ऐसीकरांची ओळख
ऐसी अक्षरे वरील सदस्यांची ओळख करून देण्यासाठी हा धागा काढलेला आहे. खालील यादी अपुरी आहे ह्याची आम्हाला जाणीव आहे. पण सर्वच जर आम्ही लिहिले तर अन्य सदस्यांना वाव कसा मिळणार अशा विचाराने आम्ही थोड्क्याच माननीयांचा उल्लेख करून थांबलो आहोत. तरी संधीचा फायदा घेऊन ऐसीकरांनी यात भर घालावी ही विनंती.
अरविंद कोल्हटकर -
हे ऐसीचे पितामह. अत्यंत संतुलित, सुसंस्कृत आणि माहितीपूर्ण प्रतिसाद देणे हे यांचे वैशिष्ट्य आहे. ह्यांनी प्रतिसाद लिहिला आणि ५ मार्मिक अगर माहितीपूर्ण श्रेणी मिळाल्या नाहीत असे सहसा होत नाही. किंबहुना 'कोल्हटकर' अशी आणखीन एक श्रेणी निर्माण करावी अशी मागणी वारंवार ऐसीच्या सदस्यांकडून प्रशासनाकडे केली जाते. यांच्या व्यासंगाने दिपून जाऊन अनेकदा आमच्या मनी येते की 'आप पूज्य हैं! आप धन्य हैं! बल्कि आप पुरुष ही नही हैं, आप महापुरुष हैं!' असे म्हणत आमचे डोसके यांच्या चरणी आपटावे. मात्र काही मौजमजेच्या धाग्यांवरती आम्हा तरुणांच्या (होय होय. आम्ही तरुणच आहोत. कोण बरे संशय घेतोय? ह्म्म? ) बरोबरीने टैम्पास करताना बघून हा म्हापुरुष थोर असला तरी माणसातलाच आहे याची खात्री पटते. (जाणकारांनी मनुकांचा उल्लेख आठवावा.)
चिंतातुर जंतू -
दृश्यकला माध्यमांचे खंदे रसिक. ह्यांचे वेगळेपण म्हणजे रसिकतेच्या जोडीला जबरदस्त जाण देखील आहे. ह्यांची कलासमीक्षणे, रसग्रहणे आणि जाणकारीचा दबदबा एवढा की भलेभले ऐसीकर ह्यांचा नामोल्लेख करतेवेळी प्रथम कानाला स्पर्श करतात असे ऐकिवात आहे. (तसा आमचाही उल्लेख कानाला हात लावल्याशिवाय होत नाही, पण ते खत्रुड लोक त्याला कानाला खडा लावणे म्हणतात. असो. उपेक्षा मोठमोठ्यांच्या वाट्याला आलेली आहे.)
अनेक अनवट चित्र-नाटकांमधल्य खुब्या, बारकावे किंवा ज्यांना मराठीत न्यूआन्सेस असे म्हणता येईल, सर्वसामान्यांना कंटाळा येणार नाही अशा रसाळपणे उलगडून दाखवत असल्यामुळे त्यांनी कला-समीक्षक या पदाला काळिमा फासला आहे.
धनंजय -
ऐसीवरील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. गणित, भाषा, विज्ञान, कविता वगैरे अनेक क्षेत्रांत त्यांचा लीलया अधिकारपूर्ण संचार असतो. त्यांच्या प्रतिसादांचे वैशिष्ट्य हे की कुठे खुसपट काढता येऊ नये अशी चिरेेबंदी बांधणी. जणू काही एखाद्या मान्यवर जर्नलमधील पेपर, रीसर्चचे प्रपोझल, किंवा पीअर रीव्ह्यू रिस्पॉन्सच लिहीत असावेत. कोणीही कितीही चुकीचे, उचकवणारे विधान केले असले तरी हे फक्त थंड डोक्याने, मुद्देसूद विश्लेषण करतात. क्वचित वेळ पडल्यास खण्णकन एकच 'लुहार की' ठेवून देतात, पण तीही शालजोडीत घालून. इतके कष्ट घेत असल्यामुळे त्यांच्या म्हणण्याचा कोणी विपर्यास करताना दिसले की मात्र त्यांना अत्यंत क्लेश होतात. तरीदेखील मूळच्या सज्जनपणामुळे अशा परिस्थितीतही आपली उच्च पातळी ते सोडत नाहीत.
कोणे एके काळी ह्यांनी अत्यंत संस्मरणीय ललितलेखन केले आहे. दुर्दैवाने सध्या फारसे काहीच लिहीत नाहीत.
जयदीप चिपलकट्टी -
गणित, विज्ञान आणि भाषा या सर्व क्षेत्रांत असाधारण गती असलेल्या मूठभर ऐसीकरांपैकी हे एक आहेत. प्राज्ञ पण अतिशय ओघवत्या भाषेचे धनी. वर्षानुवर्षे अमराठी मुलुखात वास्तव्य करूनही ह्यांनी मातृभाषेची शुचिता जपली आहे. वाइनला वारुणी म्हणणारे आमच्या माहितीतले हे एकच. प्राध्यापक गणिताचे असले तरी संशोधन मराठीच्या अक्षरांवर करत असतात. त्यांची रीसर्च ग्रँट आमच्या खिशांतून जात नसल्यामुळे आम्हाला त्याचेही कौतुकच आहे.
हेदेखील ऐसीवरचे एक सभ्य व्यक्तिमत्व, पण आजकाल विक्षिप्तबाई आणि घासुगुर्जी यांच्या संगतीत असतात.
अरुण जोशी -
ऐसीच्या क्षितिजावर या अरुणाचा उदय तसा अलिकडचाच, पण अल्पकाळातच त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप उमटवलेली आहे. मूळ लेखापेक्षाही मोठा प्रतिसाद देणे या बाबतीत ते ऐसीवरचे ज्येष्ठ सदस्य 'न'वी बाजू यांना कांपिटिशन देऊन आहेत असे म्हणतात. इतर सदस्यांचे ठाउक नाही, पण दुर्दैवाने (आमच्या) त्यांचे बरेचसे लांबलचक प्रतिसाद आमच्या डोक्यावरून जातात. पण यांच्या खुसखुशीत नर्मविनोदी प्रतिसादांचे आम्ही चाहते आहोत. मात्र तिरकसपणा, खवचटपणा इ कौशल्यांच्या बाबतीत ते अगदीच मागासलेले आहेत. शिवाय, स्वतःच्या एखाद्या प्रतिसादातली चूक लक्षात आली तर सरळ ती कबूल करून मोकळे होतात. त्यामुळे साहजिकच जालिय जगतात वजन कमी आहे.
बाकी गृहस्थ अतिशय सद्वर्तनी हो! अहो, सर्व मनोरंजन (आपल्याच) बायको आणि मुलाबरोबर करतात.
संजोप राव -
ज्या विषयांत अरुणजोशी प्राथमिक यत्तेत आहेत त्यात रावसाहेबांनी पीयच्डी केली आहे. अर्थात, ऐसीच्या जन्माच्याही आधीपसून बारा संस्थळांचे पाणी प्यालेल्या आणि पचवलेल्या ह्या ज्येष्ठ सदस्यांस हे क्वालिफिकेशन शोभूनही दिसते. जीएक्कुस्वामींप्रती आदरभाव हा त्यांच्या- आमच्यातला अत्मियतेचा दुवा. ह्यांच्या खुसखुशीत शैलीतील टपल्या - टिप्पणी अनेकांना भावतात. प्रस्तुत लेखाची प्रेरणा त्यांच्या ढिपांग टिपांग वरून मिळाली हे आम्ही कृतज्ञतेने ( हेही एक म्हणावे लागते ) नमूद करू इच्छितो.
'न'वी बाजू -
ऐसीवरचे विरोधी पक्षनेते. ह्यांचा विरोध व्यक्तीला नसून विचाराला असतो. डावे- उजवे न करता एकंदरीत सगळ्यालाच कडवा विरोध असल्यामुळे हे कुठल्याही पक्षात नसतात. 'वन मॅन आर्मी' प्रमाणे ह्यांचा स्वतःचा 'न'वा पक्ष आहे. ह्यांचा आवडता छंद म्हणजे कुठल्याही विषयाची न (दि)सलेली बाजू ((खरे तर खुस्पट) दाखवणे. त्यापायी त्यांच्या लेखणीची धार कधीकधी फारच तीक्ष्ण होत असली तरी प्रतिसाद मार्मिक आणि माहितीपूर्ण असल्यामुळे वाईट श्रेणी देववत नाही. मात्र मुद्देसूदपणा, सौजन्य आणि व्यक्तिगत पातळीवर न उतरण्याची मुलखावेगळी तऱ्हा असल्या गुणांमुळे विरोधी पक्षनेते या पदाला ते बट्टा लावतात.
बॅटमॅन -
बटाट्याच्या चाळीतल्या बाबा बर्व्यांना चोवीस भाषांत मौन पाळता येत असे. ह्या वाघूळबाबांना चोवीस वेगवेगळ्या भाषांमध्ये वाद घालता येतात. विदूषकांचा संहार करण्यासाठी उत्पन्न झालेला हा वाल्गुदेय. एखाद्या वटवाघळाने अंधाऱ्या रात्री निबिड झाडाझुडपांमधून फिरावे त्याप्रमाणे हे स्तोत्र, आर्या, दिंडी वगैरे अनेक वृत्तांमधून लीलया फिरत असतात. स्वतःवरतीच कितीतरी कविता रचलेल्या असल्यामुळे त्यांना स्वस्तुतीची हौस आहे असे कोणी म्हणेल. पण तशी ती कोणाला नसते? 'स्वतःस मोठे शहाणे समजणे' हा सद्गुण बाळगून असणाऱ्या ऐसीवरच्या (आमच्यासकट) इतर अनेकांप्रमाणेच हे असल्यामुळे हे इथले एक लाडके व्यक्तिमत्व झालेले आहे.
सतीश वाघमारे -
ऐसीवरती तसे नव्यानेच आगमन झाले असले तरी आपल्या प्रत्ययकारी आणि सणसणीत शैलीने यांनी आपला ठसा जोरदारपणे उमटवलेला आहे. महाविद्यालयीन वातावरण आणि आपल्या वस्तीचं वास्तव या दोहोंची त्यांच्या समर्थ लेखनाला पार्श्वभूमी असते. या दोन्ही ठिकाणी दिसणाऱ्या विसंगती ते अत्यंत नेमकेपणे टिपतात. आर्त शब्द्चित्रे रेखाटतानाही ती, शब्द्बंबाळ किंवा दयनीयतेचे भांडवल केल्यासारखी होऊ न देणे हे ह्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. (मात्र एकदा लेख टाकून झाला की एखाद- दुसर्या प्रतिसादापलिकडे तिकडे फिरकत नाहीत. आणि अलिकडे तर लेखही नाहीत. )
कौतुकाची गोष्ट म्हणजे मराठी विषयात उच्चशिक्षण आणि सध्या मराठीचेच महाविद्यालयीन अध्यापन असल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतूनही त्यांनी अंतरीची प्रतिभा शाबूत राखली आहे.
कविता महाजन
कविताबाई ऐसीवर येण्याच्या आधीपासूनच मराठीत चार बुके लिहून प्रसिद्धी पावलेल्या आहेत. आमच्या मर्यादित वाचनानुसार ती प्रसिद्धी यथायोग्यही आहे. ह्यांचे लेखन बर्याचदा स्त्रीवादी गणले जात असले तरी समाजातल्या एकूणच शोषित, पीडित, पिळित वर्गाबद्दल ह्यांना आत्मीयता आहे. सामाजिक संशोधनकार्यात त्यांचा ह्या वर्गाशी प्रत्यक्ष संबंधही आलेला आहे. अनुभवाची धार असल्यामुळे, शोषण आणि अन्यायाबद्दल लिहीताना संताप संताप होऊन ह्यांच्या लेखणीला समशेरीचा आवेश चढतो. ऐसीवरील बहुतांशी तर्ककठोर चर्चांमध्ये भावनिक बाजू लढवणार्या सदस्या.
शेलकी विशेषणे!
"त्यांची रीसर्च ग्रँट आमच्या खिशांतून जात नसल्यामुळे आम्हाला त्याचेही कौतुकच आहे."
"असो. उपेक्षा मोठमोठ्यांच्या वाट्याला आलेली आहे."
"'वन मॅन आर्मी' प्रमाणे ह्यांचा स्वतःचा 'न'वा पक्ष आहे."
"ह्या वाघूळबाबांना चोवीस वेगवेगळ्या भाषांमध्ये वाद घालता येतात."
"मराठी विषयात उच्चशिक्षण आणि सध्या मराठीचेच महाविद्यालयीन अध्यापन असल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतूनही त्यांनी अंतरीची प्रतिभा शाबूत राखली आहे."
"शिवाय, स्वतःच्या एखाद्या प्रतिसादातली चूक लक्षात आली तर सरळ ती कबूल करून मोकळे होतात. त्यामुळे साहजिकच जालिय जगतात वजन कमी आहे."
ही वाक्ये टाळीची. शेलक्या विशेषणांमुळे मजा आली!
अचूक निरीक्षण
आपले निरीक्षण अचूक आहे. अलिकडचीच गोष्ट- अशीच नव्या बाजूला चक्कर मारताना ''संसार असार आहे'', ''श्रेणी श्रेणी ती काय शेवटी बरोबर थोडीच येणार आहे?'', ''या जाली कुणिच कुणाचे नसतेय होेेेSSSS '' असा हृदयस्पर्शी टाहो आमच्या कानी पडला. वळून पाहिले तर नवीकाका. कुणा चांडाळाने काही मागेपुढे न बघता सतत मार्मिक आणि रोचक श्रेणी दिल्याचे दःख एकाच प्याल्यात बुडवून टाकत होते. पण हेही दिवस गेले. परवा त्यांना चार खोडसाळ, सात अवांतर आणि नऊ भडकाऊ श्रेणी मिळाल्या. पाहिले, तर हर्षवायू होऊन प्यार्टीच्या तयारीला लागले होते.
मस्त
'स्वतःस मोठे शहाणे समजणे' हा सद्गुण बाळगून असणाऱ्या ऐसीवरच्या (आमच्यासकट) इतर अनेकांप्रमाणेच हे असल्यामुळे हे इथले एक लाडके व्यक्तिमत्व झालेले आहे.
(ब्याटम्यान नेहेमी स्वतःच्या वयाची जाहिरात करत असल्यामुळे) 'स्वतःस मोठे शहाणे समजणे' हा सद्गुण बाळगुण असणाऱ्या ... असं वाचलं गेलं. चूक लक्षात यायलाही अंमळ वेळच लागला.
'मनुकां'चा दुवा ?
मनुकांचा धागा कोणता हे न
मनुकांचा धागा कोणता हे न आठवल्यामुळे तो प्रतिसाद शोधायला त्रास होतोय. पण आपल्या घरच्या भीष्माचार्यांनी आल, संदीप आणि गोर्बी हे लिहूनही दंगा केला आहे.
कंपूबाजी आहे हो, कंपूबाजी!
अरे रे, ऐसीवर कंपूबाजी सुरू झालेली पाहून वाईट वाटले. शिवाय, आपल्याच कंपूतल्या लोकांची नावं जाहीर करणे सुरू झाले आहे म्हणजे ह्या कंपूबाजांची धिटाई फारच वाढलेली दिसते!! असे जाहिर शक्तीप्रदर्शन केल्याने आम्ही लगेच घाबरून जाऊ वगैरे गोड-गैरसमज असतील तर ते आत्ताच दूर करा, नंतर उगाच त्रास होणार नाही! बाकी चलाखीने काही कावेबाज कंपूबाजांची नाव आलेली नाहीत हे ही आमच्या ध्यानात आलं! (नव्या, सालस आणि सज्जन सदस्यांकरता हिंटः घासूगुर्जी, जोजोकाकू इ.) आणि काही मान्यवरांना उगाचच आपल्या कंपूत ओढून घेऊन कंपूचा भाव वाढवणयचा क्षीण प्रयत्नही आमच्या चाणाक्ष नजरेतून सुटलेला नाही!
बाकी वर्णनं किती फुलवून, फुलवून केली आहेत! मानलं ब्वॉ!
ह्यांची कलासमीक्षणे, रसग्रहणे आणि जाणकारीचा दबदबा एवढा की भलेभले ऐसीकर ह्यांचा नामोल्लेख करतेवेळी प्रथम कानाला स्पर्श करतात असे ऐकिवात आहे. (तसा आमचाही उल्लेख कानाला हात लावल्याशिवाय होत नाही, पण ते खत्रुड लोक त्याला कानाला खडा लावणे म्हणतात. असो. उपेक्षा मोठमोठ्यांच्या वाट्याला आलेली आहे.)
अनेक अनवट चित्र-नाटकांमधल्य खुब्या, बारकावे किंवा ज्यांना मराठीत न्यूआन्सेस असे म्हणता येईल, सर्वसामान्यांना कंटाळा येणार नाही अशा रसाळपणे उलगडून दाखवत असल्यामुळे त्यांनी कला-समीक्षक या पदाला काळिमा फासला आहे.
कायच्याकाय! यांची रसग्रहणं वाचून सामान्यांना कोणत्या भाषेत वाचलं हे सुद्धा कळत नाही. आमची तर खात्री आहे फ्रेंच अन जर्मनच्या नावाखाली यिडीश नाहीतर क्लिंगऑन शब्द फेकत असतात हे महाशय! कोण बोंबलायला तसले सिनेमे अन नाटकं बघायला जाणार आहे एवीतेवी! ते लोक कानाला हात लावतात ते स्वतःच वाचलेल्या शब्दाच्या उच्चारावर विश्वास बसत नाही म्हणून!
गणित, भाषा, विज्ञान, कविता वगैरे अनेक क्षेत्रांत त्यांचा लीलया अधिकारपूर्ण संचार असतो. त्यांच्या प्रतिसादांचे वैशिष्ट्य हे की कुठे खुसपट काढता येऊ नये अशी चिरेेबंदी बांधणी.
ह्यांचं म्हणजे त्यांच्या उलट, फक्त कोणत्या भाषेत प्रतिसाद लिहलाय ते कळतं, बाकी सगळं वरून! आता प्रतिसाद कळलेच नाही तर खुसपटं काय कपाळ काढणार?
हेदेखील ऐसीवरचे एक सभ्य व्यक्तिमत्व, पण आजकाल विक्षिप्तबाई आणि घासुगुर्जी यांच्या संगतीत असतात.
जयदीप चिपलकट्टी हा डुप्लिकेट आयडी असून घासुगुर्जी आणि विक्षिप्तबाई आजकाल तो आळीपाळीने वापरतात असा हा छुपा धमकीवज संदेश आहे हे जाणकारांच्या ध्यानात आले असेलच!
विदूषकांचा संहार करण्यासाठी उत्पन्न झालेला हा वाल्गुदेय.
अरे जा! जा!! असल्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही!
एखाद्या वटवाघळाने अंधाऱ्या रात्री निबिड झाडाझुडपांमधून फिरावे त्याप्रमाणे हे स्तोत्र, आर्या, दिंडी वगैरे अनेक वृत्तांमधून लीलया फिरत असतात.
थोडक्यात काय तर भारतात रात्र असताना परदेशस्थ सदस्यांवर नजर ठेवण्याचे काम हे छुपे संपादक करतात!
कितीही कट केलेत तरी माझ्यासारख्या सज्जन, सालस, सुशील, सभ्य आणि एकट्या (एकट्याला स वरून काही शब्द आहे का रे बॅट्या?, च्यायला चांगला समास का अंलकार वाया गेला!!) सदस्याच्या वावरस्वातंत्र्यावर तुम्ही कंपूबाज गदा आणू शकत नाही, बजावून ठेवतो!!
छे हो
कायच्याकाय! यांची रसग्रहणं वाचून सामान्यांना कोणत्या भाषेत वाचलं हे सुद्धा कळत नाही.
कळण्याचा काय संबंध? कुठ्ल्या का भाषेत असेना रसाळ असले म्हणजे झाले. काही नाही तर निदान त्यातील चित्रांकडे बघा. डोळ्याला विसावा मिळेल.
ह्यांचं म्हणजे त्यांच्या उलट, फक्त कोणत्या भाषेत प्रतिसाद लिहलाय ते कळतं, बाकी सगळं वरून! आता प्रतिसाद कळलेच नाही तर खुसपटं काय कपाळ काढणार?
अहो तेच तर म्हटले आहे ना! चि रे बं दी. कुठे चिमणीलाही छिद्र नाही. मग वरूनच जाणार ना? मनास लावून घेऊ नका, बहुतेकांचे असेच होते. घासूगुर्जींसारखे विद्रट अपवाद वगळता कोणीव ह्या चिर्यांच्या भानगडीत पडत नाही. '' धनुभावजी कशाला चुकीचं सांगतील? वावावा छानछान. चला.'' म्हणून पुन्हा वाती वळायला लागतात. आता वरचाच प्रतिसाद घ्या. 'मोहरून वगैरे' लिहिले काय तर दोन कंस. आता ह्याच्यातून कळणार तरी काय? पण ते कंसही कसे एकमेकांना चिकटून आहेत बघा. वर म्हटल्याप्रमाणे चिमणीलाही जागा नाही. गेले डोक्यावरून. पण म्हणून आम्ही लिहिलेले चूक ठरत नाही.
( मोहराला लेखनफल कधी धरणार कोण जाणे )
जयदीप चिपलकट्टी हा डुप्लिकेट आयडी असून घासुगुर्जी आणि विक्षिप्तबाई आजकाल तो आळीपाळीने वापरतात
@ ज. चि. -
हा उपमर्द आपण सहन करणार काय?
Nile - ऐसीवरचं सर्वद्वेष्टं
Nile - ऐसीवरचं सर्वद्वेष्टं व्यक्तिमत्व. हे सर्वद्वेष्टेपण ऐसीवरच्या वावरातून दिसून येत असलं तरी त्याची कमाई अनेक इतर संस्थळं, फेसबुक वगैरे ठिकाणी झालेली आहे. संस्थळावरून हाकललं जाणं, आठ दिवसांसाठी बॅन होणं, संपादकांकडून दरडावणीच्या खरडी, व्यनि वगैरे येणं, झुकरबर्गने कपाळाला हात लावणं या नाइलसाठी सामान्य गोष्टी. किंबहुना बरेच दिवस असं काही झालं नाही तर त्याला अस्वस्थ वाटतं. मग तो खाजगीत 'साला, मीच एक संस्थळ काढेन आणि स्वतःचे बावन्न आयडी तयार करून दर आठवड्याला एक बॅन करेन' अशी गणपत वाण्याप्रमाणे स्वप्नं बघतो. गणपत वाणी काड्या चावून फेकून द्यायचा आणि त्या दुकानाच्या जमिनीत रुतून फुकट जायच्या. नाइलने टाकलेल्या काड्या मात्र कुठेतरी आग लावल्याशिवाय रहात नाहीत. हा माणूस आकाशात आणि अवकाशात विमानं उडवण्याचा धंदा पोटापाण्यासाठी करतो असं ऐकलं आहे. पण याची खरी हौस म्हणजे दुर्बिणीला कॅमेरा लावून त्यातून चंद्राचे खळगे, सूर्यासमोर आलेला बुध वगैरेंचे फोटो काढणे. निदान हे फोटो ऐसीवर तरी टाकलेले आहेत. आणखीन इतर कुठच्या तारका-निरीक्षणांचे फोटो काढले असतील आपल्याला काय माहित?
(पहाताय काय, सामील व्हा! इतर आयडींची खेळीमेळीत ओळख करून द्या.)
'Nile - ऐसी' नव्हे ऐसी - Nile = ?
एखाद्या ठिकाणी जोवर Nile (तात्पुरता का होईना) बॅन होत नाही, तोवर त्या ठिकाणाला आम्ही मराठी संस्थळांच्या यादीत गणत नाही. इथल्या मालक-चालक वगैरेंनी ह्याची नोंद घ्यावी आणि मराठी संस्थळांच्या यादीत स्वतःचं काही तरी स्थान निर्माण करण्यासाठी काही तरी हालचाल करावी. अन्यथा हवा काढून घेतली जाईल. नंतर तक्रार चालणार नाही.
- हुकुमावरून.
फ्*ग सहमत विथ यू, डूड!
एखाद्या ठिकाणी जोवर Nile (तात्पुरता का होईना) बॅन होत नाही, तोवर त्या ठिकाणाला आम्ही मराठी संस्थळांच्या यादीत गणत नाही.
आधी 'पुनरागमनाय च', मग विसर्जन आणि अकरा दिवसांनी पुन्हा "त्वं भूमिरापोनलोनिळो नगः ... त्वं संस्थळातीतः" म्हणून निळोबांची प्रतिष्ठापना - हे विधी मनोभावे केले तरच प्रतिष्ठित मराठी संस्थळांच्या यादीत ऐसीची गणना होऊ शकेल ;)
थत्ते चाचा
नितीन थत्ते:
'थत्ते चाचा' हे जालीय सदस्यांनी दिलेले संबोधन मिरवणार्या (न मिरवून सांगतात कोणाला?) या सदस्याची ओळख करून घ्यायची असेल तर त्यांचे प्रतिसाद वाचणे मस्ट आहे. किमान शब्दांत कमाल मुद्दे (खरोखरच कमालीचे मुद्दे) मांडण्याचे त्यांचे कसब एखाद्या पुण्यातील दुकानदारालाही न्यूनगंड आणेल. खरं तर सर्वसाधारण जालीय जनतेच्या विरोधात असणारी त्यांची मते कमालीच्या शांतपणे(थंडपणे) व विदा-तर्क याच्या आधारे मांडणारे हे सदस्य जालावर काँग्रेसचे प्रतिनिधित्त्व करतात अश्या (बेछूट, बेफाम, बे.. वगैरे वगैरे) आरोपांना हसत हसत सामोरे जातात (पुन्हा, न जाऊन सांगतील कोणाला). कोणावरही वैयक्तीक टिका न करता त्यांच्या वर्मावर (म्हणजे श्री वा सौ वर्मा नव्हेत) बोट कसे ठेवायचे (थोडक्यात योग्य जागी कसे टोचावे?) हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांनी 'थत्ते' हे आडनाव बदलून 'तथ्ये' आडनाव घेतले पाहिजे असे माझे मत यानिमित्ताने स्पष्टपणे मांडायची संधी साधतो.
त्यांनी 'थत्ते' हे आडनाव
त्यांनी 'थत्ते' हे आडनाव बदलून 'तथ्ये' आडनाव घेतले पाहिजे
या वाक्यासाठी जोरदार टाळ्या. त्यांच्या लेखनात नेहमीच तारतम्यावर भर दिलेला असतो. भंपक, जहाल, आणि बायस्ड विधानं शांतपणे आणि मुद्देसूदपणे खोडून काढण्यात त्यांचा हात धरणं कठीण आहे. दुर्दैवाने त्यांना कॉंग्रेसविरोधी टोकाची मतं खोडून काढावी लागली म्हणून ते कॉंग्रेसचे समर्थक ठरले. जर त्यांच्यासमोर कॉंग्रेससमर्थक भंपक विधानं मोठ्या प्रमाणावर आली असती तर कदाचित त्यांच्यावर कदाचित भाजपीय असा शिक्का बसला असता.
आम्हाला कळलेले घासकडवी
Case 1: Value = V1, time = t, place = (x1, y1, z1),
Case 2: Value = V2, time = t+alpha, place = (x+ delta x, y1+ delta y, z1+ delta z)
where Vn = f( t, place, amuk, tamuk, amka tamka, dhamaka, ...* ...**)***
If alpha>0 (even if alpha is tending to zero), V2 is much much better than V1.
* First three dots for three contexual arguments.
** Last three dots represent standard and invincible arguments-
1. Unavailability of data does not imply absence of perpetrations e.g. absence of police records on rapes in BC 1054 means they easily outnumbered those in 2013 (of course, in per capita terms)
2. Wider acceptance is more than proof of betterness of a thing, most popular notions are misplaced. e.g. schools are much smaller than we thought in childhood days (meaning think twice if you consider something in in childhood was great).
3. Principle of ranking betterness, e.g. abject poverty is better than death
*** This is called Ghaskadaviya function. The beauty of this function is that the absolute time appears to play near negligible role in it but in the end the results never come in favor of the other parameters, whatever their strength, if the time goes against them. Some call it equation of evolution, perfectly describing the dead past and intelligent today in one single string.
मग आत्ता तो वरचा प्रतिसाद पून्हा वाचा
गविजी,
शहराजादजींनीही लिहिलं आहे कि माझं लेखन मुखमूल्यावर घेतलं तरच त्याचा खरा अर्थ कळेल. घासकडवींबद्दल काय लिहिलं आहे त्या दुसर्या उदाहरणाने अधिक स्पष्ट होईल अशी आशा आहे.
उदाहरणार्थ मी म्हणतो - "माझे आजोबा गोरेप्पान आणि उजळ कांतीचे होते. तसा मला सावळा म्हणतात पण त्यांच्यामानाने मी अगदीच काळा!"
घासकडवी हेच वाक्य पुढीलप्रमाणे म्हणतात - " 'बाकी काहीही असो', भारतासारख्या उष्णकटीबंधीय हवामानात टिकून राहायला अरुणच्या त्वचेत मोठ्याप्रमाणात मेलॅनिन आहे. त्याच्या आजोबांकडे मात्र त्याची प्रचंड वाणवा." कारण काय तर आजोबा १९३० ते १९५५ चे आणि मी १९७६ ते २०.. चा.
आपण ऐसीवर इतका काळ इतके घासकडवी वाचले आहेत, तोंडभरून जाऊ द्या पण साधी दोन शब्दानी त्यांनी कधी गतकाळाची स्तुति, प्रशंसा केलेली आठवते? आजच्या काळाची स्तुती करायला ते कोणत्याही स्तरावर* जातील. उदाहरणार्थ -"कोण तो एकपत्नी राम? शाहरुखचे बघा. भारताच्या लोकसंख्येच्या ३.५५७८९ पट त्याचे फॅन आहेत. त्यात ५२.८७६१२०५% स्त्रीया आहेत. दरडोई, दरफॅन तो रामापेक्षा ३४.७६५*१०^८ पट एकपत्नी आहे."
* केवळ सांख्यिकीय स्तर
वर्गीकरणाचा नियम
ज्याने कोणी श्रेण्यांचे वर्गीकरण /प्रकार केले आहेत त्याने/तिने वर्गीकरणाचा एक fundamental law दुर्लक्षित केला आहे. वर्गीकरण करताना त्याचा आधार/बेसिस सांगून मग प्रकार सांगायचे असतात. जसे on the basis of gender, human beings are classified into -1. men, 2, women, 3. transgender.
पण असे नाही केले तर प्रकारांत संभ्रम निर्माण होतो.
मर्म सांगताना विनोद केला जाऊ शकतो, विनोद करताना मर्म सांगीतले जाऊ शकते, they are not mutually exclusive words.
नंदन
नंदन : सिर्फ नाम ही काफी है!
----------------------------------------------
ग्यानबा-तुकाराम या गजराच्या इतकाच आंजावर प्रसिद्ध गजर-
नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला. नंदन आला.
छे छे
छे छे.. नुसतं नाव चालत नाही.. नंदन म्हटलं की चार-पाच लै भारी पुस्तकांची नावं, एखादी रोचक कवितेची ओळ आणि हे असो-नसो मात्र, कधीही न पाहिल्या-वाचलेल्या (आणि आपणहून पाहण्या-वाचण्याची सुतराम शक्यता नसलेल्या) नेमक्या आणि मार्मिक अशा ४-५ लिंका तरी आल्या पाहिजेल मंजे पायजेल! ;)
बरोबर नंदनवा कोटी कोटी कर आये
बादवे चिं जं यांची एक मोठी ओळख करुन दिली गेली नाही याचा खेद वाटतो -
सर्व अनवट परदेशी कलावंतांचे 'जयंत्या-मयंत्या साजरेकार' म्हणून चिंजं यांचे योगदान मोठे आहे याचा उल्लेख नाही आहे. नाशिकच्या सर्व वंशावळ्याकार लोकांकडे नसतील इतक्या 'हूज हू - जयंत्या मयंत्या' नोंदी यांच्याकडे सापडतात.
असो, मराठी माणसाला, मराठी माणसाच्या कर्तृत्वाची ओळख नसणे हे काय नविन म्हणा!
...पाहिले म्यां डोळा!
'न'वी बाजू -
ऐसीवरचे विरोधी पक्षनेते. ह्यांचा विरोध व्यक्तीला नसून विचाराला असतो. डावे- उजवे न करता एकंदरीत सगळ्यालाच कडवा विरोध असल्यामुळे हे कुठल्याही पक्षात नसतात. 'वन मॅन आर्मी' प्रमाणे ह्यांचा स्वतःचा 'न'वा पक्ष आहे. ह्यांचा आवडता छंद म्हणजे कुठल्याही विषयाची न (दि)सलेली बाजू ((खरे तर खुस्पट) दाखवणे. त्यापायी त्यांच्या लेखणीची धार कधीकधी फारच तीक्ष्ण होत असली तरी प्रतिसाद मार्मिक आणि माहितीपूर्ण असल्यामुळे वाईट श्रेणी देववत नाही. मात्र मुद्देसूदपणा, सौजन्य आणि व्यक्तिगत पातळीवर न उतरण्याची मुलखावेगळी तऱ्हा असल्या गुणांमुळे विरोधी पक्षनेते या पदाला ते बट्टा लावतात.
केवळ एकच दुरुस्ती सुचवावीशी वाटते. वरील परिच्छेदातील क्रियापदांची वर्तमानकाळवाचक रूपे बदलून ती भूतकाळवाचक केल्यास परिच्छेद अधिक खुलून दिसावा.
तसेच, इतःपर आमच्या फोटोची एक प्रत भिंतीवर / देवघरात लावून त्यास हार घालण्यास आणि दुसरी प्रत (प्रेमळ, मनमिळाऊ, धर्मपरायण, आखुडशिंगी, बहुदुधी इ.इ. विशेषणयुक्त रायटपसहित) 'सकाळ'ला पाठवण्यास प्रत्यवाय नसावा.
आगरकरांनंतर हा बहुमान आमच्या वाट्यास आलेला पाहून गहिवरून आले. त्याबद्दल 'ऐसीअक्षरे'चा मी आ(उर्वरितसुर्वरित)जन्म ऋणी राहीन.
माझा छळ करणारा कंपू
अजून अनेकांविषयी लिहायचं आहे अशी धमकी दिली होती. तेव्हा ती पूर्ण करताना मला छळणाऱ्या कंपूला कसं विसरणार? यात तीन लोक प्रकर्षाने येतात.
नगरीनिरंजन - ताकदवान लेखणी आणि तितकाच दांडगा अभ्यास. आपल्या वेगळ्या शैलीत उत्तम कथा लिहून ती ऐसीवर सादर केली, आणि अनेकांच्या सूचना स्वीकारून तितकेच कष्ट घेऊन ती कथा बदलून पुन्हा सादर केली असं नगरीनिरंजनच करू जाणे. हळूवार विषयांवरच्या कथा समर्थपणे हाताळण्याबरोबरच हा सद्गृहस्थ पर्यावरणाबद्दलही आस्था व कळकळ बाळगून आहे. आणि ही कळकळ कोरडी नसून तीमागे वाचन आणि मननही आहे. ऐसीवर अजून दिसून न आलेलं उत्कृष्ट विनोदी लेखनही करण्याची क्षमता आहे. (पहा 'बंडू आणि मुखपुस्तकातले उरोजकर्क स्थितीसंदेश!') ऐसीवरही त्यांनी आपल्या विनोदाच्या पोतडीतून अजून काही चीजा काढून दाखवाव्या असं मनापासून वाटतं.
विसूनाना - जालावरचं जुनं आणि जाणितं व्यक्तिमत्व. हे स्वतः लेखन फार करत नाहीत पण प्रतिसादांमधून त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि उदारमतवादाची झलक दिसून येते. आणि जेव्हा लिहितात तेव्हा विनोदी, खवचट, माहितीपूर्ण अशा अनेक श्रेणी मिळवून जातात. अत्यंत मूलभूत असे प्रश्न उपस्थित करणं ही यांची खासियत. त्यांच्यामुळे अनेक चर्चांची खोली वाढते.
मन - नाव सार्थ करणारं व्यक्तिमत्व. बऱ्याच वेळा यांचं लेखन वाचताना आपण मनातली स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस वळणं घेत घेत वहाताना पाहतो आहोत असं वाटतं. आसपासच्या जगात जे दिसतं आहे ते खरंच असंच आहे का? नक्की काय असणं योग्य ? हे प्रश्न कायम डोकावताना दिसतात. त्यांच्या प्रतिसादांमुळे विचारांना चालना मिळते. आजकाल हे ऐसीवर कमी दिसतात, पण लवकरच नियमितपणे दिसोत ही सदीच्छा.
आता तुम्ही म्हणाल की इतके चांगले लोक माझा छळ का करतील? आणि नक्की काय करतात तरी काय? यावर मी म्हणेन की त्यांच्या वरच्या प्रतिमेवर जाऊ नका. हे तिघे फक्त मला त्रास देण्यासाठी टपलेले असतात. ते माझ्या दुर्दम्य आशावादी दृष्टिकोनाची कायमच चेष्टा करत आलेले आहेत. आपण रिकाम्या अर्ध्या ग्लासात शांतपणे तरंगायचं आणि मला उरलेल्या अर्ध्या ग्लासभर पाण्यात बुडवायचं हा त्यांचा आवडता खेळ. अर्थात त्यांच्यामुळे माझंच लेखन सुधारतं असं कोणी म्हणेल. ते उघडउघड बेसलेस आहे. त्यांचा आनंद केवळ मला गोत्यात आणून फिदीफिदी हसण्यात आहे!
आम्हाला समजलेले बॅटमॅन
वय आणि व्यासंग एकत्रित धरून वयव्यासंग नावाचा एखादा इंडेक्स काढला तर बॅटमॅन टॉप ऐसीकर असतील. ते काय वाचतात आणि ते वाचून ते काय लक्षात ठेवतात आणि काय लिहितात हे कळायला देखिल एक किमान गुणवत्ता लागते. मला तर नेहमी भाबडेपणाने '...म्हणजे काय ?' विचारावे लागते. त्यांचे वय वाढत जाईल तसे 'बॅटमॅन कळण्याची परीक्षा' ऐसीवर अपरिहार्य होइल.
मी जेव्हा ऐसीवर नवा होतो (तसा अजूनही आहे, माझे अजूनही कुणी ऐसीवर स्वागत केले नाही, मंजे माझी इथे फॉर्मल एंट्री अजूनही नाही.)तेव्हा नेहमी बॅटमॅन विरुद्ध 'इतर सर्व ऐसीकर' अश्या लढाया दिसायच्या. मला त्या आचार्य अत्रे (विरोधी पक्ष नेते) विरुद्ध १०० काँग्रसवाले (किंवा अत्र्यांनी उदाहरण म्हणून सांगीतलेला तो कोंबडा विरुद्ध १०० कोंबड्या ) अशा भासायच्या. इतर ऐसीकर इतके दिग्गज असताना बॅटमॅन कधीच दुबळे वाटले नाहीत हे विशेष. इतर ऐसीकर सहसा समर्थायला सोपी जाईल अशी मध्यम भूमिका घेतात, बॅटमॅन मात्र तीव्र भूमिका घेतात. (सहसा बॅटमनी संवाद तीव्र काटाछाटी असते.)
इश्वर, परंपरा, हिंदू धर्म, भारत यांच्याबद्दल त्यांच्या मतांत आदर आढळतो असे निश्चितपणे म्हणता नाही आले तरी यांच्यावर अवाजवी टीका करणारांवर ते सॉलिड तूटून पडतात. अश्या टिकेतील लॉजिकमधील फोलपणा दाखवण्यासाठी उदाहरणे देतात. (मी त्यांची ही बाजू उचलून धरतो.) एकवाक्यिय अँटीलॉजिक मधे ते माहीर आहेत. पण इतक्या संक्षेपात भावना जनतेला पोहोचत नाहीत. बॅटमॅन विरुद्ध अदिती, चिंजं,घासकडवी, नाईल, संजोपराव, नवीबाजू, कोल्हटकर, ऋषिकेश (याच प्राधान्याने) लढती म्हणजे ऐसीची शोभा आहेत.
आपल्या मुलगीमैत्रिणीशी ते इतक्या क्लिष्ट गप्पा करत असतील का असा प्रश्न मला नेहमी छळतो. एक माठ मुलगी आणि बॅटमॅन यांचे सुत जुळलेच तर त्या बयेला काय काय सहन करावे लागेल याची कल्पना न करणेच बरे.
पण एक निश्चित आहे, बॅटमॅनमुळे अति(उदारमत/मानवता/साम्य/मानवाधिकार/स्त्रीपुरुषसमता/अभिव्यक्तिस्वातंत्र्य/हिंदूधर्मठोकंपट्टी/भारतीयठोकंपट्टी, इ इ )वाद्यांना थोडा अंकुश आहे.
बिलकुल
बॅटमन हे थेट्ट भूमिका घेतात, ते लै भारी वाटतं. कधी कधी , अगदि क्वचितच कर्कश्श सुद्धा वाटतं; पण इतर वेळच्या खणखणीत प्रतिसादांचा साइड इफेक्ट म्हणून दुर्लक्षिलं तरी चालतं.
(सेहवाग कसा बेजबाबदार फटका मारुन कॅच आउट झालेला चालतो, कारण त्यानी एकुणात दांडपट्टा फिरवल्यासारखी ब्याट आधी फिरवून लै दाणाकट्टी माजवलेली असते मैदानात. दहा-बारा चौकार षटकारांमागे एखादा क्याच मग माफ होउन जातो.लक्षात राहतात ते फटके.)
.
अजून एक महत्वाचे म्हणजे ब्याट्या नाही नाही त्या विषयावर नाही नाही त्या लोकांशी डोके लावीत बसला तरी तो स्वतःला सॉफ्ट टार्गेट बनू देत नाही.
तुम्ही संख्याबळात कमी पडलात आणि इतरांपेक्ष वेगळे दिसलात तर लोकं बेक्कार टार्गेट करतात; विशेषत; एकाकी खिंड लढवणार्याला.
श्रीकृष्ण सामंत, इंटरनेटस्नेही ही माणसं वाईट नव्हती. पण पब्लिकनं जो काय पिच्छा पुरवला; की ह्यांना बस्तान आवरावे लागले.
चेतन सुभाष गुगुळे हे ही एकटे पडल्यासारखे दिसले. इतरही काही आय्डीज् आहेत.
ब्याट्या पब्लिकला पुरुन उरतो.(पूर्वी टारझन पुउन उरायचे तसेच. त्यानं भल्या भल्यांना टर उडवून घायकुतीला आणलं होतं.)
पूर्वी उपक्रमावर गुंडोपंतांनीही कित्येक काळ परंपरावाद्यांचा किल्ला फारच नेटाने आणि जबरदस्त ताकदीने लढवला.
शेवटी दोनेक वर्षाखाली निर्णायक पराभव होत पितळ उघडे पडल्याने त्यांनी पराभूत अॅटिला हूण किंवा जपानी समुरायसारखी पराभवोत्तर जालिय आत्महत्या केली किम्वा जालिय जोहार केला पद्मावती स्टाइल.
ओह सॉरी....
ऐसीवर झालेले नाही.
पण कळपाची मनोवृत्ती विखारी असते.(हो. अगदि विचारी माणसेही कळपात आली तरी ती माणसे....)
त्यांचा प्रॉब्ल्मे हा होता की स्वतः ते कुठल्याच कंपूत नाहित.
इतरांना मग त्यांच्या प्रतिसादांची,लेखांची "घ्यायची" हुक्की येते.
त्यांच्या मदतीला कोण जात नाही.(कारण जावे असे त्यांच्या लिखाणात आणि व्यक्तित्वात काहिच नाही.)
ते एकटे त्या प्रकारला पुरे पडत नाहित.
अर्थात ऐसीवर असे एकदाही झालेले नाही हे कबूल. (माझ्या डोक्यात मराठी सायटी ह्या वेगळ्यावेगळ्या येत नाहित. ते एक सबंध ,एकसलग प्याकेज असच डोक्यात फिट्ट झालय; त्यामुळे उल्लेखाच्या वेळी हा घोळ होतो.
कुतुंबातील हरेकाला वेगवेगळे आपण समजत नाही. कुतुंबाची एकत्रित अशी एक आयडेंटिटी असते, तीच मित्रांच्या ग्रुपची. पण असा घोळ होउ नये हे मान्य.)
बॅट्याचं वैशिष्ट्य हे की तो पुरुन उरतो. कुणास मदत मागायला जात नाही. (उलट तोच इतरांची करु शकतो.)
.
सध्या मिपावर एक असेच सामंत किम्व इंट्या इन्-मेकिंग आहेत.पहिल्या पानावर झळकताहेत.
जिथं गप्प रहायचं, दुर्लक्ष करायचं नेमकं तिथं ते तोंड उघडतात.(ऑफसाइड बाहेरच्या वाइड बॉलचे बॅटने चुंबन घेण्याचा प्रयत्न करावा तसेच.)
लवकरच तुम्हाला एक इन्-मेंकिग मधील दिवंगत आय डी दिसेल.
"माझ्या डोक्यात मराठी सायटी
"माझ्या डोक्यात मराठी सायटी ह्या वेगळ्यावेगळ्या येत नाहित. ते एक सबंध ,एकसलग प्याकेज असच डोक्यात फिट्ट झालय; त्यामुळे उल्लेखाच्या वेळी हा घोळ होतो. कुतुंबातील हरेकाला वेगवेगळे आपण समजत नाही. कुतुंबाची एकत्रित अशी एक आयडेंटिटी असते, तीच मित्रांच्या ग्रुपची."
अगदी असंच. किंबहुना मराठी आंतरजाल हा इतका लहान गट आहे की असं होणं साहजिक आणि योग्यही वाटतं.
"माझ्या डोक्यात मराठी सायटी
"माझ्या डोक्यात मराठी सायटी ह्या वेगळ्यावेगळ्या येत नाहित. ते एक सबंध ,एकसलग प्याकेज असच डोक्यात फिट्ट झालय; त्यामुळे उल्लेखाच्या वेळी हा घोळ होतो. कुतुंबातील हरेकाला वेगवेगळे आपण समजत नाही. कुतुंबाची एकत्रित अशी एक आयडेंटिटी असते, तीच मित्रांच्या ग्रुपची."
एकदम नेमके!!
वास्तविक हा ऐसीवरचा मी पाहिलेला एकमेव भयंकर धागा होता
"मी पाहिलेला भयंकर एक ब्लॉग" वरच्या प्रतिसादांनी माझी निराशा केली होती. ज्या ब्लॉगचा लेखिकेने संदर्भ दिला होता त्यावरचे एकही वाक्य (स्वतःच बळेच मानून) खरे असू शकत नाही त्यामुळे त्या ब्लॉगवर तर टिका होतीच पण त्या ब्लॉगच्या विपरित भूमिका घेणार्या लेखिकेवरही टिका होती. त्याच लेखिकेचा अजून एक लेख होता. दोन्हीत साधारणतः "दोन्ही बाजूंनी (उदा. दाभोळकर स्वतः ब्राह्मण होते म्हणून आणि अजून काहीतरी) ब्राह्मणांवरच का टिका होते?" असा मला रास्त वाटला नसला तरी प्रश्ननीय वाटलेला मुद्दा मांडला होता.
त्या मधेच 'मला लिहायला कष्ट पडतात आणि तुम्ही मात्र...' असे काहीसे म्हणाल्या आणि त्यांच्यावर वाईट प्रकारे टिका झाली. नविन सदस्यास एक मार्दवता, शिष्टता दाखवावयास हवी, किमान शंका समाधान करून द्यायला हवे असे काही झाले नाही. रॅगिंगमुळे विद्यार्थ्याने कॉलेज सोडल्याचा प्रकार झाला अशी मला आशंका आहे.
प्रत्येक जण आधुनिक वातावरणातुन येत नाही. अशा लोकांची मते थोडी अशी तशी असणारच. प्रगल्भ विचार करणार्या लोकांनी अशा नव्या लोकांना (त्यांचे उपद्रव्यमूल्य अतिच होते आहे असे किमान न वाटेपर्यंत तरी) आपल्या चमू सोबत ठेवणे गरजेचे आहे. त्याचा परिणाम चांगलाच होतो.
त्यांनी विश्वनिर्मितीबाबतचा
त्यांनी विश्वनिर्मितीबाबतचा स्वतंत्र सिद्धान्त "अवकाशताण सिद्धान्त आणि विश्वनिर्मिती" नामक स्वप्रकाशित पुस्तकात मांडला आहे. आधुनिक दुर्बिणींनी केलेल्या निरीक्षणांमधूनही या सिद्धांताला पाठींबा मिळालेला नाही. (विकी वरुन)
यातलं दुसरं वाक्य वाचून कपिल शर्माच्या बेक्कार पंचची आठवण झाली. =))
जुने सदस्य
हे सारे वाचत असताना मराठी जालावरील जुन्या सदस्यांची आठवण होते.
सर्किट, आजानुकर्ण, कोलबेर, प्रियाली, यनावाला, गुंडोपंत ,रिकामटेकडा हे आणि असेच अनेक उपक्रम, मिपा वगैरेवर ही मंडळी धमाल करीत असत. (उपक्रमातील अगदि ठणठणपाळ आणि तथागत ह्यांचं अवांतर आणि प्रचारकी लिखाणही मला आवडे.)
सर्किट आणि आजानुकर्ण ह्यांचे एक दोन प्रतिसाद, धागे मागच्या एक वर्सहत इथे दिसले. पण पुढे काहीच नाही.
त्याकाळी मी बव्हंशी वाचनमात्रच असे; त्यामुळे थेट परिचय असा कुणाशीच नाही.
राहून राहून आजच्या हिट्ट सदस्यांशी त्या मंडळींची जुगलबंदी झाली तर काय धमाल होइल असं वाटून गेलं.
.
खुद्द ऋषिकेश ह्यांनी तिथली आजी-आजोबांच्या गोष्टी ही मालिका क्रमाक्र्माने इथे प्रकाशित करावी असे वाटते.
त्यानिमित्ताने सध्याची सक्रिय मंडाळी बरीच भर घालू शकतील त्यात; निदान कोल्हटकर आणि बॅटमन आणि
तत्सम ऐसीवासी माहितीभक्ष्यी तरी हे करतीलच.
आयला! खणखणीत! अजून लिहीन.
आयला! खणखणीत! अजून लिहीन. तत्पूर्वी जागा धरून ठेवते फक्त!
***
आता पुन्हा वाचताना वाटतंय, छ्या! हा दिवाळी अंकाच्या तोलामोलाचा लेख आहे. असा आधीच का बरं येऊ दिला? संपादकांना डुलकी लागली काय?