Skip to main content

लोकसंवाद :- काही चितपरिचित डायलॉग्ज

लोकगीत, लोककला, लोकसंगीत कसं असतं अगदि लोकांत मिसळून गेलेलं; त्यांच्यात वारंवार आढळणारं; तसेच हे "लोकसंवाद"
हल्लीचे काही लोकसंवाद. खरं तर लोकरोग. लोकांच्या टाळक्याला झालेले आजार.
(ह्यातले एक दोन मी जालवरील प्रतिसादातून उचलले आहेत)
.
.

१.मुलगी काळी असली तरी कमावती आहे!!
२.तू आयटीत आहेस? मग तिसरं होम लोन कधी घेतोयस?
३.तू आयटीत आहेस? मग भारतात काय करतोयस?
४.भेंचोत महागाई इतकी वाढलिये आजकाल; ग्लेनफिडिच पितानाही हाच विचार सतावतो.
५.मी मुलगा इंजिनिअर असला तरच होकार देणार.
६.तो मुस्लिम/ब्राम्हण्/दलित असला तरी चांगलाय! किंवा
६.१ मी मुस्लिम असलो तरी मी देशभक्त आहे हो.
किम्वा
६.२ मी मराठी असलो तरी हिंदी द्वेष्टा किंवा गुंड माणूस नाहिये हो.
.
७.तो अमुक अमुक मोठा गायक आहे ना, गायक असला तरी निर्व्यसनी आहे! (अरे चौकटीबंद चष्मा काढून जरा त्याच्या गायकीकडे बघा रे)
८.नै, तुम्हाला वाटेल जरा पर्सनल होइल, पण एक विचारु का? काय हो.....
(अरे पर्सनल आहे ना, मग गप्प बैस ना.)
९.राहुलचं बाळ गेलं मागच्या महिन्यात. शिवाय मुलगा होता हो!
१०.बस मॅम, तुम्ही आम्हाला फक्त अमुक हजार द्या. काssssही कष्ट्/व्यायाम्/आहार नियोजन न करता हे अस्सं वजन कमी होत पहा.
११.तसंही जगून काय करनार भेंचोत. मस्त सुस्साट बेभान हाकायची गाडी. आपल्याला जीवाची फिकिर नाय. बिंदास हे आपन.
१२.ई ई ई नाऱळासोबत खडीसाखरेचा तुकडा नको. क्यालरिज असतात त्यात फार.
१३. काही गोष्टी अजून विज्ञानालाही उमजलेल्या नाहित.( म्हणून मी वाट्टेल त्या कविकल्पना गळ्यात मारिन; त्या मुकाट्याने ऐक)
१४.त्या हिरोइनचं ऐकलं का? ती त्याच्यासोबत अमुक अमुक ठिकाणी फिरत असते म्हणे.
१५. अरे आपला तो हा अमुक आणि आपली ती ही तमुक फार सोबत दिसताहेत. ऑफिसनंतरही भटकताना दिसतात बराच वेळ.
मी पीछा करताना समजलं की...(आँ? त्यांचं भटकणं चूक, तर साल्या तुझं असं चोरीछुपे गॉसिपिंग आणि पीछे करणं आंबटशौकिनपणा नै का?)
१६.आता मी कशाला स्वतःच्या तोंडानं सांगू? पण अमक्याच्या तमकीसोबत काहीतरी चालल्याचं मी ढमक्याकडून ऐकलय.
१७. बस आता आम्हाला इतके इतके दिलेत, की महिन्याभरात अंबानीच्या दुप्पट रक्कम तुमच्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये येणार!
१८.जाउ दे रे. ह्याही वेळी पार्शलिटी झाली; नाही तर आपल्यालाच मिळालं असतं प्राइझ.
१९. अहो त्यानं अभ्यास खूप केला होता. पण बोर्डात काय घोळ झाला ठाउक नाही.
तसा तो फार हुशार आहे. पण नक्की चेकिंग मध्येच प्रॉब्लेम आला असणार.
२०. आपण कोण?
किंवा:-
आडनाव काय म्हणालात तुमचं?

.
.
तुमच्या कडे असल्यास असे लोकसंवाद इथे शेअर करावेत.

--मनोबा

ऋता Fri, 15/11/2013 - 00:59

'तिचं लग्न नाही झालं अजून? तिशीही उलटली असेल नं आतापर्यंत...?'

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 15/11/2013 - 01:05

माझी "आवडती" लोकसंवादिक वाक्यं:

१. माहेरचं आडनाव काय तुझं?
२. तू लग्नानंतर नाव नाही बदललंस?
३. सासरची देशपांडे (किंवा इतर काही) आहे ती. (काही लोकांशी बोलताना मुद्दाम पुरुषांचा उल्लेख "सासरचा जोशी (किंवा इतर काही) आहे तो" असा केल्यावर हे ड्वायलॉक बंद झाले.)
४. मला क्वचित विचारला जाणारा प्रश्न - नवराही चष्मिष्ट आहे का?

आणि अनेक वेगवेगळ्या संदर्भात ऐकलेलं वाक्य - तुला बरं जमतं सगळं करायला!

बॅटमॅन Fri, 15/11/2013 - 02:25

अजून काही:

"लग्नाला ४ वर्षे झाली तरी अजून मूलबाळ नाही??? #######". (पुढे मग कसं होणार आजकालच्या पोरांचं पासून कैतरी प्राब्ळम आहे पर्यंत कैपण येऊ शकते.)

"मुलाचं स्वतःचं घर नाही, काय फायदा बाकी सगळं असून? रिजेक्टच करते झालं. बाकी घरबीर असलं तरी मुलाच्या आईवडिलांसोबत राहणे म्हणजे याइक्स."

राजेश घासकडवी Fri, 15/11/2013 - 07:46

In reply to by बॅटमॅन

"लग्नाला ४ वर्षे झाली तरी अजून मूलबाळ नाही??? #######".

आईवडलांच्या या प्रश्नाला कंटाळून माझ्या एका पंजाबी मित्राने त्यांना सांगितलं होतं 'हमको आता नही है'. पलिकडे फोनवर आईवडिलांचा चेहरा कसा झाला असेल याची फक्त कल्पनाच करता येते.

निनाद Fri, 15/11/2013 - 05:56

लोकसंवाद :- काही चितपरिचित डायलॉग्ज चिपरिचित म्हणायचे आहे का? की काही चितपट गोम आहे शीर्षकात?

ॲमी Fri, 15/11/2013 - 08:25

१. लहान असताना 'मोठी वाटते' आणि मोठी ( की म्हातारी??) झाल्यावर 'लहान वाटते'
२. तू वजन कसकाय मेँटेन केल?
३. नुकतच शिक्षण पुर्ण झाल की 'लग्न कधी' चालु होत. एकदाच लग्न झाल की 'मुल कधी'
४. गेल्या काही दिवसात 'तू तुझा खर्च कसा काय मेनेज करते' हा प्रश्न बर्याचजणांनी विचारला मला.

'न'वी बाजू Fri, 15/11/2013 - 10:38

In reply to by अजो१२३

"जेवण झालं का?" हा एक लोकसंवाद आहे. यात वाईट ते काय?

कोण, कोणाला, कोणत्या परिस्थितीत आणि कसे म्हणते, यावर अवलंबून आहे.

वेळी-अवेळी (किंवा आयत्या वेळी) टपकलेल्या पाहुण्याचे 'जेवण झालेच असेल' (पाठभेद: 'जेवूनच आला असाल') या शब्दांतील पुणेरी स्वागत पॉझिटिव खचितच नसावे.

अजो१२३ Fri, 15/11/2013 - 10:44

In reply to by 'न'वी बाजू

आता मला वाटायला लागलंय की सगळे ऐसीकर मिळून एक चांगला लोकसंवाद लिहू शकतील का? अहो, प्रत्येक वाक्याच्या काहीही छटा काढता येतात. पण लेखकाने लोकसंवाद म्हणून धागा काढला आहे तर काही चांगले लोकसंवाद पण नको का लिहायला?

अवांतर -
मी जर कोणी प्रभावशाली व्यक्ति असतो तर "फार संभ्रमशील भाषा आहे ही" हा लोकसंवाद प्रसिद्ध केला असता.

'न'वी बाजू Sat, 16/11/2013 - 05:51

In reply to by ॲमी

योग्य किंवा अयोग्य हा मुद्दा मी उपस्थित केलेला नाही. कृपया नोंद घ्यावी.

सहकार्याबद्दल आगाऊ धन्यवाद.

मन Fri, 15/11/2013 - 11:03

In reply to by अजो१२३

सगळे निगेटिव का लिहित आहे; ते ठाउक नाही. जे डोक्यात आलं ते लिहिलं.
( मला स्वतःबद्दल कमेंट करण्म अवघड वाटतं अशा परिस्थितीत. म्हणजे "निगेटिव का लिहिलं. अमक्या लेखात अमुक ह्याला अमुक असं का दाखवलं; " वगैरे.
त्यापेक्षा पब्लिकनं काय त्या पिंका टाकलेल्या परवडतात त्याबद्दल. फक्त त्या पिंका सोसायची तयारी हवी.)

शक्यता :-
१.धागाकर्त्याचा माइंडसेट धागानिर्मितीच्या वेळी नकारात्मक होता.
२.नकारात्मक गोष्टीच अधिक ठळक स्मृतीत रहाव्यात असं मानवी मन का मेंदूचं वायरिंग असल्याची थिअरी ऐकली
होती. त्याचा संबंध असावा.
३. इतर काही कारण. जसे की; सकारात्मक गोष्टीत तितकी चर्चाही होउ शकत नाही.
किंवा ---
त्या मुळमुळित वाटतात.
किम्वा
दखलपात्र असा सकारात्मक लोकसंवाद धागाकर्त्यास त्या वेळी आठवला/सुचला नाही.

अजो१२३ Fri, 15/11/2013 - 11:20

अर्थातच वाक्यरचना वेगळी असू शकते.
१. पाच वर्षात कुठल्या कुठे पोहोचला तो, परवाच स्कोडा घेतली.
२. आम्ही इथे आलो तेव्हा बाजूला कुणीच नव्हतं. आता पार्किंगला जागा मिळत नाही.
३. १० वर्षाखाली फक्त २००० (रु प्रति स्केअर फूट) ला होता हा फ्लॅट, आता ७५०० ला आहे.
४. आमचा मुलगा आणि जावई दोघेही अटलांटिकच्या पलिकडे आहेत.
५. अरे मी भारतात चारच दिवस येत आहे, शेड्यूल फूल पॅक आहे. पाहू या भेट होते का ते.
६. अरे तो फेसबूकवर नाही म्हणून त्याच्याकडे काय चाललंय ते कळत नाही.
७. मी आहे तसा फेसबूकवर, पण उपडेट करायला वेळ मिळत नाही.
८. अरे फोन करणारच होतो तुला.
९. मिटिंगमधे होतो म्हणून फोन घेतला नाही.
१०. नरेंद्र मोदी यावेळेस पंतप्रधान व्हायला पाहिजेत.

मन Fri, 15/11/2013 - 11:33

In reply to by अजो१२३

क्र ७ आणि क्र९ बर्‍याचदा मी स्वतःच म्हणत असतो.
पण मी म्हणतो; तेव्हा ते खरच प्रामाणिकपणे म्हटलेले असतात.(मीटिंगमध्ये असतो, तेव्हाच, मी मीटिंगमध्ये असल्याचं सांगतो; एरव्ही नाही.) ( काही लोकांना टाळण्यासाठी मी मिटींग व्यतिरिक्त इतर बहाणा करतो.)
चेपु वगैरे रेग्युलर पहायल खरच आजही जमत नाही, वेळ पुरत नाही.

गवि Fri, 15/11/2013 - 11:52

कोंकणातला नमुना:

-तुम्ही विचारु नये आणि आम्ही सांगू नये.. अहो काय बोलायचं.. अहो... दिसते तशी साधी, पण नजर एकीकडे, पावलं एकीकडे... हं (कळला ना माझ्या म्हणण्याचा आतला पुरेपूर गूढ मतलब.. अशा अर्थाचा चेहरा..) .. (खालच्या आवाजात..) असं आहे सगळं..!!

मग इन जनरलः

- आपण सहसा चिडत नाही.. पण का एकदा जर चिडलो... (पॉज) की मात्र ...(पॉज.. निव्वळ डोळ्यांनी इशारे..)..
- उच्चांतर्जातीय चालेल.
-तू कोणीही आण.. अगदी ख्रिश्चनाची केलीस तरी चालेल पण ***** नको आणू बाबा.
- बाबा महाराज वगैरे एकजात भोंदू.. माजलीय लूटमार.. नंदीबाबा मात्र.. तो प्रकारच वेगळा आहे.. अनुभव घेतल्याशिवाय पटणे नाही.

हारुन शेख Fri, 15/11/2013 - 12:29

६.१ मी मुस्लिम असलो तरी मी देशभक्त आहे हो.

मी आता असं काही म्हणायच्या फंदात पडत नाही. कितीवेळा ? आणि मीच काय म्हणून अश्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे त्यापेक्षा दुर्लक्ष करून कोडगेपणा पत्करलेला बरा. लोकांच्या मनातली असुरक्षितता घालवायला आपण देशभक्त आहोत की नाहीत अशी ग्वाही देत बसण्यापेक्षा माणुसकीने वागून मन जिंकणे बरोबर आहे हे शिकलोय. भीतीने ग्रस्त आणि असुरक्षित मनाच्या माणसाला देशभक्ती बळ देते. हे एका व्यक्तीपुरतं. पण पूर्ण समाजच भीतीने ग्रस्त आणि असुरक्षित असेल तर अशा समाजात देशभक्तीच्या भावनेने निर्माण होणारे बळ खूप प्रचंड असते. त्याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक. अन्यथा कधीही हे बळ अक्राळविक्राळ रूप धारण करु शकते. नाझी जर्मनीत देशभक्तीच्या नावाखाली ज्यू लोकांवर अनन्वित अत्याचार झाले. देशभक्तीच्या भूलीत सुशिक्षित जर्मन समाजाने माणुसकीला काळीमा फासणारी कृत्ये बिनधोक केली कारण हिटलरसारखे क्रूर आणि प्रोपगंडा राबवणारे नेतृत्व. त्याच पार्श्वभूमीवर चौरीचौरातल्या हिंसेनंतर असहकार आंदोलन स्थगित करणारे गांधी मला फार थोर वाटतात.

बॅटमॅन Fri, 15/11/2013 - 12:36

In reply to by हारुन शेख

नै म्हणजे बाकी ठीके, पण देशभक्ती ही दुर्बळ समाजात दृढमूल होत असेल तर युरोपियन देशभक्तीची संगती कशी लावणार? युरोप असा काय भीतीग्रस्त होता की तिथे देशभक्तीचे एक्स्ट्रीम आविष्कार तयार झाले? किंवा अमेरिका? लक्षात घ्या, देशभक्तीच्या नावाखाली चाललेल्या क्रूर कर्मांचे समर्थन इथ आजिबात नाही. पण काहीसे सरसकटीकरण केले जातेय की काय अशी शंका.

मन Fri, 15/11/2013 - 12:49

In reply to by बॅटमॅन

त्यांच्या प्रतिसादाच्या संदर्भानं सांगायचं तर देशभक्तीच्या नावानं होणार्‍या शॉविनिझम, थैल्लर्याकडं त्यांचा निर्देश आहे.
तसा असणं चूक नाही.
किम्वा मोअर स्पेसिफिकली हल्ली "राष्ट्रवाद" नावाच्या प्रकाराखाली जे चालतं ते प्रतिसादात आलेलं आहे. त्यातही अधिकाधिक लोकांना एकत्र आणायला उरलेल्यांची भीती दाखवायची/बागुलबुवा उभा करायचा किंवा उरलेल्यांना साइड लाइन करायचं हा एक राजरोस उद्योग झालाय.
हल्ली कुणी "राष्ट्रिय" वगैरे शब्द वापरले की जरा भीतीच वाटते.
"राष्ट्रासाटेहे अमुक आवश्यक आहे. तमुक आवश्यक आहे." असे म्हणत झुंडी तयार होणं सोपं पडतं.
परवा एक श्रीमान तर चक्क "अमुक गोष्ट बरोबर अहए कारण माझे वडील असे म्हणताहेत" असं म्हणाले.
नंतर पुन्हा थोड्यावेळाने अत्यंत अभिमानानं "मी माझं विचार करायचं काम आउअटसोर्स केलय" (येस, तुम्ही बरोबर वाअचलत. "विचार आउटसोर्स केलेत" ह्याच शब्दांत तो बोलला.)
नै, असले दिव्य विचार ठेवायला हरकत नाही, पण मग फक्त त्यांनी आमची चूक दाखवायला येउ नये.
(आमचे धर्म ग्रंथ श्रेष्ठ छाप भंपक लिंकमध्ये सतत ट्याग करणारे काही प्राणी आहेत.
त्यांच्यामुळे किती वैताग येतो. मित्र असल्याने त्याने डोके गमावून केवळ एक "धड" म्हणून स्वतःचं अस्तित्व ठेवल्यामुळं सहानुभूतीही वाटते.)
असो. अवांतर होतय.
माफी असावी.

बॅटमॅन Fri, 15/11/2013 - 13:01

In reply to by मन

शॉव्हिनिझमबद्दल सहमतच आहे. तसेच अशी अतिरेकी असहिष्णू चित्रे दाखवून समाजाची दिशाभूल करण्याचे कामही काही आयव्हरी टॉवरनशीन विद्वान करीत असतात. हां अर्थात उपद्रवमूल्य पाहू गेले तर अतिरेकी राष्ट्रवादाचे जास्त आहे-विशेषतः आमजनतेसंदर्भात. पण संशोधक वर्तुळात हे एकांगी विद्वानही लै माजलेत. असो.

बाकी तुमचे सर्कल भलतेच खतरनाक दिसते. शुकर है भगवान का, आमच्या वर्तुळात असे लोक फारसे नाहीत.

हारुन शेख Fri, 15/11/2013 - 13:07

In reply to by बॅटमॅन

स्वतःच्या व्यापारी हितांचे रक्षण आणि त्यातून येणारी असुरक्षितता यातून ब्रिटेनमध्ये देशभक्ती दृढ झाली. पहिल्या महायुद्धानंतर
व्हर्सायच्या तहाच्या अटी अन्यायकारक होत्या आणि त्यातून जर्मनीला कमकुवत केले गेलेय ही जर्मन लोकांची असुरक्षित असण्याची भावना त्यातून हिटलरने त्या भावनेला दिलेली देशभक्तीची जोड . अमेरिका हा तर स्वतःला सर्वात असुरक्षित मानणारा देश. (दुसऱ्या महायुद्धातून अमेरिकेच्या वाटयाला आलेल्या संपन्नतेने असुरक्षिततेची भावना अधिकच त्रीव्र झाली ) आधी कम्युनिझम आणि आता आतंकवाद. यातून केलेली अनेक युद्धे यात देशभक्तीची भावना नाही असे म्हणताच येत नाही. आपला शेजारी पाकिस्तान सतत भारताच्या भीतीने ग्रस्त ! त्यातून निर्माण होणारी तिथली टोकाची देशभक्ती. सरसकटीकरण नाही करायचे पण देशभक्तीच्या भावनेचा उपयोग लोककल्याणासाठी नसेल तर एक भावना म्हणून ती मला फोल वाटते.

त्यातून निर्माण होणारी तिथली टोकाची देशभक्ती. सरसकटीकरण नाही करायचे पण देशभक्तीच्या भावनेचा उपयोग लोककल्याणासाठी नसेल तर एक भावना म्हणून ती मला फोल वाटते.

अत्यंत मार्मिक आणि रोचक मत. पण एकच प्रॉब्लेम / धोका असा की हा मुद्दा सार्वजनिकरित्या पटण्यास आणि मान्य होण्यास अत्यंत कठीण.. वेगवेगळी इंटरप्रिटेशन्स करुन प्रचंड विपर्यास होणेबल आणि सध्याच्या "सिस्टीम"मधे "मॅनेज" करायला कठीण..

महायुद्धाच्या कारणमीमांसेबद्दल सहमत आहे. पण वसाहतवादामागे असुरक्षितता कसली होती? असो.

बाकी

देशभक्तीच्या भावनेचा उपयोग लोककल्याणासाठी नसेल तर एक भावना म्हणून ती मला फोल वाटते.

हे पटणीय आहे खास.

हारुन शेख Fri, 15/11/2013 - 14:47

In reply to by बॅटमॅन

पण वसाहतवादामागे असुरक्षितता कसली होती?

वसाहत टिकवण्याची.
जलियानवाला बाग नरसंहार करणारा जनरल डायर इंग्लंडात "The Man who saved India" ठरला. ब्रिटीश जनतेने त्याच्यासाठी २६००० स्टर्लिंग पौंड निधी म्हणून जमवले.

वसाहतवाद आणि असुरक्षितता या एका नाण्याच्या दोन बाजू होत्या/आहेत

बॅटमॅन Fri, 15/11/2013 - 18:33

In reply to by हारुन शेख

अंमळ गल्लत होतेय असं वाटतं. डिझायर टु एक्स्पांड नीड नॉट बी असुरक्षितता. असो, पण हा मुद्दा तादृश महत्त्वाचा नाही.

आडकित्ता Sat, 16/11/2013 - 00:26

In reply to by बॅटमॅन

मला तुमचा हा प्रतिसाद अजिबात पटला नाही.
मराठी लिहिणार्‍या मुस्लीम आयडिला युरोपियन द्शभक्ती अन अमेरिका इत्यादी विचारताहात. काय संबंध हो? काही हिडन रेफरन्सेस आहेत का?
बॅटोबा,
नक्की काय म्हणायचंय तुम्हाला तिथे?

संपादनः
बाकी चर्चा वाचल्यानंतर माझाच प्रतिसाद व श्रेणी अवांतर आहे ;)
असो.

हारुन शेख Fri, 15/11/2013 - 12:30

काय सुंदर मराठी बोलतोस ? ब्राम्हण आहेस ?

शेख का ? बहोत अच्छा लगा आपसे बात करके शेखभाई । (शेख आडनाव कळण्यापूर्वी अर्धा तास सर्व संभाषण निशंकपणे मराठीत चाल्लेले )

चार बायका करायची सूट असते ना, मजाये ब्वा तुम्हा लोकांची.

अजो१२३ Fri, 15/11/2013 - 13:16

In reply to by हारुन शेख

काय सुंदर मराठी बोलतोस ? ब्राम्हण आहेस ?

सीओइपीत पहिल्या वर्षी मी आणि समीर शेख नावाचा मित्र बर्‍यापैकी एकत्र असायचो. तो एकदम नाकाडे शुद्ध पुणेरी मराठी बोलायचा आणि झकपक राहायचा. त्यामानाने मी गावाकडून आलेला आणि मराठी प्रचंड अशुद्ध. अवतार पांडूरंग! साले लोक त्यालाच अरुण जोशी समजायचे. पहिले एक-दोन महिने तरी मला पुरता बाटवला होता, नवे लोक भेटले कि अर्धा अर्धा तास नि:शब्द राहायची माझी सवय चांगलीच भोवली होती. तो घरी मुसलमानी हिंदी कशी बोलत असेल ते अजूनही मला कल्पवले गेले नाही.

बॅटमॅन Fri, 15/11/2013 - 18:34

In reply to by अजो१२३

तसे मित्र पाहिले आहेत. सहाध्यायांशी एकदम शुद्ध मराठी अन घरच्यांशी शुद्ध दखनी. इमिजिएट स्विच ऑफ रजिस्टर पाहिला की जाम मजा वाटायची.

अजो१२३ Fri, 15/11/2013 - 13:27

In reply to by हारुन शेख

चार बायका करायची सूट असते ना, मजाये ब्वा तुम्हा लोकांची.

असे तोंडावर म्हणणारे हिंदू फार बोल्ड म्हणेन मी. पण एखादं समृद्ध मुस्लिम कुटुंब सार्वजनिक स्थळी दिसलं कि लगेच 'यांच्या ४-४ बायका आणि प्रत्येकीचे ८-१० लेकरं' असं हिंदू लोक हलक्या आवाजात आपसात हमखास म्हणतात. अर्थात ही सोय आपल्याला नाही असंच त्यांना जास्त म्हणायचं असतं.

मी १०-२० दोन बायका असलेली घरं पाह्यली आहेत. सगळीच हिंदू!

गवि Fri, 15/11/2013 - 13:54

In reply to by अजो१२३

याबाबत बर्‍याचदा अशा स्वरुपाचं मत येतं:

"अरे.. परवानगी असली तरी प्रत्यक्षात चार चार लग्नं करणं आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सर्वांना शक्य तरी आहे का ?"

..निव्वळ संख्याशास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तरी असं प्रत्यक्षात कितपत प्रमाणात घडत असेल किंवा घडू शकेल असा प्रश्न पडणं तर्काने बरोबर आहेच.

मुळात असं आहे की हा विरोध म्हणा, किंवा जळणं म्हणा किंवा वैषम्य म्हणा किंवा जी काय भावना असेल ती (निगेटिव्ह) असण्याचं मूळ कारण हे प्रत्यक्षात काय घडतं हे नसून "मुभा असण्या"पुरतं आणि "मुभा असण्या"मुळेच आहे. [ त्याला तेवढी सायकल आणि मला नाही.. असा प्रकार आहे.. सायकल किती चालवतात किंवा चालवता येते का यावर काही अवलंबून नाही. :) ]

बर्‍याचदा अशा "प्रत्यक्ष काय होतं" या मुद्द्यांच्या आधारे हिंदूंच्या मनात तयार झालेलं चित्र कसं चुकीचं आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो.. पण कायदा वेगळा लागू आहे हे सत्यच ना?

सर्व हिंदू किंवा सर्व मुस्लिम अमुकच एक प्रकारचे असतात अशी चुकीची धारणा दोन्ही बाजूंना न होऊ देण्यासाठी किंवा ती निवळण्यासाठी असे अ‍ॅबसोल्यूट मूलभूत नियम / मुद्दे / कायदे यांना मात्र स्पर्श होत नाही हे खरं.

पुन्हा प्रत्येक मत हे देणारा कोण आहे यावरही पूर्ण उलटं इंटरप्रीट होऊ शकतं. हीच वरची घटना तुमचा मुस्लिम मित्र सांगत असता तर ?? काय अर्थाने / छटेने ऐकलं असतं?

मुळात एका सरासरी हिंदूच्या आयुष्यात त्याला इतर हिंदू जास्त आणि मुस्लिम कमी भेटतात.

त्याउपर जे (तुलनेत) थोडे भेटले त्यावरुन तो मत बनवतो. पूर्णच्यापूर्ण व्ह्यू मिळत नाही. आणि तो मिळण्याचा मार्गही नाही.

मुस्लिम धर्मात "धर्म" हा रोजच्या व्यवहारात जास्त सिरियसली घेतला जाण्याचं प्रमाण जास्त आहे हे बहुधा नि:संशय मान्य व्हावं.

त्यामुळे उपास सोडायला किंवा मारुतीला जायला मीटिंगमधून अर्ध्यात उठलेला कलीग पाहिलेला नसतो, पण नमाजाची वेळ झाली म्हणून उठलेला कलीग मी तरी अनेकदा पाहिला आहे. तो धर्माचा कडक आणि सिरियसली घेतला जाणारा नियम आहे.. त्यात चूक काही नाहीच..तो न पाळणारेही काही मुस्लिम असतील पण तसे हिंदूंपेक्षा कमी दिसतात..

आता आजुबाजूच्यांना काय दिसतं की.. याची हाय्येस्ट प्रायोरिटी म्हणजे धर्म.. मीटिंगचा चेअरमन किंवा ट्रेनरही ते आधीच जाणून लगबगीने -- हो हो.. नमाज ना.. जा जा..- असं म्हणतो. हे वेगवेगळ्या राज्यांतल्या ठिकाणी पाहिलं आहे. आपल्या बाबतीत आपल्याला असं मधेच जाऊ दिलं नसतं असा एक (कदाचित उगीचच) समजही करुन आतल्याआत ठेवला जातो.

असं करत जितक्या जास्त नोंदी होतील तितकं ते वैषम्य दृढ होतं.

आणि हिंदू हा आपल्या धर्माबाबत कितीही अस्मिता इ इ बाळगून असला तरी मुस्लिम धर्माइतका धर्माची डेली कंप्लायन्स आणि रिजिडिटी नसते.

त्यामुळे तुलनेत मुस्लिम धार्मिक वाटतो आणि मग उगीचच एक "ते वेगळे, आपण वेगळे" हा भाव निर्माण होतो.

या बद्दल काहीही लिहीलं तरी चुकीचंच इंटरप्रीटेशन होण्याची ९९% शक्यता असल्याने प्रतिसाद स्वतःच संक्षिप्त करुन टाकत आहे.

बॅटमॅन Fri, 15/11/2013 - 13:58

In reply to by गवि

मार्मिक अन नेमके. जेवढे लिहिलेय त्यापेक्षा इंचभर इकडेतिकडे सरकले तरी लोक तुटून पडतील पण यात तसे काही नाही. अन हे खरेच आहे.

मी Fri, 15/11/2013 - 14:35

In reply to by गवि

मुळात एका सरासरी हिंदूच्या आयुष्यात त्याला इतर हिंदू जास्त आणि मुस्लिम कमी भेटतात.
त्याउपर जे (तुलनेत) थोडे भेटले त्यावरुन तो मत बनवतो. पूर्णच्यापूर्ण व्ह्यू मिळत नाही. आणि तो मिळण्याचा मार्गही नाही.

अधोरेखिताबद्दल आक्षेप, जे थोडे भेटले त्यांच्याकडून माहिती मिळणे शक्य आहे, आणि पूर्ण व्ह्यू मिळत नसल्यास अमुक एक मत बनविणे गैर आहे असे वाटते.

मी Fri, 15/11/2013 - 14:43

In reply to by बॅटमॅन

साधारणपणे सहमती दर्शवतो पण मग माहिती नसताना 'मत' बनवण्यासाठी एव्हरीबडी इज इंटरेस्ट्रेड, इज दॅट जस्टीफाइड?

बॅटमॅन Fri, 15/11/2013 - 14:49

In reply to by मी

ज्या पद्धतीने प्रश्न विचारलाय ते पाहता एकच उत्तर संभवते ;) पण हे कुठल्याही केसमध्ये लागू पडते, नै का? म्हणजे समाजाचे नीट निरीक्षण न करता झोडणे हा स्थायीभाव असलेल्या मनोरानशीन विद्वानांनाही तितकेच लागू पडते. असो, अर्थात एकाने गाय मारली म्हणून दुसर्‍याच्या वासरूहत्येचे समर्थन होत नाही-प्रोव्हायडेड गाय/वासरू मारणे चूक अशी धारणा असेल तर.

पण मग हा गैरसमज अगदीच कै खोटा नाही. किमान वेगळेपण उठून दिसण्याइतपत तरी नक्कीच आहे. इतक्यावरून मत बनले तर फार दोषही देऊ नये असे माझे मत आहे. असो.

गवि Fri, 15/11/2013 - 14:41

In reply to by मी

पूर्ण व्ह्यू मिळत नसल्यास अमुक एक मत बनविणे गैर आहे असे वाटते.
.

गैर आहे..होऊ नये पण सर्वसामान्य माणसाच्या मनात तसं होतं हेही खरंच. काय होतं ते मांडल्याने ऑपॉप त्याचं समर्थन होतंच असं नाही.

गवि Fri, 15/11/2013 - 14:48

In reply to by मन

ठीक आहे. लेखी चर्चेतले नमुने:

-तुमच्या "### अमुक" या विधानाने गंमत वाटली- (वास्तविक अजिबात गंमत वाटलेली नसून वर्मी लागलेले असते)
- अंशतः सहमत (माघार, पण अगदीच नाकावर पडून नको.)
-असो.. हा माझा शेवटचा प्रतिसाद. (म्हणजे आता मी पाचपाच मिनिटाला फक्त रिफ्रेश मारत तडफडत बसणार)
;)

बॅटमॅन Fri, 15/11/2013 - 15:05

In reply to by गवि

=)) =)) =))

क्र. १ आणि ३ अगदी अगदीच बलीवर्दनेत्रभञ्जक आहेत =))

त्यात अजून एक निरीक्षण अ‍ॅडवावेसे वाटते म्हणजे "अमुक अमुक विधान मला ''रोचक'' वाटलं." रोचक हा शब्द शिवीसारखा वापरल्या जातो ;)

हारुन शेख Fri, 15/11/2013 - 15:00

In reply to by गवि

गवि प्रतिसाद पटला आणि आवडला. वेगळा कायदा नसावा असे माझे स्पष्ट मत आहे. देशाच्या आणि सर्व लोकांच्या दीर्घकालीन हितासाठी ते आवश्यक आहे. पण दुहीचं राजकारण करणाऱ्या आपल्या देशातल्या राजकारण्यांना ते सोयीस्कर नसणार. मुस्लिम समाजातून अशी मागणी पुढे / मागे येईलच अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही. आधुनिक शिक्षणाचा प्रभाव पडतोच.

'न'वी बाजू Fri, 15/11/2013 - 18:13

In reply to by हारुन शेख

वेगळा कायदा नसावा असे माझे स्पष्ट मत आहे.

वेगवेगळे 'पर्सनल लॉज़' असण्यामागे काही पारंपरिक, रीतिरिवाजात्मक (आणि कदाचित ऐतिहासिकसुद्धा) पार्श्वभूमी असू शकते, आणि असे वेगवेगळे 'पर्सनल लॉज़' असण्यात तत्त्वतः, 'पर से' काही गैर अथवा अडचणीचे आहे, असे मला व्यक्तिशः वाटत नाही.

अर्थात, बहुपत्नीत्व, त्रिवारतलाक वगैरे प्रकार मुस्लिम समाजास जर अनिष्ट वाटत असतील, तर त्यांविरुद्ध मुस्लिम पर्सनल लॉमध्ये योग्य ते बदल संबंधित बोर्डामार्फत आणि कायदेमंडळामार्फत करवून घेण्याची मागणी करण्याची मुभा मुस्लिम समाजास आहेच. मात्र, अशी मागणी करण्याचा अधिकार हा मुस्लिम समाजाचा आहे; इतरांनी तसे लादणे हे इष्ट वा उचित ठरणार नाही, एवढीच भूमिका आहे.

(थोडक्यात, if these are issues at all, they are internal issues of the Indian Muslim society. पण (यांचे सार्वजनिक / राष्ट्रीय इश्यूज़ न बनवणे हे) दुहीचे राजकारण करणाऱ्या आपल्या देशातल्या राजकारण्यांना सोयीस्कर नसणार, हा भाग आहेच.)

बॅटमॅन Fri, 15/11/2013 - 18:24

In reply to by 'न'वी बाजू

मुस्लिम समाजातल्या अमुक एका गोष्टीचे मतांसाठी भांडवल करू नये हे ठीकच.

पण मुळात समान नागरी कायद्याचा आग्रह धरणे चूक कसे ते समजत नाही. वेगळ्या कायद्यांमागे काहीएव्क पार्श्वभूमी असते हे खरे, पण मग बदलत्या स्थितीत ती मानलेली पार्श्वभूमी कितपत स्थिर आहे याचाही विचार व्हावयास हवा. मुस्लिम समाज आज अनेक बाबींत पिछाडीवर आहे. त्याला मुख्य प्रवाहात आणून पुढे न्यायचे तर वेगळे नियम लावणे कितपत योग्य? इथेही परत पुढे जायचे की तिथेच रहायचे हा चॉइस त्या समाजावर सोडू म्हणण्यात अर्थ नाही. सरकारने असे हस्तक्षेप करणे हे वेल्फेअर स्टेटच्या आजच्या काळात अपेक्षितही आहे.

शिवाय, समान नागरी कायद्यामुळे मुस्लिम समाजात असे कोणते आमूलाग्र बदल होणारेत की ज्यांमुळे त्यांचे वेगळे अस्तित्व धोक्यात येईल? त्यांची जीवनशैली अशी काय वेगळी आहे?

अवांतरः गोव्यात समान नागरी कायदा आहे. त्यामुळे तिथल्या मुसलमानांत असंतोष असल्याचे कोणी पाहिलेय का?

मेघना भुस्कुटे Fri, 15/11/2013 - 18:31

In reply to by बॅटमॅन

सहमत. शिवाय त्यामुळे भगव्या मूलतत्त्ववाद्यांच्या हातातले, ते कधीही नष्ट होऊ देणार नाहीत असे शस्त्र मुळातूनच नाहीसे होईल.

हारुन शेख Fri, 15/11/2013 - 20:26

In reply to by नितिन थत्ते

पाडायला ती एकच वादग्रस्त मशीद / वास्तू असती तर कधीच नसती पाडली. भारतात अश्या वादग्रस्त वास्तू खूप आहेत. भगव्या मूलतत्त्ववाद्यांचे अस्तित्व टिकेल इतक्या तर नक्कीच.

अजो१२३ Fri, 15/11/2013 - 20:40

In reply to by हारुन शेख

असंच म्हणायचं झालं तर ज्यांनी कुणी कोणताही प्रश्न सोडवला वा कोणतीही निर्णायक कृती केली त्यांनी इतर अशा बर्‍याच कृती उरल्या होत्या म्हनून केल्या असे होईल. गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य (मिळवून) दिलं ते आफ्रिकेतल्या बर्‍याच देशांचं अजून उरलं होतं म्हणून असं का?

तत्त्व चांगलं असो वा वाईट, तत्त्ववाद्यांना आपल्या तत्त्वात आस्थाच नसते म्हणणे अस्वीकार्य आहे.

बॅटमॅन Fri, 15/11/2013 - 20:50

In reply to by अजो१२३

तत्त्व चांगलं असो वा वाईट, तत्त्ववाद्यांना आपल्या तत्त्वात आस्थाच नसते म्हणणे अस्वीकार्य आहे.

हे बाकी प्रचंड सहमत. तत्त्वनिष्ठेत शिवचरित्रकार श्री. गजानन मेहेंदळे आणि श्रीमंत कोकाटे, संजय सोनवणी हे सर्वच जण सारखेच अव्वल आहेत.

मन Fri, 15/11/2013 - 21:03

In reply to by बॅटमॅन

"मंदिर बांधून झाले तर हिंदुत्ववाद्यांचा मुद्दाच संपेल" हा मला आशावादातून आलेला विचार वाटतो.
त्यांना निर्विरोध (निदान २/३ जागा ) मिळू द्यात; मंदिर बांधल्याशिवाय रहायचे नाहित.
हे म्हणजे "सगळे रोगी बरे झाले तर डॉक्टरला काम काय" असे म्हटल्यासारखे आहे.
थट्टा म्हणून ह्यात तथ्य आहे; प्रत्यक्षात नाही.
वेगळ्या भाषेत सांगायचं तर "उर्वरित काश्मीर पाकिस्तानला देउन टाकला तर भांडण राहिलच कुठे" असं म्हटल्यासारखं आहे.
किंवा " उर्वरित काश्मीर पाकिस्तानला नकोच आहे. तसे ते मिळाले तर मुद्दा उरतोच काय त्यांच्याकडे?" असं म्हटल्यासारखं आहे.
.
म्हणजे एकदा अ ने ब कडे शरणागती पत्करली, तर ब कदील मुद्दाच संपुष्टात येतो असे म्हटल्यासारखे आहे.
वस्तुतः त्यात ब च्या आर्ग्युमेंटास अधिक बळ मिळते, जोर चढतो.
ब ला विजयी व्हायचेच नव्हते; शरणागती नकोच होती असे म्हणणे त्यामुळेच पटत नाही.
.
"तस्मात् हिंदुत्ववाद्यांना मंदिर रेंगाळत ठेवायचे आहे" हे वाक्य चमत्क्रुतीपूर्ण असल्याने लक्षवेधक ठरते.
पण तर्कसंगत किंवा तथ्यपूर्ण असेलच असे नाही.
अवांतर :-
चांगले, भले, देशाच्या भल्यासाठी तळमळणारे कोण ? काँग्रेस की भाजप? किंवा ---
हिंदुत्ववादी - निधर्मी किंवा धर्मांध - निधर्मांध ह्या चिखलात मला दगड मारायचा नाहिये.
.
पण साला तो जालिय चर्चेबाबत कुणा पाश्चात्त्य तत्वज्ञाचा नियम खरा ठरतो असे दिसते.
"चर्चा जितकी लांबेल (तिचा विषय काही का असेना, अगदि बाल संगोपन कसे करावे, इथपासून ते सेव्हिंग्ज अकाउंट कोणत्या ब्यांकेत बरे मिळते,असे काहीही असले तरी)तितके त्या चर्चेत नाझी-हिटलर ह्यांचा उल्लेख होणे अटळ होत जाते."
.
भारताच्या बाबतीत फक्त नाझी ऐवजी बाबरी- हिंदुत्व वगैरे शब्द टाकावेत; नियम तोच.
.
पण छ्या . च्यामारी नियम ठाउक असूनही शेवटी मीही त्यात उतरलोच.

बॅटमॅन Fri, 15/11/2013 - 21:09

In reply to by मन

इंडीड. समजा अयोध्येत मंदिर बांधले तर काशी-मथुरा बाकी आहेतच की. जसे भांडारकरनंतर शनवारवाडा बाकी आहे.

तिथेही समजा झाले तर अजूनही कैक खुस्पटे काढता येतीलच. इट नेव्हर एंड्स.

आणि भारतीय जालचर्चेतला सनातन मुद्दा आहेच तो- हिंदूमुसलमान विषय. वादच नै.

अन

पण छ्या . च्यामारी नियम ठाउक असूनही शेवटी मीही त्यात उतरलोच.

इतके डिस्क्लेमर वगैरे देऊन आपण मुरलेले जालपटू असलो तरी फिर भी दिल तो अच्छा/सच्चा/बच्चा है जी वैग्रे दाखवण्याचं काय चाल्लंय नवीन ;)

अजून तरी वाहत्या गङ्गेत हात धुवून घ्यायला आमची हरकत नसते. काही उत्साही भगीरथांना याकामी मदतही केल्या जाते ;)

मन Fri, 15/11/2013 - 21:24

In reply to by बॅटमॅन

खरं तर मी इत़कं खरडत बसायचं कारणच नव्हतं. एका सोप्या उदाहरणात काम झालं असतं.
"हिटलरनं जर्मनी मधले किम्वा जर्मनी अंकित युरोपमधील ज्यू संपवले तर तो कुणाचा बागुलबुवा उभा करुन सत्तेवर राहणार" हे कुणी १९३५ वगैरेच्या आसपास म्हटलं असतं तर कदाचित असाच बुद्धीभेद झाला असता. प्रत्यक्षात त्यानं कित्येक भूभागातून ज्यूंचा नायनाट केला. म्हणजे मराठीत आपण "निर्वंश" हा भयानक शब्द वापरतो ना,
तसा त्यानं शब्दशः निर्वंश केला. थोडक्यात "त्याच्याकडे मग मुद्दाच उरला नाही" !!
मूलतत्ववादी धर्मवेडे प्लस त्यांचे धूर्त नेते ह्यांचा उन्माद विध्व्म्स करण्यास पुरेसा आहे.
ते पुढच्या वेळी पुढचे टारगेट शोधतीलच.
.
वाचकांची त्रिवार माफी मागतो. स्वतःच अवाम्तर करत सुटल्याबद्दल.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 15/11/2013 - 20:59

In reply to by अजो१२३

गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य (मिळवून) दिलं ते आफ्रिकेतल्या बर्‍याच देशांचं अजून उरलं होतं म्हणून असं का?

बाकी तत्त्वाबाबत नाही (म्हणजे मत नाही), पण उदाहरण पटलं नाही. गांधीजींना आफ्रिकेतल्या देशांबद्दल तेवढं प्रेम असण्याचं कारण नाही आणि त्यांच्या वागण्यातून ते तसं दिसतही नाही.

अजो१२३ Fri, 15/11/2013 - 22:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला काय म्हणायचे आहे ते पुन्हा लिहितो -
१. गांधींना भारताच्या स्वातंत्र्याशी काही देणे घेणे नव्हते.
२. म्हणून त्यांनी ते डिले केले
३. पण तरीही ते (साले) मिळालेच
४. मग काहीतरी खूस्पट हवे म्हणून त्यांनी आपला मोर्चा जगात इतरत्र कुठेही, कोणत्याही महासत्तेविरुद्ध, वळवला (असता). (स्वातंत्र्य मिळाल्यावर गांधीजींचे काय महत्त्व असा विचार लोकांनी केला असता म्हणून आपले महत्त्व कायम ठेवण्यासाठी)

असे विचार करायची पद्धत चूक आहे.

त्यापेक्षा गांधीजींना तत्वतः भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायची खरीखुरी इच्छा होती हे मानणे सोपे नाही का?

'न'वी बाजू Sat, 16/11/2013 - 03:46

In reply to by अजो१२३

असंच म्हणायचं झालं तर ज्यांनी कुणी कोणताही प्रश्न सोडवला वा कोणतीही निर्णायक कृती केली त्यांनी इतर अशा बर्‍याच कृती उरल्या होत्या म्हनून केल्या असे होईल.

"प्रश्न सोडवला"???

अरविंद कोल्हटकर Fri, 15/11/2013 - 20:49

In reply to by 'न'वी बाजू

अर्थात, बहुपत्नीत्व, त्रिवारतलाक वगैरे प्रकार मुस्लिम समाजास जर अनिष्ट वाटत असतील, तर त्यांविरुद्ध मुस्लिम पर्सनल लॉमध्ये योग्य ते बदल संबंधित बोर्डामार्फत आणि कायदेमंडळामार्फत करवून घेण्याची मागणी करण्याची मुभा मुस्लिम समाजास आहेच. मात्र, अशी मागणी करण्याचा अधिकार हा मुस्लिम समाजाचा आहे; इतरांनी तसे लादणे हे इष्ट वा उचित ठरणार नाही, एवढीच भूमिका आहे.>

वरील प्रतिसादातील भूमिका पटत नाही.

पर्सनल लॉ मुळे एखाद्या मुस्लिम व्यक्तीवर अन्याय होत आहे आणि तो दूर करावयास हवा अशी मागणी मुस्लिम समाजातूनच आली तर उत्तमच पण तशी ती येत नसली तर बाकी सर्व देशाने आणि शासनाने मूग गिळून बसावे आणि मागणी मुस्लिम समाजातूनच येईपर्यंत थांबावे हेहि टोकाचे वाटते. जेथे अन्याय होण्याचा प्रश्न नाही तेथे पर्सनल लॉ चालू दे. उदाहरणार्थ मुस्लिम मृताचे दफन करतात आणि हिंदु अग्नि देतात हा पर्सनल लॉ चालू द्यावा कारण त्यात कोणावरच अन्याय होतांना दिसत नाही. पण शाहबानोचा पोटगीचा दावा योग्य आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेहि दिल्यावर तो निर्णय उलटवण्यासाठी कायद्यात केला गेलेला बदल म्हणजे प्रतिगामी पाऊल होते. पीडिताला न्याय मिळवून देणे हे शासनाचे प्रमुख कर्तव्य आहे. ते न करता शाहबानो प्रकरणात तिच्यावरचा धडधडीत दिसणारा अन्याय मुस्लिम पर्सनल लॉ अनुसार अन्याय नाहीच अशी भूमिका घेतली गेली. हे निंद्य आहे. पर्सनल लॉ मध्ये जे लिहिलेले नाही पण योग्य दिसते अशी पुरवणी त्याला का जोडली जाऊ शकत नाही? एखाद्या न्यायी मनाच्या मुस्लिम व्यक्तीने तलाक दिलेल्या बायकोला आपखुशीने पोटगी दिली तर ते चालत असावे, यद्यपि तेहि शरियतमध्ये बसत नाही. अशा मुस्लिमाला धर्मामधून काढून टाकणार काय?

बेंटिंकच्या काळात सतीबंदी, स्वातन्त्र्यानंतर हिंदु कोड बिल ह्यांना मूलवादी हिंदूंनी विरोधच केला होता तरीहि हिंदूंच्या पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप करून धडधडीत अन्याय दूर करण्यात आलेच होते.

बॅटमॅन Fri, 15/11/2013 - 13:56

In reply to by अजो१२३

अर्थात ही सोय आपल्याला नाही असंच त्यांना जास्त म्हणायचं असतं.

सर्वच काही सोय नाही. चार बायका ही सोय वाटत असेल कदाचित-पण प्रत्येकीची (असलीच तर) आठधा पोरे ही कुणाला सोय वाटत असेल असे नाही. तदुपरि चार बायका हीदेखील सोय वाटणार्‍याचे काळीज सिंहाचेच म्हणावयास पाहिजे.असो.

हारुन शेख Fri, 15/11/2013 - 14:51

In reply to by अजो१२३

असे तोंडावर म्हणणारे हिंदू फार बोल्ड म्हणेन मी.

बोलतात की अगदी तोंडावर बोलतात. ( ते माझे दोस्त आहेत तो भाग सोडून दिला तरी ) बोल्ड हिंदू लोक फार वाढलेत. चांगलंच आहे ते. संवादाच्या शक्यता निर्माण होतात.

बॅटमॅन Fri, 15/11/2013 - 14:56

In reply to by अजो१२३

कायद्याने परमिषण नसताना कसे म्यानेज करतात? 'ठेवलेल्या' केसेसमध्येच गणना होत असेल नै का यांची? माझ्या बनारसच्या मित्राने असे किस्से सांगितले होते. रखेल ठेवली तर तिला अगदी स्वतंत्र घरबीर बांधून देणारे, तिच्यापासून होतील त्या पोरांना आर्थिक मदत करणारे इ.इ. लोक. बहुतेक सगळेच बडे.

'न'वी बाजू Fri, 15/11/2013 - 17:44

In reply to by बॅटमॅन

पहिली पत्नी हयात असताना आणि विवाहविच्छेद झालेला नसताना भारतीय हिंदू पुरुषाने दुसरा विवाह करणे हा भारतात कायद्याने गुन्हा जरी असला, तरी तो दखलपात्र गुन्हा नाही. (अपवाद: आंध्रप्रदेशमध्ये हा दखलपात्र गुन्हा आहे. उलटपक्षी, जम्मू आणि कश्मीरमध्ये प्रस्तुत कायदा मुळात लागू आहे किंवा कसे, याबद्दल निश्चित कल्पना नाही.)

याचा अर्थ असा, की असा गुन्हा घडला असता अथवा घडत असता, न्यायालयीन वॉरंटाच्या अनुपस्थितीत त्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्याचा, हस्तक्षेप करण्याचा अथवा त्याविरुद्ध साधी तक्रारसुद्धा नोंदविण्याचा अधिकार पोलिसांस नाही. याउपर, अशा न्यायालयीन वॉरंटाची मागणी करण्याचा अधिकार हाही केवळ जातीने पीडित पत्नी आणि/किंवा तिचे प्रतिनिधी या नात्याने कायद्याने अनुसूचित केलेले तिचे काही ठराविक निकटतम रक्ताचे नातेवाईक यांव्यतिरिक्त इतरांस नाही; त्रयस्थांस तर नाहीच नाही.

(उलटपक्षी, तेवढीही रिस्क घ्यावी लागू नये, याकरिता, असा दुसरा विवाह करण्यापूर्वी कागदोपत्री रीतसर धर्मांतर करून नाममात्र मुसलमान बनणार्‍या प्रतिष्ठित हिंदू केसिसबद्दलही ऐकण्यात आलेले आहे.)

===========================================================================================================================

'इन पर्सन' अशा अर्थी. 'बाय काष्ट' अशा अर्थी नव्हे. 'बाय नेशन' अशा बंगाली अर्थाने तर नव्हेच नव्हे.

बॅटमॅन Fri, 15/11/2013 - 17:57

In reply to by 'न'वी बाजू

रोचक आहे! माहितीकरिता धन्यवाद.

'ते' प्रतिष्ठित उदाहरण म्हणजे टि'प्पि'कल फिल्मी पंजाबी हिरो-मद्राशी हिरविण यांच्या लग्नाची गोष्टवालं तेच ना?

मन Fri, 15/11/2013 - 18:05

In reply to by बॅटमॅन

हो. तेच असावं.
दक्षिणेतील एका राज्याच्या मुख्यमंत्र्याचेही एकाचवेळी एकाहून अधिक विवाह आहेत असे ऐकले आहे.
(पुन्हा तेच. इतर कुणाच्या तरी खाजगी बाबीबद्दल मी बोलतोय. बर्‍याचदा हे चूक वाटतं;तरी पुन्हा तेच करतो.)

बॅटमॅन Fri, 15/11/2013 - 18:11

In reply to by मन

इतर कुणाच्या तरी खाजगी बाबीबद्दल मी बोलतोय. बर्‍याचदा हे चूक वाटतं;तरी पुन्हा तेच करतो

=))

प्रत्येकाचे वैयक्तिक विचार काय असावेत अन काय नसावेत, कसे असले तर अमुकद्वेष्टे, इ.इ. वर खल चालणारे धागे तर प्रत्येक संस्थळाची शान असतात अन ट्यार्पीचा प्राण असतात. त्या सौंस्थळसञ्जीवनीला चूक म्हणण्याचे पातक नको करूस हो मनोबा.

नितिन थत्ते Fri, 15/11/2013 - 19:38

In reply to by 'न'वी बाजू

माझ्या माहितीप्रमाणे तक्रार करण्याचा अधिकार दुसर्‍या (पहिल्याच्या नंतरच्या कोणत्याही) पत्नीस असतो. पहिल्या पत्नीस नसतो.
[यामागचे लॉजिक कदाचित असे असावे...... पहिल्या पत्नीचा अधिकार घटस्फोट होईपर्यंत अबाधित असतो. त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या दुसरे लग्न हे मुळात झालेलेच नसते. Void ab initio. तेव्हा दुसर्‍या पत्नीची फसवणूक झालेली असते म्हणून तिला तक्रार करण्याचा अधिकार.]

मन Fri, 15/11/2013 - 20:02

In reply to by नितिन थत्ते

सिरियसली विचारतोय.
एखाद्या स्त्रीने पहिल्या विवाहातून अधिकृतपणे स्वतंत्र न होता, दुसरे लग्न केले तर?
द्विभार्या प्रतिबंधक का कायसा कायदा आहे ना, तसा द्विदादला प्रतिबंधक कायदा आहे का?

नितिन थत्ते Sat, 16/11/2013 - 21:10

In reply to by मन

द्विभार्याप्रतिबंधक कायदा अश्या नावाचा काही कायदा अस्तित्वात आहे की नाही याबाबत साशंक आहे.

हिंदू विवाह कायद्यात पहिला विवाह चालू असताना दुसरा (किंवा तिसरा, चौथा....) विवाह करता येत नाही अशी तरतूद आहे.

प्रतिसादातील अ‍ॅडिशन
गूगलवर Prevention of Polygamy Act असे शोधले असता काही रिझल्ट येत नाही. येणारे रिझल्ट हिंदू विवाह कायद्याकडे निर्देश करतात. कदाचित हिंदू विवाह कायदा १९५५ अस्तित्वात येण्यापूर्वी असा कायदा तात्पुरता करण्यात आला असेल.

अवांतर: कुठलाही कायदा निर्वात पोकळीत अस्तित्वात येत नाही. परंपरेने एकापेक्षा जास्त दादले करण्याची स्त्रियांना मुभा नसल्याने तसा कायदा करण्याची गरज जाणवली नसेल. अर्थात हिंदू विवाह कायद्यात दोघांनाही मोनोगामी सक्तीची आहे.

राधिका Fri, 15/11/2013 - 13:23

तुझं कुठे काही आहे का? (यावर मी एकदा उत्तर दिलं होतं, "हो, तमुक बँकेत खातं आहे ना!" :ड)
लाडू की बर्फी?
स्वैपाक करता येतो का? (आणि पुढे- "नाही म्हणजे, आजच्या मुलींना स्वैपाक करता येत नाही म्हणून विचारलं.")
काय योग असतात एकेक!
सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बर्‍या.
आईवडिलांच्या कष्टांचं सार्थक केलं हो!
छे, छे! आम्हाला हुंडा-बिंडा नको, लग्नात तिच्या अंगावर जे काही सोनं घालाल ते चालेल. (क्लिशे म्हणून हे वाक्य सांगणं हाही क्लिशे झाला असावा बहुधा आतापर्यंत, पण लहानपणापासून ज्याला ओळखायचे अशा मित्राने त्याच्या लग्नाच्या बोलण्यांच्या वेळेस सासरच्यांना हे सांगितलं हे ऐकल्यावर 'हल्ली लोक सुधारलेत' (हा आणखी एक लोकसंवाद) हा माझा गैरसमज लगेच दूर झाला. असाच गैरसमज आणखी कोणाचा असेल, तर तो दूर व्हावा म्हणून हा लोकसंवाद इथे देते आहे.)
खरं सांगायचं तर माझा पत्रिकेवर विश्वास नाही, पण पत्रिकेशिवाय चालत नाही ना!

आणि लहानपणी नातेवाईकांकडून ऐकलेले काही-
नाक टोचलं नाही तर (स्वतःच्या) लग्नात नथ कशी घालणार?
मुलीच्या जातीने मोठ्याने हसू नये.
आता वंशाला दिवा कधी?

राधिका Sat, 16/11/2013 - 19:27

In reply to by ऋता

बरोबर, 'पेढा की बर्फी?' असंच विचारतात. हा संवाद आणि 'काय मग आता लाडू कधी? ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.' हा संवाद यांत मी गोंधळ घातला. :ड

याचं परवा फेसबुकवर वाचलेलं एक व्हेरियेशनः It's a gift in pink or blue?

राजेश घासकडवी Sat, 16/11/2013 - 05:16

In reply to by राधिका

संवाद छान पकडले आहेत....

तुझं कुठे काही आहे का? (यावर मी एकदा उत्तर दिलं होतं, "हो, तमुक बँकेत खातं आहे ना!" (दात काढत))

'आजकाल काय, वेगवेगळ्या ब्यांकांमध्ये खाती उघडता येतात. कलयुग आहे, दुसरे काय?'

सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बर्‍या.

हे वाक्य, 'नाही, म्हणजे कसं...' ने सुरू होतं बऱ्याच वेळा.

'न'वी बाजू Sat, 16/11/2013 - 05:20

In reply to by राजेश घासकडवी

सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बर्‍या.

याला, "हो ना! म्हणून तर रोज रात्री नित्यनेमाने इसबगोल घेतो/ते." हे "उत्तर" (प्रत्यक्षात इसबगोल घेत असलो किंवा नसलो तरी) चपखल आहे, नाही?

बॅटमॅन Fri, 15/11/2013 - 14:00

यात हे कसे राहिले???

"अलीकडे च्यायला $$$$$$ फार माजलेत."

इथे $ च्या जागी जातधर्माधारित नावच पाहिजे असे नाही. सेक्युलरपणे पाहिले तरी कारकुनापासून साह्यबापर्यंत कोणीही येते.

बॅटमॅन Fri, 15/11/2013 - 14:24

In reply to by मी

मआंजाच्या सुरुवातीच्या दिवसांत स्त्री/स्त्रीसदृश आयडींच्या खवमध्ये हा संवादही लै दिसायचा म्हणे - "%$$% मझ्यशि मय्त्रि कर्न्र कं" ;)

मी Fri, 15/11/2013 - 20:45

एकापेक्षा अधिक बायकांशी संबंधीत कायदेशीर बाबींबद्दल एवढी तपशीलवार माहिती ह्या धाग्यात मिळाली, उगाच आपण "ह्याना बरं हे सगळं माहीत आहे!!" हा लोकसंवाद म्हणावा?

राही Fri, 15/11/2013 - 20:59

आमच्यात असं नसतं बुवा/बाई.
जुनं हाड आहे ते. घरच्या दुधातुपावर वाढलेलं. (नव्वद वर्षे वयाची ही व्यक्ती पेस-मेकरमुळे कशीबशी जिवंत आहे आणि तिची बाकीची चार भावंडे साठीतच आटोपलीयत.)
सगळ्या नेत्यांना / राजकारण्यांना / बॉसला / सरकारी कर्मचार्‍यांना / बँक कर्मचार्‍यांना / xxx ना गोळ्या घातल्या पाहिजेत.
बामण / मराठे / बी ग्रेडी / भय्ये / रिक्शावाले /ओबीसीज् / दलित / xxx माजलेत नुसते.

राजेश घासकडवी Sat, 16/11/2013 - 05:34

माझ्या विशिष्ट परिस्थितीमुळे मला ऐकू आलेले काही रोचक संवाद. हे चिरपरिचित असतीलच असं नाही.

-'काय, तुझी मुंज झाली नाही? अरे मग तू ब्राह्मण कसा ठरणार?' (मी पीएचडी करत असताना 'मॉ मै बीए पास हो गया!' म्हणत आनंदाने शिक्षण सोडणाऱ्याचे हे उद्गार)
याचंच आणखीन एक व्हेरिएशन
-'अरे, मुंज नाही झाली तर लग्नाच्या वेळी प्रॉब्लेम येतो. कारण सोडमुंज झाल्याशिवाय लग्न करता येत नाही. म्हणून आजकाल मुंज न झालेल्यांना लग्नाच्या दोन दिवस आधी मुंज आणि एक दिवस आधी सोडमुंज करावी लागते.'

इतर काही चिरपरिचित असावेत असा अंदाज
-'हो, तुम्ही वैज्ञानिकसुद्धा विज्ञानावर शेवटी विश्वास ठेवात, म्हणजे ती तुमची अंधश्रद्धाच नाही का'
-'हे राजकारणी म्हणजे सगळे साले एकजात हरामखोर'
-'अहो, स्विस बॅंकांमध्ये भारतीयांचे ४०० लाख कोटी रुपये आहेत. ते जर परत आले, तर भारताचे सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील.'
-'सगळा समाज रसातळाला चाललाय, बाकी काही नाही.' (हे म्हणणारे बहुतेक पन्नाशीच्या पुढचे लोक असतात.)
-'साला आमच्या काळी असं नसायचं.' (हे म्हणणारे लोक आजकाल तिशीच्या अलिकडेही सापडतात. आमच्या काळी असं नसायचं. आमच्या काळी फक्त चाळिशीतले लोक असलं म्हणायचे.)
-'आजकाल सांगू का.....' यापासून सुरूवात होऊन कुठेही संपणारी अनंत विधानं येतात.
- 'सचिन साला स्वतःसाठी खेळतो. त्याची सेंचुरी झाली की भारत हरणार हे डेफिनिट' 'सचिन म्हणजे गॉड आहे!' ही दोन विधानं काही काळाने आलटून पालटून ऐकण्याची सवय होती. आता आपण या सर्वच आनंदाला मुकणार. कदाचित कोहली, धवन, शर्मा, पुजारा यांपैकी कोणीतरी त्या जागेवर पोचण्याची वाट बघावी लागेल.

बॅटमॅन Sat, 16/11/2013 - 15:26

In reply to by राजेश घासकडवी

आयला हे मुंजीचं विसरलोच होतो!! हे मलाही ऐकावं लागायचं लहानपणी. त्यावेळी सगळे जरा जास्तच इश्श्यू करायचे अन मी बाबांना आग्रह करायचो मुंजीचा. पण ते काही झालं नाही अन मीही तेवढ्यापुरते सोडल्यास पाठपुरावा कधी केला नाही. आता तर सोडाच. :)

बाकी, सचिन स्वतःसाठी खेळतो असा दावा करणारे एक बाष्कळ आर्टिकल नुकतेच वाचले. वायझेड लेखक मेला!

http://www.livemint.com/Opinion/PKgPHTk5wKn8DZLRpCtCyK/Master-Blaster-o…

वरकरणी लेजिट वाटतील असे मुद्दे आहेत खरे. पण आयॅम शुअर की क्लोज स्क्रूटिनी केली तर बर्‍याच वावड्या उडून जातील.

राजेश घासकडवी Sun, 17/11/2013 - 04:59

In reply to by बॅटमॅन

वरकरणी लेजिट वाटतील असे मुद्दे आहेत खरे. पण आयॅम शुअर की क्लोज स्क्रूटिनी केली तर बर्‍याच वावड्या उडून जातील.

क्लोज स्क्रुटिनी करून हे भंपक असल्याचा लेख मी मिपावर लिहिलेला आहे.

बॅटमॅन Sun, 17/11/2013 - 12:14

In reply to by राजेश घासकडवी

लेख वाचला. पण शतके सोडली तर अन्य मुद्द्यांचा परामर्श त्यात नाहीये. जेवढे लिहिलेय ते अर्थातच पटण्यासारखे आहे पण अन्य मुद्दे असते तर अजून बहार आली असती.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 17/11/2013 - 04:07

अगदी दोनच दिवसांपूर्वी एकाने मारलेलं, नेहेमी ऐकू येणारं वाक्य, "बायकांना विनोदबुद्धी नसते". (आणि त्यात मला बाई म्हणाल्याबद्दल किंचित अपराधीभाव होता. :ड)

"बायकांना गाडी चालवता येत नाही" हे याचंच भावंडं.

(ही वाक्यं एवढ्या वेळेला आणि एवढ्या लोकांकडून ऐकलेली आहेत की आता, कोण बोललेलं नाही, याची नोंद ठेवायला सुरूवात केल्ये. सोपं पडतं.)

अजो१२३ Sun, 17/11/2013 - 12:32

१. दलितांना आरक्षण दिल्यापासून सरकारी सेवांचा दर्जा घसरला आहे.
२. तुझीही बायको सिरियला पाहते? घरोघरी मातीच्या चुली!
३. त्याच्या सोबतचे सगळे आज अमेरिकेत आहेत. हाच मागे राहिला.
४. आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे.
५. ऐकलं का? हे वारले. फार कै नै, ४०-४५ चे च होते. चांगले धडधाकट. आजकाल मंडळी कधी कोण कशाने जाईल सांगता येत नाही.
६. लोकसंख्या फार वाढलीय.

मन Sun, 17/11/2013 - 12:41

In reply to by अजो१२३

सत्यनारायण ज्याला करायचा आहे; त्यानं करावा. करायचा नसेल त्यानं करु नये.
पण हल्ली निमंत्रण देतानाच "तसं मला काही फारसं पटत नाही; पण हिच्या/ह्यांच्या आग्रहासाठी आपला विधी ठेवलाय" हे सांगायची फ्याशन आली आहे.
म्हणजे इतर ठिकाणी वेगळ्या संदर्भाने चर्चा सुरु असेल, तिथे आपलं मत म्हणून देणं आणि हे सांगणं वेगळं (कुटुंबियांच्या मताचा आदर करतो वगैरे.)
पण अरे निमंत्रण देताय ना? ते सरळ द्या ना. इतकं काही अपराधी वाटून घ्यायची गरज नाहिये. तुम्ही काही नरबळी देणार नैय्ये.
मस्त चविष्ट शिरा चार जणात वाटून खाताय. द्या की निमंत्रण बिंधास्त.

'न'वी बाजू Sun, 17/11/2013 - 21:10

In reply to by अजो१२३

५. ऐकलं का? हे वारले. फार कै नै, ४०-४५ चे च होते. चांगले धडधाकट. आजकाल मंडळी कधी कोण कशाने जाईल सांगता येत नाही.

'हे' वारले, तर सांगणारी इतक्या कूलली ते असे सांगेल, असे वाटत नाही. निदान अद्याप तरी. अ‍ॅट लीष्ट, आय होप नॉट. नाही म्हणजे, मी सोडल्यानंतर भारत पुष्कळ बदलला आहे, याची जाणीव आहे, परंतु इतकीही प्रगती झाली असेल, यावर विश्वास बसत नाही.

(बाकी चालू द्या.)
=========================================================================================================================================

(नाही म्हणायला, आजकाल 'हे' असे कोणी म्हणत असेल, असेही वाटत नाही, परंतु, 'ऐकले का? आमचा मक्या गचकला. फार नाही, ४०-४५चाच होता.' इतके कूलली म्हणण्याइतपत प्रगती माझ्या भूतपूर्व मायभूमीत अद्याप झाली असण्याबाबत साशंक आहे. चूभूद्याघ्या. असो.)

ऋषिकेश Mon, 18/11/2013 - 10:38

धागा बराच मोठा झाला आहे. तेव्हा थोडीशीच पुरवणी:

-- ती मुलगी असूनही.... या धृपदाने सुरू होणारी बहुतांश वाक्ये. उदा. ती मुलगी असूनही तीन मागणी घातली, ती मुलगी असूनही एकटीने लोन्सच्या भानगदी करून घर घेतले, ती मुलगी असूनही ऑनसाईटला एकटी गेली, ती मुलगी असूनही नाईट शिफ्टला तयार झाली, ती मुलगी असूनही...)
-- चांगला पुरूषा सारखा पुरूष तु अन्.... या पालुपदाने सुरू होणारी वाक्ये (उदा. चांपुसापुतु आणि ड्रायविंग येत नाही?, चांपुसापुतु आणि कुत्र्याला घाबरतोस, चांपुसापुतु आणि जेवण करत बसतोस, चांपुसापुतु आणि बायकोसाठी आम्हाला टांग, चांपुसापुतु आणि....)
-- आता मी म्हणून सहन करतो / करते (न करून सांगता कोणाला?)
-- नाही हो आम्हालाही आवडलं असतं अशी मजा करायला पण दोन दोन होम लोन्स आहेत ना! (घ्यायला सांगितली होती कोणी?)
-- तुझं बरंय तुला आपली समजूतदार बायको मिळालीये / नवरा मिळालाय (तुला काय डोळे/कान झाकून लग्न करायला लावलं होतं की काय?)
-- सगळ आहे सायकल आहे, पुस्तकं आहेत, ट्युशन्स आहेत, गाण्याचा क्लास आहे, स्पीच थेरपिस्ट येतच असतो, खास बॅडमिंटनचा क्लास लावलाय तरी यांच तोंड वाकडं ते वाकडंच. मुलांना काय दिलं नाही सांग ना! (अहो वेळ ही गोष्ट विसरलात का?)

'न'वी बाजू Mon, 18/11/2013 - 17:23

In reply to by ऋषिकेश

-- सगळ आहे सायकल आहे, पुस्तकं आहेत, ट्युशन्स आहेत, गाण्याचा क्लास आहे, स्पीच थेरपिस्ट येतच असतो, खास बॅडमिंटनचा क्लास लावलाय तरी यांच तोंड वाकडं ते वाकडंच. मुलांना काय दिलं नाही सांग ना! (अहो वेळ ही गोष्ट विसरलात का?)

बाकीची सर्व क्रिब ('घरोघरी'न्यायाने) एक वेळ समजू शकतो (म्हणजे न समजून सांगतो कोणाला), पण स्पीच-थेरपिष्टपण? 'मुलांना काय दिले नाही (आणि तरीही तोंड वाकडेच)'-क्याटेगरीत? यांच्या जिभेला काही हाड?

या रेटने उद्या 'पोरांना भूक लागली तर जेवू घातले, चारचौघात लाज झाकायला (झालेच तर थंडीपासून संरक्षणासाठी) कपडेपण घेतले, ताप आला किंवा तंगडे तुटले तर डॉक्टरकडे/हॉस्पिटलात नेले (तरी यांचे तोंड वाकडे ते वाकडेच)' असेही म्हणतील. (म्हणजे इतर आईबाप काय पोरांना वार्‍यावर सोडतात काय?)

ऋषिकेश Mon, 18/11/2013 - 17:26

In reply to by 'न'वी बाजू

हा हा हा
सदर मुद्दा गेल्याच आठवड्यात ऐकल्याने लिहिला गेला :)
मात्र (सुदैवाने) हा जेनेरिक मुद्दा - वटवटीचा भाग - नाही हे मान्य

............सा… Mon, 25/11/2013 - 21:15

(१) त्यानेच हिला डोक्यावर चढवलीये (च्यायला! मग तुमचं का पोट दुखलं? ;))
(२) ते दीघे ना बायकोच्या ताटाखालचे मांजर आहेत नुसते.

सासूचे काही डायलॉग्स-
(३) (जरा स्वयंपाकघरात खुट्ट झाले की) काय करतेयस गं? (थोडी क्रिएटीव्हीटी म्हणून मनासारखा प्रयोगच करायचा नाही की काय?)

(४) (बायको नवर्‍याला गंभीर आवाजात)तुला एक विचारु? (ही येणार्‍या वादळाची नांदी असल्याचे जाणते नवरे ओळखतात अन "नको" म्हणून टाकतात :D )
(५) (थोडं कौतुकानीच) अमुक एक दुर्वास आहे नुसता (मला हे कळत नाही कधी कोणत्याही घरात "लेडी दुर्वास" कशी नसते?" )

अवांतर - मला एक कळत नाही प्रत्येक लग्न समारंभात एक तरी "बेबी" मावशी कशी उपस्थित असते? :D

गब्बर सिंग Tue, 26/11/2013 - 00:06

(१) त्यानेच हिला डोक्यावर चढवलीये (च्यायला! मग तुमचं का पोट दुखलं? (डोळा मारत))
(२) ते दीघे ना बायकोच्या ताटाखालचे मांजर आहेत नुसते.

यालाच पॅरलल म्हणून.

आमचा मुलगा चांगला होता ओ. पहिल्या तारखेला पगार अगदी माझ्या हातात आणून द्यायचा. पण लग्न झालं आणि बदलला. बायकोच्या डोक्याने चालतो. बायकोच्या कह्यात गेला. (२५ पेक्षा जास्त वर्षे तुम्ही "संस्कार केलेत" व प्रेम केलेत त्याच्यावर. आणि सहा महिन्यात त्या मुलीने त्याला बदलले ? तुमचे संस्कार इतके तकलादू कसे ?)

बॅटमॅन Tue, 26/11/2013 - 00:33

In reply to by गब्बर सिंग

आमचा मुलगा चांगला होता ओ. पहिल्या तारखेला पगार अगदी माझ्या हातात आणून द्यायचा. पण लग्न झालं आणि बदलला. बायकोच्या डोक्याने चालतो. बायकोच्या कह्यात गेला. (२५ पेक्षा जास्त वर्षे तुम्ही "संस्कार केलेत" व प्रेम केलेत त्याच्यावर. आणि सहा महिन्यात त्या मुलीने त्याला बदलले ? तुमचे संस्कार इतके तकलादू कसे ?)

याची कारणमीमांसा करणारा एक शुद्ध मांसाहारी खंग्री ज्योक आहे.