कित्येक शतके लुप्त झालेला प्राचीन हिंदु पद्धतीमधील राज्याभिषेक समारंभ शिवाजीमहाराजांनी पुनरुज्जीवित केला आणि परकीय मूळ असलेल्या राजकीय वर्चस्वाला आह्वान दिले. सांस्कृतिक पातळीवर असेच करण्यासाठी परक्या शासकांबरोबर आलेल्या फारसी-उर्दू भाषांचे मराठीवरील आक्रमण थांबवून पुन: ह्या देशातील मूळच्या अशा मराठी भाषेला राज्यकारभारात योग्य स्थान देण्याचे त्यांनी ठरविले.
राज्याभिषेककालापर्यंत खरोखरच येथील जनतेची स्वत:ची मराठी भाषा फारसी-उर्दूच्या आक्रमणाखाली गुदमरून गेल्यासारखी दिसत होती. १४व्या शतकाच्या प्रारंभाला देवगिरीचे यादवांचे राज्य नष्ट झाले आणि खिलजी सल्तनतीचे अंमल सुरू झाला. शासक आपली भाषाहि आपल्याबरोबर आणतो ह्या नियमास धरून फरसी-अरबी शब्दांचे मराठीवरील आक्रमण तेव्हापासून सुरू झाले. १७व्या शतकापर्यंत प्रामुख्याने गद्य लेखनामध्ये हे आक्रमण जाणवण्या-खुपण्याइतपत वाढले होते. पद्य लेखनामध्ये ते त्यामानाने कमी दृग्गोचर होते कारण तत्कालीन पद्यलेखन हे सर्व धार्मिक-आध्यात्मिक स्वरूपाचे असल्याने त्याची परंपरा ही प्राचीन भारतीय दर्शने, पुराणे आणि रामायण-महाभारतासारख्या काव्यामधून आलेली होती. गद्य लेखन हे सरकारी कामकाज, महसूल गोळा करणे अशा हेतूने होत असल्याने शासकांच्या भाषेचा प्रभाव तेथे अधिक लक्षात येण्याजोगा होता. हा परकीय प्रभाव पुढील दोन उतार्यांच्या तुलनेतून स्पष्ट दिसतो. पहिला उतारा महानुभावांच्या ’लीळाचरित्र’ ह्या ग्रन्थातून घेतला आहे. ह्याचा काल १३व्या शतकाचा मध्य.
दुसरा उतारा इ.स. १७०० च्या पुढेमागे परशुरामपंत प्रतिनिधीने गोव्याच्या ’विजरई’ ला -Viceroy - पाठविलेल्या एका पत्रामधून घेतला आहे. पत्रामध्ये गोवेकरांच्या एका वर्तणुकीबद्दल नापसंती दर्शविली आहे. उतार्यातील वाक्यरचना आणि विभक्तिप्रत्यय वगळता येथे मराठी अभावानेच दिसते आहे.
ही परिस्थिति बदलण्यासाठी आणि मराठीला तिचे नैसर्गिक स्वरूप मिळवून देण्यासाठी आणि राज्यकारभारातील फारसीचा अतोनात प्रसार ताब्यात आणण्याच्या दृष्टीने पाऊल म्हणून शिवाजीराजांनी आपला दक्षिण प्रान्तातील अधिकारी आणि तंजावरनिवासी रघुनाथ नारायण हणमंते ह्यांना फारसीच्या जागी देशी शब्द सुचविणारा ’राज्यव्यवहारकोश’ रचण्यास सांगितले. लगोलग कामाला लागून रघुनाथपंतांनी असा कोश रचून तो राजापुढे १६७८ च्या सुमारास सादर केला . ह्या साठी संस्कृत भाषेचा आधार घेण्यात आला आणि फारसी शब्दांच्या जागी समानार्थी संस्कृत शब्द सुचविण्यात आले.
१७व्या शतकात राजाचे कुटुंब, राज्यकारभार कसा चालत असे, राजसभेमध्ये शिष्टाचार कसा असे, राज्यातील शासकीय आणि सैनिकी अधिकारी कोण होते येथेपासून सुरुवात करून वापरातील शस्त्रे, अंगावरचे दागिने, राज्याचा अर्थव्यवहार, महसूल आकारणी, नाणी, व्यापार-उदीम, कापडचोपड आणि कपडे, मादक पेये, धूम्रपान, तांबूलद्रव्ये, सुगंधी तेले अशा आर्थिक आणि सामाजिक विचाराच्या दृष्टीने मनोरंजक आणि उद्बोधक वाटतील अशा वस्तूंचे उल्लेख येथे मूळ फारसी/उर्दू शब्द आणि त्यांच्यासाठी सुचविलेला संस्कृत शब्द ह्या मार्गाने मिळतात. असे सुमारे १३८० शब्द १० गटांमध्ये - अमरकोशाची भाषा उचलून त्यांना ’वर्ग’ असे नाव दिले आहे- आपणास येथे दिसतात.
ह्या कोशाच्या एकमेकापासून कमीअधिक प्रमाणात भिन्न अशा अनेक प्रती महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मिळाल्या आहेत. त्यापैकी कोल्हापूरहून का.ना. साने ह्यांनी मिळालेली प्रत १९२५ साली भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रकाशित केलेल्या ’शिवचरित्रप्रदीप’ ह्या ग्रंथामध्ये छापलेली आहे. ह्या प्रतीचे वैशिष्टय असे की मुख्य कोशापलीकडे तिच्यामध्ये ८४ संस्कृत श्लोकांचा उपोद्घात आणि अखेरीस ५ श्लोकांचा उपसंहार आहे, जो अन्य प्रतींमध्ये नाही. उपसंहारामध्ये कोशाच्या निर्मितीविषयी अधिक माहिती आहे. पुढील लेखन ह्या प्रतीवर आधारलेले आहे.
कोशातच अनेक ठिकाणी म्हटल्याप्रमाणे त्याची निर्मिति ही रघुनाथपंतांनी केली आहे. उपोद्घातामध्ये पुढील श्लोक दिसतात.
कृते म्लेच्छोच्छेदे भुवि निरवशेषं रविकुला-
वतंसेनात्यर्थं यवनवचनैर्लुप्तसरणीम्।
नृपव्याहारार्थं स तु विबुधभाषां वितनितुम्।
नियुक्तोऽभूद्विद्वान्नृपवर शिवच्छत्रपतिना ॥८१॥
सोऽयं शिवच्छत्रपतेरनुज्ञां मूर्धाभिषिक्तस्य निधाय मूर्ध्नि।
अमात्यवर्यो रघुनाथनामा करोति राज्यव्यवहारकोशम् ॥८२॥
सूर्यवंशाचा जणू तुराच अशा राजश्रेष्ठ शिवछत्रपतीने पृथ्वीवर म्लेच्छांचा समूळ उच्छेद केल्यानंतर यवनोक्तींनी झाकोळलेल्या देवभाषेला राज्यव्यवहारासाठी वाढविण्याच्या हेतूने एका विद्वानाला नियुक्त केले. ८१.
तो मी अमात्य रघुनाथ शिवछत्रपतीची आज्ञा मस्तकी धारण करून राज्यव्यवहारकोश करीत आहे. ८२.
प्रत्येक वर्गाच्या अखेरीस पुढील प्रकारचा समारोप आहे:
इति श्रीशिवच्छत्रपतिप्रियामात्येन नारायणाध्वरिसूनुना रघुनाथपण्डितेन शिवराजनियोगत: कृते राजव्यवहारकोशे पण्यवर्गो दशम: समाप्त:॥
(शिवछत्रपतीचा प्रिय अमात्य, नारायणाचा पुत्र अशा रघुनाथपंडिताने शिवाजीराजाच्या आदेशावरून केलेल्या राजव्यवहारकोशामध्ये पण्यवर्ग हा दहावा वर्ग समाप्त झाला.)
ह्याउलट उपसंहारामध्ये पुढील दोन श्लोकांमध्ये असे लिहिले आहे:
व्यासान्वयाब्धिचन्द्रेण लक्ष्मणव्याससूनुना।
कोशोऽयं ढुंढिराजेन रघुनाथमुदे कृत:॥१॥
यथामति विचार्यैव नामान्यर्थानुसारत:।
विहितानि मयाकार्यमार्यैरत्र मनो मनाक्॥२॥
(व्यासकुल हा सागर, त्यातून उत्पन्न झालेल्या चन्द्रासारखा असलेल्या, लक्ष्मण व्यासाचा पुत्र, अशा ढुंढिराजाने रघुनाथाच्या संतोषासाठी हा कोश केला. १.
बुद्धीने विचार करून अर्थानुसारी शब्द मी येथे योजिले आहेत. आर्य विद्वानांनी ह्याकडे थोडे लक्ष द्यावे. २.)
हे सर्व श्लोक एकत्रितपणे विचारात घेतले तर असे म्हणता येते की रघुनाथपंडिताला हे कार्य मिळाले. तो स्वत: तंजावरचा निवासी असून त्याच्याकडे शिवराज्यापैकी दक्षिणभागाचे शासन हे प्रमुख कार्य होते. पूर्ण कोश स्वत: करणे त्याला शक्य नसणार म्हणून त्याने ढुंढिराज नावाच्या परिचित विद्वानाला हे कार्य सोपविले. कोशनिर्मितीमध्ये असा दोघांचाहि काही वाटा आहे. ढुंढिराजाने शब्द गोळा करणे असे पहिले काम केले आणि दोघांनी मिळून त्याला हे अखेरचे स्वरूप दिले. (प्रख्यात पंडितकवि रघुनाथपंडित, नलदमयंतीस्वयंवराचा कवि आणि रघुनाथपंत अमात्य हे एक का दोन, ढुंढिराज व्यास कोण होता असे बरेच काही लिहिण्याजोगे आहे पण विस्तारभयास्तव ते येथे न लिहिता त्याचा नुसता उल्लेख करतो.)
ह्यापुढे प्रत्यक्ष कोशाचा धावता आढावा घेऊ. संस्कृत पंडितप्रथेला धरून शिवजन्मामागे ईश्वरी प्रेरणा आहे असे सुचविणारे, कोशकार्याची आवश्यकता काय आणि ते करण्यास रघुनाथपंडित कसा सर्वथैव पात्र आहे ह्याचे वर्णन करणारे आणि अतिशयोक्तीने भरलेले ८४ श्लोक उपोद्घातामध्ये आहेत. त्यांचा सारांश असा:
यवनाक्रान्त आणि त्यामुळे त्रस्त अशी पृथ्वी ब्रह्मदेवाकडे ’माझी यवनांपासून सोडवणूक कर’ असे सांगण्यासाठी गेली. हे कार्य करण्यास विष्णु अधिक योग्य आहे असे सांगून ब्रह्मदेव तिला बरोबर घेऊन विष्णूकडे गेला. आपल्यापेक्षाहि शंकराने हे कार्य केल्यास उत्तम होईल असे म्हणून सर्वजण कैलासावर शंकराकडे गेले. तेथे शंकर ’परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥’ असे तूच पूर्वी सांगितले होतेस अशी विष्णूला आठवण करून देतो आणि म्हणतो:
निहता भवता हरे पुरा ये पौलस्त्यमुखा: सुखाय भूमे:।
अहितान्पुनरेव जन्मभाजो जहि तान्प्राप्तनराकृतिस्त्वमेव॥४६॥
येषां कलौ दुर्नयमेव सोढुं बुद्धावतार: कलितो मयाऽभूत्।
तेषां विनाशं स्फुटमेव कर्तुमसाम्प्रतं मे मनुषे यदीत्थम्॥४७॥
उपायमप्यत्र वदामि भूमिमवाप्य मन्नामनिगूढभाव:।
साहाय्यमंशेन पुनर्भवान्या लब्ध्वापि त्तानाशु सुखेन हन्या:॥४८॥
हे हरे, पूर्वी भूतलावर सुख आणण्यासाठी तू रावणादींचा वध केलास. आता पुन: जन्म घेतलेल्या त्या शत्रूंना मनुष्यरूपाने तू नष्ट कर. ४६.
’ज्यांचा दुष्टपणा सहन करण्यासाठी मी कलियुगामध्ये बुद्धावतार धारण केला होता त्यांचा विनाश करण्यासाठी मी मनुष्यरूप धारण करणे अयोग्य आहे’ असे जर तुला वाटत असेल...४७.
...तर त्यावर मी उपाय सांगतो. गुप्तपणे माझे नाव धारण करून तू धरणीवर अवतीर्ण हो आणि सहजपणे त्यांचे हनन कर. ह्यामध्ये भवानीचेहि साहाय्य अंशत: तुला मिळेल. ४८.
विष्णूस असा आदेश दिल्यावर शंकर पुढे सांगतो...
अस्ति प्रशस्तविभवो भुवि भानुवंशे विख्यातभोसलकुलामृतसिन्धुचन्द्र:।
श्रीशाहवर्मनृपतिर्विधिपार्वतीशश्रीशा हवि: क्रतुषु नित्यमदन्ति यस्य ॥४९॥
तस्य प्रिया भूपतिभर्तुरार्या रूपेण संतर्जितकामभार्या।
साध्वी जिजूर्नाम सुलक्षणास्ते पत्नी दिलीपस्य सुदक्षिणेव॥५०॥
त्वं शाहपृथ्वीपतिवीरपत्न्यामस्यां समासाद्य मनुष्यजन्म।
म्लेच्छापहत्या सुखमाचरय्य भूमे: पुन: स्थापय वर्णधर्मान्॥५१॥
पार्थं प्रति प्राक्तव धर्महानौ सृजेयमात्मानमिति प्रतिज्ञा।
जगत्सु गीतैव तदत्र कार्षी: कार्येऽधुना माधव मा विचारम्॥ ५२॥
अर्थ - विख्यात भोसले कुलरूपी सागरातून वर आलेला चन्द्रच जणू असा शाहाजी नावाचा कीर्तिमान् राजा आहे ज्याचा यज्ञातील हवि ब्रह्मदेव, शिव आणि विष्णु नित्य ग्रहण करतात. त्याची प्रिय आणि दिलीपाची सुदक्षिणा असावी अशी जिजू नावाची सुलक्षणा रूपवती भार्या आहे. ४९-५०.
तिच्यापासून मनुष्यरूपाने जन्म घेऊन तू म्लेच्छविनाश करून पृथ्वीवर पुन: सुखसमाधान आण आणि वर्णाश्रमधर्माची पुन:स्थापना कर. ५१.
धर्महानि झाली असता मी पुन: जन्म घेऊन उतरेन असे तूच पूर्वी गीतेमध्ये सांगितले आहेस. तेव्हा आता अधिक विचार न करता तू हे कार्य अंगावर घे. ५२.
आदेशाप्रमाणे स्वत: श्रीविष्णूने ’शिव’ ह्या नावाने पृथ्वीवर जन्म घेतला आणि भवानीचा अंश असलेल्या जिजाबाईच्या पाठिंब्याने म्लेच्छांचा संहार केला.
क्रमेण जित्वा स दिशश्चतस्रो राजा शिवच्छत्रपति: प्रतापात्।
नि:शेषयन्म्लेच्छगणं समस्तं पाति स्म पृथ्वीं परिपूर्णकाम:॥६५॥
सर्व म्लेच्छगणांचा आपल्या पराक्रमाने नि:शेष करणारा परिपूर्णकाम राजा शिवछत्रपति चारी दिशा क्रमाने जिंकून सर्व पृथ्वीचे रक्षण करू लागला.
तदनंतर...
कृते म्लेच्छोच्छेदे भुवि निरवशेषं रविकुला-
वतंसेनात्यर्थंयवनवचनैर्लुप्तसरणीम्।
नृपव्याहारार्थं स तु विबुधभाषां वितनितुम्।
नियुक्तोऽभूद्विद्वान्नृपवर शिवच्छत्रपतिना ॥८१॥
सोऽयं शिवच्छत्रपतेरनुज्ञां मूर्धाभिषिक्तस्य निधाय मूर्ध्नि।
अमात्यवर्यो रघुनाथनामा करोति राजव्यवहारकोषम् ॥८२॥
अर्थ - सूर्यवंशाचा जणू तुराच अशा राजश्रेष्ठ शिवछत्रपतीने पृथ्वीवर म्लेच्छांचा समूळ उच्छेद केल्यानंतर यवनोक्तींनी झाकोळलेल्या देवभाषेला राज्यव्यवहारासाठी वाढविण्याच्या हेतूने एका विद्वानाला नियुक्त केले. ८१.
तो मी अमात्य रघुनाथ शिवछत्रपतीची आज्ञा मस्तकी धारण करून राज्यव्यवहारकोष करीत आहे. ८२.
आपल्या ह्या कोशकार्याची कुचेष्टाहि होऊ शकेल असे वाटून रघुनाथपंडित उपोद्घाताच्या अखेरीस सांगतो:
विपश्चित्संमतस्यास्य किं स्यादज्ञविडम्बनै:।
रोचते किं क्रमेलाय मधुरं कदलीफलम् ॥८४॥
विद्वन्मान्य अशा ह्या कार्याची अडाण्यांनी कुचेष्टा केली म्हणून काय बिघडते? उंटाला गोड केळ्याची चव कोठे कळते? ८४.
ह्यापुढे १० वर्गांमध्ये मिळून १३८० फारसी-उर्दू शब्दांना संस्कृत भाषेतील शब्द समानार्थी शब्द सुचविण्यात आलेले आहेत. कोशाचे १० वर्ग असे: १) राज्यवर्ग २) कार्यस्थानवर्ग ३) भोग्यवर्ग ४) शस्त्रवर्ग ५) चतुरंगवर्ग ६) सामन्तवर्ग ७) दुर्गवर्ग ८) लेखनवर्ग ९) जनपदवर्ग १०) पण्यवर्ग . ह्यापुढे ह्या लेखामध्ये कोशामधील कोणताहि शब्द दाखवितांना प्रथम राज्यव्यवहारकोशाने सुचविलेला पर्याय आणि नंतर कंसात मूळ फारसी शब्द अशी रचना ठेवली आहे.
हा राज्यव्यवहार पुष्कळसा पूर्वीच्या मुस्लिम पद्धतीमधून घेतला आहे. राज्याच्या कारभाराचे १८ कारखानेआणि १२ महाल असे विभाजन तेथूनच घेतले आहे, मात्र ते जसेच्या तसे ह्या कोशामध्ये उतरलेले नाही. कसे ते लवकरच दिसून येईल.
राज्याच्या १८ कारखान्यांची मुस्लिम राजवटीतील नावे आणि त्यांच्या कामाचे विषय असे२- i) खजिना - कोशागार ii) जवाहिरखाना - रत्ने, दागिने iii) अंबरखाना - धान्यसाठा iv) शर्बतखाना - औषधे v) तोफखाना - तोफा, बंदुका इत्यादि vi) दफ्तरखाना - राज्यविषयक कागदपत्रे vii) जामदारखाना - वस्त्रप्रावरणे ह्यांची व्यवस्था viii) जिरातखाना - शस्त्रे, चिलखत, टोप इत्यादि ix) मुतबकखाना - पाकसाधना, रसोई इत्यादि, x) फीलखाना -हत्ती आणि त्यांचे सामान xi) उष्टारखाना - उंट आणि त्यांचे सामान xii) नगारखाना - नौबत, ढोल, शिंगे इत्यादि xiii) तालिमखाना - मल्लशाळा, xiv) फरासखाना तंबू, राहुटया, जाजमे इत्यादींची व्यवस्था, xv) आबदारखाना - पाणी अन्य पेयांची व्यवस्था xvi) शिकारखाना - पाळीव प्राणी (वाघ, सिंह इत्यादि) xvii) दारू खाना - तोफा-बंदुकांसाठी दारूगोळा xviii) शहदखाना - सफाई खाते.
१२ महाल असे२: i) पोते - व्यय, ii) सौदागर - व्यापार उदीम, iii) पालखी, iv) कोठी, v) इमारत, vi) वहिली - रथशाळा, vii) पागा - अश्वदल, viii) सेरी - सुखसोयी, ix) दरुनी - अन्त:पुर, x) थट्टी - गाईम्हशींचा तबेला, xi) टांकसाळ, xii) सबीना - संरक्षक.
ह्या कारखाना आणि महालांपैकी कशाकशाची नोंद राज्यव्यवहारकोशामध्ये घेतली गेली आहे ते आता पाहू.
कारखान्यांपैकी कोशागार (खजिना), रत्नशाला (जवाहिरखाना) आणि वसनागार (जामदारखाना) ह्यांमधील वस्तु आणि तेथील अधिकार्यांची नावे ही क्रमाने वर्ग २ - कार्यस्थानवर्ग येथे मिळतात. पाकालय (मुतबकखाना). जलस्थान (आबदारखाना), सुधास्थान (शरबतखाना), पक्षिशाला (शिकारखाना), आस्तरणक (फरासखाना) हे कारखाने वर्ग ३-भोग्यवर्ग येथे आहेत. शस्त्रागार (जिरातखाना), अग्निचूर्णक (दारूखाना) आणि मल्लशाला (तालिमखाना) हे वर्ग ४ - शस्त्रवर्ग येथे आहेत. गजशाला (फीलखाना, ह्यामध्येच मन्दुरा - घोड्यांची पागा ह्या महालाचाहि समावेश केला आहे), रथशाला (वहिलीमहाल), उष्ट्रशाला (शुतुर्खाना म्हणजेच उष्टारखाना), वाद्यशाला (आलंखाना म्हणजेच नगारखाना) इतक्यांचा समावेश वर्ग ५ - चतुरंगवर्ग केला आहे. वर्ग ६ - सामन्तवर्गामध्ये सैनिकांचे प्रकार, अधिकार्यांची नावे. सैन्याची हालचाल आणि मुक्काम अशा सैन्याशी संबंधित शब्द आहेत. वर्ग ७ - दुर्गवर्गामध्ये प्रथम दुर्ग-किल्ले ह्यांच्याशी संबंधित परिभाषा दर्शवून त्यानंतर संभारगृह (अंबारखाना) हा कारखाना, इमारत हा महाल आणि अखेरीस मलस्थान (तारतखाना किंवा शहदखाना ह्यांच्याशी संबंधित श्ब्द दर्शविले आहेत. कोशातील सर्वात मोठा वर्ग म्हणजे वर्ग ८ - लेखनवर्ग. ह्यामध्ये लेख्यशाला (दफ्तरखाना) हा कारखाना, व्यय (वेतनादि खर्च) हा महाल आणि त्यानंतर पत्रव्यवहारात, वाटाघाटींमध्ये, राजसभेमध्ये, शिष्टव्यवहारामध्ये, कर्जव्यवहार आणि दोन पक्षांमधील आर्थिक विवादामध्ये वापरायचे अनेक फारसी शब्द आणि त्यांना प्रतिशब्द दिले आहेत. वर्ग ९ - जनपदवर्ग ह्यामध्ये नाना देशविभाग, त्यांचे अधिकारी, जमिनीचे महसूलासाठी प्रकार, महसूलाशी संबंधित शब्द, वजनेमापे, अशा गोष्टी दिसतात. अखेर वर्ग १० - पण्यवर्ग येथे उत्पादनाच्या आणि विक्रीच्या वस्तु आणि ते निर्माण करणारे ह्यांची नावे दिसतात.
(क्रमश:. पुढील भागामध्ये काही रंजक आणि लक्षणीय शब्द.)
आधार:
१) राज्यव्यवहारकोश - सं. का.ना.साने, शिवचरित्र प्रदीप, पृ.१३७ पासून पुढे.
२) Administrative System of the Marathas by Surendranath Sen पृ. ५९-६१