Skip to main content

लसविषयक शंकानिरसन आणि चर्चा

लसविषयक शंकानिरसन चर्चा

लसविषयक माहितीचा महापूर जरी सध्या आला असला तरी समाजात / लोकांच्या मनात अजूनही अनेक किंतु-परंतु आहेत असे मत भूषण पानसे व संदीप देशपांडे यांनी व्यक्त केले होते.

या कारणे चिंतातुर जंतू, अबापट , भूषण पानसे आणि संदीप देशपांडे यांच्यात सखोल चर्चासत्र झाले. यानंतर ज्येष्ठ अभ्यासक श्री मिलिंद पदकी हे न्यू जर्सीहून ईमेलद्वारे सहभागी झाले. या चर्चासत्रात समजलेले मूलभूत प्रश्न आणि त्यांची उत्तरे इथे देत आहे.

इतर वाचकांच्या मनात असलेले किंवा त्यांनी ऐकलेले कुठले प्रश्न असतील तर इथे द्यावेत. त्यांची उत्तरे शोधण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला जाईल.

India Vaccination Drive

भूषण पानसे : ५०% + एफिकसी हा लस पास होण्याचा निकष लावून काही लसी पास झालेल्या आहेत, पण मग त्यातही अमुक एक लस तमुक एका लसीपेक्षा चांगली आहे असे असते का? किंवा अमुक प्रकारच्या पद्धतीची लस ही तमुक प्रकारच्या लसीपेक्षा चांगली असू शकते असे असते का?

अबापट : सध्या एफिकसी आणि इफेक्टिव्हनेस या दोन टर्मिनॉलॉजीजनी बराच गोंधळ घातला आहे. त्याबद्दल समजून घेणे फार जरुरी आहे.

तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी एफिकसी म्हणजे काय ती कशी मोजतात वगैरे समजून घेणे फार गरजेचे आहे.

या लसींच्या संदर्भात एफिकसी म्हणजे लसीच्या चाचणीच्या कंट्रोल्ड परिस्थितीत लसीची परिणामकारकता किती निदर्शनास आली एवढा व फक्त एवढाच घेण्यात यावा.

उदाहरणार्थ : फायझरच्या लसीची एफिकसी ही ९५ टक्के आहे म्हणजे ही लस घेणाऱ्यांपैकी पाच टक्के लोकांना कोविड होण्याची शक्यता आहे असा चुकीचा अर्थ घेतला जातो. खरा अर्थ असा आहे की "प्लासिबो-कंट्रोल्ड चाचण्यांच्या दरम्यान कंट्रोल ग्रुप आणि vaccinated ग्रुपमधील किती जणांना लक्षणांसहित कोरोना झाला हे मोजण्यात येते. त्याला बेसलाईन इन्फेक्शन रेट असं म्हटलं जातं.

या फायझरच्या संपूर्ण चाचणीत (जी हजारो लोकांवर केली गेली) त्यातील १७० लोकांना कोरोना इन्फेक्शन झाले. त्यातील १६२ जण हे प्लासिबो दिलेले होते आणि आठ जण लस दिलेले. म्हणजे १७० हा बेस इन्फेक्शन रेट आणि त्यातील ८ लोक लस दिलेले, म्हणजे ५ टक्के. म्हणून एफिकसी ९५ टक्के. हे अशा पद्धतीने मोजले गेलेले आहे.

सर्वच लसींच्या बाबतीत मोजण्याची पद्धत ही अशीच.

मिलिंद पदकी : १. लसीची परिणामकारकता ठरविताना, प्लासिबो आणि व्हॅक्सिन दिलेल्या गटांमधल्या रोग-निर्मितीच्या घटना मोजल्या जातात. यांचे गुणोत्तर समजा ९:१ असे आले, तर "९० टक्के" परिणामकारकता जाहीर केली जाते. पण याचा अर्थ, व्हॅक्सिन गटातल्या रोगापासून बचावलेल्या प्रत्येक व्यक्तीला १०० टक्के संरक्षण मिळालेले असते (एका व्यक्तीला ०.९ असे "संरक्षण" मिळू शकत नाही. ते शून्य किंवा १ असेच असू शकते!).

२. आता तुम्ही यातील दहात मोडणार का ९०मध्ये हा अनेक घटकांवर अवलंबून असणारा प्रश्न आहे : तुमच्यात किती व्हायरस शिरला, तुमची सध्याची प्रतिकारशक्ती किती आहे वगैरे.

३. अमेरिकन एफडीएने माणसे वाचविण्यासाठी ५० टक्के संरक्षणाचा निकष करोना महासाथीसाठी लागू केला आहे. सर्व व्हॅक्सीन्सनी त्यापेक्षा उत्तम कामगिरी दाखविली आहे.

४. आणि सर्व व्हॅक्सीन्सनी तीव्र रोग आणि मृत्यू यांबाबत तर १०० टक्के परिणामकारकता दाखविली आहे.

लशींमध्ये काळे-गोरे ठरविण्याबाबतचा सध्याचा मोठा अडचणीचा भाग म्हणजे येणारे नवनवे "व्हेरियंटस". (मूळ व्हायरसमध्ये जनुकबदल झालेल्या नव्या व्हायरसला आपण आधी "व्हेरियंट" म्हणतो. याने जर नवीन जैविक / वैद्यकीय गुणधर्म दाखविले उदा. संसर्ग-क्षमता किंवा रोग-निर्मिती क्षमता, तर मग हळूहळू त्याला "स्ट्रेन" या पदवीला चढविले जाते.) अस्त्रा-झेनेकाच्या (म्हणजेच भारतात सीरमची कोव्हिशील्ड) व्हॅक्सिनची परिणामकारकता २२ टक्के इतकी कमी दिसल्यावर दक्षिण आफ्रिकेने आता जॉन्सन अँड जॉन्सनचे व्हॅक्सिन त्या जागी आणले आहे. नव्या व्हेरियंटसमध्ये अजून जादा रोग-निर्मिती, मृत्यू हे दिसलेले नाही. त्या जातीचे फार मोठे काही आढळल्यास नवे व्हॅक्सिन अर्थातच महत्त्वाचे ठरेल. अनेक व्हेरियंटससाठी वरच्या व्हॅक्सीन्सचे मिश्रण असाही एक पर्याय असू शकतो.

जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीचा एकच डोस ६६ टक्के परिणामकारक दिसला, पण तो एफडीएच्या ५० टक्क्याच्या निकषाहून अधिक असल्यामुळे त्याला मान्यता मिळाली. (त्यांची दुसरा डोस देण्याची ट्रायल मात्र चालूच आहे!) असा एकच डोस द्यावा लागणे, हे दूर राहणाऱ्या, जाण्यायेण्याला अडचणी असणाऱ्या व्यक्तींना फायद्याचे असू शकते.

अजून तरी व्हॅक्सिनमध्ये साईड-इफेक्टसच्या बाबत डावे-उजवे करण्याइतका डेटा नाही. जे दिसते आहे ते सर्वांचे साधारण समानच दिसते आहे.

अबापट : त्यामुळे या ६६ ते ९५ टक्क्याला फेज-तीनच्या चाचण्यांच्या विदेच्या संदर्भात बघितले जावे. फक्त.

आता ही पद्धत अपुरी म्हणावी का?

याचे उत्तर हो आणि नाही.

हो अशासाठी की पुढे चाचण्या सुरूच राहतात. स्पेसिफिक न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज टायटर मोजून. त्याचे निष्कर्ष येतच राहतात अजून किमान नऊ महिने. ते जास्त शास्त्रीय.

मिलिंद पदकी : जरा जास्त खोलात जाऊन सांगायचं झालं तर प्रतिकारशक्ती निर्माण होण्यातील (अँटीबॉडी व्यतिरिक्त) दुसरा भाग म्हणजे T सेल रिस्पॉन्स : CD ४ (हेल्पर) आणि CD ८ (किलर) T सेल्स. हेल्पर T सेल्स या मुख्यतः B सेल्सना अँटीबॉडी तयार करण्यास मदत करतात. तर किलर T सेल्स या माणसाच्या शरीरातील विषाणूबाधित पेशी (ज्यांच्या पृष्ठभागावर विषाणू/विषाणूचे काही भाग /तुकडे दिसत असतात) नष्ट करतात. हे दोन्ही रिस्पॉन्स परिणामकारक प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी महत्त्वाचे असतात. माझ्या माहितीच्या एका विख्यात इम्युनॉलॉजिस्टने मला खाजगीत सांगितले की इनऍक्टिव्हेटेड विषाणू लसी (जशी भारत बायोटेकची आहे) यांचा T सेल रिस्पॉन्स हा फारसा चांगला असत नाही. या प्रकारच्या लसीचा अजून एक तोटा म्हणजे या लसी विषाणूच्या सर्व प्रथिनांच्या विरुद्ध प्रतिकार प्रतिसाद देतात. (साधारणपणे २९) आता या उर्वरित फारशा महत्त्वाच्या नसलेल्या प्रथिनांच्या विरुद्ध जोरदार (T आणि B सेल्सचा) प्रतिसाद देणे हे पूर्ण सुरक्षा देणारी प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी जरूर असतो का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे उत्तर खरे तर 'नाही' असे आहे.

अबापट : आणि ही पद्धत अपुरी नाही अशासाठी, की एवढ्या मोठ्या चाचणीतील निष्कर्ष लस रिलीज करण्यासाठी पुरेसे आहेत. विशेषतः महासाथ जोरात सुरू असताना.

मिलिंद पदकी : "भारतात महासाथ तर ओसरत आली आहे , मग घाई काय आहे , थोडं थांबू" असा प्रतिवाद काही लोक करतील.

अबापट : यापेक्षा जास्त सखोल निष्कर्ष येणार आहेत म्हणून लस रिलीज करणे थांबवणे हे अयोग्य.

संदीप देशपांडे : थोडक्यात लस पास जरी झाली तरी त्यात उत्तम निकृष्ट असं काही असतं का? आणि असलं तर त्याचे निकष काय? आणि नसले तर ते कसं ठरतं?

अबापट : सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमासाठी लस किमान ५० टक्के एफिकसी असलेली हवी हा आत्तापर्यंतचा ठोकताळा आणि प्रघात. सध्या जगात मान्यता मिळालेल्या चार-पाचही लसी त्यात बसतात. परंतु यावरून एखादी लस दुसऱ्या लसीपेक्षा जास्त चांगली किंवा वाईट हे ठरविण्यासाठी हा विदा अपुरा.

लस पास झाल्यावर निकृष्ट=उत्कृष्ट असे त्यात काही असते असे मला वाटत नाही.

तुम्हाला जर चांगलीच्च लस हवी असेल तर अजून काही महिने थांबा.

मिलिंद पदकी : याचा दुसरा अर्थ असा की तुम्हाला या मधल्या काळात कोरोना इन्फेक्शनपासून संरक्षण नकोय.

अबापट : सर्व लसींचा रक्तातील न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी टायटरचा विदा जर कधी तुमच्यासमोर आला तर त्याचा तौलनिक अभ्यास करून किंवा करवून घेऊन तो निर्णय करावा.

मला वैयक्तिक विचाराल तर मी म्हणेन हे बिनगरजेचे आहे. पण असो.

भूषण पानसे : कोणती स्वस्त आणि कोणती महाग ह्यावर सरकार लस निवडत असेल का? हा निकष योग्य आहे का? स्पर्धेत काही लसी कालांतराने बाहेर पडल्या असे कधी झाले आहे का?

अबापट : सरकार कशी निवड करत असेल : सद्यस्थितीतील परिप्रेक्ष्यात सांगतो. निवड करण्याचे पुढील निकष असावेत :

१. एफिकसी : यात सर्व लसी बसतात

२. सहज मिळण्याची शक्यता : यात भारतात बनणाऱ्या दोन्ही लसी बसतात

३. वितरणासाठी सुलभता : यात भारतातील दोन्ही लसी बसतात, साठवण २ ते ८ डिग्री सेल्शियस म्हणजे साध्या फ्रिजमध्ये साठवणे शक्य. इथे फायझरची लस गैरसोयीची, कारण त्याला साठवण्यासाठी आणि वितरणासाठी कायम -७० डिग्री सेल्शियसची साठवण क्षमता आणि कोल्ड चेन पाहिजे. ती छोट्या कालावधीत तयार करणे खर्चिक.

मिलिंद पदकी : अर्थात फायझरने नुकताच USFDA ला -२० डिग्रीला लस स्टेबल राहते अशी विदा दिली आहे. याला परवानगी मिळाली तर लसीकरण सुलभ होईल.

अबापट : चौथा निकष किंमत : इथे सरकारने भारत आणि सिरम या दोघांकडून ३ डॉलर प्रति डोस एवढ्या किमतीत लस घेतली आहे. फायझर आणि मॉडर्नाची किंमत ३० डॉलरच्या वर आहे.

मिलिंद पदकी : अर्थात या किमती जवळ जवळ ना नफा ना तोटा तत्त्वावर दिल्या आहेत. याबद्दल या दोन्ही कंपन्यांचे अभिनंदन करायला पाहिजे. अशा वाजवी दरातील किमतीमुळे जगातील गरीब देशांमध्ये लसीकरण जास्त सोयीचे होईल.

अबापट : पाचवा निकष (इथेच नाही, जगभर) राजकीय असल्याने त्याबद्दल लिहीत नाही.

६. भारत सरकारने मान्यतेसाठी "आमच्या देशात चाचण्या घेणे जरुरी" असे विशेष कलम घातले. यामुळे फायझरने मान्यतेसाठीचा अर्ज मागे घेतला. प्रत्येक देशात लसीची वेगळी चाचणी घेण्याचा प्रघात नाही. शास्त्रीयदृष्ट्या याची गरज नाही. हा उगाच घातलेला खोडा आहे असे वाटते. आपोआप बाहेरच्या देशातील लसी कटाप झाल्या. भारतातील लसनिर्मिती उद्योग हा पूर्वीपासून अत्यंत सक्षम आहे, त्यामुळे आपल्याला याने काही अडचण येणार नाही. पण हे बंधन घालणे शास्त्रीयदृष्ट्या योग्य नाही. (सर्वच देशांनी ही अट घातली तर vaccine मैत्री व vaccine डिप्लोमसी हे भारत सरकारचे उपक्रम बंद पडतील.)

कुठली लस विकत घ्यावी याबाबत निर्णय घेण्यास भारत सरकारला फार अडचण आली असेल असं वाटत नाही.

काही लसी नक्की या स्पर्धेतून नक्की बाहेर पडतील. परंतु दर वेळी याचे कारण तांत्रिक/शास्त्रीयच असेल असे नाही.

मिलिंद पदकी : दक्षिण आफ्रिकन सरकारने अगदी आत्ताच Astra -Z लसीचा वापर थांबविला. विषाणूच्या दक्षिण आफ्रिकी व्हेरियंटवर या लसीची परिणामकारकता २२ टक्के आहे असे त्यांना आढळून आले. त्यांनी जॉन्सन अँड जॉन्सनची लस देण्याचा निर्णय घेतला आहे. असे झाले तर याचे परिणाम सर्वदूर होणार.

अबापट : आता सर्व प्रश्नांचे मला वाटणारे तात्पर्य : ही लस चांगली की दुसरी याचे निष्कर्ष येण्यास (जर आलेच तर) वेळ लागणार. खरं तर या निष्कर्षांची वाट बघणे बिनगरजेचे. तरीही वाट बघणे असल्यास बघावी. न बघून भारत किंवा सिरम कुणाचीही लस मिळाल्यास तात्काळ घेऊन टाकणे हा सुज्ञपणा.

मिलिंद पदकी : बरोबर. आणि आलेले कुठलेही व्हेरियंट भारतात सध्यातरी पसरलेले नाहीत असं दिसतंय. अर्थात दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत काळजी घेणे अत्यंत जरुरीचे.

अबापट : दक्षिण आफ्रिकी व्हेरियन्टवर कुठली लस चालणार किंवा नाही चालणार याविषयी अभ्यास अजून प्राथमिक पातळीवर आहे. आत्ता त्याविषयी काही नक्की सांगण्याइतपत अभ्यास झालेला नाही. झाल्यावर सांगणेत येईल.

मिलिंद पदकी : जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा दावा असा आहे की त्यांची लस या दक्षिण आफ्रिकन व्हेरियंटच्या बाबतीत सुमारे ५६% परिणामकारकतेने (एफिकसी) काम करते.

अबापट : बरोबर, पण अजून लसीच्या ' इफेक्टिव्हनेस' बद्दल चर्चा मात्र आपण सुरूच केली नाहीये. कारण त्याच्यावर अभ्यास आत्ताशी सुरू झाला आहे.

(इफेक्टिव्हनेस आणि एफिकसी या दोन संज्ञांमध्ये गल्लत नको.)

(माझ्या मर्यादित कुवत व आकलनानुसार उत्तरे लिहिली आहेत.)

अबापट Sat, 13/03/2021 - 21:48

In reply to by नितिन थत्ते

एफिकसी म्हणजे चाचण्यांच्या काळात लसीची परिणामकरता कशी आहे.(चाचणी २५००० ते ७०००० स्वयंसेवकांवर केलेली असते)
इफेक्टिव्हनेस म्हणजे प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्यावर मोठ्या जन समूहात दिसलेली परिणामकारकता. (जे कोट्यवधी लोकांवर केले जाते)

मिलिन्द Sat, 13/03/2021 - 21:49

In reply to by नितिन थत्ते

इफिकसी ची सध्याची व्याख्या म्हणजे तुम्हाला तीव्र कोव्हीड-२९ रोग, हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यू यापासून वाचविणे . (यात सौम्य कोव्हीड होणे, रोग-प्रसार थांबणे या गोष्टी धरल्या गेलेल्या नाहीत.)

नितिन थत्ते Sat, 13/03/2021 - 19:15

दुसरा प्रश्न

सामान्य इन्फ्लुएन्झा साठी परदेशात लोक दरवर्षी लस घेतात. तशी भारतात कुणी घेत नाहीत. हीच गोष्ट टायफॉईड आणि कदाचित स्वाइन फ्लुची आहे. तर कोविड साठी लस घेणे भारतात गरजेचे आहे का?

लस घेतल्यावर जी इम्युनिटी येते ती कोणत्या प्रकारे असते?
प्रकार १- लस घेतल्यावर रक्तात न्यूट्रलायझिंग ॲण्टीबॉडीज तयार होतात आणि त्या जोपर्यंत रक्तात पुरेश्या संख्येने आहीत तोवर संरक्षण मिळते. (पहाऱ्यावर खडे सैन्य उभे केलेले आहे)
प्रकार २. लस घेतल्यामुळे शरीराला या आगंतुकाची माहिती झालेली आहे. विषाणूने प्रवेश केल्यावर भराभर ॲण्टीबॉडीज तयार होऊन विषाणूवर मात केली जाईल. (खडे सैन्य नाही पण सैन्य ताबडतोब आणता येईल असे सर्व्हेलन्स + इन्फ्रा तयार झालेले आहे).

भारतातल्या लशी यापैकी कोणत्या प्रकारच्या आहेत? मी स्वत: दुसऱ्या प्रकारच्या लशीला प्राधान्य देईन कारण या प्रकारच्या लशीने (देवीप्रमाणे) कायम स्वरूपाची इम्युनिटी मिळेल असे मला वाटते.

वेगळा उपप्रश्न- रेबीज ची लस कुत्रा चावल्यावर आपण घेतो. (धनुर्वाताचेही तसेच. जरी बालपणी दिली जात असली तरी). तशी नंतर घेण्याची लस कोविडसाठी बनू शकते का?

मिलिन्द Sat, 13/03/2021 - 21:57

In reply to by नितिन थत्ते

१. (प्रकार एक आणि दोन यांचे पुरेसे डिसेक्शन झालेले नाही) . भारतातल्या आणि जगातल्याही सर्व लशी सध्या तरी प्रकार-१ च्याच मानाव्या लागतील. अँटीबॉडी सुमारे पाच वर्षे टिकेल.
२. रोग्याला (बाहेर निर्मिलेली) तयार अँटीबॉडी देणे याला पॅसिव्ह इम्म्युनायझेशन असे म्हणतात. अमेरिकेत अशा दोन अँटीबॉडीज आता बाजारात आल्या आहेत. लस हा "उपचार" नाही, ते प्रतिबंधक आहे.

अबापट Sun, 14/03/2021 - 09:56

In reply to by नितिन थत्ते

सामान्य इन्फ्लुएन्झा साठी परदेशात लोक दरवर्षी लस घेतात. तशी भारतात कुणी घेत नाहीत. हीच गोष्ट टायफॉईड आणि कदाचित स्वाइन फ्लुची आहे. तर कोविड साठी लस घेणे भारतात गरजेचे आहे का?

ट्रॉपिकल वातावरण असलेल्या , दाटीवाटीने लोकं राहतात ( पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त ), गरीब आणि सार्वजनिक स्वच्छता हा फारसा गंभीरपणे न घेतलेल्या विकसनशील देशामध्ये सबक्लिनिकल पातळीवर अनेक संसर्गजन्य रोग निर्माण करणाऱ्या जिवाणू/विषाणू यांचे एक्सपोजर आपल्याला झालेले असते. त्यामुळे त्या जिवाणू विषाणू यांच्याविरुद्ध काही बेसिक प्रमाणात का होईना प्रतिकारशक्ती आपल्या शरीरात तयार असते.

(टेम्परेट वातावरणात , कमी पॉप्युलेशन डेन्सिटी असलेल्या , सार्वजनिक स्वच्छता चांगली असलेल्या प्रगत देशांमध्ये यापैकी बऱ्याच गोष्टी नसतात. यामुळे त्या देशातील व्यक्ती प्रतिकार शक्ती निर्माण व्हावी म्हणून या लसी घेत असावेत. )

सार्स कोविड २ या विषाणूचा प्रसार होऊन जेमतेम सव्वा वर्ष झालं आहे , त्यामुळे आपल्यला याचे सबक्लिनिकल पातळीवर पूर्वी/लहान /तरुणपणी एक्सपोजर मिळून त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाली असायची शक्यता फारशी नाही.

त्यामुळे लस घेणे जरुरी .

भारतातल्या लशी यापैकी कोणत्या प्रकारच्या आहेत? मी स्वत: दुसऱ्या प्रकारच्या लशीला प्राधान्य देईन कारण या प्रकारच्या लशीने (देवीप्रमाणे) कायम स्वरूपाची इम्युनिटी मिळेल असे मला वाटते.

गल्लत होत आहे थोडी इथे. देवीच्या लसीमुळे निर्माण होणारी प्रतिकारशक्ती कायम स्वरूप असते . परंतु सर्व प्रकारच्या जिवाणू/विषाणू यांच्याविरुद्ध लसी ( अगदी तुम्ही म्हणता त्यातील दुसऱ्या प्रकारच्या सुद्धा ) या कायम स्वरूप असतेच असे नाही.
त्या त्या ' शत्रू ' ( अँटीजेन ) विरुद्ध तयार झालेल्या प्रतिकारशक्तीची " आठवण " ( मेमरी ) ही कमी जास्त असते . जिथे कमी असते त्या रोगांच्या बाबतीत बूस्टर डोस घायला लागतो. काही रोगांच्याबाबतीत मी मेमरी तहहयात राहते , म्हणून त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती कायमस्वरूपी असते . ( तुम्ही वर्गीकरण केलंत त्या स्वरूपाचे नाही हे )
या याव्यतिरिक्त काही विषाणू सारखे स्वरूप बदलतात , ज्यामुळे पूर्वी दिलेल्या लसीने निर्माण केलेली प्रतिकारशक्ती फारशी उपयोगी ठरत नाही , हेही एक कारण आहे . ( उदा : फ्लू )

चिमणराव Sun, 14/03/2021 - 13:01

In reply to by अबापट

सार्वजनिक स्वच्छता हा फारसा गंभीरपणे न घेतलेल्या विकसनशील देशामध्ये सबक्लिनिकल पातळीवर अनेक संसर्गजन्य रोग निर्माण करणाऱ्या जिवाणू/विषाणू यांचे एक्सपोजर आपल्याला झालेले असते. त्यामुळे त्या जिवाणू विषाणू यांच्याविरुद्ध काही बेसिक प्रमाणात का होईना प्रतिकारशक्ती आपल्या शरीरात तयार असते.

यालाच मी एक्स्ट्रापलेट केले कोविडसाठी. पण चूक आहे म्हणतात. ओके.

अबापट Sun, 14/03/2021 - 17:09

In reply to by चिमणराव

शेवटचं वाक्य वाचलं नाहीत की ....
सार्स कोविड 2 हा विषाणू केवळ गेली सव्वा वर्ष आला आहे त्यामुळे हे सर्व त्याला लागू नाही (जे विषाणू जिवाणू आधीपासून अस्तित्वात आहेत त्यांना हे लागू आहे)
जे अस्तित्वात नव्हतं (किमान माणसाच्या संपर्कात तरी आला नव्हता)
त्याच्याविरुद्ध 'अशी' प्रतिकार शक्ती कशी येणार ?

मिलिन्द Mon, 15/03/2021 - 02:26

In reply to by अबापट

यावर एक माफक वेगळा अँगल असा, की मानवाला इन्फेक्ट करणारे जे सात निरनिराळे करोनाव्हायरस माहितीत आहेत, त्यातले सार्स -१, मर्स आणि सार्स -२ (सध्याचा) हे जबरदस्त रोग आणि मृत्युकारक असू शकतात. याउलट उरलेले चार हे सर्दी/फ्लू असे सौम्य रोग निर्माण करतात. पण त्यांना आलेल्या अँटीबॉडीज , सार्स -२ विरुद्ध काही प्रमाणात "क्रॉस-रीऍक्टिव्ह" असू शकतात. या सर्वातून एक सूत्र पुढे येते ते म्हणजे सध्याचा सार्स -२ , हा आपल्या शरीरात कमीत कमी येऊ देणे सर्वात चांगले आणि सोपे (मास्क, शारीरिक अंतर, गर्दी टाळणे, हात धुणे). यामुळे शरीराकडे जी काही मर्यादित साधने उपलब्ध आहेत, त्यांच्यावर मोठा लोड न येता, ती थोडीफार उपयोगी ठरू शकतात.

चिमणराव Sat, 13/03/2021 - 19:29

पण प्रतिसाद वगैरे देण्याएवढी माहिती नाही.

तिरशिंगराव Sat, 13/03/2021 - 21:44

कोविशिल्ड/ ॲस्ट्रा झेनेका या लसीबद्दल, रक्तात गुठळ्या होतात असा काही देशांत आक्षेप घेतला गेला आहे. तो कितपत खरा आहे ?

मिलिन्द Sat, 13/03/2021 - 22:05

व्हायरॉलॉजीत तरी, रक्तातील गुठळ्या या, प्रत्यक्ष व्हायरसच्या आर एन ए चे , रक्तातील प्रमाण ("viremia") वाढल्यामुळे, (एम आर ए च्या "फॉस्फेट पॉलिमेरिक चेन मुळे ) होतात असे मानले जाते. हे व्हॅक्सिनमुळे झालेले असणे अशक्य आहे, आणि अस्त्रा-झेनेका हे तर डी एन ए व्हॅक्सिन आहे, एम आर एन ए व्हॅक्सिनही नाही. त्यामुळे अधिकारी वर्गाने "पॅनिक" मध्ये घेतलेली ही स्टेप वाटते. "हे व्हॅक्सिनमुळे होते आहे असे आम्हीही निश्चितपणे सांगू शकत नाही" असे त्यांच्या स्टेटमेंट मध्ये आहेच!).

मिलिन्द Mon, 15/03/2021 - 02:19

In reply to by anant_yaatree

सध्याच्या, पहिल्या पिढीच्या लशी तुम्हाला तीव्र कोव्हीड, हॉस्पिटल-भरती आणि मृत्यूपासून वाचवण्याचा दावा करीत आहेत. "सौम्य" नवे इन्फेक्शन होणारच नाही असा त्यांचा दावा नाही. पण तुम्ही त्यामुळे मरणार नाही.

अबापट Mon, 15/03/2021 - 11:30

In reply to by anant_yaatree

या अशा केसेस चा पाठपुरावा व्हायला हवा.
तो होतोय का ते बघुयात.
आणि दोनेक दिवसा पूर्वीपर्यंत भारतात 'पूर्ण ' लसीकरण म्हणजे दोन डोस झालेल्यांची संख्या साडे पाच ते सहा लाखांच्या दरम्यान असावी.
यातील किती लोकांना असे इन्फेक्शन झाले याचा डेटा आल्यावर हे अपवादात्मक होते की सरसकट हे ठरवू शकू.
सध्या तरी अपवादात्मक आहे असं दिसतंय.
तुम्हीही अशा बातम्यांच्या वर नजर ठेवा , आम्हीही ठेवू

चिमणराव Tue, 16/03/2021 - 10:05

एक डोस घेतल्यावर काही ज्ये नागरिकांना ताप किंवा अस्वस्थ वाटले ते पुढचा डोस घेणार नाहीत किंवा उशिरा घेतील तर एकूण लशीची काही विचित्र reaction किंवा हँग आला तर? किंवा अर्धवट औषधाने वायरसच कोडगे होऊ नयेत. म्हणजे तेही संशोधन घाइघाईत केलेच असणार.
( कुतुहुलपूर्ण शैक्षणिक प्रश्न आहे, टीका नाही.)

अबापट Tue, 16/03/2021 - 13:43

reaction किंवा हँग आला तर?
लोकांना ताप येणे किंवा थोडेसे अस्वस्थ वाटणे ही सर्वसामान्य रिअक्शन आहे . यात घाबरण्यासारखे काहीही नाही. आपण बालपणात घेतलेल्या लसींच्या वेळीही हे होत असे. तेव्हा आपल्या मनात किंतु नसे. पुढचा डोस न घेणे कुणी करत असेल तर ते दुर्दैवी असेल , तोटा त्यांचाच असेल. आणि किमान कोवीशिल्ड लसीच्या नवीन अभ्यासात असे लक्षात आले आहे ( अभ्यास कायम चालू राहतो , अजून किमान सहा आठ महिने तरी सुरु राहणार , यात विशेष असं काही नाही ) अठ्ठावीस दिवसांनी लस घेतली नाही आणि अगदी १२० दिवसांपर्यंत जरी लस घेतली ( पहिला डोस घेतल्यानंतर ) तरीही काही अडचण नाही , लाभ होतो.
विचित्र रिअक्शन म्हणजे anaphylactic शॉक येणे हे खूप दुर्मिळ आहे . म्हणजे एक लाख लोकांमध्ये एकाला वगैरे. त्यामुळे आपण फार काळजी करू नये
किंवा अर्धवट औषधाने वायरसच कोडगे होऊ नयेत.

हे होण्याची शून्य टक्के शक्यता आहे .(एकतर हे औषध नाही , ही लस आहे, तुम्ही antibiotic च्या संदर्भाने म्हणत असणार , इथे तसे नाही ) कारण कुठल्याही लसित जिवंत विषाणू नाही. कोवॅक्सिन ( भारत बायोटेकची लस ) यात मृत विषाणू आहे , त्यामुळे तो कोडगा होण्याची शक्यता नाही. आणि उर्वरित लसींमध्ये तर तेही नाही , फक्त स्पाइक प्रोटीन चे जनुकीय मटेरियल आहे जिवंत किंवा मृत विषाणू नाही त्यामुळे असली भीती बाळगू नये. लस घ्यावी .
( जास्त माहिती हवी असेल तर जनुकीय लस , वाहक प्रोटीन लस व बहरत बायोटेकच्या लसीबद्दल लिहिलेले धागे वाचावेत , वाचायला द्यावेत )

चिमणराव Tue, 16/03/2021 - 13:50

सध्या नातेवाईक, ओळखीचे माझ्याच वयाचे असलेले यांची हीच चर्चा चालू आहे. " मी घेणार/ घेतली, तुम्ही?"
त्यांना हेच सांगेन. काय ते पक्के ठरवा.

स्वयंभू Tue, 16/03/2021 - 13:59

महाराष्ट्रात फक्त तीच खपवत आहेत असे दिसतेय. तीन चार लशी आल्या आहेत आता बाजारात. इतर ठिकाणी कोव्हँक्सिन मिळते असे ऐकलेय.
त्रिभूवन किर्ती गोळ्यासारखे झाले म्हणजे लशींचे.
झेंडुप्लस च्या पण त्रिभूवन किर्ती मिळतात
शारंगधर आणि बैद्यनाथ च्या पण मिळतात
आयुर्वेद रसशाळेच्या पण मिळतात
धुतपापेश्वरच्या मिळतात

जो जास्त कमीशन देतो त्या ब्रँडच्या गोळ्या खपतात
तसेच लशींचे होणार आता.
फक्त सरकारचा कंट्रोल असवा लशीकरणात नाहीतर ट्रँफिक सिग्नला पण विकायला येतील कोरोना लशींचे डोस. भारतात कायपण घडू शकते.

अबापट Tue, 16/03/2021 - 14:17

In reply to by स्वयंभू

भारतातील बाजारात तीन चार नाही. दोनच लसी आहेत.
आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणात 80 -90टक्के कोविशिल्ड चे झाले आहे (एक कारण असे असू शकते की त्यांची चार पाच महिन्यापूर्वीच उत्पादन सुरू केल्यामुळे त्यांच्याकडे साठा जास्त होता)
काल पासून पहिला डोस घेणाऱ्या सगळयांना कॉव्हक्सिन मिळेल असा सरकारने जाहीर केले आहे (कॉव्ही शिल्ड चा साठा आधी पहिला डोस ज्यांना त्या लसीचा मिळाला आहे त्यांच्या दुसऱ्या डोस करिता राखीव )
बाकी ते झंडू, त्रिभुवन कीर्ती , सरकारचे कमिशन वगैरे माहिती तुम्हाला कुठून मिळाली ? असेल तर इथेही मांडा ,सखोल.
आमच्याही ज्ञानात भर पडेल

स्वयंभू Wed, 17/03/2021 - 00:13

In reply to by अबापट

औषधातील घटक हा महत्त्वाचा. ते औषध तयार कोण करतो . त्याचे मार्केटिंग कसे करतो किंवा लोकांच्या गळी कसे उतरवले जाते याची कैक उदाहरणे आहेत. उदा. जनरिक औषधे विरूद्ध समान घटकांची मात्रा असलेली महागडी नामांकित कंपन्यांची औषधे.
औषध माफियांनी आरोग्य सेवेचा गोरखधंदा केलेलाच आहे. तसा कोरोनाच्या लशीबाबत होऊ नये एवढीच माफक अपेक्षा. कारण लशी तयार करण्यात हजारो कोटी रुपये गुंतवले गेले आहेत. वसुलीसाठी लोकांच्या गळी मारून लशी खपवू नयेत. सध्या ज्या प्रकारे सरकारने टप्प्या-टप्प्याने लशींचे वितरण आणि लशीकरण कंट्रोलमध्ये ठेवले आहे तेच गरजेचं आहे. किमतीवर नियंत्रण असणं गरजेचं आहे. मध्यंतरी सरकारने २५०₹ लशीचा दर ठेवला म्हणून बरेचशे खाजगी इस्पीतळातील डॉक्टरांनी कुरकुर केली म्हणे. पण सरकारचा लशीच्या किंमतीवर ताबा असायलाच हवा. मला तर वाटते अंबानी अदानी वगैरे पण काही वर्षांनी लस उत्पादनात उतरतील. सध्याच्या काळात काहीही होऊ शकतं. सध्या तर लशींच्या कुपीवर मोदींचा फोटो यायचाच बाकी राहिलाय. ;-)
तसेच जेवढे नवनव्या कोरोनाच्या आवृत्त्या येतील तेवढे जास्त संशोधन होईल. तेवढ्याच संशोधित लशी बाजारात येतील.

चिमणराव Tue, 16/03/2021 - 21:21

In reply to by स्वयंभू

सध्या महिलामंडळ कुणी कशी कुठे नोंदणी करून डोस घेणार यावर फोनाफोनीत व्यस्त आहे. वाटसप पुरे पडत नसल्याने तासातासाचे कॉल्स होत आहेत.
----------
अवांतर -
पण आणखी आयुर्वेदिक मात्रांच्या चर्चा करून आणखीनच गोंधळ होऊ शकतो. या औषधांची नावे खूपच उद्बोधक आणि रंजक असतात हे मान्य. पण टक्कर नको. श्रीश्री रामदेवबाबांनी मौन धरलंय हे एक बरं केलंय.
बाकी निरनिराळ्या कंपन्यांनी बनवलेली आयुर्वेदिक सिद्ध औषधे ही वेगळी नसतात कारण त्यांनी त्याची सिद्धता ही प्रमाणभूत ग्रंथामधली कृतीप्रमाणे केलेली असते. फॉर्मुलेशनचा उल्लेख असतो - चरक/ वगैरे.
अवांतर समाप्त.
-----------

तिरशिंगराव Tue, 16/03/2021 - 15:06

भारत सरकारचे लसीकरणाचे काम प्रामाणिकपणे चालू आहे. त्यावर, लोकांच्या मनांत शंका निर्माण होईल असे वक्तव्य पुराव्याशिवाय करु नये. पहिला डोस घेतल्यावर मला काहीच रिॲक्शन आली नाही. पण जरी आली असती तरी मी दुसरा डोस चुकवणार नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 16/03/2021 - 19:16

In reply to by तिरशिंगराव

अमेरिकेत राष्ट्रीय पातळींवरच्या बातम्यांमध्ये फाउची आणि इतर तज्ज्ञ नियमितपणे सांगत आहेत - लशीमुळे थकवा, तापबिप आला याचा अर्थ लशीचं काम सुरू झालेलं आहे. त्याला अजिबात घाबरू नका.

सामो Tue, 16/03/2021 - 21:26

अर्रे यार!! आमच्याकडे भल्यामोठ्या रांगाच्या रांगा लागल्यात. लसचह मिळत नाहीये. तरी मी प्रयत्नांती नवऱ्याकरता अपॉइन्ट्मेन्ट घेतली आहे. या शुक्रवारी आहे.
मला अजुन तरी मिळत नाहीये. नवरा एका विशिष्ठ नोकरीसंदर्भात, ब्रॅकेटमध्ये येतोय.

चिमणराव Wed, 17/03/2021 - 09:58

In reply to by अबापट

एका महिन्याच्या अंतराने दोन डोस १३० कोटींना!
---------
(हा विषय नाही पण औषध असते तर दहा लाख डोसात काम झाले असते आणि निर्धास्त झालो असतो सर्वजण. औषध का असू नये असा विचार येतोच.)

'न'वी बाजू Wed, 17/03/2021 - 19:02

In reply to by अबापट

कोट्यवधी लोके दर पाच वर्षांनी मतदान करतात.

हे अगदी खरे आहे. आणि, ती निवडणूक आयोजित करणाऱ्या नि चालविणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांची नि कर्मचाऱ्यांची ती चालवीत असताना काय गांड फाटते (भाषेबद्दल क्षमस्व!), याची पूर्ण कल्पना (बायको इथे त्याच खात्यात नोकरीला असल्याकारणाने) मला आहे. (खास करून या वेळच्या निवडणुकांसारखा माहौल असेल तर.)

तरी बरे, लसीकरण कर्मचाऱ्यांना डेथ थ्रेट्स देण्याचा प्रघात अद्याप निर्माण झालेला नाही. कोणीतरी रिपब्लिकन पक्षाला (नि उर्वरित जगातल्या तत्सम गुंडांना) कल्पना सुचविली पाहिजे.

असो. सवांतराबद्दल क्षमस्व. बाकी धागा चांगला चाललेला आहे. चालू द्या.

----------

('मार्मिक' दिली आहे.)

चिमणराव Wed, 17/03/2021 - 10:03

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आम्हीही रांगेत आहोत.
बाकी लस लवकर मिळत नाही म्हणून / आमच्या उटपटांग प्रतिसादांस कंटाळलात?
आता ताबडतोब थांबवतो प्रतिसाद.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 17/03/2021 - 20:09

In reply to by चिमणराव

तक्रारखोरीचा कंटाळा आला. त्यातही जो त्रास आपल्याला होणार नाहीये, १३० कोटींना दोन डोस मिळणं, वगैरे, त्याच्या चिंता आपण का वाहायच्या? आपण किमान आपलं नागरिक म्हणून जेवढं कर्तव्य आहे तेवढं बजावावं. आपल्याला पुरेशी माहिती नसताना लशीला बदनाम करू नये, कारण सध्या अक्सीर इलाज तर नाहीच.

आता लसच का औषध का नाही याचं उत्तर असंही आहे की लशींबद्दल काही महिन्यांपूर्वी ऐसीवरच आलेले लेख वाचा. लस एवढ्या लवकर का तयार झाली याचं उत्तर त्यात आहे.

Rajesh188 Wed, 17/03/2021 - 19:41

Covid होवून गेल्यावर निर्माण होणारी रोग प्रतिकार शक्ती आणि लस घेतल्या मुळे निर्माण होणारी रोग प्रतिकार शक्ती ह्या मध्ये काय फरक आहे.
कसलेच लक्षण नसलेले covid रुग्णांची संख्या खूप मोठी असावी असा अंदाज आहे.
किती तरी लोकांना covid होवून गेला हे माहीतच पडले नाही.
त्यांनी रोगावर विजय कशाच्या जोरावर मिळवला.

अबापट Wed, 17/03/2021 - 21:40

In reply to by Rajesh188

१..कोविड झाल्यामुळे निर्माण झालेली प्रतिकार शक्ती किती तीव्र स्वरूपाचे इन्फेक्शन झाले होते व त्याला शरीराने त्या वेळी कसा प्रतिसाद दिला त्यावर अवलंबून असते..त्यातून पुरेशी प्रतिकार शक्ती प्रत्येक बधिताला निर्माण होईलच अशी खात्री नसते. (अजून काही दिवसांनी /महिन्यांनी आपल्या शरीरातील कोविड विरोधी न्यूट्र लायझिंग अँटीबॉडी मोजण्याची सोय सामान्य पणे उपलब्ध झाली तर हे मोजताही येईल)
२. लसीमध्ये पुरेसा लागणाऱ्या अँटिजेनचा डोस पुरेशा प्रमाणात असल्याने (व एका महिन्यानंतर त्याचा बूस्टर डोस असल्याने )( आणि या लसीतील अँटीजेन मुळे आजार होत नसल्याने) शरीर पूर्ण क्षमतेने प्रतिकार शक्ती निर्माण करू शकते.
T आणि B नावाच्या पेशींचा प्रतिसाद जोरात तयार होतो. शरीराला या शत्रूची ओळख होते आणि भविष्यात हा शत्रू शरीरात प्रवेश करता झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी शरीर सक्षम रित्या तयारीत असते. (या T आणि B सेल्स काय करतात , बाह्य आक्रमण झाल्यास हे सुलभ भाषेत वाचायचे असेल तर याचे विकी करून बघणे इष्ट)

Rajesh188 Fri, 19/03/2021 - 15:45

In reply to by अबापट

फक्त एकच वर्ष झाले आहे त्या अत्यंत कमी काळात लस निर्मिती करणाऱ्या संशोधक लोकांनी सर्व चाचण्या योग्य प्रमाणात केल्या आहेत का?
साधे प्लास्टर केले तरी ते सुखण्या साठी दोन दिवस जातात.
मग लस नक्की कशी काम करते हे पूर्ण पने समजण्यासाठी एक वर्ष हा काळ पुरेसा नाही
असे माझे मत आहे.
लसी करणं म्हणजे लसी चे दीर्घ कालीन काय परिणाम होतील हा प्रयोग तर नाही ना.
लसीकरण प्रायोगिक नाही ना?

अबापट Fri, 19/03/2021 - 16:32

In reply to by Rajesh188

राजेश भाऊ ,

अत्यंत कमी काळात लस निर्मिती करणाऱ्या संशोधक लोकांनी सर्व चाचण्या योग्य प्रमाणात केल्या आहेत का?
तुमच्या या प्रश्नाचा खुलासा या संस्थळावर वारंवार केला गेला आहे. शिवाय लस निर्मिती आणि त्याच्या चाचण्या याविषयी आपण सहा सात धागे पण काढले आहेत , ते कृपया वाचाल का ? वाचल्यास मनातील बरेच किंतु परंतु कदाचित नाहीसे होतील.

मग लस नक्की कशी काम करते हे पूर्ण पने समजण्यासाठी एक वर्ष हा काळ पुरेसा नाही
असे माझे मत आहे.
हे मत का झाले असेल याबद्दल कल्पना नाही. पुन्हा एकदा विनंती , हे सहा सात धागे आपल्यासाठीच आहेत , ते कृपया वाचावेत.

सामो Mon, 19/04/2021 - 22:15

In reply to by अबापट

लसीमध्ये पुरेसा लागणाऱ्या अँटिजेनचा डोस पुरेशा प्रमाणात असल्याने (व एका महिन्यानंतर त्याचा बूस्टर डोस असल्याने )( आणि या लसीतील अँटीजेन मुळे आजार होत नसल्याने) शरीर पूर्ण क्षमतेने प्रतिकार शक्ती निर्माण करू शकते.

हां हे म्हणजे असेच झाले ना - तुम्हाला (= शरीर) नेतृत्व गुण (= प्रतिकार शक्ती) स्वत:मध्ये निर्माण करायचे आहेत तर तुम्ही आधी गरीब, दुबळ्या लोकांना (अँटीजेन) कोपच्यात घ्या. त्यांच्यावर अरेरावी करुन दाखवा. मग पुरेसा आत्मविश्वास आला की खऱ्या आखाड्यात उतराल तेव्हा यशस्वी व्हालच.
स्वगत आहे प्रश्न नव्हे.

अबापट Fri, 19/03/2021 - 16:37

आयुर्वेद वाचस्पती यांचे जाहीर प्रश्न

सध्या सोशल मीडियावर एकंदरीतच कोरोना आणि लसीबद्दल बरेच लिखाण केले जात आहे. समज गैरसमज इत्यादी. प्रश्न
फेसबुकवर अत्यंत सुप्रसिद्ध ( आणि कदाचित फेसबुकबाहेरही सुप्रसिद्ध ) असे आयुर्वेद वाचस्पती आहेत. ते सातत्याने या विषयावर रोचक लिखाण करत असतात.
दोन तीन दिवसांच्यापूर्वी त्यांनी कोरोना लसीबद्दल जाहीर प्रश्न जे त्यांना मूलभूत वाटतं आहेत , ते लिहिले आणि त्याची उत्तरे मागितली.
श्री भूषण पानसे यांनी त्यांच्या वॉल वर जाऊन खुलासे केले.
काय स्वरूपाचे लिखाण होते व काय स्वरूपाचे प्रश्न असतात याचे उदाहरण म्हणून त्यांचा संवाद इथे देत आहे .
१. कोविड संसर्ग होऊन गेलेल्या आणि शरीरात अँटिबॉडी तयार आहेत अशा व्यक्तींनी लस घेण्याची वैद्यकीय दृष्ट्या काही आवश्यकता आहे का?

कोविड संसर्ग झालेल्या प्रत्येक माणसाच्या शरीरात पूर्ण प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी लागणाऱ्या पुरेशा अँटीबॉडीज ( म्हणजे पुरेशा न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज ) तयार होतातच असे नाही. ( याची अनेक शास्त्रीय कारणे आहेत , अगदी किती सीव्हीयर इन्फेक्शन झाले होते , तेव्हा प्रतिकारप्रतिसाद निर्माण झाला वगैरेंसह ) . मुळात पाच टाईपच्या अँटीबॉडीज असतात .... वेळ आणि जागेअभावी त्याबद्दल जास्त माहिती लिहीत नाही. विषयांतर होईल .

मूळ प्रश्नाला उत्तर : वैद्यकीय दृष्ट्या आवश्यकता आहे .

२. लसीचे दोन डोस घेतल्यावर विषय संपणार आहे की इथून पुढे दरवर्षी लस घ्यायची आहे?

आत्ताच्या घडीला याची शक्यता कमी वाटते . अर्थात भविष्यकाळात विषाणूमध्ये मोठ्या प्रमाणावर म्युटेशन होऊन त्याचे स्ट्रक्चर बदलले तर होऊ शकते .
इन्फ्लुएंझाच्या बाबतीत हे कॉमन आहे आणि देवीच्या बाबतीत अजिबात कॉमन नाही . हे दोन्हीही विषाणूजन्य आजार आहेत . (म्युटेशन होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आत्ताही या विषाणूत म्युटेशन्स झाली आहेतच , फक्त ती पुन्हा लसीकरण करायला लागतील अशी नाहीत . पुढे होतील का ? होऊ शकतात . म्युटेशन्स विशेषतः RNA विषाणूंची, हा एक वेगळा व मोठा विषय आहे. वेळ आणि जागेअभावी त्याबद्दल जास्त माहिती लिहीत नाही. विषयांतर होईल )

३. लस घेतल्यानंतर करोना संसर्ग होणारच नाही का? झाल्यास लस घेतलेली व्यक्ती वाहक बनून संसर्ग पसरवणार नाही का?

लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर पंधरा दिवसांनी प्रोटेक्टिव्ह इम्युनिटी तयार होते. यानंतरही क्वचित कोरोना इन्फेक्शन होऊ शकते , पण झाले तरी आजार बळावून गंभीर होण्याची शक्यता अजून कमी . मृत्यू होण्याची शक्यता जवळ जवळ शून्य .
अशी क्वचित इन्फेक्शन झालेली व्यक्ती संसर्ग पसरवू शकते.

आत्तापर्यंत भारतात ६३ लाख ४० हजार ८१५ लोकांना लसीचे दोन्ही डोस दिले गेले आहेत . ( हा आकडा वाढत जाणार आहे , कारण पहिला डोस घेतलेल्यांची संख्या आजतागायत २ कोटी ९२ लाख , १४ हजार ३६ आहे) यातील कुणाला पुन्हा कोरोना इन्फेक्शन झाल्यास ती नक्कीच ब्रेकिंग न्यूज होईल . अशा किती होतात त्याकडे लक्ष ठेवले तर वर काय म्हणत आहे ते कदाचित पटेल.

४. दोन्ही डोस घेऊन महिना वा अधिक कालावधी झाल्यावर ताप, अंगदुखी, खोकला इ. लक्षणे घेऊन आलेल्या रुग्णांना RT PCR करणे बंधनकारक असेल की नाही?

बंधनकारक असेल किंवा कसे हे केंद्र सरकारची ICMR ही संस्था ठरवते त्यामुळे त्याचे उत्तर मी देऊ शकत नाही . वैयक्तिक मत असे की एनीवे याची शक्यता कमी , त्यात झाले तर करून घ्यावे.

५. अशा रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांचे विलगीकरण बंधनकारक असेल की नाही?

अर्थात .

आपल्यापैकी कोणी ही उत्तरं 'केवळ उपरोल्लेखित स्रोतांकडूनच' वाचली असल्यास कृपया कमेंटमध्ये लिंक द्यावी ही विनंती. अन्य कोणाही वैद्यकीय तज्ज्ञाचे 'वैयक्तिक मत' मला अपेक्षित नाही.

अबापट Mon, 22/03/2021 - 19:53

येवल्याच्या IMA हेड असं सांगणाऱ्या डॉ सुदाम पाटील यांच्या गैरसमज पसरवणाऱ्या पोस्टवर आज डॉ. विनिता बाळ यांनीही खुलासा केला. श्री संदीप देशपांडे यांच्या सौजन्याने तो खुलासा इथे आणत आहोत. डॉ. विनिता बाळ यांचे आभार . संदीप देशपांडे यांचेही आभार.

डॉ सुदाम पाटील, IMA President, येवला यांनी लिहिलेली एक पोस्ट अनेकांनी वाचली असेल. त्यात त्यांनी १४ मुद्दे मांडून सध्या मिळणारी लस ही निरुपयोगी असण्याचीच शक्यता का आहे, आणि वरदानाऐवजी लसीकरण शाप का ठरेल असे मांडले आहे. त्यातल्या अनेक गोष्टी या पुरेशा माहितीअभावी लिहिल्या असाव्यात.

लसीला सर्वसामान्य वापरासाठी मान्यता मिळण्याआधी अनेक चाचण्या पास कराव्या लागतात. त्यावेळी ती कुठल्या तपमानाला किती काळ stable राहू शकते याविषयीच्याही चाचण्या होतात. लस निर्माण करणाऱ्या भारतातील कंपन्यांना स्थानिक सोई काय असतात याविषयी सुद्धा कल्पना असते. त्यामुळे डॉ पाटील यांनी केलेल्या विधानांविषयी शहानिशा करण्याची गरज आहे.

-- आज वापरात असलेल्या दोन्ही लसीच्या दीर्घकाळ storage साठी room temperature चा वापर करू नये हे योग्य. त्यासाठी २-८ सें. तपमान गरजेचे. पण injection देतांना औषध/लस ही room temperature ला असावी. त्यामुळे १० ml ची लसीची vial/बाटली वापरायला काढली आणि ती पुढल्या १५ मिनिटात वापरून संपणार असेल तर बर्फात ठेवण्याचा आग्रह धरण्याची गरज नाही. एव्हढ्या काळात लस खराब होत नाही, ती उपयोगी पडते.
-- लसीच्या storage फॅसिलिटी पासूनच्या प्रवासात शीत साखळी नक्कीच गरजेची. पण प्रत्यक्ष लसीकरणावेळी - जेव्हा अनेक रांगेत माणसे उभी राहून लस घेतात - तेव्हा याची गरज नाही.
-- सध्या कोविडच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात वेगाने वाढते आहे. अशा वेळी जितक्या लोकांना लस मिळेल त्यांनी ती जरूर घ्यावी. दोन्ही लसी सुरक्षित आहेतच पण त्या कोविडच्या गंभीर आजारापासून नक्की संरक्षण देतात. जी लस प्रथम घेतली तिचाच दुसरा डोस साधारण ४ आठवड्यांनी घ्यावा.
-- लसीकरणानंतर सुद्धा कोविड झाल्याच्या बातम्या आपण वाचतो. त्यात ३ मुद्दे आहेत.
(१) दुसऱ्या डोस नंतर १५ दिवसांनी पुरेशी प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्याआधी कोविड होऊ शकतो.
(२) लस घेणाऱ्या १००% लोकांना संरक्षण मिळत नाही. तरीही समाजातल्या रोग होणाऱ्या माणसांची संख्या कमी होतेच. तो फायदा महत्त्वाचा.
(३) सध्या कोविडच्या विषाणू मध्ये mutations होत असल्याच्या बातम्या आहेत. बरीच mutations असणारा विषाणू लसीच्या तडाख्यातून सुटू शकतो, हे लक्षात ठेवायला हवे. अशा घटनांची संख्याही सार्वत्रिक लसीकरणाने कमी होईल.

-- थोडक्यात, कोविड पासून बचाव करण्यासाठी लस उपयुक्त आहे.
-- सध्या लसीकरणाची वापरली जाणारी पद्धत पुरेशी योग्य आहे.
-- लसीमुळे होणारे थोडे त्रास हे आजारी पडण्याच्या त्रासापेक्षा पुष्कळ कमी आहेत.
-- लस घेतली तरी मास्क, माणसा-माणसातलं शारीरिक अंतर राखणं आणि वैयक्तिक स्वच्छता याशिवाय पर्याय नाही.

डॉ विनीता बाळ
निवृत्त शास्त्रज्ञ, नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इम्युनॉलॉजी, नवी दिल्ली.

अबापट Mon, 22/03/2021 - 20:13

गेल्या आठवड्यात सर्वश्री मिलिंद पदकी ,संदीप देशपांडे श्री भूषण पानसे आणि श्री चिंतातुर जंतू यांच्यात चर्चा होऊन हे लिहिले होते ( प्रकाशित करण्याचे राहिले )
Astra_Zeneca लसीच्या हाताळणीविषयी: १. सहा तासापर्यंत , ३० डिग्री सेंटीग्रेडला लस खराब होत नाही. त्यापलीकडे नको. तसेच एका बाटलीत दहा डोस असतात. ते सर्व वापरले जावेत आणि उरलेले फेकून दिले जावेत अशी अपेक्षा आहे.
एका व्हायल मध्ये दहा डोस असतात , आपल्याकडे लस घ्यायच्या रांगेत त्याहून खूप जास्त लोकं असतात. त्यामुळे ' उरलेली लस ' खराब शक्यता नसते.
२. लस दोन ते दहा डिग्री टेम्परेचरला ठेवून लस देत नाहीत . इंजेक्शन देताना ती शक्य तितकी रूम टेम्परेचरला असावी असा प्रघात आहे. पण केवळ अर्धा मिलिलिटर इतकाच व्हॉल्युम टोचला जात असल्यामुळे, थोडीशी थंड असली तर काही बिघडत नाही. ३. सूर्यप्रकाशातही अधिक काळ नको. मात्र वापरताना थोडासा प्रकाश पडला तर लगेच खराबी होणार नाही. ४. या कशानेही लसीचे "डिस्टिल्ड वॉटर" होत नाही, पण त्यातली नाजूक सेंद्रिय संयुगे नक्कीच खराब होतात. त्यामुळे काळजी घ्यायला हवीच. ५. लस कशी हाताळावी यावर कंपन्यांच्या उत्तम सूचना असतात. हे प्रशिक्षण देणे-घेणे फार अवघड नाही.

https://www.hse.ie/.../covid19vacci.../sopastrazeneca.pdf...

भारतात अशा पद्धतीचे कोल्ड चेन मेंटेन करून लसीकरण यापूर्वी अनेकदा अनेक लसींच्या बाबतीत केले गेले आहे . फक्त तेव्हा चर्चा होत नसे एवढी.

कोल्ड चेन मेंटेन करणे हे पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे 'जटिल ' वगैरे अजिबात नसते. लस सोडा , अनेक फूड इंडस्ट्रीज यापेक्षा कमी तापमानाची कोल्ड चेन आरामात आणि व्यवस्थित मेंटेन करून निर्यात करत आहेत .
भारतातील मीट इंडस्ट्री तर -२० ची कोल्ड चेन मेंटेन करून कारखान्यापासून ट्रकने पोर्ट ला नेऊन तिथून जहाजाद्वारे अगदी वाळवंटी देशात वर्षानुवर्षे निर्यात करत आहेत. आईस क्रिम हेही कारखान्यापासून रिटेलर पर्यंत -१६ डिग्रीची कोल्ड चेन मेंटेन करून पाठवतात वर्षानुवर्षे.
त्यामानाने २ ते १० डिग्री ची कोल्ड चेन मेंटेन करणे हे खूप सोपे काम आहे .
या तथाकथित डॉक्टर साहेबाना बाहेरच्या जगात काय चाललं आहे याबद्दल काहीही माहिती नसावी म्हणून हे उगा नाही ते गैरसमज पसरवत आहेत.

असल्या भडकावू अर्धसत्य माहितीवर आधारित मेसेज कडे दुर्लक्ष करावे .
टीप : या पोस्ट मध्ये फक्त कोविशील्ड चा उल्लेख आहे परंतु कोवॅक्सिन साठवण्याचे तापमानही कोविशील्ड इतकेच आहे , २ ते १० डिग्री , म्हणजे आपल्या घरातील फ्रिज मध्ये असते ते .

नितिन थत्ते Wed, 24/03/2021 - 00:00

In reply to by अबापट

मला आय एम ए च्या साइटवर सुदाम पाटील नावाचे कोणी अध्यक्ष असल्याचे आढळले नाही.

मिलिन्द Thu, 25/03/2021 - 03:34

कोव्हीड-१९ मध्ये दोन प्रकारच्या अँटीबॉडी टेस्ट केल्या जातात:
"N" प्रथिन: जे व्हायरस मधले सर्वात मोठे, आणि म्हणून सापडायला सोपे. रोगनिदानासाठी उत्तम उपयोगी. मात्र याविरुद्ध लस निर्माण करून फारसा उपयोग नाही, कारण हे व्हायरसच्या पोटात असते, बाह्य पृष्ठभागावर नाही. त्यामुळे अँटीबॉडी वापरून व्हायरसला "पकडण्यासाठी" याचा उपयोग नाही.
"S" प्रथिन: हे व्हायरसच्या बाह्य पृष्ठभागावर असते आणि अँटीबॉडी याला पकडते आणि व्हायरसला नष्ट करण्याची प्रक्रिया सुरु करते.
(चित्रात दोन्ही प्रथिने दिसतील) .
- नव्या विज्ञानानुसार, केवळ "एस" प्रथिन धरता आले की पुरेसे आहे असे मानून, ते अँटीजेन म्हणून निर्माण करणारी , एम आर एन ए (फायझर, मॉडर्ना ), डी एन ए (कोव्हीशील्ड), किंवा ते प्रथिनच थेट टोचणारी "सब -युनिट" व्हॅक्सीन्स तयार केली जातात. व्हायरसमध्ये निदान २९ इतर प्रथिने आहेत, पण त्यांना पकडण्यात इम्यून सिस्टीमचे रिसोर्सेस वाया घालविण्यात अर्थ नाही असा विचार यामागे असतो.
- इन्फेक्शन आहे का हे बघायला "एन" प्रथिनाची टेस्ट चालेल, पण व्हॅक्सिन लागू पडले आहे का हे बघायला "एस" प्रथिनाविरुद्धच्या अँटीबॉडीची टेस्ट करणे आवश्यक आहे.

प्रभुदेसाई Fri, 02/04/2021 - 13:01

https://apnews.com/article/can-i-take-painkillers-before-after-covid-19-...
मला ही लिंक मिळाली. अबापट प्लीज वाचा आणि सांगा.
बऱ्याच लोकांनी क्रोसिन घेतले होते. गयी भैस पानीमे. सरकारचा पैसा पाण्यात गेला. वाचून वाईट वाटले.

राजेश घासकडवी Sun, 04/04/2021 - 15:34

लस घेतल्याचा परिणाम म्हणून काही लोकांना किंचित ताप, अंगदुखी वगैरे लक्षणं दिसतात. हे अर्थातच कुठलीही लस टोचल्यावर अपेक्षितच असतं. मात्र काही लोकांना काहीच त्रास होत नाही. याचा अर्थ त्यांची रोगप्रतिकारकशक्ती अधिक आहे असं म्हणता येईल का? किंवा कोरोनाशी लढण्यासाठी जी रेण्विक माहिती आवश्यक असते ती आधीपासूनच आहे असं काही असतं का?

अबापट Sun, 04/04/2021 - 22:11

In reply to by राजेश घासकडवी

नाही हो गुर्जी . काहींना त्रास होतो आणी काहींना हा किरकोळ त्रास होत नाही त्याचा रेण्विक वगैरे माहितीपर्यंत संबंध जोडू नका कृपया.
त्रास झाला म्हणजे प्रतिकार शक्ती रीस्पॉन्ड करत आहे आणि त्रास नाही म्हणजे काही उपयोग नाही , प्रतिकारशक्ती रीस्पॉन्ड करत नाहीये अशी नवी अंधश्रद्धा प्रसार पावलीय सध्या. तसे नाहीये काही

राजेश घासकडवी Mon, 05/04/2021 - 00:53

In reply to by अबापट

मला योग्य तांत्रिक शब्द माहीत नव्हता. माझा जनरल प्रश्न खालीलप्रमाणे

समजा हजार लोकांना लस टोचल्यावर लोकांवर होणाऱ्या परिणामांची तीव्रता मोजली. (त्यांतल्या कोणालाही सुप्त करोना नाही असं गृहित धरू) आणि ती ० (काही परिणाम नाही) ते १०० (मोजलेल्यातला सर्वांत तीव्र परिणाम) याप्रमाणे स्केल केली. आता ० ते १० स्कोअर येणारे लोक, ४५ ते ५५ स्कोअर येणारे लोक, आणि ९० ते १०० स्कोअर येणारे लोक, या तीन गटांत सरासरी काही फरक असतील का? का ही ० ते १०० रेंज इतकी लहान आहे की हा अभ्यासच स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट नाही? की लशीमुळे येणारे परिणाम हे पूर्णपणे रँडम असतात? थोडक्यात या ० ते १०० रेंजचं अंडरलाइंग कॉज काय?

अबापट Mon, 05/04/2021 - 05:32

In reply to by राजेश घासकडवी

तत्वतः हा सर्व अभ्यास करता येईल व तुम्ही जे उत्तर शोधत आहात ते नक्की मिळू शकेल .
माझ्या मर्यादित माहितीनुसार अगदी असा नसला तरीही याच्या जवळचा म्हणावा असा अभ्यास चालतोही , पण तो फक्त लस रिलीज झाल्यानंतर काही ठराविक ग्रुपवर . आणि तेही बहुधा ( माझी माहिती अत्यंत मर्यादित आहे , कदाचित मला माहिती नसेल म्हणून मी हे सांगत असेन )
परंतु संपूर्ण जनसमूहावर हा अभ्यास सुरु असणे अवघड दिसते सध्यातरी.
सध्या महासाथ सुरु आहे. आपल्यासारख्या देशातील तुटपुंजे रिसोर्सेस हे अशा अभ्यासापेक्षा बेसिक हेल्थकेअर कडे वळले असतील. कदाचित श्रीमंत देशांच्यामध्ये असा अभ्यास झाला तर आपल्याला त्याचे निष्कर्ष वाचायला मिळू शकतील.

राजेश घासकडवी Mon, 05/04/2021 - 15:16

In reply to by अबापट

या विशिष्ट लशीबाबत अभ्यास आहे का, करावा का, आत्ताच करावा का, हे प्रश्न मी विचारत नाहीये. आत्तापर्यंत अब्जावधींना इतर लशी दिल्या आहेत. त्यातून काही अनुभवात्मक किंवा सैद्धांतिक उत्तर आहे का? उत्तर माहीत नसेल तर तसं सांगा, पण प्रश्न भरकटवू नका.

माझं आत्यंतिक तुटपुंजं ज्ञान मला सांगतं की लशीत विषाणूंचे अवशेष असतात. त्यामुळे त्या विषाणूंचा प्रतिरोध करण्यासाठीच्या ऍंटिबॉडीज शरीर तयार करतं. हे होईपर्यंतच्या कालावधीत विषाणूचे तुकडे पुनरुत्पादन करू शकत नसल्यामुळे रोग होत नाही. मात्र काही कारणाने काहींना याची प्रतिक्रिया येते, काहींना ती तीव्र असते, काहींना ती कमी तीव्र असते, काहींना नसते.

कोणी जर अशा लोकांकडे पाहिलं आणि म्हटलं, 'ओह, तुला प्रतिक्रिया आली नाही म्हणजे तुझी लसपूर्व इम्युनिटी चांगली, याला मंद प्रतिक्रिया आली म्हणजे याची लसपूर्व इम्युनिटी मध्यम आणि हिला तीव्र प्रतिक्रिया आली म्हणजे हिची लसपूर्व इम्युनिटी कमी' तर हे विधान बरोबर ठरेल का?

दुसऱ्या प्रकारे विचारायचं झालं तर ज्या व्यक्तीच्या शरीरात आधीच ऍंटिबॉडीज आहेत तिला लसोत्तर प्रतिक्रिया शून्य आणि जिच्या शरीरात ऍंटिबॉडीज नाहीत तिला मध्यम/तीव्र प्रतिक्रिया येईल असं म्हणणं बरोबर का?

चिंतातुर जंतू Mon, 05/04/2021 - 15:28

In reply to by राजेश घासकडवी

कोणी जर अशा लोकांकडे पाहिलं आणि म्हटलं, 'ओह, तुला प्रतिक्रिया आली नाही म्हणजे तुझी लसपूर्व इम्युनिटी चांगली, याला मंद प्रतिक्रिया आली म्हणजे याची लसपूर्व इम्युनिटी मध्यम आणि हिला तीव्र प्रतिक्रिया आली म्हणजे हिची लसपूर्व इम्युनिटी कमी' तर हे विधान बरोबर ठरेल का?

दुसऱ्या प्रकारे विचारायचं झालं तर ज्या व्यक्तीच्या शरीरात आधीच ऍंटिबॉडीज आहेत तिला लसोत्तर प्रतिक्रिया शून्य आणि जिच्या शरीरात ऍंटिबॉडीज नाहीत तिला मध्यम/तीव्र प्रतिक्रिया येईल असं म्हणणं बरोबर का?

हे वाचून काही उत्तर मिळतंय का पाहा :
If You Don’t Have COVID Vaccine Side Effects, Are You Still Protected?

राजेश घासकडवी Wed, 07/04/2021 - 13:54

In reply to by चिंतातुर जंतू

धन्यवाद. म्हणजे लशीच्या प्रतिक्रियेच्या तीव्रतेमागे काही कारण असलंच ते मला वाटलं त्याच्या विरुद्ध आहे.

प्रभुदेसाई Wed, 07/04/2021 - 15:55

In reply to by Nile

आचरटपणा
हे बहुतेक माझ्या साठी असावे. ठीक आहे. पण एक गोष्ट चांगली आहे. आचरटपणा करतो म्हणून कोविड हल्ला करत नाही का विद्वान आहे म्हणून माफ करत नाही. शिवाय ह्या विश्वात कित्येक आचरट प्रश्न अनुत्तरीत आहेत. तेव्हा आपला आचरटपणा आपल्यापाशीच ठेवावा हे उत्तम.
बाकी प्रश्न विचारण्याची ही पद्धत फारच छान .

चिमणराव Tue, 06/04/2021 - 10:59

म्हणजे असं की 'शंका निरसन' धागा आहे म्हणून शंका विचारत होतो. आणि उत्तरं / निरसन तिथेच होत गेल्याने धागा संपूर्ण होण्यास मदत होते.
शंकांची उत्तरं देणारी बरीच माहिती स्थळं {इंग्रजीत} जालावर माहिती ओतत आहेतच. ती मी वाचतोच. पण इथे मराठीत डबल बॉइल्ड सार वाटीत/द्रोणात मिळतं. श्री अबापट या प्रश्नांवर मागच्या वर्षापासून जीवतोड काम करत आहेत हे आपण बघतोच. आमच्या अण्णांना कोण रे त्रास देतोय?
बाकी शंका न विचारल्याने हुश्श होण्याने नुकसानच आहे. काही सटरफटर लांबण लावून वेळ घालवणे/ घालवणारे यासाठी एक इंग्रजी शब्द आहे पण आता आठवत नाही ये. मी नाही त्यातला.

Rajesh188 Thu, 08/04/2021 - 02:33

भारतात लसीकरण चालू केले आणि बाधित लोकांची संख्या प्रचंड वाढली.
जगातील बाकी देशात लसीकरण चालू आहे .
.......असा कोणता देश आहे का ?
ज्या देशात लसीकरण केल्या मुळे covid चे रुग्ण कमी झाले आहेत..
सध्या फक्त
अमेरिका,ब्राझील,भारत ही त्रिमूर्ती च बाधित आहे.
चीन मध्ये लॉक down सुद्धा नाही आणि रुग्ण पण नाहीत
उजव्या विचारसरणीच्या देशात च covid रुग्ण जास्त आहेत..
उजवे म्हणजे भांडवल वादी
ह्या angle पण विचार करायची वेळ आली आहे.
माझ्या पाहण्यात असंख्य लोक आली कसलेच लक्षण नाही पण जबरदस्ती नी covide टेस्ट ल बळी पडून टेस्ट मध्ये ते positive आलेत.
अगदी तंदुरुस्त .
आणि मरायला टेकलेले रुग्ण पण covide टेस्ट निगेटिव्ह..
त्यांना उपचार मात्र covid चे.
हा कोणता चमत्कार आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 08/04/2021 - 07:11

In reply to by Rajesh188

तुम्ही लिहीत राहा. किमान लोकांचे कायकाय गैरसमज आहेत, हे तरी दिसत राहतं.

Rajesh188 Thu, 08/04/2021 - 10:50

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सामान्य लोक त्यांना जो अनुभव येतो त्या वरून मत बनवत असतात.
माझ्या पाहण्यात जवळचे ५० तरी कोरोनाबधित लोक आली .त्या मधील कोणालाच जास्त काही त्रास झाला नाही.काही ना तर बिलकुल कोणतीच लक्षण नव्हती फक्त एकच व्यक्ती गंभीर झाला त्याला व्हेंटिलेटर गरज लागली पण आश्चर्य हे की त्याचा रिपोर्ट negetive आला.

चिंतातुर जंतू Thu, 08/04/2021 - 11:28

In reply to by Rajesh188

माझ्या पाहण्यात जवळचे ५० तरी कोरोनाबधित लोक आली .त्या मधील कोणालाच जास्त काही त्रास झाला नाही.काही ना तर बिलकुल कोणतीच लक्षण नव्हती

असेच लोक टेस्ट न करता हिंडत असतील आणि खबरदारी न घेता रोग पसरवत असतील आणि म्हणून परिस्थिती गंभीर झाली आहे अशी शक्यता जाणवते का तुम्हाला?

Rajesh188 Thu, 08/04/2021 - 11:55

In reply to by चिंतातुर जंतू

कोणतीच लक्षण नसलेल्या लोक कडून रोग प्रसार होत असावा हे खरेच आहे.
पण कोणतीच लक्षण नसताना सरसकट सर्व लोकांची टेस्ट करणे भारतात तरी अशक्य आहे.
आता च फक्त लोक संख्येच्या एक दोन parcent लोकच मुंबई मध्ये रोज टेस्ट करत असतील तरी रिपोर्ट येण्यासाठी आता तीन दिवस लागतात.
तीन दिवसाच्या आत रिपोर्ट मिळणे कठीण झाले आहे.
सर्व लोकांची टेस्ट केली तर रिपोर्ट यायला सहा महिने लागतील( हा जोक नाही लॅब ची कार्यक्षमता तेवढीच आहे) .
स्वतःचा बचाव स्वतःच करणे हैं लोकांचे कर्तव्य आहे.
बस हाच एकमेव मार्ग आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 08/04/2021 - 20:18

In reply to by Rajesh188

तो बचाव करण्यासाठीच लस आहे.

लशीमुळे करोना होत नाही. ते कावळा बसायला आणि फांदी तुटायला, असं झालेलं असू शकतं. म्हणजे, आधीच लागण झालेली होती पण लक्षणं नव्हती. मग लस घेतली; आणि नंतर लक्षणं दिसायला लागली.

किंवा लस घेतली तरीही माणसांना लागण होऊन ते करोनाचा डोस इतरांना देऊ शकतात. करोना हा विषाणू, त्यामुळे होतो तो रोग कोव्हिड. लस घेतलेल्या लोकांना कोेव्हिड हा रोग होण्याची शक्यता बरीच कमी होते, रोगामुळे दगावण्याची शक्यता अगदीच शून्य होते, पण ज्यांना त्यांच्यामुळे लागण होईल त्यांनी लस घेतलेली नसेल तर त्यांना रोग होऊ शकतो. भारताच्या वेगवेगळ्या भागांत राहणारे लोक इथे आणि फेसबुकवर म्हणताना दिसत आहेत की, हे लस घेतलेले लोक आता सगळीकडे मास्कांशिवाय, कसलेही धरबंध न पाळता फिरताना दिसत आहेत. त्यांच्यामुळेही नवीन लाट येण्यात भर पडली असू शकते.

शिवाय भारतात विषाणूचं नवं म्यूटेशन दिसत आहे. तो म्यूटेशन आधीपेक्षा अधिक वेगानं पसरणारं आहे, अशा प्राथमिक बातम्या आहेत.

अशा परिस्थितीत आपल्याला लागण होऊ नये, आणि झालीच तर आपल्यामुळे इतरांना लागण होऊ नये याची खबरदारी घेणं एवढाच पर्याय आहे. माणसांना लागण झाली नाही तर नवी म्यूटेशनं येणार नाहीत. यासाठी सध्या काळजी घेणं आणि लस घेणं वगळता काहीही पर्याय नाही. पुढेही रोग होणारच नाही अशी लस आल्यावर लशीला पर्याय नसेल.

अबापट Thu, 08/04/2021 - 07:59

In reply to by Rajesh188

राजेश सर, ग्रेट ब्रिटन मध्ये लसीकरण खूप झाल्यावर बधित लोकांचा आकडा एकदम खाली आल्याची बातमी वाचली नाहीत का ?

Rajesh188 Fri, 16/04/2021 - 02:15

In reply to by अबापट

तरी corona होण्याचे उदाहरण जगात सापडू लागली .
तेव्हा असा युक्तिवाद करण्यात आला की लस घेतल्या मुळे corona होणार नाही असे नाही.
लस घेतली तरी मास्क, sanitizer,social distance palave लागेल.
लस घेतल्या मुळे फक्त आजाराची तीव्रता कमी होईल आजार होणारा नाही असे नाही.
असे सिरम चे पुना वाला आणि अनेक तज्ञ
लोक बोलली होती .
मास्क,sanitizer,social distance he corona पासून बचाव करतात आणि लस आजाराची तीव्रता कमी करते .
असाच ह्याचा अर्थ होतो.
ब्रिटन मध्ये जे covid चे रुग्ण कमी झाले आहेत त्याला कारण फक्त लसीकरण आहे असे समजणे खरोखर शास्त्रीय दृष्ट्या योग्य आहे का?
की प्रतिबंधित उपाय(मास्क etc) आणि लस ज्यांनी रोगाची तीव्रता कमी झाली अशी दोन सामाईक कारण आहेत.
की ब्रिटन मध्ये corona सर्वोच्य पातळीवर पोचून त्याला उतरती कळा लागली.
जे नैसर्गिक आहे.
नक्की कोणते कारण असावे ?

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 17/04/2021 - 00:07

In reply to by Rajesh188

तेव्हा असा युक्तिवाद करण्यात आला की लस घेतल्या मुळे corona होणार नाही असे नाही.

हा युक्तिवाद नाही. लशीमुळे करोनाचा संसर्गच होणार नाही, असा दावा केलेला नव्हताच.

अबापट Tue, 13/04/2021 - 19:21

In reply to by मार्मिक गोडसे

डॉ रवी गोडसे बऱ्याच वेळी अशास्त्रीय बोलतात त्यामुळे त्यांचे व्हिडीओ पूर्ण बघण्याचे धैर्य माझ्यात उरले नाहीये.

बातमी बद्दल म्हणाल तर ती माहिती सांगतो.
स्पुटनिक 5 नावाच्या लसींच्या फेज 3 चाचण्या डॉ रेड्डी लॅब ने conduct केल्या, व त्याचा डेटा subject expert कमिटीला दिला.
या कमिटीने तो डेटा बघून या लसीला मान्यता द्यावी अशी शिफारस केली आहे.
मान्यता DCGI नावाची संस्था देते. तिने आता इमर्जन्सी अप्रुव्हल द्यावे अशी अपेक्षा आहे (खरं तर ही फॉर्मलिटी असते, कधी पार पडते ते बघुयात)
ही लस वाईट असण्याचे काही कारण दिसत नाही.
देशाच्या पुढे असलेले मे महिन्यात येऊ घातलेले एक man made संकट टळायला याने थोडीफार मदत व्हावी
(मार्मिक शेठ , रवी गोडसे तुमचे कुणी नाहीत ना ?)

मार्मिक गोडसे Tue, 13/04/2021 - 20:39

स्पुट्नीक लसीत दोन वाहक वापरल्याने ती अधिक परिणामकारक का ठरते ह्याचे डॉक्टरांनी वाहक म्हणून बस आणि ट्रेनचे उदाहरण दिले आहे. हे कितपत खरं आहे? खरं असेल तर कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यावर २१ दिवसांनी दुसरा डोस स्पुटनिक लसीचा चालू शकतो का? कारण वाहक वेगळा आहे . दुसऱ्या डोससाठी ४५ - ६० दिवस थांबायला लागणार नाही.

डॉक्टर माझे कोणीही लागत नाहीत , असते तर त्यांनाच थेट शंका विचारली असती.

अबापट Wed, 14/04/2021 - 06:21

In reply to by मार्मिक गोडसे

बस आणि ट्रेनचे उदाहरण जाउ द्यात आपण शास्त्रीय बोलूयात.

कोविशिल्ड चा पहिला डोस घेतल्यावर 21 दिवसांनी

स्पुटनिकचा दुसरा डोस घेतला तर चालेल का ?
माहीत नाही..
कारण अशी एकही चाचणी एकाही माणसावर अद्याप केलेली नाही.
शिवाय सरकार असे करू देईल असेही वाटत नाही.

Rajesh188 Mon, 19/04/2021 - 21:21

पण माझ्या साठी गहन आहेत.
लस घेतल्या मुळे आपली जी रोगास प्रती बंद करणारी यंत्रणा आहे ती.
1) रोग कारक विषाणू,जिवाणू ची ओळख सहज पटवते जे लस न देता आपली रोग प्रतिबंध क यंत्रणा
ती ओळख सहज पटवू शकत नाही तिला वेळ लागतो..
२) ओळख पटली की त्या विषाणू ,जिवाणू चा विनाश केले जातो.
इथ पर्यंत समजले आहे.
आता खरा प्रश्न हा आहे.
रोग झाल्यावर आपण जी औषद वापरतो ती सुद्धा रोग प्रतिकार यंत्रणेचा वापर करून च जिवाणू ,विषाणू चा नाश करतात का?. .
औषध आणि लस ह्या दोन्ही मध्ये प्रत्यक्ष युद्ध भूमीवर लढणारी यंत्रणा ही एकच म्हणजे आपली रोगप्रतिकार करणारी यंत्रणा च असते .
की काही वेगळे उत्तर आहे.
आता दुसरा प्रश्न हा आहे.
स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी जीव उत्क्रांत होतात किंवा त्यांच्या उत्परिवर्तान होते.
त्यांना अस्तित्व टिकवणे जेव्हा अवघड होते तेव्हाच हे घडत की असे काही नाही ती एक सरळ प्रोसेस आहे.?.
मग आपण लस दिल्यानंतर,औषध घेतल्या नंतर,किंवा नैसर्गिक प्रतिकार शक्ती च्या हल्ल्या मुळे जिवाणू आणि विषाणू ह्यांचे अस्तित्व धोक्यात येते म्हणून त्यांच्यात mutation घडून येते.
जेवढं आपण त्यांना विरोध करू तेवढे लवकर ते स्वतः मध्ये बदल करून टिकून राहण्याचा प्रयत्न करतील हे बरोबर आहे का?
विरोध झालाच नाही तर ते लवकर मानवी शरीरात जुळवून घेवून रोग निर्माण करणार नाहीत कारण त्यांचे अस्तित्व च धोक्यात असणार नाही..
हा विचार योग्य आहे का?
प्रश्न अतिशय फालतू असू शकतात पण ते प्रश्न मला तरी पडले आहेत..
सांभाळून घ्यावे .
आणि शंका निरसन करावे.