स्वावलंबी गावः महात्मा गांधी
आज महात्मा गांधींच्या हत्येचा ६५वा स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांचे 'आदर्श गाव' या संकल्पनेवरच काही विचार स्वैर अनुवादित रूपात समोर ठेवत आहे. त्यांच्या स्मृतीस अभिवादन व प्रणाम!
=========
"ज्या गावात सर्व गावकरी गरजेपुरती खादी गावातच बनविण्यासाठी-विणण्यासाठी थोडा वेळ देतात, खादी-वस्त्रे गावातच बनवतात व तीच खादी परिधान करतात, गावातील तेलाच्या घाणीत तयार झालेले तेल वापरतात, स्वतःच्या किंवा जवळच्या गावात तयार झालेला गूळ वापरतात, स्वतः दळलेले धान्य, हातसडीचा तांदूळ वापरतात त्याला सुधारीत (रिफॉर्म्ड) गाव म्हणता यावे. ते असे गाव असेल जेथे शक्य तितके ग्रामीण उद्योग उत्तम चालत आहेत, कोणी गावकरी अशिक्षित नाही, रस्ते स्वच्छ आहेत, नकोश्या वस्तूंची विल्हेवाट लावायची जागा ठरलेली आहे, विहिरी स्वच्छ आहेत, वेगवेगळ्या जातिधर्मांमध्ये सलोखा आहे, अस्पृश्यता समूळ नष्ट झालेली आहे, प्रत्येकाला गायीचे दूध, तूप वगैरे मिळते आहे, गावातील चोऱ्या बंद आहेत आणि ग्रामसेवकांच्या सल्ल्याने गावातील इतर कामे होत आहेत. आणि हे सद्यस्थितीत शक्य आहे; मात्र मी याला किती वेळ लागेल ते सांगू शकत नाही"
-- मुन्नालाल शहा यांना ४-४१९४१ ला लिहिलेल्या पत्रातून ७३:४२१
========
"गावकऱ्यांनी जर सहकाराचा मार्ग अवलंबला तर ते खूप प्रगती करू शकतात. आपलं छोटं गाव आहे. आपण आपल्या गावात किती प्रमाणात व कोणत्या प्रकारचं काम सहकाराने करू शकतो ते पाहिलं पाहिजे. जरी सारे गावकरी सहकारी तत्त्वासाठी तयार नसतील तरी जे तयार आहेत त्यांनी एकत्र येऊन हा प्रयत्न केला पाहिजे. "
"आपण गावातच इतर साऱ्या गरजेच्या वस्तू बनविल्या पाहिजेत. तसेच कोणते उद्योग आपण इथेच उभारू शकतो तेही पाहिले पाहिजे. तेल गाळणे, चपला-बूट बनविणे अश्या गोष्टी स्थानिकच असल्या पाहिजेत. तसेच इतर उद्योगांबद्दलही विचार करता येऊ शकतो. "
"आपल्याला सेवाग्राममधील शिक्षणाबद्दल विचार करायला हवा. जरी तुम्ही मला याबद्दल प्रश्न विचारलेला नाही, तरी माझे मत असे आहे की सेवाग्राममध्ये एकही व्यक्ती निरक्षर असता कामा नये. माझ्या आयुष्यात फार उशीरा मी 'मूलभूत शिक्षणाचे' तत्त्व पुढे ठेवू शकलो मात्र त्याचे महत्त्व खूप अधिक आहे. मी गुजराती साहित्य परिषदेपुढे पुढील प्रश्न ठेवला आहे की करोडो निरक्षर गावकऱ्यांसाठी खास असे कोणते साहित्य लेखक देणार आहेत? "
" आणि हे देखील लक्षात ठेवा की आपले स्वतःचे आयुष्य साधे आणि स्वच्छ असेल तर त्याचा परिणाम तुम्ही इतके शब्द न बोलताही गावकऱ्यांवर नक्कीच होईल. "
-- सेवाग्राम येथील प्रार्थनेच्या सभेतून, २२-१०-१९४१ ७५:४३. ४४
==========
माझ्या स्वावलंबित्वाची कल्पना (सेल्फ सफिशियंसी) अशी आहे की गावकरी अन्न, वस्त्र आणि इतर प्राथमिक गरजांसाठी स्वावलंबी असले पाहिजेत. याचा प्रसंगी अतिरेक होऊ शकतो तेव्हा तुम्ही ही संकल्पना नीट आत्मसात केली पाहिजेत. स्वावलंबित्व म्हणतो कोतेपणा (नॅरोनेस) नव्हे. स्वावलंबी असणे म्हणजे सर्वार्थाने स्वयंपूर्ण असणे असे नाही. आपल्याला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपण गावातच तयार करू शकू हे कधीही शक्य नाही. जरी आपले ध्येय पूर्ण स्वावलंबित्व असले तरी जे पदार्थ आपण गावात तयार करू शकत नाही ते बाहेरून आणावेच लागतील. तसेच आपल्याकडे जे आहे ते अधिक निर्माण करून ते दुसरीकडे धाडले पाहिजे. मात्र गरजेपेक्षा अधिक निर्माण करून ते मुंबईला किंवा दूरच्या शहरात धाडू नये. शहरात निर्यात करण्यासाठी म्हणून काही अधिकचे तयार केले जाता कामा नये. माझ्या स्वदेशीच्या संकल्पनेच्या ते विरुद्ध आहे. स्वदेशी म्हणजे दूरच्या लोकांऐवजी माझ्या जवळच्या शेजाऱ्याला हवे ते निर्माण करणे. आपला उद्देश असा हवा की आपण गावाला हवे ते बनविण्याचा प्रयत्न करू नंतर शेजाऱ्यांना, नंतर जिल्ह्याला आणि त्यानंतर राज्याला गरजेची संपत्ती निर्माण करू"
-- श्रीकृष्णदास जाजू यांच्यासोबत चर्चा, १०-१०-१९४४
========
१. तुमच्या मते महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, नागरिकांची बौद्धिक (मेंटल), आर्थिक, राजकीय आणि नैतिक प्रगती होईल याची खात्री कशी करावी. माझेही असेच मत आहे.
२. आणि हे करताना प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार आणि संधी मिळाली पाहिजे
३. या दृष्टिकोनातून गाव आणि शहर यांना समान दर्जा दिला पाहिजे. आणि म्हणून त्यांचे अन्न, त्यांचा राहणीमान, त्यांचे कपडे आणि त्यांच्या सवयी सारख्या असल्या पाहिजेत. आणि अशी परिस्थिती हवी असेल तर त्यांनी त्यांचे कपडे स्वतः तयार केले पाहिजेत आणि स्वतःची घरे स्वतः बांधली पाहिजेत. त्याच प्रमाणे त्यांनी त्यांच्या गरजेपुरते पाणी आणि विजेची तजवीज केली पाहिजे
४. मनुष्य हा जंगलात राहण्यासाठी नव्हे तर समाजात राहण्यासाठी जन्मला आहे. जर आपल्याला याची खात्री करायची आहे की एक व्यक्ती दुसऱ्याच्या पाठीवर चढून बसणार नाही, तर आदर्श गाव किंवा स्वावलंबी नागरिकांचा गट - जे अंतर्गतरीत्या एकमेकांवर अवलंबून आहेत- हे एकक असले पाहिजे. ही संकल्पना मानवाच्या नात्यांमध्ये सर्व जगात बदल घडवून आणेल"
-- जवाहरलाल नेहरूंना लिहिलेले पत्र, १३-११-१९४५, ८२:७२
====
संदर्भ एमकेगांधी. ऑर्ग हे संस्थळ
प्रतिक्रिया
उत्तम लेख
चार्वाकाची आठवण नुसतीच 'घृतं पीबेत' अशी करणं जसं चुकीचं आहे, तसंच गांधींच्या 'स्वावलंबी गाव' कल्पनेचीही उथळ भाषेत खिल्ली उडवणं योग्य नाही हे लक्षात येतं. विचार पूर्णपणे पटले नाहीत. गावात काय असावं याबाबतचे विचार पटण्यासारखे आहेत. ते कोणत्या मार्गाने मिळवावे, व त्यासाठी कुठची तत्त्वं पाळली जावीत (विशेषतः स्वदेशीची कल्पना) हे मात्र अर्धकच्चं वाटतं. माझ्या घरात मला या सुविधा हव्यात असं घरमालक म्हणू शकतो. पण त्यासाठी मीच घर डिझाइन करेन असं म्हटलं तर जुनी, इनएफिशियंट तंत्रज्ञानं वापरली जाण्याची शक्यता जास्त. घर आर्किटेक्टनेच डिझाइन करावं. तसं अर्थव्यवस्थेची घडी तज्ञांनीच घालावी.
स्वदेशीबद्दल ते म्हणतात की गावात मुद्दाम मुंबईकडे पाठवण्यासाठी माल तयार करणं योग्य नाही. आपोआप जो होईल तो शेजारी विकला तर हरकत नाही. यात केंद्रीकरणाला विरोध दिसतो, व विकेंद्रीकरणावर भर दिसतो. आणि ही केवळ तात्विक भूमिका आहे. याचा नक्की काय फायदा हे कुठे सांगितलेलं नाही. पण गांधीजींची महती त्यांच्या तात्विक भूमिकांना काहीशा टोकाला जाऊन ठाम रहाण्यातच होती, हेही आहेच. याचा अर्थ सर्वच तत्वं सर्वांनाच उपयुक्त किंवा स्वीकारार्ह असतीलच असं नाही.
उत्तम
टोकाचे वाटणार्या विचारांची टिंगल करणं शक्य असतं, पण त्यातून क्षणिक विनोदापलिकडे काही मिळणार नाही. स्वयंपूर्ण गाव याबद्दल गांधीजींची बरीचशी मतं पटली नाहीत.
शहर आणि खेड्यांमधे दरी नसावी, हा विचार आजही पटण्यासारखाच आहे. शहर आणि खेड्यांमधला फरक आजही लक्षणीय आहे. पण गांधीजींच्या स्वप्नातलं खेडं तेव्हातरी अस्तित्त्वात होतं का? जातिभेद, वर्णभेदांनी पोखरलेला समाज शहरांकडे सरकल्यावर आधुनिक होतो आहे, कृत्रिम भेद गळून पडत आहेत. राहणीमानाचा प्रश्न आजही दोन्ही ठिकाणी आहेच.
गोकुळातलं दही, दूध, लोणी मथुरेत नेऊन विकलं जात होतं आणि गोकुळातल्या मुलांना काहीच मिळत नव्हतं म्हणून कृष्णाने 'माखनचोरी' केली. ज्या काळात यंत्रच नव्हती, यंत्रमागावर बनणारं स्वस्त आणि मस्त कापड नव्हतं, पेट्रोलवर पळणार्या गाड्या नव्हत्या आणि उन्हाचा दाह शांत करण्यासाठी पंखे, ए.सी. नव्हते त्या काळात स्वयंपूर्ण-वस्ती (खेडं, शहर इ) ही कल्पना नक्कीच रम्य असणार. पण अगदी गांधीजींच्या काळातही त्यांनी याचा पुरस्कार का केला हे मला समजत नाही.
दळणवळणाची साधनं गेल्या पन्नास वर्षांतही एवढी प्रगत झालेली आहेत आणि भारतातही उपलब्ध होत आहेत, तेव्हा शेजारी नक्की कोणाला म्हणावं?
प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार, खेडं आणि शहर यांचा दर्जा समान इत्यादी गोष्टी अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत, पण समानता निश्चितच पटण्यासारखी आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सहमत
म. गांधींना श्रद्धांजली.
सहमत आहे.
पण रोमँटिसिझमच पाहिजे तर मला स्वयंपूर्ण खेड्यांपेक्षा नैसर्गिक अराजक आणि प्राथमिकतावाद जास्त आवडतात.
बाकी गांधींचा कुटीरोद्योग, समाजवाद आणि सोव्हिएतस्टाईल सरकारी भांडवलशाही यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करून तयार केलेली नेहरूंची मिश्र अर्थव्यवस्था आणि तिचे भयंकर परिणाम यावर सध्या रोचक माहिती वाचतो आहे.
अरे वा!
अरे वा! कुठले पुस्तक? जालावर काहि वाचत असाल तर दुवा द्यावा
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
India Unbound
India Unbound: From Independence to the Global Information Age.
लेखकः गुरचरण दास.
आहे अवांतर तरी.....
>>बाकी गांधींचा कुटीरोद्योग, समाजवाद आणि सोव्हिएतस्टाईल सरकारी भांडवलशाही यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करून तयार केलेली नेहरूंची मिश्र अर्थव्यवस्था आणि तिचे भयंकर परिणाम यावर सध्या रोचक माहिती वाचतो आहे.
नेहरूंच्या आर्थिक धोरणात गांधींच्या स्वयंपूर्ण खेड्याला आणि कुटिरोद्योगाला काहीही स्थान नव्हते. समाजवाद आणि सोव्हिएट स्टाईल सरकारी उद्योगांची सांगड ही तेव्हाच्या काळानुरूप होती. हा कन्सेन्सस इतका सर्वांगीण होता की भारतातल्या तेव्हाच्या उद्योगपतींनी देखील मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणारा बॉम्बे प्लॅन सरकारला सादर केला होता. नेहरूंच्या काळापर्यंत अर्थव्यवस्था बर्याच प्रमाणात मिश्र होती. पुढे इंदिरा गांधींच्या काळात तेव्हाच्या राजकीय समीकरणांमुळे आणि आर्थिक वास्तवांमुळे* अर्थव्यवस्थेला डावे वळण घेणे** भाग पडले.
*सुरुवातीच्या काळात ६६-६७ मध्ये अन्नधान्याचा तसेच परकीय चलनाचा प्रश्न बिकट झाला होता. तेव्हा इंदिरा गांधी या गूंगी गुडियाच्या भूमिकेत होत्या आणि सत्ता सिंडिकेटकडे होती. त्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी अमेरिकेची आर्थिक मदत घ्यायचे ठरले. अमेरिकेने मदतीसाठी घातलेल्या अटीनुसार रुपयाचे अवमूल्यन केले गेले. अवमूल्यनाने फारशी भाववाढ होणार नाही आणि अमेरिकेची मदत मिळेल असे वाटले होते. परंतु प्रत्यक्षात भाववाढीने अधिकच उग्र स्वरूप घेतले आणि अमेरिकेची मदतही लवकर आणि पुरेश्या प्रमाणात मिळाली नाही. आणि जनतेत प्रचंड असंतोष माजला. त्याचे फळ ६७ च्या निवडणुकीत मिळाले. तेव्हा कसेबसे बहुमत असलेले सरकार चालवण्यासाठी आणि पक्षांतर्गत विरोधकांना शह देण्यासाठी त्यांनी डाव्या पक्षांची मदत घेतली. कंट्रोल्ड अर्थव्यवस्थेचे राजकीय फायदे दिसू लागल्यामुळे लायसन्स परमिट राज अधिकच कडक होत गेले.
**अर्थव्यवस्थेने अशी वळणे दोन वेळा घेतली. एकदा ६७-७१ दरम्यान आणि दुसर्यांदा ९१-९५ दरम्यान. पहिल्यावेळी डावीकडे झुकण्याबाबत तेव्हा प्रबळ विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला काही आक्षेप नव्हता. दुसर्यावेळी तेव्हाच्या प्रबळ विरोधी पक्ष असलेल्या भाजपला उजवे वळण हवेच होते. त्यातून दुसर्यावेळी जनता तर रस्त्यावर बाबरी मशिदीचा प्रश्न सोडवण्यात मशगूल होती.
व्यक्तीचे आणि त्याच्या कृतीचे मूल्यमापन त्या काळात उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे केले जावे. आज ठाऊक झालेल्या गोष्टींवरून नव्हे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सर्वांगीण
ही सांगड तेव्हाच्या काळानुरुप नव्हती. कारण त्याच्याच आगेमागे स्वतंत्र/स्वायत्त झालेल्या पूर्व आशियाई देशांनी (तैवान, कोरिया इ.) छोट्या-छोट्या वस्तूंच्या कारखान्यांची उभारणी केली आणि अवजड उद्योगांसाठी बाहेरच्या भांडवलाची मदत घेतली. आपण मात्र निर्याताभिमुख अर्थव्यवस्था घ्यायचे टाळून परकीय राजवटीच्या भयगंडाने आयातविकल्पाचे धोरण स्वीकारले. यात लॉजिक असे होते की कुटीरोद्योगाने छोट्या वस्तूंचा पुरवठा होईल आणि सरकार पोलाद वगैरे मोठे भांडवली प्रकल्प राबवेल. त्यात पुन्हा समाजवादाची फोडणी देऊन कशाचे किती उत्पादन करायचे वगैरे नियम टाकून "लायसेन्स राज" (हा सी. राजगोपालाचारींचा शब्द. त्यांनी म्हणे मुक्त अर्थव्यवस्थेची भलामण करणारा एक पक्ष काढला होता पण आर्थिक मदतीअभावी तो बंद पडला.) तयार केले गेले. त्यामागची संकल्पना उदात्त असली तरी खूपच स्वप्नाळू होती.
बॉम्बे प्लॅन म्हणजे बोक्यांनी (कळत? नकळत?) लोणी खाण्याचा एक प्रयत्न होता. हे उद्योगपती कोण? तर जेआरडी टाटा, जीडी बिर्ला वगैरे मोठमोठे आणि प्रस्थापित लोक. या "समाजवादी" प्लॅन नुसार दुसर्या कोणाही भारतीय माणसाला उद्योजक होणे दुष्प्राय होणार होते आणि या मोठ्या लोकांना आपोआपच परवाने (आणि त्याचबरोबर एकाधिकारशाही) मिळणार होते. मग कोण विरोध करेल? तरीही आपण असे समजू या की त्यांनी हे चांगल्या हेतूनेच केले.
त्याचवेळी अमेरिकेने शेतीवर लक्ष द्या असे सांगितले ते कानाआड टाकण्यात आले.
आपण गव्हाची आयात ५६ सालापासून करत होतो. प्रश्न आधीच बिकट होता. ६६ साली उलट सी.सुब्रमण्यम यांनी मेक्सिकन गव्हाचे बियाणे आयात करून हरितक्रांतीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. शिवाय दुसर्या पंचवार्षिक योजनेनुसार जे पीएसयु तयार झाले त्यांच्याकडून कोणत्याही नफ्याची अपेक्षा केली गेली नाही उलट त्यांच्या तोट्याचे (आणि अकार्यक्षमतेचे) समर्थनच केले गेले. स्वतः अर्थमंत्री सी.डी.देशमुख यांनी या योजनेबद्दल पुरेशी चर्चा न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
भारताला सुरुवातीपासून (केनेडींमुळे) सर्वात जास्त मदत अमेरिकाच करत होती. पण नेहरूंनी जॉह्न्सनच्या काळात व्हिएतनाम युद्धावर जाहीरपणे नैतिक प्रवचन दिल्यामुळे अमेरिकेने नाक दाबायला सुरु केली. पुढे हेन्री किसिंजर जो नेहरुंच्या अलिप्तपणाच्या धोरणांचा आणि नैतिक मास्तरकीचा कट्टर विरोधक होता त्याने अमेरिकेचे धोरण पाकिस्तानकडे झुकवले आणि भारत सोव्हिएत रशियाच्या डाव्या कुशीत जाऊन बसला.
इतिहासावरून आपण नेहमी चुकीच्याच गोष्टी शिकतो हाच मुख्य प्रश्न आहे याच्याशी सहमत. वरची सर्व माहिती मला आज ठाऊक झाली असली तरी ज्यांनी ती लिहीली आहे ते तेव्हा जिवंत होते आणि बहुसंख्य भारतीयांप्रमाणे नेहरूंच्या प्रेमात आंधळे झालेले नव्हते.
>>ही सांगड तेव्हाच्या
>>ही सांगड तेव्हाच्या काळानुरुप नव्हती. कारण त्याच्याच आगेमागे स्वतंत्र/स्वायत्त झालेल्या पूर्व आशियाई देशांनी (तैवान, कोरिया इ.) छोट्या-छोट्या वस्तूंच्या कारखान्यांची उभारणी केली आणि अवजड उद्योगांसाठी बाहेरच्या भांडवलाची मदत घेतली. आपण मात्र निर्याताभिमुख अर्थव्यवस्था घ्यायचे टाळून परकीय राजवटीच्या भयगंडाने आयातविकल्पाचे धोरण स्वीकारले.
तैवानचे उदाहरण योग्य नाही कारण तैवाननेही इंपोर्ट सब्स्टिट्यूशनचाच मार्ग सुरुवातीच्या काळात अंगिकारला होता.
The government also carried out an import substitution policy, taking what was obtained by agriculture to give support to the industrial sector, trading agricultural product exports for foreign currency to import industrial machinery, thus developing the industrial sector. The government raised tariffs, controlled foreign exchange and restricted imports in order to protect domestic industry. By the 1960s, Taiwan's import exchange industry was faced with the problem of saturating the domestic market.
In 1962, Taiwan had a per-capita gross national product (GNP) of $170, placing its economy on a par with those of Zaire and Congo.
उजवे वळण योग्य आणि डावे वळण अयोग्य हे निदान १९६० पर्यंत तरी "स्वयंसिद्ध" नव्हते.
पॉलिसीमधला शिफ्ट तैवानमध्येही १९६० नंतरच आला. जो भारतात उलट दिशेने गेला असे मी माझ्या प्रतिसादात म्हटलेच आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
भारतातही दुसर्या पंचवार्षिक
भारतातही दुसर्या पंचवार्षिक योजनेत घेतलेल्या निर्णयांवर टीका होऊन बदल करण्याचे प्रस्ताव १९५७ सालीच आले होते. वकील आणि ब्रह्मानंद या अर्थशास्त्रज्ञांनी Wage Goods Theory मांडून पर्यायी मार्ग सुचवला होता पण तो दुर्लक्षित राहिला. निर्णय घेण्यात वाईट काहीच नाही. तो न बदलण्यात आहे.
आता मुक्त अर्थव्यवस्था आली म्हणून त्यावेळच्या निर्णयांना नावे ठेवायचा उद्देश नाही. परंतु एका विशिष्ट वर्गाच्या तत्वांपुढे सर्व पर्यायांचा विचार झाला नाही. बाहेरच्या कंपन्यांचे समजू शकतो. पण भारतीयांना उद्योग सुरु करण्यात आडकाठी करण्याचे काय कारण?
यात पुन्हा ब्रिटीश विचारसरणीचाही भाग आहेच पण मुळात नफा कमावणे हे पाप आहे किंवा आम्हाला शेतीवर लक्ष द्यायला सांगतात हा प्रगत देशांचा आम्हाला मागास ठेवायचा डाव आहे असे म्हणणे किंवा घरात दाणा नसताना ज्यांनी मदत केली त्यांची जाहीर निंदानालस्ती करणे या चुका झाल्यात हे नक्की. मग त्या कबूल करण्यात काय अडचण आहे? नेहरू किती वाईट होते हे इथे कोणीच सिद्ध करायचा प्रयत्न करत नाहीय.
जे तत्ववादी आणि स्वप्नाळू नेहरू अठरा वर्षांत करू शकले नाहीत ते साध्या पण व्यवहारी लालबहादूर शास्त्रींनी १९ महिन्यात करून दाखवले. हरित क्रांतीचा पाया त्यांनीच रचला आणि १९६५ मध्ये औद्योगिक उत्पादनवाढीचा दर ५ वरून ७.७% वर गेला. एक युद्ध होऊन सुद्धा. दुर्दैवाने नेहरूंच्या आवडत्या तत्वांच्या प्रभावाखालीच वाढलेल्या इंदिरा गांधींनी पुन्हा पकड घट्ट केली आणि MRTP सारखे कायदे करून औद्योगिक वाढीचा दर ४% वर आणून ठेवला. त्या काळात (७० ते ८० च्या दशकामध्ये) किती अर्थशास्त्रज्ञ देश सोडून गेले याचा मागोवा घेतला तर तो उद्बोधक ठरेल.
अवांतर
"India Unbound"बद्दल वेगळं लिहीणार असाल तर उत्तमच. पण आता ते ही पुस्तक यादीत टाकलं आहे. आधीही एका कलीगकडून या पुस्तकाची प्रशंसा ऐकलेली होतीच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तैवान आणि दक्षिण कोरिया
ही दोनच उदाहरणे मलाही माहीत आहेत. परंतु हे दोन्ही एकीकडे कॉम्युनिस्ट एकीकडे बिगरकॉम्युनिस्ट विभाजन झालेल्या देशांची शकले आहेत. दोघांवरती अमेरिकेच्या सैन्याचे प्रत्यक्ष छत्र आहे. दोन्ही देशांत सुरुवातीला (अनेक दशके) हुकुमशाही होती, आणि मुक्त बाजारपेठेत मिळाला असता त्यापेक्षा अधिक धनाची आवक पाश्चिमात्य देशांकडून होती. त्या दोन देशांतली आर्थिक प्रगती काचघरातली होती (बाहेरून खते, आणि नैसर्गिक धोक्यांपासून बाहेरून छत्र), अशी शंका मला येते.
(हीच बाब १९९० च्या आधीच्या सुखी क्यूबाबाबत म्हणता येईल. स्वावलंबितेपेक्षा बाहेरची मदत.)
भारतात त्या काळात जर मुक्त अर्थव्यवस्थेची धोरणे राबवली असती, तर या दोन अपवादात्मक देशांसारखे झाले असते, असे मला वाटत नाही. परंतु पाकिस्तान, इन्डोनेशिया, नायजेरिया... वगैरे बहुसंख्य देशांसारखी परिस्थिती येण्याची शक्यता अधिक होती.
बरोबर आहे
पण जपान मध्ये तर १८७० मध्येच मेइजि पुनर्स्थापना झाली आणि व्यापारी वर्गाला खूप प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्यावर अमेरिकेचा अंमल नव्हता (प्रभाव असेल कदाचित).
भारताचे पहिल्या दहा वर्षांत तुकडे होतील असा अंदाज खूप लोकांनी वर्तवला होता पण ते झाले नाही. याचे कारण आर्थिक निर्णय नाहीत.
रिलेव्हंट गांधीजी
अदिती, दळणवळणाची साधनं प्रगत झाली आहेत हे खरं आहे, पण त्यात एक रायडर आहे. अजूनही ही साधनं सर्वांसाठी सहज उपलब्ध नाहीत. ज्यांना उपलब्ध आहेत, त्यांनाही त्याची किंमत द्यावी लागते, फक्त पैशांतच नव्हे, तर पर्यावरणाच्या किंमतीतदेखील. त्यामुळे अजूनही गांधीजींचे प्रस्तुत विचार भारतातील आणि जगातीलही बर्याच मोठ्या भागाला लागू पडतात असे वाटते. असेही विकासाच्या वेगळ्या वाटा शोधणार्या मंडळींना गांधीजींचा खूप मोठा आधार वाटतो तो या रिलेव्हंट फॅक्टर मुळेच.
ऋषिकेश, या लेखासाठी आभार. अजून काही बोलायचं आहे, येतोच.
सर्वकाळ हवीत म्हणून
सर्वकाळ हवीत म्हणून इंग्लंडमधे न्यूझीलंडमधली सफरचंदं मे महिन्यात आयात करण्याचं समर्थन मी करत नाही. पण भारताची साखर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात बनणार, पंजाब-हरियाणात गहू पिकणार, आंध्रात तांदूळ, बिहार-झारखंडमधून कोळसा मिळणार या गोष्टी बदलण्यात आजच्या काळात काही हशील आहे असं मलातरी वाटत नाही.
गांधीजींच्या काळात भारताची लोकसंख्या आजच्या अर्धीही नसेल. आज भले खेडी स्वयंपूर्ण नसतील तर अर्धपोटी, उपाशी जनतेची आकडेवारी काय आहे? जिथे शक्य आहे तिथे पावसाचं पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणी आयात करण्याची वेळ येऊ देऊ नका हे पटतं. पण एनर्जी सरप्लस म्हणून प्रोडक्टीव्हीटी वाढते, त्यातून स्वस्तात अनेक गोष्टी उपलब्ध होतात, अनेकांना रोजगार मिळतो त्याचं काय? स्वयंपूर्ण खेडं बनवताना दहा एकराच्या तुकड्यावर वीस-पंचवीस अवलंबून जीव हे गणित परवडण्यातलं वाटतं का?
दळणवळणाची साधनं आजही सर्वांना समान प्रमाणात उपलब्ध नाहीत हे मलाही मान्य आहे. त्यात अजूनही बरीच प्रगती बाकी आहे. पर्यावरणाची मोजदादच करत बसलो तर शंभर कोटींच्या वर लोकसंख्येला आज भारत पोसू शकतो का? पर्यावरणाकडे दुर्लक्ष करा असं मी म्हणत नाही, पण पृथ्वीच्या पोटातून पाणी आणि वातावरणातली हवाही वापरण्याची चोरी नको व्हायला!
निरंजन आणि नितिन यांची चर्चा आवडते आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कॅव्हिएट्स
गांधीजींवर इथे थोडासा अन्याय करत आहात. त्यांनी घेतलेली कॅव्हिएट्स लेखातूनच उद्धृत करतो :-
चांगली चर्चा
गांधीजींचे सर्व विचार आजच्या घडीला पटण्याजोगे नाहीत हे खरेच आहे. पण सामा़जीक परिस्थिती, तंत्रज्ञानाची उपलब्धता, व्यापाराचे स्वरूप अशा अनेक बाबींचा विचार प्रश्न सोडवताना व्हायला हवा.
चांगली चर्चा सुरू केल्याबद्द्ल ऋषिकेश यांचे आभार.
सहमत.
हा या चर्चेतील प्रस्तावास धरून असा एकमेव सेन्सिबल प्रतिसाद आहे असे मला वाटते.
पुढे मी जे लिहितो आहे ते थोडे विस्कळीत वाटेल, पण थोडा गांधी विचार, थोडा इतिहास अभ्यासला असेल तर लिंक लागेल कदाचित.
Its about contexts.
When we try to judge the concept of self sufficient village, we are trying to apply today's contexts to the concept.
संदर्भ पाहिले तर त्या काळी या देशाची परिस्थीती काय झाली होती, करण्यात आली होती? का 'खादी' चा सकृतदर्शनी अतिरेकी प्रचार झाला? हा विचार करून पहा.
आपण आज म्हणतो, 'भारत शेतीप्रधान देश आहे'. इतका जुना इतिहास/सभ्यता(हिंदीतील अर्थाने वाचावा. पटकन मराठी चपखल शब्द सुचत नाहिये) असलेला देश शेतीसारखा मूलभूत व्यवसाय का बहुसंख्येने करीत असावा? गांधी भारतात परत आल्यावर निळीचा सत्याग्रह केला.
गावोगावी जिनिंग प्रेसिंग मिल्स दिसतात. त्या का दिसतात?
या देशात इंग्रज येण्याआधी इथल्या प्रगत व्यवसायांची परिस्थीती काय होती? उदा. खादीच्या संदर्भातच बोललो तर, रेशीम किंवा ढाक्याची मलमल कुठे गेली?
इथले व्यवसाय अवाजवी व जुलमी कर लावून बंद पाडले गेले.
मनुष्य इतर सगळे प्रयत्न थकल्यावरच शेती सारख्या 'आदिम' उद्योगाकडे वळतो, त्या शेतीचीही वाट लावली गेली. अमेरिकत गुलाम नेऊन कापूस पिकवला गेला. इथे खाण्याचे पीक सोडून निळ, कापूस यांची शेती करण्यास भाग पाडले गेले.
लँड रेव्हेन्यू हे सर्वात करप्ट खाते इंग्रजांची देन आहे. शेतसारा आकरणी, आणेवारी यांच्या मार्फत केलेली आधीच गांजलेल्या शेतकर्याची पिळवणूक किती होत होती हे एकादे जुने ग्याझेट वाचल्यास समजते
ही झाली काँटेक्स्ट.
या पार्श्वभूमीवर आता स्वयंपूर्ण खेडे ही कल्पना पहा. इथला कापूस इथेच वापरा, सूत कताई करा, हे समजून बघा? गांधीबाबा काही वाय्झेड टीव्हीवर सत्संगाचे कार्यक्रम करीत आर्टऑफ्लिविंग शिकवीत नवता. तरी लोक येडे होऊन सूत कताई का करत असावेत बरे?
त्यांच्या अनेक कन्सेप्ट्स मला पटत नाहीत. पण स्वयंपूर्ण खेडे ही एक आहे, जी फार आवडते.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
तरीच!
संस्कृती?
थोडक्यात, जुन्या व्यवस्थेतील 'प्रिविलेजेस' गमावलेल्यांच्या रडीतून भारतीयांचे टप्प्याटप्प्याने आधी शेती, मग स्वयंपूर्ण खेड्याच्या संकल्पनेकडे संक्रमण होत गेले, म्हणायचे तर.
तरीच, 'सोन्याचा धूर' वगैरे नॉस्टाल्जिया आळवणारे आजही अधूनमधून आढळतात. एकदा "ती" नशा चढली, की डोळ्यात जाणारा सोन्याचा धूरसुद्धा गोग्गोड असतो.
कदाचित इतिहास(पुनर्)लेखकांत 'सोन्याचा धूर'वादी जमातीचा वरचष्मा राहिल्याने त्यांच्या फ्यांटश्या त्या तमाम हिंदुस्थानच्या फ्यांटश्या, असा भास (अगदी स्वाभाविकपणे) होत असावा काय?
(असो. आता गंभीर प्रतिसाद.)
स्वातंत्र्यपूर्व/वसाहतीच्या काळात स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना (सगळी धूळधाण झालेली असताना, स्वतःच्या पायांवर पुन्हा एकदा उभे राहण्यासाठी) कदाचित समजण्यासारखी आहे. पण दीर्घकालीन दृष्टिकोनातून त्यालाच चिकटून राहण्याचा अट्टाहास कितपत सयुक्तिक आहे?
'प्रत्येक खेड्याने स्वयंपूर्ण व्हावे' हेही समजू शकतो. नव्हे योग्यच आहे. पण एकदा स्वयंपूर्ण झाल्यावर, त्याहून अधिक उत्पादन आम्ही करणारच नाही, जेमतेम स्वयंपूर्ण राहण्याइतपतच उत्पादन करत राहू, कमी नाही की अधिक नाही, ही मर्यादा आम्ही आम्हालाच घालून घेऊ, हा विचार काही केल्या समजत नाही.
'जास्तीचे उत्पादन करून प्रथम शेजार्याच्या गरजा पुरवण्यासाठी ते दिल्यावर त्यातूनही उरलेले छानपैकी निर्यात करू, जगाला पुरवू, नि मस्तपैकी परकीय चलन कमावून जीवनमान उंचावू (नव्हे, इतके उत्पादन करू की शेजार्याच्या गरजा पुरवूनसुद्धा निर्यात करायला भरपूर उरेल, हे ध्येय ठेवू)' असा (प्रॅग्मॅटिक) विचार नेमका का नसावा? अतिरिक्त उत्पादनाला इतका विरोध का? अतिरिक्त उत्पादनाचा व्यय सर्वोदयासाठी नेमका कसा करायचा, यादृष्टीने काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवता आलीच नसती का?
(गांधीजी नक्की गुजरातीच होते ना?)
(अतिअवांतरः
म्हणजे गांधीजींचीही समृद्धीची अल्टिमेट कल्पना 'घृतं पिबेत्' हीच होती म्हणायची तर! ('प्रिविलेज्ड! प्रिविलेज्ड!!!'))
एकदा स्वयंपूर्ण झाल्यावर,
अगदी अगदी!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
माझ्यापुरता वाटलेला तर्क
स्वयंपूर्ण खेड्याबद्द्ल विचार करता नेमका हाच आक्षेप माझ्या मनात येतो - येत असे. हे कुपमंडूकत्त्वासारखे विचार मलाही खटकत. मात्र गांधीजींच्या विविधविषयांच्या मताच्या, मार्गांच्या चित्रातला हा स्वयंपूर्ण खेड्याचा तुकडा बसवल्यावर हे तत्कालिक परिस्थितीत बसता पटले. माझा विचार इथे देतो आहे अर्थात हा मी माझ्यापुरता शोधलेला तर्क आहे.
गांधीजींच्या एकुणच तत्त्वांचा, मार्गांचा सर्वात मोठा 'युएस्पी' जर कुठला असेल तर "होय! मी हे करू शकतो" अशी लोकांमधे निर्माण होणारी भावना. प्रत्येकाला आपले घर, व्य्वसाय, कुटुंब यांची काळजी घेऊनही देशासाठी काहि करायचं असतं - असे. त्यात त्यावेळी टिळक व इतरांनी असंतोष पसरून 'तयार केलेली' जनता. अश्यावेळी हे सारं सांभाळूनही करता येतील असे मार्ग गांधीबाबांनी दाखवले. त्यांच्या मार्गांचे कोणावर दडपण येत नसे.
अश्यावेळी, नुकतीच स्वतंत्र झालेली खेड्यापाड्यातील जनता ज्यांना शिक्षणापासून मुलभुत सोयीपर्यंत कसलाही गंध नाही, जातीव्यवस्था-अस्पृष्यता खोलवर रुजली आहे, केवळ गांधीबाबांच्या मागे जायचं इतकंच महित असणार्या तत्कालिन लोकांना अचानक आता आधुनिक काळाप्रमाणे 'इतके उत्पादन करू की शेजार्याच्या गरजा पुरवूनसुद्धा निर्यात करायला भरपूर उरेल, हे ध्येय ठेव' अशी टार्गेट कितपत झेपली असती? स्वयंपूर्ण खेडे हिच मुळात सोपी गोष्ट नव्हती (अजुनही नाही) ती पुर्ण व्हायच्या आधीच दुर दुरची टार्गेट देऊ करणं तसही गांधीच्या पद्धतीच्या विपरीतच वाटतं
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मुद्दा तो नाही
'येस, वी कॅन'ची फिलॉसॉफी अर्थातच मान्य आहे. तिच्याबद्दल आदरच नव्हे, विश्वास, कदाचित कौतुकही आहे. मुद्दा तो नाही.
प्रश्न असा आहे, की गांधींची भूमिका, त्यांचा 'रोल', त्यांचा 'आउटलूक' केवळ एक कुशल 'कम्युनिटी ऑर्गनायझर' एवढ्याच मर्यादित दृष्टिकोनातून पहावा का?
माझ्या मते नाही. आणि म्हणूनच, अधिक मोठ्या अपेक्षेतून पाहताना प्रश्न पडू लागतात. या प्रश्नांना उत्तरे नसतील असे नाही, पण माझ्या वाचनमर्यादेमुळे म्हणा किंवा अन्य कोणत्या कारणाने म्हणा, ती माझ्यापर्यंत पोहोचलेली नाहीत, असे म्हणू.
नुकत्याच स्वतंत्र झालेल्या, शिक्षणाचा, मूलभूत सोयींचा आणि एकंदरच स्वतःची प्रगती ('प्रगती'ची कोणतीही व्याख्या गृहीत धरली तरी) करण्याच्या संसाधनांचा तुटवडा असलेल्या जनतेला अचानक मोठी ध्येये देण्यातून काहीच साध्य होण्यासारखे नाही, ते शक्यकोटीतीलही नाही, तस्मात सुरुवातीची ध्येये ही तुलनेने लहान पण साध्य अशीच असली पाहिजेत, हे तर उघड आहे. त्याबद्दल शंका नाही, शंका असण्याचे काही कारण दिसतही नाही. परंतु, जनतेत मुळात कधी कोठल्याही प्रगतीची क्षमताच नाही, असे तर नाही! किंबहुना गांधींचेही असे काही गृहीतक खचितच नसावे. (किंवा, जनतेने कायम अप्रगत अवस्थेतच रहावे, असाही उद्देश किंवा अपेक्षा निश्चितच नसावी. गांधींच्या इंटेग्रिटीबद्दल कोणत्याही प्रकारचा संदेह नाही.) म्हणजे, संसाधनांचा अभाव ही केवळ तात्कालिक, तात्पुरती अडचण आहे. याचाच अर्थ, जनता प्रगतीचा हा पहिला टप्पा कधी ना कधी ओलांडणार (आणि, 'होय, मी हे करू शकतो'चे स्पिरिट असेल, तर दीर्घकालाने नव्हे, तर लवकरच ओलांडणार) हे ओघानेच यावे.
आता, प्रगतीचा हा पहिला टप्पा ओलांडताना संसाधनांच्या अभावापोटी अतिशय नाइलाजाने स्वतःवर घालून घेतलेल्या काही अपरिहार्य मर्यादा या तात्कालिक न राहता जर तत्त्वांतच थिजल्या, तर त्या, प्रगतीचा तो पहिला टप्पा ओलांडल्यावर पुढील प्रगतीस निश्चितच मारक ठरतील, हा पुढील विचारही आधीच करून, तसे न होण्याच्या दृष्टीने एखादा दूरदृष्टीचा नेता काही मार्गदर्शक तत्त्वे मांडेल, आपली विचारधारा पुरेशी स्पष्ट करेल, अशी अपेक्षा निर्माण होते. गांधींनी असा विचार केला असल्यास आणि तो सुस्पष्ट रीत्या मांडला असल्यास त्याचा पुरेसा प्रसार दुर्दैवाने झालेला नाही, आणि म्हणूनच शंकाकुशंकांना पुष्कळ वाव राहिलेला आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते. या दृष्टीने काही अधिक प्रकाश पडू शकल्यास तो उपयुक्त ठरेल असे वाटते.
उदाहरणादाखल, याच लेखात उद्धृत केलेल्या विचारांत गांधी म्हणतात, की 'आपल्याला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपण गावातच तयार करू शकू हे कधीही शक्य नाही. जरी आपले ध्येय पूर्ण स्वावलंबित्व असले तरी जे पदार्थ आपण गावात तयार करू शकत नाही ते बाहेरून आणावेच लागतील.' पण पुढे त्याच परिच्छेदात ते असेही म्हणतात, की 'मात्र गरजेपेक्षा अधिक निर्माण करून ते मुंबईला किंवा दूरच्या शहरात धाडू नये. शहरात निर्यात करण्यासाठी म्हणून काही अधिकचे तयार केले जाता कामा नये.' आता समजा, गावात एखादी आवश्यक गोष्ट बनत नाही, आणि ती तूर्तास तरी शहरातून आणणे गरजेचे आहे. (पुढेमागे अशी वस्तू गावातच - किंवा फार तर शेजारच्या गावात - बनू शकली, तर अर्थातच उत्तम. परंतु तोपर्यंत, इतर पर्यायांच्या अभावी, समजा अशी वस्तू शहरातूनच आयात करणे गरजेचे आहे.) अशा परिस्थितीत ती वस्तू शहरातून आयात करण्यास गांधींचा विरोध अर्थातच नाही.
आता अशी एखादी वस्तू जर शहरातून आयात करायची म्हटली, तर ती शहरवासीयांकडून भीक मागून तर काही आणायची नाही. आणि विकत आणायची म्हटले तर त्या वस्तूच्या बदल्यात शहरवासीयांस विनिमय म्हणून काही तर द्यावेच लागेल. आता, शहरवासीय ती वस्तू गावास नेमके काय म्हणून किंवा कशाच्या बदल्यात पुरवतील? तर त्याकरिता, शहरवासीयांस उपयुक्त असलेली एखादी वस्तू किंवा सेवा (किंवा सममूल्य विनिमय) शहरवासीयांस अर्थातच अपेक्षित असणार. म्हणजे शहरवासीयांस वांच्छित आणि/किंवा आवश्यक अशी एखादी वस्तू किंवा सेवा (किंवा सममूल्य विनिमय) निर्माण करणे आले. परंतु मुद्दाम शहरवासीयांस पुरवण्यासाठी म्हणून काही उत्पादन करणे हे तर तत्त्वाच्या विरोधात आहे!
उलट बाजूने बघू. याच तत्त्वानुसार, केवळ शहरात बनणारी परंतु गावास आवश्यक असणारी एखादी वस्तू ही शहरवासीयसुद्धा केवळ शहराची गरज भागवण्यापुरत्या प्रमाणातच जर बनवू लागले, आणि यदृच्छेने जर कधी चुकून अतिरिक्त उत्पादन झालेच, तर आणि तरच ते गावास विकू लागले, तर गावदेखील अशी वस्तू विकत आणणार कशी? (पिकलेच नाही, तर विकत काय घेणार?) लक्षात घ्या, ही शहरात बनणारी आणि गावात न बनणारी वस्तू म्हणजे मोटारगाडीच असेल असे नाही, तर एखादे जीव वाचवणारे अत्यावश्यक औषधही असू शकेल. पुढेमागे जेव्हा प्रत्येक गाव हे आपापली औषधे बनवण्याइतके स्वयंपूर्ण बनेल, गावोगावी जेव्हा औषधाचे कारखाने बनतील (हे कितपत शक्य किंवा साध्य आहे याबद्दल साशंक आहे.), तेव्हा ठीक आहे, परंतु तोपर्यंत, मर्यादित संसाधनांच्या, मर्यादित प्रगती झालेल्या काळात, गरजा भागवण्याकरिता नि आपल्या भागात न बनणार्या आवश्यक वस्तू इतर ठिकाणांहून आयात करण्याकरिता, त्या जेथून आणायच्या तेथे त्या अतिरिक्त प्रमाणात बनल्या पाहिजेत, नि त्या पुरवणार्या पुरवठादाराच्या गरजा भागवणारी परंतु पुरवठादाराच्या इलाख्यात न बनणारी एखादी वस्तू इतरत्र कोठेतरी अतिरिक्त प्रमाणात (यदृच्छेने नव्हे, तर योजनेने) बनली पाहिजे, हे सकृद्दर्शनी उघड आहे.
अशा काही अगदी प्राथमिक मुद्द्यांबद्दलच्या शंकांचे समाधानसुद्धा गांधींचे आर्थिक विचार ज्या प्रकारे प्रसृत झालेले आहेत, त्यातून होताना दिसत नाही. याचा अर्थ गांधींनी याबद्दल विचार केलेला नसेलच, असा अर्थातच होऊ नये. परंतु तो पुरेशा सुस्पष्ट रीतीने आणि पुरेशा प्रमाणात सर्वत्र पोहोचलेला नाही, त्याच्या प्रचार-प्रसार-स्पष्टीकरणार्थ आणखी प्रयत्नांस मुबलक वाव आहे, आणि असे पुरेसे आणि योजनाबद्ध प्रयत्न झाल्यास कदाचित बराच धुरळा कमी होण्यास मदत होईल, असे वाटते.
(हे अर्थातच गांधींचे आर्थिक बाबतीतील विचार ग्राह्य आहेत, हे गृहीत धरून झाले. तूर्तास या मुद्द्याबद्दल माझे निश्चित असे मत झालेले आहे असे वाटत नाही. तूर्तास तरी, 'गांधींचे आर्थिक बाबतीतील विचार पटलेले नाहीत' म्हणण्यापेक्षा, 'गांधींचे आर्थिक बाबतीतील विचार समजलेले नाहीत, परंतु ते जसे दिसून येतात, त्यावरून ते अजूनपर्यंत वरकरणी तरी पटण्यासारखे वाटलेले नाहीत; अर्थात यात आणखी काही खोचा असल्यास प्रामाणिकपणे, कल्पना नाही' असे म्हणणे अधिक सयुक्तिक वाटते.
उलटपक्षी, ते विचार ग्राह्य असलेच पाहिजेत, असेही नाही; आणि यदाकदाचित अंतिम पृथक्करणाअंती ते ग्राह्य नाहीत असे निष्पन्न झाल्यास, 'ते ग्राह्य नाहीत' असेही प्रांजळपणाने कबूल करण्यास काहीच प्रत्यवाय नसावा. गांधींचे - किंवा कोणाचेही - एखाद्या विशिष्ट बाबतीतील विचार हे विचाराअंती ग्राह्य धरण्यासारखे न निघाल्यास त्यामुळे त्या व्यक्तीच्या - या ठिकाणी गांधींच्या - थोरवीवर काहीच फरक पडण्याचे कारण नाही. प्रत्येकाचे प्रत्येक बाबतीतले विचार हे ग्राह्य असलेच पाहिजेत - किंवा, एखादी व्यक्ती ही थोर आहे, म्हटल्यावर त्या व्यक्तीचा प्रत्येक विचार किंवा प्रत्येक शब्द सुभाषितमोलाचा असला पाहिजे - असे थोडेच आहे? गांधींना आजूबाजूची परिस्थिती जशी दिसली, आणि त्याप्रमाणे त्यांना जे योग्य वाटले, जसे विचार त्यांच्या मनात आले, तसे ते त्यांनी मांडले. लोकांना पटोत न पटोत, त्यांना जोपर्यंत एखादी गोष्ट मनापासून पटली, तोवर ती कोणाचीही किंवा कसलीही भीड न बाळगता त्यांनी बिनदिक्कतपणे मांडली, अगदी अट्टाहासाने मांडली; गांधींची थोरवी माझ्या लेखी यात आहे. आणि त्यांचा प्रत्येक विचार हा बरोबर होता वा नव्हता याने त्यात काहीही फरक पडत नाही.)
प्रतिसाद आवडला
याच्याशी सहमत आहेच. इतकेच काय अहिंसा, सत्य, स्वदेशी वगैरेंवर लेखन करणार्या गांधीजींनी या विषयावर भाषणांमधे विचार बोलून दाखवला असला तरी फारसे सखोल लेखन केलेले नाही (मला दिसले नाही -अधिक सयुक्तीक).
दुसरे असे की त्यांचे विचार समजून घेताना त्यातील फोलपणा 'आता' शोधणे तुलनेने सोपे वाटते. माझा प्रयत्न असा आहे की असा (आता अंमलबजावणीस कठीण वाटणारा) विचार-प्रस्ताव समजापुढे मांडण्यामागे-आधी त्यांची काय विचारशृंखला असेल याचा अंदाज करणे. अशावेळी स्वावलंबी गावाचा प्रस्ताव मांडतेवेळी त्यांनी फारसा विचार केलेला नसेल हे गृहितक ठेवले तर हा अंदाज करणे कठीण होते. त्यांनी विचार केला होता असे गृहितक ठेवल्यास त्या विचारांमागाचा तर्क शोधण्यात खरी मजा येते
अर्थातच. किंबहुना आताच्या समाजव्यवस्थेत, गांधीजींच्या मृत्युपश्चात जागतिकीकरणानंतर समाजवादाच्या दिसलेल्या मर्यादा बघता ते विचार 'आता' जसेच्या तसे ग्राह्यच नव्हे तर शक्यही नाही. तत्कालीन जातीव्यवस्थेत बरबटलेल्या, जमिनदार-कारखानदार आणि सरकार या त्रयीच्या हातून पिचलेल्या व स्वतंत्र आर्थिक विचार नसलेल्या गावांतून हे बदल घडवायच्या वेळी त्यांनी असे 'सुलभीकृत' (काहिसे तर्कदुष्ट?) विचार मांडले. ते त्यावेळीही कितपत ग्राह्य, प्रॅक्टीकल होते याबद्दल शंका आहे मात्र ते तत्कालिन 'दिशाहीन' समाजाला (खरां तर केवळ समाजाला नव्हे तर नेत्यांना, कार्यकर्तांना) दिशा दाखवणारे, खास ग्रामिण प्रश्न मांडणारे होते. केवळ प्रश्न न मांडता आपल्यापरीने त्याचे उत्तर द्यायचा हा प्रय्त्न इतपत याकडे बघता येते. दुर्दैवाने त्याकाळी गांधींच्या सामाजिक इंजिनियरिंगला आव्हान देईल अशी व्यक्ती आणि विचारधारा तेव्हा तितकी लोकप्रिय नसल्याने या कल्पनेचे ग्लोरीफिकेशन होऊन काहिसे टोकाचे - खोडसाळ- रूप या(ही) कल्पनेला मिळाले असे वाटते आणि त्याचाच अधिक खेद होतो
बाकी उदा. चांगले आहे. मात्र गरज म्हणून एखादी किंवा काहि वस्तू शहरातून आणणे आणि शहरात निर्यात करण्याला त्यांचा आक्षेप असेल असे वाटत नाही. मात्र शहरा-गावामधे आयात-निर्यात होणे हीच गरज बनण्याला त्यांचा विरोध दिसतो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
माफ करा.
प्रतिसाद हा 'कॉन्टेक्स्ट' बद्दल होता.
माझ्या स्वतःच्या कॉन्टेक्स्ट्स -मराठीत 'संदर्भ'- आपणास ठाऊक नाहीत.
नॉस्टॅल्जिआ बद्दल इथे काहीच नाहिये. जर माझे लिखाण 'नॉस्टॅल्जिक' होते असे आपण म्हणाल, तर त्या काळच्या ग्रामीण भारताबद्दल आपली माहीत अपुरी आहे असे माझे म्हणणे आहे.
आऊटडेटेड कल्पना गांधींना 'लहान' करतात. सगळी धूळधाण झालेलीच होती. अन तेंव्हाच स्वत:च्या पायांवर उभे रहाण्यासाठीचा हा संघर्ष होता. वेगवेगळ्या वेळी (Across time. as contexts changed,) गांधींनीही त्याम्चे विचार बदललेले वरील लेखातच दिसतात. पुनः एकदा वाचून पहा ही विनंती. आज ते खेडे 'तसे' पुनः बनूच शकत नाही. पण म्हणून त्याची आजच्या कालानुरुप आवृत्ती कल्पायची सुद्धा नाही का??
बादवे: सभ्यतेस शब्दार्थ संस्कृती आहे, इतपत जुजबी ज्ञान मराठी व हिंदीचे मला आहे. त्याची 'एक्झॅक्ट' अर्थछ्टा जी माझ्या मनात होती ती सुचवणारा शब्द शोधत होतो.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
उत्तरे
'कॉन्टेक्स्ट'बद्दल आक्षेप आहे असे वाटत नाही. 'कॉन्टेक्स्ट'पलीकडे न पाहता स्वतःला (कायमस्वरूपी?) मर्यादा घालण्याचा प्रकार घडत असल्याचे सकृद्दर्शनी वाटते, ते समजत नाही, एवढेच म्हणणे आहे.
आपण ते जोपर्यंत स्वतः मांडत नाही, तोपर्यंत (१) मला ते ठाऊक असण्याचे, आणि/किंवा (२) ते या संदर्भात महत्त्वाचे (germane) किंवा विचारात घेण्यायोग्य असू शकतील, अशी शंकाही मला येण्याचे, काहीच कारण मला दिसत नाही.
उलटपक्षी, जर ते या संदर्भात महत्त्वाचे असतील, तर आपण ते मांडालच.
असो. नॉस्टॅल्जियासंबंधीचे माझे संदर्भ वेगळे होते. किंबहुना, माझ्या प्रतिक्रियेत नॉस्टॅल्जियासंबंधी जो भाग होता, त्याचा आपल्या प्रतिक्रियेतील कोणत्याही मुद्द्याशी - किंवा खरे तर वरील मूळ लेखाशीही - अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता. त्याचे लक्ष्य अन्यत्र होते; केवळ ते आपल्या प्रतिक्रियेच्या निमित्ताने (किंवा अनुषंगाने) व्यक्त झाले, एवढेच. त्यास आपण 'आडकित्तान्योक्ति' (किंवा 'गांध्यान्योक्ति') म्हणून सोडून देऊ शकता.
गांधींना 'लहान' करण्याचा प्रश्नच नाही, उद्देश तर नाहीच नाही. फक्त, त्यांनी जे विचार मांडले, ते ज्या प्रकारे मांडलेले आहेत त्यातून मला जे अभिप्रेत झाले असे वाटते, त्यानुसार मला तरी ते विचार किंवा त्यांची व्यापक (आणि दूरगामी) संदर्भातील व्यवहार्यता समजलेली नाही (अत एव पटलेली नाही), एवढेच म्हणणे आहे.
यात आणखीही जर काही आयाम असतील, तर ते मला अर्थातच स्पष्ट झालेले नाहीत, आणि या कारणास्तव त्यांचा विचार करण्यास किंवा त्या संदर्भातून पाहण्यास तूर्तास असमर्थ आहे. असे आयाम स्पष्ट होऊ शकल्यास अर्थातच त्यांचा विचार करणे सुकर होईल.
या निरीक्षणाबद्दल काहीच मतभेद नाही.
एवढ्या मर्यादित संदर्भापुरता काहीच आक्षेप नाही. किंबहुना, या उद्दिष्टाच्या साधनापुरते बोलायचे झाले, तर हे विचार उचितच आहेत याबद्दल संदेह नाही. परंतु एकदा स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर, स्वयंपूर्ण झाल्यावर पुढे काय, याबद्दल काही दूरगामी विचार झाला असल्यास, जे काही प्रस्तुत झाले आहे त्यातून तो स्पष्ट होत नाही, आणि जे काही वरकरणी सूचित होते, ते पुढील प्रगतीच्या दृष्टीने सकृद्दर्शनी फारसे उत्साहवर्धक वाटत नाही, उलटपक्षी पुढील प्रगतीस कदाचित खीळ घालणारे ठरू शकेल असे वरकरणी जाणवते. यात गांधींच्या विचारधारेचे इतर काही आयाम लक्षात घेतले गेलेले नसल्यास अर्थातच एक तर त्यांबद्दल काही कल्पना नाही आणि/किंवा ते पुरेसे स्पष्ट झालेले नाहीत, एवढेच म्हणणे आहे.
याबद्दल माझी नेमकी समस्या स्पष्ट करण्याच्या दृष्टीने सवडीने सविस्तर असे काही कदाचित लिहिता येईल. जमल्यास येथे किंवा अन्यत्र लिहीन. पाहू या कसे जमते ते.
यास कोणताही आक्षेप निदान मी तरी घेतल्याचे आठवत नाही. (तसेही, कोणीही काहीही म्हणो, पण भारतात विचारस्वातंत्र्य असावे, तेव्हा वस्तुतः मी आक्षेप घेण्याचा प्रश्नही उद्भवू नये.)
त्याहीउपर, अशी काही कल्पना आपण केल्यास ती मांडायची किंवा नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आपल्याला असावेच. अर्थात, आपण ती न मांडल्यास ती मला (किंवा इतर कोणास) समजण्याची शक्यता सुतराम् नाही. (याचा अर्थ आपण ती मांडल्यास ती समजेलच - किंवा यदाकदाचित समजल्यास ती पटेलच - असा अर्थातच नाही. फक्त, आपली कल्पना इतरांस समजण्याकरिता आणि/किंवा पटण्याकरिता सर्वप्रथम आपण ती मांडणे ही आवश्यक पूर्वअट आहे, एवढेच सुचवण्याचा हा नम्र प्रयत्न आहे.)
आपली समस्या साधारण लक्षात येते. परंतु दुर्दैवाने, culture आणि civilization या दोहोंकरिता, यांपैकी कोणतीही किंवा अन्य संबंधित अर्थच्छटा नेमकेपणाने मांडणारा असा, 'संस्कृती' याव्यतिरिक्त अन्य कोणता शब्द मराठीत उपयोगात असल्यास निदान मला तरी तो माहीत नाही.
एल ओ एल
आपण दोघे एकच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांना सांगत आहोत. मुळात मतभेद नाहीतच. तेंव्हा, सोडून देऊ यात आता.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
गांधीवादावर छान चर्चा चालू
गांधीवादावर छान चर्चा चालू आहे.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
हे एकमेव व्यक्ती आहेत
हे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांच्या बद्दल ते चांगले होते की वाईट, हे मी आज पर्यंत ठरवू शकलो नाही आहे.
प्रत्येक वेळी त्यांच्या बद्दल वाचताना माझे एकतर मत या टोकाला जाते अथवा त्या टोकाला
दोन विचारधारेत व्यक्ती अडकून राहिला असेल तर असं होते, हे देखील माहिती आहे पण... काय करावे.
*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)
ही चांगली गोष्ट आहे असं मी
ही चांगली गोष्ट आहे असं मी म्हणेन. एखादा माणूस संपूर्णपणे पटणं अशक्य आहे, अगदी गांधीजी असले तरीही! त्यांचे जे विचार पटतात ते आपले म्हणायचे, जे पटत नाहीत त्यांच्यासाठी पर्याय शोधायचा. फक्त इतर कोणीतरी बिन्बुडाच्या कारणांसाठी नावं ठेवतं म्हणून आपणही ते करू नये एवढंच.
गांधीजींचे स्वयंपूर्ण खेडी आणि अर्थशास्त्राबद्दलचे विचार मला १००% पटले नाहीत तरीही त्यांचे इतर अनेक विचार पटतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सहमत. मला पुर्णतः गांधीचे
सहमत.
मला पुर्णतः गांधीचे सत्याचे प्रयोग समजलेच नाहीत, पटले नाहीत असे नाही म्हणू शकत.
वाचतो आहे, सध्या मेकर्स ऑफ मॉर्डन इंडिया... बघू अजून काय नवीन समजते ते
*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)
अतिशय योग्य प्रतिसाद आणि
अतिशय योग्य प्रतिसाद आणि विवेचन
गांधी समजायला त्याहूनही आचरणात आणायला अवघड आहेत
पण जेवढ पटत आणि करु शकतो ते करायला हवं
.
>>पण जेवढ पटत आणि करु शकतो ते
>>पण जेवढ पटत आणि करु शकतो ते करायला हवं
ते ही करू शकत नाही.
सांगा पाहू तुमच्या माहितीत असलेला एखादा / एखादी ?
अशक्य आहे, आजच्या जगात तरी अशक्य आहे. किबोर्ड स्वतःचाच आहे म्हणून ढीगभर खोटं लिहू शकतो, पण गांधी च्या तत्त्वज्ञानाप्रमाणे काही अंशी देखील वागणारे सध्यातरी नाहीत एवढं नक्की. शेवटचे व एकमेव सहरद्द गांधी होते.. बाकी सगळ्यांनी गांधीच्या तत्त्वाचा विपर्यासच केला असावा, कारण त्यांच्या नंतर मला दुसरा कोणी कधी दिसलाच नाही / वाचनात देखील आला नाही.
*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)
फक्त इतर कोणीतरी बिन्बुडाच्या
अगदी अगदी.
फक्त हे वाक्य "फक्त इतर कोणीतरी बिन्बुडाच्या कारणांसाठी नावं ठेवतं किंवा बिन्बुडाच्या कारणांसाठी भक्ती करतं म्हणून आपणही ते करू नये एवढंच." असं असतं तर मला जास्त बरोबर वाटलं असतं.
मान्य आहे.
मान्य आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
चांगले संकलन
चांगले संकलन आहे. गांधींचे मत (मला आधी वाटत असे तितके) अतिसुलभीकृत वाटत नाही.
आभार
एकदा का व्यक्ती 'महान' आहे म्हटले की त्या व्यक्तीचे बोलणे हे कानोकानी पोहोचेपर्यंत त्याचे इतके सुलभीकरण झाले असते की मुळ विचार अनेकदा हरवल्यासारखा वाटतो. नुसता विचारच नाही तर त्यामागची पाश्वभूमी, तत्कालिन घटनांचे आता उपलब्ध असणार्या तथ्यांवरून केलेले परिक्षण वगैरेही कळत-नकळत होतच असते. अश्यावेळी मुळ विचार समजुन घेणे मला अनेकदा कठीण जाते.
दोनेक वर्षांपूर्वी आजानूकर्ण यांनी गांधीजींच्या एका सुंदर लेखाचा दुवा दिला होता (बहुदा मिपावर- शोधतो आणि इथेही देतो), त्यामुळे मला गांधींच्या स्वावलंबी खेड्याच्या कल्पनेची थोडी विस्ताराने ओळख झाली. मग त्यांचे या बाबतीत विचार वाचले, काही संकलने जालावर सहज उपलब्ध आहेत. अर्थात आता शहरी वर्गाला उपलब्ध असलेल्या अनेक सोयी, वस्तु, सुविधा वगैरे त्यांच्या कल्पनेत कुठेही बसत नाही. आणि त्या मिळण्यात मुक्त बाजारपेठेचा वाटा आहे हे नाकारायचा प्रश्नच नाही. मात्र ट्रेकिंगच्या निमित्ताने जेव्हा कुठे खेड्यात जातो, ट्रेकिंगला जाताना खालच्या गावातली मुले टपरीवर केवळ सिगारेटी फुंकताना (आणि निवडणूका आल्या की पैसे घेऊन व दारू पिऊन सभांना जाताना) दिसतात. त्यांना ना गडावर वाट दाखवायचा उत्साह असतो, अधिक पैसे देऊ करूनही ते करणे कमीपणाचे वाटते. काहितरी शिक्षण झाले आहे, टिव्हीवर सुबत्ता दिसते आहे मात्र स्वतःच्या हाताला काम नाही, शहरात टिकण्याइतका पैसा नाही व प्रत्येकात तितकी जिद्द असेल असेही नाही. अश्यावेळी त्या खेड्यातच त्यांना रोजगार व त्या व्य्वसायांनाही प्रतिष्ठा असती तर ही वेळ आली असती का असा प्रश्न मनात येतो. माझाच काय माझ्या आधीच्या तीन पिढ्या मुंबईतल्या आहेत, मात्र मुंबईपुण्यात राहतानाही आजुबाजुला विविध गावांतून आलेली 'जन्ता' बघतो आणि केवळ इथेच पैसा आहे म्हणून आनंदाशी तडजोड करून ते इथे राहताना दिसले की वाईट वाटतं. "गावात योग्य तितका पैसा मिळाला असता तर कशाला आलो असतो या गर्दीत मरायला" यासारखे उद्गार, उसासे टाकणारा शहरी-समाज अपेक्षेपेक्षा बराच अधिक आहे असे आता जाणवू लागले आहे.
अश्यावेळी गांधींचे विचार आताच्या काळातही काहि क्षण भुरळ घालतात. तर त्यावेळी जेव्हा भांडवलशाही, मुक्त अर्थव्यवस्था, शहरीकरणाचे फायदे-तोटे समजायचे होते त्यावेळी त्यांची ही विचारसरणी बहुतांश योग्य वाटते. प्रसंगी ती टोकाची वाटते-आहे, मात्र तो गांधीजींचा स्थायीभाव आहे. त्यांच्या समाजकारणाची ती (थोडे अधिक लाऊड पद्धतीने विचार मांडणे)पद्धत आहे. परवा एका परिचिताशी बोलताना स्वावलंबि खेडे वगैरे सुचणे म्हणजे गांधींना म्हातारचळ लागला होता इतक्या टोकाची प्रतिक्रीया आली आणि यावर लिहावसं वाटु लागलं. लिहायला बसलो मात्र ते अगदीच कृत्रिम होऊ लागलं, म्हणून मग शेवटी गांधींच्याच उद्गारांचा स्वैर अनुवाद करायचा ठरला - माझ्या कोणत्याही टिपणाशिवाय-मताशिवाय.
असो बरंच लाऊड थिंकिंग झालं आता थांबतो. सगळ्यांनी या संयमीत चर्चेत जे मुद्दे पुढे आणले त्याबद्दल सगळ्याचे अनेक आभार. मौजमजा, उत्तम दर्जेदार ललित लेखन आणि संग्राह्य चर्चा यांचे सुरेख मिश्रण ही ऐसीची ओळख होत चालली आहे याचाही आनंद आहेच
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
गाल कुठे आहेत?
हे पाय कुठे आहेत? धरावे म्हणतो. या चाली वर वाचावे.
गाल कुठे आहेत? पप्पी घ्यावी/ गालगुच्चा घ्यावा इ. वाचावे.
इत्कं टाईप केलं तुम्ही तेच तर म्हंतोय ना मी?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
सुंदर चर्चा...
मूळ लेखापेक्षाही चर्चा अधिक रंगतदार वाटते.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
वाचनीय चर्चा
गांधींसारखा मराठी आंतरजालावरील "जनप्रिय" विषय असूनदेखिल चर्चेने कुठेही पातळी सोडली नाही, ह्याचा आनंद वाटतो.
अवांतर
'महर्षी ते गौरी' हे मंगला आठलेकर यांचं पुस्तक वाचते आहे. त्यात अर्थातच 'रधों'बद्दल बरीच माहिती आहे. इतर सर्व कर्तबगार कर्व्यांच्या तुलनेत कर्तबगारी आणि समाजावर उपकार कमी नसूनही 'रधों'बद्दल पुरेशी माहिती सामान्यतः मिळत नाही. रधों फ्रेंच शिकले होते, त्यांनी उपजीवीकेसाठी फ्रेंच-> इंग्लिश अनुवाद केले होते आणि पॅरीसमधे असताना मार्कांपुरता गणिताचा अभ्यास करून इतर वेळात फ्रेंच वाचन केलं होतं, ही माहिती मला त्यातही अधिक रोचक वाटली.
रधोंनी गांधीजींच्या ब्रह्मचर्याची यथास्थित खिल्ली उडवली होती. चार मुलं झाल्यानंतर संन्यस्त आयुष्य जगणार्या गांधीजींच्या विचारसरणीबद्दलच रधोंना शंका होत्या. या विषयासंदर्भात गांधीजींनी सखोल वाचन आणि अभ्यास केलेला नाही असा रधोंचा दावा होता. शिवाय नवरा बायकोने २-३ मुले झाल्यावर वेगवेगळ्या खोल्यांत झोपावं तर "गरीबांनी एवढी मोठी घरं कशी मिळवावी?" असा रधोंचा प्रश्न होता. मुळात शरीराची भूक काय ती वाईटच याही गांधीजींच्या दाव्याबद्दल रधोंची मतं तीव्र होती. नैसर्गिक गरजांवर मात करणं गांधीजींना जमलं, हीच अपेक्षा इतर सर्वांंकडून करणं योग्य होतं का? उपहास, टोकाची खिल्ली वगळताही रधोंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं गांधीजींच्या साहित्यातून मिळतात का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कारणमिमांसा
गांधींजींची शरीराची भूक वगैरे विषयावरची मते खरोखरच अचंबित करणारी आहे. मात्र त्याचे मुळ त्यांच्या वैयक्तीक आयुष्यात सापडतं.. त्यांचे वडील मृत्यूशय्येवर असताना त्यांच्या पत्नीकडे ते संग करण्याचा हट्ट करत होते. तसेच त्याआधीही अनेकदा पत्नीची इच्छा नसतानाही त्यांनी संग केल्याचे त्यांना जाचत असे. या घटनेने (वडीलांच्या) त्यांच्यावर बराच परिणाम झालेला आढळतो. आणि त्यातून ही काहिशी वेगळी मते-विचार तयार झाले असावेत. (संदर्भः माय एक्परिमेंट्स विथ ट्रुथ)
अर्थात अहे समर्थन नाही केवळ कारणमिमांसा.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सहमत आहे. गांधीजी अगदी शुद्ध
सहमत आहे.
गांधीजी अगदी शुद्ध देशी होते यावर माझा विश्वास अधिकच बसतो तो त्यांच्या अशा विचारांमुळेच! 'शुद्ध देशी' यात अपमान अजिबात नाही. राष्ट्रवाद, महाभारत-रामायण-पुराण, संतसाहित्यात प्रेरणा शोधणे, स्वयंपूर्ण गाव अशी मांडणी करताना भारताची बहुसंख्या खेड्यांंमधे आहे हा विचार बहुतकरून करणे (आणि पुढारलेल्या देशांचा यात फारसा विचार न करणे) इ.इ. कल्पना आहेत. या संदर्भात डॉ. सदानंद मोरे यांनी 'लोकमान्य ते महात्मा'मधे तपशीलवार चर्चा केलेली आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
प्रति
गांधीजींचे ब्रम्हचर्यासंबंधी ('ब्रम्हचर्य प्रयोग' असे काहीसे) काही लेख 'पुरुष स्पंदने' मधे वाचण्यात आले, त्यांची मते टोकाची किंवा/आणि आदर्श ह्यामधे कुठेतरी होती असं मला वाटतं, *प्रयोग वाचून थक्क व्हायला होतं पण त्यामागची भुमिका समजल्यावर त्यामागचा दृष्टीकोन समजतो.
रधोंचे विचार व्यवहारी होते असे वाटते पण गांधीजींच्या विचार हे मुळातुन दृष्टीकोन बदलण्यासंबंधी होते असं माझं वैयक्तिक मत आहे.
*प्रयोग काय होते ह्या तपशीलात मी इथे जात नाही, हवी असल्यास माहिती ख.व किंवा व्यनितून कळवतो.
इट टेक्स अ विलेज
अनुवाद आणि त्या अनुषंगाने झालेली चर्चा आवडली.
थोडे अवांतर -
१. सोलापूरपासून जवळच अंकोली नावाचे एक खेडे आहे. अरूण देशपांडे आणि त्यांचे काही सहकारी (त्यातल्या एका ज्येष्ठ सहकार्याचे 'अशोक सराफ' हे नाव लक्षात राहील असं) तिथे प्रयोग परिवारातर्फे स्वयंपूर्ण खेड्याचा/वसाहतीचा प्रयोग राबवत आहेत. (बंगलोरजवळही याच धर्तीचा एक प्रयोग राबवला जात आहे.) इयत्ता नववीत असताना एका प्रकल्पस्पर्धेच्या निमित्ताने तिथे दोन-तीन दिवस राहण्याचा योग आला होता. दुष्काळी परिसरातही तेथे होणारी शेती, पर्यावरणाला कमीत कमी हानी पोचवतील अशा बेताने बांधलेली राहण्याची घरे हे सारे अतिशय प्रभाव पाडणारे होते. मात्र जगातील सार्या समस्यांना हेच एक रामबाण उत्तर आहे, शहरातील लोकांनी शहरं सोडून अशा स्वरूपाच्या वसाहतींतच रहायला यायला हवं; हा त्यांचा हेका म्हणजे जटील समस्यांचे अतिसुलभीकृत उत्तर होते. प्रकल्पाची स्केलेबिलिटी, वेगवेगळ्या पर्यावरणांमध्ये तगून राहण्याची क्षमता याबद्दल उत्तर देण्याचं त्यांनी टाळलेलं आठवतं. अनिल अवचटांनी त्यांच्या 'कार्यरत' ह्या पुस्तकात ह्या प्रयत्नांचा आढावा घेतला आहे, तोही वाचनीय.
२. शीर्षक निराळ्या संदर्भात येथून.