प्रपोजल- एक नाट्यानुभव
सूचना: ज्यांना हे नाटक पहायचे आहे त्यांनी हा लेख आधी वाचू नये.
ह्या नाटकाला २८ पारितोषिके मिळाली आहेत आणि टीकाकारांनी उचलून धरले आहे, अशी बरीच ख्याती कानावर आली होती. त्यामुळे हे नाटक बघायचे असे मनाशी ठरवले होते. त्याप्रमाणे, एकदाचा, एका रविवारी मुहूर्त मिळाला. तिकीटे काढल्यावर लक्षांत आले की डॉ. अमोल कोल्हे, आता काम करत नसून त्यांच्या जागी कोणी 'आस्ताद काळे' काम करतात. पण अदिती सारंगधर आहे, हे पाहून बरे वाटले.
नाटक चालू होण्यापूर्वी, नेहमीची मोबाईल बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली पण त्याच बरोबर, लहान मुलांनी किरकिर करु नये म्हणून त्यांनाही 'बंद' करण्याची सूचना गंभीरपणे देण्यात आली. यावर काही प्रेक्षक फिदीफिदी हंसले. आम्हाला मात्र हंसु आले नाही.
पडदा उघडताच स्टेजवर चक्क, मरेची लोकल ट्रेन उभी असलेली दिसली. मुळ्येंच्या नेपथ्याचे, आम्ही मनांतल्या मनांत कौतुक केले. काही प्रेक्षकांनी त्या दृष्याला टाळ्या वाजवल्या. ट्रेन चालू होतानाच (म्हणजे मागील पाट्या डावीकडून उजवीकडे हलायला लागल्यावर, आस्ताद काळेने(आका) ट्रेन पकडली. शेवटची होती ना ती! त्याच्या पाठोपाठ अदिती आली धांवत धांवत! तिला चालत्या ट्रेनमधे, आकाने हात दिल्यामुळे चढता आले. ती सावरते आहे तोच, तो तिच्यावर, "पडला असता म्हणजे", असे वसकन ओरडला. तिचे थँकू थँकू आणि त्याचे लाऊड बोलणे ऐकल्यावर आणि त्या दोघांचा बिनधास्त अभिनय सुरु झाल्यावर, आता आपल्याला एखादे एक्स्टेंडेड 'फू बाई फू' तर बघावे लागणार नाही ना, अशी अशुभ शंका मनाला चाटून गेली. प्रत्यक्षांत, उत्तरोत्तर, त्याहूनही भडक अभिनय आणि भडक कथेशी गांठ पडली.
त्यांच्या बोलण्यावरुन तो एक अविवाहित साधाभोळा तरुण आणि ती एक कॉलगर्ल, एवढे कळले. त्यानंतरचे त्यांचे डायलॉग म्हणजे, गंभीर विषयाच्या डोहावर पीजेंच्या भाकर्या उडवणे आणि सुमार प्रेक्षकांचे अस्थानी हंशे वसुल करणे, याप्रकारचे वाटले. 'बसणार का?' या तिच्या बोल्ड प्रश्नाला, 'बसलोच आहे की आत्ता' असे भोट उत्तर देणे, किंवा तिने सिगरेट ऑफर करताना,'ओढल्यावर लहान होणारी ही एकच वस्तु आहे', अशी कॉमेंट करणे असल्या प्रकारचे अगणित विनोद सतत आमच्यावर फेकण्यात आले. थोडक्यांत ती दोन पात्रे,'स्ट्रीटस्मार्ट' हे पटवून देण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
पहिल्या अंकात प्रेक्षकांना कायकाय दिसते ? तिने केलेली छेडछाड आणि त्याचे अवघडून बसणे वा लाजणे.पाणी,दारु,खाणे आणि शरीर या जीवनावश्यक गोष्टींची, तिने वारंवार केलेली ऑफर ! तसेच तिची फिल्मी कर्मकहाणीही समजते.एकमेकांच्या नांवाची ओळख करुन घेताना त्याचे नांव,निवृत्ती आहे,हे कळल्यावर त्या राधाचे विकट हास्य पाहून, निवृत्तीच काय,पण प्रेक्षकही गर्भगळित होतात.मधेमधे,झोपेतून उठवले नाही म्हणून शिवीगाळ करुन उतरणारा प्रवासी,'रूळ टूट्या',म्हणून खेकसणारा रेल्वेचा कर्मचारी, वेडा बनून आलेला आणि आकाची बॅग पळवण्याचा प्रयत्न करणारा आणि अंकाच्या शेवटी,चाकू दाखवून,अदितीला लुटण्याचा प्रयत्न करणारा भुरटा अशा विविध सोंगात राजन ताम्हाणे(राता)दिसत रहातात.आणि सगळ्या रोलमधे,ते राजन ताम्हाणेच वाटतात..
पहिल्या अंकाच्या शेवटी,अदिती आणि राता,यांच्यात झालेल्या झटापटीत अचानक राता मरतो आणि तो खून आहे असे स्वतःच ठरवून निवृत्ती तिला जेलात पाठवतो,कारण तो पोलिस असतो.
अवांतरः- पहिला अंक संपल्यावर आमचे एकमत झाले की शिवाजी मंदिरचा बटाटावडा फारच चांगला होता. सध्या फक्त वड्याबद्दल मत आणि दुसरा अंक संपल्यावरच नाटकाबद्दल चर्चा करायची असे ठरले.
दुसर्या अंकाआधी, सर्व नाट्यशिबिराकांक्षी मुलांसाठी एक विशेष सूचना देण्यात आली. त्यानुसार, त्यांनी नाटक संपल्यावर स्टेजवर जमायचे होते.
दुसर्या अंकात तोच रेल्वेडब्याचा सीन! पण आता 'राधा' कोठीवाली बाई' झालेली असते. तिचा दलाल फर्स्टक्लासच्या डब्यात तिच्यासोबत असतो. त्यांचा हिसाब पूर्ण झाल्यावर तो उतरुन जातो. याठिकाणीही तो 'राता' आहे हे कळायला, क्षणाचाही अवधी लागत नाही. मग राधाला शोधत आका येतो. त्याची आता बढती झालेली असते. तो राधाला डायरेक्ट मागणी(म्हंजे प्रपोजल) घालतो. ती रागावते, तुरुंगात पाठवल्याबद्दल त्याची निर्भत्सना करते. पण गडी पेटलेलाच असतो. तो त्याची(पण) दर्दभरी कहाणी सुनावतो. भान विसरुन गाडीतून खाली उतरुन अभिनय करायला लागतो. (तोपर्यंत गाडी सुटेल या कल्पनेने आम्ही अस्वस्थ झालेले असतो.) त्याचा हा बाण वर्मी लागतो. राधाला हर्षवायु होतो. ती होकार देते आणि त्या आवेगात गाडीतून खाली पडते.तो बेभान होऊन ओरडू लागतो,स्वतःच्या गुरुजींना बोल लावतो. या गुरुजींना 'भावे' नांवाचे लेबल का लावले ते समजले नाही. नाटक संपते.
या ठिकाणी,एखादा इन्स्पेक्टर येऊन सब-इन्स्पेक्टर निवृत्तीला,राधाला मारण्याच्या किंवा आत्महत्येला उद्युक्त करण्याच्या आरोपाखाली जेलात पाठवतो, असा शेवट केला असता तर तो पहिल्या अंकाच्या शेवटाला मॅचिंग ठरला असता अशी मनांत एक कल्पना चमकून गेली. शिवाय त्यामुळे,राता ला आणखी एक रोल करण्याची संधीही मिळाली असती. असो.
अति अवांतरः नाटक संपल्यावर आम्ही, दुखर्या गुडघ्यांनी बाहेरची वाट धरली तोच, प्रेक्षागृहातच बसलेली १०-१२ वर्षांची अनेक मुले स्टेजकडे पळाली. अरेरे, त्यांना या वयांत शिबिरांत जाण्यासाठी काय काय पहावे लागले ?
आम्ही सारे, छबिलदासी चळवळीचे पूर्वापार प्रेक्षक असल्याने, हतबुद्ध होऊन, कुठलीही चर्चा वा मत व्यक्त न करता, घरची वाट धरली.
दोन शंका: १.आस्ताद या नांवाचा अर्थ काय ?
२.राधा अपघाताने पडते की आत्महत्या करते ?
प्रतिक्रिया
लेख वाचलेला नाही.
नाटक पहायचे असल्याने लेख वाचलेला नाही. तशी सुचना दिल्याबद्दल आभार
मात्र नाटक पाहण्याचे ठरवले आहे- शेवटी चांदण्या वगैरे दिल्या असत्या तर आमचा हा निर्णय योग्य आहे की नाहि हे तरी किमान कळले असते
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
खड्डा दाखवलेला आहे
पण "बघु तरी कसा आहे हा खड्डा" असंच ठरवल्यावर काय?
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
सूचना:
नाटक पहाणार नसल्याने सूचनेप्रमाणे लेख वाचला. रसग्रहण वाचल्यावर - हे नाटक विनोदी आहे काय? की रहस्यमय आहे? की कौटुंबिक आहे? की ऐतिहासिक आहे? -असे अनेक प्रश्न पडल्याने त्यांची उत्तरे मिळवण्यासाठी आता ते पहावेच लागेल अशी भीती वाटत आहे.
विसुनाना
एक महत्वाचं राहिलं. त्याच्या स्टोरीत, तो ही अशाच आईच्या पोटी जन्माला आलेला असतो. एक चांगले गुरुजी त्याला सुधारतात. म्हणून त्याला तिच्याविषयी सहानुभूति असते. हे न लिहिल्यामुळे रहस्यकथा वाटली असेल.
अस्सं!
अस्सं! म्हणजे "अरे, संस्कार, संस्कार" असेही हे नाटक आहे तर! 'भावे' गुर्जी काय? हम्म्म्म, मग तर पाह्यलाच पाहिजे...
छान लिहीलाय नाट्यानुभव.
छान लिहीलाय नाट्यानुभव. चित्रपटांप्रमाणे नाटकांना सेन्सर बोर्ड असतं का? हे नाटक U/A असायला हवं असं वाटतय.
अय्याई.. शेवट वाचून पार
अय्याई.. शेवट वाचून पार भंजाळायला झाले आहे. असलं कसलं हे नाटक?
नाटक पहाण्याचा योग आला नाही,
नाटक पहाण्याचा योग आला नाही, पण जालावर उपलब्ध समिक्षेवरुन असं लक्षात येतं आहे की राजन ताम्हाणेंना चित्रपटाच्या जवळ जाणारा नाट्य-अविष्कार सादर करायचा आहे, रेल्वेचा डबा, नाटकाचा शेवट वगैरे बाबी चित्रपटामधे बर्यापैकी अपेक्षित परिणाम साधतात, कथेचा जीव फार नाही असे बर्याच जणांचे म्हणणे आहे, पण नेपथ्य आणि संगीत चांगलं आहे ह्याची नोंद बर्याच ठिकाणी मिळते.
नाटक पहाताना दृष्टीकोन बदलल्यास काही फरक पडेल काय अशी शंका आहे.
आस्ताद या नांवाचा अर्थ काय ?
आस्ताद काळे हे प्रमोद काळे यांचे चिरन्जीव आहेत का? बर्याच वर्षांपूर्वी प्रमोद काळ्यांकडून त्यांच्या मुलाचे नाव 'अस्तद', म्हणजे एंजल असे ऐकले होते.
होय
होय ते त्यांचेच चिरंजीव आहेत.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हार्दिक आभारी आहे . नाटकाला
हार्दिक आभारी आहे . नाटकाला जायचा वेळ , पैसा आणि कष्ट वाचले . हुश्श्श !नुकतीच बारा /पंधरा पारितोषिक(!!) मिळालेली तब्बल दोन नाटके पाहून
( सुखांशी भांडतो आम्ही व टॅाम आणि जेरी ) जेरीस आलेय .
हार्दिक आभारी आहे
सुखांशी भांडतो आम्ही व टॉम आणि जेरी- नाहीतरी बघणार नव्हतोच. आता नक्की फुली मारतो.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
हेही नका बघू
शफाअत खानांचे नाव ( आणि शोभायात्राने वाढवलेल्या) प्रचंड अपेक्षा घेऊन गांधी आडवा येतो ला जाऊन आलो... भयंकर दु:ख झाले. हाच का तो लेखक , यानेच का हे लिहिले आहे, असले प्रश्न पडले.
लै भारि
राता काम करित असलेले चित्रपट माटके आपण सोडित नाही असे दिसते.
संपूर्ण धागा क्लास आहे.
त्यातही
मधेमधे,झोपेतून उठवले नाही म्हणून शिवीगाळ करुन उतरणारा प्रवासी,'रूळ टूट्या',म्हणून खेकसणारा रेल्वेचा कर्मचारी, वेडा बनून आलेला आणि आकाची बॅग पळवण्याचा प्रयत्न करणारा आणि अंकाच्या शेवटी,चाकू दाखवून,अदितीला लुटण्याचा प्रयत्न करणारा भुरटा अशा विविध सोंगात राजन ताम्हाणे(राता)दिसत रहातात.आणि सगळ्या रोलमधे,ते राजन ताम्हाणेच वाटतात..
हे हाय क्लास!
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
:)
हा हा
जबरा लिहिता तिरशिंगराव.
सध्या नाटकं पहात नसल्याबद्द्ल
सध्या नाटकं पहात नसल्याबद्द्ल पाठ थोपटून घेतली आहे.
आणि सगळ्या रोलमधे,ते राजन
हाहाहा बिच्चार्या रातांनी ऐकलं तर नर्व्हस ब्रेक डाऊन व्हायचा