वैचारिक क्षमतेवर पसरलेली श्रद्धेची गडद छाया (उत्तरार्ध)

पूर्वार्ध

वैचारिक क्षमतेवर पसरलेली श्रद्धेची गडद छाया असलेली ही मानसिकता कशा कशामुळे घडत असावी याचा थोडासा जास्त खोलात जाऊन विचार करू लागल्यास आणखी काही गोष्टी लक्षात येतील.

आपण आपल्या श्रद्धा-विचारांशी पूरक असलेल्या गोष्टीच फक्त लक्षात ठेवतो.

आपण नेहमीच आपल्या विधानांच्या पूरक अशा गोष्टींच्यांच शोधात असतो. आपला फलजोतिषावर विश्वास असल्यास जोतिषाने सांगितलेली एखादे क्षुल्लक भाकित खरे ठरले तरी आपण त्याची वाहवा करत राहणार. त्याच्यावरील श्रद्धेत भर पडतच राहणार. त्यानी सांगितलेल्या इतर हजारो भाकिते खोटे ठरल्या तरी आपल्या श्रद्धेला अजिबात तडे जाणार नाहीत. आपल्या श्रद्धेला धक्का लावणाऱ्या गोष्टी आपल्या खिजगणतीत नसतात. त्यामुळे यश आपल्या लक्षात राहते व अपयश स्मृतीच्या अडगळीच्या कोपऱ्यात जाऊन पडते.

आपल्या ओळखीतला एखादा माणूस दानशूर आहे असे आपल्याला मनोमन वाटत आल्यास त्यानी एखाद्या गरजू संस्थेला दिलेली क्षुल्लक देणगी आपल्याला फार मोठी वाटते. तो कायमचाच सर्वाना अशीच देणगी देत असेल अशी खूणगाठ आपण मनातल्या मनात बांधत असतो. परंतु प्रत्यक्षात तो हजारो पिडीतांना रिकाम्या हाताने परत पाठवत असला तरी त्याच्याविषयीची आपली श्रद्धा अचल राहते. त्या देणगीदाराच्या विरोधातील एकही शब्द ऐकून घेण्याच्या स्थितीत आपण नसतो. आपल्या (क्षद्धेच्या) विश्वातच रमणाऱ्या या कूपमंडूक वृत्तीमुळे आपले जबरदस्त नुकसान होऊ शकते, याचीसुद्धा आपल्याला भान नसते. त्यामुळेच आपल्या विधानांची, वर्तनांची वा निर्णयांची चिकित्सा करणारे शत्रू समान वाटू लागतात.

योगायोग व चान्समुळेही गोष्टी घडू शकतात याचा आपल्याला (सोईस्करपणे) विसर पडलेला असतो.

जगात काही वेळा योगोयोगाने पण गोष्टी घडू शकतात, हे आपण नेहमीच विसरतो. कावळा बसायला व झाडाची फांदी मोडायला कारण योगोयोग असतो, कावळ्याची किमया नव्हे. शेअर बाजारातील एकाद्या कंपनीचे समभाग कायमचेच तेजीत आहेत अशी जाहिरात वाचून आपण त्या कंपनीत फार मोठी गुंतवणूक करत असल्यास ते महागात पडण्याचीच शक्यता जास्त. कारण त्या विशिष्ट कंपनीची कार्यक्षमता त्या कालावधीत चांगली असेल. परंतु यांनंतरसुद्धा ती तशीच राहील याची खात्री देता येत नाही. योगायोगामुळे त्या समभागावर कित्येकांनी प्रचंड नफा कमविला असेलही. परंतु याचा अर्थ तो नफा तुम्हालाही मिळू शकेल किंवा समभागामधील गुंतवणूक आदर्शवत आहे असे ठामपणे सांगता येणार नाही. नाणे उडवून छाप - काटा ठरवायचे असल्यास सतत पाच-सहा वेळा छाप येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु यानंतरसुद्धा छापच येईल वा छापच येत राहील याची खात्री कुणीच देवू शकत नाही.

आपण तीन - चार कंपन्यांच्यात गुंतवणूक केल्या केल्या भाव वधारला की त्या विषयात तज्ञ झालो ही समजूतसुद्धा एक श्रद्धा आहे. त्यावरून कंपन्यामध्ये सर्व पैसा गुंतवण्याचा सपाटा लावल्यास पश्चात्तापाची वेळ येईल. कारण मुळातच अशा गोष्टी योगायोगाने घडत असतात याचा मागमूसही आपल्याला नसते. आपल्या 'शहाणपणा'वर आपली नितांत श्रद्धा असल्यामुळेच अशाप्रकारचे जीवघातकी निर्णय आपण घेत असतो व नंतर कर्जबाजारी होतो. खुल्या मनाने थोडा वेळ तरी विचार करण्याची तसदी घेतल्यास त्यामागील कार्य-कारणभावामध्ये योगायोग व चान्स हेसुद्धा कारण असू शकतील हे नक्कीच लक्षात येईल व आर्थिक नुकसान टाळू शकेल.

आपण नेहमीच आपल्या परिस्थितीचे व आपल्या भोवतालच्या जगाचे चुकीचे आकलन करतो.

आपले ज्ञानेंद्रिय आपल्याला कधीच दगा देणार नाहीत यावर आपली अढळ श्रद्धा असते. परंतु वास्तव परिस्थितीच्या चुकीच्या आकलनामुळे साध्या दोरीला साप म्हणून भुईवर थोपटत असतो. भुता-खेतावर विश्वास ठेवणाऱ्यांना भूत हमखास दिसतात व शपथेपूर्वक सांगण्याची त्यांची तयारी असते. परंतु आपल्याला भास होऊ शकतात याची पुसटशी जाणीव त्यांच्यात नसते.
काही वर्षापूर्वी दिल्लीत "एक माकडसदृश माणूस प्राणी रात्रीच्या वेळी माणसांना जखमी करत आहे, त्याची लांब लांब नखं आहेत, उंच इमारतीवरून उड्या मारत आहे, लोकांना ओरबडून रक्त बंबाळ करत आहे, " अशा बातम्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर छापून आल्या. आज अमुक गल्लीत माकडांनी हल्ला केला, तमुक बाजारात माकडांनी ओरबडले, अमुक इतके लोक दवाखान्यात उपचार घेत आहेत, अशा बातम्यांना ऊत आला.लोक घाबरून रात्रीच्या वेळी बाहेर पडेनासे झाले. माकडांना पकडण्यासाठी पोलीस फौज संघटित झाली. कसल्या तरी अलौकिक शक्तीमुळेच अशा घटना घडत आहेत असे जनसामान्यांना खात्री होऊ लागली. व त्यातच टीव्ही व वृत्तपत्रांनी भर घातली.

परंतु काही विवेकवादी संघटनांनी तपास केल्यानंतर मानवी वेषातला वानर वा वानराच्या वेषातला मानव असा कुठलाही प्रकार नसून काही विघातक गुंडांच्या टोळ्यानी आपापसातील हेवेदावे मिटवण्यासाठी एकमेकावर छुपे हल्ले करत आहेत, हे लक्षात आले. अंगावर घोंगडी पांघरून इमारतींच्या छतावरून गुंड पळापळी करत असल्यामुळे रात्रीच्या अधारात बघणाऱ्यांना (व तसे शपथेपूर्वक सांगणाऱ्यांना) ते खरोखरच माकड वाटत होते. गुंडांच्या टोळींवर पोलीसांनी बगडा उगारताच चोवीस तासात सारे कसे शांत शांत झाले.

विचारामध्ये चुकीच्या आकलनांचा शिरकाव होऊ लागल्यास आपल्या समोरील समस्यांच्या संख्येत भर पडत जाते. समस्या जास्त गुंतागुंतीचे होतात. आपल्या इच्छा-आकांक्षावर त्यांचा दुष्परिणाम होतो. मुळातच आपल्या अपेक्षांच्या आक्रमकतेमुळे वास्तवतेचे भान रहात नाही. सत्य परिस्थितीचे योग्य आकलन नसल्यामुळे अफवावर, अनैसर्गिक अशा गोष्टीवर, चमत्कारसदृश घटनांवर विश्वास ठेवण्याची मानसिकता बळावते. त्याप्रमाणे आपले वर्तन बदलत गेल्यास शेवटी आपलेच नुकसान होते. वैयक्तिक अनुभवावर ठेवलेली श्रद्धा - विशेषकरून अलौकिक, अद्भुत व अतिंद्रिय शक्तीवरील श्रद्धा - गाढ होत जाते. विचारात तफावत जाणवू लागते. विचारांची साखळी तुटू लागते. व त्यातून चुकीचे निर्णय घेण्याची सवय जडते.

आपण समस्यांचे योग्य उत्तर शोधण्याऐवजी त्यासाठीच्या पळवाटा शोधण्याच्या प्रयत्नात असतो.

आधुनिक दैनंदिन जीवन दिवसे न दिवस फार गुंतागुंतीचे होत चालले आहे. दिवसभरात एकाचवेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक गोष्टी हाताळावे लागतात. निर्णयापर्यंत पोचण्यासाठी अनेक घटकांची तपासणी करावी लागते. आधुनिक तंत्रज्ञानाने आपल्या समोर माहितीचा डोंगरच उभा करून ठेवला आहे. त्यातून नेमकी माहिती शोधणे अत्यंत जिकिरीचे ठरत आहे. उपलब्ध माहितीचे विश्लेषण करताना मनस्ताप होतो. यामुळे शेवटी वैतागून काही शॉर्टकट्स शोधत, पळवाटा शोधत वेळ मारून नेण्याच्या प्रयत्नात आपण असतो. आजचे मरण उद्यावर ढकलण्याची ही घाई अत्यंत धोकादायक असते, हेच आपण लक्षात घेत नाही. या पळवाटा आपल्याला धोक्याच्या खाईत लोटतात. वर्षभर अभ्यास न करता ऐन परिक्षेच्या वेळी सिद्धी विनायकाच्या रांगेत (ताटकळत!) उभे राहून गणेशाची आळवणी करत असल्यास शेवटी नापासच होण्याची पाळी येते. टीव्हीच्या पडद्यावरील चित्तथरारक खेळ बघत असताना आपल्यालाही तसेच करावेसे वाटू लागते. परंतु पडद्यावर सोपे करून सांगितलेल्या गोष्टी मुळातच फार गुंतागुंतीचे असतात, याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतो. अशा प्रकारच्या खेळासाठी भरपूर सराव करावा लागतो. अशा खेळातील संभाव्य धोक्यांचा विचार न करता माहितीचे जुजबी विश्लेषण करून तसे प्रयत्न करू लागल्यास अपघाती मृत्यू येण्याचा संभवच जास्त. समस्यांचे सुलभीकरण धोकादायक ठरू शकते. सुलभीकरणामुळे काही वेळा श्रम व पैसा वाचण्याची शक्यता असली तरी, ही मानसिकता तशीच राहिल्यास आपण गोत्यात येऊ शकतो. स्वत:वरील फाजिल विश्वास केव्हा दगा देईल त्याचा नेम नाही. या फाजिल विश्वासाचेच हळूहळू श्रद्धेत रूपांतरित होत जाते. मुळात सर्व श्रद्धा एका प्रकारे पळवाटाच असतात. व या पळवाटा कामचलाऊ निर्णयच देऊ शकतात.

आपली स्मृती दगा देऊ शकते.

आपण आपल्या मेंदूला संगणकसदृश मानतो. आपल्या आयुष्यभरात जे काही घडत असते ती सर्व माहिती जशीच्या जशी आपल्या मेंदूत जाऊन बसते व जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ती माहिती तशीच्या तशीच आपल्या समोर उभे करू शकतो, असे वाटत असते. परंतु स्मृतीपटलावरील माहितीत बदल होऊ शकतो हे आपण लक्षात घेत नाही. काही (कडू) आठवणी किंवा आठवणीतील काही (नको असलेला) भाग पुसून जातात. आपल्या श्रद्धा-विचारामुळे त्यात बदल होऊ शकतात. या आठवणी जसेच्या तसे परत येतात याची पण काही खात्री देता येत नाही. त्यामुळे केवळ स्मृतीला ताण देऊन किंवा त्यावर विसंबून राहून निर्णय घेत असल्याल काही वेळा निर्णय चुकीची ठरण्याची शक्यता असते.

आपल्या स्मृतीपटलावर संग्रहित झालेली माहिती आपल्या श्रद्धा विषयांशी निगडित असतात. श्रद्धेला तडा देणाऱ्या आठवणी लगेचच पुसून जातात. त्यामुळे एकदा फसलो गेलो तरी पुन्हा पुन्हा फसतच जातो. अनुभवांती शहाणपण हे फार कमी लोकांना जमते. संमोहनावस्थेतच असल्यासारखे आपण वावरत असतो. पुढच्याला ठेच मागचा शहाणा असे क्वचितच घडते.

अशा प्रकारे आपल्यातील निर्णयक्षमतेला मगरमिठीत पकडून ठेवलेल्या श्रद्धाविषयांशी दोन हात केल्याविना आपण आपल्या पूर्ण क्षमतेने जीवन जगू शकत नाही. ही मगरमिठी सैल करत गेल्यास अचूक निर्णयांच्या जवळपास जाण्याची शक्यता वाढते. आपल्यासमोरील समस्यांना अचूक उत्तर शोधणे सुलभ होते. यासाठी श्रद्धेच्या अंधारातून बाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नाही.वैचारिक क्षमतेच्या संवर्धनासाठी श्रद्धेचे कवच भेदणारी मानसिकता विकसित करणे ही त्याची पहिली अट ठरेल.

.....समाप्त

व्यवस्थापन : पहिल्या भागाचा दुवा सुरुवातीला देऊन धागा अद्ययावत केला आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

अतिशय सुंदर स्पष्टीकरण. पूर्वार्धाची लिंक द्या ना कुठेतरी. श्रद्धा खासकरुन बालपणी मनावर कोरलेल्या असल्या तर त्यातून बाहेर पडणं फार कठिण असतं. तो झगडा सतत चालूच असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रद्धेच्या अंधारातून बाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नाही.वैचारिक क्षमतेच्या संवर्धनासाठी श्रद्धेचे कवच भेदणारी मानसिकता विकसित करणे ही त्याची पहिली अट ठरेल.

हे वाक्य पटले नाही.

_____________
http://www.sharonsalzberg.com/faith/
शॅरन सॅल्झ्बर्ग यांचे "फेथ" हे पुस्तक वाचून झाले. बौद्ध धर्माचा अभ्यास करुन नंतर भारतात बोधिगया येथे राहून पुढे ऑस्ट्रेलिया वगैरे देशात, त्यांंना जे काही अनुभव आले त्याचे व मुख्यत्वे लेखिकेची श्रद्धा कशी घडत गेली त्याचे वर्णन या पुस्तकात येते. हे पुस्तक खाली ठेववले नाही.
.
आंधळी श्रद्धा तसेच डोळस श्रद्धा दोन्हीचा विचार केलेला आहे. जी श्रद्धा स्टॅटिक आहे, जी श्रद्धा प्रश्नांची उत्तरेच शोधत नाही ती ठिसूळ व आंधळी श्रद्धा याउलट प्रश्नांना नित्य सामोरी जाऊन, बदलास अनुरुप असणारी ती श्रद्धा डोळस श्रद्धा.
.
या पुस्तकात ध्यान या विषयी देखील बरेच लिहीले आहे. काही मुद्दे आवडले जे मेंदूत रजिस्टर झाले आहेत ते म्हणजे "भीती" याविषयीचे लेखिकेचे विवेचन. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत भीती आहे. परंतु भीती मुळे क्रिपल (गोठल्याने) झाल्याने आपण भीतीच्या पलिकडे जी अमर्याद संभावनांचे जग आहे तिकडे पाठ वळवतो.
.
तसेच सर्वसाधारणपणे श्रद्धेच्या विरुद्ध गुण हा भीती मानला जातो परंतु तसे नसून "नैराश्याचा काळोख"= आता यापुढे काहीही चांगले घडण्याची शक्यता नाही ही अंधःकारमय भावना ही श्रद्धेच्या विरुद्ध गुण आहे.
.
त्यांना आलेले काही गूढ अनुभव लिहीले आहेत. उदाहरणार्थ एका अपघातामध्ये शुद्ध हरपताना व पुढे भान (कॉन्शसनेस) क्षीण होत जाताना, त्यांना कोणीतरी सतत आवाज देत होते "श्वासावर लक्ष केंद्रित कर" अर्थात तू आतापर्यंत केलेल्या ध्यानाच्या सरावाचा आश्रय घे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही लेख आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.