Skip to main content

हिंदी सिनेमातली स्त्री-प्रतिमा उलटीपालटी करणारा 'अय्या'

आदिमाया, स्त्रीशक्ती वगैरे शब्दांचा येते नऊ दिवस आपल्यावर मारा होणार आहे. पण आदिमायेची सगळीच रुपं काही आपल्या सोयीची नसतात. मलालावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करायला अनेकजण पुढे येतात (ते योग्य आणि गरजेचंच आहे), पण 'बलात्कार थांबवण्यासाठी अल्पवयीन मुलींची लग्नं लावून द्या' असं म्हणणारे, किंवा 'पबमध्ये जाणारी बाई चवचालच असते' असं म्हणणारे लोकही आपल्याकडे आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदी सिनेमातली सोयीची आणि सवयीची स्त्रीप्रतिमा बदलण्याच्या एका प्रयत्नाची घेतलेली ही एक दखल आहे. हे 'अय्या'चं एका विशिष्ट अंगानं केलेलं सामाजिक विश्लेषण आहे; ती सिनेमाची समीक्षा नाही. त्यामुळे सिनेमा चांगला की वाईट, जमलेला की फसलेला याच्याशी इथे काही देणंघेणं नाही. म्हणून हा लेख चर्चा → सामाजिक ह्या वर्गवारीत टाकलेला आहे.

परवा चॅनल चाळता चाळता कुठेतरी एक परिसंवाद चाललेला दिसला. 'हिंदी सिनेमातली स्त्रीची प्रतिमा बदलते आहे का?' असा विषय असावा. त्यात करीना कपूर, करिश्मा कपूर आणि शर्मिला टागोर बोलत होत्या. आजचा हिंदी सिनेमा अधिक स्त्रीकेंद्री विषय निवडतो आहे आणि त्यामुळे हिंदी सिनेमातली स्त्री प्रतिमा बदलते आहे असा एकंदर सूर असावा. भाग घेणाऱ्यांची 'स्टार व्हॅल्यू' पाहता 'साहिब, बीबी और गुलाम'मधली ब्राह्मो समाजात वाढलेली वहिदाची व्यक्तिरेखा किंवा श्याम बेनेगलच्या सिनेमातल्या स्त्रिया वगैरे इथे कुणाच्या खिजगणतीत नसणार हा अंदाज खरा ठरला. मधुर भांडारकरचे सिनेमे, नुकतेच आलेले विद्या बालनचे 'डर्टी पिक्चर' आणि 'कहानी' आणि (अर्थात) येऊ घातलेला करीनाचा 'हिरॉईन' यांच्याभोवती चर्चा फिरत होती.

ह्या अलीकडच्या सिनेमांत स्त्री व्यक्तिरेखा केंद्रस्थानी आहेत हे खरंच आहे. पण त्यातून उभी राहणारी स्त्री-प्रतिमा कशी आहे? पुरुषप्रधान कॉर्पोरेट संस्कृती असो, की फॅशन किंवा बॉलिवूडसारखं ग्लॅमरस वातावरण असो; मधुर भांडारकरची नायिका यश मिळवते, पण ते क्षणिक ठरतं. 'डर्टी पिक्चर'ची नायिका आपल्या शरीराचा आणि बिनधास्तपणाचा वापर करून पुरुषांना थोडं चकवते खरी, पण तिची अखेर निराशेच्या गर्तेत होते. थोडक्यात, पुरुषी वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या स्त्रियांचं वाटोळं होतं; किंबहुना हेच त्यांचं भागधेय असतं असं ह्या सर्व सिनेमांचं म्हणणं दिसतं. 'कहानी'तल्या स्त्रीची कृतीप्रेरणा नवऱ्याच्या प्रेमातून उगवते. आधुनिक मध्यमवर्गीय कुटुंबातल्या स्मार्ट स्त्रीकडून जेवढी अपेक्षा असते तेवढीच 'इंग्लिश विंग्लिश'मधली गृहिणी पार पाडते. म्हणजे 'शिका; मोठ्या व्हा'; पण 'उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका'.

ह्या व्यक्तिरेखांनी हिंदी सिनेमातली स्त्रीची प्रतिमा फारशी बदलली आहे असं त्यामुळे अजिबात वाटत नाही. याउलट काही इतर (म्हणजे तितक्याशा स्त्रीकेंद्रित नसलेल्या) सिनेमांमध्ये काहीतरी वेगळं होताना दिसतं. उदाहरणार्थ, 'इश्किया'मधली विद्या बालनची व्यक्तिरेखा एकटी राहते; घरात दोन अट्टल चोरांना ठेवून घेते; त्यांना झुलवते; त्यांच्याबरोबर झोपते आणि आपला स्वार्थ साधते. थोडक्यात, ती पुरुषांना चांगलीच गुंडाळते आणि आपलं सुख आपण मिळवते.

किंवा अनुराग कश्यपच्या 'देव-डी' मधली पारो पाहा. देवदासला मुठीत ठेवण्यासाठी ती आपली उन्मादक प्रतिमा त्याला फोनवर पाठवते. तो दुसऱ्या मुलीबरोबर झोपला हे पाहून त्याला सोडून देते. आपल्याच लग्नात बेधुंदपणे नाचते आणि मग सुखी संसारात रममाण होते. 'देवदासला हवं तर होऊ देत फ्रस्ट्रेट; माझं सुख मी शोधेन' असं म्हणणारी ही पारो हिंदी सिनेमातल्या स्त्रियांपेक्षा वेगळी वाटते.

‘अय्या’मधली राणी मुखर्जीची मीनाक्षी देशपांडे या माळेत बसते आणि हा धागा वेगळ्या प्रकारे पुढे नेते असं म्हणता येतं. पृथ्विराजनं साकारलेली नायकाची व्यक्तिरेखा ही इथे अक्षरश: शोभेची आहे; आणि नायिकेला तिचं शारीर आकर्षण वाटण्यातच ह्या नरपुंगवाची शोभा आहे. नायिका आधी त्याच्या वासावर मोहित होते. त्याचा पाठलाग करत अगदी वेश्यावस्तीतही पोचते. 'फुलशर्टच्या आत बनियन घालणारे मुलगे मला अजिबात आवडत नाहीत' असे तिला पाहायला आलेल्या मुलांविषयीचे तिचे शेरे पाहूनही नायिकेच्या शारीर आवडीनिवडी लक्षात येतात. आपल्याला आवडणारा मुलगा तमिळ आहे हे कळल्यावर नायिका कॅन्टीन बॉयकडून काही तमिळ वाक्यं शिकून घेते. ती वाक्यंसुध्दा कशी असतात? 'तू शेव्ह करू नकोस' (मला तुझे दाढीचे खुंट आवडतात.) किंवा 'शर्टाचं वरचं बटन उघडं ठेव' (म्हणजे तुझी केसाळ छाती मला दिसेल.) अशी वाक्यं ती शिकते. हाच धागा गाण्यांतही दिसतो. दाक्षिणात्य ठेका, सेट, कपडेपट वगैरे वापरून केलेल्या गाण्यात राणी दाक्षिणात्य पध्दतीचं उत्तान नाचते, पण त्याबरोबर 'ढोल पीटनम्' म्हणता म्हणता ती चक्क नायकाच्या पार्श्वभागावर फटके मारते. लुंगी वर करून आपल्या मांड्यांचं प्रदर्शन करणं हे इथे नायकाचं भागधेय आहे. थोडक्यात, नायकाचं 'सेक्स ऑब्जेक्ट' असणं हे चित्रपटाच्या कथानकात येतं तसंच किंवा त्याहूनही उत्कट पध्दतीनं ते गाण्यांत येतं.

आई-वडिलांनी राणीसाठी पसंत केलेला सुबोध भावे हा अर्थात याच्या अगदी उलट आहे. समंजस, उदारमतवादी, मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात वाढलेल्या गोडगोडमिट्ट मुलाचा तो अर्क आहे. त्यामुळे तो नायिकेला समजूनबिमजून घेण्याचा प्रयत्न करतो; पण त्याच्याबरोबरचं आयुष्य कंटाळवाणं होणार हे उघड आहे. नायिकेची सिनेमाची आवड चारचौघांसारखीच असते (श्रीदेवी, माधुरी आणि जुहीच्या सिनेमांमध्ये स्वत:ला कल्पणं ही तिची फॅन्टसी असते). तर सुबोध भावे म्हणजे 'तुमको देखा तो ये खयाल आया' टाईप असतो. त्याला दीप्ति नवल आवडते यातच सगळं आलं. तो गच्चीवर गुलाबांची बागबिग फुलवणारा रसिक असतो. नायिकेच्या व्यक्तिरेखेची गंमत म्हणजे तिला त्याच्या ह्या आवडीनिवडींबद्दल आक्षेप नसतो; पण त्याच्या शरीराविषयी कुतुहल असतं. एका प्रसंगात ती लपूनछपून त्याचं उघडं बोदलं शरीर बघते आणि किळस येऊन पळून जाते.

दाखवायचं आहे ते सगळं नायिकेच्या माध्यमातून दाखवण्यावर मर्यादा पडतात म्हणून व्हॅम्प वापरण्याची पूर्वी पध्दत होती. नादिरा, श्यामा, कक्कू, निगार सुलताना ते अगदी हेलन, बिंदू आणि कल्पना अय्यरपर्यंतची ही आपली सनातन आणि समृध्द परंपरा आहे. 'अय्या'मध्ये मैना (अनिता दाते) हे एक असं भन्नाट पात्र नायिकेच्या जोडीला आहे. तिचा सगळा अवतार हा लेडी गागा, एस&एम, लेदर वगैरे दृश्यप्रतिमांत घडवलेला आहे. तिला जॉन अब्राहम आवडतो (म्हणजे त्याचं शरीर आवडतं). त्याच्या जवळजवळ पूर्णनग्न फोटोचं विश्लेषण ती 'असं अगदी थोडंस्सं झाकावं की मग पाहणारे अधिकच चेकाळतात' अशा धर्तीचं काहीतरी करते. 'बेशर्मी के तेल मे तल के खा लूं तेरा इज्जत पापड' असं मुलाला म्हणत त्याची इज्जत लुटू पाहणारी ही मैना राणीपेक्षा अधिक गडद रंगात रंगवलेली आहे. तिचं लाल माकड आणि त्याचं मादक रहस्य, तिच्या घराची घंटा अशा अनेक घटकांचं वर्णन सरळसरळ 'सबव्हर्जिव्ह' किंवा 'कॅम्प (पाचवा अर्थ पाहा)' असं करता येईल.

काहींना हे बीभत्स वाटेल. पण मुळात ते लाउड आणि फार्सिकल ढंगाचं असल्यामुळे त्यात अनेक गोष्टी खपून जातात. पाहणारा पुरुष आणि बघितली जाणारी म्हणजे पॅसिव्ह बाई ह्या नेहमीच्या फॉर्म्युल्याला इथे उलटंपालटं करून ठेवलं आहे. पुरुषी वर्चस्वाला शह देणारी बाई अखेर धुळीला मिळते हेदेखील इथे होत नाही. शरीरसुख म्हणजे काहीतरी भयंकर गोष्ट आहे; विशेषत: स्त्रीनं त्यापाठी धावण्यानं तिची आणि समाजाची काहीतरी हानी वगैरे होते असला नैतिक संदेश इथे दिला जात नाही. 'चांगल्या घरातली मुलगी' 'असं' वागत नाही वगैरे गोष्टींना आजकाल फारसा अर्थ राहिलेला नाही. जगण्यात मजा आणणाऱ्या अनेक गोष्टींपैकी शरीरसुख ही एक आहे आणि ज्याला/जिला तिची आवड आहे त्यानं/तिनं ती जोपासावी असा, म्हणजे आजच्या तरुण पिढीचा विचार मांडणारा मोकळाढाकळा असा हा प्रकार आहे. आणि म्हणून कदाचित दखल घेण्याजोगा आहे.

सत्तरच्या दशकात आलेल्या बासुदांच्या 'रजनीगंधा'मध्येसुध्दा नायिका दोन पुरुषांच्या तिढ्यात सापडते. त्यांपैकी एक बावळा कारकुंड्या (अमोल पालेकर) तर दुसरा जरा 'इंटुक'टाइपचा (दिनेश ठाकुर) असतो. पीएचडी करणारी, एकटी राहणारी आणि आपले निर्णय कुटुंबावर न सोडता स्वत: घेणारी ही नायिका (विद्या सिन्हा) तेव्हाच्या मध्यमवर्गाला आकर्षित करून गेली. आजच्या मुलींना आपल्या अपोलोनियन आणि डायोनिसिअन आकांक्षांना सामोरं जायला लागतं तेव्हा त्यांचं काय होतं हे रजनीगंधासारख्या वास्तववादी कथेत बांधण्यापेक्षा अशा, म्हणजे फॅन्टसीवर वाढलेल्या हिंदी सिनेमात आता दाखवलं जातंय. सिनेमाचा मुख्य प्रवाह समकालीन वास्तवाला सामोरं जाण्याचा जो अनेक प्रकारे प्रयत्न करतोय त्यातला हा एक छोटासा पण दुर्लक्ष न करता येण्याजोगा भाग म्हणता येईल.

श्रावण मोडक Tue, 16/10/2012 - 18:22

नवरात्राच्या पहिल्याच दिवशी तोरण लावलंत! ;-)
परिचय (परीक्षण म्हणावं की नको या पेचात पडलोय. शंभरावर प्रतिसाद झाले तर म्हणेन...) तुमच्या शैलीत बसतोच.
काही प्रश्न आहेत. पण त्याची उत्तरं काही भावी प्रतिसादातून मिळतील म्हणून वाट पाहतो. :-)

अतिशहाणा Tue, 16/10/2012 - 19:24

'अय्य़ा' लेख रोचक आहे. एक शंकाः पॉर्नोग्राफिक चित्रपटांमध्ये अशा स्वरुपाची स्त्रीप्रतिमा वारंवार दिसते. (किंबहुना बहुतेक पॉर्नोग्राफिक सिनेमांची थीम हीच असते असे निरीक्षण आहे). त्याचे सामाजिक विश्लेषण कोणी करत नाही. मात्र अय्य़ा सारख्या चित्रपटांचे विश्लेषण केले जाते यामागे (मेनस्ट्रीम वगळता) काय कारण असावे. (आजपर्यंतच्या तुमच्या लेखनप्रवासातून तुम्ही मेनस्ट्रीम विरुद्ध इतर असा फारसा फरक केलेला जाणवला नाही.)

मी Tue, 16/10/2012 - 21:40

मदर इंडिया, जेसिका, चिनी कम, फायर, कभी अलविदा ना कहना, क्या कहना मधे असे अनेक स्त्री-मुक्तीचे प्रयत्न झालेच होते, ह्या सिनेमाला वास्तवाचे प्रतिबिंब म्हटल्यावर जत्रेतल्या चित्र-विचित्र प्रतिबिंबे दाखवणार्‍या आरश्यांची आठवण झाली, त्या आरशांनी घटकाभर करमणूक झाली होती खरी.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 17/10/2012 - 03:20

म्हणजे हा ही सिनेमा बघणे आले तर!

'चीनी कम' स्त्रीमुक्तीवादी वाटला नाही; त्यातली नीना वडलांना विरोध करते तेवढंच. पण "मुलगा मुलीपेक्षा मोठा आहे" इ, इ, वाक्य घालून आम्ही फार मोठं परंपराभंजनही करत नाही आहोत असंही सुचवलं आहेच.

मी Wed, 17/10/2012 - 18:50

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ते परेश रावलमुळं, उत्तरार्धामुळे सिनेमाचा पार कचरा होऊन जातो, पण पुर्वार्ध बराच ईंटरेस्टिंग आहे, त्यात दाखवलेली निना ही वास्तवात फारशी आढळत नाही, निना चीनी-कमची मुख्य नायक होती ते तसचं ठेवायला हवं होतं.

नंदन Wed, 17/10/2012 - 01:19

रोचक चर्चा. लोकसत्तेतले परीक्षण वाचून 'गंध' ही चित्रपटातली मुख्य थीम आहे, असं दिसतं. एका अर्थी, सचिन कुंडलकरांच्याच 'गंध' या मराठी चित्रपटाशी याचा संबंध जोडता येईल.

अमुक Wed, 17/10/2012 - 01:31

In reply to by नंदन

या चित्रपटाची 'गंध' ही मध्यवर्ती कल्पना वाटत नाही. (https://www.youtube.com/watch?v=cWC2hQ-rrVg)
पण अनिता दातेचे दन्त्यार्कचित्र अवश्य तिथून उचलले आहे.
तसेच केवळ मुलगी पाहण्याचे प्रसङ्गच नाही तर त्यातले एक जुळे भावण्डही जसेच्या तसे उचलले आहे. असो. मराठी शाळेत जाणार्‍या एका मुलाला उचलून कॉन्वेण्टमध्ये टाकावे असे काहीसे झाले आहे..

ऋषिकेश Wed, 17/10/2012 - 09:09

च्यामारी! हाफीसातल्या 'मासेस'ने अगदी फाल्तु मुव्ही आहे. वेळ वाया गेला अशी प्रतिक्रीया दिली होती. काही 'क्लास' चित्रपट बघणार्‍यांनाही फारसा आवडला नव्हता.. त्यामुळे हा चित्रपट बघायचे रहित केले होते.

आता किमान डाऊन लोडवून बघावा लागेल

अवांतर १:

बाकी येऊ घातलेला करीनाचा 'हिरॉईन' यांच्याभोवती चर्चा फिरत होती.

हिरॉईन केव्हाच येऊन पडला देखील :) (मी तो डाऊनलोडवून बघितला.. अगदीच बेतास बात वाटला)

अवांतर २:
यातील राणीची (पेक्षा मैनाची) प्रतिमा वाचून मागे सरसकटीकरणाच्या उद्वेगातून लिहिलेल्या मी मराठीवरच्या या विडंबनाची आठवण झाली. (मुळ लेखन लेखकाने आपणहून उडवले होते, मात्र पुरुष आणि स्त्रियांची अदलाबदल केली की ते काय असेल याचा अंदाज करता यावा)

अशोक पाटील Wed, 17/10/2012 - 12:06

'परिणीता', 'कहानी', 'इश्किया', डर्टी पिक्चर' तसेच 'नो वन किल्ड जेसिका'.... विद्या बालनने गाजविलेल्या ह्या भूमिका अशा वठल्या की बर्‍याच कालावधीनंतर 'स्त्री' व्यक्तिरेखी केन्द्रस्थानी ठेऊन चित्रपट निर्मिती करण्याचा [एक चांगला] ट्रेन्ड सिनेजगतात पडत चालला आहे. तीन खानांचा तोचतोच दंगा पाहून काहीशा कंटाळलेल्या प्रेक्षकाला 'फीमेल अ‍ॅडव्हेन्चर' ही किती भावू लागले आहे त्याचीच प्रचिती विद्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गल्ल्यावर मिळविलेल्या यशाने सर्वाना आली आहे. 'जब वुई मेट' सारखा हलकाफुलका चित्रपटही हीरोपेक्षा हीरॉईनवर जास्त फोकस टाकत होता, तोही गाजलाच. त्यामुळे सध्या निर्मितीची जी हवा आहे त्याच्या गणितात 'अय्या', 'इंग्लिश-विंग्लिश' 'हीरॉईन' नक्कीच पात्र ठरतात.

'अय्या' चा लेखाजोखा वर चिंजं नी ज्या पद्धतीने घेतला आहे, तो वाचून झाल्यावर त्यानी परिक्षणात कुठेही 'अय्या' ला एक्स्ट्राऑर्डिनरीचे लेबल लावल्याचे दिसून येत नाही, पण सादरीकरण्याची भाषा अशी आहे की वाचक-सदस्याला 'अय्या' ला आता प्रत्यक्ष पडद्यावर पाहावे असे वाटते. [अन्य कित्येक ठिकाणाच्या माध्यमातून 'अय्या....' ला एक चांदणीत गुंडाळण्यात आले आहे.... एफ.एम.बॅण्डवरसुद्धा].

'रजनीगंधा' चा उल्लेख आवडला. सत्तरचे ते दशक 'स्त्री' ला तशाच प्रतिमामधून दाखविण्यात आघाडीवर होते. लेखिका मनू भंडारी यांच्या 'यही सच है' [या कादंबरीवरून 'रजनीगंधा' ची निर्मिती झाली होती] मधील दीपा आणि आजची 'यही सच है' म्हणू पाहाणारी मीनाक्षी हा 'स्त्री' चा प्रवास 'अय्या' मुळे बोल्ड झाला आहे असे म्हणावे लागेल.

चिंतातुर जंतू Wed, 17/10/2012 - 13:52

>>पॉर्नोग्राफिक चित्रपटांमध्ये अशा स्वरुपाची स्त्रीप्रतिमा वारंवार दिसते. (किंबहुना बहुतेक पॉर्नोग्राफिक सिनेमांची थीम हीच असते असे निरीक्षण आहे). त्याचे सामाजिक विश्लेषण कोणी करत नाही. मात्र अय्य़ा सारख्या चित्रपटांचे विश्लेषण केले जाते यामागे (मेनस्ट्रीम वगळता) काय कारण असावे. (आजपर्यंतच्या तुमच्या लेखनप्रवासातून तुम्ही मेनस्ट्रीम विरुद्ध इतर असा फारसा फरक केलेला जाणवला नाही.)

इथे 'अशा स्वरूपाची' म्हणताना 'पुरुषाविषयीच्या शारीर आकर्षणाला सामोरं जाणारी' असं तुम्हाला अभिप्रेत असावं असं मी गृहित धरतोय. (ते तसं नसेल तर तुम्हाला काय अभिप्रेत आहे ते कृपया स्पष्ट करा.) पॉर्नोग्राफीचं सामाजिक-राजकीय-मानसशास्त्रीय अंगानं विश्लेषण केलं जातं आणि त्यात काही गैर नाही. त्यात स्त्री जेव्हा शरीरसंबंधांमध्ये रस किंवा पुढाकार घेताना दाखवली जाते ते 'चवचाल स्त्री' ह्या पुरुषांच्या फॅन्टसीचा तो एक भाग असतो म्हणून. म्हणजे 'तंग किंवा तोकडे कपडे घालणारी स्त्री चवचाल असते' किंवा 'पबमध्ये जाणारी स्त्री चवचाल असते' असं म्हणणारे पुरुष एक प्रकारे त्या स्त्रीच्या 'अव्हेलेबल' असण्याची फॅन्टसी मनोमन करत 'चांगल्या घरातल्या स्त्रिया (पक्षी : माझी आई-बहीण-बायको) असं वागत नाहीत, पण अशी चवचाल स्त्री तर माझ्यासारख्या (पक्षी : भुक्कड आणि सर्वसामान्य) पुरुषाशीसुध्दा बिनधास्त शरीरसंबंध ठेवेल आणि मग किती मजा येईल' अशी स्वतःची समजूत घालत असतो असं काहीसं मानसशास्त्रीय विश्लेषण करता येईल असं वाटतं. म्हणजे पुन्हा तिथे स्त्रीच 'सेक्स ऑब्जेक्ट' असते. 'अय्या' हे उलटं करतो, त्यामुळे तिथे स्त्री 'सेक्स ऑब्जेक्ट' किंवा चवचाल नाही हा एक मोठा फरक झाला. पण म्हणजे प्रत्येक पुरुष 'अव्हेलेबल' असतो असंही तो म्हणत नाही. किंबहुना सुबोध भावे लग्नाला तयार असतो तो चवचाल नाही म्हणूनच, आणि पृथ्विराज तर नायिकेकडे ढुंकूनदेखील पाहात नाही. याउलट पुरुषाच्या शरीराविषयी आकर्षण असणाऱ्या मीनाक्षी किंवा मैनाच्या व्यक्तिरेखा पुरुषांच्या निवडीत अतिशय चोखंदळ असतात. त्यामुळे चवचाल तर त्यादेखील नाहीत.

लोकसत्तेतलं परीक्षण वाचलं. मैनेचं कथानकाशी काय नातं आहे हे लेखकाला समजलेलं नाही. मैनेच्या पोशाखाच्या संदर्भचौकटीचा त्याला काही उलगडा झालेला दिसत नाही. (खरं तर पुणेरी पगडीतल्या नानाचं धोतर फेडणारी मैना पाहून तरी ते लक्षात यायला हरकत नव्हती, पण असो.*) त्यामुळे 'चित्रविचित्र व भडक पोषाख परिधान करणारी' एवढं म्हणून तो त्याची बोळवण करतो. गाणी भडक रंगात, भडक पद्धतीने चित्रित केल्यामुळे ती त्याला अश्लीलतेकडे झुकणारी वाटतात. 'सबव्हर्जन'चा मुद्दाच त्याच्यापर्यंत पोचलेला नाही हे त्यातून लक्षात येतं. त्यामुळे मग 'भडकपणा, बटबटीतपणा अंगावर येतो' ही त्याची प्रतिक्रिया का आणि कशी आली ते समजू शकतं.

* - पुणेरी पगडीतला 'नाना' नावाचा तरुण सिनेमात सतीश आळेकरांचा सुपुत्र असतो हे पाहून 'महानिर्वाण'ची आठवण व्हावी ही अपेक्षा जास्त आहे, हे मात्र मला मान्य आहे! ;-)

रोचना Wed, 17/10/2012 - 15:16

मी सिनेमा पाहिला नाही. पाहिल्यावर विस्तृत प्रतिसाद देईन. पण जाता जाता - कुठलीही वरवर स्त्री-केंद्रित गोष्ट किंवा भूमिका असली की ही स्त्रीवादी आहे का, पारंपारिक प्रतिमा बदलणारी आहे का, ही चर्चा देखील आजकाल त्या सिनेमाच्या मार्केटिंगचा भागच झाली आहे. प्रस्तुत लेखात उल्लेखिलेल्या चर्चासत्राचे उदाहरण आहेच. आदीमाया किंवा स्त्रीशक्ती वगैरे राहू द्या, पण सामान्य स्त्रीने मोक्याच्या क्षणी धारण केलेले विलक्षण रूप हेही जुने पात्र आहे. म्हणजे त्याला देखील चांगले कमर्शियल यश लाभले आहे, मग ते दामिनी असो वा कहानी. लैंगिक स्वातंत्र्य, किंवा शारीर अनुभवांबद्दल उघड उघड विचार करणार्‍या, बोलणार्‍या नायिकेलाही असेच यश लाभते आहे का?

म्हणजे या ट्रेंड चा सामान्य स्त्रीच्या अधिकारांशी, किंवा स्त्रीवादाशी कितपत नाते सांगता येईल या बद्दल मला थोडी शंका आहे. कारण फॉर्म्युलीकरण कशाचे ही करून त्याला बोथट आणि थट्टेस पात्र करता येते. उदा. समलैंगिकतेचा उल्लेख हिंदी सिनेमांत गेल्या दशकात अचानक वाढला आहे. पण यामुळे समलैंगिकतेची प्रतिमा 'सुधारक' झाली आहे, किंवा समलैंगिकतेबद्दल च्या बदलत्या सामाजिक विचारांची चाहूल लागते असं नक्कीच नाही. समलैंगिकतेच्या प्रतिमेसारखेच या 'बोल्ड' स्त्रीप्रतिमा ही एक प्रकारची सेक्स ऑब्जेक्टच ठरू शकते; 'टिटिलेशन' चा भाग होऊ शकते. कारण त्यांच्या 'बोल्ड'पणाचा सब्वर्सिव म्हणून बोलबाला होतो, पण तो फक्त स्टीरियोटाइप वरच आधारित असतो.

या पेक्षा वेगळे स्त्री पात्र घडविण्यात खरोखर काही नवीन प्रयत्न ऐया चित्रपटात केले गेले आहेत का हे पाहण्यास उत्सुक आहे.

थोडक्यात, पुरुषी वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या स्त्रियांचं वाटोळं होतं; किंबहुना हेच त्यांचं भागधेय असतं असं ह्या सर्व सिनेमांचं म्हणणं दिसतं.

थोडे अवांतर, पण शारिरिक गरजांबद्दल बिनधास्त असलेल्या स्त्री पात्रांमुळे गाजलेल्या 'सेक्स अँड द सिटी' बद्दलही असाच काहीसा आरोप करणारा लेख.

चिंतातुर जंतू Thu, 18/10/2012 - 17:54

>>आदीमाया किंवा स्त्रीशक्ती वगैरे राहू द्या, पण सामान्य स्त्रीने मोक्याच्या क्षणी धारण केलेले विलक्षण रूप हेही जुने पात्र आहे. म्हणजे त्याला देखील चांगले कमर्शियल यश लाभले आहे, मग ते दामिनी असो वा कहानी. लैंगिक स्वातंत्र्य, किंवा शारीर अनुभवांबद्दल उघड उघड विचार करणार्‍या, बोलणार्‍या नायिकेलाही असेच यश लाभते आहे का?

कमर्शियल यश लाभतं आहे असं दिसत नाही.

>>म्हणजे या ट्रेंड चा सामान्य स्त्रीच्या अधिकारांशी, किंवा स्त्रीवादाशी कितपत नाते सांगता येईल या बद्दल मला थोडी शंका आहे. कारण फॉर्म्युलीकरण कशाचे ही करून त्याला बोथट आणि थट्टेस पात्र करता येते.

कशाचाही फॉर्म्युला किंवा क्लीशे करण्यात हिंदी सिनेमासृष्टी वाकबगार आहे हे खरंच आहे. पण प्रत्यक्ष जगात पुरुषी वर्चस्वाला वेगवेगळ्या पध्दतीनं आव्हान देत आपलं भविष्य ठरवू पाहत असलेल्या मुलींना जे सहन करावं लागतं त्यात आता स्त्रियांच्या लैंगिक सक्षमीकरणामुळे भर पडताना दिसते आहे हेदेखील खरंच आहे. समलैंगिकांच्या बाबतीत आणि ह्या बाबतीत असंही म्हणता येईल की पब्लिक डिसकोर्सचा भाग बनू लागत असलेली गोष्ट हिंदी सिनेमात येणं हे दखलपात्र आहे.

>>या 'बोल्ड' स्त्रीप्रतिमा ही एक प्रकारची सेक्स ऑब्जेक्टच ठरू शकते; 'टिटिलेशन' चा भाग होऊ शकते. कारण त्यांच्या 'बोल्ड'पणाचा सब्वर्सिव म्हणून बोलबाला होतो, पण तो फक्त स्टीरियोटाइप वरच आधारित असतो.

ह्यासाठी मैना दखलपात्र आहे. तिला मुद्दाम दात पुढे आलेली आणि एकंदर अनाकर्षक बनवलेलं आहे. तिचं माकड आणि तिचा चेहरा यांत कमालीचं साम्य आहे. (त्यामुळे काही परीक्षणांत परीक्षकाला तिचा त्रास झालेला जाणवतो.) हिंदी सिनेमातली व्हॅम्प चांगलीच 'टिटिलेट' करत असे. ही तसं करत नाही.

सहज Sun, 21/10/2012 - 18:47

काही वर्षांपूर्वी डॉ रॉबर्ट विन्स्टन यांनी एका माहीतीपटात गंध , फेरोनोम्स, आकर्षण याचा संबध सांगीतला होता.

तरीही घाण हायजिन असलेल्या सुर्याचे व बहुदा अगरबत्यांचे आकर्षण मिनाक्षीला असण्यामागे तिच्या घरासमोरच्या कचराकुंडीचा मोठा वाटा असावा असे सकृतदर्शनी वाटते.

१९५५ मधे गुरुदत्त बरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला तयार असणारी मधुबाला, प्रेमाचा, लग्नाचा स्वताचा निर्णय घ्यायला घरच्यांशी,समाजाशी संघर्ष करायला तयार असणार्‍या शेकडो मेन्स्ट्रीम प्रेमकहाण्यातल्या हिरोइनी (आठवा: तुम्हारी शादी वही होगी जहा हम कहेंगे| नही पिताजी, मै जान दे दुंगी पर ....), तुमच्या गुलजारच्या इजाजत मधे मुलाकरता लग्नाचा झमेला कशाला पाहीजे म्हणणारी माया, अमोल पालेकरांचा अनाहत, अशी अनेक प्रतिमा भेदणारी स्त्री पात्रे गेले अनेक दशके दिसतात. उलट सिनेमे पाहून लहान मुले, तरुण मुली बिघडतात म्हणुन पुरुषप्रधान संस्कृतीत त्यांना हिंदी सिनेमे पहायला बंदी असते कित्येक घरातुन असेही ऐकले, वाचले आहे. त्याकरता अय्याचा एवढा उदोउदो उदाहरण कशाला असा प्रश्न पडतो. बहुदा (लग्नसंस्था विरोधी लोकांकडून आधीक प्रमाणात "आपली सोय" व्हावी म्हणून) महीला लैंगीक सबलीकरणाची जोमाने नवमोहीम सुरु झाली असावी की काय?

शिवाय हे 'अय्या'चं एका विशिष्ट अंगानं केलेलं सामाजिक विश्लेषण आहे; ती सिनेमाची समीक्षा नाही. त्यामुळे सिनेमा चांगला की वाईट, जमलेला की फसलेला याच्याशी इथे काही देणंघेणं नाही.
हा हा यातच सगळ आलं.

सोपी गोष्ट आहे आर्थीक सबलीकरण व निर्णय स्वातंत्र्य लाभलेल्या कोणत्याही स्त्रीला निर्णय घेणे तुलनेत सोपे असते बाकी सगळे समाज नावाची गुंतागुंत, ज्याची त्याची जाण वगैरे वगैरे....

चिंतातुर जंतू Mon, 22/10/2012 - 11:35

>>बहुदा (लग्नसंस्था विरोधी लोकांकडून आधीक प्रमाणात "आपली सोय" व्हावी म्हणून) महीला लैंगीक सबलीकरणाची जोमाने नवमोहीम सुरु झाली असावी की काय?

हा हा हा. कॉन्स्पिरसी थियरी रोचक आहे.

>>तुमच्या गुलजारच्या इजाजत मधे मुलाकरता लग्नाचा झमेला कशाला पाहीजे म्हणणारी माया, अमोल पालेकरांचा अनाहत, अशी अनेक प्रतिमा भेदणारी स्त्री पात्रे गेले अनेक दशके दिसतात.

'साहिब,बीबी और गुलाम' किंवा श्याम बेनेगलचा ज्या संदर्भात मी उल्लेख केला होता त्याच संदर्भानुसार हे म्हणता येईल की हे सिनेमे मुख्य प्रवाहातले नाहीत.

>>प्रेमाचा, लग्नाचा स्वताचा निर्णय घ्यायला घरच्यांशी,समाजाशी संघर्ष करायला तयार असणार्‍या शेकडो मेन्स्ट्रीम प्रेमकहाण्यातल्या हिरोइनी

ते प्रेम उदात्त वगैरे असायचं, अन् हे शारीर आहे. 'अय्या'बद्दल वृत्तपत्रात जे लिहून आलेलं आहे त्यात अनेकांना त्यामुळे ते बीभत्स वगैरे वाटलेलं आहे. म्हणजे ह्या प्रेमाला निव्वळ सिनेमातल्या 'जालिम जमान्याचा' विरोध नाही, तर प्रत्यक्षातल्या समाजाचासुध्दा विरोध दिसतो.

>>सोपी गोष्ट आहे आर्थीक सबलीकरण व निर्णय स्वातंत्र्य लाभलेल्या कोणत्याही स्त्रीला निर्णय घेणे तुलनेत सोपे असते

तो प्रश्न नाही. स्त्रीच्या शारीर स्वातंत्र्याकडे स्वच्छ नजरेनं पाहायला समाज अजूनही तयार नाही हा प्रश्न आहे.

सहज Mon, 22/10/2012 - 12:24

In reply to by चिंतातुर जंतू

>>हा हा हा. कॉन्स्पिरसी थियरी रोचक आहे.
:-) धन्यवाद.

>>हे सिनेमे मुख्य प्रवाहातले नाहीत.
शोधले तर अनेक सापडतील जे तुमच्या निकषात बसतील पण शोधायचे श्रम कोण घेणार? "आकर्षण वाटणे" व पळून जाउन लग्न करणे अथवा फसवले जाणे हे खर्‍या जगात अनंत वेळा घडले आहे तसेच हिंदी सिनेमाच्या उगमापासुन.

>>ते प्रेम उदात्त वगैरे असायचं, अन् हे शारीर आहे.

असहमत आहे. दिसणे, वागणे हा एक महत्वाचा निकष असतोच. फक्त १००% शारीर असते तर तिने लग्न वगैरे नको फक्त मला पाहीजे तेव्हा, तसे संबध ठेव इतकेच केले असते पण मीनाक्षीला देखील सगळे इतरांप्रमाणेच हवे असते,(आखुडशिंगी, बहुगुणी, अमुक तमुक सगळे हवे असते दोन्ही बाजुंना. लग्नाला वधूवर सूचक मधे नाव नोंदवतात्/जाहीरती असतात त्यात अपेक्षा रकान्यात लिहलेले वाचले असेलच.) जगावेगळे काही केले नाही आहे तिने. सुर्याच्या (अथवा मेन्स्ट्रीम मधल्या रिस्पेक्टीव्ह नायकाच्या )जागी घामट, थोराड, बटबटीत, उतारवयीन, पाताळविजयम मधला राक्षस शोभेल असा कोणी असता तर ते प्रेम १००% उदात्त अथवा १००% शारीर म्हणता आले असते. बाकी वासाचा शास्त्रीय संबध वरच्या फितीत दिसला असेल. फेरोमोन्सचे महत्व मान्य आहे.

बादवे मीनाक्षी ऐवजी नाना असाच उठसूट वास घेत, रस्त्याने शोधत शोधत कोण्या मुलीच्या घरी जाउन तिची वस्त्रे पळवून नेतो, काही दिवस घालून बघतो, आवडली तरच तिला तसे सांगून प्रपोज करतो, अजुन अशीच परोक्ष-अपरोक्ष पारख करतो, असे दाखवले असते तर त्याचा उदो उदो झाला असता का? त्याच्या शारीर स्वातंत्र्याकडे स्वच्छ नजरेनं पाहायला समाज अजूनही तयार नाही हा प्रश्न इतक्याच हिरीरीने उपस्थित केला गेला असता का? सध्या समाज पुरषाच्या बाजुने तसे बघतो/ स्वातंत्र्य देतो असे म्हणणे आहे का?

असो समाजाला उठसूट इतकीही नावे ठेवायची नाहीत बॉ!!

चिंतातुर जंतू Mon, 22/10/2012 - 13:55

>>दिसणे, वागणे हा एक महत्वाचा निकष असतोच.

मुख्य प्रवाहातल्या हिंदी सिनेमांत नायक-नायिका दिसायला चिकणेचोपडे असतात, पण 'तुझे दाढीचे खुंट मला आवडतात' किंवा 'तुझी केसाळ छाती मला आवडते' असं म्हणत नायिकेनं पुरुषशरीराविषयीच्या आपल्या भावना जाहीर करणं हे हिंदी सिनेमाच्या परंपरेत फारसं बसत नाही. त्याउलट नायकानं नायिकेच्या सौंदर्याचं स्तुतिपर वर्णन करणं हे बसतं.

सहज Mon, 22/10/2012 - 15:07

In reply to by चिंतातुर जंतू

सरळ सरळ सांगा ना की तुम्ही हिंदी सिनेमे फारसे पाहीले नाहीत. अहो फोकस ग्रुपने दाढीचे खुंट व छातीचे केस आवडत नाहीत असा विदा दिला असतात तर तुमचे अमिताभ, शत्रुघ्न, विनोद मेहरा व खन्ना दोन्ही, धर्मेंद, मग तुमचे सनी, अनिल, संजय, अक्षय [आठवा सुरवातीचा काळ] केसाळ छाती दाखवली नसती, बच्चनांचा अभिषेक व अनेक तामीळ अभिनेते स्ट्बल न ठेवणारे असते. १९७२ मधे आलेला आखो आखो मे सिनेमातले गाणे , जया-संजीवकुमारचे बाहोंमे चले आओ गाणे काय आहे? ज्युली सिनेमामधे काय झाले असते? त्रिशुल मधे अमिताभ बिन्ब्याही वहिदाच्या पोटी ऑपॉप आला नसतो. ह्यातल्या कोणत्याच नायीकेच्या मनाविरुद्ध काही घडले नसते. मीनाक्षी जे संवाद बोलून दाखवते ते काय चार चौघात, आई वडलांपुढे नाही. असो. तुम्ही युरोपातलेच विदे तपसता म्हणून हा एक दुवा बघा, महिलांना माफक खुंट व केसाळ छाती पहील्यापासून आवडते.

आता बहुतेक हिरॉइनचे हिरोबद्दलचे शारीर आकर्षणाचे, फार उघड उघड शब्दात संवाद प्रत्येक सिनेमात हवेच आहेत अन्यथा समाज मोकळ्या नजरेचा नाहीच असेच काहीसे निष्कर्ष पक्के केले गेल्यासारखे वाटत आहे.

सध्या हिरो मंडळी अंगावरचे केस वॅक्स करतात ते बहुदा वेगळ्या फोकस ग्रुप कडून आलेल्या मागणीमुळे, फॅशनमुळे अथवा ह्या हिरोंचे छातीवरचेही केस गळले, पांढरे झाले, शरीराचा शेप हवा तसा न दिसणे इ इ कारणाने कमी झाले असावे.

अजुन एक मुद्दा मिडनाईट मसाला कार्यक्रम बघताना जे गाणे दाखवले त्यात बहुतेक चिरंजीवी पूर्ण पोशाखात व हीरॉइन कमी पोशाखात असते. पण अय्या मधे जी काही गाणी आहेत त्यात राणी मुखर्जी काही पूर्ण पोशाखात व फक्त सुर्या कमीत कमी वेशात नाही त्यामुळे अन्य मसाला चित्रपटांप्रमाणे इथेही हिरोईनला प्रदर्शनीय वस्तु स्वरुपात दाखवले गेले आहेच त्यामुळे असा काही हटके बिटके प्रकार नाही आहे. जर त्या दोन तीन गाण्यात तसे दाखवले गेले असते तर मानले असते. असो थोडक्यात कुंडलकर यांनी पैसे घेउन मागणी प्रमाणे निर्मात्याला प्रॉडक्ट बनवून दिले आहे, सृजन कलाकृती वगैरे काही नाही. जितका गंध बरा वाटला त्या तुलनेत अय्या फारच निराशाजनक आहे.

चिंतातुर जंतू Mon, 22/10/2012 - 15:02

>>फोकस ग्रुपने दाढीचे खुंट व छातीचे केस आवडत नाहीत असा विदा दिला असतात तर तुमचे अमिताभ, शत्रुघ्न, विनोद मेहरा व खन्ना दोन्ही, धर्मेंद, मग तुमचे सनी, अनिल, संजय, अक्षय [आठवा सुरवातीचा काळ] केसाळ छाती दाखवली नसती

>>ह्यातल्या कोणत्याच नायीकेच्या मनाविरुद्ध काही घडले नसते.

काहीतरी समजुतीचा गोंधळ होतोय. हीरोची केसाळ किंवा वॅक्स केलेली छाती दिसणं हे विशेष नाही. आणि पावसात भिजल्यानंतर 'रूप तेरा मस्ताना...' म्हणणारा नायक नायिकेच्या मनाविरुध्द काही करत नसतोच. मुद्दा असा आहे की यात 'भूल कोई हमसे न हो जाए' वगैरे म्हणत आपण कसे परिस्थितीचे/मोहाचे बळी होतो असं म्हणून उगीचच निरागसपणाचा आव आणला जायचा. गरोदर राहिल्यानं आणि त्याचे वाईट परिणाम भोगायला लागल्यानं नायिकेवर 'माती खाल्ल्याचा' थर आणखीच घट्ट बसायचा. त्या सर्वापेक्षा ह्या आजच्या 'सबल' महिला वेगळ्या आहेत. असो.

सहज Mon, 22/10/2012 - 15:57

In reply to by चिंतातुर जंतू

>>त्या सर्वापेक्षा ह्या आजच्या 'सबल' महिला वेगळ्या आहेत.

एक म्हणजे तुलना बरोबर नाही, जर सुर्याबरोबर तसे काही घडून पुढे आणीबाणीची स्थिती आली असता मिनाक्षीने काय पवित्रा घेतला असता हे कळायला वाव नाही. ती फुल गोंधळेली, निर्णय क्षमता कमजोर आहे. एकदाही तिचे समर्थ व्यक्तीमत्व पुढे आले नाही जसे लेडीज वि रिकी बहल मधल्या स्त्री व्यक्तीरेखांचे येते. त्रिशुल मधे वहिदा रेहमान अमिताभला स्वता वाढवतेच.

अय्या बोगस प्रकरण आहे. त्यापेक्षा हमतुम मधली राणी, बॅड बाजा बारात मधली अनुष्का म्हणते की जस्ट बिकॉज काल रात्री काय घडले म्हणुन तु लग्न केले पाहीजेच (मनापासुन प्रेम असणे व म्हणून लग्न करावेसे वाटते तर कर नाही तर नको) असे नाही. हे सबल प्रकरण....
(च्यायला किती उदाहरणे चोप्रा कॅम्पमधील सिनेमांची! थोडक्यात "कमर्शीयल" सिनेमावाल्या चोप्रांना जी पटकथा, व्यक्तीरेखा बनवण्याची जाण आहे ती सो कॉल्ड "आपल्या" कुंडलकरांमधे नाही. अरेरे अरेरे "आपला माणूस" परभाषी बाहेरच्या इसमांपेक्षा प्रतिभावान हवा नाही का? अरेरे अरेरे)

असेच संवाद म्हणले पाहीजे, असेच सीन दाखवले पाहीजे तरच स्त्री सबलीकरण हा आग्रह अनाकलनीय आहे.

चिंतातुर जंतू Mon, 22/10/2012 - 16:10

>>असेच संवाद म्हणले पाहीजे, असेच सीन दाखवले पाहीजे तरच स्त्री सबलीकरण हा आग्रह अनाकलनीय आहे.

असा आग्रह कोण धरतंय? मी तरी धरलेला नाही. हिंदी सिनेमात एरवी दिसतं त्यापेक्षा हे सबलीकरण वेगळं आहे एवढाच मुद्दा आहे. तरीही त्याचा एवढा त्रास होतो आहे हेदेखील रोचक म्हणायला हवं.

सहज Mon, 22/10/2012 - 16:29

In reply to by चिंतातुर जंतू

मुद्दा हा आहे की हिंदी सिनेमात एरवीही सबल स्त्री व्यक्तीरेखा बर्‍याच काळापासुन दिसायच्याच, त्याकडे दुर्लक्ष करुन अमुक धाटणीच्याच काय त्या सबल अन्यथा आव आणण्यार्‍या, जुनाट परंपरांच्या हे विश्लेषण काही पटत नाही.
ज्या जुनाट परंपरावाल्या वाटतात त्या व्यक्तिरेखा बहुदा परावलंबी असायच्या त्यामुळे ते अबल प्रकरण वाटायचे.
अय्या हे उदाहरण म्हणुन पटत नाही. शिवाय तुमच्यामुळे (हो ०.०१% तुमचा दोष व ९९.९९% आमचा) आम्हाला अय्यासारखा बोगस सिनेमा बघायला भाग पाडलत तो सात्वीक संताप व्यक्त नको व्हायला. :-P असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 22/10/2012 - 20:52

In reply to by सहज

त्याकडे दुर्लक्ष करुन अमुक धाटणीच्याच काय त्या सबल अन्यथा आव आणण्यार्‍या, जुनाट परंपरांच्या हे विश्लेषण काही पटत नाही.

हे असं काही मला तरी नाही दिसलं (धाग्यात).

उगाच वरची टेबलटेनिसची म्याच वाचण्यात वेळ गेला. (०.०१% दोष माझा, उरलेला कोणाचा ते ज्याने त्याने ठरवा.)

अतिशहाणा Mon, 22/10/2012 - 20:51

चित्रपटाचे ट्रेलर्स आणि गाणी बरी वाटली होती. वेकप्पम जबराच :D. चित्रपट मात्र फारच रटाळ-संथ वाटला. राणी मुखर्जीची पृथ्वीप्रदक्षिणा किती वेळा दाखवावी याला काही सुमार? किमान 30 मिनिटे ती पृथ्वीच्या शोधात (बोअरिंग ब्याकग्राऊंड स्कोरच्या साथीने) फिरताना दाखवली आहे. तिच्या आजीचे पात्र फार्सिकलऐवजी हिडीस वाटले. संकलन चांगले केले असते तर चित्रपट जरा चटपटीत करता आला असता. 'गंध' मधील 'लग्नाच्या वयाची मुलगी' वा तत्सम तासाभराच्या कथेचे पाणी घालून कितीही प्रसरण केले तरी ते पांचटच होणार.

अनामिक Mon, 22/10/2012 - 21:13

'ताणलं की तुटतं' ह्या म्हणीची प्रचिती आपल्याला अय्या पाहून व्हायला हवी. मूळ गंध चित्रपटातल्या एका लघुकथेवर बेतलेला अय्या हा अगदीच फालतू चित्रपट आहे असं माझं स्पष्टं मत आहे. ह्या चित्रपटात दखल घेण्याजोगं काय आहे हे मलातरी अनाकलनीय आहे. गंध चित्रपटातली पहिली कथा बघताना 'गंध' ह्या थीमवर आधारीत एक प्रेमकथा बघण्याचा अनुभवतरी येतो. अय्यामधे हे काहीच होत नाही. नायिकेला नायकाच्या अंगी येणार्‍या वासावरून ती त्याच्या प्रेमात पडावी असे वाटावे तोच दुसरीकडे ती मला साऊथइंडियन लोक पसंत आहेत ते बोलून जाते. मग त्याच्याबद्दल असलेलं तिचं शारीर प्रेम/आकर्षण खरं की त्याच्या अंगी येणार्‍या वासावरून त्याच्या प्रेमात पडणं खरं? दोन्ही दाखवताना चित्रपटाचा मूळ पाया (गंध) हरवून जातो. हे त्या दिग्दर्शकाच्या ध्यानी येतं, चित्रपट फसला आता तो बघायला कुणी काळं कुत्रंही येणार नाही अस वाटून त्याची झोप उडते. मग त्याला किंवा निर्मात्याला एक युक्ती सुचते (मार्केटिंग स्ट्रॅटजी हो!). ती युक्ती 'ड्रिमम्म वेक्कपम्म' आणि 'अगं बाई हल्ला मचाये रे' ह्या गाण्यामधून आपल्या समोर येते. नायिका बोल्ड तर असतेच पण आता ती सबलाही झाली हे आपण ह्याची देही ह्याची डोळा बघतो.

ऋषिकेश Tue, 04/12/2012 - 13:46

विकांताला (एकदाचा) हा चित्रपट पाहिला.. टाकाऊ वाटला नाही.
स्त्रीची प्रतिमा उलटी केली आहे हे ही पटले मात्र हा ट्रेन्ड सेट होईल असे वाटत नाही (तसा कोणाचा दावाही नाही म्हणा).

**हिंदी मेनस्ट्रीम चित्रपटांचा विचार केला तर मला या चित्रपटातिल प्रणयासाठी वापरलेले संकेतही फ्रेश वाटले. तीच ती दोन थरथरती फुले, उतू गेलेले दुध पासून थेट उघड्या पाठींवर फिरणारी बोटे, किंवा गुंतलेले पाय अशी दोन्ही टोके टाळून बाईकच्या टाकीत पेट्रोल भरणे निश्चितच नाविन्यपूर्ण आहे ;)

बॅटमॅन Tue, 04/12/2012 - 14:09

In reply to by ऋषिकेश

अवांतराचा ढिस्क्लेमर आदीच टाकून ठिवतो, नंतरनं मग किरकिर नगं.

पेट्रोलपूरणसंकेताबद्दल सांगायचे म्हंजे हालिवुडात नेकेड गन नामक तद्दन विनोदी पिच्चर आहे, त्यात्ला शीन तं याचा बाप हाये. पर्वत-खनित-बोगदा-प्रवेश-बाय-रेल्वे हाय त्यात ;)

ॲमी Sun, 09/12/2012 - 19:16

हा लेख, प्रतिसाद वाचल्यामुळे असेल कदाचीत, पण मला चित्रपट आवडला.
अधुनमधुन लाउड, स्लो होतो. २ तासात संपेल असं संकलन करायला हवं होतं. सुबोध भावे ने फार हसवलं.