या. स्पेशल सेवेची व्याख्या. त्यासाठी कीती जास्त चार्ज करायचे ह्याचे नियम आधी असायला पाहिजेत. आणि ते असतील तर ते तसेच पाळले गेले तर कोणालाच काही तक्रार असणार नाही. रात्री १० नंतरच्या हाफ-रीटर्न बद्दल तक्रार असत नाही गिर्हाइकाची. कारण त्याचे नियम केले गेले आहेत आणि ते सर्वांना आधीच माहीती आहेत.
पण २ किमी ला भर दिवसा ५० रुपये मागतात रीक्षेवाले त्याला सर्ज चार्जींग म्हणता येत नाही.
इतकेच काय, पॅसेंजर ला
इतकेच काय, पॅसेंजर ला तिरस्कारयुक्त हाड म्हणायचा पण अधिकार आहे, जो पूर्ण मोनोपॉली असलेल्या रेल्वेला पण नाही.
मी काय म्हणतो अनुताई, तुम्ही असं का करत नाही? कुठलीतरी रिक्षा थांबवायची, आणि विचारायचं अमुक ठिकाणी जाणार का? तो हो म्हणाला की अत्यंत तिरस्कारपूर्वक 'अरे हाड, मी नाही येत. तूच जा तिकडे.' असं म्हणायचं. तुम्हालाही तो अधिकार गाजवल्याचं समाधान मिळेल.
इथे कुणी पोकीमॉन शिकारी आहेत
इथे कुणी पोकीमॉन शिकारी आहेत का ?
आजकाल सगळीकडे लोक पोकीमॉन च्या शोधात असलेले दिसतात. आम्ही (मी आणि पतिदेव ) रात्र भोजनानंतर शतपाऊली + मोकळी हवा या साठी घराजवळील एका पार्क मधे जातो. इतरवेळी फारशी गर्दी नसते. शांतता असते. हल्ली अचानक तिथे वर्दळ वाढली आहे. पण सगळे न बोलता तिथे पोकीमॉन शोधत असतात म्हणे. बघायला मजा वाटते. काही अगदी सहकुटुंब येतात. पण एकमेकांशी चकार शब्द बोलत नाही. आमचीच बडबड ( म्हणजे माझीच) जास्तं होते आहे असं वाटून मला ऑकवर्ड होत. मग मी ( काही सेकंद) गप्प राहते.
आमच्या घरी सुद्धा एक शिकारी आहे... माझा लेक. त्याला म्हणे आमच्या घरातच बरेच पोकीमॉन सापडले. एक आमच्या हॉलमधे होता. त्यानी त्याच्याबरोबर माझा फोटो काढला. पोकीमॉन गोंडस आहे-- पण माझा अवतार तितकासा बरा नसल्याने इथे देत नाही.
पण सिरीयसली मला या गेम चा एक फायदा दिसतोय. दिवसभर क्ष-डबा किंवा किंवा आंतरजालावर असणारे, घराबाहेर येत आहेत. मोकळ्या हवेत फिरतात, चालतात. चांगलय ना? माझा लेक इतरवेळी चालायला अजिबात तयार नसतो. घराबाहेर आला की लगेच कॅब, कार किंवा बस लागतेच. पण तो हल्ली काही वेळा पोकीमॉन साठी चालत जातो येतो. दोन तिनदा तर तो आणि फ्रेंडस दिवसभर पोकीमॉन शोधत फिरत होते :))
पोकीमॉन शिकारी
मी आहे. मी सकाळी तळ्यावर जातो तेव्हा येता येता पोकेमॉन खेळतो. मित्रासोबत घोस्ट्स पकडण्यासाठी रात्री स्मशानाच्या आसपास सुद्धा भटकून झाले आहे. एकंदरीतच मजा येते, जरी या क्षणाला त्याची क्रेझ जराशी कमी झाली असली तरी. बाकी मोकळ्या हवेत चालणं बिलणं ठीक आहे; मूर्ख राजकीय परिस्थिती, त्याहून मूर्ख सोशल नेटवर्कींग, होर्डिंगबाजी आणि फालतू गोष्टींत अडकलेली निखळ-बंडल "तरुणाई", धकाधकीची जीवनशैली या सगळ्यांतून सुटून कशात तरी सबमर्ज व्हायला देणं ही पोकेमॉनची(आणि तत्सम खेळांची) सगळ्यात मोठ्ठी देणगी!!
आता मला पडलेला एक प्रश्न
मराठी संस्थळांवरचे अनेक परिचित हे जेंव्हा फेसबुकावर विचित्र किंवा पुष्कळदा प्लेन स्टुपिड पोस्टस टाकतात, तेंव्हा आपण काय करावं?
त्यांचा मूर्खपणा त्यांना दाखवून देऊन मैत्री संपुष्टात आणावी, की
हॅ हॅ हॅ करून मैत्री शाबूत ठेवून स्वतःला मनस्ताप करून घ्यावा?
:)

ब्राउनी पॉईंट्स = उत्तम कामाबद्दलची प्रशस्ती
ब्राउनी पॉईंट्स चा मी तरी एकच अर्थ ऐकलेला आहे , तो म्हणजे उत्तम (किंवा हव्या तशा) कामाबद्दलची प्रशस्ती . गर्ल स्काऊट च्या दुसऱ्या वर्षाच्या मुलींना ब्राउनी म्हणतात, आणि एक प्रकारच्या बेक्ड चॉकोलेट केकलाही . पण त्याच्याबरोबर पॉईंट्स हा शब्द नसतो.