लाईटहौशी (भाग १)
मी एक लाईटहौशी माणूस आहे. म्हणजे आहे असं मला वाटतं, कारण जेव्हा जेव्हा मी एखादं लाईटहाउस पाहिलंय, तेव्हा तेव्हा भारावून गेलोय… एक ऐतिहासिक नाही आणि अगदी आधुनिक पण म्हणता येणार नाही अशी गूढ ईमारत… दीपस्तंभ हा एकच आकृतिबंध आहे, पण तरी मी पाहिलेल्या सगळ्या दीपस्तंभांची स्वतःची वेगळी ओळख आहे, प्रत्येक ईमारतीत काहीतरी वेगळं आहे, आणि त्या त्या लाईटहाउसना भेटल्याचे क्षण खूप चांगले लक्षात आहेत.
मी पाहिलेलं सगळ्यात पहिलं लाईटहाउस रत्नागिरीचं… दुरून पाहिलं तर सिगारेट सारखं दिसणारं…
तिथे गेलो तेव्हा काही गोष्टींचा मनावर खूप प्रभाव पडला. आणि नंतर भेट दिलेल्या प्रत्येक लाईटहाउसमध्ये त्या गोष्टी प्रकर्षाने जाणवत राहिल्या. एखादं लाईटहाउस मला किती आणि का आवडावं याचे निकष पण इथेच बांधले गेले. यातल्या काही गोष्टी म्हणजे -
१. सर्वप्रथम जाणवते ती आजूबाजूच्या परिसरातली शांतता. रत्नागिरी लाईटहाउस हे एका पठारावर आहे, आणि एकदा गावातला सगळा गोंगाट मागे ठेवून ते पठार चढून गेलं की लगेच तिथली शांतता आपल्याला जणू कवटाळून घेते.
२. पठारावर आसपास दुसरी काही बांधकामं पण नाहीत. एक किल्ला / मंदिर दिसतं तेवढंच, पण तेही खूप जवळ नाही.
३. लाईटहाउस काहीशा उंचीवर बांधतात म्हणून किंवा, बाकी काही अडथळे नाहीत म्हणून, एकंदरच तिथे वारं खूप जास्त असतं. या इमारतींच्या पायथ्याने समुद्राच्या लाटा खूप सहन केलेल्या असतात, आणि त्याच्या खुणा दिसतातही…. पण इमारतींनी सोसाट्याचं वारं किती सहन केलं या खुणा मात्र अदृश्यच राहत असतील, अदृश्य माराच्या अदृश्य खुणा…
४. लाईटहाउस च्या परिसरातून जसं खालच्या पाण्याकडे लक्ष जातं तसंच वरच्या आकाशाकडे… खाली निळ्या पाण्यात फेसाळणार्या पांढऱ्या लाटा आणि वर निळ्या आकाशात पहुडलेले शुभ्र ढग… आकाश आणि समुद्र, दोघेही अथांग…
(हा एक फोटो जास्त निळा आहे कारण तेव्हा मी नुकतंच फोटोग्राफी छाप काहीतरी सुरु केलं होतं आणि फोटोवर प्रोसेसिंग नक्की कसं आणि किती करावं याचा नीट अंदाज नव्हता.)
५. लाईटहाउसच्या टोकावरून खाली पाहिलं तर अगदी रत्नागिरीच्या किनाऱ्याचं प्रदुषित पाणीसुद्धा खूप स्वच्छ आणि स्थिर दिसतं… आकर्षक वाटतं… एरवी त्या गोल भिंतींना धडकणारं समुद्री वारं आपल्या नाकातोंडात जात असतं, शहरी गोंगाट मागे पडलेला असतो आणि खाली समुद्र हे सगळं संपवून शांत मरण देण्याचं आमिष दाखवत असतो.
(क्रमश:)
प्रतिक्रिया
खूप छान लिहीले आहे.
खूप छान लिहीले आहे.
दोन तिन वेळा गेलेलो आहे भगवती
दोन तिन वेळा गेलेलो आहे भगवती बंदरावर व रत्नाग्रीच्या लाईट हाऊसवर. मस्त आहे. आवर्जून भेट देऊन पहावे असे स्थल. रत्नाग्रीबद्दल मनात एक वेगळा कोपरा (सॉफ्ट कॉर्नर म्हणा) असल्याने जास्तच.
वेगळा कोपरा = मर्मबंधातील
वेगळा कोपरा = मर्मबंधातील आठवण म्हणायचय तुम्हाला