Skip to main content

दाभोळकरांची हत्या आणि आपण

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन हा धर्म,देव, जात-पात या सगळ्यांना मागे टाकेल, हळूहळू हे सगळं नष्ट होईल असा अंदाज होता, पण विज्ञानाचा वापर केवळ उपकरण वा माध्यम म्हणून जास्त केला गेला. देव, धर्म संपले तर नाहीत पण त्यातल्या अविवेकाचे, मुर्खपणाचे आधुनिकीकरण झाले. आपला सगळा समाज या स्प्लिट सोशल पर्सेनॅलिटीने ग्रासलाय. म्हणजे आपण बाहेर वेगळे असतो आणि घरात वेगळे. बाहेर आपण उच्चविद्याविभुषित पत्रकार, लेखक, डॉक्टर वगैरे असतो आणि घरात आपण केवळ एक डेली दोनदा पुजा करणारी, नवस उपास पाळणारी, पत्रिकावगरे बघणारी, सत्यनारायण, होम वगरे करणारी 'सर्वसामान्य श्रद्धाळू'माणसं असतो. आपल्या या दोन्ही भुमिका आपण इतक्या सहजतेने पार पाडतो की आपल्या स्वतःच्या या दोन परस्परविरोधी भुमिकांबाबत आपल्या मनात यतकिंचितही प्रश्न उभे रहात नाहीत. बाहेर वावरताना विचार करावा लागतो आणि काम करावे लागते, केवळ पुजा केल्याने आणि चार रंगबेरंगी अंगठ्या घातल्याने पैसे मिळत नाहीत इतकी अक्कल आपल्याला आहे. बाहेर मी फिजिक्सचा प्राध्यापक असतो पण घरात मला लग्नासाठी मंगळ असलेली मुलगी चालत नाही. बाहेर मी इंजिनिअर असतो पण घरात वास्तुशांत आणि सत्यनारायण घातल्याशिवाय मी तिथे रहात नाही. बाहेर मी डॉक्टर असतो पण नुसत्या विभुतीने रोग्याला खाडकन बरे करणार्‍या तत्सम बाबाच्या चरणी माझा माथा सदैव टेकलेला असतो. मी घरात शास्त्रीय प्रश्न उपस्थित करत नाही. कारण तसे प्रश्न उपस्थित करणार्‍या लोकांना इथे जागा नाही, त्यांना मुर्खांच्या आणि माथेफिरुंच्या झुंडीला सामोरे जावे लागते.
मानवी मन हे जिथे जाईल, जे म्हणेल आणि जे करेल त्या सगळ्यामागे त्याचा कम्फर्ट असतोच. ही दुहेरी भुमिका अतिशय कम्फर्टेबल आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करण्यापेक्षा ती टाळणे सोप्पे होऊन जाते. नाहीतरी ही देवळं, धर्म आणि त्या अनुषंगाने घडत जाणारी संस्कृती ही एकतर काही अतिहुषार भडव्यांच्या सत्ताकारणाचे राजमार्ग आहेत नाहीतर अतिमुर्ख जनतेच्या भीतीचे डंपिंग ग्राऊंड्स. हा 'धर्म' एक कल्पनेतला मोठ्ठा दरवाजा आहे, तुम्ही काहीही करा कसेही वागा, केवळ शेवटी या दरवाज्याजवळ येऊन कन्फेशन्स द्या, शुद्धी करुन घ्या. मग इकडचे द्वारपाल ठरलेली रक्कम घेऊन तुम्हाला पलिकडे सोडतील आणि तुम्ही पुन्हा पवित्र होऊन बाहेर पडाल. मुळात हा असा दरवाजाच अस्तित्वात नाही याची जाणीव होणे आवश्यक आहे. अनेकांना ती असतेही परंतु माणसाच्या क्रुरपणाला,दडपशाहीला आणि भीतीला शरण गेलेली 'माणसाळलेली माणसं' निमुटपणे या दरवाज्यासमोर रांगा लावतात.

नितिन थत्ते Tue, 20/08/2013 - 17:36

>>म्हणजे आपण बाहेर वेगळे असतो आणि घरात वेगळे. बाहेर आपण उच्चविद्याविभुषित पत्रकार, लेखक, डॉक्टर वगैरे असतो आणि घरात आपण केवळ एक डेली दोनदा पुजा करणारी, नवस उपास पाळणारी, पत्रिकावगरे बघणारी, सत्यनारायण, होम वगरे करणारी 'सर्वसामान्य श्रद्धाळू'माणसं असतो.

वैयक्तिक (दोन) आप्तपरिचितांच्या अनुभवावरून असे वाटते की असे सरसकटीकरण नसते. व्यक्तीला एखाद्या विषयात बर्‍यापैकी ज्ञान असेल तर श्रद्धाळू असलेली व्यक्तीसुद्धा त्या क्षेत्रातल्या श्रद्धांना धूप घालीत नाही.

एक आप्त सुवर्ण या विषयातले तज्ञ आहेत. त्यांना कुणी सांगितले की "सोन्याचे दागिने अंगावर घालून आंघोळ केल्यास आरोग्यास फायदा होतो". किंवा "सोन्याची अंगठी पाण्यात बुडवून ठेवून ते पाणी प्याले असता.... " तर ते कदापि विश्वास ठेवणार नाहीत/मान्य करणार नाहीत. कारण त्यांच्या स्वतःच्या ज्ञान अनुभवाच्या जोरावर सोन्याचा काही अंश या मार्गाने पाण्यात, शरीरात जाऊ शकणार नाही हे त्यांना खात्रीने ठाऊक आहे. परंतु इतर श्रद्धांच्या बाबतीत (ज्या त्यांच्या ज्ञानाच्या क्षेत्रातल्या नाहीत) त्यावर मात्र ते "असेल काहीतरी; आपल्याला ठाऊक नसलेले" असे म्हणून विश्वास ठेवतील आणि त्यानुसार कृतीही करतील.

दुसरे एक परिचित आयुर्वेदिक वैद्य आहेत. आयुर्वेदातली औषधे प्रयोगाद्वारे सिद्ध झालेली नाहीत/सिद्ध करण्याची गरज आहे असे ते छातीठोकपणे सांगतील. किंवा आयुर्वेदाच्या विचारपद्धतीत अमूक चुका आहेत असेही सांगतील. पण इतर श्रद्धांबाबत ते सामान्य श्रद्धाळूंप्रमाणेच वागतील.

आणखी लिहायचे आहे पण नंतर लिहीन.

Nile Wed, 21/08/2013 - 02:19

In reply to by बॅटमॅन

स्वत:ला ज्यातले कळत नाही त्याबाबत चुकीच्या श्रद्धा बाळगणार्‍यांनाच अंधश्रद्ध म्हणतात. ज्यातले कळते त्याबाबतही चुकीच्या श्रद्धा बाळगणार्‍यांना गाढव म्हणतात.

Nile Wed, 21/08/2013 - 06:02

In reply to by बॅटमॅन

वाद घालायचा असेल तर खुशाल घालू. पण

स्वतःला ज्यातले बरेच कळते अशा विषयात तरी अंधश्रद्ध नसतात लोक शक्यतोवर.

या विधानातला फोलपणा दाखवला इतकेच. विवेक असणे म्हणजेच आपल्याला 'एखाद्या विषयात बरेच कळत नसले' तरी अंश्रद्धेने न वागणे म्हणजे काय हे कळणे. किंवा, एखाद्या विषयात बर्‍यापैकी कळत नसले म्हणून त्याविषयातली अंधश्रद्धा खपून जावी अशी अपेक्षा नको.

बॅटमॅन Wed, 21/08/2013 - 11:44

In reply to by Nile

ते विधान फोल नसून टॉटॉलॉजिकल आहे असे म्हणता येईल-बाकी काही नाही. अंधश्रद्धा खपून जावी अशी अपेक्षा नाहीच हेवेसांनल. तदुपरि प्रतिसादातले व्हिट्रिऑल अनावश्यक होते.

हरवलेल्या जहाज… Tue, 20/08/2013 - 18:03

In reply to by नितिन थत्ते

अहो नितीनजी, अपवाद आहेतच की नक्कीच आहेत पण त्यांची संख्या किती आहे? आणि त्यातले कितीजण निदान आपल्या कुटंबात नातेवाईकांत, व्यवसायच्या ठिकाणी आणि आपल्या एकुण अवती भवती वावरताना याच्या वर बोलताना किंवा कृती करताना दिसतात? हे सरसकटीकरण करताना केवळ या अंधश्रद्धांना वाहून घेतलेल्या माणसांचाच नाही तर हे सगळं भोवती सुरु असताना, ते पट्लं नाही तरी 'उगाच कशाला रोष ओढवून घ्या' असा विचार करुन निमुटपणे हे सगळं मान्य करायला लागणारे लोकही बरेच आहेत. हा तटस्थपणा जास्त भयंकर आहे. आजच्या घडीला वास्तवात आपली धर्माची आणि संस्कृतीची व्याख्या वाईटाकडे जातेय. सत्य, प्रेम आणि अहिंसा यापेक्षा असत्य, राग, द्वेष आणि हिंसा ही धर्माची व्याख्या बनतेय. त्यात आपल्या अंधश्रद्धेचा आणि तटस्थपणा या दोन्ही वृत्तींचा दोष आहे.

मी Tue, 20/08/2013 - 17:56

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन हा धर्म,देव, जात-पात या सगळ्यांना मागे टाकेल, हळूहळू हे सगळं नष्ट होईल असा अंदाज होता, पण विज्ञानाचा वापर केवळ उपकरण वा माध्यम म्हणून जास्त केला गेला. देव, धर्म संपले तर नाहीत पण त्यातल्या अविवेकाचे, मुर्खपणाचे आधुनिकीकरण झाले.

देव,धर्म हे हि साधनच आहे, अविवेकी दृष्टिकोन घातक आहे.

हरवलेल्या जहाज… Tue, 20/08/2013 - 19:45

In reply to by मी

याचं मुळ मानवी स्वभावात आहे. 'The will of power is the main driving force in humans',असं 'नित्शे' म्हणतो. देव आणि धर्म ह्या दोन गोष्टी अशा महत्वाकांक्षी माणसाची दोन सर्वात धारदार अस्त्रे आहेत. याउलट यात बळी पडणार्‍या माणसं ही देव आणि धर्माला साधन मानतात का? त्यांच्यासाठी तर तो सर्व सृष्टीचे पालन करणारा जगनियंता असतो आणि म्हणूनच या अशा सर्वशक्तीमान देवाला खुष ठेवण्यासाठी, त्याचा कोप होऊ नये म्हणून ते काय काय प्रकार करतात आणि पर्यायाने या व्यवस्थेचे बळी ठरतात. दुसर्‍या बाजूला ही अस्त्र परजणारी माणसं एकदा चटक लागली की शांत बसत नाहीत, त्यांची भूक संपतच नाही. प्रत्येकाला जग जिंकायची, जगावर राज्य करायची इच्छा असते, त्यामूळे सहसा ही अस्त्रं म्यानात रहात नाहीत आणि कदाचित रहाणारही नाहीत, संपुर्ण मानवजात नष्ट होईपर्यंत.

अजो१२३ Tue, 20/08/2013 - 18:51

कप्तानजी,
आज रक्षाबंधन आहे. वर्षातल्या एका दिवशी बहिणीने भावाला ओवाळणे आणि राखी बांधणे हा तद्दन मूर्खपणा आहे आणि घोर अंधश्रद्धा आहे असे जर कुणी मला म्हटले तर माझ्याकडे युक्तिवादच नाही. मला गुपचुप ती गावाकडून आलेली राखी उतरून ठेवावी लागेल. आपण दिलेली सारी उदाहरणे यात काय फरक आहे. अंधश्रद्धा पाळायची नाही असे ठरवले तर जगायचे थांबवावे लागेल असे माझे मत आहे. त्यामुळे मला एक comprehensive list पाहिजे, जे करणे योग्य आहे आणि ज्याने माझ्यावर अंध असल्याची टीका होणार नाही.

मला वाटते त्याप्रमाणे विज्ञानावर विश्वास ठेवायला आज प्रत्येक जण तयार आहे. पण विज्ञानाकडे पुरेश्या guidelines नाहीत, त्या ठीक document केल्या नाहीत, आणि प्रचारासाठी institutional framework नाही. फक्त चुकणारास टीका करायला पुढे येणारे हजारो स्वयंघोषित स्वयंसेवक आहेत.

हरवलेल्या जहाज… Tue, 20/08/2013 - 22:50

In reply to by अजो१२३

>>आज रक्षाबंधन आहे. वर्षातल्या एका दिवशी बहिणीने भावाला ओवाळणे आणि राखी बांधणे हा तद्दन मूर्खपणा आहे आणि घोर अंधश्रद्धा आहे. असे कुठल्याही कार्यकारणभावाशिवाय म्हणणे हीसुद्धा अंधश्रद्धाच नाही का? ही एक बहीण-भावाचे प्रेम अधोरेखित करणारी साधीसोप्पी सिंम्बॉलिक प्रथा आहे, त्यामागे गुढ, दैवी किंवा राक्षसी असे काहीही नाही. मी वर उल्लेखलेल्या प्रथा जसे पत्रिका पहाणे, मंगळ-शनी यांना दैवरुप देऊन त्याचा आपल्या फायद्यासाठी वापर करणे, मांत्रिकीकरण, बुवाबाजी ही सगळी पैसा कमवायची साधनं आहेत, त्यात माणसाच्या भीतीचा आपल्या फायद्यासाठी वापर करणे पर्यायने आलेच. रक्षाबंधनात असे काय आहे?
>>अंधश्रद्धा पाळायची नाही असे ठरवले तर जगायचे थांबवावे लागेल असे माझे मत आहे. हे तर बिलकुलच न पटणारे आहे. आपण सगळ्याच गोष्टी डोळे झाकून करतो का? साधं उदाहरण घ्यायचं झालं तर, वैज्ञानिक शोध व वैज्ञानिक कृती इत्यादी सुद्धा अंधश्रद्धेपोटीच होतात का? आपण नोकरि करतो तेव्हा आपला पगार पैशातच अगदी मोजून घेतो ना की आपल्या खात्यावर 'पुण्य' जमा होतं?
>>पण विज्ञानाकडे पुरेश्या guidelines नाहीत हे ही चुकीचं...गेल्या शतकांत ज्याला चमत्कार म्हटलं जाईल अशा अनेक गोष्टी आता विज्ञानाने सिद्ध केलेल्या आहेत, आणि आता आपण ज्याला चमत्कार म्हणतो त्याही पुढे सिद्ध होतील, पण तिथपर्यंत ही अज्ञाताबद्दलच्या ज्ञानाची पोकळी माणसाने आपल्या परिकथांनी भरलीच पाहीजे असं नाहीये. भानामती, अंगात येणे, मंगळ-शनी कोप, हुंडा बुवाबाजी चमत्कार या सगळ्या गोष्टी १-१० वी मध्ये शाळेत विज्ञान व्यवस्थित शिकलं, शिकवलं गेलं आणि त्यानुसार चिकित्सक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासण्याची आणि प्रश्न विचारण्याची सवय ठेवली तर यातलं काहीही कठीण नाही.
शेवट्चं म्हणजे स्वयंघोषित स्वयंसेवक स्वतःहून येत नाहीत, त्यांना यावे लागते. आपला धर्म आणि देव हा अनेक लोक मनात ठेवत नाहीत. लोक धर्म रस्त्यावर आणतात, ताशे-ढोल वाजवून हैराण करतात, फतवे काढतात, या धर्माने अधिष्टित केल्याप्रमाणे जातीची हायार्की बनते, शतकांनुशतके काही लोक या परिकथांच्या नावाने शोषण करतात आणि आणि याच परिकथांवर विश्वास ठेऊन उरलेले हजारो शोषण करवून घेतात, हजारो नवनव्या प्रथांना जन्म घालून लोकांना लुटलं जातं, जन्माने अमूक धर्माचा माणुस दुसर्‍या धर्माच्या माणसाचं निरपराध मूल मारतो, एखाद्या बाईवर बलात्कार करतो किंवा हुंडा दिला नाही म्हणून स्त्रीला जीवंत जाळलं जातं, तेव्हा टिका करावीच लागते.

अजो१२३ Wed, 21/08/2013 - 13:23

In reply to by हरवलेल्या जहाज…

आपल्या लेखाचा रोख माझ्यासारख्या शिक्षित लोकांकडे आहे. आपल्याच लेखातले हे शब्द मी खाली लिहित आहे.
ज्या आपल्याला अंधश्रद्धा म्हणून अपेक्षित आहेत तिथे माझी गल्लत होत आहे. आपल्या मते खालील सर्व अंधश्रद्धा आहेत. माझे काय मत आहे ते लिहित आहे.

धर्म मानणे - अंधश्रद्धा आहे कि नाही माहित नाही.
देव -अंधश्रद्धा आहे कि नाही माहित नाही.
जात-पात -अंधश्रद्धा आहे
नवस उपास -अंधश्रद्धा आहे
पत्रिका -अंधश्रद्धा आहे
सत्यनारायण -अंधश्रद्धा आहे
होम -अंधश्रद्धा आहे
अंगठ्या -अंधश्रद्धा आहे कि नाही माहित नाही (लग्नाची अंगठी मी घालतो)
मंगळ -अंधश्रद्धा आहे
वास्तुशांत -अंधश्रद्धा आहे
सत्यनारायण -अंधश्रद्धा आहे
विभुती -अंधश्रद्धा आहे
बाबा -अंधश्रद्धा आहे
देवळं -अंधश्रद्धा आहे कि नाही माहित नाही.
शुद्धी -अंधश्रद्धा आहे
कार्यकारणभावाची मर्यादा - मला ज्ञानाची आणि वेळेची (आणि अकलेची) मर्यादा आहे
चमत्कार -अंधश्रद्धा आहे
भानामती-अंधश्रद्धा आहे
अंगात येणे -अंधश्रद्धा आहे
मंगळ-शनी कोप --अंधश्रद्धा आहे
हुंडा -अंधश्रद्धा आहे
मनाबाहेरचा धर्म आणि देव -अंधश्रद्धा आहे कि नाही माहित नाही.
धर्म रस्त्यावर (दहीहंडी)- अंधश्रद्धा आहे कि नाही माहित नाही.
फतवे -अंधश्रद्धा आहे
धार्मिक हत्या -अंधश्रद्धा आहे
धार्मिक बलात्कार -अंधश्रद्धा आहे

यातले बरेच आयटम असे निघाले आहेत कि मी substantially अंधश्रद्ध आहे असे मला वाटत आहे.

अंधश्रद्धा किंवा कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती नष्ट व्हावी याकरिता झटणार्‍या कोणत्याही व्यक्तिचा मला आदर आहेच. पण दाभोलकरांचा विवेकवादाचा आग्रह 'समस्या सोडवण्याचा एक उपाय' म्हणून मला अयोग्य वाटतो. पृथ्वी गोल आहे हे मी वि़ज्ञानावर विश्वास ठेउन स्वीकारले आहे. बंदरातून दूर चाललेले जहाज - त्याचा बुडाचा भाग प्रथम दिसायचा थांबतो हे मी पाहिले आहे. पण त्याचा अर्थ १. पृथ्व्वीला curvature आहे, नक्की गोल /जिऑइड आहे कि नाही ते माहित नाही. २. Sinusidal पॄष्ठभागाच्या सपाट ग्रहावरही हेच निरीक्षण झाले असते, असे अजून दोन अर्थ काढायचे माझ्याकडे पर्याय होते. इतर माहीती (अंतरिक्षातूनचे प्रकाशचित्र) जी मला उपलब्ध आहे तिच्यावर मी विश्वास ठेवतो. शेवटी मी विज्ञानावर विश्वास ठेवतो.
विज्ञानावर ठेवलेला तो विश्वास आणि इतरत्र ठेवलेली ती श्रद्धा किंवा अंधश्रद्धा असेच माझे समीकरण होत आहे. पण प्रत्येक ठिकाणी विवेक, विवेकवाद, ज्ञान लावू लागतो तर - १. तितका मला वेळ नाही. जीवन जगण्याची गती खूप जास्त आहे. इतकी डोकेफोड कोण करणार? २. ज्ञान नाही - मला हवी तितकी माहिती नाही जेणेकरून कशावर विवेकवाद लावायचा आहे ते नीट उप्लब्ध होईल. ३. डोके नाही. - वेळ आणि माहिती उपलब्ध झाली तरी मी नीट अर्थ काढेन याची शाश्वती नाही. मी आयुष्यात अनेक गणीतीय, तांत्रिक चूका केल्या आहेत. त्यांमुळे विवेकवाद वापरून मी काढलेले उत्तर अनेकदा चूक असेल.

मी खूप आग्रहाने म्हणतो मला खूप जास्त डोके लावायचे काम देऊ नका. अंधश्रद्धेच्या बाबतीत सरकारचीच किंवा पुरुस्कृत संस्था असावी. तिची व्यवस्थित Institutional Framework असावे. त्यात capacity building करून सरकारने प्रत्येक बाबीवर एक official position घ्यावी. नंतर आम्ही आमच्या श्रद्धा तशा अलाइन करू.

दाभोलकरांनी केलेल्या विवेकवादाच्या आग्रहाला विरोध करणे आणि 'मला डोके लावायचे काम देउ नका' याचा भलताच अर्थ काढू नका. विवेकवाद किंवा अन्य कोणताही असा पाया एक साधारण नागरीक म्हणून तत्त्वतः मला मान्य आहे. पण त्याचे ओझे नको आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर दाभोलकर इंजिनिअरला first principles वापरून मशीन बनवण्यास सांगत आहेत. अभियंत्याच्या उभ्या आयुष्यात फार तर एक मशीन बनेल. हाच अभियंता जर सरकारने मशीन बनवायची stanadards उपलब्ध करून दिली तर मोठा कारखाना टाकून हजारो मशीनी बनवेल.

वैज्ञानिक शोध लावणे वैज्ञानिकांचे काम आहे, त्याची सामाजिक वर्तनाची मानके बनवण्याचे काम सरकारचे आहे, त्यांच्यावर विश्वास ठेऊन आदर्श नागरीक बनण्याचे काम माझे आहे.

नितिन थत्ते Wed, 21/08/2013 - 14:32

In reply to by अजो१२३

प्रतिसादाची मांडणी उत्तम झाली आहे म्हणून (त्यातले म्हणणे सर्वस्वी पटले नसूनही) मार्मिक श्रेणी दिली आहे.

>>मी खूप आग्रहाने म्हणतो मला खूप जास्त डोके लावायचे काम देऊ नका. अंधश्रद्धेच्या बाबतीत सरकारचीच किंवा पुरुस्कृत संस्था असावी. तिची व्यवस्थित Institutional Framework असावे. त्यात capacity building करून सरकारने प्रत्येक बाबीवर एक official position घ्यावी. नंतर आम्ही आमच्या श्रद्धा तशा अलाइन करू.

सरकार नावाच्या संस्थेने सांगणे काय आणि कुणा गागाभट्टाने किंवा खलिफाने किंवा बापूने सांगणे काय.... दोन्ही एकच ठरेल ना? हाच तर अंधविश्वास.

पुन्हा एक गोष्ट मान्यच आहे की प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वेळी विवेकी निर्णय घेणे शक्य होईलच असे नाही. शक्य तितक्या जास्तीतजास्त वेळा विवेकी वागणे हे तर नक्कीच शक्य होईल.

अजो१२३ Wed, 21/08/2013 - 21:12

In reply to by नितिन थत्ते

सरकार नावाच्या संस्थेने सांगणे काय आणि कुणा गागाभट्टाने किंवा खलिफाने किंवा बापूने सांगणे काय.... दोन्ही एकच ठरेल ना? हाच तर अंधविश्वास

नितिनजी, एक उल्लेख राहिला.
सरकार नावाच्या संस्थेने सांगणे काय आणि कुणा विज्ञान नावाच्या संस्थेने सांगणे काय , कुणा गागाभट्टाने किंवा खलिफाने किंवा बापूने सांगणे काय.... दोन्ही एकच ठरेल ना? हाच तर अंधविश्वास

असा मी सर्वव्यापी विचार करतो आणि प्रश्न किचकट होतो.

मेघना भुस्कुटे Wed, 21/08/2013 - 21:44

In reply to by अजो१२३

विज्ञान गोष्टी पुराव्यानिशी सिद्ध झाल्यावरच सांगतं. त्यालाच विज्ञान म्हणतात. एवढा एकच बारीकसा फरक आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 21/08/2013 - 23:56

In reply to by अजो१२३

विज्ञान ही संस्था नाही.

पुराव्याने सिद्ध झालेल्या गोष्टींच्या विपरीत पुरावे मिळाले तर वैज्ञानिक सिद्धांत बदलले जातात. संस्थांना असणारी अध्यक्षादी पदं विज्ञानात नाहीत.

एका वेगळ्या संदर्भात असणार्‍या लेखात हे सापडलं:
“Though the scientific facts do not by themselves dictate values,” Pinker goes on, “they certainly hem in the possibilities.” He’s right about this -- but the second point, though interesting, is much less important than the first. Science can’t dictate values. That’s what matters. And because it can’t dictate values, it can’t dictate courses of action.
लेखाचा दुवा: Why Science and Politics Don’t Mix
उद्धृतात असणार्‍या पिंकरच्या निबंधाचा दुवा: Science Is Not Your Enemy: An impassioned plea to neglected novelists, embattled professors, and tenure-less historians

मी Wed, 21/08/2013 - 14:43

In reply to by अजो१२३

प्रतिसाद विवेकी वाटतो आहे.

दाभोलकरांनी केलेल्या विवेकवादाच्या आग्रहाला विरोध करणे आणि 'मला डोके लावायचे काम देउ नका' याचा भलताच अर्थ काढू नका. विवेकवाद किंवा अन्य कोणताही असा पाया एक साधारण नागरीक म्हणून तत्त्वतः मला मान्य आहे. पण त्याचे ओझे नको आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर दाभोलकर इंजिनिअरला first principles वापरून मशीन बनवण्यास सांगत आहेत. अभियंत्याच्या उभ्या आयुष्यात फार तर एक मशीन बनेल. हाच अभियंता जर सरकारने मशीन बनवायची stanadards उपलब्ध करून दिली तर मोठा कारखाना टाकून हजारो मशीनी बनवेल.

पण डोकं न लावणारी जमात प्रभावी लोकांकडून नागवली जाते हाच तर विरोधाचा मुद्दा आहे, त्यामुळे डोकचं लावायला सांगू नका हा आग्रहही चुकीचाच आहे.

गवि Wed, 21/08/2013 - 15:11

In reply to by अजो१२३

मा.श्री. अरुणजोशी. तुमचे बहुतांश प्रतिसाद वाचताना मीच काल रात्री हे लिहून एखाद्या विचित्र प्रकारच्या अ‍ॅम्नेशियाने विसरुन तर गेलो नाही ना असा भास होतो.

उत्तम मांडणी. (स्वसंपादन करुन आवर्जून हे लिहीतोय की उत्तम मांडणीमुळे ते मला माझ्या प्रतिसादांसारखे भासत नसून केवळ त्या एका मुद्द्याने ते दुसर्‍याचे असल्याचं भान येतं.. :) साम्य विचारांमधेच..)

पण या विशिष्ट प्रतिसादातल्या "मला खूप जास्त डोके लावायचे काम देऊ नका" या भागाविषयी जरा गोंधळ झाला आहे. आपण म्हणजे सर्वसामान्यांचे प्रतिनिधी असं धरुन अंधश्रद्धांना वेसण घालण्यासाठी आम्हाला एक सोपी प्रोसेस / यादी / कमांडमेंट्स ठरवून द्या म्हणजे त्या मोठ्या स्केलवर अंमलात आणल्या जातील. अन्यथा सामान्य जनता इतके मानसिक कष्ट घेणार नाही असा आपला रोख आहे असं वाटतं.

प्रथमदर्शनी एक उपाय म्हणून योग्य आहे. पण एकुणात जनतेला "तर्काधारित विचार" म्हणजे काय हे समजायला लागण्याच्या दृष्टीनेच मांडणी झालेली उत्तम. कमांडमेंट्सवर समाज हजारो वर्षे राहू शकतो म्हणून भविष्यातला समाजही तसाच असावा अशी इच्छा नाही. कारण एकदा साचा बनवून दिला की त्यात बदलाला वाव फार कमी राहतो. मग आज बनवून दिलेली यादी कालानुसार बदलत जाईल ते अपडेट्स कोणी करत राहायचे हा प्रॉब्लेम उरतोच.

तर्कापलीकडे बर्‍याच गोष्टी आहेत पण रोजच्या जगण्यासाठी तर्काचाच आधार सर्वोत्तम हे सर्वांना समजलं पाहिजे अशा रितीने कोणत्याही विचारांचा प्रवाह असावा. अगदी आपल्या फिशबाउलमधून बाहेर पडण्याची इच्छा असेल तरी तर्कानेच ते शक्य आहे.

जी गोष्ट आज तर्कात बसत नाही ती माझ्या सध्याच्या ज्ञानाच्या कक्षेबाहेर आहे पण ती कधीतरी तर्काच्या कक्षेत येऊ शकेल अशी मान्यता ठेवली की मग "अज्ञेयवाद" या शब्दातला रेझिग्नेटरी वास नाहीसा होतो.

तर्कात बसत नाही म्हणून मग जे काही चार लोक म्हणतात ते कसं का असेना, आहे त्या स्वरुपात मान्य करणं आणि फॉलो करणं यामधे आपला खरा घात आहे.

उदा. देव म्हणजे काय? किंवा देव नावाची कोणती शक्ती आहे का? किंवा आधी काहीतरी अज्ञात आहे हे मान्य करुन त्यालाच देव असं केवळ नाव द्यायचं का? ते दिल्याने काय फरक पडेल? अशा प्रश्नांची उत्तरं केवळ माहीत नाहीत म्हणून मग देव (अ‍ॅज पीपल पर्सिव्ह इट टू बी - सोंडवाला, प्रतीकात्मक, झाडापानात असलेला, एनर्जीरुपात असलेला) असं काहीतरी एक मानलंच पाहिजे अशी सक्ती नसते हे लक्षात घेतलं पाहिजे.

बॅटमॅन Wed, 21/08/2013 - 15:17

In reply to by गवि

तर्कात बसत नाही म्हणून मग जे काही चार लोक म्हणतात ते कसं का असेना, आहे त्या स्वरुपात मान्य करणं आणि फॉलो करणं यामधे आपला खरा घात आहे.

घात?? बळंच?

उदा. देव म्हणजे काय? किंवा देव नावाची कोणती शक्ती आहे का? किंवा आधी काहीतरी अज्ञात आहे हे मान्य करुन त्यालाच देव असं केवळ नाव द्यायचं का? ते दिल्याने काय फरक पडेल? अशा प्रश्नांची उत्तरं केवळ माहीत नाहीत म्हणून मग देव (अ‍ॅज पीपल पर्सिव्ह इट टू बी - सोंडवाला, प्रतीकात्मक, झाडापानात असलेला, एनर्जीरुपात असलेला) असं काहीतरी एक मानलंच पाहिजे अशी सक्ती नसते हे लक्षात घेतलं पाहिजे.

कौल्दन्त अग्री मोरे!!!!

गवि Wed, 21/08/2013 - 15:25

In reply to by बॅटमॅन

घात?? बळंच?

खरंय मेल्या.. घातही नव्हेच तो तसं म्हटलं तर... एकूण सध्याच्या चर्चेतल्या अनिष्टाचा रोख ज्याकडे आहे ते.. अशा अर्थाने काहीतरी म्हणायचंय.

पण लिहिण्याच्या भरात लक्षात नाही आलं..लगेच आलास पळी ताम्हन घेऊन तर्कशुद्धी करायला..??

;)

हरवलेल्या जहाज… Thu, 22/08/2013 - 01:49

In reply to by अजो१२३

>>अंधश्रद्धेच्या बाबतीत सरकारचीच किंवा पुरुस्कृत संस्था असावी. तिची व्यवस्थित Institutional Framework असावे. त्यात capacity building करून सरकारने प्रत्येक बाबीवर एक official position घ्यावी. नंतर आम्ही आमच्या श्रद्धा तशा अलाइन करू. नेमकं हेच तर नकोय. कारण याचा पुन्हा सरकारपुरस्कृत नवा धर्म बनणार. हे वाचुन मला ऑरवेलच्या '१९८४' या कांदंबरीमधल्या 'बिग ब्रदर' आणि त्याच्या थॉट पोलिस यांची आठवण आली. किमान सारासार विचार करणं,आपल्या विचारांची आणि कृतीची चिकित्सा करणं, आपल्याला मिळालेल्या विचारस्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करुन घेणं यासाठी खूप डोकं लावून, मोठमोठी गणितं सोडवावी लागत नाहीत. ते अतिशय सोप्पं आहे, पण कठीण आहे ते आपल्या भावना आणि श्रद्धा यांच्यापासून काहीकाळ तट्स्थ राहून त्यांच्या चिकित्सेला केवळ सुरुवात करणं आणि याचंच आपल्या सर्वांना सर्वात जास्त ओझं वाटतं.
प्रत्यक्षात आपली जसजशी प्रगती होत चाललीये तसतसं माहीतीचं आदान प्रदान करणं अधिक सोप्पं होत चाललंय. आपल्या पडणारे प्रश्न यांची उत्तरे जगाच्या एका दुसर्‍या कोपर्‍यात शोधता येतात. या वाढत्या ज्ञानाच्या कक्षांमूळे खरतर धर्म आणि अतिजुन्या सत्वहीन धार्मिक कल्पना यांभोवती दाटलेलं अज्ञानाचं धूकं दूर होणं अपेक्षित होतं पण तस नक्की होतंय का? आपण चिकित्सा करायलाच तयार नाही आहोत यामूळे धर्म अधिकाधिक रिजिड आणि वास्तवापासून दूर चाललेला दिसतो. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक वर्तनाची मानके बनवणे हे जास्त जनतेचे आणि पर्यायाचे समाजाचे काम आहे. जगातलं कोणतंही स्वतःला लोकशाही म्हणवून घेणारं सरकार जनतेवर विचारांची सक्ती करू शकत नाही, मग ते विचार कितीही चांगले असले तरीही! ते केवळ समाजाकडून पुरोगामी विचारांची अपेक्षा करू शकतात.(भारतीय संविधान, मुलभूत कर्तव्ये, ARTICLE 51A [h]to develop the scientific temper, humanism and the spirit of inquiry and reform) आता निदान या क्षणापासून तरी विवेकवादी विचारसरणीची कास धरण्याची खूप गरज निर्माण झाली आहे. काही ठराविक लोक, संस्था, आंधळे विचार आपल्या भोवतालचं वास्तव वेगाने बदलता आहेत आणि आपण सगळ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधल्याने आपल्याला ते सहज जाणवत नाही, मग अचानक दाभोळकरांसारख्या समाजसेवकाचा खून पडल्यावर आपल्या जाणीव होते पण तिथपर्यंत खुप उशीर झालेला असतो. असा उशीर होऊ नये, यासाठी 'सत्यशोधन' हा लहानपणापासून आपल्या शिक्षणाचा भाग होणे आवश्यक आहे, हे मुल्य जोपासण्यासाठी त्याला पुरेश्या लिबरल मानसिकतेच्या पाठिंब्याचीही गरज आहे. सत्यनारायण, नवस-सायास इ. गोष्टींचा उल्लेख करण्याचे कारण असे की या गोष्टी खूप बेसिक आहेत, कसल्याही चिकित्सेशिवाय शरण जाण्याची मानसिकता तयार करुन जोपासण्यास इथुन सुरुवात होते आणि काहींसाठी हा प्रवास आसारामबापू-निर्मलबाबा यांच्या मठात नाहीतर धार्मिक-जातीय दंगलीपर्यंत अविरत सुरु रहातो. म्हणूनच अशा कुठल्याही कार्यकारणभावाला थारा न देणार्‍या, प्रतिगामी आणि नुकसानकारक धार्मिक संकल्पना यांसाठी आपला वेळोवेळी कच्चा माल म्हणून वापर होऊ नये हीच इच्छा.

रमताराम Tue, 20/08/2013 - 22:55

In reply to by अजो१२३

रक्षाबंधन एकवेळ तद्दन मूर्खपणा म्हटले तर सापेक्षतेला स्मरून त्याकडे दुर्लक्ष करता येईल पण त्या अंधश्रद्धा मुळीच नाही. श्रद्धा नि अंधश्रद्धा यातील फरक चळवळीतील नि अन्य बुद्धिवादी कसा करतात हे पाहणे यात सयुक्तिक ठरेल. इथे कार्यकारणभाव उलगडता न येणारा असा परिणामाचा कोणताही दावा केला जात नाही. तसेच यात कोणत्याही प्रकारे सहभागी व्यक्तिला भ्रमित करून योग्य मार्गावरून च्युत करण्याचाही प्रश्न नाही (अप्रत्यक्ष नुकसान) आणि कोणतेही प्रत्यक्ष नुकसान तर नाहीच नाही. असलाच तो केवळ उपचार आहे, हस्तांदोलनासारखा. केले म्हणून समोरचा त्याला फार आदर दाखवला असे समजत नाही किंवा त्या ऐवजी हात जोडून अभिवादन केले नाही म्हणून अवमान झाला असेही समजत नाही तसे काहीसे. तेव्हा I think you are comparing apples and oranges किंवा शुद्ध मराठीत - किंचित वेगळ्या संदर्भाने - 'वडाची साल पिंपळाला' लावत आहात.

शिवाय श्रद्धेचा, अंधश्रद्धेचा विरोध म्हणजे थेट विज्ञानाचा रस्ता असे काळे-पांढरे गृहितकही चुकीचे आहे. कित्येक अंधश्रद्धांना मूठमाती द्यायल केवळ तर्क, कार्यकारणभाव साक्षेपाने उलगडणे, नेमक्या दृष्टिकोनाची रुजवणूकही पुरते कोणत्याही वैज्ञानिक मदतीशिवायही अनेक मूर्ख चालीरिती नाहीशा करता येतात, केल्या गेल्या आहेत. फक्त हल्ली त्या सार्‍यांना अस्मितेची कव्हरे घालून विविध लहानलहान ब्रिगेड्स, सेना नि दले उभी असतात म्हणून ते अधिक अवघड झाले आहे. समस्या विज्ञानाकडे फ्रेमवर्क नाही वगैरे दुय्यम गोष्टी आहेत. ज्यांच्याकडून सुज्ञ असण्याची अधिक अपेक्षा असते तेच अस्मितांच्या फुटक्या कपांसाठी लढत आपली सारी शक्ती खर्च करताना दिसतात ही मुख्य समस्या आहे.

मी Tue, 20/08/2013 - 23:15

In reply to by रमताराम

ज्यांच्याकडून सुज्ञ असण्याची अधिक अपेक्षा असते तेच अस्मितांच्या फुटक्या कपांसाठी लढत आपली सारी शक्ती खर्च करताना दिसतात ही मुख्य समस्या आहे.

प्रतिसाद आवडला, पण हे वाक्य समजलं नाही, वरवर ते पटण्यासारखे वाटले तरी मुळात ते एका गृहितकावर आधारित असल्याचे वाटते आहे. 'मुख्य समस्या' काय हे लक्षात घेताना निदान मला तरी ते जरा गोंधळवणारे वाटले.

केतकी आकडे Tue, 20/08/2013 - 23:28

मला असं वाटतं की पूर्वीच्या काळी ज्या रूढी, परंपरा आपले पूर्वज पाळत होते, त्या रूढी त्या काळाशी सुसंगत कदाचित असतीलही.. पण आता काळाप्रमाणे त्यातही योग्य ते बदल करायला हवेत. आणि याबद्दल कुणीही कोणत्याही गाइडलाइन असलेल पुस्तक लिहिणार नाहीये, तर हे ज्याने त्याने आपापल्या अधिकारात, आपल्या बुद्धी आणि मनाला योग्य वाटेल तेच केलं पाहिजे.

अश्या कितीतरी प्रथा आहेत ज्या अजूनही डोकं बाजूला ठेवून लोकं तश्याच्या तश्याच फॉलो कारतात. उदाहरणार्थ, पाळी चालू असताना देवाच्या जवळ ही जायचं नाही.. ग्रहण चालू असताना बाहेर पडायचं नाही वगैरे. आणि हे सगळं करणारे माझ्या इतके शिकलेले, माझ्या वयाचे, आजच्या पिढीतले मुलं-मुली माझ्या आजूबाजूला आहेत. अशी खूप उदाहरणं गेल्या काही दिवसांत पाहीली आहेत.. डोक्यात जातं हे सगळं माझ्या तर! म्हणून मी माझ्या पुरत तरी एक ठरवलंय की कोणत्याही गोष्टीचा तार्कीक विचार करून ठरवायचं की हे आपल्याला करावंसं वाटतंय की नाही. आणि नसेल वाटत तर नाही करायचं.

आणि हे अगदी अगदी खरंय की सामान्य विज्ञान हा जो काही विषय शिकवला जातो इयत्ता दहावी पर्यंत, तो अधिक गंभीरपणे शिकवला गेला पाहिजे. आज आठवी पर्यंत जी काही ढकल गाडी चालवली जातेय आपल्या महाराष्ट्रात, त्याने ही गंभीरपणे वगैरेच काय, पण साधं नीट शिकवलं जाण्याची शक्यताही जवळपास शून्य आहे :(

सन्जोप राव Wed, 21/08/2013 - 06:16

चर्चा भरकटत चालली आहे, पण त्याकडे तूर्त दुर्लक्ष करु.
एक प्रश्न असा आहे की दाभोळकरांनी अंधश्रद्धेला, अविवेकाला कायम शांत, सनदशीर मार्गाने उत्तर दिले. हाच या लढ्याचा योग्य मार्ग आहे असे ते मानत असत. याच संकेतस्थळावरील दुसर्‍या एका धाग्यावर चिंतातुर जंतू यांनी दाभोळकरांच्या सुहृदयतेचे उदाहरण दिले आहे. 'शेवटी लढा आहे माणूस बदलण्याचा आणि त्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची खरी गरज आहे.' हे दाभोळकरांचे उद्गार घासकडवींच्या प्रतिसादात आले आहेत. याच कारणासाठी त्यांनी पोलीस संरक्षण नाकारले, बंदुकीचे लायसन्स घेतले नाही आणि नरेंद्र महाराजांनी 'दाभोळकर आणि एन.डी.पाटील यांचे हातपाय तोडले पाहिजेत' असे म्हटल्यावरही त्यांच्याविरुद्ध पोलीसात तक्रार दिली नाही. अशा विचारांची हत्या होणे यात सगळ्यात मोठा धोका आहे तो लोकांचा दाभोळकरांच्या मार्गावरील विश्वास उडण्याचा. दाभोळकरांचा मृत्यू हा त्यांच्या मार्गाचा पराजय आहे असे आता लोकांना वाटू लागले तर त्यात नवल नाही. कुणी थेट म्हणो (काल देसले नावाचे अंनिसचे नाशिकचे एक कार्यकर्ते म्हणाले) किंवा न म्हणो, दाभोळकरांच्या खुनाची संशयाची सुई आज तरी सनातन संस्थेकडे जाते आहे. 'दुर्जनांचा नाश' ही ब्रीदवाक्य असलेल्या या संस्थेने आम्ही आम्हाला जे दुर्जन वाटतात त्यांना संपवूनच हे जग चांगले करु असे उघडपणे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर दाभोळकरांच्या मृत्यूनंतर आता दाभोळकरांच्या विचारांची कडवी पाठराखण करणार्‍या पण दाभोळकरांइतकी वैचारिक प्रगल्भता नसणार्‍या त्यांच्या काही सहकार्‍यांना 'दाभोळकरांचा मार्ग योग्य आहे का?' असा प्रश्न पडला तर मला तरी नवल वाटणार नाही. 'शस्त्राघाता शस्त्रचि उत्तर' हाच खरा मार्ग आहे म्हणून आता (उदाहरणार्थ) सनातन संस्थेला संपवणे असा ब्रिगेडी विडा अंनिसच्या कडव्या कार्यकर्त्यांनी उचलला तर काय होईल हा विचार अस्वस्थ करणारा आहे. या क्षणी नीरक्षीरविवेकाची कधी नव्हे इतकी गरज भासते आहे. अगदी 'क्लिशे' शब्दांत लिहायचे तर आज दाभोळकर असायला हवे होते ते याचसाठी.

ऋषिकेश Wed, 21/08/2013 - 08:59

In reply to by सन्जोप राव

मार्मिक श्रेणी अगदीच लंगडी वाटावी असा प्रतिसाद! अर्थात सहमती आहेच हे सांगायला नको!
पण या निमित्ताने दुसर्‍या धाग्यावरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे याचा परिणाम उलटही होऊ शकतो आणि मूलतत्त्ववाद्यांना बॅकफूटवर जायला भाड पाडून विवेकवादाला अधिकाधिक लोकाश्रय मिळेल अशीही एक आशा आहे

सन्जोप राव Wed, 21/08/2013 - 12:11

In reply to by ऋषिकेश

याचा परिणाम उलटही होऊ शकतो आणि मूलतत्त्ववाद्यांना बॅकफूटवर जायला भाड पाडून विवेकवादाला अधिकाधिक लोकाश्रय मिळेल अशीही एक आशा आहे
हे असे होवो आणि ते झालेले आम्हाला बघायला मिळो! दुर्दैवाने इतिहास काही वेगळेच सांगतो.

'न'वी बाजू Tue, 27/08/2013 - 09:51

In reply to by सन्जोप राव

याचा परिणाम उलटही होऊ शकतो आणि मूलतत्त्ववाद्यांना बॅकफूटवर जायला भाड पाडून विवेकवादाला अधिकाधिक लोकाश्रय मिळेल अशीही एक आशा आहे
हे असे होवो आणि ते झालेले आम्हाला बघायला मिळो!

"आमेन!"??????

विवेकवादाला लोकाश्रय मिळावा, तो (श्री. दाभोलकर यांच्या हत्येमुळे निर्माण होणार्‍या) 'सिंपथी वेव'पोटी, विवेकवाद लोकांना नेसेसरिली पटल्यामुळे नव्हे, ही अपेक्षावजा इच्छा आश्चर्यकारक आहे. यामागील अजब तर्क पटत नाही.
=================================================================================================
एका अतिशय अविवेकी भावनेची लाट.

म्हणजे, १९८४मधील निवडणुकांत श्री. राजीव गांधींना पावली, तद्वत.

(विचारसरणी पटली नाही म्हणून, किंवा अन्यथाही) मनुष्यहत्या अयोग्य, धिक्कारार्ह => श्री. दाभोलकर यांची हत्या अयोग्य, धिक्कारार्ह३अ => श्री. दाभोलकर यांच्या हत्येमागच्या शक्तींची मूलभूत विचारसरणी३ब चूक३क => श्री. दाभोलकर यांची विचारसरणी / अंनिसची विचारसरणी / विवेकवाद बरोबर३ड, अशी काही 'तर्क'शृंखला जनमानसात या हत्येपोटी (निर्माण होणार्‍या सिंपथी वेवमुळे) निर्माण होणे शक्य आहेही; कोण जाणे, कदाचित विवेकवादाच्या प्रसाराकरिता तिचा फायदा घेणेही शक्य असावे. परंतु अशा प्रकारे (चुकीच्या तर्काच्या - अविवेकाच्या - पायावर) विवेकवादाचा प्रसार व्हावा, असे आपणांस खरोखरच मनापासून वाटते काय? विवेकवादाच्या कट्टर समर्थकांकडून अशी (अविवेकी) आशा/अपेक्षा/इच्छा प्रकट व्हावी, याहून मोठा असा विवेकवादाचा घात तो कोणता असावा?

३अ इथवरील तर्कशृंखला योग्यच आहे; त्याबद्दल प्रत्यवाय नाही.

३ब 'मूलभूत विचारसरणी' या संज्ञेत येथे त्या शक्तींची धर्म/श्रद्धा/अंधश्रद्धा/रूढी-चालीरीती/'जगण्याची पद्धत'/व्हॉटेवर यांसंबंधीची विचारसरणी अंतर्भूत केलेली आहे; 'श्री. दाभोलकर यांची हत्या करावीशी वाटण्याची मानसिकता' या तदानुषंगिक परंतु स्वतंत्र बाबीचा या संज्ञेत अंतर्भाव केलेला नाही.

३क तर्कशृंखलेचे हे एक्स्टेन्शन थोडे फारफेच्ड वाटते. म्हणजे, कार्यकारणभाव गंडतो. म्हणजे, त्या शक्तींची विचारसरणी चूक असेलही. (प्रस्तुत तर्कशृंखलेत न जाता, एक स्वतंत्र बाब म्हणून 'त्या शक्तींची विचारसरणी चूक आहे' हे विधान मान्य करायला मला व्यक्तिशः काहीही प्रत्यवाय नाही.) आणि, श्री. दाभोलकर यांची हत्या (आणि त्यामागील मानसिकता) ही (आधी म्हटल्याप्रमाणे) अयोग्य+धिक्कारार्ह आहे, हे स्वतंत्रपणे मान्य आहेच. मात्र, 'ज्याअर्थी त्या शक्तींनी श्री. दाभोलकर यांची हत्या केली, त्याअर्थी त्यांची मूलभूत विचारसरणी (पक्षी: धर्म/श्रद्धा/अंधश्रद्धा/रूढी-चालीरीती/'जगण्याची पद्धत'/व्हॉटेवर यांसंबंधीची विचारसरणी) ही चूक असलीच पाहिजे', ही तर्ककडी पचवावयास अंमळ जड जाते.

३ड 'श्री. दाभोलकर यांच्या हत्येमागील शक्तींची मूलभूत विचारसरणी चूक', असे जरी मानले (आणि तसे मानावयास मला व्यक्तिशः प्रत्यवाय नाही, हे अगोदर प्रतिपादिले आहेच.), तरीही त्यातून तर्काने 'श्री. दाभोलकर यांची विचारसरणी / अंनिसची विचारसरणी / विवेकवाद बरोबर' हा निष्कर्ष आपोआप निघत नाही. ते स्वतंत्रपणे, वेगळ्या आधारांवर पटवून द्यावे लागते. (आणि तसे ते पटवून देण्याकरिता अंनिस कदाचित कार्यरत असेलही - मला कल्पना नाही - आणि तशी ती कार्यरत असल्यास ते उचितच आहे.) मात्र, केवळ 'सिंपथी वेव'मुळे, 'श्री. दाभोलकर यांच्या हत्येमागील शक्तींची विचारसरणी चूक' => 'विवेकवाद बरोबर' अशी काही धारणा जनमानसात निर्माण होण्याचा जो धोका उद्भवतो, तो विवेकवादाकरिता पाया म्हणून तद्दन चुकीचा आहे, अत एव नक्कीच हितावह नाही, असे वाटते. चूभूद्याघ्या.
=================================================================================================

'शस्त्राघाता शस्त्रचि उत्तर' हाच खरा मार्ग आहे म्हणून आता (उदाहरणार्थ) सनातन संस्थेला संपवणे असा ब्रिगेडी विडा अंनिसच्या कडव्या कार्यकर्त्यांनी उचलला तर काय होईल हा विचार अस्वस्थ करणारा आहे...

पण... पण... हा तर तद्दन अविवेक आहे! विवेकवादाला वाहून घेतलेल्या एका संघटनेत अशा विचारांना मुळात स्थान असणे हे धक्कादायक (आणि धोकादायक) आहे. आणि खुद्द अशा संघटनेच्या कट्टर समर्थकांनी असे काही होण्याची चिंता व्यक्त करणे हे (यदाकदाचित ती चिंता अनुभवजन्य असल्यास प्रामाणिकपणाकरिता वाखाणण्यासारखे असले, तरी) भयचकित करणारे आहे.

या क्षणी नीरक्षीरविवेकाची कधी नव्हे इतकी गरज भासते आहे. अगदी 'क्लिशे' शब्दांत लिहायचे तर आज दाभोळकर असायला हवे होते ते याचसाठी.

असे का वाटावे बरे? श्री. दाभोलकर यांचे अभावी, असा नीरक्षीरविवेक स्वबळावर बाळगण्यास या संघटनेचे सदस्य असमर्थ असावेत, अशा धारणेमागील कारण काय असावे? किंवा, संघटनेचे काही सदस्य हे अशा नीरक्षीरविवेकास अक्षम आहेत असे अगदी जरी मानले, तरीही उर्वरित सदस्य अशा वाट चुकणार्‍या सदस्यांस योग्य ते मार्गदर्शन करून, त्यांचे मतपरिवर्तन करून त्यांना विवेकाच्या मार्गावर आणण्यास अक्षम असावेत काय? अंनिस हा श्री. दाभोलकर यांचा 'पर्सनॅलिटी कल्ट' तर खचितच नसावा (किंवा वन-मॅन-शोही नसावा), की जेणेकरोन त्यांच्या पश्चात 'विवेकमार्गे मार्गक्रमणा कशी करावी' (किंवा 'विवेक कशाशी खातात') याविषयी सदस्यांनी दिङ्मूढ असावे, इतक्या मूलभूत मुद्द्याच्या बाबतीतसुद्धा सदस्यांत वैचारिक स्पष्टता असू नये, त्याकरिता त्यांच्या वैयक्तिक मार्गदर्शनाची निकड भासावी, त्या वैयक्तिक मार्गदर्शनाअभावी इतकी साधी बाब हाताळता येऊ नये, एक व्यक्ती ही वैचारिक दिशेकरिता अपरिहार्य ठरावी. (आणि ही वैचारिक दिशासुद्धा महत्त्वाच्या बाबतींत नव्हे, तर 'हिंसेस उत्तर हिंसाचाराने द्यावे किंवा कसे' इतक्या साध्या, मूलभूत विवेकसंबंधी बाबतींत.)

उपरोद्धृत वक्तव्ये (आणि त्यामागील धारणा/भावना/भय इ.) जर साधार असतील, तर (या वक्तव्यांच्या अनुसार) ज्या संघटनेअंतर्गत मुळात विवेक रुजलेला नाही, अशा संघटनेच्या समाजात विवेक पसरविण्याच्या क्षमतेबद्दल एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते. आणि म्हणूनच ही वक्तव्ये (कदाचित प्रामाणिक असली, तरी) खळबळजनक आहेत.

ऋषिकेश Tue, 27/08/2013 - 10:05

In reply to by 'न'वी बाजू

एवढा मोठा प्रतिवाद करायच्या आधी भुमिका तरी विचारून घ्यायचीत असो ;)

विचारसरणी पटली नाही म्हणून, किंवा अन्यथाही) मनुष्यहत्या अयोग्य, धिक्कारार्ह => श्री. दाभोलकर यांची हत्या अयोग्य, धिक्कारार्ह३अ => श्री. दाभोलकर यांच्या हत्येमागच्या शक्तींची मूलभूत विचारसरणी३ब चूक३क => श्री. दाभोलकर यांची विचारसरणी / अंनिसची विचारसरणी / विवेकवाद बरोबर३ड

याहूनही वेगळा तर्क असु शकतो.
विचारसरणी पटली नाही म्हणून, किंवा अन्यथाही) मनुष्यहत्या अयोग्य, धिक्कारार्ह => श्री. दाभोलकर यांची हत्या अयोग्य, धिक्कारार्ह => श्री दाभोलकरांचे नक्की म्हणणे काय बरे होते असा प्रश्न पडणे? => त्यांच्या विरोधकांची भुमिका काय होती याकडे जनतेचे लक्ष वेधले जाणे => उत्सुकतेपोटी म्हणा किंवा जिज्ञासेपोटी म्हणा दाभोलकर व अन्य विवेकवाद्यांची पुस्तके, भाषणे यांचा अधिकाधिक प्रसार होणे => त्याद्वारे आपापल्या विवेकबुद्धीने विवेवकवादाच्या मार्गावर जाणार्‍या व्यक्तिंमध्ये वाढ होण्याची शक्यता

असा तो मार्ग असेल असे म्हणायचे आहे आणि अश्या घटनाक्रमाची आशा धरणे अविवेकी का ठरावे? उदा म्हणून कै.राजीव गांधी नव्हे तर महात्मा गांधींचे उदारहरण दिले आहे.

'न'वी बाजू Tue, 27/08/2013 - 11:13

In reply to by ऋषिकेश

महात्मा गांधींच्या हत्येमुळे त्यांच्या विचारांच्या प्रसारास (नव्याने) काही विशेष, मोठ्या प्रमाणात किंवा अधिकची चालना मिळाली असावी, याविषयी साशंक आहे. एरवी, गांधीहत्येनंतर गांधींच्या पुस्तकांचा खप वाढला किंवा कसे, याबाबत माझ्याकडे काही विदा नाही; कदाचित प्रकाशक त्याबाबत काही सांगू शकतील.

तसेही, पुस्तकांचा खप --> त्यांचे वाचन --> त्यांतील विचारांचा प्रसार असे काही थेट नाते असण्याबाबत साशंक आहे. (उदा., गांधींची पुस्तके ही शोकेसमध्ये / बुकशेल्फावर मांडल्यास इंप्रेसिव दिसतात. याचा अर्थ ती वाचनीय/मननीय नसतात, असा नव्हे, परंतु तरीही.)

दुसर्‍या बाजूस, गांधींची हत्या ही गांधींच्या विरोधकांच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष वेधले जाण्यास कारणीभूत ठरली असावी, याबद्दलही काहीसा साशंक आहे. हं, आता त्यानंतर प्रकाशित झालेली 'गांधीहत्या आणि मी', 'पंचावन्न कोटींचे बळी', झालेच तर 'गांधी वि. गोडसे', 'मी नथुराम गोडसे बोलतोय', झालेच तर 'हे राम!' असली असंख्य पुस्तके/नाटके/चित्रपट - आणि अनेकप्रसंगी त्यांवर आलेल्या बंद्या - यांचा काही हातभार लागला असल्यास कल्पना नाही, परंतु तेथेसुद्धा त्यांचे 'सिंगिंग टू द कॉयर'पलीकडे फारसे योगदान झाले असण्याबद्दल साशंक आहे.

मात्र, गांधीहत्येनंतर (अथवा -मुळे) दोन्ही बाजूंचे प्रकाशक/निर्माते/तत्सम 'धंदेवाईक' (आणि कदाचित स्वतःला गांधीवादी / गांधींचे कट्टर विरोधक म्हणवून घेणारे असंख्य सेल्फ-प्रमोटर्स) यांची प्रचंड चलती झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
==================================================================================
'प्रोफेशनल्स' अशा अर्थी.

ऋषिकेश Tue, 27/08/2013 - 11:19

In reply to by 'न'वी बाजू

त्यानंतर दंगली थांबल्या, हिंसक चळवळींना वा टोकाच्या धार्मिक भुमिकांना मिळणारा लोकाश्रय (व राजाश्रय) लक्षणीयरित्या कमी झाला याकडेही लक्ष वेधतो. आता हिंसात्मक प्रतिक्रीयांचे कमी होणे अविवेकी होते असे आपले मत असल्यास तो आरोप मी सहर्ष स्वीकारतो ;)

बॅटमॅन Wed, 21/08/2013 - 11:54

या निमित्ताने फेसबुकभिंती ओसंडून वाहू लागल्या. त्यातले एक अतिशय चीड आणणारे अपडेट असे होते:

"दाभोलकर स्वतः विवेकवादी होते, परंतु त्याचा अर्थ ते देव किंवा श्रद्धेच्या विरोधात होते असे नाही. सबब तथाकथित विवेकवाद्यांनी हे सत्य नजरेआड करू नये, की देवावरील विश्वासाला त्यांचा पाठिंबा होता."

हे वाचून "कुणाला कशाचं तर बोडकीला केसाचं" ही म्हण आठवली.

मनीषा Wed, 21/08/2013 - 15:28

हा 'धर्म' एक कल्पनेतला मोठ्ठा दरवाजा आहे, तुम्ही काहीही करा कसेही वागा, केवळ शेवटी या दरवाज्याजवळ येऊन कन्फेशन्स द्या, शुद्धी करुन घ्या. मग इकडचे द्वारपाल ठरलेली रक्कम घेऊन तुम्हाला पलिकडे सोडतील आणि तुम्ही पुन्हा पवित्र होऊन बाहेर पडाल. मुळात हा असा दरवाजाच अस्तित्वात नाही याची जाणीव होणे आवश्यक आहे.

+१ सहमत आहे (म्हणजे, 'वाटेल ती पापे करून धार्मिक उपचारांनी शुद्धीकरण होते असे म्हणणे हा दांभिकपणा आहे', या मुद्द्याला सहमती आहे.)

पण तरीही असे वाटते...
धर्म, अंधश्रद्धा, दैववादी दृष्टीकोन, वैज्ञानिक दृष्टीकोन या सगळ्या १+१ = २ असे म्हणण्याइतक्या सोप्या आणि सुस्पष्ट संज्ञा नाहीयेत.

मी माझ्या भावाच्या हातावर राखी बांधली नाही, अथवा मासिक पाळी चालू असताना सुद्धा देवळात अथवा धार्मिक समारंभात गेले म्हणजे माझा दृष्टीकोन हा लगेच वैज्ञानिक होतो का? तर नाही. किंवा मी माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा, वास्तुशांत केली म्हणजे मी लगेच दैववादी होत नाही. आणि या सगळ्या प्रथा आहेत अंधश्रद्धा नाहीत. त्याचे कार्यकारणभाव सुद्धा सांगीतलेले आहेत. जर तुम्ही या प्रथा, किंवा तथाकथित सांस्कृतिक कल्पना आपल्या आयुष्यातून काढून टाकल्या तर बाकी काय राहील? या सर्व प्रथा, किंवा परिकथा आयुष्य 'जगण्यायोग्य' करतात. माणसांना एकत्र आणतात. तुम्ही म्हणाल की कॉकटेल पार्टीला देखिल लोक एकत्र येतात. मान्य येतात ना. त्याला कुणाचा विरोध नाहीये. पण मग गणपतीची आरती करायला लोक जमले तर तुम्ही त्यांना मूर्ख ठरवणार?
अनिष्ट रूढी, चालीरिती यांना विरोध करायलाच हवा, जसे अंगात येणे, दृष्टान्त होणे, साठीशांत करणे, जादूटोणा, मंत्र-तंत्र इ. कारण या मधे दुसर्‍यावर काहीतरी लादणे येते, दुसर्‍याला भिती दाखवून त्याला काही करायला लावणे म्हणजे त्याचे शोषण येते. त्याला सर्वांनी विरोध करायलाच हवा.
पण धर्माला वाईट ठरवून धार्मिक प्रथा मानणारे सर्व मूर्ख असे सरसकट विधान करणे हा मात्र अविचार आहे.
जो पर्यंत माझ्या* श्रद्धेचा, धर्माचा दूसर्‍या कुणाला त्रास होत नाही, समाजाला नुकसान होत नाही, मी* कुणाचे शोषण करत नाही, की धर्माच्या नावाखाली कुणाची फसवणूक करत नाही, आणि माझेही* स्वतःचे नुकसान करून घेत नाही (फायदा होतो की नाही हा वेगळा मुद्दा) तो पर्यंत कुणालाही त्याबद्दल अक्षेप घेण्याचा अधिकार नाही असेच मी मानते.
(* यात 'मी' म्हणजे 'मी स्वतः' असे नसून ते एक प्रातिनिधिक संबोधन आहे.)

बॅटमॅन Wed, 21/08/2013 - 15:32

In reply to by मनीषा

अनिष्ट रूढी, चालीरिती यांना विरोध करायलाच हवा, जसे अंगात येणे, दृष्टान्त होणे, साठीशांत करणे, जादूटोणा, मंत्र-तंत्र इ. कारण या मधे दुसर्‍यावर काहीतरी लादणे येते, दुसर्‍याला भिती दाखवून त्याला काही करायला लावणे म्हणजे त्याचे शोषण येते. त्याला सर्वांनी विरोध करायलाच हवा.
पण धर्माला वाईट ठरवून धार्मिक प्रथा मानणारे सर्व मूर्ख असे सरसकट विधान करणे हा मात्र अविचार आहे.

आणि या अविचाराची फ्याशन झाली की मग आपल्याइतक्या पोटतिडिकीने जे लोक या गोष्टींचा निषेध करीत नाहीत त्यांना झोडणे हीही एक नवीन फ्याशन आहे. मग भले त्याला काही अर्थ असो किंवा नसो.

जो पर्यंत माझ्या* श्रद्धेचा, धर्माचा दूसर्‍या कुणाला त्रास होत नाही, समाजाला नुकसान होत नाही, मी* कुणाचे शोषण करत नाही, की धर्माच्या नावाखाली कुणाची फसवणूक करत नाही, आणि माझेही* स्वतःचे नुकसान करून घेत नाही (फायदा होतो की नाही हा वेगळा मुद्दा) तो पर्यंत कुणालाही त्याबद्दल अक्षेप घेण्याचा अधिकार नाही असेच मी मानते.

इतकी साधी सरळ गोष्ट कळाली असती तर काय पाहिजे होतं म्हणा अजून..पण असोच.

चिंतातुर जंतू Wed, 21/08/2013 - 15:24

कशाला अंधश्रद्धा म्हणायच्या?
दाभोलकरांना कायद्याकडून जे अपेक्षित होतं त्या चौकटीत हा प्रश्न पाहिला, तर उघड व्हावं की त्यात शोषण किंवा फसवणूक अभिप्रेत होती. तुमच्या घरी तुम्ही बहिणीकडून राखी बांधून घ्या नाही तर सत्यनारायणाची पूजा घाला. त्यात शोषण किंवा फसवणूक अंतर्भूत नसेल, तर तुम्ही ते करायला मुखत्यार आहात. पण कुणी माणूस हवेतून राख उत्पन्न करण्याचा दावा करत असेल, आणि त्या राखेच्या सेवनानं पुत्रप्राप्ती होईल असा दावा करून लोकांकडून पैसा उकळत असेल, तर त्याला कायद्यानं कडक निर्बंध घालता यावा ही अपेक्षा मला तरी रास्त वाटते. अशा कायद्याला विरोध करणारे हे कदाचित त्या कायद्याचा फटका ज्यांना बसू शकतो असे हितसंबंधी असतील, किंवा अशा बाबा-साधूंच्या आहारी गेलेले अंधभक्त असतील.

>> मी खूप आग्रहाने म्हणतो मला खूप जास्त डोके लावायचे काम देऊ नका.

सद्यकालीन जगण्यामध्ये 'डोकं न लावता' जगण्याचा पर्याय असेल असं मला तरी शक्य वाटत नाही. किंबहुना हा कालातीत अस्तित्ववादी प्रश्न आहे असं मी पुढे जाऊन म्हणेन. ज्या समाजव्यवस्थेत 'सज्ञान माणसानं आपल्या कृत्यांची जबाबदारी घ्यावी' ही अपेक्षा आहे, तिथे (ह्या अपेक्षेमागे) 'त्यानं विचारपूर्वक जगावं' हेदेखील अभिप्रेत आहे. नाही तर मग 'मी फक्त नाझी वरिष्ठांची आज्ञा पाळली, तद्वत माझा दोष नाही आणि मी जबाबदार नाही' अशासारखी एखादी पळवाट काढता येते.

>> अशा विचारांची हत्या होणे यात सगळ्यात मोठा धोका आहे तो लोकांचा दाभोळकरांच्या मार्गावरील विश्वास उडण्याचा.

अशी भीती अनेकदा व्यक्त झाली आहे, पण भारतीय समाजातल्या बहुसंख्य हिश्श्याला हिंसक मार्गांविषयी दीर्घकाळ आकर्षण वाटत नाही असं इतिहास सांगतो. म्हणजे सगळे लगेच गांधीवादी होतात असं नाही, पण अनेक अधलीमधली उदाहरणं देता येतील. उदाहरणार्थ, सावरकरांच्या किंवा भगतसिंग वगैरेंच्या सशस्त्र क्रांतीच्या विचारांमागे भारतीय समाज एक झाला नाही; तर तो गांधींच्या अहिंसेच्या विचारांमागे गेला. अयोध्येच्या मुद्द्यावर वातावरण पेटवून भाजपला निर्णायक बहुमत मिळालं नाही, तर वाजपेयींसारख्या नेमस्त नेत्याला पुढे करून विविधविचारी पक्षांची मोळी बांधून सरकार चालवावं लागलं. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यांना कितीही गर्दी झाली, तरीही विधाससभेवर भगवा एकदाच, अन् तोदेखील भाजपबरोबर युती करूनच फडकला, आणि आधीच्या गमजा पाहता त्या सरकारला फार काही हिंसक करता आलं नाही. अगदी आजदेखील 'आपण मुसलमानांना जवळ आणलं पाहिजे' असं मोदींना म्हणावं लागतंय.

जाता जाता : 'बघ्या, दाभोलकर आणि मंगळागौर' वाचा.

Nile Thu, 22/08/2013 - 06:32

वरती अनेक प्रतिसादांत "असे असे केले की अंधश्रद्धाळू" का? असे गमतीदार प्रश्न पाहून मुळात अंधश्रद्धाळू म्हणजे काय हे अनेकांना कळलेले दिसत नाही असे समजले.

राखी बांधणे, आरत्या करणे, सत्यनारायण घालणे या क्रिया करणे म्हणजे अंधश्रद्धा नव्हे तर अशा गोष्टी केल्याने इप्सित पुण्य-फायदा वगैरे होईल यावर विश्वास म्हणजे अंधश्रद्धा. गणपती करता एकत्र यायला काहीच हरकत नाही, तो एक सोहळा झाला, आरत्याही म्हणायला हरकत नाही, पण आरती केली नाही तर गणपतीची अवकृपा होईल, किंवा ह्याने ओवाळलं तर चालत नाही, ती विटाळाची आहे म्हणून तिने आरतीला यायला नको असा विचार करणे म्हणजे अंधश्रद्धा. मासिक पाळी चालू असताना देवळात गेला तर तुम्ही वैज्ञानिक होणार नाही, तर मासिक पाळी सुरू असताना देवळात जाण्यात काही चूक नाही असे तुम्हाला वाटत असले तर तो विवेक.

जाता जाता, तुम्ही धर्माची, देवाची हवी ती व्याख्या करा, तुम्ही अंधश्रद्धाळूच. माझी देवाची अशी व्याख्या आहे आणि त्यावर विश्वास ठेवल्याने मला मनःशांती मिळते वगैरे प्रतिवाद पोकळच आहेत, अवैज्ञानिकच आहेत.

अजो१२३ Thu, 22/08/2013 - 11:49

In reply to by Nile

राखी बांधणे, आरत्या करणे, सत्यनारायण घालणे या क्रिया करणे म्हणजे अंधश्रद्धा नव्हे

सत्यनारायण आपण कधी केला आहे का? सत्यनारायणाची कथा ऐकायला ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम नसलेला श्रोता लागतो. कृपया एकदा ती कथा कान देऊन ऐका. त्याची एक कोण्या महान गायकाने गायलेली ऑडिओ सीडीही येते. ती ही ऐका. सत्यनारायण 'घालण्यामधे' ती कथा 'कोणतीही सूक्ष्म चूक' न करता ऐकणे अभिप्रेत आहे, घालण्याचा एक अविभाज्य भाग आहे. ज्याला डोके आणि आत्मसन्मान नाही असा माणूसच ती कथा श्रद्धेने ऐकू शकतो. सत्यनारायणाचा विचार करणे देखिल अंधश्रद्धा आहे. त्याच्याने पुण्य किंवा फायदा मिळण्याची गोष्ट म्हणजे अंधश्रद्धेचा वर्ग. इथे आपण फक्त बेस लेवल अंधश्रद्धेची समज घ्यायचा प्रयत्न करत आहोत.

Nile Thu, 22/08/2013 - 12:04

In reply to by अजो१२३

सत्यनारायणाची कथा ऐकायला ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम नसलेला श्रोता लागतो.

संस्थळांवरील वायझेड लोकांचे लांबच्यालांब अन बावळट प्रतिसाद वाचायला हार्टचा प्रेशंट नसलेला वाचक लागतो! असे कित्येक प्रतिसाद अन धागे वाचलेत त्यापुढे सत्यनारायणाची पुजा म्हणजे किस खेत की मुली, किंवा किस बाबाकी आरती, किस भगवान का मंदिर वगैरे वगैरे...

रोचना Thu, 22/08/2013 - 13:45

In reply to by अजो१२३

सत्यनारायणाच्या दिवशी सकाळपासून घरात दगदग असते. कुठल्यातरी मोठ्या इव्हेंट नंतर - लग्न, मुंज, इ. - सहसा ही केली जाते, सगळ्यांनाच तोवर पूजा-पंडितांचा कंटाळा आलेला असतो. पूजा होऊन कथा सुरू होईपर्यंत बरंच दमायला होतं, कधी एकदा जेवणं होऊन थोडंसं झोपायला मिळतंय असा विचार डोक्यात असतो. तेव्हा गुरुजी मान आणि पाठ पुढे-मागे हलवत "आणि मग कलावती आणि लीलावती...." असं वाचायला सुरुवात करतात. तुपातल्या शिराच्या घमघमाटात, तिथेच, जेवायच्या आधीच छान डुलकी लागते. हे या कथेचं खूप मोठं अ‍ॅडवांटेज आहे.

आमची अंधश्रद्धा ती आपली प्रसादापुरती, अगदीच बेस लेवेल...

(कृ. ह.घे.)

मनीषा Thu, 22/08/2013 - 09:21

राखी बांधणे, आरत्या करणे, सत्यनारायण घालणे या क्रिया करणे म्हणजे अंधश्रद्धा नव्हे तर अशा गोष्टी केल्याने इप्सित पुण्य-फायदा वगैरे होईल यावर विश्वास म्हणजे अंधश्रद्धा.

अगदी बरोबर .. कुठलीही कृती जाणीवपूर्वक आणि डोळसपणे केली की त्याच्या आहारी जाण्याची भिती नाही.

आणि मनःशांती ही सापेक्ष आहे. कुणाला कशात ती लाभेल हे सांगता येत नाही. कुणाला देवळात गेल्याने मिळत असेल, कुणाला मठात जाऊन ध्यान लाऊन बसल्याने मिळत असेल, तर कुणाला आपण हे असे काही करणारे अंधश्रद्धाळू नाही तर वैज्ञानिक दृष्टीकोनाचे आहोत या कल्पनेने मिळत असेल.

चिंतातुर जंतू Thu, 22/08/2013 - 14:56

>> सत्यनारायण आपण कधी केला आहे का?

नाही.

>>सत्यनारायणाची कथा ऐकायला ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम नसलेला श्रोता लागतो.

लहान मुलांच्या गोष्टींमध्येसुद्धा (उदा : हॅरी पॉटर वगैरे) पुष्कळ हिंसा असते. त्यामुळे ह्यात फार काही विशेष वाटत नाही.

>>कृपया एकदा ती कथा कान देऊन ऐका.

ऐकलेली आहे.

>>ज्याला डोके आणि आत्मसन्मान नाही असा माणूसच ती कथा श्रद्धेने ऐकू शकतो.

सज्ञान माणसाचा डोकं आणि आत्मसन्मान गहाण ठेवण्याचा हक्क मला मान्य आहे, मात्र आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे जोवर इतरांचं शोषण किंवा फसवणूक होत नाही तोवर.

अनुप ढेरे Thu, 22/08/2013 - 17:51

एखादा डॉक्टर जेंव्हा सांगतो की नॉर्मल डिलिवरी होणार नाही सिझेरिअन करायला लागेल तेव्हा आपण त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतो. याला काय म्हणायचं? विश्वास की अंधश्रद्धा? आपण काही ते पडताळून बघत नाही की हा सांगतोय ते वैज्ञानिक द्रुष्ट्या बरोबर आहे का नाही.

आबा Thu, 22/08/2013 - 17:56

In reply to by अनुप ढेरे

ते पडताळून पहायचं की नाही हे ठरवेल ज्याचा तो,
मेडिकल मालप्रॅक्टिस हा गुन्हा आहे. पुढे ?!

अनुप ढेरे Thu, 22/08/2013 - 18:08

In reply to by आबा

मला विचारायच आहे की ही अंधश्रद्धा आहे का नाही?

ते पडताळून पहायचं की नाही हे ठरवेल ज्याचा तो,

म हे मांत्रिकाच्या बाबतीतपण म्हणता येइल की. कायदा करायची गरज काय?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 22/08/2013 - 18:16

In reply to by अनुप ढेरे

ज्या गोष्टींची, विचारांची, इ. चिकीत्सा करता येते त्यात विश्वास असतो (किंवा असावा), श्रद्धा किंवा अंधश्रद्धा नव्हे. एका डॉक्टरने दिलेला सल्ला योग्य आहे का नाही हे इतर चार डॉक्टरांना जाऊन विचारता येतं. तत्त्वतः आपणच या विषयाचा अभ्यास करूनही चिकीत्सा करता येते. हीच गोष्ट चंद्रावर माणूस गेला होता का याच्या पुराव्यांची किंवा हज्जार वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करून (फायनली) उपयुक्त गोष्ट शोधून काढणार्‍यांची.

मी म्हणतो/म्हणते म्हणून, अमक्या बुकात लिहीलेलं आहे म्हणून, एवढाच कार्यकारणभाव मान्य करून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा, उपयुक्त मानायचं ही श्रद्धा/अंधश्रद्धा.

दाभोलकरांवर टीका करणारेही काही लेख वाचले, साधारण सूर असा की कायदे करून अंधश्रद्धा जाते का? पण दाभोलकरांचा विरोध व्यक्तिस्वातंत्र्याला नव्हताच. त्यांचा विरोध लोकांची मानसिक, आर्थिक, शारीरिक फसवणूक किंवा छळ करण्याला होता.

अनुप ढेरे Thu, 22/08/2013 - 19:16

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तत्त्वतः तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण जेव्हा त्या निकडीच्या क्षणी आपण (बरेच लोक) जो निर्णय घेतो तो त्या डॉक्टर वर असलेल्या (अंध)श्रद्धेवरूनच घेतो असं मला वाटतं. एखादा निर्णय घेताना आपण कोणत्या गोष्टी विचारात घेतो त्यावर श्रद्धा/अंधश्रद्धा हे ठरतं असं मला वाटतं

आबा Thu, 22/08/2013 - 18:50

In reply to by अनुप ढेरे

हो म्हणता येइल,
काय म्हणता येइल?
हे की "मांत्रिकाकडे जायचं की नाही हे ज्याचं तो ठरवेल"
जसं की "...ते पडताळून पहायचं की नाही हे ठरवेल ज्याचा तो"
मेडिकल माल्प्रॅक्टिस हा गुन्हा आहे, तद्वतच बुवाबाजी हा सुद्धा गुन्हा ठरावा. असं म्हणायचयं !

Nile Fri, 23/08/2013 - 07:30

In reply to by अनुप ढेरे

एखादा डॉक्टर जेंव्हा सांगतो की नॉर्मल डिलिवरी होणार नाही सिझेरिअन करायला लागेल तेव्हा आपण त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतो. याला काय म्हणायचं? विश्वास की अंधश्रद्धा? आपण काही ते पडताळून बघत नाही की हा सांगतोय ते वैज्ञानिक द्रुष्ट्या बरोबर आहे का नाही.

तुम्ही असा निर्णय घेतलात की काय? पहिलीच वेळ होती का? मोठ्या ताई, मावश्या, आत्या बित्या वगैरे नव्हत्या का?

नॉर्मली लोकांचं काय असतं माहिती का! पहिल्या काही आठवड्यांतच कळतं. काही लोक अपेक्षा करत असतील ना तर लवकर कळतं, ते स्वतःचाच चेक करतात नं! आणि मग काय हळूहळू पोट वाढायला लागतं. तर सांगायचा मुद्दा काय तर की तुम्ही प्रेग्नंट झाला हे कळलं ना की लगेच योग्य तशी खबरदारी लोक घ्यालला. डॉक्टरांना वेळोवेळी भेटतात, डॉक्टरसुद्धा ओळखीपाळखीतून वगैरे शोधतात. आमच्या वळखीतल्या तीन पिढ्यांची डीलीव्हरी एकाच डाक्टरनं केली, आता बोला! ते असो. तर हां, सोनोग्राफी वगैरे करतात आणि बाळाची तब्येत वगैरे कशी आहे याबरोबर डाक्टरशी बोलतात. तुमच्या तब्येतीत काय प्रॉब्लेम फिल्ब्लेम असला तर डिलीव्हरीच्या वेळेला काही वांदा होईल का याबद्दल डाक्टरची डिलीव्हरीच्या आधी बोलून ठेवतात. थोडक्यात काय सांगतोय ते कळलं का नै? की असा एकदम बोराची बी घशात गेली की पाढीत धपाटा घालत्यासारखं "करा सिझेरीयन" असं नार्मल लोकांच्यात होत नाही!

तुमच्याबरोबर असं काहीतरी झालं हे ऐकून वाईट वाटलं पण तुम्ही इथे येऊन कमेंट वगैरे करताय म्हणजे तसं डिलीव्हरी वगैरे व्यवस्थीत झालेली दिसते! अभिनंदन!
(नाही, म्हणजे तुमचं नाव अनुप आहे म्हणून लगेच मी तुम्ही पुरुष असू शकता असे समजले तर ती अंधश्रद्धा नाही का होणार!! आमचं आपलं जनरल नालेज बरं का, इकडंच तिकडंच वाचून हो! नायतर तसा आपल्याला काय अनुभाव विनुभाव वगैरे काही नाही!)

ऋषिकेश Fri, 23/08/2013 - 09:30

In reply to by अनुप ढेरे

एखादा डॉक्टर जेंव्हा सांगतो की नॉर्मल डिलिवरी होणार नाही सिझेरिअन करायला लागेल तेव्हा आपण त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतो. याला काय म्हणायचं? विश्वास की अंधश्रद्धा?

मी याला अंधश्रद्धा म्हणेन!
आमच्या मुलीच्या जन्मा आधी दर विकांताला विविध डिलीवरींचे प्रकार, त्यासाठी काय प्रोसेस असते (अगदी अ‍ॅनिमेशन - शक्य असल्यास विडीयो सकट), काय धोके असतात, कोणती इंजेक्शने दिली जातात, कोणत्या प्रकारच्या घाईच्या प्रसंगी कोणत्या प्रकारचे कंसेन्ट घेतले जातात, प्रसुतीवेळ जवळ आल्याचे कळल्यावर काय तयारी करणे आवश्यक आहे, सिझेरियन कधी करावे लागु शकते वगैरेची शास्त्रोक्त माहिती देणारी १३ लेक्चर्सची सिरीज आमच्या गायनाकॉलिजिस्ट घेत असत (अजूनही त्या ती घेतात). त्याद्वारे प्रत्यक्ष प्रसंगी अश्या अंधविश्वासाला बळी न पडता आपण कधी कुठले कंसेट देणे योग्य आहे, कोणते नाही, कळा येण्यासाठी नक्की कधी कंसेट द्यावा, सिझेरियन साठी कोणकोणत्या प्रसंगात कंसेट द्याव वगैरे माहिती आधीच मिळालेली होती.

गर्भधारणेच्यावेळी कसली तरी स्त्रोत्र म्हणणे, डॉक्टरकी नसलेल्या लेखकांची जाडजूड नी महागडी पुस्तके वाचून कित्येक अशास्त्रीय गोष्टी करण्यापेक्षा आम्हाला ही माहिती मिळवणे अधिक श्रेयस्करही वाटले आणि अधिक उयुक्तही ठरले

अक्षय पूर्णपात्रे Fri, 23/08/2013 - 08:32

दाभोलकरांच्या हत्येची बातमी समजल्यानंतर खूप वाईट वाटले. धक्काही बसला. बर्‍याच वृत्तपत्रांनी गणपतिदुधभास्कर साळगांवकरांचा नैसर्गिक मृत्यु आणि दाभोलकरांची हत्या या बातम्या एकाच मथळ्याखाली छापल्याचे पाहून मात्र सावरलो.