Skip to main content

या मनुष्यांना हवे काय तरी आहे?

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला. आणखीन अंधश्रद्धेचा कायदा राज्यातल्या सरकारने पास करून घेतला. वटहुकूम काढला आहे, असे वृत्त टिव्हीवर आले आहे. या सगळ्या प्रकरणा मध्ये मला एक गोष्ट समजत नाही, ती अशी की, ज्या प्रसंगी हा कायदा पास होत नव्हता, त्या प्रसंगी हे लोक ब्राह्मणांना दोष देत होते. सनातन प्रभातवर आरोप करत होते. म्हणजे, हा कायदा पास होत नाही आहे, त्याला ब्राह्मणच जबाबदार आहेत, असे यांना म्हणायचे होते. मग आता हा कायदा पास झाला तरी हे लोक पुन्हा वरून ब्राह्मणांनाच दोषी धरीत आहे, ते का असा माझा प्रश्न आहे.

आणखीन एक गोष्ट मी येथे दाखवून देऊ इच्छिते. ती अशी की, दाभोलकर हेसुद्धा ब्राह्मणच आहेत. सांगायचा मुद्दा असा की, जर कायदा करा म्हणून आंदोलन चालविणारे व्यक्ती ब्राह्मण आहेत, आणि कायदा करायला नको, म्हणून दुसरे आंदोलन करणारे व्यक्ती जे की सनातन संस्था आणि इतर आहेत, तेसुद्धा ब्राह्मणच आहेत तर मग ब्राह्मणांनाच दोष का म्हणून दिला जातो.

आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, मी मागे भयंकर ब्लॉग विषयी लेखन केले होते. या संकेत स्थळावरील बंधू आणि भगिनींनी या लेखाला खूप प्रतिसाद दिला होता. आणखीन माझा उत्साह वाढविला होता. या लेखावर इतकी चर्चा झाली की, कोणत्याही लेखावर झाली नसेल. या लेखातील ब्लॉगवर नेहमीच ब्राह्मण धर्मावर टीका करण्यात येते. तशीच आता पण करण्यात आली आहे. अंधश्रद्धेचा कायदा जो आता पास झाला आहे, त्याच्यावरच हे मनुष्य टिका करू लागले आहेत. काय तर म्हणे हा जो कायदा पास झाला आहे, तो ब्राह्मणशाही माजविणारा कायदा आहे. अशी टिका बरोबर आहे का? म्हणजे कायदा पास होत नव्हता, तर ब्राह्मणांमुळेच होत नव्हता. आता कायदा पास झाला तर ब्राह्मणांच्या फायद्याचा पास झाला. असे कसे? हा कायदा ब्राह्मणशाही माजविणारा आहे, असे जे आरोप हे लोक लेख लिहून करू लागलेले ओहत, ते फारच चुकीचे आहे. याच भयंकर ब्लॉगवर आणखी एक भयंकर लेख पडला आहे. त्याचे हेडिंग वाचून सुद्धा संताप येतो. तसे असे आहे : अंधश्रद्धा निर्मुलन करणारा नव्हे, ब्राह्मणशाही माजविणारा कायदा!

अरे तुम्ही लोकच हा कायदा पास व्हावा असे म्हणत होतात ना? आता आणखीन टिका का करता?

हा माझा दुसराच लेख आहे. आधीचा लेख फार चांगला जमला नव्हता. आता थोडी जास्त मेहनत करून हा लेख लिहिला आहे. आजचा संपूर्ण रविवार हा लेख लिहिण्यातच गेला आहे. यात काही कमी जास्त झाले असल्यास मी हात जोडून क्षमा मागते. हा दुसार लेख सर्व बंधूंना आणि भगिनींना आवडेल, अशी आशा करते.

प्रकाश घाटपांडे Sun, 25/08/2013 - 19:48

एक गोष्ट सांगू का? अशा तथाकथित विचारमंचा कडे दुर्लक्ष करा.समाजात अशा प्रवृत्ती असणारच. सुदैवाने ब्राह्मणेतर समाजात विचार करणारे लोक भरपूर आहेत. ते अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. दाभोलकरांवर ब्राह्मण असल्याचा 'बट्टा' लागला होता त्याला त्यांनी कृतीशील विचारातून उत्तर दिले.

राजेश घासकडवी Sun, 25/08/2013 - 20:33

अरे तुम्ही लोकच हा कायदा पास व्हावा असे म्हणत होतात ना? आता आणखीन टिका का करता?

जातीय लेबलं लावून या मंचावर 'आम्ही लोकं, तुम्ही लोकं' होऊ नये. याचा अर्थ जातींचा उल्लेखच होऊ नये असं नाही. जे विचार मांडायचे असतील विविध जातीसमाजांचा त्रयस्थपणे उल्लेख करून व्हावा. नाहीतर त्या मंचावरच्या लेखनात जे त्याज्य गुण आहेत तेच लेखनात येण्याचा धोका असतो.

कायद्यात मूळ लेखात वर्णन केलेल्या गोष्टी (ब्राह्मण पुरोहितांची दक्षिणा आणि इतर जातींमध्ये असलेले विधी) सरकार कसं हाताळतं हे पहाणं महत्त्वाचं ठरेल. माझा अंदाज असा आहे की सुरूवात तरी हीनातल्या हीन प्रथांविरुद्ध शस्त्र म्हणून हा वापरला जाईल. जिथे उघड उघड मृत्यू, हाल आणि लुबाडणुक दिसते तिथे. नवस बोलण्याबद्दल भगताला किंवा सत्यनारायण केल्याबद्दल भटजीला दक्षिणा देण्यावर काही गंडांतर येईलसं वाटत नाही.

अजो१२३ Sun, 25/08/2013 - 21:15

सबब लेखकाकडे आपण निष्पक्षपणे का पाहू शकत नाही? त्याने कोणत्याही सुरात आणि शब्दांत आपले विचार मांडले तरी त्याचा एकूण उद्देशापासून तो लेख दूर जात नाही. काही विशिष्ट कलमेच का गाळली? तेवढ्या एका कलमात सारे साळसूद ब्राह्मण कवर होतात. तेच का गाळले?

कायद्याच्या , कायदा करणारांच्या मर्यादा आहेत पण त्या लेखाच्या मांडणीत चूक काहीच नाही. त्याचा 'सुर' बायस्ड आहे म्हणून त्याने मांडलेला मुद्दाच गैर आहे का? ब्राह्मणांचा सरकारदरबारीचा प्रभाव लागला नाहीच असे धरले तरी अंधश्रद्धेचे वर्णन (व्याख्या नाही कायद्यात) एका विशिष्ट टप्प्याला आणून संपवले आहे. ते ब्राम्हणांच्या पथ्यावर पडले आहे. यात कुणाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली तर त्याच्यात एवढे आक्षेप घ्यायसारखे काय? प्रामाणिक शंकाशमन शक्य असेल तर करावे. भाषेच्या, सुराच्या अंदाजावरून एका प्रामणिक प्रश्नाचे उत्तर टाळू नये.

Irrespective who has said it, where it is done so, with what tone, what objective, the significance of the point does not lessen.

(माहिती- मी तो ब्लॉग मागच्या एका धाग्याच्या संदर्भात बर्‍यापैकी वाचला आहे.)

फारएण्ड Wed, 28/08/2013 - 10:03

In reply to by अजो१२३

पण ते १३ वे कलम नक्की काय होते? त्यात जर काही गोष्टी वगळल्या असतील तर ते काढल्याने नक्की काय गडबड झाली? त्या लेखातील या कलमाचा संदर्भ संदिग्ध आहे. त्या ब्लॉगवरचे इतर लेख पाहिले तर कोणत्याही लेखातील स्वतःच्या मताला अनुकूल गोष्टी फक्त ठेवून प्रोपोगंडा केलेला वाटतो.

फारएण्ड Fri, 30/08/2013 - 01:56

In reply to by अजो१२३

धन्यवाद माहितीबद्दल. त्या कलमात या दोनच गोष्टी होत्या की ब्राह्मणांचा किंवा कोणत्याही एका जातीचा संबंध नसलेल्या इतर प्रथाही होत्या?

फारएण्ड Sat, 31/08/2013 - 00:26

In reply to by अजो१२३

१. त्यातील या दोनच गोष्टी वेगळ्या काढून एका जातीला घाऊक टारगेट करण्याचाच अजेंडा त्या ब्लॉगवर दिसतो. त्यामुळेच तो निष्पक्षपातीपणे वाचता येत नाही मला तरी. तेथील लेखांचा उद्देश कोणतेही मुद्दे उपस्थित करणे हा नसून केवळ काड्या लावणे हाच दिसतो.
२. आणि मुळात या दोन गोष्टी जर असत्या तर ब्राह्मणांखेरीज जे लोक त्या पूजा करून घेतात त्या सर्वच जातींच्या लोकांना त्याचा त्रास झाला असता ना?
३. त्यातही तेथील "ब्राह्मण" हा उल्लेख - या पूजा करणारे ब्राह्मण, म्हणजे गुरूजी यांच्याशीच फक्त संबंधित आहे. बाकी ब्राह्मण जातीच्या लोकांशी त्याचा संबंध इतर कोणत्याही जातीएवढाच आहे.

अजो१२३ Sat, 31/08/2013 - 15:26

In reply to by फारएण्ड

१. ब्लॉगचा सुर कसा आहे हा मुद्दा गौण आहे. समजा तो फार जातीय आणि वाईट आहे. तरीही त्यात एक सत्यही मांडलेले आहे. ते काय ते माझ्या पहिल्या प्रतिसादात लिहिले आहे.
२. 'पूजा करून घेणे' दंडणीय नसले असते. पूजा करणे दंडनीय असले असते. त्यामुळे टिका पुरोहितांवर करणे रास्त आहे.
३. 'सगळे गुरुजी ब्राह्मण आहेत' म्हणून लेखकाने तिथे ब्राह्मण शब्द सरसकट वापरला आहे. शिवाय मी इतर ब्राह्मण आहे म्हणून माझी गुरुजींना सहानुभूती आहे असेही होऊ शकते.

http://www.hindujagruti.org/activities/campaigns/religious/anti-faith-b… इथे राइट विंगचे क्लॉज १३ चे विरोधाचे कारण आहे. ते (ब्लॉगचे वातावरण) ही निपक्षपातीपणाचे नाही पण नाइलाज आहे. तर हे क्लॉज गाळण्यास दाभोळकरांनी मान्यता दिली. अगदी खुली, पब्लिक डिबेटमधे. आणि ब्राह्मण सुटले! असा अर्थ काढणे एकदमच अतार्किक नाही.

सगळ्याच प्रथांचा समाजाला त्रास होत असताना ब्राह्मणांच्या पथ्यावर पडणार्‍या प्रथा कायद्यात का टाळल्या आहेत असे कुणास वाटू शकते. हा मुद्दा सबब लेखकाने आपल्या पद्धतीने मांडला आहे. Let's not waste our time on his style.

खरे तर हे सगळे कॉग्रेसचे,माध्यमांचे सेक्यूलर म्हणून, काम आहे. अंनिस आणि वारकरी यांचे भांडण लावून टाळ्या कुटण्यापेक्षा 'नि:पक्षपातीपणे' सर्वांची भूमिका काय आहे हा संवाद तरी त्यांनी नीट साधायला हवा होता. मूळ बिलात केवळ हिंदू धर्माचा उल्लेख होता असे वाटते. अजूनही बिलाची प्रावधाने पाहताना कोणती ख्रिश्चन कुप्रथा कव्हर झाली आहे याचे उत्तर कोणतीच नाही असे आहे. ख्रिश्चनांत कुप्रथा नसतात का? असतात. मुसलमानांचा पण बिलाला कधी विरोध झाल्याचे आठवत नाही, नेटवर बातमी नाही. दिल्ली ते आग्रा रेल प्रवास कराल तर 'वीर्य', 'पूत्र', 'संतान', 'बाधा', इ वर काम करणारे ७० ते ८०% बाबा मुसलमान असतात हे बाहेरच्या जाहिराती पाहून कळते. महाराष्ट्रातही वेगळी परिस्थिती नाही. मुस्लिम समाज प्रगत झाला आहे असे विरोधाच्या अभावावरून मी म्हणू शकतो. पण १४ पैकी १२ वर्षे त्यांना हे बिल 'असंबंधित' असेही वाटले असेल. म्हणून विरोध करायची पद्धत त्यांच्याकडे नसेल. पण जर भविष्यात असे बरेच मुस्लिम बाबा पकडले जाऊ लागले तर विरोध न केल्याचा त्यांना पश्चात्ताप वाटेल असेही वाटते. पारशी प्रेत गिधाडांना खायला सोडतात, तोच त्यांचा अंतिमसंस्कार असतो. तो बिलात नाही. पुन्हा तेच - ज्याचं जळतं ...

पॉइंट असा आहे कि कोणाच्या प्रथांना कायद्यात समावले गेले आहे आणि कोणाच्या नाही यावरून काही त्या वरून त्या त्या समाजाच्या लोकांना वाइट वाटले आहे, वाटणार आहे. नजमा हेपतुल्लांना 'जन्म मृत्यू नोंदीच्या' कायद्याने 'मुस्लिम महिलांना' काही फायदा झाला असे (वाइट) वाटले तसेच. एक समाज म्हणून आपण सगळे इतके विभक्त झालो आहोत कि 'हिंदुना वाइट वाटले' इतका सरळ अर्थ काढता येत नाही. त्यातही उपप्रकार (ब्राह्मण, इतर) आहेत. त्याचे पडसाद त्या ब्लॉगवर आहेत.

दाभोळकरांनी कुर्बानी दिली आहे तर आता 'तातडीने' कायदा झालाच पाहिजे असे समजणारे दिडशहाणेही समाजात चिकार आहेत. ते सरकारात बहुसंख्यने निघाले!! त्यांची कथा वेगळीच आहे. कायदा हा कसा असावा? व्यवहार्य आणि राबवण्यालायक असावा. त्याची उद्दिष्टे पूर्ण करता येतील असा असावा. अशी सरकारकडे व्यवस्था असेल, निर्माण करता येत असेल, तरच तसा कायदा करणे काही कामाचे! नाही 'कामचलावू' कायदा म्हणजे काय? दीडशहाण्या लोकांचा प्रतिकात्मक विजय यापलिकडे त्याचे काही महत्त्व नसते.

'न'वी बाजू Sat, 31/08/2013 - 22:06

In reply to by अजो१२३

दाभोळकरांनी कुर्बानी दिली आहे तर आता 'तातडीने' कायदा झालाच पाहिजे असे समजणारे दिडशहाणेही समाजात चिकार आहेत. ते सरकारात बहुसंख्यने निघाले!! त्यांची कथा वेगळीच आहे. कायदा हा कसा असावा? व्यवहार्य आणि राबवण्यालायक असावा. त्याची उद्दिष्टे पूर्ण करता येतील असा असावा. अशी सरकारकडे व्यवस्था असेल, निर्माण करता येत असेल, तरच तसा कायदा करणे काही कामाचे! नाही 'कामचलावू' कायदा म्हणजे काय? दीडशहाण्या लोकांचा प्रतिकात्मक विजय यापलिकडे त्याचे काही महत्त्व नसते.

बाकीचे असो, पण या एका परिच्छेदाकरिता एक 'मार्मिक' माझ्यातर्फे तुम्हाला! (अधोरेखित वाक्याकरिता आणखी एक जास्तीची श्रेणी द्यायची सोय असती, तर छान झाले असते, असे आता वाटू लागते.)

तेवढा 'कुर्बानी' हा शब्द दुहेरी अवतरणांत (मराठीत: डबलक्वोटांत) टाकला असतात, तर अधिक समर्पक झाले असते, पण हरकत नाही.

नितिन थत्ते Mon, 26/08/2013 - 15:23

सदर लेखात मांडलेले प्रश्न (कसे मांडले या कारणाने) दुय्यम ठरत नाहीत या अरुण जोशींच्या मताशी सहमत आहे.
तरीही
नारायण नागबळी हा विधी या कायद्याच्या अंधश्रद्धेच्या कक्षेत येणार नाही असे वाटत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 28/08/2013 - 17:31

In reply to by ऋषिकेश

या नाड्यांचा प्रचार सध्या मराठी आंजावर दिसत नाही त्यामुळे मी त्यातल्या त्यात आनंद मानून घेते आहे.

यसवायजी Wed, 28/08/2013 - 21:59

या ब्लॉगवरचे बहुतेक सगळे लेख निरर्थक असले तरी तुम्ही दिलेल्या या लिंकमधे काही मुद्दे महत्वाचे आणी बरोबर आहेत. तुमचा आक्षेप त्यातील कोणत्या मतांवर आहे?

माझ्या आजोळचे बरेच नातेवाईक या (भटजी) व्यवसायात असल्याने दक्षिणेच्या नावाखाली केली जाणारी लुबाडणूक पाहलीय.
माझ्या मावशीला खोकल्याचा खुप त्रास आहे. तीला कसाला तरी एक होम करायला सांगीतला होता. हजारो रुपए या विधींवर खर्चून काही फायदा झाला नाही.(होणारच नाही म्हणा)..मग ही लुबाडणूक नाही का? आणी यापेक्षा महत्वाचे, यातुन अंधश्रद्दा वाढत नाही का?

-SYG-

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 28/08/2013 - 22:18

दिल्लीतल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातल्या निर्भयाचा मृत्यु झाला. आणखीन सरकारने न्या. वर्मा समितीकडून अहवाल बनवून घेतला. हा अहवाल मान्य झाला, असं काहीसं आठवतं. या सगळ्या प्रकरणामधे मला एक गोष्ट समजत नाही, ती अशी की, ज्या प्रसंगी हा बलात्कार होत होता, त्या प्रसंगी हे लोक सरकारलाच दोष देत होते. प्रशासनावर आरोप करत होते. म्हणजे, बलात्कार होतो आहे त्याला प्रशासनच जबाबदार आहे, असे यांना म्हणायचे होते. मग आता हा न्या. वर्मा समितीचा रिपोर्ट मान्य झाला तरी हे लोक पुन्हा वरून प्रशासनालाच दोषी धरीत आहे, ते का असा माझा प्रश्न आहे.

आणखीन एक गोष्ट मी येथे दाखवून देऊ इच्छिते. ती अशी की, लोक हेसुद्धा सरकारचा भाग आहेत. सांगायचा मुद्दा असा की, जर समितीचा अहवाल मागवा करा म्हणून आंदोलन चालविणारे व्यक्ती सरकारचा भाग आहेत, आणि अहवाल मान्य व्हायला नको, म्हणून दुसरे आंदोलन करणारे व्यक्ती जे की मंत्री आणि इतर आहेत, तेसुद्धा प्रशासनच आहेत तर मग प्रशासनालाच दोष का म्हणून दिला जातो.

आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, मी मागे भयंकर चित्रपटा विषयी लेखन केले होते. या संकेत स्थळावरील बंधू आणि भगिनींनी या लेखनाला खूप प्रतिसाद दिला होता. आणखीन माझा उत्साह वाढविला होता. या लेखनावर इतकी चर्चा झाली की, कोणत्याही लेखनावर झाली नसेल. या लेखनातील चित्रपटात नेहमीच प्रशासनावर टीका करण्यात येते. तशीच आता पण करण्यात आली आहे. वर्मा समितीचा अहवाल जो आता मान्य झाला आहे, त्याच्यावरच हे मनुष्य टिका करू लागले आहेत. काय तर म्हणे हा जो कायदा पास झाला आहे, तो पुरुषप्रधानता माजविणारा अहवाल आहे. अशी टिका बरोबर आहे का? म्हणजे अहवाल मान्य होत नव्हता, तर सरकारमुळेच होत नव्हता. आता अहवाल मान्य झाला तर प्रशासनाच्या फायद्याचा पास झाला. असे कसे? हा कायदा पुरुषप्रधानता माजविणारा आहे, असे जे आरोप हे लोक लेख लिहून करू लागलेले ओहत, ते फारच चुकीचे आहे. याच भयंकर चित्रपट दिग्दर्शकावर आणखी एक भयंकर लेख पडला आहे. त्याचे हेडिंग वाचून सुद्धा संताप येतो. तसे असे आहे : स्त्रियांचे संरक्षण नव्हे, पुरुषप्रधानता माजवणारा अहवाल.

अरे तुम्ही लोकच हा अहवाल मान्य व्हावा असे म्हणत होतात ना? आता आणखीन टिका का करता?

या धाग्यावरचा हा माझा दुसराच प्रतिसाद आहे. आधीचा प्रतिसाद फार चांगला जमला नव्हता. आता उलुशीच मेहनत करून हा प्रतिसाद लिहिला आहे. आजची संपूर्ण पाच मिनीटं हा प्रतिसाद पाडण्यातच गेली आहेत. यात काही कमी जास्त झाले असल्यास मी हात जोडून क्षमा मागते. हा दुसार प्रतिसाद सर्व बंधूंना आणि भगिनींना आवडेल, अशी आशा करते.

-- एक चोप्य-पस्ते, बिनडोक, विडंबक

ता. क. शुद्धलेखन चुकलेले नसल्यास कृपया माफ करावे.

सुप्रिया जोशी Thu, 29/08/2013 - 15:51

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे काय हो अदिती ताई, माझी अशी खिल्ली उडविणे शोभते काय तुम्हाला? मी कधी तरी असे केले आहे का? आणखीन मी कधी असे करणारही नाही. तुम्ही जरी माझी अशी खिल्ली उडविली आहे, तरी देखील मी तुम्हाला ताई असेच म्हटले आहे आणखीन पुढे पण ताई असेच म्हणेन. कोणी कसेही का वागत असले तरी आपण चांगलेच वागायचे हाच माझा नियम आहे. माझ्यावर संस्कार झाले आहेत, तसेच मी वागणार.

बरे तुम्ही जे काही लिहिले आहे, ते स्वत:चे तरी लिहायचे, असा माझा मुख्य मुद्दा आहे. माझ्याच लेखात थोडे थोडे बदल करून जसल्याचा तसला लेख तुम्ही येथे लिहून घेतला आहे. हे खरोखरच योग्य झालेले नाही, अशी माझी स्पष्ट भूमिका मी येथे मांडते. आणखीन खूप काही असे लिहिण्यासारखे आहेच. पण आता माझी लिहिण्याची इच्छा मरून गेली आहे. म्हणजे आपण काही लिहायला जावे, तर तुम्ही लोक असे काही तरी करून दुस-याला नाऊमेद करणार, मग लिहावे तरी का आणि कसे, याचे उत्तर मला आधी द्या.

आणखीन माझा शेवटचा प्रश्न आहे की, जर हे असेच होणार असेल, तर मी या स्थळावर लेख लिहू नये का?
किंवा मग मी माझी या स्थळावरची सदस्यता मागे काढून घ्यावी काय?

सुप्रिया जोशी Thu, 29/08/2013 - 15:58

In reply to by सुप्रिया जोशी

आणखीन एक मुद्दा राहिला आहे तो येथे मांडून ठेवते. म्हणजे मी जे काही दोन लेख लिहिले आहेत ते काही स्वत:साठी लिहिलेले नाहीत. आज काल समाजामध्ये ज्या काही अपप्रवृत्ती नेटवरून पसरत चालल्या आहेत, त्या आपल्या सर्वांच्या नजरेत आणून द्यायला पाहिजे आहे, असे मला वाटले म्हणून मी हे सगळे केले. त्यामध्ये माझा किती वेळ पण गेला. आणखीन वर मला त्याचे असे फळ मिळणार असेल, तर माणसाने हे कशासाठी करीत राहावे?

प्रकाश घाटपांडे Thu, 29/08/2013 - 19:13

In reply to by सुप्रिया जोशी

तुम्हाला मिष्किलपणाचे वावडे आहे का हो? तुम्ही विक्षिप्त आदितीचे अन्य लेखन वाचले नाही वाटत.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 29/08/2013 - 19:16

In reply to by प्रकाश घाटपांडे

मी एवढी मेहेनत घेऊन स्त्रियांचे प्रश्न मांडायचा प्रयत्न करते आहे तरी तुम्ही माझ्याबद्दल असं का बोलता? मी हे संकेतस्थळ सोडून निघून जावं असं तुम्हाला वाटतं का?

आडकित्ता Sun, 01/09/2013 - 13:14

In reply to by सुप्रिया जोशी

आणखीन माझा शेवटचा प्रश्न आहे की, जर हे असेच होणार असेल, तर मी या स्थळावर लेख लिहू नये का?
किंवा मग मी माझी या स्थळावरची सदस्यता मागे काढून घ्यावी काय?

पूर्वीच्या काळी, जालीय जगतात हे असले "डायलॉग" लिवणार्‍यांना,

हे^^ भेटीदाखल देऊन, पुढील प्रवासास शुभेच्छा देण्याची पध्धत होती, असे ऐकून आहे.

या किंवदंतीत कितपत तथ्य आहे?

तिरशिंगराव Thu, 29/08/2013 - 19:42

एखादी व्यक्ती खरच एवढी बाळबोध असते की तसा आव आणून लिहित असते हे समजणे जरा अवघड झाले आहे.
प्रत्येक समाजात चांगल्या व अपप्रवृत्ती असतातच. आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला त्याचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जर समाजात तंटे होणार असतील तर त्यावर कारवाई करायला सरकार आहेच. आपण चांगल्या प्रवृत्तींना समर्थन दिले पाहिजे. अपप्रवृत्तींवर चर्चा करुन उगाच त्यांचे महत्व कशाला वाढवायचे ? ते तर, माध्यमे सतत करतच असतात.

'न'वी बाजू Fri, 30/08/2013 - 21:42

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एक शक्यता अशी लक्षात येते, की प्रस्तुत प्रतिसादक हे बहुधा बारा वर्षांकरिता (बारा इयत्तांमध्ये?) प्रस्तुत लेखिकेचे शिक्षक (बहुधा शिकवणीचे) असावेत. त्यामुळे, "बारा वर्षे माझी शिकवणी लावूनसुद्धा हा इतपतच लेख पाडायला जमले का? कर्म माझे!" अशी प्रस्तुत प्रतिसादकाची ल्यामेण्ट असू शकते, असा आपला एक अंदाज. (चूभूद्याघ्या.)

- (वॅटसनचा अनौरस बाप) 'न'वी बाजू.

राजेश घासकडवी Fri, 30/08/2013 - 19:58

In reply to by तेजा

हेचि फळ का मम तपाला!

प्रतिसाद कळला नाही. सुप्रिया जोशींच्या लेखाबद्दल तुम्हाला काही तक्रार आहे का? की तो ब्राह्मणशाहीबद्दलचा लेख तुम्हीच लिहिला आहे? नक्की कुठच्या तपाविषयी बोलत आहात?

'न'वी बाजू Fri, 30/08/2013 - 21:35

In reply to by राजेश घासकडवी

नक्की कुठच्या तपाविषयी बोलत आहात?

उपरोल्लेखित प्रतिसाद ३० ऑगस्ट २०१३ रोजी लिहिला आहे, हे लक्षात घेता, उपरोल्लेखित तप हे ३१ ऑगस्ट २००१पासून ते ३० ऑगस्ट २०१३पर्यंतचे असावे, अशी एक अटकळ मांडता यावी. (एलेमेंटरी, माय डियर...)

मात्र, या तपाचा प्रस्तुत लेखाशी अथवा फळांशी संबंध लक्षात येत नाही. (वॅटसन एलेमेंटरीवाला, तर आमची धाव फार फार तर मिडलस्कूलापर्यंतच. चालायचेच.)

तेजा Sat, 31/08/2013 - 10:59

भाई लोग किती कीस पडला "तपा"चा.

सुप्रिया तै यांनी जी शतकोत्तरी महान ट्रजेडी लिहून काढिली आहे त्यावरून "हेचि फळ का मम तपाला" हे नाट्यगीत आठवले. आपण सारे सुज्ञ आहात, असे गृहीत धरून जास्त लिहिले नाही. पण गहजब झाला.

असो. "सुज्ञांस अधिक सांगणे न लगे" या वाक्प्रचारावर अजूनही आमचा विश्वास आहे.