SOLO IMPOTENCE
कॅफेटेरियात
वारुळ ढोसत
बसलेली नागडी माणसं
कसल्याशा कुंपणांनी,
गोंदवत बसलीयत
आपली उघडी शरीरं.
'तु अजुन कपडे काढ.
मी माझेही काढतो.
त्वचा उतरवुन ठेव
मी माझीही ठेवतोच.
तुझा कोथळा उतरव
आणि मला दे.
माझा तुझ्या हातात घे.
आपल्या,
पेशीपेशींमधल्या मरणफुलांचा
गुच्छ बनवु आणि
सात जणात
सुखासमाधानाने
गिळुन खाऊ.
रक्त पचवु.
धागे उपसु.
नाहीतरी,
जगुन झालेल्या पारदर्शक रक्ताने,
प्रत्येक पेशींमधले मेंदु सैरभैर आहेत,
होणारी प्रत्येक नवी मांडणी
विटाळत नाहीये एकसंधपणे.
शरीरविरहीत जग बनुन,
चिडिचुप वखवखलेपण घेऊन,
केवळ मनं का सडत नाहीत??
भग्नतेची शिल्प होऊन,
भोगलेले सगळे अनिर्णित प्रश्न
कुठल्या शहरात निघुन जातायत??'
प्रतिक्रिया
अरे वा! बर्याच दिवसांनी
अरे वा! बर्याच दिवसांनी दिसलात!
कविता मात्र उमगलेली नाहि.. पुन्हा शांतपणे वाचावी लागेल
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अवघड आहे
अवघड आहे
.
थोडी थोडी उमगल्यासारखी वाटली.
थोडी थोडी उमगल्यासारखी वाटली. पण सर्व कवितेतल्या प्रतीकांमध्ये वारुळाचा संदर्भ लागला नाही. त्वचा, पेशी, मेंदू, कोथळा या शारीर प्रतिमांमध्ये वारुळाची प्रतिमा काहीशी तुटकपणे वागणारी वाटली.
कविता पुन्हा वाचून बघतो आहे.
कठीण
बापरे आता तुम्हालाच ऊमगल नाही तर मग पेपर नक्कीच कठीण आहे
.
वारुळ इथे 'प्रघात' या अर्थी
वारुळ इथे 'प्रघात' या अर्थी आहे. घालुन दिलेले नियम पाळत शिस्तीत मुंग्या जगतात. प्रत्येक वारुळाची/गटाची/समाजाची एक ठरलेली रेफरन्स फ्रेम असते. ही संदर्भांची वारुळं आहेत. नागडं असुनही क्षणोक्षणी आपल्या अस्तित्वाचा नवनव्या रेफरन्स फ्रेम्स घेऊन केलेला तौलनिक विचार वा तशी गरज याबद्दल पहिल्या दोन ओळींत मांडले आहे.
“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre
वा!
मार्क्स म्हणतो तसं लैंगिक ओळख ही भाषेच्या अग्राह्यतेचाच भाग आहे, पण नवसंस्कृतीच्या नष्टतावादाचा विचार केला तर आपल्याला नववस्तुवाद किंवा सांस्कृतिक व्यवहार यापैकी एक स्वीकारावे लागते.
लाँगच्या म्हणण्याप्रमाणे अग्राह्य वास्तवापासून फटकून असलेल्या भाषिक वास्तवाच्या कोशात शाब्दिक पुराणकवित्वात्मक परिपूर्णता लैंगिक परस्परविरोधाच्या व्यवस्थेला नष्ट करते तेव्हा अशी आधुनिकोत्तर कविता निर्माण होते!
शप्पथ
कविता कळली नाही, म्हणून खाली वाचत गेलो. प्रतिसादांतून काही कळेल, या आशेपोटी. हा प्रतिसाद वाचला आणि 'खपलो...' वगैरे शब्दच आठवले.
बहुतांश कवितेत मळलेल्या
बहुतांश कवितेत मळलेल्या वाटेवर विचार न करता चालणार्यांचं वर्णन आहे; पण शेवटच्या तीन ओळींचा अर्थ नाही लागला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.