Skip to main content

काटकोन त्रिकोण

'काटकोन त्रिकोण' हे नाटक साधारण वर्षापूर्वी बघायचे ठरवले होते. तिकिटेही काढून आणली होती. पण ऐन वेळेस सभागृहावर पोचलो आणि, डॉ. मोहन आगाशे' यांची तब्येत बरी नसल्याने प्रयोगच कॅन्सल झाला. त्यानंतर, या ना त्या कारणाने बेत लांबणीवरच पडत गेला. अचानक, गणेशचतुर्थीलाच, शिवाजी मंदिर ला प्रयोग लागल्याचे कळताच फोन बुकिंगवर प्रयत्न केला. ते फक्त दोनशेचीच तिकिटे ठेवतात हे कळले. पण गणपतीच्या गडबडीत सगळे असल्याने आयत्या वेळेसही तिकीट मिळेल असा विचार करुन गेलो. अंदाज बरोबर ठरला आणि एकदाची नाटक बघण्याची इच्छा पूर्ण झाली.

हे नाटक अजिबात चुकवू नकोस, असे कुणी आधी सांगितले की, प्रत्यक्षात अपेक्षाभंग होतो असा माझा आजवरचा अनुभव आहे. हे नाटक बघितल्यावर अपेक्षाभंग वगैरे झाला नाही तरी , एक चांगले नाटक बघितल्याचे पूर्ण समाधान मिळाले नाही. नवीन लग्न झालेल्या एका जोडप्याची आणि त्यातील नवर्‍याच्या बापाची ही गोष्ट आहे. कुटुंबात पात्रे तीनच पण नाटकात पात्रे चार! कारण मोहन आगाशे यांनी डबल रोल केला आहे. ते त्या तरुण माणसाचे बापही झालेत व त्यांच्या घरी चौकशीला येणारे पोलिसही झालेत. दोन्ही भूमिकांमधे त्यांनी उत्तम अभिनय केला आहे आणि ते अपेक्षितच होते. केतकी थत्ते आणि संदेश मात्र त्यांच्यापुढे फिके पडतात.
विधुर सासरा व सून यातील संघर्ष व त्यात होणारी मुलाची फरपट, हा मुख्य विषय आहे. नेहमीप्रमाणे ठोकळेबाज संवाद व भडक प्रसंग न दाखवता त्यांच्यातील भांडण हे
खेळीमेळीच्या वातावरणात व चर्चेच्या स्वरुपात दाखवले आहे. सासरा हा जुन्या पिढीतला असल्यामुळे, त्याचा आक्षेप आहे, सुनेच्या उधळ्या व खर्चिक वृत्तीवर आणि घरी काही काम न करण्यावर. त्यामुळे आपल्या मुलाला जास्त काम पडते असे त्याचे म्हणणे असते. पहिल्या अंकात हे सर्व इतक्या हलक्याफुलक्या वातावरणात चालू असते की केवळ एका अपघाताच्या घटनेमुळे तो इन्स्पेक्टर, इतक्या खोलात का शिरत आहे असा आपल्याला प्रश्न पडतो. पण दुसर्‍या अंकात वातावरण इतके गंभीर होते की ही एक रहस्यकथा आहे असे वाटू लागते. संवाद चटपटीत, विनोदी आणि कायम एकमेकांवर कुरघोडी करणारे होतील याची लेखकाने विशेष काळजी घेतल्याचे जाणवते. पण ते करताना काही ठिकाणी त्याची नाटकाच्या आशयावरची पकड सुटते. एकच डायलॉगचा सेट, वेगवेगळ्या प्रसंगी त्याच किंवा दुसर्‍या पात्रांच्या तोंडी घालण्याची युक्ती तशी जुनी आहे. ती एका मर्यादेत वापरली तर चांगली वाटते. पण या नाटकात लेखकाने त्याचा अतिरेक केला आहे. शेवटी खुद्द मोहन आगाशेच जेंव्हा , 'तुम्ही मंगल पांडे पाहिला आहे का हो ?' हा डायलॉग रिपीट करतात तेंव्हा नाटक एका चांगल्या उंचीवरुन अचानक कोसळल्याचे जाणवते. थोडक्यात, नाटक चांगले आहे, एकदा पहायला हरकत नाही पण चुकलेच बघायचे तरी फार मोठे काही गमावल्याचे दु:ख होणार नाही.

लेखकः डॉ. विवेक बेळे, कलाकारः मोहन आगाशे, केतकी थत्ते आणि संदेश कुलकर्णी.

वि.सू.: नाटकाचे कथानक मुद्दाम विस्ताराने दिले नाहीये, कारण त्यामुळे, त्यातील धक्कातंत्राचा आस्वाद प्रेक्षक घेऊ शकणार नाहीत.

ऋषिकेश Fri, 21/09/2012 - 11:31

छोटेखानी परिचय चांगला आहे. नाटक बघायचे (गेले कित्येक महिने) ठरवतोच आहे.. अजून योग नाही.. बघुया कधी जमते ते

मेघना भुस्कुटे Fri, 21/09/2012 - 11:43

नाटक आशयात फार वेगळे नसले, तरी संवाद, सादरीकरणातला वेगळेपणा यांत चटपटीत आहे.
पण शेवट फारच पंतोजी-प्रकारचा आहे. 'हवा आन दे, यार' असे म्हणावेसे वाटू लागते.

भडकमकर मास्तर Fri, 21/09/2012 - 23:52

In reply to by मेघना भुस्कुटे

+१..

बेळेंचे चमकदार संवाद आणि धमाल आहेच..
पण शेवट मलाही अगदी भाषणबाजीचा वाटला...

शिवाय सेकंड हाफ हे रहस्यमय नाटक करायचंय की साधे-सरळ, अशा गोंधळात फिरतंय असे वाटत राहते...
अर्थात बेळे - जोशी ग्यान्गच्या आधीच्या "शॅम्पेन"शी तुलना करता ती नशा नाही आली असे म्हणावेसे वाटते..

मेघना भुस्कुटे Mon, 24/09/2012 - 10:56

In reply to by भडकमकर मास्तर

बेळेंचे 'नेव्हर माईंड' पाहिले का तुम्ही? तेपण टाईमपास आहे. त्यातले शर्वरी पाटणकरचे काम मात्र अगदी सुमार होते. बाकी सगळे ताजे नि उत्तम.

बॅटमॅन Mon, 24/09/2012 - 12:59

In reply to by भडकमकर मास्तर

पण शेवट मलाही अगदी भाषणबाजीचा वाटला...

शिवाय सेकंड हाफ हे रहस्यमय नाटक करायचंय की साधे-सरळ, अशा गोंधळात फिरतंय असे वाटत राहते...

पूर्ण सहमत. इन्स्पेक्टर बापट ट्विस्टवर ट्विस्ट असे सांगतात, की तिसर्‍या ट्विस्टपर्यंत औटघटकेसाठी डोके औट होते.

प्रकाश घाटपांडे Fri, 21/09/2012 - 11:58

लई भारी नाटक आहे. व्हिस्कीचा पेग घेताना मोहन आगाशे नको! नको! नको! बास! बास! बास! असे करतानाचा अभिनय डोळ्यासमोर आहे