चौघांची गोष्ट !
एक कथा काही दिवसांपासून डोक्यात घोळते आहे.
नेमकी हव्या त्या फॉर्म्याट मध्येलिहिता येत नाहिये.
जशी आहे तशी ...अपरिष्कृत रुपात इथे सादर करत आहे.
***************************कथा सुरु***********************************************
जुनी आहे एक गोष्ट. झाली असतील काही शे वर्ष.
एक होतं गाव. खरं तर ते नव्हतं नुसतं गाव. ते होतं मोठं राजधानीचं गाव. मोठ्ठं गाव.
प्रसिद्ध गाव. प्रसिद्ध ठिकाणी वर्दळ.भरपूर प्रवाशी. देषोदेशीचे प्रवाशी. गावंही मोठ्ठं.
गावात होते भटजी.मोठ्ठ्या गावातले मोठ्ठे भटजी. पण हे आटपाट नगरातले नव्हते.
आटपाट नगरातले म्हंजे "एक होतं आटपाट नगर. त्यात एक गरिब ब्राह्मण राहत होता." असं म्हटल्यावर दिसणारे.
तसे हे अजिबात नव्हते.हे चांगले सधन. मस्तपैकी पैसा बाळगून. स्वकतृत्वाचा नसला; तरी पैसा आहे म्हटल्यावर मान असायलाच हवा!
तसा ह्यांना गावात बराच विकतचा मान.भटजींचं जरा वय वाढू लागलेलं.त्यांच्या माता पित्यांना चिंता लागली.
(तर तर...आदर आहे ना त्यांच्याबद्दल. "थोराड झालेत" कसं म्हण्णार ?)
तर सांगायचं म्हणजे , भटजी काही लग्नात रसच दाखवेनात.
पण इतक्या विद्वान नि हुश्शार पोराला इतक्या जायदादीसकट एकटं कसं ठेवणार ?
माता पित्यांनी बराच आग्रह करुन दिला बार उडवून.
लग्न झालं, बायको आली. मोठ्या घरात पडल्यानं आधी आनंदून गेली.
पण का कुणास ठाउक काहिशी नंतर नाराज राहू लागली. नुसते आवंढे गिळू लागली.
चालायचच. तुच्छ जनावरं आणि बायका ह्यांना नाराज रहायला, तोंड फिरवायला काही कारण लागतं?
नाहिच. दाखवतात आपला असाच माज. चालायचच.
काही वर्ष गेली, तरी भटजींना मूलबाळ नै.त्या काळात चूक अर्थातच भटणीचीच असे.तिला सर्वांनी दोष दिला.
ही असली ओसाड जमीन सोडून चांगली सुपीक जमीन भरघोस पीक घेण्यासाठी पहायचं ठरलं.
भटजींचा दुसरा बार दिला उडवून घरच्यांनी. लग्नाच्यावेळी ही आधीची भटजीपत्नी जरा चिंतितच होती.चेहरा पाडून होती.
ती काही सांगू पहात होती.पण बरच झालं.सवत आलेली तिला बघवली नसणार.मोडता घालायचा शिंचा प्रयत्न असणार.
असो.
तर दुसरी पत्नी आली. मजेत राहू लागली. पण घराला जणू दृष्ट की हो लागली. काही दिवसातच हीसुद्धा उदास उदास दिसू लागली.
काही वर्ष गेली. पाळण्यानं हलायचं नाव घेतलं नाही.
.
.
नशीब की हो वाईट. इतका चांगला मुलगा. दरवेळी अशीच कशी बायको मिळाली म्हणून जो तो सहानुभूती दाखवी.
लोकांना चिंता. माता पित्यांच्या काळजाला घोर. समई तेवत का नाही. वंशाला अजून दिवा का नाही.
.
.
हरकत नाही. अजून एक डाव खेळू. चांगली जमीन शोधून पाहू. भटजींनी आळस झटकला.
अजून एक जमीन्...आपलं मुलगी पाहिली. ही तिसरी बायको तरी चांगली निघावी. जो-तो बोलू लागला.
तिसरं लग्न ठरलं. तो तरुण सुकुमार बालक बाशिंग बांधुनि उभा राहिला.
दरम्यान त्या आधीच्या बायकांना काही बघवलं नाहिच. त्या तिसरीपाशी कशाबशा पोचल्या नि कानात काही सांगू लागल्या.
तिसरीनं ऐकून न ऐकल्यासारखं केलं.आणि समारंभात ती पुन्हा व्यग्र झाली.
.
.
तर...
ठरल्याप्रमाणे लग झालं. ती आली.तिच्यावर सासरचे सारेच खुश.तिचं रुप, गुण सगळच कसं खानदानी.
तिच्यावर सगळ्यांचा भारी जीव. काही महिनेच गेले असतील; तोवर गोड बातमीसुद्धा आली!
"उसके घर देर है अंधेर नही " चा खरोखरीच प्रत्यय त्या कुटुंबाला आला.
पाळणा हलला.
.
.
पण चांगल्या गोष्टीलाही गालबोट लागायचच.
भट - भटणी दोघं चांगले गोरे गोमटे. पण बाळ मात्र जsssरा वेगळच दिसे.
अगदि रंगानंही बरचस वेगळं.रुपानंही!ह्यांचे केस सरळ, बाळाचे केस कुरळे.
ह्यांचे चेहरे गोलट. बाळाचे उभट. ह्यांचे नाक सरळ. बाळाचे बसके.
.
.
चालायचच. देवाचा चमत्कार असाच असायचा.
काही कुजकट चर्चा क्वचित होत. दबक्या आवाजात कानावर येत.
"बाळ बापावर गेलय" अशीही खवचट टिप्पणी होइ.
मारणार्याचा हात धरता येतो. बोलणार्याचं तोंड नाही.
.
.
इतक्या पुण्यवंत, प्रयत्नशील मंडळींवरही शंका घेणं ? संशय घेणं?
शिव शिव. खरच. जुना काळ असला तरी कलियुगातलीच वेळ होती म्हणायचं.
.
.
तिसरी बायको आता सगळ्या कुटुंबाच्या गळ्यातला ताईत होती.
भटजींच्या सत्शील वर्तनाबद्दल देवानेच आता पावती दिली होती.
त्यांच्या सत्शीलतेचा लौकिक वाढतच होता. दुसरी पत्नी होती ना,
तिनंही ह्या नवरा-बायकोच्या -- पुण्यवंतांच्या सेवेत स्वतःला समर्पित केलं होतं.
.
.
पण पहिली आणि दुसरी आपसात बोलत.
दुसरी म्हणे की "कमाल आहे. आपल्याला नाही, पण तिला मूल झालं. पण्.. हे असं कसं?
दैव आपल्यावर का गं असं प्रसन्न नै झालं ? नेमकं आपल्याच वेळी आपल्या ह्यांना ....."
.
पहिली म्हणे "आपल्यावेळी तेच नि खरं तर हिच्याही वेळी तेच."
दुसरी म्हणे "अगो बाई! खरं की काय ? पण्...पण मग तसं असतं...
तर श्रद्धेचं हे फळ असं कडेवर घेउन मिरवायला त्यांना मिळालं कसं असतं?"
.
.
दुसरी म्हणे "नवरोबांना खरं काय ते ठाउक आहे. पण शांत राहण्यातच त्यांचंही हीत आहे."
.
.
पहिली बायको होती ना, ती काही बडबड करी. तिच्यामुळेच भलभलते समज पसरले होते.
तिनं पुण्यवंतांबद्दल बेताल बडबड केली होती. देवानच तिला शिक्षा दिली.
ती अवचित पाय घसरून आडात पडली. शेजारी भटजी असतानाही पडली.
अर्थात, देवाच्या इच्छेच्या विरुद्ध भटजींसारखा धर्मश्रद्ध जाणे शक्यच नाही.
त्यांनी दैवाच्या गतीला विरोध केला नाही.
.
.
बंडखोर, भांडकुदळांना अश्शीच शिक्षा मिळायला हवी.
.
.
तर...
अशी ही कहाणी संपत आली.
कहाणीत पात्रे एकूण चार.
ती पहिली पत्नी म्हणजे भांडकुदळ, माणूसद्वेष्टी हिंसक राक्षसीणच जणू!
दुसरी पत्नी म्हणजे आता साक्षात निष्ठा , श्रद्धा ह्यांची मूर्तीच. अगदिच आज्ञाधारक आणि कायदेपाळू.
काही हल्कट तेवढ्यातही तिला लाचार, दुबळी म्हणत.
पण कुजबुजीकडे का लक्ष द्यायचे असते ?
आणि ते ते... ते भटजी म्हणजे साक्षात जगन्नियंत्याशी संपर्क असणारेच. सत्शील!
त्यांच्याकडे कितीही आणि कोणतेही अधिकार दिले, तरी चूक काही नाही.
ते सर्वांवर नियंत्रण थेवत. सर्वांची काळजी घेत. ह्या सर्वांचा प्रतिपाळ करत.
कोणाला काय हवं - नको; ते बघत. कोणी काय करावं ; हे सुद्धा ठरवायची तसदी इतर कुटुबियांना घेउ देत नसत.
स्वतःच सगळ्यांसाठी सर्व काही ठरवून मोकळे होत. सर्वांना न्यायानं वागवायची हमी देत.
आणि तिसरी पत्नी म्हणजे साक्षात यश. योग्य प्रयत्नांची साथ असेल तर ईश्वर यश देतोच, ह्याची साक्ष असणारे उदाहरण!
ह्या प्रतिपाळ करणार्याच्या न्यायाची जिवंत-- जितीजागती साक्ष.
आणि तिच्या कडेवर त्या सुखाचा , आनंदाचा पुरावा!
***************************कथा समाप्त***********************************************
--मनोबा
तात्पर्य कशाला?
प्रत्येक कथेला किंबहुना कथेला तात्पर्य असायलाच हवे असा नियम आहे का? तसे असेल तर सगळ्याच कथा,लघुकथा, दीर्घकथा बादच करून टाकाव्या लागतील.
आणि ही काय ईसॉपची नीतिकथा आहे का तात्पर्य असायला? उलट ही तर अनीतिकथा.
हे म्हटल्यानंतर, कथा आवडली हे लिहायलाच पाहिजे. खरंच आवडली. (पण नवी नव्हे. कुठेतरी बीजरूपाने वाचलेली आहे. कुठे ते आठवत नाही. कदाचित आनंद साधल्यांची असेल. अर्थात एखादी कल्पना नव्याने अनेकांना सुचणे सहज शक्य आहे.)
तिसरी पत्नी पतिव्रता होती,
तिसरी पत्नी पतिव्रता होती, तिला ९ महिन्याच्या आत मुल झाल. अशी कथा मी एकदा ऐकली होती. ब्रिटीश राजकुमार आणि सफाईकर्मचारीच्या मुलात होणारा संवाद ही अशीच कथा होती. (लंडनमध्ये ही कथा अजूनही प्रसिद्ध आहे, एका मराठी दिवाळी अंकात वाचली होती). संता-बंताचे ही अश्या धर्तीचे चुटूकले आहेत.
रुपक - तात्पर्य वगैरे
रुपक कथा लिहायची म्हणून हे लेखन केलेलं नाही. नुसती कथा म्हणता यावी.
काही एक तात्पर्य सांगता यावे किंवा लोकांना काही संदेश द्यावा, उपदेश द्यावा असा उद्देश नाही.
.
.
चार वेगळ्या प्रवृत्तींची तर्हा मांडता येत आहे का ते पहावं म्हटलं.
कथेतील कुजबूज खरी मानली आणि त्या काळाच्या मानाने विचार केला तर --
भटजी काही बाबतींत अक्षम आहे. आणि त्याने करायचे काम कुणी भलत्यानेच केलेले आहे.
एखाद्या सक्षम माणसाला ह्याबद्दल संताप आला असता किवा त्याची निदान तक्रार तरी राहिली असती.
पण कुणी भलत्यानेच काम केल्यानं "कसं का होइना आपलं काम झालं" हे अजब समाधान त्याच्याकडे आहे.
तिसर्या पत्नीनं तत्कालीन नैतिक चौकटीत बसणार नाही असं काहीतरी केलय;
व त्याबद्दल उलट तिचे कोड कौतुक वगैरे सुरु आहे. ते तसे राहण्यातच भटजींचेही हित आहे.
भटजी व तिसरी पत्नी ह्यांनी आपापली गैरकृत्य ट्रेड-ऑफ केलेली आहेत.
व वेगवेगळ्या निकषांवर ते सामर्थ्यशाली किंवा यशस्वी ठरले आहेत.
(मार्ग महत्वाचा नाही, दोघे तुलनेने यशस्वी आहेत हाच शेवटचा निकाल .)
दोघेही खुश आहेत. त्यांनी केलेल्या गोष्टी त्यांना काही फार गंभीर वगैरे अजिबात वाटत नाहित.
.
पहिल्या पत्नीने नैतिकतेचे नियम गंभीरपणे घेतलेत. शिवाय आपली बाजू बरोबर असेल तर तक्रार ती करत आहे.
पण पुरेसे सामर्थ्य नसताना इतरांकडून आपल्याला नैतिक वागणूक मिळेल का, ह्याचा तिनं विचार करायला हवा होता.
किंवा तिनं तो केला असावा, व विचार केल्यावरही आपली तक्रार सुरुच ठेवली असावी.
.
पत्नी क्र. १ व पत्नी क्र २ जवळपास सारख्याच परिस्थितीत आहेत.
त्या फसवल्या गेलेल्या आहात. पतीवर अवलंबूनही आहेत. स्वतंत्र नाहित.
ह्या स्थितीत अस्तित्व टिकवायचं की जिवाचा धोका पत्करून बंड पुकारायचं हे सांगता येणं कठीण आहे.
जो तो अशा परिस्थितीत आपापल्या पद्धतीनं रिस्पॉण्ड करत असतो.
.
पत्नी क्र.२ ही परिस्थितीशरण म्हणा, हतबल म्हणा, अशी आहे. किंवा उलट तिला कुणी धोरणीही ठरवू शकते.
"योग्य वेळेची" वाट पाहण्याशिवाय कधी कधी हाती काहीच नसते. ती गुमान मेहनत करत आहे.
.
.
अर्थात हे फक्त जी कुजबूज होत आहे; त्यात तथ्य आहे; असे गृहित धरले तरच.
अन्यथा, सारच काही रॅण्डम - यादृछिक. साराच योगायोग. कशातच विशेष काहिच नाही.
टॉपलाईन (रेव्हेन्यू) उत्तम
टॉपलाईन (रेव्हेन्यू) उत्तम असूनही बॉटमलाईन (प्रॉफिट) कमी असण्याची अनेक कारणं असतात (थोडं सिनिकली बघायचं झालं तर "सांगता येतात"). काही सुप्रसिद्ध कारणं येणेप्रमाणे:
- आमची इंडस्ट्रीच अशी आहे हो, त्याला काय करणार! (बिग बझार सारखी सुपरमार्केटं)
- कॅश प्रॉफिट आहे हो. घसार्याने काशी कढवली. (टेलिकॉम कंपन्या)
- आमचं बिझिनेस मॉडेल अजून रुळलं नाहीये (फ्लिपकार्टसारखे मार्केटप्लेस रीटेलर्स)
- आमच्या कंट्रोलबाहेरच्या कारणांमुळे खर्च वाढले (एअरलाईन्स)
- आमचा लॉस हा अकाउंटिंगचा खेळ आहे हो. खरं तर प्रॉफिटच आहे. (ऑईल एक्स्प्लोरेशन कंपन्या)
परत सिनिकली: बॉटमलाईनशी खेळता येतं. टॉपलाईनशी खेळलं तर झटकन अंगाशी येऊ शकतं. (उदा. सत्यम)
गोष्ट
गोष्ट त्या काळाच्या नीतीमूल्यांच्या मानाने लिहिली आहे.
योनिशुचिता पाळावीच असा इतरांना सल्ला देणं, आग्रह करणं मला पटत नाही.
पण लपवाछपवी,फसवणूक त्याही काळात आणि आजही ....वाईटच समजली जात असणार ना.
योनिशुचिता न पाळणं हे वाईट आहे; असं म्हण्णं नाही.
लपवाछपवी,फसवणूक आणि रास्त तक्रारीवर क्रूर उपाययोजना हे मात्र वाईट जरुर आहे.
(
अधिक स्पष्टीकरण :-
एखाद्या कुमारी मातेनं मॅट्रिमोनिअल साइटवर लग्नासाठी प्रोफाइल बनवणं अजिबात चूक नाही.
तिनं बनवल्यास नाक मुरडणार्यांतला मी नाही.
आपल्या जोडिदारापासून भूतकाळ किंवा इतर काही तपशील लपवून ठेवणं मात्र चूक/वाईट आहे असं मला नक्कीच वाटतं.
)
आपल्या जोडिदारापासून भूतकाळ
आपल्या जोडिदारापासून भूतकाळ किंवा इतर काही तपशील लपवून ठेवणं मात्र चूक/वाईट आहे असं मला नक्कीच वाटतं.
हा एक घमासान धाग्याचा विषय होऊ शकतो. :p
माझ्या मते "Need to know" माहीती दिली तरी पुरेशी आहे. किंवा जी माहीती देवुन नुकसानच होणार आहे ती माहीती द्यायचे कारण नाही ( माझ्या मते )
साईडथीम
शिवाय स्त्रीवादी स्त्रीया नवरे कसे भूषणाने आपली किती लफडी होती, कोणत्या लफड्यातली कोणती पोरगी किती माल होती हे चारचौघात सांगतात, जेव्हा कि स्त्रीयांना चारचौघातच काय अगदी एकांतात देखिल 'त्याने माझा हात धरलेला' इतके देखिल म्हणणे किती कठीण आहे अशी स्त्रीवादी साइड्-थीम रंगवू शकतात.
योनिशुचिता नि उदात्तता
पण लपवाछपवी,फसवणूक त्याही काळात आणि आजही ....वाईटच समजली जात असणार ना.
अजिबात मान्य नाही. तुच्छ, फालतू, नगण्य, निरर्थक गोष्टीत केलेली फसवणूक फसवणूक नसते. योनिशुचिता तुच्छ आहे. आणि (गृहित धरू) नवरा पिता बनण्यास अक्षम आहे. तिसरी बायको प्रचंड विचारी, उदात्त, श्रेष्ठ, सारासार विचार करणारी, विवेकी, इ इ आहे. घर मुलासाठी डेस्परेट आहे. घरात लहान बाळ असले कि सगळ्यांचा जीव लागतो. तिने सगळ्याच्या कल्याणाचा, त्या वाड्यावर निर्भर असणार्या सगळ्या लोकांचा विचार करून अख्ख्या आयुष्यात घाईगडबडित फक्त "१५-२० मिनिटे टाईमपास केला." डी एन ए टेस्ट नव्हती तेव्हा. पोर काळं झालं म्हणून काय झालं? भारतात कोणत्याही कलरच्या मायबापाला कोणत्याही कलरची पोरे होतात.
------------
मूळात योनिशुचिता या संकल्पनेतच जर राम नसला तर कुठची आलीय फसवणूक? गुणाकारातली एक संख्या शून्य आहे.
छान.
छान. जरा अश्लील वाटतेय का मलाच कळली नाहीयी ;)
____
हां आत्ता प्रकाश पडला डोक्यात. बंडखोर लोक हे नेहमी वाईटच असतील असे नव्हे अन यशस्वी, गोडबोले लोक नेहमी धुतल्या तांदळासारख्या चारित्र्याचे असतीलच असे नव्हे.
मला तर ब्वॉ गोडबोले लोक अजिबात आवडत नाहीत. भीतीच वाटते :(