Skip to main content

धेनुकाकटचे गौडबंगाल- भाग 3

(मागील भागावरून पुढे)
इ.स.पहिल्या शतकात अस्तित्वात असलेल्या धेनुकाकट गावाचा शोध घेण्याचे आपले प्रयास पुढे चालू ठेवण्याच्या आधी या गावाच्या बाबतीतील काय माहिती आपल्या जवळ आहे त्याचा एक आढावा आपण घेऊया. भरभराटीस आलेली एक मोठी समृद्ध बाजारपेठ या गावामध्ये होती. ग्रीक किंवा रोमन वंशाच्या बर्‍याच व्यक्ती धेनुकाकट बाजारात व्यापार तरी करत होती किंवा या गावामध्ये ठेवण्यात आलेल्या सेना तुकडीमधे भाडोत्री सैनिक म्हणून आणल्या गेलेल्या होत्या. गावामधल्या व्यापार्‍यांची एक संघटना सुद्धा या गावामध्ये होती आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे गाव कार्ले मठाच्या परिसरात आणि दखखनच्या साम्राज्यातील कोणत्या तरी महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर वसलेले होते.

यावरून असे म्हणणे सयुक्तिक ठरेल की एका बाजूला दख्खनचे साम्राज्य आणि दुसर्‍या बाजूला रोम किंवा ग्रीस या मध्ये चालणारा बराचसा व्यापार धेनुकाकट मधील व्यापाऱ्यांच्या मार्फत निदान एका विविक्षित कालखंडामध्ये तरी होत असला पाहिजे. हे जर मान्य केले तर असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक वाटते की पैठण आणि रोम यामधील व्यापार ज्या मार्गांवरून होत असे अशा व्यापारी मार्गांपैकी फक्त एका व्यापारी मार्गाजवळ, धेनुकाकट सारखी भरभराटीस आलेली बाजारपेठ प्रस्थापित होण्याइतकी मोठी, या आयात-निर्यात व्यापाराची व्याप्ती खरोखरीच होती का?

प्लिनी द एल्डर (Pliny the Elder) या नावाने ओळखला जाणारा एक रोमन तत्वज्ञानी, लेखक आणि विचारवंत ( Gaius Plinius Secundus (CE 23 – CE 79) याच काळात होऊन गेला. तो रोमच्या नौसेनेचा आणि पायदळाचा सेनापतीही होता. त्याने भारत आणि रोम मधील त्या काळातील व्यापाराबद्दल मोठे परखड आणि मार्मिक मत व्यक्त केले होते. रोमच्या दृष्टीने मोठ्या तुटीत चालतअसलेल्या या व्यापाराबद्दल तो म्हणतो:

” आमचे विलास, चैन आणि रोमन स्त्रियांचे लाड यासाठी आम्ही मोजत असलेली ही किंमत आहे. अलीकडेच केलेल्या हिशोबाप्रमाणे भारत, चीन आणि अरेबिया यांनी व्यापारात रोमचे निदान शंभर मिलियन sesterces तरी काढून घेतलेले आहेत.”

“This is the price we pay for our luxuries and our women. At the last reckoning one hundred million sesterces are taken away by India, Seres and Arabia.”

जुन्या रोमन कागदपत्रांवरून असे दिसते की त्या कालात विलासी आणि चैनीच्या आयुष्यासाठी, रोमन स्त्री पुरुषांना हव्याहव्याशा वाटणार्‍या वस्तूंनी भरलेली निदान 40 गलबते तरी प्रत्येक वर्षात रोम आणि भारत यामधील फेर्‍या करत होती. भारताकडून येणार्‍या आयातीत मसाले, मोती, मलमल, हस्तिदंत या सारख्या वस्तू असत तर निर्यातीत अतिशय किरकोळ प्रमाणातील वस्तूंचा समावेश असे. यात मुख्यत्वे दारू किंवा वाइन भरलेल्या भाजलेल्या मातीच्या सुरया, वाद्ये आणि गायक तरूण आणि नर्तकी या भारतात पाठवल्या जात. दर वर्षीच्या आयात-निर्यातीमधील या तफावतीमुळे, रोमचा भारताबरोबरचा व्यापार एवढ्या तुटीत चालत असे की सोन्याच्या स्वरूपात रोमला त्याची किंमत भरावी लागणे अपरिहार्य बनत असे.

रोम आणि भारत यांच्यामधील त्या कालातील व्यापाराचा आढावा एवढ्या बारकाईने मी वर घेण्याचे कारण हेच आहे की रोमबरोबरच्या व्यापाराची व्याप्ती प्रत्यक्षात केवढी मोठी होती हे वाचकांच्या लक्षात यावे. धेनुकाकट सारख्या समृद्ध बाजारपेठा त्या काळी भारतीय प्रदेशामध्ये प्रस्थापित होण्यामागे हेच कारण आहे आणि त्यात नवलाईचे असे काही दिसत नाही. यापुढचा प्रश्न म्हणजे ज्या व्यापारी मार्गांवरून रोम आणि भारत यामधील व्यापार त्या काली चालत असे ते व्यापारी मार्ग कोणते होते? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी, आपण भारतातील ज्या बंदरांवरून रोमला जाणारी गलबते प्रस्थान करत असत आणि रोमहून येताना दारू भरलेल्या सुरया घेऊन ज्या बंदरांना लागत असत, अशा बंदरांपासून सुरूवात करणे योग्य ठरेल.

क्लॉडियस टॉलेमी Claudius Ptolemy (CE 90 – CE 168) हा अलेक्झांड्रिया शहरामधील एक ग्रीक-रोमन वंशाचा नागरिक होता. एक लेखक, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, भूगोल तज्ञ, भविष्यवेत्ता आणि कवी असलेला टॉलेमी तसा सुप्रसिद्धच आहे. अनेक शास्त्रीय ग्रंथ त्याने लिहिलेले आहेत. नंतरच्या काळात, इस्लामी जगात आणि युरोपमधे झालेल्या शास्त्रीय प्रगतीला त्याच्या किमान तीन ग्रंथांचे तरी ऋण हे मान्य करावेच लागते. ‘द जिऑग्राफी’ ‘The Geography’ (also known as Geographia, Cosmographia, or Geographike Hyphegesis) हा ग्रंथ टॉलेमीने लिहिलेल्या ग्रंथांपैकी एक प्रमुख ग्रंथ म्हणून मानला जातो. नकाशे काढण्याचे तंत्र आणि इ.स. दुसर्‍या शतकातील रोमन साम्राज्याच्या भूगोलाविषयीची एकत्रित केलेली माहिती, अशा विषयांवर हा ग्रंथ लिहिलेला आहे.

रोम बरोबर चालत असलेला बहुतांशी व्यापार ज्यांच्या मार्फत होत असे अशा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या चार प्रमुख बंदरांची नावे या ग्रंथामध्ये टॉलेमीने दिलेली आहेत. ती अशी आहेत; भडोच(Barygaza) डौंगा (Salsette island) वसई जवळील सोपारा ( Suppara) आणि चौल (Semylla or Cemūla.)). ही चार बंदरे आणि या व्यतिरिक्त असलेले कल्याण हे बंदर, यांच्यामधूनच रोम बरोबरचा भारताचा व्यापार चालत असल्याने, आपण शोधत असलेले व्यापारी मार्ग या 5 ठिकाणांपासून सुरू होऊन पूर्वेकडे जात असले पाहिजेत हे स्पष्ट आहे. या मार्गांवर येणारी पहिली मोठी अडचण म्हणजे पूर्व पश्चिम पसरलेली सह्याद्री पर्वतराजी ही होती. ही पर्वतराजी पार करण्यासाठी, व्यापारी तांड्यांना. या महाकाय पर्वतराजीमध्ये त्या काळापासूनच अनेक ठिकाणी अस्तित्वात असलेल्या, घाटरस्त्यांपैकी एकामधून वाट काढावी लागत होती. दख्खनमधील बहुतांशी बौद्ध मठ या व्यापारी मार्गांजवळच स्थापले गेले असल्याने असे मार्ग या बौद्ध मठांच्या परिसरातूनच जात होते.

भडोच बंदरापासून पूर्वेकडे जाणारा व्यापारी मार्ग, तो कार्ले मठापासून खूपच दूरच्या अंतरावर असल्याने त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल. उरलेल्या म्हणजे, कल्याण, सालसेट, सोपारा आणि चौल या बंदरांपासून निघालेले असे काही व्यापारी मार्ग विख्यात व्यासंगी दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी शोधलेले आहेत. या मार्गांचे त्यांनी केलेले वर्णन मी खाली उद्धृत करत आहे.

” उत्तरेकडचा व्यापारी मार्ग, कल्याण किंवा सोपारा येथून सुरू होऊन तो सह्याद्रीच्या पायथ्यालगत नाणेघाटापर्यंत जात असे व नाणेघाट ओलांडल्यावर तो सरळ थेट जुन्नर गावात पोचत असे. दुसरा एक शक्य असलेला व्यापारी मार्ग, लोणावळे गावाजवळच्या ‘सावा’ किंवा ‘कुरवंडे’ घाटातून वर चढून बेडसे मठाजवळून जात असला पाहिजे. या शिवाय खंडाळा गावाजवळ घाट चढून आलेला आणखी एक रस्ता, कोंडाणे मठाच्या परिसरातून जात असला पाहिजे. परंतु यापैकी बहुतेक सर्व घाट रस्ते अतिशय दुर्गम आणि चढण्यास कठीण असल्याने बहुधा फारसे लोकप्रिय नव्हते.”

“The northern feeder route starting from Kalyan, Sopara went right along the foot of the western Ghats and reached Junnar town through Naneghat. One possible route might have climbed up Sava or Kurvanda pass near present town of Lonavala and would have passed in the vicinity of Bedse monastery. .Another route came up the vally near today’s hill station Khandala and passed in the vicinity of Kondane monastery. However all these routes were difficult and were not popular.”

दक्षिणेकडे असलेल्या चौल बंदरापासून सुरू होणारा आणखी एक व्यापारी मार्ग या शिवाय अस्तित्वात होता. सध्याच्या मुळशी तलावाजवळ असलेल्या पिंपरी गावाजवळून हा घाट वर चढत असल्याने त्याला पिंपरी घाट या नावाने बहुधा ओळखले जात होते. (सध्याचा ताम्हणी घाट म्हणजे बहुधा हाच घाट् असावा.) घाटमाथ्यावर आल्यानंतर हा रस्ता पवना खोर्‍यातून उत्तरेकडे शेलारवाडी मठाच्या परिसरातून जात असे व नंतर भाजे व कार्ले येथील मठांच्या परिसरात पोचल्यानंतर, नवलाख उंबर गावामधून हा रस्ता कार्ले डोंगराला वळसा घालून प्रथम चाकण गावाकडे व तेथून जुन्नर गावाकडे जात असला पाहिजे. धेनुकाकट गावातील एका रहिवाशाने शेलारवाडी मठाला दिलेल्या एकुलत्या एक देणगी मागचे कारण, वरील मार्ग शेलारवाडी मठाजवळून जात होता हेच बहुधा असले पाहिजे.

हे सर्व संभाव्य मार्ग मी गूगल अर्थ नकाशांवर प्रत्यक्ष काढून बघितल्यावर माझ्या हे लक्षात आले की त्या काळातील व्यापाराचे पश्चिम घाटातील सर्वात प्रमुख केंद्र असलेल्या जुन्नरला पोचण्यासाठी नाणेघाट्चा रस्ता हा सर्वात कमी अंतराचा, सुकर आणि म्हणूनच सर्वात सोईस्कर असा मार्ग होता. यावरून कोणालाही असा संभ्रम पडेल की इतका सोईस्कर रस्ता उपलब्ध असताना, रोमवरून आलेली ही गलबते चौल बंदराकडे का वळत असावीत? त्याच प्रमाणे चौलहून निघाल्यावर, पिंपरी घाटातून वर येऊन नंतर पवना खोर्‍यातून, कार्ले मठाला वळसा घालून जुन्नरकडे जाणारा लांबचा आणि जास्त त्रासाचा मार्ग व्यापारी तांडे का आणि कशासाठी वापरत असत? या प्रश्नाचे उत्तर शोधणे ही खरी तर अशक्य कोटीतीलच बाब होती. परंतु सुदैवाने ‘पेरिप्लस ऑफ द युरेथ्रियन सी’ (Periplus of the Erythraean Sea) या नावाने ओळखल्या जाणार्‍या एका ग्रीक ग्रंथामध्ये, याचे कारण थोडक्यात दिलेले आहे. इ.स.पहिले आणि तिसरे शतक या कालखंडामध्ये लिहिलेल्या आणि सतत अपग्रेड गेल्या गेलेल्या या ग्रंथामध्ये, रोम किंवा इजिप्त मधील Berenice सारख्या बंदरांवरून निघणार्‍या गलबतांसाठी, कोणते समुद्री मार्ग उपलब्ध आहेत? प्रवासात काय अडचणी संभवनीय आहेत? तसेच, तांबड्या समुद्राच्या काठावर असलेली बंदरे, वायव्य आफ्रिकेतील बंदरे आणि भारतीय उपखंडातील बंदरे यांच्याबरोबर व्यापाराच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत याबद्दलची सर्व उपलब्ध माहिती संकलित करून ती सतत अपग्रेड करून ठेवण्यात येते असे.

मी या लेखमालेच्या सुरवातीच्या भागातच, इ.स.पहिल्या शतकाच्या सुरूवातीस दख्खनमध्ये सतत चालू असलेला संघर्ष आणि राजकीय अस्थिरता यांचा उल्लेख केला होता. या कालात क्षत्रप नहापन याच्या सैन्याने सातवाहन साम्राज्याचा बराचसा भाग जिंकून घेतलेला होता. जिंकलेल्या भूप्रदेशात, कार्ले मठाच्या परिसरातील भूप्रदेश तर होताच पण या शिवाय किनारपट्टीजवळ असलेल्या कल्याण, सोपारा वगैरे बंदरांवर सुद्धा नहापन याच्या सैन्याचेच प्रभुत्व होते. पेरिप्लस ग्रंथ या राजकीय परिस्थितीला दुजोरा देताना म्हणतो:

” या भू प्रदेशातील बाजारपेठा भडोच, सोपारा आणि कल्याण या असल्या तरी कायदेशीर रितीने त्यांचा उपयोग सातवाहन शासन कालात करणे सहज शक्य होते. मात्र जेव्हापासून या बाजारपेठा क्षत्रपांच्या अंमलाखाली आल्या आहेत तेंव्हापासून या बंदरात गलबतांना प्रवेश नाकारला जातो आहे आणि तरीही एखादे ग्रीक गलबत जर या बंदराला लागलेच तर त्याला अटक करून ते सैनिकांच्या संरक्षणात भडोचला नेले जाते. मात्र कल्याणच्या पुढेही (दक्षिणेला) या प्रदेशातील चौल सारख्या इतर बाजारपेठा आहेतच…..”

“The market-towns of this region are, in order, after Barygaza (Bhadoch): Suppara, (Sopara)and the city of Calliena (Kalyan), which in the time of the elder Saraganus (Satavahanas) became a lawful market-town; but since it came into the possession of Sandares (Kshatraps or Nahapana’s forces), the port is much obstructed, and Greek ships landing there may chance to be taken to Barygaza (Bhadoch) under guard. Beyond Calliena there are other market-towns of this region; Semylla (Chaul)..…”

पेरिप्लस मधील या संदर्भाच्या सुमारे एक शतकानंतर, लिहिल्या गेलेल्या आपल्या ग्रंथात क्लॉडियस टॉलेमी, भडोच आणि कल्याण बंदरांचा उल्लेख सुद्धा करत नाही आणि फक्त गोवरी नदीच्या मुखाजवळ असलेले सोपारा, डौंगा किंवा सालसेट आणि चौल एवढ्याच बंदरांचा उल्लेख करतो, यावरून या भागात सतत चालू असलेल्या संघर्षामुळे व्यापारासाठी परिस्थिती कशी धोकादायक बनलेली होती याला एका प्रकारे अप्रत्यक्ष रितीने दुजोरा देतो आहे असे म्हणता येते.

वरील संदर्भांवरून, इ.स.पहिल्या शतकामध्ये दख्खनमधील परिस्थितीची वाचकांना कल्पना येईल. ग्रीक किंवा रोमन गलबतांना भडोच, कल्याण, या सारख्या उत्तरेकडच्या बंदरांमध्ये मालाची चढ-उतार करणे शक्य होत नव्हते. सोपारा बंदर सुद्धा उत्तरेलाच होते आणि उपयोग करण्यास तितकेसे सोईस्कर नव्हते. यामुळे दक्षिणेकडे असलेल्या सालसेट आणि चौल बंदरांचा वापर प्रामुख्याने ही गलबते करत असत. जुन्नर वरून कल्याणला माल नेण्यासाठी जरी नाणेघाट हा सर्वात जवळचा आणि सोईस्कर असला तरी दक्षिणेकडे असलेल्या चौल बंदरात चढवला जाणारा माल तेथे नेण्यासाठी, नाणेघाट फारच उत्तरेला असल्याने, लांबचा आणि सोईस्कर नव्हता. त्यामुळे चौल बंदराकडे नेण्यात येणार्‍या मालासाठी, दक्षिणेकडे असलेला आणि सध्याच्या ‘ताम्हिणी’ घाटामधून जाणारा रस्ता लोकप्रिय बनला असावा आणि त्यामुळे या व्यापारी मार्गाजवळ असलेल्या विशाल कार्ले मठाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेले असावे.
या दक्षिणेकडच्या व्यापारी मार्गाच्या जवळपास आर्थिक समृद्धी प्राप्त झालेले धेनुकाकट गाव वसलेले असावे असा अंदाज या परिस्थितीजन्य पुराव्यामुळे केल्यानंतर या भागात धेनुकाकटचा ठावठिकाणा कोठे लागतो का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण पुढे करूया.

(क्रमश:)

मूळ इंग्रजी लेखासोबत असलेली चित्रे बघण्यासाठी या दुव्यावर क्लिक करावे.

27 एप्रिल 2014

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

मन Fri, 02/05/2014 - 17:37

हाही भाग वाचनीय.
पण :-
दक्षिणेकडे असलेल्या चौल बंदरापासून सुरू होणारा आणखी एक व्यापारी मार्ग या शिवाय अस्तित्वात होता. सध्याच्या मुळशी तलावाजवळ असलेल्या पिंपरी गावाजवळून हा घाट वर चढत असल्याने त्याला पिंपरी घाट या नावाने बहुधा ओळखले जात होते. (सध्याचा ताम्हणी घाट म्हणजे बहुधा हाच घाट् असावा.) घाटमाथ्यावर आल्यानंतर हा रस्ता पवना खोर्‍यातून उत्तरेकडे शेलारवाडी मठाच्या परिसरातून जात असे व नंतर भाजे व कार्ले येथील मठांच्या परिसरात पोचल्यानंतर, नवलाख उंबर गावामधून हा रस्ता कार्ले डोंगराला वळसा घालून प्रथम चाकण गावाकडे व तेथून जुन्नर गावाकडे जात असला पाहिजे. धेनुकाकट गावातील एका रहिवाशाने शेलारवाडी मठाला दिलेल्या एकुलत्या एक देणगी मागचे कारण, वरील मार्ग शेलारवाडी मठाजवळून जात होता हेच बहुधा असले पाहिजे.
गूगल अर्थ वगैरे तपासले नाहित. पण ताम्हिनी घाट जरा दूर होइल ना पिंपरी पासून.
तो पौड - पिरंगुट साइडहून लागेल.
तुम्ही जे वर्णन सांगताय, त्याच्या आसपास उंबरखिडीचा रस्ता असण्याची शक्यता वाटते.
(उंबरखिंड म्हणजे शाहिस्तेखानाचा सहकारी कारतलबखान(व बहुतेक वर्हाडी सरदारीण रायाबाघन ह्याही सोबत असाव्यात)
ह्याच्या अजस्र फौजेचा शिवाजी महाराजांनी अल्पशा मावळ्यांसोबत दणक्यात पराभव केला; कारतलबखानाला खिंडीतून पुढे सरकून कोकणात उतरु दिले नाही; त्या लढाईचे ठिकाण.)

वल्ली Fri, 02/05/2014 - 18:52

In reply to by मन

उंबरखिंड हा काही घाटमार्ग नाही. ही घाटपायथ्याला आहे. उंबरखिंडीतून आंबेनळी घाट वर चढतो जो ड्युक्स नोझ च्या जवळ संपतो.

आजचा ताम्हिणी घाट म्हणजे म्हणजे पिंपरी घाट नव्हे. पिंपरी घाट म्हणजे बहुधा अंधारबन घाट असावा. हा सिनेर खिंडीतून घनदाट जंगलातून खाली कोकणात उतरतो. ताम्हिणी घाटानजीक जो मुख्यघाटमार्ग होता तो बहुतेक सावळ घाट आहे. हा डोंगरवाडी नजीक आहे तिथून तो भिर्‍याला उतरतो. आजही घाटवाटेत पाण्याची टाकी आहेत.

चंद्रशेखर Sat, 03/05/2014 - 08:44

In reply to by मन

लेखामध्ये मी ज्या पिंपरी गावाचा उल्लेख केला आहे ते गाव म्हणजे सध्याचे पुण्याजवळचे पिंपरी नव्हे. मुळशी तलावाला वळसा घालून आपण ताम्हणी घाट उतरण्यास सुरूवात करतो त्याच्या आजूबाजूला घाटमाथ्यावर असलेल्या खेड्यांमध्ये हे पिंपरी खेडे आहे. (गूगल अर्थ वर अचूक स्थान कळू शकते.) या खेड्यामुळे या घाटाला पिंपरी घाट असे जुने नाव होते. त्याचे ताम्हिणी कधी झाले हा संशोधनाचा विषय होईल.

वल्ली Fri, 02/05/2014 - 18:57

चौल बंदरातून येणारे व्यापारी तांडे कुडे, मांदाड्, खडसांबळे, ठाणाळे अशा लेणींचे टप्पे घेत सुधागड, कुर्डू, कोरीगड, लोहगड, विसापूर अशा बळकट दुर्गांच्या आश्रयाखाली आपला प्रवास करीत असावेत.

राही Sat, 03/05/2014 - 00:42

सालसेट बंदर म्हणजे नक्की कुठले बंदर? आणि सालसेट म्हणजे साष्टीच ना? त्याचेच नाव त्या काळी डौंगा होते का?
शूर्पारक बंदर ज्या नदीच्या मुखावर वसले होते त्या गोवारी नदीचे सध्याचे नाव काय असावे?( ही नदी सध्या अस्तित्वात नाही असे वाटते.)
गोराई खाडीला मिळणारी दहिसर नदी हिचे नाव एकेकाळी वेगळे होते(बहुधा शिव) असे वाचल्याचे आठवते. शिव-गौरी हे सान्निध्य लक्षणीय आहे. ही नदी कान्हेरीजवळ उगम पावते आणि एकेकाळी नौकानयनयोग्य होती असे सांगतात. गोराई आणि गोवारी हे साम्यही लक्षणीय आहे.
अलीकडील इतिहासात तरी माहिम खाडीच्या उत्तरेकडल्या आणि वसई खाडीच्या दक्षिणेकडल्या मधल्या भूभागास साष्टी बेट म्हटले आहे. एकेकाळी हे वेगळे बेट होते, आता मूळ मुंबईच्या सात बेटांशी जवळपास जोडले गेले आहे
सध्याचे सोपारे हे वसई खाडीच्या उत्तरेकडे आहे आणि साष्टी प्रांतात मोडत नाही. नाळा-सोपारा ही जोडगावे आरनाळ्यापासून जवळ आणि वसईपासून थोडीशी लांब पण वसई-आरनाळ्यादरम्यान आहेत.
अर्थात वेगवेगळ्या कालावधीत साष्टी प्रांताची व्याप्ती वेगवेगळी असू शकेल, आणि शूर्पारकाचीही.
(ह्याविषयी माझ्या मनात खरोखरीच गोंधळ आहे. त्याचे निराकरण व्हावे हा प्रामाणिक हेतू.)

चंद्रशेखर Sat, 03/05/2014 - 08:53

सालसेट म्हणजे अर्थातच साष्टी. लेखाचे मराठी भाषांतर करताना वास्तविक मी साष्टी हेच नाव वापरायला हवे होते. चूक दाखवल्याबद्दल राही यांना धन्यवाद. साष्टी बेटावरील डोंगरी या खेड्याजवळ आणि गोवारी नदीच्या मुखाजवळ हे जुने बंदर होते असे टॉलेमी सांगतो. (हे खेडे बहुधा आजही अस्तित्वात आहे (वरळीजवळ) तेथे एक डोंगर खरोखरच आहे. तो चढून गेल्यास समुद्राचा सुंदर देखावा दिसत असे.) टॉलेमीने या बंदराला डौंगा असे नाव दिलेले आहे. आजचे मुंबई शहर ज्या बेटांच्या समूहावर उभे आहे त्यापैकी साष्टी हे एक आहे.

राही Sat, 03/05/2014 - 11:54

In reply to by चंद्रशेखर

साष्टी बेट हे मूळ मुंबईच्या सात बेटांपैकी नव्हे. ती मूळ बेटे म्हणजे कुलाबा, धाकटा कुलाबा, मुंबई, माझगाव, परळ, वरळी आणि माहिम. हा सर्व भूभाग अठराव्या शतकातच एकत्र जोडायला (दलदलीच्या खाड्या बुजवून भूसंपादनाद्वारे) सुरुवात झाली. कालांतराने या सर्व भूभागाला मुंबई म्हणू लागले. हे विस्तारित मुंबई बेट साष्टी बेटापासून माहिम खाडीमुळे (मिठी नदी) तुटलेले होते. वांदर्‍यापासून पुढे उत्तरेला वसई खाडीपर्यंत (उल्हास नदीचे मुख ) आणि पूर्वेला तुर्भ्याच्या खाडीपर्यंत असा हा सलग भूभाग होता. ही माहिम खाडी पार शीवपर्यंत होती. शीव ही माहिमच्या राज्याची सीमा होती. मध्य रेल-वेच्या शीव स्थानकाचे नाव विसाव्या शतकाच्या पहिल्या काही वर्षांपर्यंत माहिम रोड असे होते.
तर ह्या साष्टी बेटाचा बराच मोठा भूभाग (वांदरे ते दहीसर) १९६०-६६ दरम्यान एका विशेष कायद्यान्वये मुंबईत सामील झाला आणि साष्टीचे नामोनिशाण पुसून जाऊन बृहन्मुंबई हे नाव चलनात आले. या पार्श्वभूमीवर 'साष्टी बेटाच्या काही भागावर आजची बृहन्मुंबई वसली आहे' असे म्हणणे योग्य ठरेल.
वरळी बेट हे साष्टी प्रांतात येत नव्हते. ते तीनशे वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या (आडव्या आकारातल्या रोमन 'एच' सारख्या) मुंबईबेटाच्या उत्तर-पश्चिमेला आणि माहिमच्या दक्षिण-पश्चिमेला असलेले एक लांब, चिंचोळे स्वतंत्र बेट होते.
मूळ सप्तद्वीपा मुंबईत आणि आताच्या अतिविस्तारित बृहन्मुंबईत अनेक डोंगर-टेकड्या अजूनही आहेत. मलबार-खंबाला हिल्स तर आहेतच, शिवाय गोलनजी हिल्, भंडारवाडा, मस्जिदजवळची डोंगरी, शीवची डोंगरी, ताडदेव, वांद्र्याची पाली आणि माउन्ट मेरीची टेकडी, अंधेरीतल्या असंख्य डोंगर्‍या (महाकाली-कोंदिवट्याचा डोंगर आणि कोळडोंगरी धरून), गोरेगावची पहाडी असे कित्येक आहेत. कुर्ल्याच्या काही टेकड्या सांताक्रुझ विमानतळाच्या विस्तारीकरणात चाळीस वर्षांपूर्वी जमीनदोस्त झाल्या आणि हिरानंदानी संकुलामुळे पवईच्या. बोरिवलीच्या मागाठणे गुंफा आणि बाजूचा डोंगर (आता खासदार होऊ घातलेल्या एका वजनदार राजकीय नेत्यामुळे) अलगद कोसळल्या.
गोराई खाडीच्या मुखावर उत्तन डोंगरी हे गाव येते. हे पूर्वी चांगले बंदर होते. अजूनही तिथे मच्छीमारीची गलबते लागतात. (उत्तन येथे रास्वसंघ आणि परिवाराचे एक विस्तृत अभ्यासकेंद्र आहे. तिथे बौद्धिके, शिबिरे तर होतातच पण एक दिवसाच्या सहलीसाठी आणि प्रबोधनासाठी ते एक निसर्गरम्य असे उत्तम ठिकाण असल्याने पर्यटनसहलीही तिथे जातात.)

'न'वी बाजू Mon, 05/05/2014 - 06:55

In reply to by राही

ती मूळ बेटे म्हणजे कुलाबा, धाकटा कुलाबा, मुंबई, माझगाव, परळ, वरळी आणि माहिम.

'धाकटा कुलाबा' म्हणजे 'ओल्ड म्यान्स/अल्-ओमानी आयलंड' काय?

मूळ सप्तद्वीपा मुंबईत आणि आताच्या अतिविस्तारित बृहन्मुंबईत अनेक डोंगर-टेकड्या अजूनही आहेत. मलबार-खंबाला हिल्स तर आहेतच, शिवाय गोलनजी हिल्, भंडारवाडा, मस्जिदजवळची डोंगरी, शीवची डोंगरी, ताडदेव, वांद्र्याची पाली आणि माउन्ट मेरीची टेकडी, अंधेरीतल्या असंख्य डोंगर्‍या (महाकाली-कोंदिवट्याचा डोंगर आणि कोळडोंगरी धरून), गोरेगावची पहाडी असे कित्येक आहेत. कुर्ल्याच्या काही टेकड्या सांताक्रुझ विमानतळाच्या विस्तारीकरणात चाळीस वर्षांपूर्वी जमीनदोस्त झाल्या आणि हिरानंदानी संकुलामुळे पवईच्या. बोरिवलीच्या मागाठणे गुंफा आणि बाजूचा डोंगर (आता खासदार होऊ घातलेल्या एका वजनदार राजकीय नेत्यामुळे) अलगद कोसळल्या.
गोराई खाडीच्या मुखावर उत्तन डोंगरी हे गाव येते. हे पूर्वी चांगले बंदर होते. अजूनही तिथे मच्छीमारीची गलबते लागतात. (उत्तन येथे रास्वसंघ आणि परिवाराचे एक विस्तृत अभ्यासकेंद्र आहे. तिथे बौद्धिके, शिबिरे तर होतातच पण एक दिवसाच्या सहलीसाठी आणि प्रबोधनासाठी ते एक निसर्गरम्य असे उत्तम ठिकाण असल्याने पर्यटनसहलीही तिथे जातात.)

अच्छा, म्हणजे 'चौपाटी' किंवा 'सोनापूर'प्रमाणे 'डोंगरी' हीदेखील जेनेरिक टर्म असावी काय?

बादवे, सध्या जो भाग सामान्यतः 'डोंगरी' म्हणून ओळखला जातो, जेथे सावरकर काही काळ कारावासात होते, नि जेथील (बहुधा बहुसंख्य असलेली) मुस्लिमवस्ती ही मुंबईतील 'मराठी' माणसाच्या आगमनाच्याही पुष्कळ आधीपासून वसलेली असावी (असे वाचलेले आहे), ती नेमकी कोणती (आणि कोठे आहे)?

मन Mon, 05/05/2014 - 16:17

In reply to by 'न'वी बाजू

"डाँगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस" हे आगरकर - टिळक तिथल्या तुरुंगात असतानाबद्दलचे पुस्तक आहे.
सावरकरांनाही तिकडेच ठेवले असेल नंतर आश्चर्य आहे.

'न'वी बाजू Mon, 05/05/2014 - 16:29

In reply to by मन

अंदमानास धाडले जाण्याअगोदर सावरकर काही काळ डोंगरीच्या तुरुंगात स्थानबद्ध असल्याबद्दल 'माझी जन्मठेप'मध्येच वाचल्यासारखे वाटते ब्वॉ...

पण माझ्या आठवणीत/समजुतीत चूक असू शकेल. पुन्हा एकदा वाचून खात्री करून सांगतो.

'न'वी बाजू Mon, 05/05/2014 - 17:03

In reply to by मन

'माझी जन्मठेप', प्रकरण पहिलेच.

प्रकरणाचे शीर्षक: 'मुंबईंतील डोंगरीचें कारागृह'.

मी काथ्या कुटूं लागलों. तो हवालदार व बंदिवान मला काम येतें कीं नाहीं तें पाहाण्याच्या निमित्तानें तेथेंच उभे राहिले आणि मला करमणूक करण्यासाठीं इकडच्यातिकडच्या गोष्टी बोलू लागले.

"महाराज, तुम्हाला माहीत नसेल कीं, याच खोलींत टिळक व आगरकर यांना शिक्षा झाली तेव्हां ठेवण्यात आलें होतें. ते आपापसात वाद करीत तेव्हां मोठमोठ्यानें बोलत. केव्हां केव्हां त्यांना हळू बोला म्हणून बजवावें लागे."

--------------------------------------------------------------------------------------------------------------------
१. ह्या खोलींत सध्या लोकमान्य टिळकांचे छायाचित्र ठेवून तेथें त्यांचें स्मारक केलेलें आहे.

(संपूर्ण मजकूर, त्यातील शुद्धलेखन, अनुच्चारित अनुस्वार, जाड ठसा, तळटीप क्रमांक तसेच तळटीपेचा मजकूर हे सर्व पुस्तकाच्या माझ्याकडील आवृत्तीबरहुकूम. फक्त एकच फेरफार केलेला आहे; तो म्हणजे, सावरकरी इकार आणि सावरकरी उकार (म्हणजे 'अ'ला वेलांटी अथवा उकार) छापण्याची क्षमता प्रस्तुत संकेतस्थळावरील प्रणालीत (बहुधा) नसल्याकारणाने (चूभूद्याघ्या.), तेवढेच बदलून प्रमाण इकार व उकार वापरले आहेत. तसेच, तळटीप ही बहुधा सावरकरलिखित नसावी; संपादकाने / मूळ प्रकाशकाने ती लिहिली असावी, असे वाटते.)

मी Mon, 05/05/2014 - 17:27

In reply to by 'न'वी बाजू

चटकन संदर्भ देण्यावरुन असे लक्षात येते की बेष्ट सेलर्सच्या फ्रंट र्‍याक मधे ठेवल्याप्रमाणे 'माझी जन्मठेप' शेल्फात 'उजवीकडे' पुढे ठेवलेले दिसते.

'न'वी बाजू Mon, 05/05/2014 - 21:01

In reply to by मी

तर्क रोचक आहे, परंतु तथ्यास धरून नाही. (अधिक तपशिलांत शिरू इच्छीत नाही.)

(अतिअवांतर: आम्ही 'डॉन'सुद्धा चवीने वाचतो.)

अजो१२३ Mon, 05/05/2014 - 17:31

In reply to by 'न'वी बाजू

वरील प्रतिसादातील कोट केलेला कोट्ची चिन्हे सोडून संपूर्ण सावरकरांनी आपल्या कागदी पुस्तकात लिहिलेला व मी इथे जालावर टंकलेला तुम्ही वाचत असलेला मजकूर, त्यातील भाषा, लिपी,पण फाँट आणि त्याचा साईझ वजा जाता, त्यातील वाक्यप्रयोग, शब्दप्रयोग, अक्षरप्रयोग, शुद्धलेखन, व्याकरण, अनुच्चारित अनुस्वार, जाड ठसा, तिरकी वा सरळ ठसाशैली, रंग, लेखनाच्या व टंकनाच्या पार्श्वभूमीचा शास्त्रीय रंग वजा जाता ढोबळ रंग, छाया, अक्षरगुलकारी, अक्षरखनन, उच्चलेखन, अधोलेखन, परिच्छेदन, परिच्छेदप्रतिमा, संरेखण, खाच, मुद्रणगोळी, क्रमांकन, परिच्छेदांतील, वाक्यांतील नि शब्दांतील अवकाशन वजा जाता, पान नंबर, पानाचा प्रकार, इ वजा जाता, अभिप्रेत अर्थ, भावार्थ, शब्दार्थ, अक्षरक्षः अर्थ, मतितार्थ, तळटीप क्रमांक तसेच तळटीपेचा मजकूर हे सर्व पुस्तकाच्या माझ्याकडील आवृत्तीबरहुकूम.

असे + लिहिले तर त्याला नवी बाजूंचे लिखाण म्हणतात.

अतिशहाणा Mon, 05/05/2014 - 22:57

In reply to by 'न'वी बाजू

अ‍िकार व अ‍ुकार हे ‍ च्या साहाय्याने देता येतील असे वाटते1.

उदा. अ + ‍ + ि = अ‍ि

1. अस्मादिकांनी (अ‍िनस्क्रिप्ट व) झीरो विड्थ जॉअ‍ीनर वापरुनच हे शब्द टंकले आहेत. लिनक्साधारित संगणकांवर ही अक्‍षरे चुकीची दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अतिशहाणा Tue, 06/05/2014 - 02:21

In reply to by 'न'वी बाजू

हम्म. ही अडचणच आहे. अनाथ स्वर टंकण्यासाठी गमभनमध्ये सुविधा नाही असे दिसते. खालील लेआऊटमध्ये काही उपयुक्त दिसले नाही.

अं अ: अँ आँ
a aa/
A
i ee
/I
u uu/
oo/U
e ai o au aM/
a.N
a: E O EM/
E.n
OM/
O.n
ka kha ga gha Ga cha/
Ca/ca
chha
/Cha
ja jha/
za/Za
Ya
Ta Tha Da Dha Na ta tha da dha na
pa pha/
fa/
Fa/
Pha
ba bha/
Bha
ma ya ra la va/
Va/
wa/
Wa
sha
क्ष ज्ञ क़ ख़ ग़ ज़ ड़ ढ़ फ़ य़
shha/
Sha
sa ha La xa/Xa
/kSha
dnya
/jna
ka.q kha.q ga.q ja.q Da.q Dha.q fa.q ya.q
श्री र्‍हा र्य हूँ क्यूँ
Rlu Ru RU a~ a^ H HH shrI AUM Rhaa rya hEMU kyEMU
मॢ मॣ मृ मॄ म् म॑ म॒ म॓ म॔ म़
mRlu mRlU mRu mRU ma.h maq maqq maQ maQQ maJ/
maK/
ma.q
0 1 2 3 4 5 6 7 8 9

नितिन थत्ते Tue, 06/05/2014 - 21:53

In reply to by 'न'वी बाजू

>>बादवे, सध्या जो भाग सामान्यतः 'डोंगरी' म्हणून ओळखला जातो, जेथे सावरकर काही काळ कारावासात होते, नि जेथील (बहुधा बहुसंख्य असलेली) मुस्लिमवस्ती ही मुंबईतील 'मराठी' माणसाच्या आगमनाच्याही पुष्कळ आधीपासून वसलेली असावी (असे वाचलेले आहे), ती नेमकी कोणती (आणि कोठे आहे)?

सॅण्डहर्स्ट रोड (छ शि ट - बोले तो व्हीटी - बोले तो बोरीबंदर हून ठाण्याला स्लो लोकलने जाताना तिसरे) स्टेशनच्या पश्चिमेकडे असलेला भाग.
इथे रिमांड होम सुद्धा आहे.

सदर स्थानकाचे नाव बदलून डाँगरी करावे अशी मागणी काही काळापूर्वी झाल्याचे स्मरते.

अजो१२३ Sun, 04/05/2014 - 17:22

रोचक लेखमाला.

लेख वाचताना एक विचार मनात आला - अलेक्झांडर नि कोलंबसला १००, १०० मार्क दिले तरी त्यांच्याही पूर्वी इतक्या दूर येणारे जाणारे हे जे काळाने दखल न घेतलेले कितीतरी छोटे मोठे लोक होते - त्यांनाही १०, १० मार्क द्यावेत.

राही Tue, 06/05/2014 - 22:18

@'न'वी बाजू,
ओल्ड वुमन'स आय्लंड म्हणजेच अल-ओमानी आय्लंड, म्हणजेच धाकटा कुलाबा.
डोंगरी हा भाग उमरखाडीच्या पुढे, सॅन्ढर्स्ट रोड स्टेशनच्या जवळ येतो. तिथला उंचवट्याचा भाग गोलन्जी हिल म्हणून ओळखला जातो. आज तिथे जेल नाही. पण त्याची आठवण म्हणून 'जेल रोड' आहे. आणि एक बालसुधारगृह किंवा बालनिरीक्षण गृह आहे.
'डोंगरी' हे नाव निदान मुंबईत तरी 'जेनेरिक' आहे. इथे 'टेकडी' म्हणत नाहीत, 'डोंगरी'च म्हणतात.
असे म्हणतात की 'डन्गरीज़' नाव डोंगरीवरून आले आहे कारण या प्रावरणासाठी लागणारे कापड डोंगरी भागात तयार होई. (विकिपीडिआ)

राही Wed, 07/05/2014 - 01:19

In reply to by राही

गुजरातच्या सुलतानाने इ.१३४८ मध्ये यादवांचा पराभव केला आणि माहीम येथे मुसलमानी सत्ता आली. माहीमचा सुप्रसिद्ध मखदूम फकी अली दर्गा पंधराव्या शतकातला आहे. या सुलतानांनी जरी माहीम आणि ठाणे येथे दक्षिणेच्या बहमनी राजांचा पराभव केला तरी शेवटी शेवटचा गुजराती सुलतान बहादुरशहा याने मोघलांचे दडपण आणि पोर्तुगेज़ांचे वाढते सागरी सामर्थ्य याला कंटाळून मुंबई आणि वसई हे प्रांत पोर्तुगेज़ांच्या हवाली केले. (१५३४- न.र. फाटक) पुढे मुंबई बेट इंग्रजांना मिळाले आणि नंतर वार्षिक दहा पौंड भाड्याने ई.इं कंपनीकडे आले. तरीही सुरतेच्या मुघल उभेदाराची नाराजी (मुंबई हातची गेल्यामुळे) आणि जंजिर्‍याच्या सिद्दीला फूस चालू राहिली. सिद्दी हाही मुघल सुभेदार होता आणि तो मुंबईवर सतत हल्ले करून लुटालूट करी. पावसाळ्यात त्याचे वास्तव्यही तिथे असे.(न.र.फाटक.) हे मुख्यतः माझगाव बेटात चाले. या काळापासून माझगावात मुसलमानी वस्ती वाढू लागली. पुढे वरळी बेट मुंबईशी जोडणारा बांध घातल्यामुळे पश्चिमेकडून माझगावपर्यंत घुसणारे समुद्राचे पाणे अडले गेले आणि उमरखाडी बुजवली जाऊन माझगाव मुंबई बेटाशी जोडले गेले. माझगावची मुसलमान वस्ती आजूबाजूच्या डोंगरी भागात पसरू लागली.

मन Wed, 07/05/2014 - 07:51

In reply to by राही

दिल्ली सुल्तानाचा पुतण्या अल्लाउद्दीन खिल्जी याच्याकडून यादवांचा दणक्यात पराभव झाला तो १२९१च्या आसपास; त्यानंतर मांडलिक म्हणून त्यांचे नाममात्र अस्तित्व उरले.
देवगिरीचा हतबल राजा रामदेवराय दिल्ली दरबारी त्याचा आश्रित असल्यासारखा राहू लागला.
१३१० की १३१८ साली उरलेल्या यादव सैन्याने एकदा रामदेवराय ह्याअसल्यात्र शंकरदेवराय ह्याच्या नेतृत्वात पुन्हा बंड केले.
(साम्राज्याच्या गतवैभवाच्या आठवणी इतक्या सहजी खोडल्या जात नाहित). एक दोन लढाया झाल्या. तो लढाईत मारला गेला.
अजून एक बंड राजाचा जावई हरपाल यादवाने केले. तो धरला गेला.
त्याला कातडी सोलून वगैरे हालहाल करुन मारले. वेशीवर त्याचे चुथडा झलेले लोळागोळा प्रेत लावले गेले धाक बसावा म्हणून.
हे सारे १३१८ पूर्वीच झाले.

माहिम पट्ट्यात मला वाटते चुरी घराण्याची सत्ता होती. हे लोक यादवांशी लावून घेउन रहात.
(कधी कमजोर पडले तर मांडल्लिकासारखे; नाहीतर जवळजवळ स्वतंत्र असल्यासारखेच होते.)
भागड चुरी हा बहुतेक त्यांचा शेवटचा राजा होता. ह्याची सत्ता मुस्लिम शासकाने take over केली.
मुस्लिम शासक कोण होता, आदिल्-निजाम्-बहामनी हे लोक होते की गुजरातचा सुल्तान होता हे आता आठवत नाही.

महिकावतीची बखर ह्या राजवाड्यांच्या पुस्तकाबद्दल वाचलं होतं.
त्यात ही माहिती बरीच तपशीलवार होती.

राही Wed, 07/05/2014 - 14:40

In reply to by सुनील

आपण दिलेल्या दुव्यातील या लेखमालेत काही जुन्या ग्रामनामांची अद्यतन रूपे दाखवताना किरकोळ अशा तीन-चार चुका झाल्या आहेत. कोंडिवटे हे गाव म्हणजे कर्जतजवळचे (ट्रेकर्सप्रिय) कोंदिवटे नसून महाकाली गुंफा असलेले अंधेरी पूर्वेकडचे कोंडिवटे किंवा कोंडिविटा गाव आहे. वरसावे म्हणजे अंधेरी पश्चिमेचे वर्सोवा (मराठी वेसावे किंवा येसांवे) नसून घोडबंदर रोड जिथे पश्चिम महामार्गाला मिळतो तेथील भायंदरजवळचे वरसावे आहे. हे गाव सध्या पुष्कळांना माहीत असते कारण इथला चेणा खाडीवरचा पूल नादुरुस्त झाल्याने महामार्गावर एकतरफी वाहतूक सुरू असते त्यामुळे वाहनांचा प्रचंड खोळंबा होत असतो. नागावे या नावाशी साधर्म्य असलेली दोन गावे या परिसरात आहेत. एक म्हणजे वसई खाडीवरचे प. रेल्वेचे नायगाव आणि दुसरे रायगड जिल्ह्यातले नागाव. शिवाय नागवे असेही एक गाव कुठेतरी आहे. पहाडी म्हणजे प. रेल्वेचे गोरेगाव. याचे नाव पूर्वी पहाडीच होते (ब्रिटिश स्पेलिंगनुसार पहारी, उच्चार पाssडी) पण बीबीसीआय वर गुजरातमध्ये एक पारडी नावाचे स्टेशन आहे त्याच्याशी याची गल्लत होऊ लागली म्हणून पहाडीचे गोरेगाव झाले. आसनपे म्हनजे सध्याचे आसलफे (अगदी अद्यतन असल्फा) असावे.
असो. या धाग्यावर बरेच अवांतर माझ्याकडून झाले आहे. तेव्हा थांबलेले बरे.

राही Wed, 07/05/2014 - 08:53

In reply to by मन

१२९४ मध्ये देवगिरीकर यादवांवर अल्लाउद्दीन खिलजीचे 'विजयी आक्रमण' (न.र. फाटक) होऊन १३१७ मध्ये त्याची इतिश्री झाली. त्याआधी उतरत्या काळात रामदेव यादवाने आपल्या मुलांपैकी भीमदेवाला कोंकणात पाठवले. ह्याने महिकावती ही आपली राजधानी केली. भीमदेव इ.१३०२ मध्ये मरण पावला असा समज आहे. त्याच्यानंतर २८ वर्षे त्याच्या मुलाने राज्य केले. चौलच्या नागरदेव नायकाने त्याचा पराभव करून मुंबईतली यादवसत्ता संपवली. ह्या नागरदेवाचा पराभव १३४८मध्ये गुजरातच्या सुल्तानाने केला आणि माहीम-ठाण्यावर मुसलमानी अंमल आला.
इथे संदर्भ घेतलेले पुस्तक न.र. फाटक यांचे असून ते १९८१ मध्ये प्रसिद्ध झालेले आहे. त्यामुळे या पूर्वीचे या बाबतीतले संशोधन अथवा निष्कर्ष हे पुस्तक लिहिताना श्री फाटक यांना उपलब्ध होते आणि अवगतही होतेच असणार.

वल्ली Wed, 07/05/2014 - 09:51

In reply to by मन

देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीची पहिली स्वारी झाली ती इ.स. १२९६. ही लढाई प्रत्यक्ष देवगिरीवर झाली होती की नाही ह्याबाबतीत जरा संभ्रमच आहे. ही लढाई देवगिरीवर न होता त्याच्या जवळच्या प्रदेशात झाली असावी असे डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांचे मत आहे. देवगिरीच्या लुटीची ही अतिशयोक्त वर्णने ही ह्यानंतर सुमारे ३०० वर्षांनी लिहिलेल्या मुसलमान इतिहासकारांच्या वर्णनांत येतात. देवगिरीच्या ह्या तथाकथित पराभवानंतरही रामदेवरायाने महाराजाधिराज अशी बिरुदे धारण केलेली तत्कालिन ताम्रपट आणि शिलालेखांत आढळून येतात. जर ह्यावेळी रामचंद्रदेव मांडलिक असेल तर ही बिरुदे वापरता येणे अशक्य आहे. बहुधा १३११ मध्ये रामदेवरायाचा मृत्यु झाला त्यानंतर शंकरदेव (हा बहुधा तिसरा सिंघण) गाडीवर आला. होयसळांविरुद्धच्या सततच्या लढाईने दुबळे झालेले यादव साम्राज्य १३१८ मध्ये मलिक काफूरच्या स्वारीनंतर लयाला गेले.

सुनील Wed, 07/05/2014 - 10:02

In reply to by वल्ली

म्हणजे त्या धान्याऐवजी मिठाच्या गोणी वैग्रे गोष्टी कपोलकल्पितच की काय? ;)

असो, धागा धेनुकाकटापासून देवगिरीपर्यंत सरकला आहे!

मन Wed, 07/05/2014 - 10:25

In reply to by सुनील

अजून थोडे इकडे तिकडे सरकवतो.
मिठाच्या गोण्या भरल्या गेल्या. त्यावेळी हेमाड पंताचे काम चुकले. त्याने लक्ष द्यायला हवे होते.
हेमाडपंत पडला कर्‍हाडे.
कामाचे ना धामाचे . ह्यांना नुसतं रुचकर खाणं बनवायला सांगा.
त्यापेक्षा देवरुखे, चित्पावन , देशस्थ अगदि सीकेपी सुद्धा परवडले.

आता पळतो. बाय.

वल्ली Wed, 07/05/2014 - 10:49

In reply to by मन

ह्यात पण दुरुस्ती.
अल्लाउद्दिन खिलजीच्या पहिल्या स्वारीच्या आधीच हेमाद्रीचा मृत्यू झालेला होता त्यामुळे हेमाद्रीने त्याजकडे लक्ष द्यायचा प्रश्नच येत नाही.
हेमाद्रीचे बिरुद होते 'श्रीकरणाधिप' म्हणजे थोडक्यात अर्थमंत्री.

मन Wed, 07/05/2014 - 10:52

In reply to by वल्ली

माहित आहे.
पण त्याशिवाय विषयांतर करणे जमणार नाही, म्हणून आपले हात पाय मारुन पाहत होतो ह्याच्या-त्याच्या नावाने.
बादवे,
हुडुत त्या सगळ्या विदेशातून आलेल्या ब्राम्हण नामक वंश- वर्गाच्या.
आणि हाड - हुड त्या समस्त ब्राम्हणेतर वर्गांना.

आता तरी करा रे विषयांतर.

मन Wed, 07/05/2014 - 10:19

In reply to by वल्ली

मी बेधडक चुकीची माहिती लिहिल्याशिवाय तुम्ही लोकं इतकं तथ्यपूर्ण लिहायला सरसावत नाही असं दिसतय ;)
असो.

वर्णनं आतिशयोक्त वाटतातच. देवगिरी राज्य्/साम्राज्याचा आकार कितीही पकडला तरी नर्मदेच्या फार उत्तरेस आणि तुंगभद्रेच्या दक्षिणेस त्याच्या भरभराटीच्या काळातही गेल्याचे ऐकले नाही. यादवांचा इतरांशी खुश्की व समुद्री मार्गाने व्यापार न भूतो न भविष्यति होता, असेही नाही. (विजयनगरचे ऐकले तरी आहे की व्यापार भरभराटिस आला होता वगैरे)
असे असेल तर "सातशे उंटांच्या पाठीवर व हजारो बैलगाड्या भरुन सोने लादून नेले " हा प्रकार जरा अतिच
आणि कै च्या कैच वाटतो.
(विजेत्यांनी पराभूतांचा छळ वगैरे केला असेल, पण "सातशे उंट व बैलगाड्या भरुन सोन्याची लूट " ही स्केल
जरा जास्तच वाटते.)
आख्ख्या जगात एकत्रित मिळून आज इतक्या सोन्याच्या उत्खननानंतर सातशे वर्षांनीही इतके सोने असेलसे वाटत नाही.

वल्ली Wed, 07/05/2014 - 10:54

In reply to by मन

यादवांची संपत्ती अचाट होतीच. यादवांना उत्तरेकडे नेहमीच माळव्याच्या परमारांमुळे प्रतिकार झाला. तदनंतर माळव्याचा परमारांचा खिलजीच्या हस्ते पराभव होऊन बफर नष्ट झाल्यामुळे देवगिरी थेट मुस्लिम सत्तेच्या टापांखाली येऊ लागले. दक्षिणेत मात्र यादव चांगलेच पसरले होते. सिंघण यादवाने भोज दुसरा याचा पराभव करून कोल्हापूर शिलाहारांची तर महादेव यादवाने सोमेश्वराचा पराभव करुन उत्तर कोकण शिलाहारांची राजवट संपुष्टात आणली. वरंगलच्या काकतीय रूद्राचा पराभव केला. होयसाळांना जेरीस आणले. पण ह्यात यादव सैन्य सतत दक्षिणेकडे युद्धात मग्न राहिलेल्या उत्तरेकडून येणार्‍या वावटळीकडे त्यांचे दुर्लक्षच झाले.

मन Wed, 07/05/2014 - 10:57

In reply to by वल्ली

अरे पण "हजारो बैलगाड्या भरुन सोने " म्हणजे काय ?
ह्यांच्या पप्पाकडे तरी कधी इतके सोने होते का ?
आख्ख्या जगात सध्या सोने आहे ते एकत्रित केले तर फार तर चार पाच स्विमिंग पूल भरतील असे म्हणतात.