Skip to main content

कोरेगाव भीमा लढाई

आजच्या तारखेच्या दिनविशेषात इंग्रजांचे सैन्य आणि बाजीरावाचे सैन्य ह्यांच्यामधील कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी १८१८ ह्या दिवशी झालेल्या लढाईचा उल्लेख आहे. ह्या लढाईमध्ये सगळीकडून घेरल्या गेलेल्या इंग्रज सैन्याच्या तुकडीने - जिच्यामधील बहुसंख्य सैनिक हिंदुस्तानीच होते - बाजीरावाच्या मोठया सैन्याला यशस्वी तोंड दिले. इंग्रजांना ह्या विजयाचे विशेष कौतुक होते आणि तत्कालीन पुस्तकांमधून तिची अनेक वर्णने वाचावयास मिळतात. ह्या लढाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्याच्या कोरगाव पर्क भागास ते नाव मिळाले आहे.

१८२३ साली लढाईच्या स्थानी इंग्रजांनी एक स्मृतिस्तंभ उभारला. अजूनहि पुण्याहून अहमदनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर तो उजव्या हाताकडे पाहता येतो. त्याची मी पूर्वी काढलेली दोन छायाचित्रे येथे माहितीसाठी दर्शवीत आहे.

मन Thu, 02/01/2014 - 09:17

बस? हे इतकच?
.
धागाकर्त्याच्या नावामुळे अधिक अपेक्षा होती.
.
अवांतर :- आज गावात ठिकठिकाणी "कोरेगाव भिमाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. भीमसैनिकांचा विजय असो" अस फ्लेक्स बोर्ड दिसताहेत.
विजयी बाजू इंग्रजांची व त्यात दलित सैनिक अधिक संख्येने लढाईत होते असे दिसते.
त्यात दलित होते, म्हणून "इंग्रज जिंकले ते बरे/चांगले झाले" हे फ्लेक्स बोर्ड वाल्यांना म्हणायचे असावे.
आश्चर्य वाटले. "इंग्रज शतकभर अजून लवकर जिंकले असते तर ते अधिक चांगले झाले असते " , "एकोणिसावय शतकाच्या प्रारंभी जिंकायच्या ऐवजी अटह्राव्या शतकाच्या प्रारंभीच जिंकले असते तर अधिक बरे झाले असते" अशी काही पब्लिकची भावना आहे काय?
असल्यास शंका हीच, की १५ ऑगस्ट ला आनंद साजरा का करायचा इंग्रज गेले म्हणून ?
.
.
अवांतर शंका :- पेशवाईचा अंत व इंग्रजांचा उदय ह्याबद्दल जुजबी जे काही वाचले आहे, ऐकले आहे; त्यातून नक्की कोणता कालबिंदूवर "पेशवाई/मराठेशाही आता गंडली. सावरायच्या पार पलिकडे पोचली" असे म्हणता ते समजत नाही. म्हणजे दुसरा बाजीराव गादीवर आला १८९६च्या आसपास, तेव्हाच मराठ्यांचे राज्य मातीत जाणार हे स्पश्ट झाले का? की त्याही नंतर काही आशा होत्या?
की मग मुळात बारभाई कारस्थान- सवाई माधवराव ह्याकाळात मराठ्यांची अँग्लो-मराठे व इतर युद्धात सरशी झाली तरी ब्रिटिशांना राजकारणात थेट व स्पष्ट हस्तक्षेप करण्याची संधी मिळाली म्हणून मराठेशाही आतून पोखरली जाण्यास सुरुवात झाली म्हणावे? न बुजवता येण्याजोगं नेमकं भगदाड कोणतं नि पडलं कधी ?
दुसर्‍या बाजीरावास गादी मिळणे, नाना फडणविसाचा मृत्यू व महादजी शिंदे ह्यांच्या म्रुत्यू ह्या दोनेक वर्षाच्या अंतराने घडलेल्या घटना आहेत.
ह्यातली नक्की कोणती घटना इर्रिवर्सिबल इफेक्ट देउन गेली? दौलतराव माहदजीच्या क्यालिबरचे निघते तर ब्रिटिश राज्य येणे थांबले; निदान लांबले असते काय?
(शीख सत्ता अगदि १८४५ पर्यंत मजबूत व स्वतंत्र होती; तद्वत.)
अर्थातच, जर्-तर च्या गोष्टी आहेत, पण ठळक, महत्वाचा कालबिंदू ओळखायचा तर ह्याचा आधार घेणे गरजेचे वाटते.
कंपनी सरकारने भारत एका फटक्यात जिंकला नाही. अलगद विविध सत्तांना मगरमिठीत ओढले किंवा अजगरसारखे व्यवस्थित आवळले. पण नेमका कधीपर्यंत चान्स होता सुटायचा?

अरविंद कोल्हटकर Thu, 02/01/2014 - 10:42

वर उल्लेखिलेले कोरेगाव भिमाच्या स्मृतीचे फ्लेक्स बोर्ड हे अलीकडचेच असावेत. १० वर्षांपूर्वीपर्यंत मी पुण्यात होतो तेव्हा कधीहि असे बोर्ड पाहिले नेव्हते. किंबहुना, अशी काही लढाई पुण्याजवळ झाली ही बाबहि फार थोडयांच्या खिजगणतीत होती. ही स्मृति जागृत करण्याचा आणि त्यासाठी फ्लेक्सबोर्ड करण्याचा नवा उद्योग सुरू झालेला दिसतो. ह्याच मार्गाने थोडे पुढे जाऊन कोपर्‍याकोपर्‍यावर वार्षिक उत्सव साजरा होणेहि बहुशः दूर नसावे.

इंग्रजांची फौज बहुसंख्येने एतद्देशीयांचीच होती हे मी वर लिहिलेच आहे. त्या एतद्देशीय शिपायांच्या बटालियनला सन्मानदर्शक असा 'ग्रेनेडियर पलटणी'चा दर्जा बहाल करण्यात आला. तेव्हापासून त्या पलटणीच्या Battle Honours मधे ह्या लढाईचा उल्लेख होत असतो. त्या स्मृतिस्तंभाची देखभालहि ग्रेनेडियर्सकडूनच ठेवली जाते. पेशव्यांचा पराभव आणि मराठेशाहीच्या अस्ताचा हा शेवटचा अध्याय होता. ब्राह्मणशाहीचा असा अस्त झाला ही काही लोकांना स्मरणीय गोष्ट वाटावी हे साहजिक आहे.

ह्या लढाईची माहिती अनेक जुन्या पुस्तकात मिळते. ब्रिटिशांच्या सैनिकी शाळांमधूनहि तिचा अभ्यास केला जात असे.

किंकेड-पारसनीसलिखित A history of the Maratha people (1918) ह्या पुस्तकात पान २१४-२१६ येथे हिचे तपशीलवार वर्णन आहे.

बाकी वरच्या 'अवान्तर'विषयी काही लिहावे असे माझे मत आहे. ते थोडया सवडीने लिहीन.

चिंतातुर जंतू Thu, 02/01/2014 - 11:07

>> त्यात दलित होते, म्हणून "इंग्रज जिंकले ते बरे/चांगले झाले" हे फ्लेक्स बोर्ड वाल्यांना म्हणायचे असावे.
आश्चर्य वाटले. "इंग्रज शतकभर अजून लवकर जिंकले असते तर ते अधिक चांगले झाले असते " , "एकोणिसावय शतकाच्या प्रारंभी जिंकायच्या ऐवजी अटह्राव्या शतकाच्या प्रारंभीच जिंकले असते तर अधिक बरे झाले असते" अशी काही पब्लिकची भावना आहे काय?

कदाचित आपण हे आताच्या संदर्भचौकटीतून पाहता आहात म्हणून असं दिसत असावं. उत्तर पेशवाई सर्वसामान्यांहून इतकी दूर गेली होती की तळागाळातल्या लोकांनी पेशव्यांच्या विरोधातल्या बाजूला साहजिक पाठिंबा दिला ही गोष्ट माझ्या मते अधिक विचार करण्याजोगी आहे. शिवाजीच्या काळात महारांसारखे लढवय्ये समाज शिवाजीसाठी प्राण पणाला लावून लढत होते. पेशव्यांनी जातपात दूर ठेवून शिवाजीसारखी गुणग्राहकता दाखवली असती, तर ते समाज पेशव्यांसाठीसुद्धा तितक्याच प्राणपणानं लढले असते. तशी गुणग्राहकता ब्रिटिशांनी दाखवली म्हणून 'महार रेजिमेंट' निर्माण झाली.

ऋषिकेश Thu, 02/01/2014 - 12:05

सध्या भीमा कोरेगाव याचे विकीपान पुढिल माहिती सांगते:
यातील प्रत्येक महत्त्वाच्या विधानाला एक संदर्भ दिलेला आहे:

भिमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ - या दिवशी ब्रिटीश ईस्ट इंडीया कंपनीच्या कॅप्टन. एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृत्वा खालील दुसरी/बाँबे नेटीव्ह इन्फन्ट्री बटालियनने २५००० पेशवे सॆन्याचा पराभव केला[१] ; दुसरी/बाँबे नेटीव्ह इन्फन्ट्रीबटालियन मुख्यत्वे ५०० महार सैनिकांची होती[२] . स्वातंत्र्यवीर सावरकरही इंग्रजांच्या या विजयास भारतातील जातीभेदाची विषमता कारणीभूत होती असा निष्कर्ष त्यांच्या "प्रस्तुतच्या जातीभेदाचें इष्टानिष्टत्व" या जात्युच्छेदक निबंधात मान्य करतात.[३] .स्वा.सावरकर म्हणतात

"परंतु हें विधानही तितकेंच विपर्यस्त न्यूनोक्तीचें होणारें आहे की, आपली जी हिंदूपदपादशाही मूठभर इंग्रजी पलटणीच्या पायाखाली तुडविली गेली, ती इतकी निर्बल होण्यास जातीभेदाचा क्षय मुळीच कारणीभूत झालेला नाही!"

या धाग्यातील माहिती वापरून सदर विकीपान उद्ययावत करण्याचे ठरवतो आहे. तेव्हा श्री कोल्हटकर तसेच अन्य प्रतिसादकांची हरकत नसल्याचे गृहित धरतो आहे. पान प्रकाशित करण्याआधी इथे याच धाग्यावर एक दिवस विचारार्थ ठेवेन. जर त्यावर काही हरकत असेल तर लगेच सांगावे.

एक समांतर शंका:
भिमा कोरेगाव की भीमा कोरेगाव?

मिलिन्द् पद्की Sat, 06/01/2018 - 04:44

In reply to by ऋषिकेश

थोडेसे अवांतर पण कदाचित प्रस्तुत: आपले संख्याबळ कमी असतानाही इंग्रज अनेक लढाया का जिंकला: इंग्रजांचे "सैनिकांची पुढची रांग गुडघ्यावर बसलेली, आणि मागची उभी" असे फॉर्मेशन असे. एक रांगेतले लोक इशाऱ्यानुसार एकाच वेळी गोळ्या झाडत , तोपर्यंत दुसरी रांग बंदूक ठासत असे. याचा मशिनगन सारखा अतिशय खतरनाक परिणाम होत असे.

बॅटमॅन Thu, 02/01/2014 - 13:00

उत्तर पेशवाईत जातिभेदाची परमावधी होती आणि त्यामुळे ब्रिटिशांना एतद्देशीय पलटण उभारणे सोपे गेले असा जंतूंच्या प्रतिसादातून युक्तिवाद मांडलेला दिसतो आहे. माझ्या मते ही कारणमीमांसा फसवी अन चुकीची आहे. पहिला बाजीराव सोडा, अगदी थोरल्या माधवरावापर्यंत जातिभेद नव्हता काय? इंग्रज कमजोर होते तोपर्यंत हा जातिभेद बरा दिसला नाही कुठे तो? इंग्रजांचं अर्थकारण चोख असल्याने त्यांना एतद्देशीय पलटणी उभ्या करणे सोपे गेले अन लॉयल्टी मिळाली इ.इ. कारणमीमांसा रँडॉल्फ कूपरच्या "अँग्लो मराठा बॅटल्स" नामक पुस्तकात दिलेली आहे ती जास्त पटण्याजोगी आहे. कुठल्याही समाजात वर्गकलह असतात त्याचा इंग्रजांनी फायदा उठवला असे फारतर म्हणता येईल. त्यावरून उत्तरपेशवाई ही पूर्वपेशवाई किंवा मध्यपेशवाईपेक्षा जास्त जातीय होती असा निष्कर्ष काढणे चूक ठरेल. कुठलेही तत्कालीन राज्य असायचे तितपतच पेशवाई जातीय होती. आता प्रॉपर पुणे शहरातली उदाहरणे देऊन ती अखिल पेशवा राज्याला कोणी लागू करणार असेल तर ती इंडक्टिव्ह फॉलसी आहे. पेशवा काळात महार समाजाचे लोक काही ठिकाणी पेशव्यांच्याच राज्यात मोठे अंमलदार असल्याचेही उल्लेख सापडतात-मुलकी अन फौजदारीदेखील.

पण नंतरच्या काळात या लढाईची स्मृती जातीव्यवस्थेविरुद्धचे यशस्वी बंड म्हणून जनमानसात कशी जागृत ठेवली गेली हे पाहिले तर मजा वाटते खरी. म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध केला याचीच नशा इतकी की त्यापायी इंग्रजांना मदत केली अन पारतंत्र्य ओढवून घेतले यातील केविलवाणा विरोधाभास कुणाच्या लक्षातही येत नाही. शिवाय जातिनिरपेक्ष, समतावादी, इ. आणि राष्ट्राभिमान हा रद्दी समजणार्‍या विचारधारेच्या फ्याशनमुळे हे मुद्दामहून दुर्लक्षिले गेल्याचीच शक्यता जास्त. प्राची देशपांडे यांचा याबद्दलचा एक लेख रोचक आहे.

ऋषिकेश Thu, 02/01/2014 - 13:06

In reply to by बॅटमॅन

देशपांडेतैंच्या लेखाचा दुवा आहे?
बाकी मत रोचक आहेच, कोणत्याही काळात सामाजिक कारणांपेक्षा आर्थिक कारणे बर्‍याचदा प्रभावी ठरली आहेत. ते कारण अधिक मान्य होण्यासारखे आहेच.

पण इंग्रजाला आपण आता/ एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शत्रु मानु लागलो होतो. त्या आधी मराठे, मुघल, फ्रेंच, पोर्तूगीज यांच्यासारखेच तेही सत्तेच्या खेळाडूंपैकी एक होते. त्यावेळी जातीपातीच्या कारणांनी किंवा आर्थिक फायद्यासाठी किंवा दोन्ही (कसेही) समजा एखादा समाज इंग्रजांच्या सैन्यात सामील झाला असला तरी त्यामुळे आपण 'पारतंत्र्य ओढवून घेतले' म्हणणे तत्कालीन सैन्यावर अन्यायकारक आहे असे वाटते. इंग्रज इतका मोठा होईल याची कल्पना तेव्हा कोणीच केली नव्हती.

बॅटमॅन Thu, 02/01/2014 - 17:43

In reply to by ऋषिकेश

दुवा माहिती नाही. संग्रहात आहे लेख, पाठवतो.

बाकी 'पारतंत्र्य ओढवून घेतले' ही शब्दयोजना तत्कालीन सैन्यावर अन्याय करणारी ठरेलच, परंतु नंतरच्या इतिहासकारांना अक्कल नको? त्यांच्यावर ही टीका मुख्यतः केंद्रित आहे.

चिंतातुर जंतू Thu, 02/01/2014 - 13:04

>> पहिला बाजीराव सोडा, अगदी थोरल्या माधवरावापर्यंत जातिभेद नव्हता काय? इंग्रज कमजोर होते तोपर्यंत हा जातिभेद बरा दिसला नाही कुठे तो?

पुण्यात येताना महारांनी गळ्यात मडकं आणि कमरेला खराटा बांधावा अशी उत्तर पेशवाईत सक्ती होती. महारांसारखा मानी समाज अशी वर्तणूक सहन करून वर पेशव्यांसाठी प्राणपणानं लढला असता असं वाटत नाही.

बॅटमॅन Thu, 02/01/2014 - 13:10

In reply to by चिंतातुर जंतू

हे किती ठिकाणी होतं? त्याने नक्की काय फरक पडला? एका दाखल्याचे एक्स्ट्रापोलेशन करणे हे फसवं ठरतं ते याचमुळे. असा दाखलाच द्यायचा झाला तर कोकणात अन सांगलीच्या आसपास एकदोन महार अंमलदारही होते पेशव्यांचे. असे दाखले चिकार देता येतील, त्याचा परिणाम किती झाला हे पहावं असं माझं मत आहे. उत्तर पेशवाईतही असे महार अंमलदार सापडतील शोध घेतला तर. त्यामुळे या उदाहरणाची व्याप्ती तितपतच आहे.

चिंतातुर जंतू Thu, 02/01/2014 - 13:16

>> हे किती ठिकाणी होतं? त्याने नक्की काय फरक पडला? एका दाखल्याचे एक्स्ट्रापोलेशन करणे हे फसवं ठरतं ते याचमुळे. असा दाखलाच द्यायचा झाला तर कोकणात अन सांगलीच्या आसपास एकदोन महार अंमलदारही होते पेशव्यांचे.

लढाई पुण्यातच झाली होती. कोकणातले दाखले तिथे किती उपयोगी पडतील ह्याबद्दल शंका आहे.

बॅटमॅन Thu, 02/01/2014 - 13:19

In reply to by चिंतातुर जंतू

ठीक. पण लढाई घडली कधी, असा हा आदेश होता कधी आणि याचा नक्की काय परिणाम झाला याबद्दल काही निश्चित विदा मिळेस्तवर अशी कारणपरंपरा लावणे चूक वाटते. कारण इंग्रजांनी सर्व ठिकाणी स्थानिक जनताच उभी केली होती.

इथे पेशव्यांचे उदात्तीकरण करण्याचा हेतू नाही पण इतके एकच कारण अशा लढाईच्या मुळाशी असेल हे अविश्वसनीय आहे.

चिंतातुर जंतू Thu, 02/01/2014 - 13:29

>> इतके एकच कारण अशा लढाईच्या मुळाशी असेल हे अविश्वसनीय आहे.

'एकच कारण पराभवाच्या मुळाशी' इतकी एकारलेली समीक्षा करावी असा आग्रह नाहीच, पण जो समाज आपल्या शौर्यासाठी आणि धन्याकरता जीवावर उदार होण्याच्या वृत्तीसाठी अनेक पिढ्या प्रख्यात होता, त्या समाजाला जातिश्रेष्ठत्वाच्या आपल्या कल्पनांमुळे अशी मानहानीची वागणूक देताना पेशवे आपलं आणि आपल्या राज्याचं दीर्घगामी हित विसरले होते हे मान्य करायला प्रत्यवाय दिसत नाही.

मी Thu, 02/01/2014 - 13:48

बॅटमन ह्यांना विनंती - धाग्याच्या निमित्ताने दोन्ही बाजू विषद करणारी एक संदर्भसहित विस्तृत माहिती त्यांनी लिहावी, अर्थातच त्यांचा ह्याबाबतचा व्यासंग दांडगा असल्याने हि विनंती केल्या जात आहे. त्यांचे मत व माहिती वेगवेगळी लिहिल्यास जास्त उत्तम.

बॅटमॅन Thu, 02/01/2014 - 15:33

त्या समाजाला जातिश्रेष्ठत्वाच्या आपल्या कल्पनांमुळे अशी मानहानीची वागणूक देताना पेशवे आपलं आणि आपल्या राज्याचं दीर्घगामी हित विसरले होते हे मान्य करायला प्रत्यवाय दिसत नाही.

हे ठीक आहे, पण मुळात "पुण्यात येताना महार समाजाला खराटा अन मडकं लटकवून मगच यावं लागे" इ.इ. ला काही समकालीन पुरावा आहे की ही बखरींतून उठलेली भूमका आहे? समकालीन पुरावा असेल तर मी मान्य करतो आत्ताच्या आत्ता, नपेक्षा एक बाजारगप्पा यापलीकडे त्याला महत्त्व देणे दुरापास्त वाटते. असो.

अन असे असेल तर हा आदेश उत्तरपेशवाईत लागू करण्यात आला आणि पूर्व/मध्य पेशवाईत नव्हता याचा अन पुणे सोडून अन्यत्र असा काही नियम नव्हता याचा पुरावा मिळाल्याशिवाय या कारणाची खातरजमा होणार नाही.

@मी: माझा व्यासंग वगैरे नाही. थोडीशी माहिती आहे इतकंच. ती नीट जमवली की पाहतो अवश्य.

मन Thu, 02/01/2014 - 15:36

In reply to by बॅटमॅन

पुराव्याची कल्पना नाही. पण माझ्याकडील माहिती मांडतो.
पण पेशवाई संपल्यावर लागलिच १८२७ च्या काळात महात्मा फुल्यांचा जन्म झाला. त्याकाळात उच्च वर्ग काहिसा उत्तर पेशवाईच्या हँग ओव्हर मध्येच होता.
महात्मा फुल्यांनी हे वातावरण पाहिले. त्यांच्या ज्येष्ठांकडून near past बद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल ऐकले.
"१८५७ चे बंड फसले ते बरेच झाले नाहीतर कैकांना पुन्हा गळ्यात मडके अडकवून व मागे खराटा बांधून फिरावे लागले असते" असे त्यांचे एक विधान आहे.
त्यांनी हे दूरवरच्या ऐकिव माहितीपेक्षा प्रत्यक्ष पीडा भोगलेल्या कडून ऐकले असल्याची शक्यता अधिक वाटते, त्यांचा जन्मकाळ्, कार्यस्थळ ,निवास लक्षात घेता.

बॅटमॅन Thu, 02/01/2014 - 16:01

In reply to by मन

:)

हे अर्ग्युमेंट येणार हे ठाऊकच होते. पण समकालीन पुरावा काय? पेशवा दफ्तरातले एक चिटोरे दाखवा की कुणीतरी.

आणि मगाचपासून एका मुद्याला कोणी उत्तर देईना.

हे सर्व काही पूर्वपेशवाईत नसून उत्तरपेशवाईत होते या म्हणण्याला पुरावा काय?

ऋषिकेश Thu, 02/01/2014 - 17:12

In reply to by बॅटमॅन

हे सर्व काही पूर्वपेशवाईत नसून उत्तरपेशवाईत होते या म्हणण्याला पुरावा काय?

हा पुरावा इतका निर्णायकरित्या आवश्यक आहे काय?
आपल्यावर अन्याय होतोय हे समजले तरी पेशवे ताकदवान असेपर्यंत + महारांची नवी पिढी घडेपर्यंत + इंग्रजांसारखा महारांना अ‍ॅक्सेप्टच नाही तर त्यांच्या दृष्टीकोनातून गुणग्राहक सत्तातूर समोर येईपर्यंत महार समाजाला अन्यायाला/अपमानाला वाचा फोडायला वाव नव्हता. इंग्रजांच्या रुपात ती संधी येताच त्यांनी ती साधली असे म्हणणे गैर आहे का?

(तुझा मुद्दा खोडायला म्हणून नै, हा तुमची चर्चा वाचून पडलेला जेन्युअन प्रश्न आहे. अगदीच बाळबोध असेल तरी उत्तर वाचायला आवडेलच)

बॅटमॅन Thu, 02/01/2014 - 17:35

In reply to by ऋषिकेश

हा पुरावा इतका निर्णायकरित्या आवश्यक आहे काय?

अर्थातच, आवश्यक आहे. तसा पुरावा नसेल तर मग जातिभेदाधारित ओव्हरसिम्प्लिफाईड कारणमीमांसा फोल जाते.

आपल्यावर अन्याय होतोय हे समजले तरी पेशवे ताकदवान असेपर्यंत + महारांची नवी पिढी घडेपर्यंत + इंग्रजांसारखा महारांना अ‍ॅक्सेप्टच नाही तर त्यांच्या दृष्टीकोनातून गुणग्राहक सत्तातूर समोर येईपर्यंत महार समाजाला अन्यायाला/अपमानाला वाचा फोडायला वाव नव्हता. इंग्रजांच्या रुपात ती संधी येताच त्यांनी ती साधली असे म्हणणे गैर आहे का?

पण मग पानिपतच्या लढाईतदेखील महार समाजातले सेनापती होते. काही ठिकाणी महार समाजातले पाटील अन अन्य अधिकारीही होते. इंग्रज येईपर्यंत अगदी दबून राहिलेला वर्ग असेल तर त्याची उसळी जरासुद्धा कधीही कुठेही दिसू नये हे असंभवनीय वाटते. महार समाजाबद्दल विशेष असंभवनीय वाटते कारण तत्कालीन कागदपत्रांमध्ये त्यांना इनाम जमिनी दिल्याची नोंद आहे, खटल्यांमध्ये त्यांची साक्ष निर्णायक मानली गेल्याचे पुरावे आहेत.

मी Thu, 02/01/2014 - 17:49

In reply to by बॅटमॅन

अदर वे राउंड तुमच्या प्रतिसादातुन महार रेजीमेंटने परताव्यासाठी म्युटनी केली असे दिसते, विदा नसताना तसे करणे ओव्हरसिम्प्लिफिकेशन होणार नाही काय?

बॅटमॅन Thu, 02/01/2014 - 18:04

In reply to by मी

नाही. परताव्यासाठी महार रेजिमेंटने म्युटिनी केली असा माझा दावा नाही.

इंग्रजांनी ज्या एतद्देशीय पलटणी उभ्या केल्या त्यांनी बहुतेक सर्व स्थानिक सत्तांचा पराभव केला. याच्या कारणमीमांसेकडे पाहू गेलो तर टेक्नॉलॉजीचा मुद्दा बहुतेकजण उभा करतात. पण असईची लढाई जी १८०३ साली झाली, त्या लढाईत तांत्रिक बाजूही तुल्यबळ होती अन अन्य काही लढायांतही. मग अशावेळी इंग्रज का जिंकले तर बेटर ऑर्गनायझेशन, मेड पॉसिबल इन पार्ट बाय गुड मिलिटरी फायनान्सेस हा एक मुद्दा त्या पुस्तकात दिलेला आहे. तो मला ग्राह्य वाटतो.

म्हणजे कसं की इंग्रजांनी रिक्रूटमेंट सुरू केली अन चांगला अनुभव आल्याने बरेच लोक तिथे जॉइन झाले. काही लोक इकडून तिकडे गेलेही असतील, पण सर्व नाही. मराठ्यांच्या लष्करातील पेमेंट सिस्टीम गंडलेली होती हे सर्वश्रुत आहे. तरी म्युटिनी झाली नाही कारण आयत्यावेळी पिसमील परतावा तरी दिला जात होता.

मी Thu, 02/01/2014 - 18:48

In reply to by बॅटमॅन

सहमत, तुम्ही मांडलेले मुद्दे हा एक भाग असु शकेल पण महारांचा मुद्दादेखिल एक कारण असु शकेल काय? का महारांचा मुद्दा जातीराजकारणावरुन नंतर घुसडलेला असल्याचीच शक्यता आहे असे तुम्हाला वाटते? त्यासंदर्भात काही संदर्भ उपलब्ध आहेत काय?

बॅटमॅन Thu, 02/01/2014 - 19:02

In reply to by मी

पण महारांचा मुद्दादेखिल एक कारण असु शकेल काय?

व्यक्तिशः त्या मुद्याचे योगदान त्यात फारसे आहे असे मला वाटत नाही.

का महारांचा मुद्दा जातीराजकारणावरुन नंतर घुसडलेला असल्याचीच शक्यता आहे असे तुम्हाला वाटते? त्यासंदर्भात काही संदर्भ उपलब्ध आहेत काय?

ब्रिटिश अंमलात जागृती वगैरेंनंतर इतिहास वेगळ्या रिव्हिजनिस्ट चौकटीत लिहिणे सुरू झाले तेव्हा या लढाईचे पर्सेप्शन ब्राह्मण विरुद्ध दलित असे मांडणे सुरू झाले असे मला वाटते. प्राची देशपांडे यांचा एक लेख यावरच फोकस करतो- या लढाईचा इतिहास कशा प्रकारे लिहिला गेला इ.इ. या लढाईच्या 'हिस्टोरिओग्राफी' संबंधात बहुतेक पुरावे तिथे आहेत असे म्हणता यावे. लेख वाचल्याला मला बरेच दिवस झालेत, पुनरेकवार वाचून सांगतो काही सापडते का ते.

चिंतातुर जंतू Thu, 02/01/2014 - 18:25

In reply to by मी

>> अदर वे राउंड तुमच्या प्रतिसादातुन महार रेजीमेंटने परताव्यासाठी म्युटनी केली असे दिसते, विदा नसताना तसे करणे ओव्हरसिम्प्लिफिकेशन होणार नाही काय?

किंवा असंही म्हणता येईल की पेशवाईत महारांवर विशेष अन्याय झालाच नसेल, तर नंतर फुले प्रभृतींच्या लिखाणात पेशवाईबद्दल जो रोष दिसतो तो अनाठायी होता.

बॅटमॅन Thu, 02/01/2014 - 15:59

यात पान क्र. २१ वरचा संदर्भ क्र. ८ आहे तो काय आहे ते दिसत नाहीये या लिंकमध्ये.

आणी महत्त्वाचे म्हणजे उत्तर पेशवाईतच असे होते आणि पूर्व पेशवाईत असे नव्हते असे तर आजिबात दिसत नाही वरील उल्लेखावरून.

य न केळकर आणि आंबेडकर यांचा पत्रव्यवहार झाला त्यात वरील वाक्याला पुरावा पेशवा दफ्तरात सापडला नसल्याचे नमूद आहे. य न केळकर हे पेशवा दफ्तरात आयुष्य घालवलेले संशोधक होते.

त्यामुळे असोच.

बॅटमॅन Thu, 02/01/2014 - 17:16

घुर्यांच्या पुस्तकातही ही प्रथा पेशवाईत सुरू झाली किंवा कसे याबद्दल काहीच विधान नाही आणि मूळ प्रतिसाद त्या गृहीतकावरच अवलंबून आहे. पेशवाईच्या पूर्वीपासून ही प्रथा असेल, शिवकालातही असेल तर तेव्हा बंडे का झाली नाहीत????

त्यांचा तो पान क्र. ४२-४३ वरचा संदर्भही काय याचा पत्ता लागत नाही. शिवाय पुस्तकाच्या प्रकाशनाचे वर्ष १९६९ आहे त्यामुळे पूर्वसूरींवर कितपत विसंबलेत तेही ठाऊक नाही.

नितिन थत्ते Thu, 02/01/2014 - 20:55

पानिपताच्या युद्धानंतर ज्याचे कर्तृत्व सिद्ध झालेले होते (अटकेपार झेंडे) अशा सीनिअर राघोबा* ऐवजी केवळ आधीच्या पेशव्याचा पुत्र* म्हणून १६ वर्षाच्या (तोवर कर्तृत्व सिद्ध न झालेल्या)** माधवरावास पेशवा म्हणून नेमले तिथेच पेशवाईच्या*** र्‍हासाची बीजे पेरली गेली असे माझे मत आहे. त्याने राघोबा दुखावला गेला आणि त्याने अधिकृत पेशव्याविरोधात कारस्थाने केली.

* त्याकाळी घराणेशाही**** होती असे मान्य केले तरी राघोबाही त्या घराण्यातलाच होता.
** माधवराव पेशव्याने नंतर कर्तृत्व सिद्ध केले हे खरे पण नेमणुकीच्यावेळी ते सिद्ध नव्हते.
***पेशवाईच्या र्‍हासाची म्हटले आहे. मराठेशाही नव्हे कारण १८१८ नंतरही शिंदे, होळकर, गायकवाड आणि इतर अनेक मराठ्यांची राज्ये अस्तित्वात होती.
**** खरे तर पेशवे हे राजे नव्हते त्यामुळे घराणेशाही ऑटोमॅटिक लागू होण्याचे काहीच कारण नव्हते.

रमा Fri, 03/01/2014 - 01:44

In reply to by नितिन थत्ते

आपण केलेली कारणमीमांसा पटली नाही. सत्तेचे राजकारण सहसा नियम पाळुन केले जात नाही. पहिले माधवराव लेजिटिमेट वारस होते म्हणुन नाही तर तत्कालिन पॉवर सेंटर्स ना सोइचे होते म्हणुन त्यांना नियुक्ती मिळाली असण्याची दाट शक्यता आहे. निव्वळ नानासाहेब पेशव्यांचा मुलगा नाही म्हणुन राघोबादादा ला पेशवाई देण्यात आली नाही असे वाटत नाही. संभाजी महाराज हे नियमानुसार अभिषिक्त युवराज असुनही सोयराबाई आणि राजाराम महाराजांना बॅक करणारी लॉबी अस्तित्वात होती आणि ह्या दोघांच्या मृत्युनंतर सातारा आणि कोल्हापुर अशी दोन संस्थान निर्माण होउन तो वाद बरीच वर्षे चिघळला. राघोबादादा च्या पाठी अशी कुठलीहि लॉबी नव्हती/ ती निर्माण करण्यात तो अपयशी ठरला म्हणुन नाहीतर पेशवाईच्या ही दोन शाखा तयार झाल्या असत्या.

त्यामुळे निव्वळ राघोबादादा वर अन्याय झाला आणि तीच पेशवाईच्या र्‍हासाची सुरुवात होती ही मीमांसा पटली नाही. माझ्यामते ती सुरवात पानिपतच्या युध्दात झालेल्या मराठ्यांच्या पराभवात होती. हा ब्लो इतका जबरदस्त होता की त्यातुन मराठी राज्य कधी सावरुच शकल नाही. कारण ते सावरण्याची क्षमता असलेली कर्तुत्ववान/अनुभवी माणसे पानिपतच्या युध्दात किंवा युध्दामुळे आलेल्या नैराश्यात गारद झाली त्यामुळे राघोबादादाच्या बंडखोर/ सत्तालोलुप कारवायांना पायबंद घालायला कुणिच राहिल नाहि. माधवरावांचा त्यांच्यावरचा प्रभाव मर्यादित राहिला (वय्/नाते). शिवाय माधवरावांना त्यांच्या कारकिर्दित तेवढ स्थैर्य ही मिळु शकल नाहि कारण पानिपताच्या लढाइचा फायदा घेउन निजामासारखे तुलनेने कमजोर असलेले शत्रु फायदा घ्यायला सरसावले.

अरविंद कोल्हटकर Thu, 02/01/2014 - 21:09

महार समाजातील लोकांनी गळ्यात (आपली थुंकी साठविण्यासाठी) मडके बांधायचे आणि आपल्या मागे रस्ता झाडण्यासाठी झाडू बांधायचा ही प्रथा पेशवाईमध्ये किती प्रमाणात रूढ होती ह्याविषयी मजजवळ काहीच निश्चित माहिती नाही पण असे काही प्रमाणात तरी होत असणार हे शक्य वाटते. उदाहरणार्थ ज्या गावातील पाटील-देशमुख-जोशी-कुलकर्णी इत्यादि गावाचे पुढारी जातिबंधनांबाबत विशेष जागरूक असतील तेथे महारांवर अशी सक्ति केली जात असणे अशक्य वाटत नाही.

नारायणराव पेशव्याच्या काळात पुण्यामध्ये ब्राह्मणांनी प्रभु समाजावर (सीकेपी) दावा करून ते शूद्र असून त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही, केवळ पुराणोक्ताचा आहे असे आज्ञापत्र धर्मपीठांकडून मिळविलेच होते. त्याचाच भाग म्हणून प्रभूंनी आपल्या पत्रव्यवहारांमध्ये 'शिरसाष्टांग नमस्कार' असे न लिहिता 'दंडवत' असे लिहावे, समोरासमोर भेट झाल्यास 'नमस्कार' न म्हणता 'रामराम' म्हणावे असले अपमानास्पद वाटणारे petty नियमहि प्रभूंवर लादले होते. प्रभु ही त्या मानाने वरची जात आणि लिखापढीवर उपजीविका करणारी. त्यांची ही स्थिति तर मग महारांचे काय?

गुजराथी लोककथेवर आधारित 'भावनी भवाई' (उच्चार ठीक?) हा सिनेमा मी पाहिला होता. गोष्ट अशीच गुजराथेतील महार-सदृश समाजाबाबत आहे. त्या सिनेमातील त्या समाजाचे लोक अशी मडकी आणि झाडू बांधून हिंडताना दिसतात.

बॅटमॅन Thu, 02/01/2014 - 22:53

In reply to by अरविंद कोल्हटकर

रोचक आहे. उदाहरणांबद्दल धन्यवाद.

त्या वेदोक्ताबद्दल बोलायचं झालं तर कोकणस्थ आणि देवरुखे यांमध्येही हा तंटा सुरू होता आणि प्रत्येक पक्ष काशीस जाऊन आपल्यास फेवरेबल निर्णय आणत असे. याचा पुरावा रोझालिंड ओ हॅनलॉन नामक बाईंच्या एका पेपरात आहे. त्यामुळे एकदा आलेला हा निर्णय प्रभूंनी डोळे मिटून स्वीकारला असेल हे संभवत नाही.

आणि ही अशी प्रथा असेल तर उत्तरपेशवाईतच होती या म्हणण्याला आधार काय? मी हा मुद्दा कायम लावून धरतोय कारण पराभवाची कारणमीमांसा त्यावर आधारित आहे. आधीपासून असे असेल तर तेव्हाच असे काय झाले या प्रश्नाला उत्तर मिळालेले नाही.

अरविंद कोल्हटकर Fri, 03/01/2014 - 00:11

एखादा जुना वाडा पडतो तो काही एका दिवसात पडत नाही, कित्येक दशके त्याची बारीकसारीक झीज आणि पडझड चालू असते, अशी किरकोळ वाटणारी झीज थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत आणि एखाद्या पावसाळ्यात तो जीर्ण वाडा खाली येतो. पेशवाईचे - किंबहुना हिंदुस्तानातील सर्वच एतद्देशीय सत्तांचे - तसेच झाले असे मी म्हणेन.

दोन हजार वर्षे चालू असलेल्या जातीपातींच्या उतरंडीमुळे आणि श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या कल्पनांमुळे जातीजातींमध्ये देशबांधव म्ह्णून एकमेकांबद्दल प्रेम नाही, निष्ठा कोठे असेल तर ती आपापल्या जातीबद्दलच. अशा स्थितीत आपल्या डोक्यावर कोण राज्य करतो आहे ह्याचे सर्वसामान्य माणसाला काहीच सोयरसुतक नव्हते. वर कोणीहि असला तरी जनता नेहमीच भेदरलेली कारण सैन्य आपले काय वा परक्याचे काय, लुटालूट करण्यामध्ये ते कसलाच आपपरभाव ठेवीत नसत.

समाजाचे एकूण ज्ञानभांडार म्हणावे तर ते वांझोटया चर्चांनी भरलेले, ऐहिक बाबींविषयी संपूर्ण उदास वा त्याकडे तुच्छतेने पाहणारे. विद्याधनाचे संस्कृत श्लोकात कौतुक कितीहि करोत, त्याचे प्रत्यक्ष आचरण कोणीच करीत नव्हते. 'शहाणे करुनी सोडावे सकळजन' असे रामदासांनी म्हटले खरे पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी पावले कोणत्याच समाजधुरीणाने उचलली नाहीत. (शेजारच्या गोव्यात १६व्या शतकात छपाईची विद्या पोहोचली होती पण आपल्याकडे ती आणावी असे कोणासच जाणवले नाही.) ह्यामुळे समाज एकुणात बाल्यावस्थेतच होता असे म्हटले तरी चालेल.

असला स्वत्त्वाची जाणीव विसरलेला बालबुद्धि समाज परकीय आक्रमणांना वारंवार बळी पडत गेला ह्यात आश्चर्य काय? इस्लामी आक्रमणापुढे त्याने सहजच मान टाकली.

मधल्या काळात जगातील अन्य समाज प्रगति करीत होते, नवनवी शास्त्रे आत्मसात करीत होते, राज्य आणि अर्थव्यवस्था चालविण्याचे नवनवे प्रयोग करीत होते, जगभर हिंडून आपली क्षितिजे रुंदावत होते.

अशा वातावरणात अनुभव घेऊन शिकलेल्या इंग्रजांना बाल्यावस्थेतून बाहेरच पडायची इच्छा नसलेल्या समाजावर विजय मिळवायला कितपत प्रयास पडणार? आज ना उद्या ते व्हायचेच होते, ते १८१८मध्ये झाले इतकेच काय ते!

बॅटमॅन Fri, 03/01/2014 - 00:40

In reply to by अरविंद कोल्हटकर

:)

नेमकी हीच मीमांसा राजवाड्यांनी महिकावतीच्या बखरीच्या प्रस्तावनेत दिलेली आहे. उसमे दम जरूर है पण निव्वळ पश्चातबुद्धीने पाहिल्यामुळे बरेच फॉल्ट्स आहेत. उदा.

असला स्वत्त्वाची जाणीव विसरलेला बालबुद्धि समाज परकीय आक्रमणांना वारंवार बळी पडत गेला ह्यात आश्चर्य काय? इस्लामी आक्रमणापुढे त्याने सहजच मान टाकली.

सहजच मान टाकली हे विधान अतिशय चूक आहे. मुहम्मद बिन कासिमने सिंधवर आक्रमण केले इ.स. ७१२ साली. काही वर्षांच्या अरब सत्तेनंतर सिंधमधून इ.स. ७५० च्या सुमारास अरब सत्ता पूर्ण नेस्तनाबूत झालेली होती. पुढे अरब अन अन्य लोकांबरोबर काबूल आणि झाबूलच्या राज्यांनी किमान दोनशे वर्षे झुंज दिली आणि स्वातंत्र्य अबाधित राखले. पर्शियन साम्राज्य अन इजिप्तच्या तुलनेत हा प्रतिकार कडवा नव्हे काय? अरबांना इतका कडवा विरोध अन्यत्र फक्त फ्रान्समध्ये चार्ल्स मार्तेल यानेच केलेला होता. दोनशे वर्षांच्या झुंजीनंतरही मुस्लिम सल्तनत सहजासहजी सिद्ध झालेली नाही. कधी पॄथ्वीराज आहे, कधी अजून कोणी. आणि अख्खा भारत इस्लाममय करणे राहोच, उलट मुसलमानांवर हिंदू धर्माचा प्रभाव पडतोय अशा भयाने मुल्लामौलवींना मेहदवी चळवळ हाती घ्यावी लागली. इतके करूनही शेकडो वर्षांत कधी विजयनगर, कधी मराठे तर कधी आहोम, शीख, इ. लोक परत मान वर काढतातच!! अन्यत्र असे कुठे दिसते काय? इतका विरोध दिसूनही 'इस्लामी आक्रमणापुढे नांगी टाकली' म्हणत असाल तर आश्चर्य आहे.

परकीय आक्रमणांचे म्हणाल तर एक यादीच करू. मौर्यकाळातले ग्रीक आक्रमण चंद्रगुप्ताने थोपवले. नंतर हूण अन सिथियन वगळता इ.स. ६०० पर्यंत मेजर आक्रमणे झाली नाहीत अन जी झाली ती अखेरीस परतवली गेली. आक्रमकही बर्‍याच अंशी इथे राहिले. पुढे मुस्लिम आक्रमणे झाली, अगदी मंगोलांचेही आक्रमण झाले. मुस्लिम आक्रमणे दोनेकशे वर्षांच्या हार्ड फायटिंगनंतरच भारताच्या अंतर्भागात घुसली. आक्रमणे का होतात याचे कारण समाज बुळा आहे हे नसून इथली संपत्ती हे आहे. दोन्हींची गल्लत करत आहात असे वाटते. तसे तर मग रोमवरही कैक आक्रमणे झालीच होती ती काय रोम दुबळे होते म्हणून नव्हे.

समाजाचे एकूण ज्ञानभांडार म्हणावे तर ते वांझोटया चर्चांनी भरलेले, ऐहिक बाबींविषयी संपूर्ण उदास वा त्याकडे तुच्छतेने पाहणारे. विद्याधनाचे संस्कृत श्लोकात कौतुक कितीहि करोत, त्याचे प्रत्यक्ष आचरण कोणीच करीत नव्हते. 'शहाणे करुनी सोडावे सकळजन' असे रामदासांनी म्हटले खरे पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी पावले कोणत्याच समाजधुरीणाने उचलली नाहीत. (शेजारच्या गोव्यात १६व्या शतकात छपाईची विद्या पोहोचली होती पण आपल्याकडे ती आणावी असे कोणासच जाणवले नाही.) ह्यामुळे समाज एकुणात बाल्यावस्थेतच होता असे म्हटले तरी चालेल.

मग ते पर्वतप्राय पुतळे बनवणारे, गिचमीड कलाकुसर दगडांत करणारे, १२व्या शतकात जस्ताचे एक्स्ट्रॅक्शन शोधून काढणारे, बाहेर सर्वत्र मागणी असलेले स्टील बनवणारे, देवगिरीसारखे किल्ले बनवणारे लोक कुठून आले बरे? गेल्या दोनेक हजार वर्षांत भारतात ऐहिक प्रगती काहीच झाली नव्हती असे म्हणणे आहे काय?

तुमच्या विवेचनातला वाडा दोनेक हजार वर्षे पडकाच आहे. माझा आक्षेप या विधानाला आहे. जो युरोप रोमन साम्राज्याच्या विघटनानंतर इ.स. १३००-१४०० पर्यंत अरबांच्या ओंजळीने पाणी पीत होता आणि जे अरब भारताकडून बर्‍याच गोष्टी उचलत होते त्याच्या पोस्ट रेनेसाँ अचीव्हमेंट्स पाहून सार्वकालिकरीत्या ग्रेटनेस आरोपू पाहणे आणि जो भारत दोनशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांच्या हाती गेला त्यावर सार्वकालिकरीत्या विपन्नावस्था आरोपिणे हे अतिशय तर्कदुष्ट आहे.

युरोप तरी रेनेसाँआधी काय मोठा प्रौढावस्थेत होता? नवव्या दहाव्या शतकातल्या युरोपात सगळीकडे अनेक टोळ्यांचा नुस्ता धुमाकूळ सुरू होता. व्हायकिंग, हूण, गॉथ, इ. टोळ्यांचा नुसता कापाकापीचा प्रोग्रॅमच सुरू होता. नवनवीन शास्त्रे शिकणे हे रेनेसाँनंतर जास्त सुरू झाले. त्याआधी ग्रीकोरोमन परंपरा विसरल्यामुळे युरोपला कळायचं बंद झालं होतं.

ऋषिकेश Fri, 03/01/2014 - 10:20

In reply to by अरविंद कोल्हटकर

हा प्रतिसाद माझ्यासाठी अतिशय माहितीपूर्ण असला तरी तत्कालीन घटनांना आताच्या संकल्पना, विचार लाऊन केलेली चिकित्स वाटली. (आपले विचार एकाच दिशेने आहेत बहुदा, फक्त चिकित्सेचा मार्ग वेगळा आहे)

दोन हजार वर्षे चालू असलेल्या जातीपातींच्या उतरंडीमुळे आणि श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या कल्पनांमुळे जातीजातींमध्ये देशबांधव म्ह्णून एकमेकांबद्दल प्रेम नाही

त्यावेळी मुळात आधुनिक काळातील राष्ट्रवाद किंवा देशबांधव ही संकल्पना होती का? त्यावेळी समाज जातींमध्ये विभाजीत होताच शिवाय जात ही फक्त व्यवसायाशी निगडीत असलेली बाब नव्हती तर ती प्रत्येकाची ओळख होती. अशावेळि आपल्या जातीपुरता/जातीचा विचार करणे हे आता जसे संकुचित किंवा मूर्खपणाचे वाटते तसे ते तेव्हाच्या काळातील व्यक्तींना कसे वाटावे? त्यामुळे त्यावेळच्या व्यक्तींना देशबांधव म्हणून एकमेकांवर प्रेम नव्हते हा आरोप करणे गैर ठरावे. तसे प्रेम करायचे असते हेच त्यांना माहित नव्हते.

अशा स्थितीत आपल्या डोक्यावर कोण राज्य करतो आहे ह्याचे सर्वसामान्य माणसाला काहीच सोयरसुतक नव्हते. वर कोणीहि असला तरी जनता नेहमीच भेदरलेली कारण सैन्य आपले काय वा परक्याचे काय, लुटालूट करण्यामध्ये ते कसलाच आपपरभाव ठेवीत नसत.

हे ही पूर्णांशाने खरे नसावे. लुटालुट सगळेच करत हे मान्य. मात्र सामान्य जनतेला राज्य कोण करते याच्याशी सोयरसुतक असेच असे. नाहितर शिवाजी महाराजांच्या राज्यात आपणहून कॅडर जमा झाले नसते. हे सोयरसुतक अरण्याचे कारण म्हणजे त्या त्या राजाची न्याय व आर्थिक करव्यवस्था.

आणि वरील चर्चा वाचुन बहुदा असे म्हणत यावे की पेशवाईत उत्तरोत्तर न्याय व आर्थिक आघाडी दोन्ही बाबतीत ढिसाळ होत चालली होती. प्रत्येक राजाची न्याय देण्यामागचे तर्कशास्त्र स्वतंत्र असते. पेशवाई जसजशी स्थिर (व गाफिल) होत गेली तसतसे त्यांचे न्याय-नियम हे तत्कालिन समाज नियमांपेक्षा धार्मिक काटेकोरपणाकडे, धार्मिक चिकित्सेकडे झुकले असावेत काय? त्यातूनच महार आदी मंडळींवर होणारी सक्ती म्हणा गळचेपी म्हणा वाढत गेली असेल काय? दुसरे बॅट्याने सांगितलेले आर्थिक कारणाने आप्ली भुमिका निभावली असेलच. शेवटच्या काडीसारखी!

अरविंद कोल्हटकर Fri, 03/01/2014 - 02:17

कधी पॄथ्वीराज आहे, कधी अजून कोणी>

पृथ्वीराज हा आपला tragic hero असू शकेल आणि त्याच्या शौर्याच्या गोष्टींवर सिनेमाहि काढता येईल पण आक्रमकांनी त्याला खतम केले हेच सत्य. त्याच्यानंतर 'अजून कोणी' नाही, तो एकटाच. त्याच्या वधानंतर ११व्या शतकाच्या अखेरीपासून वेगवेगळ्या मुस्लिम राज्यांनी जी एकदा हिंदुस्तानावर पकड बसवली ती १७व्या शतकाच्या अखेरीपर्यंत मजबूत होती आणि त्यानंतर १०० वर्षे नामधारी का होईना पण टिकून होती. मधल्या काळात इकडेतिकडे अन्य हिन्दु लहानमोठे सत्ताधीश होऊनहि गेले पण मुघल साम्राज्याची सर त्यांपैकी कोणालाच नव्हती आणि मुघल साम्राज्याचे तुल्यबल प्रतिस्पर्धी असे कोणाचेच इमेज नव्हते. शिवाजी आणि विजयानगरसारखे सन्मान्य अपवाद सोडले तर अन्य सारे मुस्लिम सत्ताधार्‍यांनी मोकळी ठेवलेली empty space धरून होते. ह्यालाच मी मुस्लिम आक्रमणापुढे मान टाकणे समजतो. ११व्या शतकापर्यंत जवळजवळ शून्य टक्के असलेली मुस्लिम संख्या १९४७ पर्यंत २५% येथवर पोहोचली होती हा काय हिंदु संस्कृतीचा विजय मानू कारण की उरलेले ७५% अजून हिंदूच राहिले होते? हाच इस्लामला केलेला 'कडवा विरोध' काय?

परकीय आक्रमणांचे म्हणाल तर एक यादीच करू. मौर्यकाळातले ग्रीक आक्रमण चंद्रगुप्ताने थोपवले. नंतर हूण अन सिथियन वगळता इ.स. ६०० पर्यंत मेजर आक्रमणे झाली नाहीत अन जी झाली ती अखेरीस परतवली गेली.>

अलेक्झँडरचे आक्रमण चंद्रगुप्ताने थोपविले असे म्हणण्यास काही आधार आहे काय? आपल्या इतिहासात तर त्याच्या नावाची नोंदच नाही. त्याच्याबाबतची आपली सर्व माहिती ग्रीक स्रोतांमधूनच येते. अलेक्झँडरला शूर भारतीयांनी 'सीमेवरून परत जा' असे बजावले असे म्हणण्याऐवजी आपल्या देशापासून फार दूर आल्यामुळे परतणे त्याने पसंत केले किंवा त्याच्या सैनिकांनी तसे करायला त्याला भाग पाडले हे अधिक सयुक्तिक वाटते. क्षत्रप, हूण इत्यादींनी हिंदुस्तानच्या अंतर्भागात स्वतःची राज्ये तयार केली.

मग ते पर्वतप्राय पुतळे बनवणारे, गिचमीड कलाकुसर दगडांत करणारे, १२व्या शतकात जस्ताचे एक्स्ट्रॅक्शन शोधून काढणारे, बाहेर सर्वत्र मागणी असलेले स्टील बनवणारे, देवगिरीसारखे किल्ले बनवणारे लोक कुठून आले बरे? गेल्या दोनेक हजार वर्षांत भारतात ऐहिक प्रगती काहीच झाली नव्हती असे म्हणणे आहे काय?>

हिंदुस्तानामध्ये ज्या भौतिक विद्या होत्या त्या दुर्लक्षामुळे मृत झाल्या ही वस्तुस्थिति नाही काय? असे दुर्लक्ष का झाले? तर ब्रह्म आणि अध्यात्मचर्चेपलीकडे काही ज्ञान असू शकते हे कोणालाच जाणवले नाही. अन्यथा लोहस्तंभ एकुलता एक न राहता त्यातून धातुशास्त्र ही ज्ञानशाखा निर्माण होऊ शकली असती. देवळे बांधणार्‍या आणि लेणी कोरणार्‍या स्थपतींच्या कौशल्यामधून अधिक लोकोपयोगी असे स्थापत्यशास्त्र निर्माण होऊ शकले असते. पण असे का झाले नाही? कारण ज्ञानाचा मक्ता स्वतःकडे ठेवलेल्या ब्राह्मणसमाजाला केवळ घटपटादि चर्चेतच ज्ञान दिसत होते. ७व्या शतकात आणि १७व्या शतकात भारतीय प्रजेच्या भौतिक जीवनात काहीच फरक पडला नाही हे अक्षरशः सत्य आहे. आपणास एकतरी भौतिक उपयुक्ततेची अशी चीज दिसते काय की जी ७व्या शतकात नव्हती पण १७व्या मध्ये होती? लोहस्तंभ बनवणार्‍या देशात शेतकर्‍यांना लोखंडाचे फाळ मिळण्यासाठी २०व्या शतकात लक्ष्मणराव किर्लोस्कर जन्मायची वाट पाहावी लागली. काय उपयोग झाला त्या लोहस्तंभ बनवण्याच्या कौशल्याचा?

आज आपणास दिसते की शिवाजी आणि आइन्स्टाइनसारख्या व्यक्ति योग्य शिक्षण आणि संधि मिळाली तर समाजाच्या कोठल्याहि थरातून वर येऊ शकतात, समाजाच्या अमुक गटांचीच ही मक्तेदारी असते असे नाही. हिंदुस्तानातील जातिव्यवस्थेने असा कडेकोट बंदोबस्त केला होता की आपल्या समाजाच्या मानवी भांडवलापैकी ९९.५% भांडवल शिक्षण आणि संधि न मिळाल्यामुळे वाया जात होते आणि हे सत्य अनेक थपडा खाऊनहि हजारएक वर्षे कोणासहि दिसले नाही.

असा आंधळा समाज आज ना उद्या कोणाच्यातरी दावणीला बांधला जाणारच.

फारएण्ड Fri, 03/01/2014 - 02:35

In reply to by अरविंद कोल्हटकर

ज्ञानाचा मक्ता स्वतःकडे ठेवलेल्या ब्राह्मणसमाजाला>>> आपल्या पोस्टचा आवाका या स्पेसिफिक मुद्द्यापेक्षा बराच मोठा आहे याची कल्पना आहे. पण हे मला पटत नाही. ज्ञान म्हणजे धार्मिक ज्ञान एवढ्याच मर्यादित अर्थाने ठीक आहे. पण तेव्हाही सुतारकाम, गवंडीकाम, कापड बनवणे, शेती संबंधित ज्ञान - जे समाजाला जास्त उपयोगाचे होते- ते त्या त्या जातीच्या/समाजाच्या लोकांनी स्वतःकडे पिढ्यानपिढ्या ठेवले होते ना? काही जाती तर अजूनही करतात. वैद्यक सुद्धा ब्राहमणांकडे होते तसेच अनेक वैदू ई होतेच जंगलातील वनस्पती ई चे ज्ञान असलेले. ब्रॉड लेव्हलला जातीनिहाय असलेले ज्ञान सर्वांना उपलब्ध झाले नाही हे मान्य. पण एकाच जातीच्या लोकांना उगाच धोपटण्यात काय अर्थ आहे. तरीही त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या बाबतीत तो मुद्दा मान्य आहेच.

ऋषिकेश Fri, 03/01/2014 - 10:23

In reply to by फारएण्ड

ब्राह्मणांकडे असणारे ज्ञान व इतर जातींमध्ये असणारे ज्ञान यात मुलभूत फरक आहे. त्याकाळची न्यायव्यवस्था, कायदे हे धर्माधिष्ठित असत. व ब्राह्मणांकडे धर्माचे ज्ञान असल्याने ते आपोआप 'लॉमेकर्स' होत. त्यांनी दिलेला शब्द, त्यांनी लावलेला धर्माचा अर्थ शेवटचा मानला जात असे.

इतर जातींकडेही ज्ञान होतेच पण त्यामुळे ते कायदे-नियम बनवण्यास पात्र होत नसत.

शहराजाद Fri, 03/01/2014 - 22:20

In reply to by ऋषिकेश

सर्व समाजाला नियमित करणारे कायदे आप म्हतल्याप्रमाए बहुतांशी वरिष्ठ जातीच्या ताब्यात असत. पण त्या त्या जातिसमाजाअंतर्गत लागू असणारे आचारनियम, कायदे, निवाडे, शिक्षा इ त्या त्या जातीतील पंचायतीसारख्या गटाच्या ताब्यात असत.

बॅटमॅन Fri, 03/01/2014 - 03:19

In reply to by अरविंद कोल्हटकर

पृथ्वीराज हा आपला tragic hero असू शकेल आणि त्याच्या शौर्याच्या गोष्टींवर सिनेमाहि काढता येईल पण आक्रमकांनी त्याला खतम केले हेच सत्य. त्याच्यानंतर 'अजून कोणी' नाही, तो एकटाच. त्याच्या वधानंतर ११व्या शतकाच्या अखेरीपासून वेगवेगळ्या मुस्लिम राज्यांनी जी एकदा हिंदुस्तानावर पकड बसवली ती १७व्या शतकाच्या अखेरीपर्यंत मजबूत होती आणि त्यानंतर १०० वर्षे नामधारी का होईना पण टिकून होती.

बळंच? पृथ्वीराज मेला इ.स.१२०० च्या आसपास. खिलजी वगैरेंचा दक्षिणेतला नंगानाच संपतो न संपतो तोवर विजयनगर उदयाला आलेच होते. बहामनी राज्याच्या भागांनी विजयनगर नष्ट केल्यावर मराठ्यांचा उदय झालाच. हा हिंदुस्थान म्हणजे उत्तर हिंदुस्थानच होय. पूर्ण हिंदुस्थान नव्हे.

मधल्या काळात इकडेतिकडे अन्य हिन्दु लहानमोठे सत्ताधीश होऊनहि गेले पण मुघल साम्राज्याची सर त्यांपैकी कोणालाच नव्हती आणि मुघल साम्राज्याचे तुल्यबल प्रतिस्पर्धी असे कोणाचेच इमेज नव्हते. शिवाजी आणि विजयानगरसारखे सन्मान्य अपवाद सोडले तर अन्य सारे मुस्लिम सत्ताधार्‍यांनी मोकळी ठेवलेली empty space धरून होते. ह्यालाच मी मुस्लिम आक्रमणापुढे मान टाकणे समजतो. ११व्या शतकापर्यंत जवळजवळ शून्य टक्के असलेली मुस्लिम संख्या १९४७ पर्यंत २५% येथवर पोहोचली होती हा काय हिंदु संस्कृतीचा विजय मानू कारण की उरलेले ७५% अजून हिंदूच राहिले होते? हाच इस्लामला केलेला 'कडवा विरोध' काय?

हा प्रतिवाद अतिशय फसवा अन चुकीचा आहे. नऊ शतकांमध्ये २५% झालेली लोकसंख्या उरलेल्या जगाशी तुलून पहा. अख्खा इराण मुसलमान व्हायला किती वर्षे गेली, तीच गोष्ट इजिप्तादि अन्य मुस्लिमबहुल राष्ट्रांची. अन्य जगाच्या तुलनेत भारत नऊ शतकांच्या संपर्कानेही पूर्ण मुसलमान झाला नाही-पूर्ण होणे राहोच, मेजॉरिटी मुसलमानही झाला नाही तर त्याला इस्लामपुढे "मान टाकणे" हा अकारण जजमेंटल शब्दप्रयोग किती सयुक्तिक आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.

अलेक्झँडरचे आक्रमण चंद्रगुप्ताने थोपविले असे म्हणण्यास काही आधार आहे काय? आपल्या इतिहासात तर त्याच्या नावाची नोंदच नाही. त्याच्याबाबतची आपली सर्व माहिती ग्रीक स्रोतांमधूनच येते. अलेक्झँडरला शूर भारतीयांनी 'सीमेवरून परत जा' असे बजावले असे म्हणण्याऐवजी आपल्या देशापासून फार दूर आल्यामुळे परतणे त्याने पसंत केले किंवा त्याच्या सैनिकांनी तसे करायला त्याला भाग पाडले हे अधिक सयुक्तिक वाटते. क्षत्रप, हूण इत्यादींनी हिंदुस्तानच्या अंतर्भागात स्वतःची राज्ये तयार केली.

वाटलंच :) अलेक्झांडर नाही मी सेल्युकसबद्दल बोलतोय. चंद्रगुप्ताने त्याचा पराभव केलाच ना? अलेक्झांडरबद्दल बोलायचं तर तो मॅसिडोनियापासून लै दूर आला होता आणि भारताइतका कडवा प्रतिकार पर्शियनांनी केला नव्हता हे सत्य आहेच. क्षत्रपादिंची राज्ये झाली खरी पण ती वेस्टर्न फ्रिंजवरती. हूणांच्या आक्रमणाला उत्तरप्रदेशातील मौखरी आणि यशोवर्मन नामक राजांनी परतवून लावलेच की. क्षत्रपांनाही खालून सातवाहनांचा चाप होताच.

हिंदुस्तानामध्ये ज्या भौतिक विद्या होत्या त्या दुर्लक्षामुळे मृत झाल्या ही वस्तुस्थिति नाही काय? असे दुर्लक्ष का झाले? तर ब्रह्म आणि अध्यात्मचर्चेपलीकडे काही ज्ञान असू शकते हे कोणालाच जाणवले नाही. अन्यथा लोहस्तंभ एकुलता एक न राहता त्यातून धातुशास्त्र ही ज्ञानशाखा निर्माण होऊ शकली असती. देवळे बांधणार्‍या आणि लेणी कोरणार्‍या स्थपतींच्या कौशल्यामधून अधिक लोकोपयोगी असे स्थापत्यशास्त्र निर्माण होऊ शकले असते. पण असे का झाले नाही? कारण ज्ञानाचा मक्ता स्वतःकडे ठेवलेल्या ब्राह्मणसमाजाला केवळ घटपटादि चर्चेतच ज्ञान दिसत होते. ७व्या शतकात आणि १७व्या शतकात भारतीय प्रजेच्या भौतिक जीवनात काहीच फरक पडला नाही हे अक्षरशः सत्य आहे. आपणास एकतरी भौतिक उपयुक्ततेची अशी चीज दिसते काय की जी ७व्या शतकात नव्हती पण १७व्या मध्ये होती? लोहस्तंभ बनवणार्‍या देशात शेतकर्‍यांना लोखंडाचे फाळ मिळण्यासाठी २०व्या शतकात लक्ष्मणराव किर्लोस्कर जन्मायची वाट पाहावी लागली. काय उपयोग झाला त्या लोहस्तंभ बनवण्याच्या कौशल्याचा?

ही मीमांसा सफै चूक नाही पण ज्या पद्धतीने मांडलीये त्यावरून गैरसमज होण्याची फार शक्यता आहे. एका काळातील विद्या पुढच्या काळात बर्‍याचदा जात नाहीत त्यामागे हे तथाकथित अनास्थेचे कारणच नसते. उदा. रॉक कट आर्किटेक्चर हे इस्लामपुर्व काळात जास्त फ्याशनेबल होते. इस्लामिक काळात आर्किटेक्चर बदलले, डिमांड बदलली सबब त्या पद्धतीने कुणी लेणी खोदेना. तथाकथित घटपटादि चर्चेबद्दलच्या आस्थेचा प्रश्न इथे येतच नाही. भौतिक उपयुक्ततेच्या चिजेबद्दल बोलायचे झाले तर जस्ताचे एक्स्ट्रॅक्शन १२व्या शतकात शोधले होते तो एक फरक आहेच. नीट शोधल्यास अजून डीटेल्स मिळतीलही.

आणि लोहस्तंभ व किर्लोस्कर वगैरे श्वानं युवानं मघवानमाह करावयाचेच असेल तर मीही विचारतो-काय उपयोग त्या ग्रीकोरोमन इतिहासाचा अन परंपरेचा, शेवटी कॉन्स्टँटिनोपल पडायची वाट पहायला लागली ना त्यांना? इतके शास्त्रविद होते तर रेनेसाँच्या आधी काय झोपा काढत होते का? मेटलर्जी अन आकड्यांचे ज्ञान अरबांकडूनच घेतले ना?

आज आपणास दिसते की शिवाजी आणि आइन्स्टाइनसारख्या व्यक्ति योग्य शिक्षण आणि संधि मिळाली तर समाजाच्या कोठल्याहि थरातून वर येऊ शकतात, समाजाच्या अमुक गटांचीच ही मक्तेदारी असते असे नाही. हिंदुस्तानातील जातिव्यवस्थेने असा कडेकोट बंदोबस्त केला होता की आपल्या समाजाच्या मानवी भांडवलापैकी ९९.५% भांडवल शिक्षण आणि संधि न मिळाल्यामुळे वाया जात होते आणि हे सत्य अनेक थपडा खाऊनहि हजारएक वर्षे कोणासहि दिसले नाही.

असा आंधळा समाज आज ना उद्या कोणाच्यातरी दावणीला बांधला जाणारच.

अस्थानी अभिनिवेशामुळे तुमचा योग्य मुद्दा तुम्हीच झाकोळला आहे. ९९.५% लोक वाया जात होते हे विधान "प्रत्येक मुसलमान कट्टरतावादी असतो" या वाक्याइतकेच निरर्थक आहे. जातीव्यवस्थेमुळे थिअरी आणि प्रॅक्टिकल यांचा संगम व्हावा तसा झाला नाही. प्रत्येकजण आपापल्या धंद्यात परम सीमा गाठत असे पण काँबिनेशन व्हायला पाहिजे होते ते झाले नाही. युरोपात रेनेसाँ काळात ते झाले म्हणून युरोप पुढे गेला.

भारत अनादिकाळापासून असा बांधलेला आहे इ. कारणमीमांसा इतकी सरसकट आहे की प्रतिवाद करायची इच्छाच होत नाही. ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले कारण तत्कालीन भारतात काही दोष होते हे मान्य आहे पण अनादिकाळापासून भारत जणू मालकाच्या शोधात असलेल्या गायीगत मुकी बिचारी कुणी हाका असा होता हे प्रतिपादन अन्य मनोरंजक सरसकट वाक्यांइतकेच मनोरंजक आणि हुकलेले आहे.

सुनील Fri, 03/01/2014 - 08:58

In reply to by बॅटमॅन

हा हिंदुस्थान म्हणजे उत्तर हिंदुस्थानच होय. पूर्ण हिंदुस्थान नव्हे.

मला वाटते, कोल्हटकर आणि बॅटमन यांच्या हिंदुस्थान ह्या शब्दाच्या व्याप्तीतच फरक आहे. अन्यथा त्यांचे प्रतिसाद आपापल्या जागी योग्यच आहेत.

किंचित अवांतर वाटेल तरीही लिहायचा मोह टाळता येत नाही -

उत्तर आणि दक्षिण हिंदुस्थानची एकूणच प्रकृती भिन्न आहे. सुपीक, मैदानी प्रदेशात "सुशेगाद" जीवन व्यतीत करणार्‍या उत्तरीयांना स्वतःहून कुठे जाऊन आक्रमण करावे असे वाटतच नसावे. त्यामुळे वाट वाकडी करून आलेल्या परकीय शक्तींना शक्य तेवढे परतवून लावायचे नाहीतर आपल्यात सामावून घ्यायचे, हेच शेकडो वर्षे चालले.

याउलट दक्षिणी मंडळी आग्नेय अशियात दूरवर पोचली. राज्ये स्थापली. आपल्या संस्कृतीचा प्रसार केला.

बहुधा, उत्तरेतील मंडळींना दक्षिणींच्या ह्या धाडसी वृत्तीची भिती वाटत असावी. म्हणूनच त्यांनी समुद्रबंदीची टूम काढली असावी!

नाहीतरी उत्तरेत समुद्र नाहीच!! तेव्हा ह्या बंदीमुळे त्यांचे (वा त्यांच्या बापाचे) काही जात नव्हते. दक्षिणींचे मात्र पंख छाटले गेले!

मन Fri, 03/01/2014 - 09:20

In reply to by सुनील

दक्षिण नक्की कुठे सुरु होते? नर्मदेखालील धुळे-नंदुरबार वा नागपूर्-यवतमाळ दक्खन मध्ये येतात का?
की गोदामाईपसून खाली दक्षिणेत जे असेल ते दख्खन मध्ये येते?

बॅटमॅन Fri, 03/01/2014 - 17:23

समस्त ऐसीकरांची एका चुकीकरता माफी मागतो. कोरेगावच्या लढाईचे वर्णन करणारा लेख प्राची देशपांडे यांनी लिहिला आहे असे मी म्हणालो होतो पण त्याच्या लेखिका श्रद्धा कुंभोजकर या आहेत. स्मरणात गफलत झाली.

लेखाची लिंक.

लेख मला लौकरच उपलब्ध होईल. लै दिवसांपूर्वी वाचलेला.

अपडेटः

इथे लेख मिळेल. न मिळाल्यास फ्री अकौंट काढून पाहता येईल.

अजो१२३ Sat, 04/01/2014 - 16:16

इथे बॅटमॅनने दिलेल्या लढाईबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन. आत्मग्लानी आलेले लोक वेचक इतिहास पाहतात. आपल्या इतिहासाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.

आमची एक स्पॅनिश मड्डम भारतीय म्हटले कि काही बाही कुशंका काढायची. तिला म्हटले २०० वर्षे तुमचा स्पेन अरबांखाली होता आणि १००% मुस्लिम होता. इतकेच काय १९७६ मधे मी जन्मलो तेव्हा तुमच्याकडे लोकशाहीपण नव्हती. मी म्हणतो त्यात आवेश आहे हे मान्य पण भारतीय हिंदूंनी इफेक्टीव सत्ता आपल्याच हातात ठेवली.

आणि दलित सेनापती / राजे देखिल आपल्याकडे होते. पण एकांगीपणे पाहायचे असेल तर ते दिसणार नाही.

ॲमी Fri, 05/01/2018 - 08:13

धागा वर काढत आहे.

===
वढू गावातील गणपत महारच्या समाधीवरून जो वाद चालू झाला आणि चिघळला त्याच्या इतिहासबद्दल थोडक्यात कोणी लिहू शकेल का? काय खरे आहे काय खोटे...

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 06/01/2018 - 01:07

प्रा. सुहास पळशीकर यांनी या हिंसाचाराच्या निमित्तानं लिहिलेला लेख -
भीमा कोरेगाव : दलित, मराठा, ब्राह्मण जातीच्या चिरफळ्या आपण कधी समजून घेणार?