Skip to main content

'द डर्टी पिक्चर'

एखाद्या बदलामुळे आपल्याला फार बदल करावा लागत नसेल तर तो आपल्याला साधारणतः आवडतो; त्यातून तो सुखावह वाटला तर फारच! टीव्हीचे चॅनल्स बदलताना लागलेलं एकेकाळचं आवडतं गाणं असेल किंवा कडाक्याच्या थंडीत बसमधून येणारा धूर. एकता कपूरच्या 'द डर्टी पिक्चर' या चित्रपटाबाबत आणि चित्रपटात दाखवलेल्या गोष्टीतही हेच झालं. सांस-बहू मालिका काढणारीचा चित्रपटही तितपतच असणार अशा तयारीनेच मी 'द डर्टी पिक्चर' बघायला लागले, पण त्यातला जाणवलेला बदल सुखावह होता. सिल्क स्मिता या दाक्षिणात्य 'नटी'च्या आयुष्यावर आधारित चित्रपट असला तरीही सुरूवातीला 'योगायोगाने साधर्म्य आहे असे समजावे' वगैरे बघावं लागतं.

The Dirty Picture's posterआंतरजालावरून साभार

कोणत्याही भावना पिळून काढणार्‍या हिंदी चित्रपटात दाखवतील त्याप्रमाणे यातही एक गरीब मुलगी आहे, ती स्वतःच्या कष्टांवर श्रीमंत होते आणि नंतर सुख टोचल्यामुळे काय, ती आत्महत्या करते अशी ही गोष्ट. त्यात वेगळं काय आहे तर ती मुलगी काहीतरी बदल घेऊन येते, म्हणून श्रीमंत होते. पण बदल असा आहे जो समाजातल्या अर्ध्या घटकाला हवाहवासा आहे, पण उघड बोलायचीही चोरी आहे. "मी अ‍ॅक्ट्रेस नाही" असं स्वतःच म्हणणार्‍या या मुलीला चित्रपटांत नाच करून नाव हवं आहे, प्रसिद्धी, पैसा आणि त्यायोगे मिळणारी सगळी सुखं हवी आहेत. "मी मुलगा असण्याची गरजच काय, मुलांना जे हवं असतं ते माझ्याकडे आहे त्यामुळे मी त्यांना माझ्या तालावर नाचवू शकते", अशा विश्वासावरच तिचं स्वप्न सुरू झालेलं आहे. इतर सर्व व्यवस्थांप्रमाणे चित्रपटसृष्टीतल्याही पुरूषप्रधान वर्चस्वाला थेट आपल्या शरीराच्या जोरावर आव्हान देऊ पहाणार्‍या बंडखोर मुलीचा रोखठोकपणा आणि आत्मविश्वास सुरूवातीला उपयोगी पडतो. आपल्या फायद्यासाठी, आनंदासाठी एखादी गोष्ट ठरवून करावी आणि आपणच त्याला कधी बळी पडतो हेच आपल्याला कळू नये; दारू, सिग्रेटच्या व्यसनामुळे जे होतं तेच याही मुलीचं 'स्वत:चं स्त्री-शरीर वापरून घेण्या'संदर्भात होतं; आपणच आपल्या प्रतिमेत अडकून पडावं आणि मग चित्रपटसृष्टीला नवीन नसणारा व्यसनाधीनतेतून अंत होतो तसाच!

सिल्क स्मिताबद्दल मला आतातरी निदान थोडी सहानुभूती वाटेल का? नाही. पण मला विद्या बालन आवडली, तिने रंगवलेली 'ती बाई' आवडली. एवढंच काय, मला तोंडावर सुरकुत्या असलेली, सिग्रेटी फुंकणारी, दुतोंडी अंजू महेंद्रूही (तिचं चित्रपटातलं कॅरॅक्टर) आवडली. मला आकर्षक वाटावं असं सिल्क स्मिता (आणि राखी सावंत काय!) यांच्याकडे काहीही नाही. सिल्क स्मिताबद्दल मला जेवढी माहिती आहे त्यावरून तिने एवढाही विचार केला असेल का असा मला प्रश्न पडला. किंबहुना विचार केला असता तर बंडखोरी (किंवा अंगप्रदर्शन) या एकमेव भांडवलावर फार दिवस राज्य चालू शकत नाही हे तिला लक्षात आलं असतं. लोकांना बदल हवा असतो; एकेकाळची बंडखोरी एकदा पचनी पडली की तेच पुन्हा पुन्हा विकलं जात नाही. अंगप्रदर्शन नेहेमीचं झाल्यानंतर आता दाखवण्यासारखं काही असेल तर नृत्य, अभिनय हे सिल्क स्मिताला समजलं नसावं. पण वयाची तिशी ओलांडल्यानंतरही अंगप्रदर्शन करून अभिनेत्री विद्या बालनला नक्की समजत असावं. 'द डर्टी पिक्चर' कोणत्याही प्रकारे सिल्क स्मिताचा वाटण्याऐवजी 'त्या बाई'चा वाटत रहातो.

चित्रपट थोर आहे का? नाही. पण 'रा-वन' वगैरे पिच्चर येतात त्याच काळात म्हटलं तर सरधोपट पण तरीही अनेकांना फ्रस्ट्रेट करणार्‍या प्रश्नांचा निदान विचारतरी करणारा चित्रपट म्हणून मला 'द डर्टी पिक्चर' आवडला. नसीरूद्दीन शहाला फार काम नाही, पण त्या पात्राचा पुरेपूर राग येतो; थोडा थुलथुलीत दाखवला असता तरी खपून गेला असता. ;-) तुषार कपूरला आता बहुदा गरीब-बिचारा असं काम जमतं. कलाप्रेमी आणि तत्त्वनिष्ठ दिग्दर्शकाचं सोंग इम्रान हाश्मीला दाढीशिवाय कितपत जमलं असतं माहित नाही, पण तो ही खुपत नाही. खरंतर कोणतंही पात्र चित्रपटात खुपत नाही. छोट्या छोट्या भूमिकांमधल्या लोकांनीही चांगलं काम केलं आहे. ८० च्या आसपासच्या दाक्षिणात्य चित्रपटांची नक्कल चांगली केली आहे, मुथ्थु, सेल्वा अशा नावाच्या लोकांचं हिंदी थोडं विचित्र वाटतं, पण व्यवस्थित हिंदी बोलतात त्यामुळे चालून जावं. पण विद्या बालनला कितीही प्रयत्न करून 'बिनडोक बिंबो' दिसणं जमणार नाही. सुटलेलं पोट दाखवणारे तोकडे टॉप्स आणि शॉर्ट्स घालूनही विद्या 'सिल्क स्मिता' वाटली नाही तरी 'ती बाई' नक्कीच दिसते. बी-सी-डी ग्रेड नटीच्या आयुष्यावरून प्रेरणा घेऊन थोडे व्यापक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करताना, भावना न पिळणारा चित्रपट एवढ्या कारणासाठी चित्रपट बघायला हरकत नाहीच. ते ही नाही दिसलं तर "पहिल्या चार रांगांतल्या लोकांसाठी" विद्या बालन नेत्रसुखद आहे हे तर झालंच!

जाता जाता: 'द डर्टी पिक्चर'बद्दल आणखी एक रोचक मत.

नगरीनिरंजन Fri, 09/12/2011 - 09:25

'द डर्टी पिक्चर' कोणत्याही प्रकारे सिल्क स्मिताचा वाटण्याऐवजी 'त्या बाई'चा वाटत रहातो.

अशी शंका आलीच होती. सिल्कस्मिताने एवढा विचार केला असेल किंवा तिची एवढा विचार करण्याची कुवत असेल असे तिच्या फोटोतल्या चेहर्‍यावरच्या आणि डोळ्यांतल्या भावांवरून वाटत नाही. विद्या बालनचा चेहरा सिल्कस्मिताच्या भूमिकेसाठी जरा जास्त बुद्धीमान वाटतो.
परीक्षण छान वाटले. अजून पाहिला नाहीय पण लवकरच पाहीन असे वाटतेय.

दिलेल्या दुव्यातले परीक्षण फारच रोचक आहे. समीक्षकाने स्वतःच्या डोक्याने चित्रपटातून बराच अर्थ काढण्याचा बराच प्रयत्न केला आहे.
त्याचा शेवटचा परिच्छेद मात्र पटला.

ऋषिकेश Fri, 09/12/2011 - 09:45

चित्रपट बघायचा आहेच.. बघु कसं जमतंय..
परिक्षण चांगलंय

मन Fri, 09/12/2011 - 10:50

घरी तरी बघायच्या कामाचा आहे.

मला मुळात असा म्रुत व्यक्तीचे काहीतरीच चित्रण करणारे पिक्चर काढावेत का असा प्रश्न पडतो.
मागे थेट्रात जाउन "shoot out at lokhandwala" हा बॉलीवूडपत पाहिला होता.
त्यातला एक गुंड (IIT graduate)माया डोळस(विवेक ओबेरॉय) गुंडागर्दी सुरु करताना , वाढवत जाताना त्याची आई अमृता सिंग त्याला कसे अजून अजून हल्कत, गुंड, नीच,भड्वा बनायला उद्युक्त करते हे दाखवले आहे. एक अत्यंत घाणेरडे, विकृत पात्र म्हणजे त्या गुंडाची आई असे दाखवले आहे. कुठलीही आई आपल्या मुलाला असे करील असे वाटत नाही. ती स्त्री आजही जिवंत आहे. तिने ह्या चित्रपटातील अशा चित्रणाविरुद्ध कोर्टाची पायरीही गाठली होती. पण बहुतांश गरिब व निराधारांचा होतो तसाच तिचाही तित्थे पराभव झाला व चित्रपट उच्चारवात सुरुच राहिला.

हे सांगायचे कारण काय, की तेव्हापासून अशा सत्यकथार्शिअल्व्यावसायिक चित्रपटांची तिडिक बसली. शहाण्याने व्यावसायिक सिनेमे बनवातेत किंवा थेट माहितीपट(documentary)ससंदर्भ बनवावा. कुणाच्याही जीवनाची किंवा मृत्यूची अशी थट्टा मांडून थेट्रात त्याचा "खेळ" करु नये.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/12/2011 - 10:57

In reply to by मन

सिल्क स्मिताचे काही फोटो पाहिले. मी 'सदमा' पाहिल्यामुळे तिचा निदान एक चित्रपट तरी पाहिला असं म्हणता येईल. विद्या बालन कोणत्याही अँगलने सिल्क स्मिता दिसूच शकत नाही. हा चित्रपट तिच्या आयुष्यावरून प्रेरित होऊन "बनवला" आहे. जर चित्रपटातलं हे पात्र 'सिल्क' खरोखर सिल्क स्मितासारखं असेल तर त्यात तिला वाईट, दुष्ट, ढ, कुरूप वगैरे न दाखवल्यामुळे झालंच तर दिग्दर्शक-लेखकाचे आभारच मानावेत.
मृत व्यक्तींच्या चरित्रांवर आधारित चित्रपट बनवायचे नाहीत तर बालगंधर्व, शिवाजी महाराजांवरचे चित्रपटही त्यातच आले.

अशोक पाटील Fri, 09/12/2011 - 12:18

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती ~

श्री.मन यांच्या प्रतिक्रियेबाबत तुझा काहीतरी गोंधळ होतोय असे दिसते. मृत व्यक्तींच्या चरित्रांवर चित्रपट तयार होऊ नयेत असे जगभराच्या चित्रपट सृष्टीतील कुणीच म्हणत नाहीत. प्रश्न आहे तो ज्या व्यक्तीच्या जीवनावर तो तयार करायचा तितकी त्याचे (तिचे) सामाजिक महत्व आहे का ? कोण ही सिल्क स्मिता की जिच्या कथीत जीवनावर काढलेला चित्रपट अन्य कुणाच्यातरी जीवनाची दिशा ठरवून देतो ? 'क'कारी एकताने निव्वळ गल्ल्यावर लक्ष ठेवून केलेली ती एक बाजारी आवृत्ती इतकेच "डर्टी" चे महत्व (तू स्वत:च 'पुढील चार रांगासाठी" असा योग्य उल्लेख केलेला आहेसच, लेखात). तसेच 'विद्या' म्हणजे कुणी मीनाकुमारी वा वहिदा रेहमान समजू नये की जी भूमिका स्वीकारताना फार खोलवर विचार करू शकेल. "डर्टी' चा बोलबाला झाल्याझाल्या तिने आपली इमेज एनकॅश करण्यासाठी लागलीच 'प्रेग्नंट वुमन' नावाचा चित्रपट स्वीकारल्याची बातमी आली. आता या चित्रपटाच्या टायटलवरूनच समजून येते की काय दर्जाची विद्याची त्यात भूमिका असणार. (आज 'सिल्क स्मिता' झाली तर उद्या 'नॉयलॉन नलिनी' ही ती स्वीकारेल)

शिवाजी, अकबर, गांधी, हिटलर, चर्चिल, कॅस्ट्रो अशा जगाच्या नकाशावर आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक मिळविलेल्या ऐतिहासिक व्यक्तींच्या जीवनावर चित्रपट काढण्याचा हेतू सरळ आणि स्वच्छ असतो. त्यापासून निश्चित अशी प्रेरणा घ्यावी असा संदेशही असतो. पण एका सिनेनटीवर छ्चोर पातळीवरील चित्रपट काढायचा (आणि बेमालूमपणे अगोदर तशीच जाहिरात करायची आणि नंतर नसते खटल्याचे खेंगटू उभे राहू नये म्हणून मग 'पूर्णपणे काल्पनिक' चे अस्तर लावायचे) तो केवळ धंद्यासाठी आणि मग ती कशी हतबल, असहाय्य, बिचारी होती अशी इमेज करण्यासाठी दोनचार तसली दृश्ये घुसडायची. असे असेल तर मग अशा चित्रपटांची तुलना "चरित्रात्मक" टॅगशी करूही नये.

इंग्लंडबाबत कुणीतरी असे उद्गार काढले होते (बहुतेक नेपोलियन यानेच) "England is a nation of Shopkeepers" - याच सूरात या देशातील सिनेमाधंद्याबाबतही असेच म्हणता येईल की, "भारतीय सिनेमा हा फक्त धूर्त मार्केटिंग करण्यार्‍याचा धंदा आहे." ~ "डर्टी' चे बॉक्स ऑफिसवरील यश हे अशाच धंद्याचे द्योतक आहे.

अशोक पाटील

संगणकस्नेही Fri, 09/12/2011 - 11:23

चित्रपट डाऊनलोड करून १ तासात पाहिला. ;) हा चित्रपट फक्त आणि फक्त विद्याचाच आहे. काहीजणं असं म्हणत असतील की सदरचा चित्रपट विद्यासारख्या गुणी अभिनेत्रीने केल्यामुळे तिच्या बद्दलचा आदर कमी झाला वैग्रे; पण विद्याबालनने अत्यंत सशक्त अभिनय केला आहे. काही दृष्य आणि विशेषतः संवाद हे मात्र अत्यंत खालच्या पातळीचे आणी व्हल्गर आहेत. :angry:
विद्या बालनच्या अभिनयासाठी हा चित्रपट नक्की बघावा असं मी म्हणेन.

घंटासूर Fri, 09/12/2011 - 12:10

In reply to by संगणकस्नेही

एका तासात कसा काय पिक्चर पाहिला ब्वा?
घरच्यांच्या भीतीने काही खास शॉट्स पळवत पळवत पाहिलेत की काय?

अदिति Fri, 09/12/2011 - 13:39

आवडले. अजून चित्रपट पाहिलेला नाही त्यामुळे चित्रपटाबद्दल बोलता येत नाही.
पण वर चर्चा झाल्याप्रमाणे बॉलीवूडमधले चित्रपट म्हणजे एक विचित्र रसायन झाले आहे असे निश्चित वाटते.परकीय चित्रपटांवरून उचललेल्या कल्पना, गल्लाभरू मसाला, आणि नव्याचा अभिनिवेश वापरून जुन्याच गोष्टी फक्त पॅकेजिंग बदलून विकत बसणे हा आपल्याकडे यशाचा मूलमंत्र आहे असं लोकांना (का?) वाटतं. अशा ढापलेल्या कथांच्या हिंदी आवृत्त्यांमधली पात्रयोजनाही इतकी प्रेडिक्टेबल (मराठी शब्द सुचवावा) असते की वैताग येतो. उदा. लायर लायर आणि ब्रूस अल्मायटी हे जिम कॅरीचे दोन चित्रपट हिंदीमधे काढले. मूळ चित्रपट क्वचित थोडेसे सवंगही झाले आहेत. पण जिमचं काम खरोखर बघण्यासारखं आहे. आणि त्यामुळेच हे दोन्हीही चित्रपट मनोरंजक वाटतात. पण त्यांचा हिंदी अवतार पाहताना हिंदी चित्रपटसृउष्टीची खरंच कीव करावीशी वाटते. ब्रूस अल्मायटीमधल्या ब्रूसचं काम करायला सलमान खान आणि देवाचं काम करायला अमिताभ बच्चन हे ऐकल्यावर मुळीच आश्चर्य वाटत नाही.अर्थातच हे दोन्हीही हिंदी अवतार मनोरंजन तर करतच नाहीत उलट वैताग मात्र आणतात,
असो. चित्रपट बघितल्यावर सविस्स्तर मत देईनच.
एक शंका : मुन्नी बदनाम.. आणि शीला की... या दोन आयटेम साँग्जचं पुढचं पाऊल (किंवा परिणाम) = डर्टी पिक्चर असं म्हणता येईल का?

चिंतातुर जंतू Fri, 09/12/2011 - 14:35

मी हा चित्रपट मधल्या वारी, दुपारच्या खेळाला एका स्वस्त एकपडदा चित्रपटगृहात तुडुंब गर्दीत स्टॉलमध्ये बसून बघितला. काही निरीक्षणं:
केवळ चित्त चाळवण्यासाठी म्हणून आलेले बाप्ये हा चित्रपटाचा मुख्य प्रेक्षक होता. अख्ख्या चित्रपटगृहात (कॉलेज बंक करून आलेले?) मुलगे आणि (आपापला व्यवसाय-धंदा सोडून आलेले?) मध्यमवयीन पुरुष यांच्या गर्दीत औषधापुरती एक-दोन जोडपी दिसत होती (तीही बाल्कनीत). पडद्यावर विद्या बालन येताच टाळ्या-शिट्ट्यांचा गजर झाला. सिनेमातल्या खटकेबाज द्वयर्थी संवादांना अशीच दाद मिळत होती. ज्याला 'कॅरॅक्टर एस्टॅब्लिशमेंट'चे प्रसंग म्हणतात त्या सुरुवातीच्या 'स्ट्रगलर' प्रसंगांत विद्या बालनचं पात्र यश मिळवण्यासाठी कुणाहीबरोबर झोपण्याची तयारी दाखवतं किंवा या ना त्या प्रकारे लैंगिक वासना चाळवणारी एक भोगवस्तू अशी आपली ओळख सिद्ध करतं. अशा प्रसंगांनादेखील प्रेक्षकांचा प्रतिसाद येत गेला. पण... हळूहळू हे सर्व थंड होत गेलं आणि प्रेक्षक कंटाळलेले दिसले. याला दोन कारणं असावीतः

  1. पुरेशा देहप्रदर्शनाचा अभाव - 'मर्डर'छाप चित्रपटांनी एव्हाना 'प्रौढांसाठी'च्या चित्रपटांचे जे पायंडे पाडले आहेत त्या मानानं इथलं देहप्रदर्शन सौम्य आहे. त्यामुळे त्या अपेक्षेनं आलेल्या प्रेक्षकाचा अपेक्षाभंग झाला असावा.
  2. हळूहळू चित्रपट चक्क 'इंटुक'* होऊ लागतो. इम्रान हाश्मी बिछान्यात शिरण्याऐवजी 'इश्क सूफियाना' वगैरे गाऊ लागतो तेव्हा प्रेक्षक प्रचंड कंटाळले होते.

याउलट ज्यांना गंभीर काहीतरी पाहायचं आहे असा बराचसा प्रेक्षक गंभीर भाग सुरू होण्याआधीच कंटाळून जाईल किंवा सवंगतेच्या भीतीनं चित्रपटगृहाकडे वळणारच नाही असं वाटतं. थोडक्यात, सिल्क स्मिताच्या नावानं सवंग करमणूक आणि तिच्या शोकांतिकेविषयीचं स्त्रीवादी गंभीर भाष्य या दोन दरडींवरचा तोल सांभाळता सांभाळता चित्रपट फसलेला आहे. त्यातल्या एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं असतं तर चित्रपट बरा होऊ शकला असता.

अवांतर - सिल्क स्मिताच्या वास्तवातल्या व्यक्तिमत्वाशी चित्रपट कितपत साधर्म्य राखून आहे ते माहीत नाही; पण पुरुषांना त्रासदायक होईल आणि झेपणार नाही इतकी ती उन्मुक्त होती, असं ऐकीवात आहे. अशा व्यक्तिमत्वांच्या आधारानं पुरुषप्रधान संस्कृतीतल्या स्त्रियांच्या स्थानाबद्दल गंभीर भाष्य करणारे चित्रपट नक्की बनावेत असं वाटतं.

*इंटुक - म्हणजे इंटेलेक्चुअल नव्हे. अधिक माहितीसाठी पाहा/वाचा: 'गार्बो' - ले. महेश एलकुंचवार

राजेश घासकडवी Fri, 09/12/2011 - 17:59

चित्रपटातील घटनाक्रम न सांगता केवळ कथानकाचा अर्क सांगून त्यात मांडलेल्या प्रश्नांविषयी प्रांजळ मतं मांडणारी समीक्षा आवडली.

आपल्या फायद्यासाठी, आनंदासाठी एखादी गोष्ट ठरवून करावी आणि आपणच त्याला कधी बळी पडतो हेच आपल्याला कळू नये; दारू, सिग्रेटच्या व्यसनामुळे जे होतं तेच याही मुलीचं 'स्वत:चं स्त्री-शरीर वापरून घेण्या'संदर्भात होतं; आपणच आपल्या प्रतिमेत अडकून पडावं आणि मग चित्रपटसृष्टीला नवीन नसणारा व्यसनाधीनतेतून अंत होतो तसाच!

चित्रपट बघितलेला नाही, पण वरील विधानावरून एक प्रश्न निर्माण होतो. स्त्रीला निव्वळ भोगवस्तू समजण्याचा (रास्त) आरोप बहुतांश समाजांवर होतो. इथे चित्र बरोब्बर उलट दिसतं. स्वतःच्या शरीराकडे भोगवस्तू म्हणून पहाणं, आणि ते जाहीरपणे तसं वापरणं यामुळे ही शोकांतिका घडते असं दिसतं. प्रश्न असा आहे की आक्षेप नक्की कशाला घ्यावा? शरीराला (स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या) भोगवस्तू समजण्याला की त्याचा अतिरेक करण्याला?

नितिन थत्ते Fri, 09/12/2011 - 20:19

सिल्क स्मिथाच्या प्राईम काळात चित्रपटांचा प्रेक्षक असल्यामुळे सांगु इच्छितो की सिल्क स्मिथा ही तेव्हा तरी इन्सिग्निफिकंट नटी होती. पुरुष प्रेक्षकांची हॉट क्रेझ वगैरे काही नव्हती. (लीना दास, प्रीती सप्रू ही नावे आठवतात का?)

आपल्या शरीराचा वापर करून ती (चित्रपटात दाखवले आहे तशी) यशस्वी वगैरे मुळीच झाली नव्हती.

अशोक पाटील Fri, 09/12/2011 - 21:03

In reply to by नितिन थत्ते

~ सहमत.

"सौंदर्याचा अ‍ॅटमबॉम्ब" पद्मा चव्हाणचे जे स्थान मराठीत तितकेच (खरेतर त्याहीपेक्षा कमी) स्थान सिल्क स्मिताचे दाक्षिणात्य चित्रपटात. एका विशिष्ट काळातील फॅशनप्रमाणे असे मांसाचे गोळे पडद्यावर येत असतात आणि दोनचार चित्रपतानंतर अंतर्धानही पावत असतात. कोण विचारतो ? शेवटी कुणीच विचारत नाही हे पाहून नैराश्येने आत्महत्याही करतात. साडेचारशेपेक्षा जास्त चित्रपटात त्याच त्याच पद्धतीच्या अंगप्रदर्शनाच्या भूमिका (?) करून करून नैराश्यग्रस्त झालेल्या स्मितानेही शेवटी तसेच केले.

नॉयलॉन नलिनी, पॉलिस्टर पद्मिनी, डिस्को शांती अशी नावे जरी वाचली तरी 'सिल्क' ची गादी चालविली जात आहेच, हा या चित्रपटसृष्टीला असलेला एक शापच म्हणावा लागेल. त्यामुळे "डर्टी" चित्रपटात सिल्क स्मिताची सो-कॉल्ड पॅथेटिक स्टोरी बघण्यापेक्षा प्रेक्षकांनी विद्याला 'तसे' बघावे हाच त्या महान एकताबाईचा उघडानागडा हेतू आहे.

अशोक पाटील

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/12/2011 - 22:11

In reply to by अशोक पाटील

त्यामुळे "डर्टी" चित्रपटात सिल्क स्मिताची सो-कॉल्ड पॅथेटिक स्टोरी बघण्यापेक्षा प्रेक्षकांनी विद्याला 'तसे' बघावे हाच त्या महान एकताबाईचा उघडानागडा हेतू आहे.

अजिबात नाही. एकताबाईंचा हेतू आहे पैसा मिळवणे. पैसा कोणाकडून मिळेल? तर मल्टीप्लेक्सातले मध्यमवर्गीय, पापभीरू पण दुसर्‍याने केलेली बंडखोरी आवडणारे लोक; यांच्या बर्‍यापैकी बहुसंख्येने आहेत पुरूष आणि काही प्रमाणात माझ्यासारख्या बर्‍या घरच्या, कमावत्या आणि स्वतंत्र स्त्रिया!

म्हणून या लोकांसाठी सिल्क स्मिताचं आयुष्य घेतलं, त्याला आपल्या दर्शकांना आवडेल असं बेतलं. म्हणून 'योगायोगाने संबंध लागेल' वगैरे डिस्क्लेमर्स. पुढचे धागे शिवायला विद्या बालन हे नाव अनपेक्षित पण चालणारं आहे. तिचा नैसर्गिक आकार इत्यादी गोष्टींमुळे सर्वसाधारण भारतीय पुरूषाला आवडेल अशी ती आहेच, पण तुपाळ चेहेर्‍यामुळे माझ्या गटातल्या व्यक्ती, म्हणजे स्त्रियांनाही ती "अशी" आवडू शकते. मग थोडी कलेची सेवा वगैरे करण्याचा प्रयत्न म्हणून इम्रान हाश्मी हे पात्र, स्त्रियाचं शोषण असा "ब्लांड मसाला"ही घेतला. लगेच फिल्म इंटुक झाली. मल्टीप्लेक्सांमधे चित्रपट चालणार निश्चित. पुन्हा अंगप्रदर्शन आहे म्हटल्यावर सिंगल स्क्रीन्समधेही चित्रप्ट चालणारच.

आपल्याला भले कलात्मक चित्रपट बघायला आवडला असता, पण एकता कपूर बाईंचा हा प्लॅन नाहीच. त्यांचा मतलब पैशांशी आहे. माझी अपेक्षा एकताबाई आणि/किंवा चित्रपटावर लादण्याऐवजी हे एकदा स्वीकारल्यानंतर मला सांस-बहू, बिन्डोक मारामार्‍या यापेक्षा हा चित्रपट उजवा वाटतो. सिल्क स्मिता काय आणि विद्या बालन काय, त्यांनी आपापल्या मर्जीने अंगप्रदर्शन केलं आहे. ज्यांची नैतिकता आड येते त्यांनी चित्रपट पाहू नये; ज्यांचे शौक पूर्ण होतात त्यांनी निदान बोल्ड सीन्स, संवादांना नावं ठेवू नयेत ही अपेक्षामात्र अवास्तव आहे हे या धाग्यावरही दिसतं आहेच. पुन्हा तोच दांभिकपणा, आणखी काय!

चिंतातुर जंतू Sat, 10/12/2011 - 11:04

In reply to by नितिन थत्ते

>>सिल्क स्मिथाच्या प्राईम काळात चित्रपटांचा प्रेक्षक असल्यामुळे सांगु इच्छितो की सिल्क स्मिथा ही तेव्हा तरी इन्सिग्निफिकंट नटी होती. पुरुष प्रेक्षकांची हॉट क्रेझ वगैरे काही नव्हती. (लीना दास, प्रीती सप्रू ही नावे आठवतात का?)

हे मत दाक्षिणात्य चित्रपटांच्या अभ्यासाअंती बनवले आहे की हिंदी चित्रपटांच्या? माझ्या दाक्षिणात्य मित्रांमध्ये सिल्क स्मिथा पुष्कळ आवडती होती - अर्थात देहप्रदर्शनासाठीच; अभिनेत्री म्हणून नव्हे. दाक्षिणात्य चित्रपटांत देहप्रदर्शनाचे तत्कालीन संकेत धुडकावून लावण्यात ती अग्रेसर होती असे ऐकीवात आहे. गूगलवर शोधल्यास अशा जुन्या चित्रपटांतले काही प्रसंग सापडतील आणि त्यावरची लोकांची मतेदेखील.

राजन बापट Mon, 12/12/2011 - 10:54

In reply to by चिंतातुर जंतू

माझ्या आठवणीप्रमाणे ही १९९६ ची गोष्ट आहे. नोकरीतला उमेदवारीचा काळ. क्युब वगैरे भानगड नव्हती. इंटरनेट ब्राउजिंग सुरु झालेलं नव्हतं; फॉरवर्डेड इमेल्स चा जमाना. पार्टीशनच्या पलिकडच्या रांगेत एक तमिळ पोरगा बसायचा. एकदा सक्काळीसक्काळी तो एकदम जोरजोरात निषेध किंवा धाय मोकलणे यांच्या अधलंमधलं बोलायला लागला. लोकांनी चौकशी केल्यावर कळलं : सिल्कस्मिथाताई गेल्यानंतर न आवरता आलेला तो हुंदका होता. त्यानंतर अनेक दिवस त्याला, आपल्या या दु:खोद्गाराबद्दल लोक का हसले हे कळलेलं नव्हतं.

चिंजं यांच्या उपरोक्त मताशी मी सहमत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/12/2011 - 21:10

मनोबा, पाटीलः लोकं चित्रपट, मालिका पाहून त्यालाच इतिहास समजतात हा दोष कुणाचा? सदर चित्रपट सिल्क स्मिताच्या आयुष्यावर आधारित आहे, तिचा चरित्रपट नाही अशा बातम्या मलाही इंटरनेटवर मिळाल्या. (एक, दोन)
प्रत्यक्ष आयुष्यात बघितलेल्या गोष्टींवर कादंबर्‍या लिहील्या जातात, तसाच एक चित्रपट बनवला. बालगंधर्वांचा चरित्रपट बनवणार्‍यांनी गोहरबाईंना दुष्ट (माझ्या मते ढ) दाखवलं नसतं तर बरं झालं असतं ('बालगंधर्व' हा टुकार चित्रपट धोधो चाललाच पण याबद्दल कधी गदारोळ झाल्याचं आठवत नाही. ते चांगलं का वाईट हा प्रश्न नाही.) 'डर्टी पिक्चर' सरळसरळच 'फॅण्टसी' असल्याचं सुरूवातीलाच म्हणतो. मुख्य पात्राचं नावही ना विजयालक्ष्मी आहे ना स्मिता. आणखी किती ओरडून सांगावं की हा चरित्रपट नाही, यात कादंबरीप्रमाणेच या चित्रपटातही लेखन आणि/किंवा दिग्दर्शकाने स्वातंत्र्य घेतले आहे?

मी सिल्क स्मिताबद्दल जे काही अल्प वाचलं आहे, पाहिलं आहे त्यावरून: सिल्क स्मिताचं सामाजिक महत्त्व आहे का? माझ्या मते होय. तिच्या आधी कोणीही चित्रपटात एवढं बिनधास्त वावरल्याचं माझ्या माहितीत नाही. सिल्क स्मिताने या गोष्टीचा किती विचार केला होता हे मला माहित नाही. पण पुरूषांना हवं आहे तेच दाखवून, बिनधास्त वावरून पुन्हा वर पुरूषप्रधान चित्रपटसृष्टीत काही अंशी 'डिक्टेट' करणं तिला जमलं. पुरूषांना स्त्रीचं शरीर आकर्षक वाटणार, ठराविक प्रकारच्या स्त्रिया पाहून मनात लालसाही उत्पन्न होणार पण असं काही म्हणणं, दाखवणं म्हणजे अगदी बलात्कार, संस्कृतीहीन वगैरे गप्पा मारणार्‍यांच्या दांभिकपणाचा फायदा घेणं, काही काळ का होईना, तिला जमलं. (मागास अरब देशांनी इस्रायल प्रश्नावरून तेल विकणं बंद करून अमेरिका आणि इतर काही पाश्चिमात्य देशांना कात्रीत पकडलं होतं त्याचीच काहीशी आठवण झाली.) ज्या गोष्टीची बाजारात प्रचंड मागणी आहे, आपल्याकडे ती आहे, आपल्याला ती विकायची आहे आणि इतर कोणी ते विकायला तयार नाही तर आपण त्याची किंमत ठरवावी, आपण राज्य करावं असा काहीसा सिल्क स्मिताचा दृष्टीकोन असावा. तिच्या नावावर चित्रपट चालायचे, याचा अर्थ सामान्य लोकांना ती हवी होती यात काही नवल नाही.
सिल्क स्मिता जेव्हा स्टार होती त्या काळात माझा जन्म झाला. त्या काळच्या (अपवाद वगळूनच) चित्रपटांमधली मूल्य, विशेषतः स्त्री देवी आहे, आई महान आहे, सगळ्या स्त्रिया पूजनीय आहेत, त्यांना मखरात बसवा, त्यांचं रक्षण करा, असले प्रकार असताना तिने बंडखोरी केली. पण आजचे बघणेबल चित्रपट पहाताना किंवा आजचं सामान्य स्त्रिया, मुलींचं आयुष्य पहाताना त्यांना असं मखरात बसावं लागत नाही हे पदोपदी जाणवतं. तिच्या एकटीमुळेच हे शक्य झालं आहे असं काही मी म्हणत नाही. पण 'साहिब, बिवी और गुलाम'मधल्या छोटी बहूच्या आयुष्यासारखं निष्फळ आयुष्य आजचं सत्य नाही हे निश्चित आहे. आजच्या चित्रपटांमधे पूर्वीएवढी निरागसता नाही हे पण दिसतं आहेच. "आजकालची मुलं काय स्मार्ट आहेत ना" याचा हा परिणाम होणं सहाजिकच आहे. किंबहुना 'डर्टी पिक्चर'मधले संवाद मला फार काही बोल्ड वाटले नाहीत, त्यापेक्षा 'चीनी कम'मधे जास्त मसाला आहे, जो मला कालसुसंगत वाटतो. अर्थातच ही तक्रार अजिबात नाही.

नितिन आणि श्री. पाटीलः त्या काळात सिल्क स्मिता किती लोकप्रिय होती हे माहित नाही. पण नायलॉन नलिनी, डिस्को शांती, वगैरे नावं मला आत्ता, या धाग्यातून समजली. 'सिल्क स्मिता' हे नाव 'सदमा' आणि दिलीप प्रभावळकरांच्या 'गुगली'मुळे माहित होतं. पण हा मुद्दा महत्त्वाचा का? एखाद्या 'स्ट्र्'च्या आयुष्याच्या तुकड्यावर मेघना पेठे सकस कथा लिहू शकतातच की!

अशा गोष्टी चित्रपटनिर्मात्यांना दुभत्या गायी वाटल्या तर त्यात आश्चर्य नाही. एकता कपूरने या गोष्टीतून पैसे मिळवायचे ठरवले, उत्तम. सांस-बहूचं वाशेळं आयुष्य दाखवण्यापेक्षा बरं आहे. विद्या बालन या तुपाळ अभिनेत्रीलाही त्यात काम करावंसं वाटलं, आणखी उत्तम. विद्या बालनला सिल्क स्मिता बनणं शक्य नाही, पण "ती बाई" (मी इथे मुद्दाम मुलगी, स्त्री असा शब्द वापरलेला नाही) बनणं तिला जमलं. कमी कपड्यांत बिनधास्त वावरणं, जे विद्या बालनने आधी केलं नव्हतं, तिला जमलं आहे निश्चित. पण चित्रपट बनवून, दोघींचाही बिनधास्तपणा वापरून काही नवीन दाखवलं आहे का? प्रयत्न केला आहे, पण नाही नीट जमलेलं. जंतूने वर लिहील्याप्रमाने ना धड बिनधास्त बाई दाखवली ना धड तिच्या बंडखोरीचा विचार केला!

श्री. पाटीलः विद्या बालनने तिची ही इमेज कॅश का करू नये? मीनाकुमारीनेही तिची 'ट्रॅजेडी क्वीन' ही इमेज एनकॅश केलीच. माझा तिच्याबद्दलचा अभ्यास कमी आहे, पण मीना कुमारी कधी कुठे नाचता-बागडताना दिसली का? अगदी मोजके अपवाद वगळता लता मंगेशकरांनी त्यांचा गोड आवाज एनकॅश केला. 'परिणिता'नंतर विद्या बालन तशाच गोग्गोड भूमिकांत फार काळ अडकली नाही हे बरंच झालं. 'भूल भुलैया', 'इश्किया' या चित्रपटांत विद्याने उत्तम काम केलं आहे. अर्थात तिने 'हे बेबी', 'किस्मत कनेक्शन' वगैरे टुकार पिच्चरांमधेही काम केलं आहे. अभिनेत्यांनी चित्रपटाबद्दल कितपत विचार करणं अपेक्षित आहे? त्यांनी असा विचार करायचा तर दिग्दर्शकाने काय करायचं?

अदिति: सहमत आहे. बर्‍याच अंशी याही चित्रपटातली पात्रं प्रेडीक्टेबल आहेत. फक्त अमक्या ढमक्या चित्रपटाची छचोर नक्कल करण्यापेक्षा डर्टी पिक्चर मला सरस वाटला.
'मुन्नी' आणि 'शीला' ही दोन्ही गाणी मला संगीत आणि नृत्यासाठी आवडतात. त्या दोन्हींत अंगप्रदर्शन आहे असं म्हणणं मला थोडं धाडसाचं वाटतं, ते अशासाठी की इतपत स्किन शो सगळीकडेच असतो की! (शिवाय मी स्ट्रेट स्त्री असण्यामुळेही असेल, मला त्यात त्या दोघींचं नृत्य आणि ममता शर्मा, सुनिधी चौहानचं गाणंच खूपच आवडतं. ;-) ) संपूर्ण चित्रपटभर अशाच कपड्यांमधे, असेच चावट चाळे करत फिरणं, शिवाय नृत्य फार चांगलं न करता सेक्शुआलिटी दाखवणं (किंवा तसा प्रयत्न) म्हणजे डर्टी पिक्चर म्हण.

राजेशः शरीर दाखवून आपण आपल्याला हवं ते मिळवू शकतो, आपली सेक्शुआलिटी आपल्याला हवी तशी प्रदर्शित करू शकतो ही एक बाजू झाली. पण त्यावर लोकांच्या अमक्या प्रकारच्याच प्रतिक्रिया याव्यात ही त्याची दुसरी बाजू आहे. इंटुक इम्रान हाश्मी किंवा तुषार कपूर (यांची कॅरॅक्टरं) तिला वाईट किंवा चांगली पण माणूस म्हणून वागवतात. असं सगळ्यांनीच पडद्याबाहेर वागवावं अशी काहीशी तिची अपेक्षा असते. आपल्याला हवं तेव्हा सेक्सी बाई आणि अगदी क्वचितच एक व्यक्ती अशी ती वागते. या गोंधळातून तिला बाहेर येता येत नाही आणि आपण डिक्टेट करू शकत नाही यातली अगतिकता, एकटेपणा, करियर उतरणीला लागलं आहे हे सहन न होणं यात तिचा अंत होतो.

संगणकस्नेही: "सेक्स सिंबल" असं मिरवणार्‍या स्त्रीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात तुम्हाला तुपाची रेसिपी मिळेल असं वाटलं होतं का?

संगणकस्नेही Fri, 09/12/2011 - 22:48

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

संगणकस्नेही: "सेक्स सिंबल" असं मिरवणार्‍या स्त्रीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात तुम्हाला तुपाची रेसिपी मिळेल असं वाटलं होतं का?

=)) =))
छे! छे! आम्ही तो चित्रपट बघुया तरी बॉ कशी होती ती सिल्क म्हणुन पाहिला! विद्या बालनचा अभिनय आवडला हे मात्र मी वर नमूद केलं आहेच! :)

आडकित्ता Fri, 09/12/2011 - 22:31

कोर्टात केस झाली म्हणे त्या बालन वर?
नस्तं बालंट ओढवून घ्यायचं. दुस्रं काय?

धनंजय Fri, 09/12/2011 - 23:44

सहज मिळाला तर बघायला पाहिजे.

पण लेखातील काही भाग समजलेला नाही :

"मी अ‍ॅक्ट्रेस नाही" असं स्वतःच म्हणणार्‍या या मुलीला चित्रपटांत नाच करून नाव हवं आहे, प्रसिद्धी, पैसा आणि त्यायोगे मिळणारी सगळी सुखं हवी आहेत. "मी मुलगा असण्याची गरजच काय, मुलांना जे हवं असतं ते माझ्याकडे आहे त्यामुळे मी त्यांना माझ्या तालावर नाचवू शकते",
...
मला आकर्षक वाटावं असं सिल्क स्मिता (आणि राखी सावंत काय!) यांच्याकडे काहीही नाही. सिल्क स्मिताबद्दल मला जेवढी माहिती आहे त्यावरून तिने एवढाही विचार केला असेल का असा मला प्रश्न पडला. किंबहुना विचार केला असता तर बंडखोरी (किंवा अंगप्रदर्शन) या एकमेव भांडवलावर फार दिवस राज्य चालू शकत नाही हे तिला लक्षात आलं असतं.

पहिल्या परिच्छेदात जितपत विचार सांगितलेला आहे, तितपत विचार कुठल्याही सामान्य मुलीला (किंवा त्या परिस्थितीतल्या मुलाला) सुचू शकेल असे वाटते. सिल्क स्मिताला न सुचावा, असे का वाटते?
बंडखोरी किंवा देहप्रदर्शन यांच्या भांडवलावर फार काळ राज्य चालू शकत नाही, हे खरेच आहे. पण स्त्रीचा (वाटल्यास सोज्ज्वळ) देखणेपणा ज्या-ज्या ठिकाणी चालतो, तशा कुठल्याच ठिकाणी स्त्रीचे फार काळ राज्य चालत नाही. भारतात वर्षानुवर्षे गाजणारे पुरुष सुपरस्टार असतात, स्त्रिया कोणीच नाहीत. (हॉलिवूडमध्येही बहुधा हाच प्रकार आहे.) अमिताभ बच्चन, देव आनंद, राज कपूर, शाहरुख या प्रत्येकांची सुपरस्टारडमे त्यांच्या हिरोइनींच्या सुपरस्टारडमांपेक्षा खूप अधिक काळ चालली. बाजारात चलती थोडाच काळ टिकेल, ही बाब हिशोबात घ्यायची असते, पण हीच एक बाब हिशोबात नसते. जितका काळ भांडवल चालेल तितका काळ फायदा करून घ्यायचा, हे धोरणही शाहाणपणाचे असू शकते. जसे ए-ग्रेड चित्रपटांत काम करणार्‍या नायिकांचे, तसेच पोर्नपटात काम करणार्‍या नट-नट्यांचे धोरण असू शकते. त्यामुळे सिल्क स्मिताला तिच्या मालाचा क्षणभंगुरपणा लक्षात आला नाही, असे कसे म्हणता येते?

(गोव्यात एका विशिष्ट प्रकारची जंगली आळंबी फक्त आठवडाभर मिळते. त्यांची किंमत अतिशय महाग असते. हा धंदा तात्पुरता आहे, हे नीट जाणून काही लोक फायदा करून घेतात.)

रोचना Sat, 10/12/2011 - 00:43

परीक्षण आवडले. पिक्चर पाहिला नाही, घराजवळच्या थेटरात लागला आहे, बघावासा वाटतोय आता...
छान चर्चा चालू आहे...

फारएण्ड Sat, 09/03/2013 - 07:29

सिल्क स्मिता म्हणजे जितेन्द्रचा 'कैदी' आला होता त्यात 'बांगो बांगो बांगो' हे गाणे एकदम लोकप्रिय झाले होते, त्यातली बहुधा. हिन्दीत खूप लोकप्रिय नव्हती पण साउथ मधे असेल कदाचित.
http://www.youtube.com/watch?v=nqv6oMZ6Qjs

विद्या बालनने मात्र जबरी काम केले आहे यात. चित्रपट पाहताना सिल्क स्मिता डोळ्यासमोर यावी एवढी तिच्याबद्दल ओळख/माहिती नाही.

विषारी वडापाव Thu, 14/03/2013 - 20:34

आता कन्नड मध्ये वीणा मलिक चा डर्टी पिक्चर रीमेक येत आहे. इच्छुक्ाआनी गूगल सर्च करावा. अती उत्साही मंडलिनी वीणा मलिक डर्टी पिक्चर असा गूगल इमेज सर्च करावा : )