दिवाळी अंकांचा लेखाजोखा
२०११ सालची दिवाळी आली आणि गेली. दिवाळीशी संबंधित उत्सवाइतकंच तिच्या सांस्कृतिक संदर्भाचंही महत्व वेगळं सांगायला नको. फटाके, कपडेलत्ते, फराळ, स्नेहसंमेलनं यांच्या जोडीने रांगोळी , संगीताच्या मैफली आणि अर्थातच दिवाळी अंक हे येणारच. प्रस्तुत लेखात यंदाच्या दिवाळी अंकांबद्दल जी मतेमतांतरे बनत आहेत त्याबद्दल बोलावे असे वाटले म्हणून हा लिखाणाचा प्रपंच.
मराठी आंतरजालावरही दिवाळी अंकांची परंपरा चांगलीच जोम धरते आहे. बहुतेक सर्व सुप्रसिद्ध मराठी स्थळांचे दिवाळी अंक प्रसिद्ध झालेले आहेत. प्रस्तुत लेखात मात्र, अनेक दशकांची परंपरा असलेल्या छापील मराठी दिवाळी अंकांबद्दल थोडं बोलेन म्हणतो.
दिवाळी उलटून पंधरा-वीस दिवस झाले तरी पोस्टाने मागवलेले अंक पोचायचं चिन्ह नव्हतं. शेवटी एकदाचे पोचले. आल्याआल्या सर्वच्या सर्व अंक एकामागोमाग एक चाळले. मुखपृष्ठ, आतील मजकूराचं स्वरूप , त्याची छपाई , सजावट , आणि मुख्य म्हणजे एकेका अंकाचा सूरताल समजून घेण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात , एखादं गुर जसं समोर ठेवलेल्या गवताच्या अनेक भार्यांना सुरवातीला चिवडतं आणि मग एकेका भार्यातल्या "माला"ला तोंडात भरून नंतर सावकाश रवंथ करतं त्यातला प्रकार.
अजून सर्वच्या सर्व दिवाळी अंक अथ पासून इतिपर्यंत वाचून व्हायचे आहेत. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला अनेक आठवडे जावे लागतील. मात्र आतापावेतो काही "फर्स्ट इम्प्रेशन्स" झालेली आहेत. अनेक ठिकाणी निव्वळ चाळायला सुरवात झाली आणि एखादं लिखाण पूर्ण वाचल्याशिवाय थांबता आलं नाही. समग्र वाचन झाल्यानंतर कदाचित संपूर्णत्वाचं कलम भागेल, परंतु , ताज्या ताज्या लिखाणातली मजा जाईल. म्हणून हा लेखाजोखा आताच मांडावा असं वाटलं.
असो. माझ्याकडे खालील अंक आलेले आहेत :
मुक्तशब्द, मौज , अक्षर, प्रहार , चिन्ह , इत्यादि, संपूर्ण अनुवाद , लोकमत-दीपोत्सव , मटा, लोकसत्ता, साप्ताहिक सकाळ , कालनिर्णय , लोकप्रभा, पद्मगंधा , साधना.
काही निरीक्षणं/मतं मांडतो. विरोधी मतं , अधिक, वेगळी माहिती या सर्वांचं अर्थातच स्वागत आहे.
अजून खरं म्हणजे असं विधान एकदम करणं धाडसाचं होईल , पण "मुक्तशब्द"च्या प्रेमात मी सध्या आहे आणि मला हा अंक सर्वात अधिक आवडलेला आहे. प्रस्तुत वार्षिक प्रकाशन माझ्या माहितीप्रमाणे गेली पाचेक वर्षेच प्रसिद्ध होतं आहे. या पाच वर्षांत या प्रकाशनाने जमा केलेले लोक , त्यांनी केलेलं लिखाण , त्याची गुणवत्ता , या सार्याबद्दल मला अत्यंत आदर वाटतो. मुंबईचे श्री येशू पाटील या अंकाचे सर्वेसर्वा आहेत (संपादकपदीही तेच आहेत. ) सुरवातीला मेघना पेठेंनी यांचं संपादकत्व निभावलं होतं. त्यानंतर मुकुंद कुळे यांनी. आता श्री पाटीलच संपादकाच्या पदावर दिसतात. दर वर्षी कुठलं ना कुठलं "फीचर" हा अंक करतो. गेल्या वर्षी ( की दोन वर्षांमागे ) "प्रत्येक क्षेत्रातले खलनायक" असा विषय होता. त्यावेळी उद्योगक्षेत्रातल्या मुकेश अंबानी पासून ते साहित्यातल्या भालचंद्र नेमाडे यांच्या पर्यंतच्या अनेकांच्या कारकिर्दीवर कठोर प्रहार करणारं लिखाण आलेलं होतं. यंदाची "थीम" होती "विचारतुला" , अर्थात, विचारांची तुलना. विविध क्षेत्रांमधले दोन मान्यवर घेऊन त्यांच्यावर लिहिण्याचा उपक्रम. या फीचरमधल्या लेखाची यादीच देतो म्हणजे त्याच्या वैविद्ध्याची कल्पना येऊ शकेल.
"श्रीकृष्ण/जरासंध" - रविंद्र गोडबोले
"ज्ञानेश्वर/चक्रधर" - मुकुंद कुळे
"न्यूटन/लिब्नीझ" - अच्युत गोडबोले
"नेहरू/आंबेडकर " - नामदेव ढसाळ
"पलुस्कर/भातखंडे" - श्रुति सडोलीकर
"भीमसेन/कुमार" - मुकुंद संगोराम
"सॉमरसेट मॉम /गी द मोपासा" रेणु गावस्कर
"इरावती कर्वे/दुर्गा भागवत" - ज्ञानदा देशपांडे
"भालचंद्र नेमाडे/विलास सारंग" - नितीन रिंढे
"जयवंत दळवी/पु ल देशपांडे" - मुकुंद टाकसाळे
"नामदेव ढसाळ/राजा ढाले" - राहुल कोसंबी
"कुमार केतकर/ अरुण टिकेकर" - मुकुंद टाकसाळे
"अंतोनिओनी/बर्गमन" निखिलेश चित्रे
"ग्रेस/महानोर" रणधीर शिंदे
"विजया मेहता/सत्यदेव दुबे" - शफाअत खान
"धीरुभाई अंबानी/नारायण मूर्ती" - नितीन पोतदार
"नसीर/ओम पुरी" - श्रीकांत बोजेवार
"पतौडी/सौरभ गांगुली" - द्वारकानाथ संझगिरी
याखेरीज मुक्तशब्द हा अंक मला विशेष आवडण्याचं कारण म्हणजे रमेश इंगळे उत्रादकरांसारख्यांच्या कविता, जीके ऐनापुरे , कृष्णात खोत यांच्या सारख्यांच्या कथा, यांचा परिचय या अंकामुळे मला झाला. यंदासुद्धा ही परंपरा चालू आहेच. त्याशिवाय अनुवादित कथांचा वेगळा विभागही यंदा आहे. या सर्वांच्या दर्जाबद्दल दुमत होणे शक्य आहे परंतु हा सर्व , साहित्याच्या क्षेत्रातल्या नव्या लोकांमधल्या उत्तम लोकांपर्यंत पोचण्याचा , त्यांच्या कडून लिहवून घेण्याचा एका गंभीर पातळीवरचा प्रयत्न आहे या बद्दल माझ्या मनात शंका नाही.
वादग्रस्त होण्याचा धोका स्वीकारून मला हे विधान करावेसे वाटते की, प्रस्तुत घटकेला या अंकाकडे वैचारिक नेतृत्व आल्यासारखे वाटते आहे. पन्नाशीच्या दशकात सत्यकथा आणि मौज प्रकाशनाने ज्या प्रकारे नवीन लोकांना एकत्र आणून नवं घडवण्याचा प्रयत्न केला त्या जातीचं काम चालू आहे असं मला वाटतं. असो.
इतर काही अंकांकडे वळतो. "चिन्ह" या , चित्रकलेला - खरे सांगायचे तर फाईन आर्टस् असं म्हणायला हवं - वाहिलेल्या प्रकाशनाचा बरेच महिने गाजत असलेला अंक या दिवाळीला प्रसिद्ध झालेला आहे. दृष्यकलेमधल्या विचारांना मराठीतून वाव मिळावा, नामवंत लोकांचं काम आणि त्यांचे विचार मराठीतून मांडले जावेत म्हणून श्री. सतीश नाईक हा अंक गेलं दशकभर (की अधिक ?) काढत आहेत. हे प्रकाशन वार्षिक आहे आणि त्यांचा प्रत्येक अंक संग्राह्य असतो. प्रभाकर कोलते , सूझा , आरा , गायतोंडे अशा आंतराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांच्या कामाची ओळख , प्रसंगी प्रदीर्घ मुलाखती आणि प्रत्येक वार्षिक अंकात भरगच्च आर्टप्लेट्स. पाश्चात्य देशात आणि भारतातल्या इंग्रजी माध्यमामधे जो प्रकार मोठ्या प्रमाणावर होतो त्या दर्जाचं काम मराठीतून होणं , ते आपल्याला पहायला मिळ्णं ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे असं मानतो. "चिन्ह"चा यंदाचा अंक नग्नतेबद्दल आहे आणि या प्रकाराची परंपरा , या प्रकाराचे भारतीय संदर्भ, त्या प्रकाराला जोडून आलेली वादग्रस्तता, हुसैन सारख्यांचा अपरिहार्यपणे येणारा विषय , भारतीय चित्रकारांनी या क्षेत्रांत पूर्वी आणि आता केलेले काम , त्यातल्या नैतिक/सामाजिक/राजकीय गुंतागुंती या सार्यांचा उत्तम आर्टप्लेट्स सकट दिलेला एक श्रीमत् अनुभव म्हणजे चिन्ह. चिन्ह बद्दल - किंबहुना मी उल्लेख करत असलेल्या प्रकाशनांपैकी अनेकांबद्दल - स्वतंत्र लेख लिहिणे योग्य होईल. ते जमेल न जमेल म्हणून सध्या इतपत माहिती देतो आहे.
धन्यवाद
मुक्तशब्द वाचायला हवा!
चिन्ह विकत घेण्यासारखा आहे का? (लायब्ररीत केव्हाचा नंबर लावलाय )
बाकी अजुनपर्यंत लोकसत्तातील काहि लेख आवडले. बाकी इतर बरेच अंक एखाद दुसरा लेख सोडल्यास यथातथाच वाटले. अर्थात प्रत्येक पानावर जाहिराती ही अपरिहार्यता असेलही त्यामुळे अजून दर्जाहीन होत चाललेले अंक विकत घेऊन आर्थिक पाठबळ द्यावसं वाटत नाही.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
प्रतिसाद
अर्थात प्रत्येक पानावर जाहिराती ही अपरिहार्यता असेलही त्यामुळे अजून दर्जाहीन होत चाललेले अंक विकत घेऊन आर्थिक पाठबळ द्यावसं वाटत नाही.
दिवाळी अंकांना "आर्थिक पाठबळा"ची आवश्यकता तितकीच आहे जितकी एकंदर ग्रंथव्यवहाराला आहे. त्यामुळे, दिवाळी अंकांवर पैसे खर्च करावेत का ? कितपत करावेत ? त्याच्याऐवजी इतर ग्रंथांवर करावेत का ? हा ज्याचा त्याचा प्रश्न ठरतो.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
२०१२ दिवाळी ???????? कि २०११
२०१२ दिवाळी ???????? कि २०११ दिवाळी.
सॉरी
चूक झाली. सुधारणा करत आहे. धन्यवाद.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
आभारी आहे.धन्यवाद. मला वाट्ले
आभारी आहे.धन्यवाद.
मला वाट्ले की २०१२ च्या अन्काचे मानस जाहीर करत आहात.
मुक्तशब्द वाचला,
मुक्तशब्द वाचला, आवडला.
तुम्ही वर दिलेले फिचर खरच उत्तम आहे.
अद्याप पुष्कळसे दिवाळीअंक
अद्याप पुष्कळसे दिवाळीअंक वाचून झाले असे जरी म्हणता येत नसले तरी अक्षर-मुक्तशब्द वाचलेत, जत्रा आणि माहेर वरवर चाळले आहेत. या सगळ्यांत मुसु म्हणतात तसे मुक्तशब्द अर्थातच अधिक चांगला आहे. कारणे अर्थातच विचारतुला आणि अनुवादित कथा विभाग. कवितेतले काही कळत नाही त्यामुळे त्या वाटेस अद्याप गेलेच नाहीय. अक्षरही ठीकठाक आहे. (कथा तितक्याशा आवडल्या नाहीत) नंदा खरेंची मुलाखत हा प्लस पॉईंट ठरावा.
माहेरमध्ये ओळखीचे नांव म्हणून नीरजाची कथा वाचली.काहीशी आधुनिकोत्तर आहे.
-मस्त कलंदर
उदरभरण नोहे
शंका
माहेरमध्ये ओळखीचे नांव म्हणून नीरजाची कथा वाचली.काहीशी आधुनिकोत्तर आहे. Smile
"ओळखीचे नाव" म्हणून ज्या "नीरजा" तुमच्या मनात आहेत (असं मला वाटतं आहे !) त्या "नीधप" यांचीच ती कथा नक्की आहे ना ? कारण केवळ "नीरजा" या नावाने लिहिणार्या (आणि कथालेखनात ज्यांचं मोठं नाव झालेलं आहे ) त्या लेखिका म्हणजे "नीधप" नव्हेत हे मला अगदी नक्की ठाऊक आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
आवडता चर्चा विषय!
मुसु, मुक्तशब्दाची ओळख करून दिल्याबद्दल आभार. मी यंदा अक्षर, मौज, आणि (महा)अनुभव मागवले, पण मुक्तशब्द मिळते का बघायलाच हवे. (अवांतर: या तारखे नंतर या अंकाची विक्री कितीपटाने वाढली हे शोधायला मजा येईल!) प्रस्तुत फीचर मध्ये काही तुलना अपेक्षित आहेत, पण काही ( कर्वे/भागवत; मेहता/दुबे; नेमाडे/सारंग) उत्सुक्ता वाढवण्यार्या आहेत. तुला (न) आवडलेल्या तुलनांबद्दलही विस्तृत लिही ना.
अक्षर चा अंक मला फार आवडला. दीर्घ, उगीच घाई न करणारे लेख वाचून फार बरे वाटले. उपक्रम वरच्या घाग्यात म्हटले होते की खूप दिवसांनंतर न्यू यॉर्कर मधल्या लांब लेखांची आठवण झाली. त्यात "मटा" वरचा प्रकाश अकोलकरांचा लेख मस्त आहे. व्यक्ति-केंद्रित विश्लेषणातून वर्तमानपत्राच्या विश्वाचा सामाजिक-सांस्कृतिक आढावा नीट जमले आहे. जवळून परिचित असलेल्या वक्तींबद्दल तटस्थ, प्रांजळपणे कसे लिहावे याचाही हा लेख उत्तम उदाहरण आहे. "साहित्यिक संस्थानं" हा सुनील कर्णिकांचा लेखही रोचक आहे - "मराठी प्रकाशन जगत इतके आजारी का आहे?" हे कर्णिक विचारतात, आणि उत्तर लेखक, मासिक, प्रकाशन गृह, ग्रंथालय, वर्तमानपत्र, पुस्तकविक्रेते आणि साहित्य-संमेलन ही सर्व घटक कुठे कमी पडतात हे सांगत जातात. सुरुवात चांगली करूनही शेवटी क्षुद्रपणात सुख मानतात असे त्यांचे विवेचन आहे. प्रकाशन विश्वाची माहिती, आणि मूळ मुद्दा चांगाला आहे, पण नेमाडेंच्या मिशांना वगैरे उगीच का मधे खेचले आहे हे कळले नाही.
(परत अवांतर - खलनायक असूनही प्रत्येक अंकात नेमाडेंवर लेख असणे हे कम्पल्सरी आहे का? माझी त्याला तक्रार नाही, पण फक्त संशोधनाचा प्रश्न म्हणून...)
सुहास पळशीकरांचा अक्षरातला बंगाल मधल्या अलिकडच्या राजकीय 'परिवर्तना' चा परामर्श आधी मला ठीक-ठीकच वाटला. पण मौज च्या अंकात हेमंत देसाईंचा त्याच विषयावरचा लेख वाचून पळशीकरांचा किती चांगला आहे हे जाणवले. देसाईंच्या लेखाचा सूर एखाद्या उजव्या गटाच्या शिबिरात दिलेल्या "आत्ता कसे फसले हे डावे!" व्याख्यानासारखा आहे, अगदी पदोपदी उद्गारचिन्हांसहित! पण त्याच अंकात वसंत आबाजी डहाकेंचा कविता-समीक्षा वरचा लेख खूप आवडला, खूप काही शिकायला मिळाले.
अक्षर मध्ये नंदा खरे यांची मुलाखत आवडली, आणि खर्यांचे छायाचित्रही आवडले. त्यांच्या वाचनप्रवाहाची चर्चा, विचार्विश्वाची मांडणी वाचून "मी ओरिजिनल काहीच लिहीले नाही" हे अजिबात पटले नाही.
अनुभव चा अंक अजून वाचायला घेतला नाही. त्यातही पळशीकरांचा अण्णा हजारेंवर लेख आहे तो वाचायची इच्छा आहे.
प्रतिसाद
सर्वप्रथम , दीर्घ प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
तुला (न) आवडलेल्या तुलनांबद्दलही विस्तृत लिही ना.
प्रत्येक अंकातल्या आवडलेल्या/नावडलेल्या गोष्टींबद्दलही लिहायचे आहे. सध्या वेळ मिळेल तशी एक "जनरल राऊंड" करावी आणि मग सावकाश एकेका अंकातल्या हाय/लो प्वॉईंट्स चा मागोवा घ्यावा म्हणतो.
अक्षर चा अंक मला फार आवडला. दीर्घ, उगीच घाई न करणारे लेख वाचून फार बरे वाटले. उपक्रम वरच्या घाग्यात म्हटले होते की खूप दिवसांनंतर न्यू यॉर्कर मधल्या लांब लेखांची आठवण झाली. त्यात "मटा" वरचा प्रकाश अकोलकरांचा लेख मस्त आहे. व्यक्ति-केंद्रित विश्लेषणातून वर्तमानपत्राच्या विश्वाचा सामाजिक-सांस्कृतिक आढावा नीट जमले आहे. जवळून परिचित असलेल्या वक्तींबद्दल तटस्थ, प्रांजळपणे कसे लिहावे याचाही हा लेख उत्तम उदाहरण आहे. "साहित्यिक संस्थानं" हा सुनील कर्णिकांचा लेखही रोचक आहे - "मराठी प्रकाशन जगत इतके आजारी का आहे?" हे कर्णिक विचारतात, आणि उत्तर लेखक, मासिक, प्रकाशन गृह, ग्रंथालय, वर्तमानपत्र, पुस्तकविक्रेते आणि साहित्य-संमेलन ही सर्व घटक कुठे कमी पडतात हे सांगत जातात. सुरुवात चांगली करूनही शेवटी क्षुद्रपणात सुख मानतात असे त्यांचे विवेचन आहे. प्रकाशन विश्वाची माहिती, आणि मूळ मुद्दा चांगाला आहे, पण नेमाडेंच्या मिशांना वगैरे उगीच का मधे खेचले आहे हे कळले नाही.
अक्ष्रर चा अंक नेहमीप्रमाणेच लक्षणीय झालेला आहे. अक्षरच्या अंकाची प्रकृती, त्याचा पोत, त्याची एकंदर समाजाभिमुख दृष्टी या सार्याचं श्रेय या अंकाचे संस्थापक श्री. निखिल वागळे यांना दिल्यावाचून पर्याय नाही. वागळे आता अनेक वर्षे अक्षरपासून दूर गेलेले असले तरी, त्यांची छाया या अंकावर जाणवते. १९८५ सालाच्या सुमारापासून ज्या रीतीने समाजातल्या विविध विषयांवर, प्रश्नांवर , अद्ययावत माहिती आणि त्याची सांगोपांग चर्चा करण्याची परंपरा आजही दिसते आहे. ही देणगी नि:संशय वागळ्यांची. ज्या सुनील कर्णीकांचा उल्लेख आलेला आहे ते आणि त्यांच्यासारखे लोक ८० च्या दशकापासून या परिवाराशी संलग्न असलेले लोक आहेत. "मटा" वरचा अकोलकरांचा लेख वाचनीय आहेच. बाय द वे , मटाचा दिवाळी अंक हा "मटा"च्या सद्यस्थितीमधल्या वैचारिक संपत्तीच्या गंभीरस्वरूपी अभावाचा ठसठशीत निदर्शक आहे असं मानायला हरकत नाही. ८० टक्के मजकूर गेल्या ४० वर्षांतल्या निवडक लेखांना रिसायकल करून भरला. राहिलेल्या अंकात टिव्ही सिरियल्स च्या भडक जाहिरातींचं फीचरवजा लिखाण. इतकंच नव्हे तर मुखपृष्ठावरील तीन सुंदर्यांचा फोटोही त्या सिरीयलमधला. (याचा अर्थ मुखपृष्ठसुद्धा स्पॉन्सर्ड आहे !) "लोकसत्ता"ने गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात महाराष्ट्राच्या आजवरच्या मुख्यमंत्र्यांवर (स्तुतीपर !!) लेख देऊन अंक भरून टाकला होता. यंदा ती पाळी त्यांच्यावर आलेली नाही. यंदा दिवाळखोरीची खेप मटाची दिसते.
(परत अवांतर - खलनायक असूनही प्रत्येक अंकात नेमाडेंवर लेख असणे हे कम्पल्सरी आहे का? माझी त्याला तक्रार नाही, पण फक्त संशोधनाचा प्रश्न म्हणून...)
"मुक्तशब्द" च्या २०१० (की २००९ ?) मधल्या दिवाळी अंकात विलास सारंग यांनी नेमाड्यांवर "खलनायक" कल्पून लेख दिला होता. यंदाच्या दिवाळी अंकात जो "तुलनात्मक" लेख आहे तोच "सारंग आणि नेमाडे" अशी तुलना आहे. त्याबद्दल विस्ताराने लिहिणार आहे !
अक्षर मध्ये नंदा खरे यांची मुलाखत आवडली, आणि खर्यांचे छायाचित्रही आवडले. त्यांच्या वाचनप्रवाहाची चर्चा, विचार्विश्वाची मांडणी वाचून "मी ओरिजिनल काहीच लिहीले नाही" हे अजिबात पटले नाही.
नंदा खरेंच्या मुलाखतीबद्दल प्रचंड सहमत
अनुभव चा अंक अजून वाचायला घेतला नाही. त्यातही पळशीकरांचा अण्णा हजारेंवर लेख आहे तो वाचायची इच्छा आहे.
अनुभव चा दिवाळी अंक ऑनलाईन येतो एखाद्या महिन्यात
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
मुक्तशब्द आणि चिन्ह
"मुक्तशब्द" बद्दल कुठेच आणि काहीच कसे वाचले नाही याची आता खंत वाटते असे म्हणतो. एरव्ही ही बाब लक्षातही आली नसती, मात्र 'मुक्तसुनीत' यांचा लेख वाचताना मात्र निश्चित काहीतरी चांगले वाचन हुकले याची जाणीव होत आहे. अंक मात्र नक्की उपलब्ध करून घेईन हे नक्की. अंकातील (या लेखात दिलेली) केवळ शीर्षके वाचूनच अंकाचा दर्जा सुखद धक्का देणारा वाटतो. [विशेषतः श्रुती काटकरांच्या 'पलुस्कर्/भातखंडे" लेखाबद्दल फार औत्स्युक्य आहे.]
'चिन्ह' च्या टीमला सलाम (त्यातही अर्थात श्री.सतीश नाईक यांच्या अथक परिश्रमास) करावा अशीच त्या अंकाची परंपरा आहे. उद्वगाने 'चिन्ह' बंद करण्याची वेळ श्री.नाईक यांच्यावर आली असतानाही नफ्याचा विचार न करता केवळ 'कला' या एकाच विषयाला केन्द्रस्थानी ठेवून प्रत्येक वर्षी अत्यंत दर्जेदार (वेळप्रसंगी अप्रिय वाद झेलूनही) 'चिन्ह' चे प्रकाशन अखंड राहिले आहे, याचे सारे श्रेय श्री.सतीश नाईक यानाच जाते. ['चिन्ह साठवण' बांधीव अंकात श्री.नाईक यांचे प्रकाशनातील कटू अनुभव जरूर वाचावेत अशी या निमित्ताने श्री.मुक्तसुनीत याना मुद्दाम शिफारस करत आहे. "अक्षरधारा" च्या पुस्तक प्रदर्शनात हा अंक मिळतो.]
अशोक पाटील
प्रतिसाद
तुमच्या रेकमेंडेशन बद्दल अत्यंत आभारी आहे. "चिन्ह"चा बांधीव अंक लिस्ट मधे टाकलेला आहे.
अवांतर : असाच दुसरा बांधीव अंक जो ऑर्डर करून माझ्यापर्यंत महिन्याभरात पोचेल तो म्हणजे "आजचा सुधारक" चा.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
मुक्तशब्द वाचायला हवा.
आत्तापर्यंत मी किस्रीम, मटा (महाराष्ट्र टाईम्स), आणि अंतर्नाद हे अंक वाचले. सगळेच मला आवडले. त्यात किस्रीममधले काहीच लेख मी वाचले. मटा मध्ये पूर्वी प्रसिद्ध झालेले लेख ( अगदी १९६९ पासूनचे सुद्धा ) छापलेले आहेत. त्यात कृष्णाबाई मोटेंचा लेख आणि "अंतुलेसाब तुम्हारा चुक्याच" हा पु. ल. देशपांडेंचा असे दोन त्या त्या काळी गाजलेले लेख आहेत.
मला विशेषकरुन अंतर्नादचा दिवाळी अंक आवडला. त्यातल्या विशेष विभागात " मराठीपण जपणे म्हणजे नेमके काय ?" ह्यावर उहापोह करणारे जवळपास दहा लेख आहेत. त्यात डॉ. निलिमा गुंडी, विनय सहस्रबुध्दे, ज्ञानेश्वर मुळे, वसुंधरा पेंडसेनाईक, आणि अन्य काही लेखकांचे लेख आहेत. बाकी इतर लेखही बरेच आहेत. त्यात अनिल अवचटांचा प्रसिद्ध लेखिका कमल देसाईंवरचा लेख आहे.
अनुभवचा अंक मी विकत घेतला आहे, पण अजून वाचायचा आहे. चाळला आहे नुस्ता. मात्र त्यातल्या ग्रेसच्या कविता वाचल्या.
काही इतर गोष्टी
२०११ चे दिवाळी अंक वाचताना , एकंदरीत अलिकडच्या वर्षांमधल्या दिवाळी अंकांच्या ट्रेंड्स बद्दल विचार करताना काही गोष्टी जाणवल्या.
अ. ललित वाङ्मयाचा घसरलेला टक्का : एकंदरीत सर्व सुप्रतिष्ठित अंकांवर नजर टाकली असतां हे सहजच कळतं की नॉन-फिक्शन ने ६०, ७०, ८० टक्के - आणि "साधना"सारख्यांच्या संदर्भात बोलायचे तर १०० टक्केसुद्धा - मजकूर व्यापलेला आहे. यातून अनेक शक्यता नोंदवता येतील.
१. दर्जेदार ललितलिखाणाचा अभाव
२. ललित लिखाणाला अलिकडच्या काळात सातत्याने सोसावी लागलेली घसरत्या लोकप्रियतेची झळ
३. एकंदरीतच , माहिती, ज्ञान , इत्यादि गोष्टींचे ललितकृतींवर झालेले वर्चस्व.
या सर्वांबाबत मला एकट्याला निश्चित मतप्रदर्शन करता येईलच असे नाही. पण "द रायटिंग इज ऑन द वॉल" हे खरं.
ब. छापील माध्यमांनी ऑनलाईन मराठी लिखाणाची अतिशय स्पष्टपणे घेतलेली दखल : छापील आणि ऑनलाईन प्रकाशनांमधल्या लोकांचा एकमेकांच्या सदर्भातला सवतासुभा नवा नाही. छापीलवाले ऑनलाईन वाल्यांकडे गांभीर्याने पाहात नाहीत आणि ऑनलाईनवाल्यांना छापीलवाले सरंजामशाही सारखे , उच्चभ्रू , रटाळ , एकदिशीय वाटतात. यंदा मात्र प्रहार , अक्षर यांच्या सारख्यांनी ऑनलाईन माध्यमाची दखल निश्चित घेतलेली आहे. रामदास आणि चिंतातुर जंतू यांचे ऑनलाईन माध्यमातल्या मराठी लिखाणासंबंधातले लेख प्रहार ने छापलेले आहेत. अक्षरने सुद्धा एक संपूर्ण विभाग या बाबत दिलेला आहे. या लिखाणांमधून ऑनलाईन माध्यमातल्या लोकांच्या शक्तीस्थानांची , या माध्यमाच्या भविष्यकालीन अधिकाधिक मोठ्या सहभागाची नोंद घेतलेली तर आहेच. अभिजित ताम्हाणेंसारख्या ज्येष्ठ पत्रकाराने "अधिक गुणी मराठी ब्लॉग असावेत, अधिकाधिक प्रगल्भ लोकांनी मराठी ब्लॉग लिहावेत अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे". विश्राम गुप्तेंनी आपल्या एका लेखात "ब्लॉगलिखाण म्हणजे निव्वळ बडबड" अशी टिप्पणीही केल्याचं दिसतं आहे. थोडक्यात अजून अढी पूर्ण संपलेली नाही. अनेक दिवाळी अंकांमधल्या लेखाच्या अखेरीस लेखकाचा इमेल पत्ता दिला गेलेला आहे. (एका दिवाळी अंकात फक्त इमेल पत्ताच दिला आहे. बाकी डिटेल्स नाहीतच. )
क. कलेची गुणवत्ता आणि मार्केटेबिलिटीचा घातला गेलेला मेळ : या संदर्भात वेगवेगळ्या दिवाळी अंकांनी वेगवेगळे मार्ग चोखाळलेत असं म्हणायला हवं. साधनाचा गेल्या वर्षीचा दिवाळी अंक अर्थातच वाचनीय होता. परंतु इतरांपेक्षा बराच जाड असलेल्या या अंकात जाहिराती बेसुमार होत्या. यंदा या अंकाचा साईज जरा नॉर्मल आहे. पण तरी जाहिरातींचा टक्का मोठाच दिसतो. महाराष्ट्र टाईम्स ने वर म्हण्टल्याप्रमाणे , मुखपृष्ठसुद्धा स्पॉन्सर केल्यासारखे दिलेले आहे (त्यात सिरियलचं बॅनर नाही इतकंच ). मार्केटिबिलिटीचा मुद्दा केवळ जाहिरातीपुरता मर्यादित नाही, हा मुद्दा "लोकमत"च्या दिवाळी अंकातून उत्तम रीतीने देता येईल. या अंकाचे अतिथिपद शोभा डेंकडे आहे. त्याच्या मुखपृष्टावर डे बाईंबरोबर अमिताभ बच्चन, करीना कपूर , नीता अंबानी (!) यांच्या सारख्यांच्या नावाची जंत्रीच आहे. संपूर्ण दिवाळी अंक महागड्या ग्लॉसी पेपरवर छापला गेलेला आहे. अर्थात आतमधे उपरोल्लेखित चमकदमकत्या नावांखेरीज रामचंद्र गुहा यांच्या सारख्यांचेही (प्रसंगी अनुवादित) लेख देऊन बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आपल्या या साईट वरील "मेघना" या सदस्येचा या अंकात प्रदीर्घ लेख आहे आणि एक स्वतंत्र लेख म्हणून तो या अंकातला सर्वात चांगला ठरावा. शोभा डें नी केवळ "मी माहेरला आलेले आहे" अशा स्वरूपाचे मांगल्यवाचक गोऽड टिपण लिहिले आहे इतकाच त्यांचा सहभाग. बाकी बच्चन, अंबानी, कपूर यांचा संपर्क साधून देणे इतकंच काम केलेलं दिसतं. बच्चन , अंबानी , कपूर यांचे "लेख" अर्थातच भाषांतरित तर आहेतच पण ते मूळ लेख सुद्धा त्यांनी "लिहिलेले" नाहीत, शब्दबद्ध केलेले आहेत. या अंकाच्या दहा दहा हजाराच्या चार एडीशन्स खपल्या आहेत असं मला कळलं. किंमत केवळा शंभर रुपये - जी अर्थातच पेपर क्वालिटी लक्षांत घेता अत्यंत कमी आहे. याचा अर्थ सर्व पैसे जाहिरातीतून . ब्रँड च्या मार्केटीबिलिटीचं याहून उत्कृष्ट उदाहरण दिवाळी अंकांच्या संदर्भात मला सापडणं प्रायः अशक्य आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
अजून एक
छान आढावा! धन्यवाद!
याच बरोबर अजुन एक गोष्ट जाणवली ती विनोद, व्यंगचित्रे यांच्यात नाविन्याचा दुष्काळ. त्याच त्या पठडीतील विनोद व साधारणतः त्याच त्या विषयावरील व्यंगचित्रे. चांगली राजकीय व्यंगचित्रे तर आजकाल बहुदा फक्त वृत्तपत्रांतूनच येत असावीत. मागे बहुदा मुसु, तुम्हीच कुठेशा नोंदवलेल्या निरिक्षणानुसार सांगायचं पुलंनंतर (किंवा पुलंनी सेट केलेल्या बेसलाईनमुळे) एकुणच विनोदी लेखनाला जी अवकळा आली आहे ती लक्षणीयच नव्हे तर क्लेशदायक आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
घसरलेला टक्का
"ललित वाङ्मयाचा घसरलेला टक्का"
~ या स्थितीबाबत उलट मी असे म्हणतो की ती एक इष्टापत्तीच आहे वाचकाच्या दृष्टीने. काय राहिले आहे आता कथा, कादंबर्यात ? (कवितेची तर बातच नको). मी जवळपास ४० वर्षे दिवाळी अंक वाचतोय. करवीर नगर वाचन मंदिरच्या आसपासच राहत असल्याने अगदी शालेय जीवनापासून वाङ्मयाची आवड लागली होती आणि दिवाळी अंक म्हणजे मेजवानीच असायची. समजा १९७० सालातील 'दीपावली', 'मौज', 'हंस', 'निषाद', 'रसिक', 'युगवाणी' इ. अंक घेतले ('आवाज', 'जत्रा' मुद्दाम गाळले आहेत) तर त्या अंकातून भेटणारे दिग्गज सर्वार्थाने त्या संबोधनाला पात्र होते. शिवाय वाचकांची दिवाळी अंक एकप्रकारची भूक होती, तिचे शमन ते लेखक नक्कीच करीत. 'सत्यकथा' चा दर्जा वेगळाच. पण ईडियट बॉक्सच्या आगमनाने आणि त्यानंतर त्याने घराघरात घातलेल्या कल्लोळात दिवाळी अंक फक्त शोभीवंतच बनत गेले आणि मग 'सत्यकथे'च्या मृत्युनंतर नव्या दमाच्या विचाराच्या लेखकांचे हक्काचे व्यासपीठही लुप्त झाले. दिवाळी अंकांच्या मालकांनी मग नेहमीच 'होश्शीय्यार' असणारे दोनचार लेखकांना घेऊन त्याचत्याच थीमच्या कथा पाडायला लावायचे आणि निव्वळ जाहिरातीच्या उत्पन्नासाठी दिवाळी अंक प्रसवत राहायचे हा नेमेची येतो पावसाळा धर्तीचा कारभार सुरू आहे.
आज २०११ सालीही जर वाचक "दुपार झाली होती. रस्ता सुनसान होता. सुप्रिया गॅलरीत आली आणि वाळत घातलेले कपडे गोळा करीत होती. बिल्डिंग खालून एक दहीवाली चालली होती. तिच्या आवाजाने मग तिला रत्नागिरीतील आपली आळी आठवली आणि ती सदगदित झाली...." अशा य.गो.जोशी आणि स्नेहलता दसनूरकर टाईपच्या कथा समोर आल्या तर वाचकाला उबग येईल नाही तर काय होईल ? ५०-६० साली लघुकथांचं पीक उदंड झाले होते आणि त्यावेळी 'नवकथाकार' म्हणून लेबल्स लावणार्यांनी त्यानंतर पुढच्या पिढीतही आपल्यासारखे प्रयोग करणारे निर्माण होतील हे पाहिलेच नाही. एकट्या सत्यकथेनेच ते काम करायचे आणि त्या चार आयुष्यभर 'नवकथाकार' म्हणवून घेणार्यांनी दिवाळी अंकांच्या मोबदल्याची पाकिटे घेत राहायचे हाच धंदा केला. (एकट्या अरविंद गोखल्यांच्या नावावर ४०-५० कथासंग्रह असतील पण याक्षणी एकाचे नाव आठवले तर शपथ !). जयवंत दळवी यानी तर स्पष्ट आणि लेखी कबुली दिली होती की, ऑगस्ट सप्टेम्बर पासून अनेक संपादकांचा दिवाळी अंकासाठी तगादा सुरू होत असतो आणि त्याना नाही म्हणवत नाही (कसे आणि का म्हणतील?) त्यामुळे कित्येक वेळा एकाच थीमवर अनेक कथा पाडाव्या [हा शब्द माझा नाही, खुद्द दळवींचा आहे] लागतात. मात्र मी एक केले की, त्या तसल्या कथांचे मी पुढे कथासंग्रहाचे पुस्तक प्रकाशित केले नाही." मधु मंगेश कर्णिक, मिरासदार, शंकर पाटील, बोधे, इंद्रायणी सावकार, नयना आचार्य, देवदत्त पाटील, आदीं नावे तर वर्षानुवर्षे अनुक्रमणिकेवरून हटलीच नाहीत. आजही असतील.
एक वाङ्मयीन प्रकार म्हणून मराठीतील कथा काय आणि कादंबरी काय हे दोन्ही प्रकार मृतावस्थेत आहेत. त्याच त्याच ऐतिहासिक घटनांना पिळून पिळून रस काढायचा आणि तो दिवाळी अंकवाल्यांनी 'अमुक तमुक प्रसिद्ध कादंबरीकाराची इतिहासातील एक प्रेमकहाणीवर आधारीत दर्दभरी दीर्घकथा' अशी जाहिरात आमच्यासमोर आदळायची. दलित वाङ्मयाचा बहर ज्यावेळी आला त्यावेळीच संपला. प्रस्थापितांना शिव्या हाणीत ढाले-ढसाळ यानी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर स्थान मिळविले आणि त्यापुढील दया पवार, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, रुस्तम अचलखांब इत्यादींनी आपल्या मगदुरीप्रमाणे (एकदोनच) पुस्तकातून द्रोह दर्शविला आणि थंड झाले कायमचे. यांच्याच पिढीतील कित्येकांनी उच्चनीचतेच्या सोपानाला लाथा घालत असताना आशीर्वाद मात्र मागितले ते 'पु.ल.देशपांडे' या सर्वार्थाने प्रस्थापिताकडून. 'अस्मितादर्श' पेक्षाही पु.लं.ची प्रस्तावना याना महत्वाची वाटत असे. आणि मग दिवाळी अंकवाल्यांनी तर मग त्या गंगेत वेळोवेळी हात धुवून घेतल्याचा इतिहास खुद्द वितरक बागवे यांच्याकडून ऐकावा.
असो. फार लिहिता येईल या विषयावर. पण प्रतिसाद किती दीर्घ असावा याला लिखित नसला तरी अलिखित नियम असतोच. त्यामुळे इतकेच म्हणतो "ललित वाङ्मयाचा टक्का" किती घसरायचा तेवढा घसरो. त्याचा मराठी सांस्कृतिक जीवनावर कसलाही ओरखडा उठणार नाही हे नक्की.
अशोक पाटील
पूर्णपणे असहमत. एकतर ललित
पूर्णपणे असहमत.
एकतर ललित वाङ्मय म्हणजे केवळ "कथा कादंबर्या" असे समजायचे असेल तर तो अल्पसंतोष ठरावा.
दुसरे असे,
हे जर तुमचे मत असेल तर त्याचा आदर आहे, मात्र ते सत्य नाही आणि सहमती अजिबात नाही
कथा, कादंबर्या, कविता, चिंतनात्मक लेखन, आत्मचरित्रे, विनोदी लेखन, व्य्क्तीचित्रणे, अनुभव कथन यात होणारी घसरण ही चिंताजनक आहे. एखाद्या भाषेत केवळ माहितीचा साठा असणे म्हणजे ती भाषा ग्रेट असा जो दुदैवी समज सध्या पसरताना दिसतो आहे तो भाषेच्या वृद्धीसाठी घातक आहे. एखाद्या भाषेत माहितीपर लेखन यावेच मात्र ते तिथेच सिमीत असु नये. इतर प्रकारांपेक्षा, कवितांसारख्या (अधिक?) सृजनशील आणि सुंदर लेखनप्रकारात तर सतत प्रयोग होत रहाण्याची गरज वाटते. ती सध्या (मुक्तछंदानंतर?) थांबली आहे की काय अशी भीती वाटते.
असो. अर्थात
असे म्हणून जर हा घसरलेला टक्का इष्टापत्तीच वाटत असेल तर बोलणेच खुंटले
सध्या आपले असहमत असायचेच दिवस दिसताहेत
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
वेलकम
असहमती ~
ऑन द कॉन्ट्ररी, आय एन्जॉय धिस काईंड ऑफ डिफरन्सेस ऑफ ओपिनिअन्स ऋषि. सो डोन्ट वरी, यू आर परमिटेड टु किल बिल वुईथ दॅट फेमस समुराई स्वोर्ड. {च्यामारी, मराठीवर चाललेल्या चर्चेला इंग्रजीचा टेकू घ्यावा लागतो.}
~ कार्यालयीन कामाच्या निमित्ताने काहीसा फिरतीवर आहे त्यामुळे चालत्या व्हॅनमध्ये नीट टंकन होत नाही. [हे उत्तरही आजरा परिसरातील चहाच्या एका टपरीवर थांबलो असताना देत आहे. मुसुंच्या प्रतिसादास उत्तरादाखल पहिला प्रतिसाद रात्रीच टंकला होता.]
अशोक पाटील
अशीच चर्चा चालू राहो
दिस मेड माय डे! आज रटाळ करेक्शन आणि पेपर सेटिंग चे काम आहे. आठवून आठवून हसू येणार आहे दिवसभर.
पाटील साहेब, मुसु, मेघना - चर्चा चालू राहू दे. ऐसीअक्षरेचा हा सर्वात लांब आणि दीर्घकालीन धागा ठरो.... जसजसे लेख वाचून होतील तसतशा प्रतिक्रिया लिहा.
पाटील साहेब, एकच प्रतिसाद फार लांबवायचा नसला तरी अनेक प्रतिसादांमध्ये मजकूर देता येईलच - या निमित्ताने मराठी साहित्याचा, प्रकाशनविश्वाचा आढावा, रोचक इतिहासच वाचायला मिळतोय. वर उल्लेखिलेल्या अक्षर मधल्या "मराठी संस्थाने" लेखाबद्दल आपली प्रतिक्रिया वाचायला आवडेल.
मुक्तसुनीत - राम गुहांना ही आजकाल "ग्लॉसी" मध्येच धरायला हवं - "इकॉलॉजी अँड इक्वुइटी" चे जुने गुहा आता राहिले नाहीत, दुर्दैवाने जंगल आणि पर्यावरणावरच्या तळमळीपासून ते फार लांब आलेले दिसतात.
पद्मभूषण रामचंद्र गुहा
This comment has been moved here.
प्रहार
प्रहार चा अंक जालावर आहे का? मी सगळे अंक यंदा bookganga.com वरून मागवले, पण त्यांच्याकडे प्रहार उपलब्ध नाही.
मी चाळलेले अंक
मी चाळलेले अंक येणेप्रमाणे:
मुक्तशब्द, मौज, अक्षर, प्रहार, चिन्ह, इत्यादि, लोकसत्ता, साप्ताहिक सकाळ, लोकप्रभा, पद्मगंधा, साधना, अनुभव, मिळून सार्याजणी
कुठलाच अंक पुरा वाचून झालाय असं म्हणवत नाही. अजूनही इथून तिथे उड्या चालूच आहेत. त्यामुळे बाकीच्या सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे या प्रतिसादात अजून भर पडत राहील.
बाकी 'मुक्तशब्द'कडे वैचारिक नेतृत्व आलं आहे असं काही मला (अजून तरी) वाटत नाही. अंकातल्या मजकुराबद्दल माझी तशी तक्रार नाही. तो उत्तमच आहे. अनुवादित कथांसकट. पण माझ्या मते दिवाळी अंकामध्ये अशा प्रकारची काही चढाओढ असली(च), तर 'अक्षर'नं त्याचं अग्रस्थान केव्हाच आणि नि:संशय पटकावलेलं आहे. त्याचं कारण असं, दिवाळी अंक हे काही पुस्तकांसारखे स्वतंत्र नसतात. प्रत्येक अंकाचा स्वतःचा असा घडत गेलेला वाचक असतो, आपली-आपली पूर्वसुरींची परंपरा असते, आपापले लेखक असतात; आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या (ताज्या) अंकाचं मूल्यमापन करायचं असतं - केलं जातं.
त्या दृष्टीनं पाहता 'मुक्तशब्द' अजून नवा आहे. सातत्य या निकषावर त्याचं काय होतं, ते अजून तरी ठरायचं आहे. त्यातच गेल्या वर्षी त्यांनी मुखपृष्ठावर एक वादग्रस्त चित्र छापलं होतं आणि लोकांचा विरोध दिसल्यावर काहीबाही गुळमुळीत स्पष्टीकरण देऊन (नक्की शब्द आठवत नाहीयेत, पण 'माझ्या पत्नीला ते पाहताना शरमिंदं वाटलं, त्यामुळे...' :O )ते चक्क मागे घेतलं होतं - हा तपशील अजुनी हवेत ताजा आहे. याउलट 'अक्षर'नं सातत्यानं आपला दर्जा कायम राखला आहे. केवळ महाराष्ट्रापुरतंच नव्हे, तर एकूणच जगात काय चाललं आहे त्याचं त्याचं भान राखत, केवळ 'ललित' या भूमिकेला चिकटून न राहता, 'अक्षर'नं कायम नवनवीन विषय हाताळलेले आहेत, पुरेशा गंभीरपणे आणि विस्तृतपणे हाताळले आहेत.
बाकी ऑनलाईन लिखाणाची दखल अंकांनी यंदा मोठ्या प्रमाणावर घेतलीय आणि अढी पूर्णपणे संपलेली नाही हे खरंच आहे. पण माध्यम म्हणून अंकांचं प्रस्थापित स्थान पाहता ही अढी आणि काहीसा वडीलधारा सूर असणं साहजिकही आहे. इथून पुढे या दोहोंतले संबंध कसे असतील हे पाहणं मजेचं असेल.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
अनुभव
'अनुभव'च्या अंकात नेहमीपेक्षा वेगळं, अनपेक्षित असं काही नाहीय.
नाही म्हणायला प्रसाद पुरंदरे यांचा लेख मात्र मला आवडला. त्यांच्या घोडेस्वारीच्या अनुभवाबद्दल तो लेख आहे. पुण्यासारख्या शहरात राहत असताना घराखाली गॅरेजमधे घोडे पाळणं, नाक्यावर जाताना बाइकच्या ऐवजी घोडा घेऊन जाणं आणि तो 'पार्क' करणं.. असल्या कायच्या काय गोष्टींमुळे हा लेख भलताच इंट्रेष्टिंग झाला आहे.
अवधानींचा लेख टिपिकल 'अनुभवी' - आशावादी. ट्रान्समधे काढलेल्या चित्रांबद्दल चंद्रमोहन कुलकर्णींनी लिहिलंय, अंजली मेहेंदळेंनी युरोपातली कला पाहायला केलेल्या स्वैर भटकंतीबद्दल लिहिलं आहे. दोन्ही लेख ठीकठाकच. लेख सुरू होतो की नाही, तोच संपला असं वाटतं. लेखकाच्या मनावर त्याच्या बालपणातल्या अनुभवांची छाया पडलेली असते, त्याबद्दल सासण्यांनी लिहिलं आहे. खरं तर या लेखाकडून अपेक्षा होत्या. पण अगदीच 'एकास एक लावून दाखवलेला' (या कथेत अमुक अमुक येते, त्याचे मूळ हे इथे आणि सो ऑन) लेख वाटला. अवचटांचा लेख नेहमीसारखाच. (बरंच काही टंकता येईल. पणं या विषयावर एकदा चीरफाड करून झालेली असल्यामुळे थांबते!)
समीर कुलकर्णींची कथा आवडली. पण तीही खास वगैरे नाहीच.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
सर्व वैचारीक प्रतिसाद वाचून
सर्व वैचारीक प्रतिसाद वाचून खूप भारावल्यासारखी झाले आहे. हे असे लेख नेहमी वाचत यावेत. रोचना म्हणतात तशा - चर्चा चालू राहू दे. ऐसीअक्षरेचा हा सर्वात लांब आणि दीर्घकालीन धागा ठरो
"पॅसीव्ह स्मोकिन्ग" जरी प्रकृतीला वाईट असलं तरी असे हे दिवाळीअंकांचे "पॅसीव्ह रीडींग" चांगलेच की.
"मुक्तशब्द"
मुक्तसुनीत यानी खास उल्लेख केलेला "मुक्तशब्द" चा अंक अगदी आत्ताच अनपेक्षितरित्या मिळाला अन् तोही कोल्हापुरात नेहमी ज्या दुकानातून पुस्तके खरेदी करत असतो, त्यांच्याकडेच. 'मुक्तशब्द' आणि अन्य पुस्तकांचे पॅकिंग करून घेत असतानाच शेजारील एक वाचक गृहस्थ म्हणाले - मुक्तशब्दसमवेत 'इत्यादी' अंकही तुम्ही पाहा. नक्की इतरांसाठी शिफारस कराल". 'इत्यादी' हे नाव नवीनच वाटले. पण त्या क्षणी तो अंक तिथे उपलब्ध नव्हता. इथल्या सदस्यांपैकी कुणी हा अंक पाहिला असल्यास त्याच्या उपलब्धततेविषयी जाणून घ्यायला आवडेल.
("चिन्ह २०११" चा अंक आता चक्क रुपये ६००/- झाला आहे. ही एक नवीनच बातमी समजली; आणि ते देखील काऊंटरवर अगोदर पूर्ण पैसे भरून बुकिंग केले पाहिजे. एखाद्या दिवाळी अंकाची इतकी किंमत प्रथमच ऐकली.)
अशोक पाटील
धन्यवाद मुसु... :)
'ऐसी अक्षरे' मुळे मी वाचु बिचु लागले आहे कि काय अशी मज शन्का येउ लागली आहे.. आपली यादी तर खूपच मोठी आहे मुसु, पण मी जीवाला झेपेल इतकेच वाचायचे ठरवले आहे.. मुक्तशब्द आणि अक्षर मागविले आहेत.. आता त्या उप्पर आगे आगे गोरख जागे!
- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!
तीनच!
छापील तीनच वाचले.
माहेर्,अक्षर आणि साप्ताहिक सकाळ.
साप्ताहिक सकाळ फारसा आवडला नाही.
अक्षर छान आहे.
नंदा खरेंची मुलाखत आवडली.
माहेरमध्ये नीरजा पटवर्धन आणि श्रद्धाच्या कथा आवडल्या.
कविता अगदीच सो-सो वाटल्या तिन्ही अंकात.
माहेरात आरती अंकोलीकरांची मुलाखत अज्जिबातच आवडली नाही. त्यातल्या त्यात एकीकडे शास्त्रीय संगीत देशकालसापेक्ष भावते म्हणताना एकिकडे ही फक्त इलाईट लोकांसाठीच असलेली गोष्ट आहे असा सूर आरतीताईंनी लावलाय ते आवडलं नाही. मुलाखतीचं संकलनही नीट न जमल्याने मुद्दा सोडून भरकटलेय.
बाकी दीर्घ कादंबर्या आवडल्या नाहीत.
लग्नाचा फोलपणा किंवा अपरिहार्यता या घिस्यापिट्या फॉर्मलाच नविन काळात मांडलेय.
दिवाळी अंकांबद्दल आणखी थोडे
दिवाळी अंकांबद्दलची चर्चा मला व्यक्तिशः दिवाळी अंकांपेक्षा थोड्या मोठ्या विषयाबद्दलची आहे असं प्रामाणिकपणे वाटतं. नवनवे लेखक, कवी, पत्रकार यांचं लिखाण, एकंदर महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रांमधलं वातावरण, विचारांची दिशा, या सर्वांचं प्रतिबिंब पडणारी वर्षभरातली सर्वात मोठी सांस्कृतिक घटना असं या गोष्टीपुरतं म्हणता येईल. जवळजवळ वर्षातले सहा आठ महिने सर्व प्रकाशनं यावर काम करताना दिसतात. मुखपृष्ठं , आतली सजावट , व्यंगचित्रं या सर्व गोष्टींची तयारी होत असते.
कुठल्या प्रकाशनाचा उत्कर्षकाल आहे , कुणाची उतरती कळा आहे, कोणाचा फोकस कसा आहे याचं उत्तम चित्र त्या त्या प्रकाशनाच्या दिवाळी अंकामधून दिसतं. पाचेक वर्षांपासून आलेला मुक्तशब्द आणि गेल्या वर्षापासून सुरू झालेला "मनोविकास" प्रकाशनाचा "इत्यादि" किंवा "प्रहार" या, अल्पावधीत नाव मिळवलेल्या प्रकाशनाचा दिवाळी अंक यामधे नवीन लोकांचा सहभाग ही बाब ठसठशीतपणे जाणवते. वर उल्लेखलेल्या प्रमाणे लोकसत्ता आणि मटा सारख्या प्रकाशनांमधे , नेतृत्वबदल घडत असताना आलेली अंकांची अवकळा त्या प्रकाशनाची स्थिती नोंदवते. गेल्या वर्षी केतकर लोकसत्तेतून गेल. गेल्या वर्षीचा लोकसत्तेचा अंक पाट्याटाकू होता. यंदा मटामधे नेतृत्वबदल घडलेला आहे त्यामुळे यंदाची त्यांची स्थिती शोचनीय बनलेली आहे. सदा डुंबरे यांच्या जाण्यानंतर "साप्ताहिक सकाळ"च्या बदललेल्या - काही लोकांच्या मते उतरलेल्या - स्थितीची नोंद वाचकांनी घेतलेली आहे.
दिवाळी अंकांबद्दलची प्रस्तुत चर्चा पहिली नाही. इतरांनीही या विषयाबद्दल लिहिलं आहे. प्रस्तुत ब्लॉग एंट्रीचं उदाहरण पहा. हा लेख यंदाच्या दिवाळी आधी आलेला होता.
http://ramjagtap.blogspot.com/2011/09/blog-post_17.html
उपरोल्लेखित लेखाबद्दल :
"दिवाळी अंकांचा दर्जा घसरला आहे" अशा स्वरूपाची मते असणे सहज शक्य आहे. तशी मते मांडण्यालाही हरकत नाही. बरीच नावं घाऊक प्रमाणात घेतली गेली आहेत. हे सर्व ग्राह्यतेच्या कक्षेत यायला कसलीच ना नाही. मात्र "अमुक लेखक/लेखिकांनी आता लिहू नये" असं म्हणणं काहीसं रोचक आहे. मला व्यक्तिशः अशा स्वरूपाची विधाने आवडत नाहीत खरी.
दिवाळी अंकाना - आणि एकंदर सांस्कृतिक पर्यावरणामधे - मांद्य आलेले आहे. ही सद्दी सुमारांची आहे अशा स्वरूपाची मते अधून मधून मांडली जात असतात. माझ्यामते या सर्व चक्रमेनिक्रमेण घडणार्या गोष्टी आहेत. काही क्षेत्रांमधे काही काळ एकंदर अॅक्टिव्हिटीज् कमी होतात. काही काळ तेजीचा असतो. "सध्याचा काळ मोठा वाईट आला" अशा स्वरुपाच्या विधानांमधे स्मरणरंजनपर चुका तर होत नाहीत ना ? "जुने ते हिरण्मय, नवे ते टाकाऊ" अशी एकांगी भूमिका आपण घेत नाही आहोत ना ? हे तपासून पहाणे महत्त्वाचे. ज्या काळात आपण जगतो त्या काळाचे मूल्यमापन त्याच चालू क्षणी करू शकणे हे कठीण काम आहे. जगतापांनी "अमुकांचे लिखाण वाईट होते. यांनी थांबावे" असं म्हणताना लेखकांची जंत्री दिली आहे. त्याबरोबर त्यांनी नव्या जोमाच्या किंवा अनेक वर्षं लेखन करतानाही नवनवीन वाटा धुंडाळणार्या व्यक्तींची नावे लिहिली असती तर बरे झाले असते. आपण हे विसरता नये की, आसाराम लोमटे, समर खडस, जयंत पवार, निखिलेश चित्रे, जयदेव डोळे, कृष्णात खोत, यांच्यासारखे लेखक आपल्याला अलिकडच्या दिवाळी अंकांमार्फतच भेटलेले आहेत. या सर्वांनीही आपल्या लेखण्या मोडाव्यात असे त्यांचे म्हणणे आहे काय ?
असो. जगतापांनी टाकलेले क्षकिरण साठीच्या दशकातल्या अशोक शहाण्यांपासून अलिकडे हर्डीकरांपर्यंत अनेकांनी टाकलेले आहेत आणि अशा स्वरूपाचा रिअॅलिटी चेक चांगलाच. मात्र, सुक्याबरोबर ओल्यालाही जाळणे, "throwing the baby out with the bath water" या संदर्भातला रिअॅलिटी चेक क्षकिरणाच्या उपकरणांनी करायला हरकत नाही
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
लेटेस्ट
प्रस्तुत विषयासंदर्भात आजच प्रकाशित झालेला हा लेख. माहितीपूर्ण आहे. अनेक मतांबद्दल चर्चा होऊ शकते :
http://shriumrikar.blogspot.in/2015/02/blog-post_28.html
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.