Skip to main content

नरेंद्र मोदी: आपत्ती की इष्टापत्ती?

गडकरींना 'टाटा, बाय-बाय' केल्यानंतर आलेल्या राजनाथसिंगांच्या आगमनानंतर भाजपामध्ये काही मोठे बदल होताना दिसत आहेत. राजस्थानचे प्रदेशाध्यक्षपद वसुंधराराजेंना देणे हे पहिले मोठे पाऊल राजनाथसिंगांनी उचलले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. वसुंधराराजेंचे जनमानसातले स्थान बघावे की काम या संभ्रमात भाजपा असताना, त्यांचे नाव घोषित करून आपण 'ब्लॅकमेलिंग'ला किती सहज बळी पडू शकतो हे राजनाथसिंगांनी दाखवून दिले. गडकरी पक्षाध्यक्ष असेपर्यंत नरेंद्र मोदींचे नाव राष्ट्रीय पातळीवर घेणे टाळले जात होते. तेच राजनाथसिंग यांनी वसुंधराराजेंच्या धमक्यांनंतर घेतलेल्या निर्णयानंतर मोदी समर्थक आक्रमक झालेले दिसतात.

या पार्श्वभूमीवर लोकसत्तामध्ये आपत्ती की इष्टापत्ती? हा सुनील चावके यांचा लेख वाचनात आला. एकूणच मोदी प्रवासाचा, त्यांना पंतप्रधानाचा उमेदवार घोषित केल्यास निर्माण होऊ शकणार्‍या परिस्थितीचा अंदाज या लेखात चांगला घेतला आहे.

हा लेख वाचून तुम्हाला काय वाटते?

  • भाजपापुढे मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक आहे का?
  • काँग्रेस पक्षालाही सद्यस्थितीत असे धृवीकरण आवश्यक असल्यानेच -लेखात म्हटल्याप्रमाणे - शिंदेंकरवी संघाला अधिक हिंदुत्ववादी दिशेने ढकलून मोदींनाच उमेदवार घोषित करण्यास भाग पाडणे काँग्रेससाठीही पथ्याचे असेल काय?
  • मोदींना उमेदवार घोषित केल्यास भाजपामधील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा खंडीत होण्याचा धोका आहे असे वाटते का?
  • मोदींचा करिश्मा भाजपाला २०० जागा मिळवून देऊ शकेल काय?
  • मोदींचा राष्ट्रीय पातळीवरील उगम तुम्हाला आपत्ती वाटतो की इष्टापत्ती?

चिंतातुर जंतू Fri, 08/02/2013 - 14:06

ह्याच विषयावर 'हिंदू'मधला रामचंद्र गुहांचा 'The man who would rule India' हा लेख वाचण्यासारखा आहे. त्यातल्या काही तुलना काॅन्ग्रेसी लोकांनाही आवडणार नाहीत.

ऋषिकेश Fri, 08/02/2013 - 14:13

In reply to by चिंतातुर जंतू

लेख सकाळीच वाचला होता. :)
चांगला लेख आहे. बाकी सगळे नेमके आहे.
फक्त इतकेच की राहुल गांधी हा काँग्रेसचा पंतप्रधानपदासाठी उमेदवार असेल असे वाटत नाही. तो त्याच्या आईप्रमाणे पक्षातील पद घेण्यास प्राधान्य देईल असे वाटते. मात्र तो डाव खेळायच्या आधी भाजपाला कॉर्नर करत मोदींना रिंगणात उतरायला लावायचा डाव काँग्रेस आनि मोदी समर्थक दोघेही (मात्र एकत्रितपने किंवा संगनमताने नव्हे) खेळत आहेत असे म्हणायला जागा आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/02/2013 - 20:32

चावकेंच्या लेखातूनः

आंध्र प्रदेश, अरुणाचल, हरयाणा, जम्मू आणि काश्मीर, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालॅण्ड, ओरिसा, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तराखंड, दिल्ली, चंदिगढ, लक्षद्वीप आणि पुडुचेरीमधील १६४ जागांवर भाजपच्या हाती शून्य आले होते

संघाने ईशान्येकडच्या राज्यांमधे प्रचारक पाठवलेले आहेत, ते तिथे निस्पृहपणे काम करतात वगैरे गोष्टी अधूनमधून कानावर येतात. वरच्या यादीत ईशान्येकडच्या ८ राज्यांपैकी आसाम वगळता बाकीची ७ राज्य आहेत. संघाने तिथे नक्की काय काम केलंय की भाजपला तिथे लोकसभेची एकही जागा मिळू नये?

विषारी वडापाव Fri, 08/02/2013 - 20:52

मोदी हे भाजप चे ब्रम्हस्त्र आहे. जर ते या मुख्य अस्त्रा ला पुरवून पुरवून वापरणार असतील तर नक्कीच चुकीची रणनीती असेल. आणि एक राज्य चालवणे वेगळे आणि हा प्रचंड विविधता असणारा देश चालवणे वेगळे हे मोदीप्रेमीना कळेल तो 'सोनियाचा' दिन.

ऋता Fri, 08/02/2013 - 23:46

गांधी घराण्यापासूनच्या मुक्तीसाठी (किमान बदल म्हणून) मोदी ही मला (या क्षणीतरी) इष्टापत्ती वाटते.
नाहीतरी लोकशाहीमध्ये निवडून आलेले उमेदवार हे राजे नसून जनतेचे सेवक आहेत याची भारतातल्या किती टक्के लोकान्ना जाणीव आहे...मग खरोखरच 'हुकूमशहा' या अर्थाशी मिळत्याजुळत्या (माध्यमांनी त्यांच्या बनवलेल्या इमेज वरून) मोदींना काय म्हणून आपत्ती म्हणायचे?

नितिन थत्ते Sat, 09/02/2013 - 08:29

In reply to by ऋता

>>लोकशाहीमध्ये निवडून आलेले उमेदवार हे राजे नसून जनतेचे सेवक आहेत

याचा अर्थ नीटसा कळला नाही. बहुतेक सर्वच ठिकाणी (कंपनी, सहकारी संस्था वगैरे) निवडून आलेल्यांना निवडून देणार्‍या सामान्यांपेक्षा अधिक अधिकार, सोयी, सवलती असतात. कंपनीचा संचालक हा तांत्रिकदृष्ट्या कंपनीच्या सामान्य भागधारकाचा सेवक असतो. पण त्याला त्या भागधारकापेक्षा कितीतरी जास्त अधिकार, सोयी (भागधारकांनीच) दिलेल्या असतात.

बाकी गांधी घराण्याबाबत आमचे प्रवचन इथे पाहता येईल.