Skip to main content

पॅरिस पर्यावरण शिखरपरिषद २०१५

पॅरिसमधल्या पर्यावरण शिखरपरिषदेची (COP21) सांगता १२ डिसेंबर २०१५ ला झाली. त्या दिवशी UNFCCC (United Nations Framework Convention on Climate Change) मधल्या १९५ देशांनी आणि युरोपियन राष्ट्रसंघटनेने ‘पॅरिस करार’ एकमुखाने मान्य केला. या करारांतर्गत जागतिक इंधन वापर (emissions) कमी करून हरितगृह-वायूंवर (greenhouse gas) नियंत्रण आणणे मान्य केले गेले. ‘जागतिक तापमानवाढीमुळे जगाच्या पर्यावरणासाठी निर्माण झालेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी झालेला एक ऐतिहासिक करार’ असा माध्यमांतून बोलबाला झाला, आणि त्याचप्रमाणे त्याच्या मर्यादांची आणि यशापयशांचीही चर्चा झाली. या लेखामध्ये कराराची मूळ उद्दिष्ट्ये, यशापयशाच्या शक्यता आणि अपेक्षित परिणाम इत्यादि बाबींचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.

मूळ मसुद्याप्रमाणे या पॅरिस कराराची प्रमुख उद्दिष्टे अशी होती:

१) मानवसमाजांचं औद्योगिकीकरण होण्यापूर्वी पृथ्वीवर सरासरी तापमान जितकं होतं, त्यापेक्षा २ अंश सेल्सिअस जास्त एवढ्या मर्यादेत जागतिक तापमानवाढ रोखणे.
२) तापमान वाढीमुळे पर्यावरणावर होण्याऱ्या घातक दुष्परिणामांशी सामना करण्याची क्षमता जागतिक पातळीवर वाढवणे.
३) अपारंपारिक ऊर्जा स्रोतांच्या प्रसारासाठी आणि त्यावर आधारित विकासासाठी आर्थिक गुंतवणूक उपलब्ध करून देणे.

जो मसुदा या कराराअंतर्गत मंजूर केला गेला त्यानुसार या करारातील फक्त दोनच कलमे सदस्य देशांसाठी कायदेशीररित्या बांधील आहेत. ती खालीलप्रमाणे:

१) प्रत्येक सदस्य देशाने आपल्या इंधन उत्सर्जन कमी करण्याच्या लक्ष्याची (INDCची) UNFCCC कडून नियमितपणे तपासणी (review) करून घेणे.

२) प्रगत देशांनी प्रगतीशील देशांना, अपारंपारिक ऊर्जा स्तोत्रांच्या प्रसारासाठी १०० अब्ज डॉलर्सचा निधी उपलब्ध करून देणे. जे देश आपले इंधन उत्सर्जनाचे (INDCचे) लक्ष्य साध्य करतील केवळ त्याच देशांना हा निधी उपलब्ध होईल.

इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की कोणत्याच देशासाठी इंधन उत्सर्जनाचे लक्ष्य कायदेशीररित्या बांधील नाही, तर फक्त त्याची तपासणी करणे सक्तीचे आहे. शिवाय ही लक्ष्ये प्रत्येक देश स्वत:ची स्वतः ठरवील. पॅरिस करारात याला इंन्टेन्डेड नॅशनल डिटरमाईंड कॉन्ट्रिब्यूशन्स (आय एन डी सीज) असे संबोधले गेले आहे. आजपर्यंत १८७ देशांनी ह्या INDCs सादर केल्या आहेत, आणि पॅरिस करारातली ही एक (एकमेव?) आशादायक बाब होती. या सर्व १८७ आय एन डी सीज इथे वाचायला मिळतील

अनेक देशांची ही प्रतिज्ञापत्रे मार्च २०१५ पासून उपलब्ध होती. तापमानवाढीतल्या तज्ज्ञांचे असे मत आहे की यातल्या सर्व देशांनी आपल्या सर्व प्रतिज्ञा पाळल्या तरीदेखील जागतिक तापमान २.७ डिग्री सेल्सिअसने वाढणे अटळ आहे, जे पॅरीस कराराच्या २ अंश सेल्सिअसच्या ध्येयापेक्षा जास्त आहे. असे असताना मग प्रश्न असा पडतो की निदान या प्रतिज्ञा तरी सदस्यदेशांसाठी कायदेशीररीत्या बांधील का नाहीत? तर याचे उत्तर २००९ सालच्या पर्यावरणविषयी कोपनहेगन शिखर परिषदेच्या इतिहासात आहे. या शिखर परिषदेदरम्यान सदस्य देशांसाठी कायदेशीररीत्या बांधील ध्येय ठेवायचा प्रयत्न झाला होता, पण त्याचमुळे चीन, भारत, दक्षिण आफ्रिका यासारख्या देशांनी तो करार सफल होऊ दिला नाही. या प्रगतीशील देशांना त्यांच्या आर्थिक विकासात, इंधन उत्सर्जन ध्येयाचा अडथळा येईल याची भीती होती. यातूनच पुढे मग ‘परिषदेची मूळ उद्दिष्ट्ये साध्य झाली नाहीत तरी हरकत नाही, पण जगासमोर आम्ही एक ऐतिहासिक करार मंजूर केला आहे’ असा डंका पिटण्यासाठी, कायदेशीररीत्या बांधील नसलेला, मिळमिळीत भाषा वापरून बनविलेला, बिलकूल दात नसलेला मसुदा बनविण्यात आला. हा मसुदा मंजूर करण्यात सदस्य देशांना काहीच अडचण नव्हती, कारण त्यांनी आपल्या प्रतिज्ञा पाळल्या नाहीत तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होण्याची शक्यता नाही.

समुद्रसपाटीखाली राहणाऱ्या आणि पर्यावरण बदलाला प्रामुख्याने सामोरे जाणाऱ्या बऱ्याच बेटांचा हा १.५ अंशाची बांधिलकीचा आग्रह आणि भारत, चीन ह्या देशांचा २ अंशांचा अट्टाहास - हा कशासाठी? १.५ अंश ते २.७ अंश सेल्सिअसमधे १.२ अंशाचा फरक आहे आणि त्यामुळे असा प्रश्न पडू शकतो की आज जे माझ्या आजूबाजूला तापमान आहे ते १.२ अंश सेल्सिअसने वाढले तर त्यात काय एवढे?

मागचे हिमयुग साधारणपणे १० हजार वर्षापूर्वी आले होते; त्यावेळच्या आणि आजच्या जागतिक मध्य तापमानात (global mean temperature) सरासरी ३ अंश सेल्सिअसचा फरक आहे. अंटार्क्टिकातल्या बर्फावर अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या मते गेल्या काही हिमयुगात आणि उष्मयुगात ४ ते ७ अंश सेल्सिअसचा फरक असतो. आज जिथे मी उत्तर अमेरिकेत राहतो आणि थोडेसे बागकाम करतो तिथे हिमयुगात साधारणपणे १ कि.मी. खोल बर्फ होता. ४ ते ७ अंशाची तापमानवाढ १० ते १२ हजार वर्षांत होते, पण ह्या वेळेला पहिल्या ९ हजार वर्षात २ अंशाने तापमान वाढले होते आणि औद्योगिकीकरणानंतर २०० वर्षात ०.८ अंशाने तापमान वाढले आहे. नासाच्या संशोधनाप्रमाणे १९७५ पासून प्रत्येक दशकात ०.१५ ते ०.२ अंश सेल्सिअसने तापमानवाढ होते आहे. IPCC (Intergovernmental Panel on Climate Change) च्या २०१४ च्या अहवालात २ ते २.४ अंश सेल्सिअसने तापमानवाढ झाल्यास समुद्रपताळी ०.४ ते ०.५ मीटरने वाढण्याची शक्यता आहे. ही आकडेवारी बघितली की मग ह्या १.२ अंशाच्या फरकाचे गांभीर्य समजते.

अमेरिकेतल्या 'द डेली शो'मध्ये ह्या कराराची थट्टा उडवताना ट्रेवर नोवाने खूप मस्त टिप्पणी केली होती. तो म्हणाला की हा करार जर तुमच्या देशाने मोडला तर त्याला तीन प्रकारचे दंड होतील:

१) इतर देशातील लोक तुमच्याकडे तिरक्या नजरेने बघतील.
२) तुमचे ट्विटर अनुयायी कमी होतील.
३) तुमचा देश इतर देशांपुढे थोडासा नालायक दिसेल.

हे खरं असलं तरी आजच्या युगात सोशल मीडियावर झालेली मानहानीसुद्धा कमी महत्वाची ठरत नाही असे मानायला हरकत नाही.

वस्तुनिष्ठपणे पाहिले तर सामान्य नागरिकाच्या दैनंदिन आयुष्यावर या पॅरिस कराराचा पाच दृष्ट्या फरक पडू शकतो -

१) इंधन उत्सर्जन कमी करण्याचे ध्येय आता देशांपुढे असल्यामुळे, ब्लू चिप कंपन्या आणि हरितव्यापार करणाऱ्या कंपन्या (ग्रीन बिझनेसेस), विज्ञानावर आधारित कार्बन कमी करणारे तंत्रज्ञान आणि एकूण शून्य कार्बन (नेट झिरो) उत्सर्जन असणारी उत्पादने बाजारात आणतील.

२) दर ५ वर्षांनी UNFCCC कडून केल्या गेलेल्या तपासणीमध्ये जर देशांनी आपली उद्दिष्ट्ये साध्य केली नाही असे समोर आले, तर त्या देशाची सरकारे काही कठोर धोरणे बनवू शकतील.

३) प्रगत देशांनी प्रगतीशील देशांना अपारंपारिक उर्जा स्त्रोतांच्या विकासासाठी १०० अब्ज डॉलर्स निधी देण्याबाबत जे कायदेशीररीत्या बांधील कलम आहे, त्यातले ६२ अब्ज डॉलर्स जमा झालेले आहेत असे OECDचे (Organisation for Economic Co-operation and Development) म्हणणे आहे. प्रगत देश इतका निधी जमवू शकतील आणि तो प्रगतीशील देशांना अपारंपारिक उर्जा स्रोतांच्या विकासासाठी देतील याबद्दल भारत साशंक असला तरी प्रगत देशांचे सध्याचे आश्वासन हा निधी जमविण्याचे आहे. इतका मोठा निधी उपलब्ध झाल्यास सौरऊर्जा, पवनऊर्जा यांच्या वापरावर आधारित तंत्रज्ञानाला चालना मिळेल. १०० अब्ज डॉलर्स हा आकडा जरी मोठा वाटत असला तरी हा आकडा स्लोवाकिया,मोरोक्को किंवा इक्वाडोरच्या GDP च्या जवळ आहे. अमेरिकेत २००५ साली जेव्हा कतरिना चक्रीवादळ आले होते तेव्हा साधारण १०२ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते.

४) समुद्रसपाटीखाली राहणाऱ्या आणि पर्यावरण बदलाला प्रामुख्याने सामोरे जाणाऱ्या बऱ्याच बेटांनी, 'वॉरसॉ इंटरनॅशनल मेकॅनिजम'खाली नैसर्गिक आपत्तीतून होणारे नुकसान भरपाई मिळावी अशी एक तजवीज केली आहे. अमेरिका आणि युरोप संघटनेने या तजविजीत मोबदला (compensation) किंवा कायदेशीर जबाबदारी (liability) असे शब्द येवू दिलेले नाहीत, जेणेकरून त्यांच्यावर कोणी कायदेशीर कारवाई करू शकणार नाही. त्यामुळे पर्यावरण बदलामुळे झालेल्या नैसर्गिक आपत्तींशी सामना करणाऱ्या देशांना काही आर्थिक सहाय्य मिळू शकेल, पण सदस्य देशांसाठी हे बंधनकारक असणार नाही.
५) पॅरिस करारात कार्बन बाजाराचा विस्तार करण्यासाठी बऱ्याच तरतुदी आहेत. यानुसार दोन देश खुल्या बाजारात कार्बन भत्त्याचा व्यापार करून आपले INDC ध्येय गाठू शकतील; मग जगातील बॅंका त्याचा धंदा करून अब्जावधी डॉलर्स कमावतील.

हे असे सर्वसाधारणपणे चित्र आहे जे संभाव्य यशाच्या दृष्टीने काहीसे नकारात्मक आहे. तरीही, कोणतीही समस्या सोडवण्याआधी त्या समस्येचा स्वीकार करावा लागतो. जगातल्या १९७ देशांनी एकत्रितपणे या समस्येचा स्वीकार करणे आणि ती सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी धोरणे ठरविणे हे एक महत्वाचे पहिले पाऊल आहे आणि त्यादृष्टीने सकारात्मक आहे. दुर्दैवाने या कराराचे 'सांकेतिक महत्व' इतकीच त्याची उपयुक्तता ठरण्याची शक्यता सध्या दिसते आहे.

या साशंकतेमागचे कारण, UNFCCC च्या क्योटो प्रोटोकॉलच्या अपयशाच्या इतिहासात आहे. १९९७ मध्ये क्योटो जपान मध्ये १९२ देशांनी एक करार केला होता. त्या करारात मानवनिर्मित जागतिक तापमान वाढ होते आहे हे आंतरराष्ट्रीय समुदायाकडून प्रथमच स्वीकारले गेले होते. हा करार ११ डिसेंबर १९९७ ला केला होता आणि तो १६ फेब्रुवारी २००५ ला कार्यरत झाला. २०१२ साली या करारात १९२ देश सदस्य होते आणि हा करार २०१२ पर्यंत बांधील होता. २०१२ साली ह्या करारात दोहा कतार मध्ये दुरुस्ती केली गेली, जिथे फक्त ३७ देशांनी बांधील ध्येय स्वीकारले होते ते म्हणजे: ऑस्ट्रेलिया, युरोपिअन राष्ट्रीय संघटनेचे २८ देश, बेलारुस, आईसलंड, काजकस्तान, लीच्तेन्स्टाएन, नॉर्वे, स्वित्झर्लंड आणि युक्रेन. कॅनडाने २०१२ साली आपले सदस्यत्व काढून घेतले. अमेरिकन संसदेने या कराराला अजूनही मंजूरी दिलेली नाही. नोव्हेंबर २०१५ पर्यंत केवळ ५९ देशांनी या कराराला आपल्या संसदेतून मंजूर करून घेतले आहे आणि हा करार अमलात यायला किमान १४४ देशांनी हा करार आपल्या संसदेतून मंजूर करून घेणे गरजेचे होते. ज्या ३७ देशांनी ह्या कराराची बांधील ध्येय स्वीकारली होती, त्यातील फक्त ७ देशांनी हा करार आपल्या संसदेतून मंजूर करून घेतला आहे म्हणजे १९२ पैकी फक्त ७ देशांनी आपली प्रतिज्ञा पाळली! याच क्योटो कराराच्या असफलते मुळे UNFCCC ने मूळ करारात आणखीन एक दुरुस्ती करण्यापेक्षा एक नवीन करार करायचे ठरविले आणि त्यातून पॅरिस कराराची बांधणी झाली.

पॅरिस कराराबद्दल साशंक असायचे दुसरे कारण म्हणजे दोन सर्वात महत्वाचे आणि जगातील ६% प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे उद्योग - वायूसेवा आणि नौसेवा हे पूर्णपणे या कराराच्या बाहेर आहेत. त्यांचे नियम इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन (ICAO) आणि इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशन (IMO) ठरवणार आहेत. थोडक्यात असं की स्वतःच्या उद्योगाला काही त्रास देणारे नियम ते करणार नाहीत.
खालील चित्रात एका युरोपिअन राष्ट्र संघटनेच्या अहवालातील आलेख आहे जो जगातील मोठ्या देशांचे १९९० पासून २०१३ पर्यंत प्रमुख उद्योगातून कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन दाखवतो. यातून आपण कुठले देश ३०% कपात करू शकतील याचा साधारण अंदाज बांधू शकतो.

COP-1

पॅरिस कराराची सद्यस्थिती अशी आहे:
१) कराराचा मसुदा १९७ देशांनी डिसेंबर २०१५ मध्ये मान्य केला आहे, या करारावर २२ एप्रिल २०१६ ला न्यूयॉर्कमधे सह्या होतील, आणि त्यानंतर हा करार अस्तित्वात येईल.
२) हा करार अमलात यायला, जगातील ५५% प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या ५५ देशांनी आपापल्या संसदेतून मंजुरी मिळवून घेतली पाहिजे. (५५ मोठे देश - क्योटोच्या नशिबी ७ होते आणि ते देखील लीच्तेन्स्टाएन, नॉर्वे, स्वित्झर्लंड वगैरेसारखे छोटे देश).
३) सदस्य देशांनी आपल्या संसदेत मंजूरी घेऊनही, नंतर सरकारे बदलल्यावर हे देश या बांधिलकीतून बाहेर पडण्याच्या शक्यता राहतातच.

या मर्यादांमुळे, जागतिक तापमानवाढीची समस्या अशा प्रकारे केवळ सरकारांनी एकत्र येऊन करार करून सुटेल अशी आशा करण्यात अर्थ जरी नाही, तरीही हे असे मोठे गाजावाजा करून प्रसिद्ध केलेले कार्यक्रम, लोकांमध्ये जागृती निर्माण करायला मदत करतात. या जागृतीतून मिळालेल्या प्रेरणेने, समाजात मुळापासून बदलासाठी जर चळवळ सुरू झाली तर सदस्य देशांना या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे भाग पडेल, आणि या समस्येवर उपाय शोधण्यासाठी काही परिणामकारक पावले उचलली जातील.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

पिवळा डांबिस Thu, 14/01/2016 - 12:08

In reply to by चिमणराव

पण दिल्ली- पुण्यात वेहिक्युलर पोल्युशनमुळे जे गुदमरल्यासारखं होतं आणि मुंबईला ईंडस्ट्रियल पोल्युशनमुळे जो काही कायमचा घाणेरडा दुर्गंध येतो तो नाहीसा करण्यावर उपाययोजना करण्याबाबत काय मत आहे?

ओ नाम्या Sun, 17/01/2016 - 07:50

In reply to by चिमणराव

हा प्रगत आणि प्रगतीशील देश आणि त्यांच्या जबाबदाऱ्या हा वाद जुना आहे आणि तुमचा मुद्यात थोडे तथ्य असले तरी तुमचा रोख चुकीच्या दिशेने आहे असं माझे मत आहे. प्रगत देश आपल्या वाढत्या गरजा भागवताना खर्च कमीतकमी ठेवण्यासाठी प्रदूषण मात्र प्रगतिशील किंवा अप्रगत देशांमध्ये करत आहेत (किंवा ते होत असताना त्याकडे कानाडोळा करत आहेत) पण त्यातला मुख्य नफा अजूनही प्रगत देशांतील बहुराष्ट्रीय कंपन्याच मिळवत आहेत आणि हे सगळं प्रगतिशील देश आर्थिक प्रगतीच्या नावाखाली सहन करत आहेत. त्यामुळे प्रगतीशील देशांना आपले हित नक्की कशात आहे हे ठरविण्याची वेळ आली आहे. सर्व प्रगत देश हे पाश्चिमात्य देश आहेत (जपान हा अपावाद वगळता) हे कशामुळे? त्याचे मुख्य कारण हे की जो भांडवलशाहीचा खेळ आज आपण खेळत आहोत तो पाश्चिमात्य देशांनी सुरु केलेला आहे. इतर देशांना प्रगत बनविण्यात त्यांचा फायदा नाही, जेंव्हा उत्पादन करण्यात पैसा होता तेव्हा हे पाश्चिमात्य देश ते करत होते - उदा. भारतातून कापूस नेऊन मँचेस्टर मधे कपडा बनवून मग भारतात विकणे. मग इंग्लंड मध्ये प्रदूषण खूप झाल्यावर ते उत्पादन भारताला - चीनला सोपवून हे पाश्चिमात्य देश सेवा आणि आर्थिक उद्योगाकडे वळले. हे पाश्चिमात्य देश आशियायी आणि आफ्रिकी देशांच्या दोन पाऊले पुढेच असणार कारण - हा त्यांचा खेळ आहे, त्याचे नियम ते ठरवतात.

पिवळा डांबिस Sun, 17/01/2016 - 10:40

In reply to by ओ नाम्या

हे पाश्चिमात्य देश आशियायी आणि आफ्रिकी देशांच्या दोन पाऊले पुढेच असणार कारण - हा त्यांचा खेळ आहे, त्याचे नियम ते ठरवतात.

पाश्चात्य देशांनी काहीही नियम ठरवले तरी ते स्वेट शॉपस/प्रदूषण अपरिहार्य करताहेत असं म्हणता येणार नाही.
उलट आशियायी देशातल्या कंपन्या पाश्चात्य बिझिनेस मिळवण्यासाठी काहीही करार करताहेत आणि नंतर मग आपल्याला त्यात काही दमडा सुटावा यासाठी स्वेटशॉप्स चालवताहेत, प्रदूषण करताहेत. हा सगळा आशियायी कंपन्यांचा स्वतःला प्रॉफिट सुटावं यासाठी चाललेला उद्योग आहे.
वरून पाश्चात्य देशांच्या नांवाने बोंब मारायला मोकळे!
तुम्हाला नाही पसंत/परवडण्यासारखं तर नका घेऊ ना कॉन्ट्रॅक्स, कोणी जबरदस्ती का केली आहे?

ऋषिकेश Mon, 18/01/2016 - 12:10

In reply to by पिवळा डांबिस

हा सगळा आशियायी कंपन्यांचा स्वतःला प्रॉफिट सुटावं यासाठी चाललेला उद्योग आहे

पण कंपन्यांनी फक्त स्वतःचं प्रॉफिट बघावं असंच कॅपटलिझम शिकवतो ना?
आता ते आशियायी कंपन्यांनी सुरू केलं तर ते गैर का व कसं?

पाश्चात्यांच्या नावाने बोंब हे स्वतःचे प्रॉफिट टिकवण्याचा मार्ग आहे. तो ते अवलंबताहेत. तर त्यातही गैर काय?

पाश्च्यांत्यांनी नियम करावेत, खेळ सुरू करावा आणि आता आशियायी देश त्यात पारंगत होऊ लागल्यावर आता असे नियम असतील (जे पाश्च्यात्यांनीच बनवले) तर "आमी नै खेळ्णार ज्जा!" असं म्हणू लागले तर "उगी उगी अशं झालं!? आशियायी कंपन्यांचं घर आपण उन्हात बांधु हा!" इतकंच सांग्णारा करार होऊ शकतो आणि तो या परिषदेत झाला असं वाटतं

पिवळा डांबिस Wed, 20/01/2016 - 01:37

In reply to by ऋषिकेश

आता ते आशियायी कंपन्यांनी सुरू केलं तर ते गैर का व कसं?

त्या प्रयत्नात त्या करत असलेलं प्रदूषण स्थानिकच आहे ना? त्याचा स्थानिक लोकांनाच मुख्यत्वेकरून त्रास होतो ना?
की धारावीत तयार होणारं प्रदूषण झूरीकला त्रास देतंय?
मुंबई/पुणे/दिल्लीमधली हवा-पाणी आणि जिथे करार झाला तिथलं हवा-पाणी सारख्याच क्वालिटीचं आहे का?
की फक्त वाद घालता यावा, स्थानिकांचे काहीही हाल झाले तरी चालेल, म्हणून हा प्रतिसाद आहे?

("अरें बर्बाद झालो तरी बेहत्तर! पण भलमोठा बालिस्टर घेऊन मुंबैच्या हायकोडतात धिंड नाही काढली तुझी तर बापाचे नांव गंगाधर नाही लावणार, काय समजलेंस!", ची आठवण झाली!!!)
=))

ऋषिकेश Wed, 20/01/2016 - 08:31

In reply to by पिवळा डांबिस

ज्या उद्योगांमुळे प्रदुषण होतंय ते उद्योग न आल्याने (गरीबीमुळे) झालेले हाल विरूद्ध प्रदुषणासह का होईना येणार्‍या पैशासह होणारे हाल यात तुलना करायला तुम्ही सक्षम आहातच!

पिवळा डांबिस Wed, 20/01/2016 - 23:25

In reply to by ऋषिकेश

प्रदुषण होतंय ते उद्योग न आल्याने (गरीबीमुळे) झालेले हाल विरूद्ध प्रदुषणासह का होईना येणार्‍या पैशासह होणारे हाल

आम्ही सक्षम आहोतच!
जीव सलामत तो उद्योग पचास! शेवटी लोकांचा/आपल्या पुढल्या पिढीचा जीव (आरोग्य) महत्वाचा असं आपलं आमचं मत!
आता तो विचार करायला तुम्ही सक्षम आहांत का हाच प्रश्न आहे.
बघा बुवा, शेवटी मुंबै-पुणं आपलं वाटतं म्हणून जीव तडफडतो, इतकंच!

ऋषिकेश Thu, 21/01/2016 - 10:46

In reply to by पिवळा डांबिस

बहुतेक विकसनशील देशांच्या मते "हट्ट्याकट्या गरीबीपेक्षा लुळीपांगळी श्रीमंती" बरी असते. एकदा का श्रीमंत झालो की अनेक प्रश्न सोडवता येतील. आरोग्याचेही! तोवर अमेरिकेसारख्या फुगलेल्या अर्थव्यवस्थआंचे किती शोषण करता येईल -त्यांना किती ओरबाडता येईल हाच एककलमी कार्यक्रम बहुतांश विकसनशील देश राबवत आहेत. आणि त्यात मला काहीच अनैसर्गिक किंवा अनुचित वाटत नाही. चोराच्या घरात चोरी करण्यात काय उचित नी काय अनुचित!

अमेरिकेनेच शिकवलंय स्वतःचा फायदा करून घ्या.. तेच आम्ही करतोय! फक्त फरक असाय की त्या विद्येत आता आम्ही (विकसनशील देश) अमेरिकेच्याच डोक्यावर मिरे वाटतोय.. (विशेषतः फार्मा कंपन्या!) :प अशावेळी अमेरिका नि पाश्चात्या स्वतः कधीही न वापरलेली नैतिकतेची ढाल पुढे करतात ते बघुन ह ह पु वा होते!

अनु राव Fri, 22/01/2016 - 12:04

In reply to by ऋषिकेश

एकदा का श्रीमंत झालो की अनेक प्रश्न सोडवता येतील.

आपण आपले श्रीमंत व्हायचे आणि स्वतापुरते प्रश्न सोडवुन टाकायचे असे आपले माझे मत. पैसा असला की प्रदुषण त्रास देत नाही की वाढलेली समुद्राची पातळी आपल्या घरात घुसत नाही.

त्यामुळे जमेल तसे श्रीमंत व्हा आणि मुक्त जगा. नको त्या नको त्या लोकांवर आणि त्यांच्या प्रश्नांवर डोकेफोड करुन स्वताचा वेळ, उर्जा वाया घालवु नका.

अनु राव Fri, 22/01/2016 - 17:13

In reply to by नगरीनिरंजन

आधी मला होऊ द्या, मग तुम्हाला सांगेन.

पण त्यासाठी पर्यावरण, कोणाची हत्या, मग कोणाची आत्महत्या, भटक्या कुत्र्यांच्या मानसिक समस्या, डुकरांना जाडेपणामुळे होणार्‍या तब्येतिच्या तक्रारी असल्या गोष्टींवरचे लक्ष काढुन पैसे मिळवण्याकडे लावले पाहिजे. बघुया जमतय का ते.

अजुन एक राहीलेच. राकु उद्या कुठल्या विषयावर धागा काढतील ह्यावर आदल्या रात्री सट्टा लावणे. हे ही बंद केले पाहिजे. त्यात फार पैसे जातात माझे. कारण राकुंच्या धाग्याविषयी काहीही प्रेडिक्शन करता येत नाही.

ऋषिकेश Fri, 22/01/2016 - 17:50

In reply to by अनु राव

=))

तुमचा त्रास झाला तरी राग येत नाही तो अशा प्रतिसादांमुळेच.
तुम्हाला भारतातील टिव्ही च्यानेलच्या डिबेट्सचा अ‍ॅक्सेस नसावा त्यामुळे तुम्हाला प्रेडीक्ट करता येत नाही. मी त्या डिबेट्स बघतच नाही त्यामुळे मलाही नाही!

अ‍ॅंकर करो आणि राकुंना एखाद्या डिबेटमध्ये बोलावणे येवो. निदान या रोजच्या फुसकुल्या तरी आवरतील! :)

नगरीनिरंजन Thu, 14/01/2016 - 07:19

आढावा चांगला आहे.

या जागृतीतून मिळालेल्या प्रेरणेने, समाजात मुळापासून बदलासाठी जर चळवळ सुरू झाली तर सदस्य देशांना या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे भाग पडेल,

इथेच तर खरी ग्यानबाची मेख आहे. मुळापासून बदल म्हणजे त्याग आणि साधी राहणी. मंकी ट्रॅपमध्ये अडकलेल्या लोकांना कळले तरी वळणे फार अवघड असते.

अरविंद कोल्हटकर Thu, 14/01/2016 - 08:55

ह्या महत्त्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही हा प्रश्न जमेल तितका सोपा करून दाखविण्याचा प्रयत्न केला आहेच तरी सुद्धा दोनतीनदा नीट वाचल्याशिवाय तो बर्‍यापैकी लक्षात येणार नाही.

तरीहि एक मूळ शंका. मानवी हस्तक्षेपामुळे जागतिक तपमान वाढते आहे ह्याला आता सार्वत्रिक पाठिंबा आहे काय? ह्याविषयक शंका घेणार्‍यांची लॉबी काय करीत आहे?

ओ नाम्या Sun, 17/01/2016 - 07:55

In reply to by अरविंद कोल्हटकर

तुम्हाला लेख आवडला त्याबद्दल धन्यवाद. जगातील १९७ देश एकत्र येऊन करार करतायत हे माझ्या मते सर्वमान्यतेचे प्रमाण आहे. आता प्रत्येक थियरीला विरोधी दृष्टीकोन असतोच, जशी आजही फ्लॅट अर्थ मुव्हमेंट आहेच.

गेल्या काही वर्षांत जागतिक हवामानात मोठे बदल घडताहेत यातही फारसे काही मोठेसे नाही आणि असे समजणारे, साशंक दृष्टीकोन असणारेही अनेक लोक आहेत. इथे कॅनडात जानेवारी २०१२ हा ७० वर्षातला सर्वात थंड महिना होता, जून २०१२ हा १०० वर्षातला सर्वाधिक वृष्टीचा महिना होता आणि ऑगस्ट २०१२ हा ९० वर्षातला सर्वात गरम महिना होता असे सांगितले की साशंक लोक ह्या तीन गोष्टी इतिहासात १८९०, १९२० आणि १९४० साली झाल्या होत्या असे दाखवून हे नवीन नाही असे सांगतात. हे पूर्वी झाले असले तरी ते एका वर्षात झाले नव्हते ६० वर्षाच्या अंतराने घडले होते हे सोयीस्करपणे विसरतात. असे असले तरी संस्थात्मक पातळीवर हे हवामानबदल होत आहेत याला मान्यता दिसते. त्यातही ज्या विम्याकंपन्यांना या बदलांमुळे होणाऱ्या परिणामांचा मोठा फटका बसतो त्यांनी मात्र याची चांगलीच दखल घेतलेली दिसते.

अनु राव Thu, 14/01/2016 - 11:52

इंधन उत्सर्जन कमी करण्याचे ध्येय आता देशांपुढे असल्यामुळे, ब्लू चिप कंपन्या आणि हरितव्यापार करणाऱ्या कंपन्या (ग्रीन बिझनेसेस), विज्ञानावर आधारित कार्बन कमी करणारे तंत्रज्ञान आणि एकूण शून्य कार्बन (नेट झिरो) उत्सर्जन असणारी उत्पादने बाजारात आणतील.

माझ्या थियरी प्रमाणे ( ही कोण थियरी सांगणार वगैरे असले संकुचित विचार बाजुला ठेवून जरा मोकळ्या मनाने बघा ) सो-कॉल्ड पर्यावरण वादी तंत्रज्ञाना चा परतावा १५% पेक्षा कमी असला तर ते तंत्रज्ञान आणि त्यावर आधारीत यंत्रे तयार करण्यासाठी जे रीसोर्स लागतात त्यानी पर्यावरणाची अधिक हानी होते.

उदाहरण : समजा जर पवनचक्क्यांचा परतावा ८% असेल तर त्यांना तयार करताना लागणारी उर्जा आणि रॉ मटेरीयल ह्यांच्या मुळे पर्यावरणाची हानी जास्त होइल ( त्या पवनचक्क्यांनी तयार केलेल्या शुन्य प्रदुषणाच्या वीजे पेक्षा )

ओ नाम्या Sun, 17/01/2016 - 08:28

In reply to by अनु राव

तुमची थियरी फक्त परतावा बघते आहे आणि त्यामुळे फक्त त्या समस्येचा आर्थिक बाजूने विचार करते आहे, हा आजच्या भांडवलशाहीचा साईड इफेक्ट आहे. परतावा पाहताना जर तीच ऊर्जा पारंपारिक इंधने वापरून मिळवली असती तर त्यामुळे पर्यावरणाची किती हानी झाली असती त्याचाही या समीकरणात वापर केला तर मग पारडे अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या बाजूने झुकलेले दिसेल.
जेंव्हा पर्यावरण बदलामुळे एखाद्या व्यक्तीच्या घरा भोवती २ मीटर पाणी असेल तेव्हा आर्थिक पराताव्याला किती प्राधान्य द्याल? रिन्यूएबल रिसोर्सेस वापरण्याचा किंवा न वापरण्याचा निर्णय घेण्याकडे आर्थिक पराताव्यापेक्षा अधिक दूरदृष्टीने पहाण्याची गरज आहे. हा परतावा तापमानवाढीमुळे संभाव्य अनेक अनिष्टे टाळण्याचाही असू शकतो. आजघडीला अनेक देश याकडे दूरदृष्टीने पहात आहेत ही जमेची बाजू आहे, २००० सालापासून सौरऊर्जेच्या वापरात १०० पटीने वाढ झाली आहे ती याचमुळे.

अनु राव Mon, 18/01/2016 - 11:25

In reply to by ओ नाम्या

तुमची थियरी फक्त परतावा बघते आहे आणि त्यामुळे फक्त त्या समस्येचा आर्थिक बाजूने विचार करते आहे, हा आजच्या भांडवलशाहीचा साईड इफेक्ट आहे.

नाही हो नामदेवराव. मी काय लिहीले आहे ते नीट वाचा. जर परतावा चांगला नसलेला अपारंपारीक उर्जा स्त्रोत वापरला तर पर्यावरणाची हानी जास्त होते असे मी लिहीले आहे. आंधळेपणानी सौर , पवन उर्जा वगैरे वापरु नये. जर परतावा चांगला नसेल, सबसिड्या द्याव्या लागत असतील तर ह्या उपायांनी पर्यावरणाचे जास्त नुकसान होत असते. असे मी म्हणत आहे.

थोडक्यात,
परतावा कमी असलेले रिन्यूएबल रिसोर्सेस हे तयार करताना जास्त प्रदुषण होते आणि पर्यावरणाची हानी जास्त होते

उदाहरण म्हणुन

१०० मेगावॅट ऑइल वर चालणार्‍या पॉवर प्लँट नी त्याच्या पूर्ण लाईफ सायकल मधे होणार्‍या प्रदुषणापेक्षा १०० मेगॅवॅट पवनचक्क्या तयार करताना होणारे प्रदुषण जास्त असेल.

ओ नाम्या Tue, 19/01/2016 - 08:30

In reply to by अनु राव

आपण आपली थियरी सिद्ध करायला काही दुवा देऊ शकाल का? इथे तुम्हला सौर उर्जेच्या परताव्याबद्दल वाचायला मिळेल आणि तुम्ही सबसीडीचा विषय काढलात म्हणून हे आणि हे देखिल वाचा. इथे लिहिल्याप्रमाणे जी-२० देश (भारतासहीत) सर्व तेल कंपन्यांना ५४४ बिलिअन डॉलर्सची सबसीडी दर वर्षाला देतात, त्याच्या तुलनेत पूर्ण जगात, २०१४ साली अविनाशी ऊर्जास्त्रोतांसाठी १०१ बिलिअन डॉलर्सची सबसीडी दिली गेली.

अनु राव Tue, 19/01/2016 - 08:56

In reply to by ओ नाम्या

१०० मेगावॅट ऑइल वर चालणार्‍या पॉवर प्लँट नी त्याच्या पूर्ण लाईफ सायकल मधे होणार्‍या प्रदुषणापेक्षा १०० मेगॅवॅट पवनचक्क्या तयार करताना होणारे प्रदुषण जास्त असेल.

हे उदाहरण घेउन गणित करुन बघा म्हणजे पटेल.

राजेश घासकडवी Thu, 14/01/2016 - 15:17

पॅरीस परिषदेचा थोडक्यात पण नीटनेटका असा आढावा आवडला. पार्श्वभूमीवर एका बाजूला ओपेकने तेलाचा प्रचंड सेल लावलेला आहे. फ्रॅकिंग करणाऱ्या कंपन्यांचं उत्पादन वाढत चाललेलं पाहून त्यांचा कणा मोडण्यासाठी किमती पडतील अशी व्यवस्था केलेली आहे. वर्षभर या किमती पडताहेत, आणि अजूनही पडतच राहातील असा अंदाज आहे. दुसऱ्या बाजूला सर्व जगच सौर ऊर्जेच्या पडत्या किमतींचा फायदा घेत शेकडो चौरस किलोमीटरची सोलार पॅनल्स बसवतं आहे. त्याचबरोबर प्रगत देशांमध्ये कारने होणारा प्रवास स्थिरावला आहे, आणि अधिकाधिक फ्युएल एफिशियंट गाड्यांमुळे पेट्रोलचा वापर कमी होत आहे (२००७ पेक्षा २०१४ मध्ये ४ टक्के कमी - दरडोई १०% कमी). प्रगत देशांमध्ये कागदाचा वापर कमी होतो आहे. तसंच गेल्या दोन दशकांतच ७५% कमी ऊर्जा वापरणारे दिवे बाजारात आलेले आहेत. या ऊर्जा स्वस्त होण्याच्या, आणि ऊर्जावापर अनेक ठिकाणी कमी होण्याच्या पार्श्वभूमीवर दात नसलेला का होईना, असा करार होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे.

या करारात कुठच्याही देशाला शिक्षा करण्याची तरतूद नाही ही माझ्या मते चांगली गोष्ट आहे. जगातली २५ टक्के लोकसंख्या ७५ टक्के ऊर्जा वापरते. अशा परिस्थितीत या ऊर्जाबचतीचं ओझं गरीब ७५ टक्क्यांवर टाकणं अन्याय्य ठरलं असतं. तसंच श्रीमंत देश, जे सध्या दरडोई प्रचंड ऊर्जा वापरतात, त्यांनी १०० बिलियनची मदत करणं हेही सुयोग्यच. अर्थात या सगळ्याचा खर्च विचारात घेतला तर १०० बिलियन म्हणजे अगदीच मामूली रक्कम आहे. भारतातच बहुतांश वीज उत्पादन सौर बनवण्यासाठी किमान ६०० - ८०० बिलियनची गरज आहे. पण निदान योग्य दिशेला पाऊल आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 14/01/2016 - 19:34

In reply to by राजेश घासकडवी

प्रश्न आहे, मला माहिती फार नाही.

(२००७ पेक्षा २०१४ मध्ये ४ टक्के कमी - दरडोई १०% कमी).

हे मंदीचा परिणाम म्हणून झालंय का? गाड्यांची एफिशियन्सी वाढल्याचं दिसतंय का, म्हणजे काय कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये, त्यांनी जाहीर केलेल्या स्पेसिफिकेशन्समध्ये हे दिसतंय का?

राजेश घासकडवी Fri, 15/01/2016 - 17:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या पीडीएफमध्ये १९७५ ते २०१० पर्यंतच्या फ्युएल एफिशियन्सीचा आढावा घेतलेला आहे. त्यातल्या पहिल्याच ग्राफमध्ये कार आणि ट्रक्सची सरासरी फ्युएल एफिशियन्सी दाखवलेली आहे. २००४ ते २०१० च्या दरम्यान नवीन मॉडेल्सची एफिशियन्सी साधारणपणे २४ वरून २८ वर गेली. म्हणजे साधारण १६ टक्के वाढ. या गाड्यांची संख्या रस्त्यांवर जसजशी जास्त वाढली तसतसं पेट्रोल वापर कमी झालेला दिसणं स्वाभाविक आहे. त्यामुळे २००७ ते २०१४ मध्ये दिसणारी घट ही काही प्रमाणात तरी फ्युएल एफिशियन्सीपोटी असावी. या लेखात त्यांनी म्हटलेलं आहे की अमेरिकन समाज वयस्क होत चाललेला आहे, आणि म्हातारी माणसं गाड्या कमी चालवतात - हेही एक कारण असावं. मंदीपोटी एकंदरीत ड्रायव्हिंग कमी होणंही स्वाभाविक आहे. पुढच्या आलेखात ते दिसून येतं. मात्र गेल्या दशकात जे ड्रायव्हिंग कमी झालं आहे ते पूर्णपणे मंदीमुळे झालं आहे असं म्हणता येत नाही. इंटरनेटमुळे जी कामं प्रत्यक्ष जाऊन करण्याऐवजी ऑनलाइन होतात, त्याचाही काही परिणाम असावा. थोडक्यात, या घटीसाठी अनेक कारणं आहेत.
ड्रायव्हिंग

अमेरिकेसारख्या देशांत गाड्यांची संख्या जवळपास सॅच्युरेशनला आहे. मात्र चीन व भारतात ती प्रचंड वेगाने वाढते आहे. अमेरिकेत ती संख्या वाढताना गाड्यांचं मायलेज गॅलनला १० मैल होतं. भारतात तेच किमान तिप्पट-चौपट आहे. त्यामुळे तितक्याच खर्चात आणि कमी प्रदूषणात भारतीय जनता ड्राइव्ह करायला लागेल अशी आशा आहे.

रुची Fri, 15/01/2016 - 21:45

In reply to by राजेश घासकडवी

या करारात कुठच्याही देशाला शिक्षा करण्याची तरतूद नाही ही माझ्या मते चांगली गोष्ट आहे. जगातली २५ टक्के लोकसंख्या ७५ टक्के ऊर्जा वापरते. अशा परिस्थितीत या ऊर्जाबचतीचं ओझं गरीब ७५ टक्क्यांवर टाकणं अन्याय्य ठरलं असतं.

ऊर्जाबचतीचं ओझं गरीबांवर कसं? माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक देशांना फक्त त्यांनी स्वतःहून दिलेल्या प्रतिज्ञापत्रांप्रमाणे कार्बन उत्सर्जन कमी करायचे आहे आणि प्रत्येक देशाच्या ऊर्जा वापराप्रमाणे हे त्या देशांनी स्वतःच ठरविलेले लक्ष्य आहे. जर कोणासाठी कोणतीच अकाँटिबिलिटी नसेल तर मग ओनाम्या म्हणतात त्याप्रमाणे 'सांकेतिक महत्व' यापलिकडे काय परिणामांची अपेक्षा करू शकतो आपण या कराराकडून? प्रत्येक देशाने आपापले लक्ष्य साध्य केले तरी जागतिक तापमान २.७ अंशांनी वाढणार आहे असे तज्ञ म्हणत असतानाही यासाठी अधिक बांधील करार होऊ शकला नाही यातूनच त्याबद्दलची अनास्था कळते.

गेल्या दोन दशकांतच ७५% कमी ऊर्जा वापरणारे दिवे बाजारात आलेले आहेत

ही ७५% कमी ऊर्जा होणत्या दोन दिव्यांमधे फरक करून केलेल्या आहेत हे पहाणं गरजेचं आहे. खाली एक छोट्या दिव्यांचा तक्ता आहे ज्यामधे पाहिलं तर सीएफेल पेक्षा एलइडीची उर्जाबचत माफक आहे.

Light Bulbs

फ्लोरोसेंट टीफाईव्ह आणि टीएट ट्यूब्सची ल्यूमिनस इफिशिएन्सी ८० ते ९० लुमेन्स पर वॉट असते आणि आजच्या घडीला एलीडीज शंभरच्या आसपास ल्युमेन्स पर वॉट देतात. ही माफक ऊर्जाबचत आहे त्यामुळे बहुतांश वेळेस एईडी वापरण्याचं मुख्य कारण ते अधिक काळ टिकतात हे आहे. खाली फ्लोरोसेंट ३२ वॉट दिव्यातून मिळणार्या ल्युमेनचा तक्ता दिला आहे. त्यामुळे ऊर्जाबचतीच्या सांख्यिकीकडे थोडं अधिक काळजीपूर्वक पहाणं गरजेचं आहे. आजघडीला एलईडी दिवे हा ऊर्जावापरासाठी अधिक चांगला पर्याय आहे पण ऊर्जाबचतीसाठी कमी प्रमाणात आणि गरज असेल तेंव्हाच दिवे वापरणं अधिक शहाणपणाचं आहे.

T8 Lamp lumens

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 15/01/2016 - 22:30

In reply to by रुची

गेल्या दोन दशकांतच ७५% कमी ऊर्जा वापरणारे दिवे बाजारात आलेले आहेत

ही ७५% कमी ऊर्जा होणत्या दोन दिव्यांमधे फरक करून केलेल्या आहेत हे पहाणं गरजेचं आहे.

हे सगळं बरोबरच आहे (असावं); पण ऊर्जा वापरली जाते त्यात सगळ्यात जास्त कशासाठी वापरली जाते? किंवा ऊर्जेपेक्षाही हरितगृह परिणाम करणाऱ्या वायूंबद्दल बोलता येईल.

प्रगत देशांमध्ये, जिथे दरडोई ऊर्जावापर बराच जास्त आहे तिथे दिव्यांमध्ये किती ऊर्जा वापरली जाते आणि एसी, हीटर्स, विमानप्रवास, 'यूजअँडथ्रो' वस्तू आणि त्यांची आयात-निर्यात, पृथ्वीच्या दुसऱ्या टोकापासून आयात केलेले किवी किंवा सफरचंदं यांच्यासाठी किती ऊर्जा वापरली जाते? ही सगळी यंत्रं हळूहळू कमी इंधन पिणारी बनत आहेत हे सगळं मान्य आहे, पण प्रश्न असा आहे की दिव्यांमध्येच अडकावं का इतरही आकडे तपासावेत?

रुची Sat, 16/01/2016 - 00:23

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

राजेशने दिव्यांतून वाचणार्या ऊर्जेचा उल्लेख केला होता म्हणून मी त्याबाबत थोडे वास्तववादी आकडे दिले होते. एकूण ऊर्जा वापराच्या अशा किती प्रमाणात दिवे वीज खातात असा प्रश्न आहे का? तसे असेल तर सर्वसाधारणपणे कोणत्याही बिल्डिंगच्या एकूण ऊर्जावापरापैकी दहा टक्के ऊर्जा दिव्यांवर खर्च होते. ओ नाम्या यांच्या लेखात नौसेवा आणि वायूसेवा यांच्या इंधनवापराबद्दल आकडे दिलेले दिसताहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 18/01/2016 - 20:48

In reply to by रुची

कोणत्याही बिल्डिंगच्या एकूण ऊर्जावापरापैकी दहा टक्के ऊर्जा दिव्यांवर खर्च होते.

साधारण असेच आकडे अंदाजासाठी हवे आहेत.

राजेश घासकडवी Fri, 15/01/2016 - 23:47

In reply to by रुची

भारतात सुमारे दोन दशकांपूर्वी स्टॅंडर्ड दिवे (ज्यांना ग्लोब असं म्हटलं जायचं) आणि ट्यूबलाइट्स यांचं मिश्रण होतं. त्याच्या तुलनेत आत्ताचे आधुनिक दिवे हे सर्वसाधारणपणे ७५ टक्के एफिशियंट आहेत असं म्हणणं होतं. ७५ टक्के हा प्राथमिक, अंदाजपंचे आकडा आहे. पण स्टॅंडर्ड फिलामेंटी दिव्यांपेक्षा सीएफएल, आणि एलइडी हे ऊर्जाबचतीसाठी उपयुक्त आहेत. जुन्या काळी ज्या मेणबत्त्या वापरल्या जायच्या त्याच्या कितीतरी जास्त पट एफिशियंट आहेत.

आजघडीला एलईडी दिवे हा ऊर्जावापरासाठी अधिक चांगला पर्याय आहे पण ऊर्जाबचतीसाठी कमी प्रमाणात आणि गरज असेल तेंव्हाच दिवे वापरणं अधिक शहाणपणाचं आहे.

मला यातून 'आपण आजकाल अमर्याद वापर करतो, आणि तंत्रज्ञानाने काही हा प्रश्न सुटणार नाही. तेव्हा वापरच कमी केला पाहिजे' असा दृष्टिकोन दिसतो. तो एका मर्यादेपर्यंत बरोबरच आहे. अतिरेकी वापर टाळावा. पण आपण इतिहासाकडे बघितलं तर घरात उजेड असण्यासाठी जो पैशात आणि कार्बनमध्ये खर्च केला जायचा त्याच्या कितीतरी कमी पटीने आजकाल खर्च करतो. जेव्हा मेणबत्त्या किंवा अॅनिमल फॅट हीच एक उजेडाची सोय होती, तेव्हा किती महाप्रचंड खर्च व्हायचा. लोक कमी वापरायचे, तरी दरडोई थोडाफार प्रकाश मिळण्यासाठी आजच्या दिव्यापेक्षा जास्त खर्च व्हायचा. पण तंत्रज्ञानामुळे कंझंप्शन वाढलं आहे, तरी खर्च कमीच झालेला आहे.

जास्त दिवे जाळल्याने कदाचित अनेक आगरकरांना घरी अभ्यास करता येईल. त्यातून जे वैज्ञानिक, संशोधक पुढे येतील त्यांच्या हातून ऊर्जाबचतीचं तंत्रज्ञान अधिक विकास पावू शकेल - असाही विचार करता येतो.

असो. मी जी उदाहरणं दिली ती तंत्रज्ञानातून आलेल्या उपायांमुळे दिसत असलेली खरीखुरी बचत दाखवण्यासाठी दिली होती. मात्र फार थोडे पर्यावरणवादी या गोष्टींनी एक्साइट होताना दिसतात. चांगलं होणारच नाही अशी खात्री का असते?

रुची Sat, 16/01/2016 - 01:16

In reply to by राजेश घासकडवी

आपल्याला सोईचं असेल त्या पद्धतीने प्रश्नांकडे पाहिलं की मुख्य मुद्दे टाळता येतात. दिव्यांचा प्रश्न निघाला की घरगुती वापराच्या दिव्यांकडे जायचं ज्याचा वापर उद्योगांसाठी आणि व्यवसायांसाठी लागणार्या दिव्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. याचा प्रतिवाद करत रहाणं फार कष्टाचं काम आहे पण तरी सांगायचा प्रयत्न करते पहा पटतंय का.

फक्त दिव्यांसाठी लागणारी ऊर्जा याबद्दल बोलायचं झालं तर, त्यासाठी लागणारी ऊर्जा वाचविण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे ते नको असताना बंद ठेवणे किंवा मंद करणे (मी इथे उद्योगांसाठी लागणार्या दिव्यांबद्दल लिहितेय कारण त्याचा वापर जास्त असतो). हे कसं साध्य करता येईल, तर हे आपल्या आवडत्या तंत्रज्ञानाच्याच सहाय्याने दिवे वापरात नसताना आपोआप बंद होतील अशा पद्धतीने करता येतील (ऑक्युपन्सी सेन्सिंग) किंवा आपल्याला खरोखरीच इतका उजेड लागणार आहे का याबद्दल शास्त्रीय संशोधन करता येईल. 'इल्युमिनेटिंग इंजिनियर्स सोसायटी' अशा प्रकारचे संशोधन करते पण त्यात गंमत अशी आहे की हे संशोधन मुख्यतः दिवे उत्पादन करणार्या कंपन्या करतात किंवा अशी रेकमेंडेशन्स आणि त्यादृष्टीने लिहीलेली पत्रके छापण्यासाठी पैसे पुरवतात. १९७०च्या आसपास त्यांचे ऑफिसेससाठी जे उजेडाचे रेकमेंडेशन होते त्यात आजच्या घडीला पाचपट वाढ झाली आहे; हे कसे झाले, रेकमेंडेशन मागचे शास्त्र कसे बदलले हे सगळे गुलदस्त्यात आहे.

होतं काय की अशा नको असताना दिवे बंद ठेवणे किंवा अतिरिक्त वापर टाळणे वगैरे प्रकारच्या उपाययोजनांनी वस्तू उत्पादन वाढत नाही कारण हा काटकसरीचा आणि बचतीचा मार्ग झाला आणि वर्षाला दहा टक्के वाढ साधायची असेल तर चायनातल्या उत्पादन कंपन्यांना कायम वाढीव उत्पादन करत रहाणे आणि ग्राहकांना अधिकाधिक दिवे (नुसते दिवे नव्हे तर दिव्यांचे फिक्शर्स, ज्यात अधिक नफा आणि वाढ असते) विकत राहणे गरजेचे असते. त्यामुळे काटकसर करा म्हटलं, उत्पादनवाढ कमी करा म्हटलं की ताबडतोब तुम्हाला प्रगतीविरोधी ठरवता येतं. 'विकास आणि प्रगती' म्हणजे अधिकाधिक वस्तू बनविणे, विकणे आणि विकत घेणे इतकी प्रचंड संकुचित व्याख्या बनविली गेली असेल तर प्रतिवाद करणंच बंद करायला हवं.

पायांमुळे दिसत असलेली खरीखुरी बचत दाखवण्यासाठी दिली होती. मात्र फार थोडे पर्यावरणवादी या गोष्टींनी एक्साइट होताना दिसतात. चांगलं होणारच नाही अशी खात्री का असते?

हे तर अवघडच आहे, तुम्हीच सांगितलेल्या खर्याखुर्या बचतीमागचे थोडे वास्तववादी आकडे दिले तर त्यावर एक्साइट होताना काय दिसलं तुम्हाला? चांगलं होणारच नाही अशी खात्री कुठे दिसली? तंत्रज्ञानानेच प्रश्न सुटतील ही तुमची अटळ श्रद्धा दिसतेय, होय मी श्रद्धाच :) म्हणतेय कारण तंत्रज्ञानाने हाव, विषमता, वंशवाद, धार्मिक कट्टरता असले मानवी प्रश्न सुटणार असते तर आजच्या समाजाचे चित्र वेगळे दिसले असते. जागतिक तापमानवाढीची समस्या शुद्ध विज्ञानाने आपल्यासमोर ठेवली आहे पण त्याची कारणे मानवी स्वभावाशी आणि विकारांशी निगडीत आहेत आणि त्यावर उपाय राजकीय, सामाजिक आणि मानवी पुढाकारानेच शोधता येतील. तंत्रज्ञान हे ह्त्यार आहे जे मानवी मेंदूच्या तार्किकतेतून मि़ळाले आहे पण त्याकडे सर्वशक्तिशाली, सर्व अनिष्टावरचा उपाय म्हणून पाहणे निश्चितच तार्किक नाही.

राजेश घासकडवी Sat, 16/01/2016 - 02:04

In reply to by रुची

मागच्या वेळी देखील अशीच चर्चा झाली होती तेव्हा मी विचारलं होतं की नक्की काय झालं की पर्यावरणवादी आनंदी होतील? समजा, मानवजातीने ठरवलं की तेल वापरणं सोडून द्यायचं, आणि पूर्णपणे सौर किंवा इतर अविनाशी (वात, लाटा, जल वगैरे) ऊर्जा वापरायला सुरूवात करायची. तर ही ट्रान्झिशन व्हायला किती वर्षं लागली तर ते पुरेसं आहे? माझ्या मते इतका प्रचंड तांत्रिक बदल व्हायला तीस ते चाळीस वर्षं लागली तर मी त्याला अभूतपूर्व क्रांती म्हणेन. तुम्हाला यापेक्षा ते जलद व्हायला हवं आहे का? किती वर्षांत झालं तर 'हा, हे ठीक आहे' असं म्हणाल?

आपण या क्रांतीकारी बदलाच्या सुरूवातीच्या काही वर्षांत आहोत. तेलाचा दरडोई वापर कमी होऊन तेवढ्याच तेलात खूप जास्त लोक प्रवास करत आहेत. कागदाचा वापर कमी होतो आहे, पर्यायाने झाडं कमी कापली जातील (आत्ता नाही, पण भविष्यात), ऊर्जा कमी कमी वापरणारी अप्लायन्सेस येत आहेत,

तंत्रज्ञानावर श्रद्धा वगैरे म्हणणं फारच फार फेच्ड आहे. तंत्रज्ञानाचं ट्रॅक रेकॉर्ड प्रचंड प्रभावी आहे.

१. बालमृत्यू दहापटीने कमी झाले
२. सरासरी आयुष्य वाढलं
३. अन्नोत्पादन गेली सत्तर ऐशी वर्षं लोकसंख्यावाढीच्या वेगापेक्षा जास्त वाढलं.
४. ज्ञानाचा प्रसार तंत्रज्ञानामुळे शक्य झाला. इतकी शतकं ९५ टक्के जनता अशिक्षित होती.
५. अनेक साथीच्या रोगांचं उच्चाटन झालं.
अजून अनेक गोष्टी...

हे सगळं होत असताना 'चार अब्ज लोकांना अन्न पुरणं शक्य नाही' 'गरीब मरतच राहाणार' वगैरे ओरड होत होतीच. आत्ताही तापमानवाढीचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ उभं करावं लागेल. त्यासाठी माणसं जगवावी लागतील, शिकवावी लागतील, आणि संशोधन करत राहावं लागेल. तापमानवाढीचा प्रश्न पर्यावरणवाद्यांना सर्वात महत्त्वाचा वाटत असेल, पण मानवजातीसाठी इतरही जास्त महत्त्वाचे प्रश्न आहेत.

रुची Mon, 18/01/2016 - 10:14

In reply to by राजेश घासकडवी

मागच्या वेळी देखील अशीच चर्चा झाली होती तेव्हा मी विचारलं होतं की नक्की काय झालं की पर्यावरणवादी आनंदी होतील?

मागच्या वेळेस चर्चा या थराला गेली तेंव्हाच मी चर्चेतून बाहेर पडले होते कारण हे म्हणजे स्त्रीवाद्यांना "स्त्रियांना नक्की किती अधिकार मिळाल्यावर तुम्ही आनंदी व्हाल?" किंवा वंशवादाविरुद्ध बोलणार्यांना "नक्की किती वंशिक समता मिळाल्यावर तुम्ही आनंदी व्हाल?" असं विचारण्यासारखं आहे. तत्वतः या प्रश्नाची उत्तरे "स्त्रियांना पूर्ण समानाधिकार मिळाल्यावर" किंवा "पूर्ण वांशिक समता अस्तित्वात आल्यावर" अशी असू शकतात पण हे असं काही पूर्ण अस्तित्वात येणं शक्य नसतं आणि म्हणूनच जेंव्हाजेंव्हा या हक्कांची पायमल्ली होते तेंव्हा त्याविरोधात आवाज उठवणं ही त्या हक्कांसाठी लढणार्यांची जबाबदारीच असते, अर्थात हे तुम्हाला माहिती आहेच त्यामुळे या प्रश्नाचं प्रयोजन केवळ त्रागा असंच म्हणावं लागेल.

दुसरं असं की मी स्वतःला पर्यावरणवादी म्हणून घेणं अजिबात मान्य करणार नाही. मी एक अतिशय सामान्य, इतरांप्रमाणेच व्यवस्थेचा भाग असलेली, प्रगत देशामध्ये वास्तव्य असलेली, स्वतःचा बराच मोठा कार्बन फूटप्रिंट असलेली व्यक्ती आहे जिला आपल्या तत्वांप्रमाणे जगायचं ठरवलं तरं खूप मोठे त्याग करावे लागतील आणि ते सगळे करणं जमेल असं तिला वाटत नाही. शक्य तिथे आपल्या तत्वांना धरून चालावं, आपल्या भूमिकेत आणि राहणीत बदल करत आपण ज्या प्रकारच्या जगाचं स्वप्न पहातो त्यात रहाण्याची पात्रता स्वतःत निर्माण व्हावी इतकी माफक अपेक्षा असलेली व्यक्ती आहे, त्यामुळे पर्यावरणवाद्यांच्या वतीने मी उत्तर देऊ शकत नाही. पण वादाकरिता, मी स्वतः जागतिक तापमानवाढ दोन अशांखाली रोखता आली तर आनंदी होईन असं म्हणेन. ठीक?

पण मेख अशी आहे की पॅरिस पर्यावरण परिषदेत सर्व देशांनी आपापल्या प्रतिज्ञा पाळल्या तरी तापमानवाढ २.७ अंशांनी होईल असं तज्ञ म्हणताहेत आणि याही प्रतिज्ञा सदस्य देश पाळतील याची जराही खात्री देणे शक्य नाही (पूर्व इतिहाप्रमाणे) मगं अशा परिस्थितीत आम्ही आनंदी कसं रहायचं?

आता आपण तंत्रज्ञाना बाबतीतल्या तुमच्या खालील मुद्द्यांकडे पाहू,
१. बालमृत्यू दहापटीने कमी झाले
२. सरासरी आयुष्य वाढलं
३. अन्नोत्पादन गेली सत्तर ऐशी वर्षं लोकसंख्यावाढीच्या वेगापेक्षा जास्त वाढलं.
४. ज्ञानाचा प्रसार तंत्रज्ञानामुळे शक्य झाला. इतकी शतकं ९५ टक्के जनता अशिक्षित होती.
५. अनेक साथीच्या रोगांचं उच्चाटन झालं.

यातला पहिला, दुसरा आणि पाचवा मुद्दा बरोबर असला तरी ते पूर्णपणे एकमेकांशी संबंधित आहेत. म्हणजे बालमृत्यू घटल्याने सरासरी आयुष्य वाढण्यात मोठी वाढ झाली आहे. औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या काळात मूल जर दहा वर्षांपर्यंत जगले तर माणूस जितका जगायचा त्यात आणि आज माणूस सरासरी जितका जगतो त्यात केवळ आदमासे ६ वर्षांचे अंतर आहे.

लस बनविण्याच्या आणि पेनिसिलीनच्या शोधानंतर साथीच्या रोगांमध्ये बरीच घट झाली (उच्चाटन वगैरे म्हणणार नाही कारण इबोलाचा आणि सार्सचा इतिहास अलिकडचाच आहे), माणसाचे सरासरी आयुष्य वाढले पण ज्या विज्ञानाने माणसाला इतका महत्वाचा मंत्र मिळाला त्याचे तंत्रज्ञान वापरून माणसाने काय केले? तर हे मिळालेले हत्यार पाहिजे तसे, पाहिजे तितके आणि जिथे अनावश्यक होते तिथेही नफेखोरीसाठी अतिवापरले. अँटिबायोटिक्स, प्राण्यांना गिचमिडीच्या वातावरणात पोसताना त्यांना साथीचे रोग होऊ नयेत म्हणून टोचायला सुरुवात केली. आज जगात जेवढे अँटिबायोटिक्स वापरले जातात त्यातले तब्बल ९०%, आजारी नसलेल्या प्राण्यांना देण्यासाठी वापरले जातात. या अतिवापरामुळे आता आपण अशा काळात येऊन पोहोचलो आहोत की जिथे या अँटिबायोटिक्सला न जुमानणार्या जीवाणूंच्या नवीन प्रजाती तयार होत आहेत आणि हे अँटिबायोटिक्सचे प्रभावी तंत्र निष्फळ ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. तरीही, वैद्यानिकांनी वाजवलेल्या धोक्याच्या घंटेनंतरही, अमेरिकेसारख्या प्रगत देशालाही अँटिबायोटिक्सच्या अशा वापरावर कोणतीही बंदी घालता आलेली नाही किंवा त्याचा वापर कमी झालेला नाही. याचे कारण तंत्रज्ञान वाईट होते असे नव्हते तर ते चुकीच्या लोकांच्या हातात पडले आहे आणि आज याच लोकांच्या हातात कायदे बनवून घेण्याची आणि कायदे होण्यापासून रोखण्याची शक्ती आहे.

आता तुमच्या अन्नोत्पादन गेली सत्तर ऐशी वर्षं लोकसंख्यावाढीच्या वेगापेक्षा जास्त वाढलं याबद्दल; अन्नोत्पादन तर वाढलं पण मग एकीकडे अमेरिकेतली ७५% जनता ओबीज बनली आणि इथियोपियाताली उपासमारी मात्र तशीच राहिली, मग हे अन्नोत्पादन वाढल्याने नक्की फायदा कोणाला मिळाला? बरं हे अन्नोत्पादन ज्या रासायनिक खतांच्या आणि कीटकनाशकांच्या सहाय्याने वाढलं त्याने पर्यावरणाची आणि पर्यायाने आपल्याच भविष्यातल्या अन्नोत्पादानाची हानी होतेय हे कळूनही त्यावर दूरदृष्टीने आपण काही पावले उचलतोय का? नाही, कारण पुन्हा तंत्रज्ञानाचा अतिवापर किंवा अयोग्य वापर थांबवण्यावर आपण काहीच नियंत्रण ठेवलेले नाही. थोडक्यात मनुष्याच्या हावेला तंत्रज्ञानाने उत्तर सापडलेले नाही आणि साक्षरतेचं प्रमाण वाढूनाही अज्ञानात मात्र भरच पडते आहे असं म्हणावं लागतंय.

तापमानवाढीचा प्रश्न पर्यावरणवाद्यांना सर्वात महत्त्वाचा वाटत असेल, पण मानवजातीसाठी इतरही जास्त महत्त्वाचे प्रश्न आहेत.

ठीक. पण मग वैज्ञानिक चार अंशाने तापमानवाढ झाली तर त्याचे जे परिणाम होतील असं सांगताहेत त्याकडे पाहू.

१) समुद्रसपाटीजवळची शहरे पाण्याखाली जातील.
२) दुष्काळ, अतिवृष्टीमुळे अन्नोत्पादानावर मोठा परिणाम होईल.
३) जगात प्रचंड पाणीटंचाई निर्माण होईल.
४) चक्रीवादळांचे प्रमाण वाढेल.
५) समुद्रातील अनेक प्रजाती नष्ट होतील.

या सर्वांतून मला मनुष्यजातीला भविष्यात जीवितहानी, वित्तहानी, भूक, तहान आणि निसर्गाचे रौद्ररूप यांच्याशी सामना करायला लागेल असं दिसतंय. शिवाय अशा काळात संपत्तीच्या असमान विभागणीमुळे युद्ध, तंटे यांचे प्रमाण वाढून त्यानेही मनुष्याला हानी होण्याचे प्रमाण वाढलेले दिसेल. मानवजातीसाठी याहून अधिक महत्वाचे इतर प्रश्न कोणते असावेत? आता ज्या लोकांना आपल्याला पुढचे जेवण मिळणार की नाही याची शाश्वत्ती नाही त्यांना या भविष्यातल्या प्रश्नांबद्दल आस्था असण्याचं कारण नाही पण मग तुमच्याच दाव्याप्रमाणे मनुष्यजात आता त्यापेक्षा वरच्या पातळीवर पोहोचली आहे आणि अधिकाधिक लोकांना पोटभर खायला मिळतंय मग काय तरी त्यांना हे प्रश्न महत्वाचे का बरं वाटत नसावेत?
पर्यावरणाविषयी आणि आपल्या भविष्याविषयी आस्था असलेल्या लोकांचं पॅसिव्ह स्मोकर्ससारखं झालं आहे, त्यांनी स्वत: आपल्या रहाणीत कितीही बदल केले तरी जोवर इतर मनुष्यजातीला हे बदल करावेसे वाटत नाहीत तोवर काही बदलणार नाही.

राजेश घासकडवी Wed, 20/01/2016 - 02:33

In reply to by रुची

त्यामुळे या प्रश्नाचं प्रयोजन केवळ त्रागा असंच म्हणावं लागेल.

हा प्रश्न त्राग्याने बिलकुल विचारलेला नव्हता. त्यामागे एक फ्रस्ट्रेशन असं होतं की तंत्रज्ञानाचे महाप्रचंड फायदे आकडेवारीत दाखवून दिले तरी त्याला प्रत्त्युत्तर 'हो, हे झालंय खरं, पण त्याचा हा तोटा झाला की' असा अर्धा ग्लास रिकामा स्टाइलचं उत्तर येतं. आणि त्यात आकडेवारी नसल्यामुळे किती ग्लास रिकामा आहे आणि किती भरलेला आहे हे तपासणं कठीण जातं. त्यामुळे 'नक्की तुमची स्टॅंडर्ड्स काय आहेत?' हा प्रश्न विचारणं क्रमप्राप्त होतं.

औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या काळात मूल जर दहा वर्षांपर्यंत जगले तर माणूस जितका जगायचा त्यात आणि आज माणूस सरासरी जितका जगतो त्यात केवळ आदमासे ६ वर्षांचे अंतर आहे.

हा विदा कुठे आहे हे सांगाल का? कारण मला सापडलेला विदा इथे आहे. त्यात १८५० साली मॅसेच्युसेट्समध्ये व्हाइट मेल्स - १० वर्षं जगलेलं मूल असेल तर त्याचं उर्वरित अपेक्षित आयुष्य ४८ वर्षं होतं. २०११ मध्ये ते ६६ वर्षं झालेलं होतं. हा प्रचंड फरक आहे. आणि प्रत्येक कुटुंबात १० वर्षांच्या खालची दोन ते तीन मुलं मरत. ते दुःख सहन करत ४८ वर्षं, आणि त्या दुःखाशिवाय ६६ वर्षं हा प्रचंड फरक आहे.

अन्नोत्पादन तर वाढलं पण मग एकीकडे अमेरिकेतली ७५% जनता ओबीज बनली आणि इथियोपियाताली उपासमारी मात्र तशीच राहिली, मग हे अन्नोत्पादन वाढल्याने नक्की फायदा कोणाला मिळाला?

हेही खरं नाही. इथियोपियाची परिस्थिती वाईट होती हे खरं आहे, पण गेल्या वीसेक वर्षांत त्यात प्रचंड सुधारणा झालेली आहे.

At the same time, the prevalence of stunting was reduced from 58% in 2000 to 44% in 2011 and the prevalence of undernourishment fell from 75% in 1990-92 to 35% in 2012-14. The share of population without education was also reduced considerably from 70% to less than 50%. Finally, the number of households with improved living standards measured by electricity, piped water and water in residence doubled from 2000 to 2011.

आणि सर्वात टोकाचं उदाहरण घेणं उपयोगाचं नाही. भारत, चीन, बांग्लादेश, पाकिस्तान, इंडोनेशिया या पाच देशांत प्रचंड गरीबी आणि अन्नान्नदशा होती. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची परिस्थिती प्रचंड सुधारलेली आहे.

१) समुद्रसपाटीजवळची शहरे पाण्याखाली जातील.

हे एका रात्रीत होणार नाही. त्यासाठी पन्नास पंच्याहत्तर वर्षं लागतील. शहरं पाण्याखाली जाताना मनुष्यजात गप्प बसेल असं वाटतं का? हॉलंडचा कितीतरी भाग समुद्रसपाटीखाली आहे. गेली कित्येक वर्षं तिथे भिंती बांधून त्यांनी स्वतःचं रक्षण केलेलं आहे.
२) दुष्काळ, अतिवृष्टीमुळे अन्नोत्पादानावर मोठा परिणाम होईल.

कार्बन डायॉक्साइड वाढल्यामुळे पीकं वाढतील असाही अंदाज आहे. मला वाटतं निरीक्षणंही आहेत, पण आत्ता माझ्याकडे दुवे नाहीत.

३) जगात प्रचंड पाणीटंचाई निर्माण होईल.

गेल्या सत्तर ऐशी वर्षांत आपण चौपट लोकसंख्येला पाणी पुरवत आलो आहोत. २०५० पासून लोकसंख्याही घटणार आहे.

४) चक्रीवादळांचे प्रमाण वाढेल.

चक्रीवादळांत एके काळी शेकड्यांनी, हजारांनी माणसं मरत. आता ते प्रमाण दहा-पन्नासवर आलेलं आहे.

५) समुद्रातील अनेक प्रजाती नष्ट होतील.

काही होतील कदाचित. पण तशाही आत्तापर्यंत जन्माला आलेल्या ९९.९% प्रजाती मेलेल्याच आहेत.

माझा अंदाज असा आहे

१. पुढच्या पन्नासेक वर्षांत जंगलाखाली असलेल्या क्षेत्रफळात नोंद घेण्याजोगी वाढ होईल - जितका कार्बन डायॉक्साइड जास्त तितकी झाडं जास्त.
२. पन्नासेक वर्षांत माणूस जवळपास झीरो कार्बन एमिशन आयुष्यपद्धती जगत असेल.
३. हे करताना जगभरच सर्वत्र बालमृत्यू जवळपास शून्यावर येतील, बहुतांश जनता सुशिक्षित (बॅचलर्स) असेल, आणि सर्वजणांना पोटभर अन्न मिळत असेल.
४. कागदाचा वापर आजच्या एक चतुर्थांशावर आलेला असेल. त्यामुळे कमी झाडं मरतील.
५. आणि इतर बरंच काही.

नगरीनिरंजन Wed, 20/01/2016 - 07:13

In reply to by राजेश घासकडवी

सिरियसली? बदलत्या तापमानामुळे झाडे व इतर सजीव हळूहळू उत्तरेकडे स्थलांतर करु लागले आहेत. म्हणजे ग्रीनलँड व उत्तर ध्रुवावर जंगल होईल कदाचित आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो लक्षात येण्याइतका मोठा बदल असेल. पण दुर्दैवाने सगळ्या झाडांचा स्थलांतराचा वेग सारखा नसतो. शिवाय झाडे आशावादी नसल्याने उष्णतेकडे दुर्लक्ष करुन फक्त कार्बनडायॉक्साईड घ्यावा हे त्यांना कळत नाही. त्यामुळे ट्रॉपिकल प्रदेशात डायव्हर्सिटी खूप कमी होईल. (योगायोगाने तिथेच बहुसंख्य माणसे राहतात.) शिवाय आधीच पामऑईलसाठी तिथली जंगले तोडण्याचे काम चालू आहेच.
शिवाय उत्तरेकडे स्थलांतर करणारे इतरही जीव असतील आणि ते उत्तरेकडे गेल्यावर इन्व्हेजिव होतील. उदा. झाडाचं खोड पोखरणारे काही कीटक उत्तरेकडच्या सूचिपर्णी जंगलात स्थलांतरित झाल्यावर फोफावले आणि त्यांनी अनेक झाडे पोखरुन नष्ट करायचा झपाटा लावला. या किड्यांविरुद्ध संरक्षण यंत्रणा तयार करायला या झाडांना लक्षावधी वर्षे लागतील. म्हणजे थोडक्यात ही झाडे नष्ट होतील.
शिवाय तीव्र दुष्काळ आणि पूर वगैरेमुळे नुकसान होईल ते वेगळेच.

राजेश घासकडवी Wed, 20/01/2016 - 08:28

In reply to by नगरीनिरंजन

येणाऱ्या प्रेडेटर्सपासून स्वतःचं संरक्षण करायला लक्षावधी वर्षं वगैरे मिळणं ही निसर्गात लक्झरी असते. गेलं आइस एज पंधरा हजार वर्षांपूर्वी आलं होतं, आणि मिनी आइस एज पाचशे वर्षांपूर्वी. त्यात जी उत्तरेकडून दक्षिणेकडे स्थलांतरं झाली ती तर काही मानवनिर्मित नव्हती. उत्तर ध्रुवावर जंगलं तयार होतील वगैरे अजिबात म्हणणं नाही. माझं म्हणणं असं आहे की जी सध्या रेनफॉरेस्ट्स आहेत, ती कार्बनडायॉक्साइड वाढल्यामुळे अधिक फोफावतील.

(गब्बर मोड ऑन) पृथ्वीने मानवाचं अस्तित्व हे एखाद्या आपटलेल्या मिटियरप्रमाणे का समजू नये? साडेसहा कोटी वर्षांपूर्वी जो मीटियर आपटला त्यात ९० टक्क्यांहून जास्त प्रजाती नष्ट झाल्या. माणसाने फारतर एकदोन टक्के नष्ट केल्या असतील. ट्रॉपिकल प्रदेशात समजा डायव्हर्सिटी कमी झाली तर काय बिघडलं? ज्या फडतूस जीवांना हे व्हेरिएशन झेपत नाही, ते मेलेलेच काय वाईट? (गब्बर मोड ऑफ)

मी काय म्हणतो, की पीक ऑइलसंबंधी जशी आपण पैज लावली, तशी लावायची का? की पुढच्या पंधरा वर्षांत पृथ्वीवरचं फॉरेस्ट कव्हर वाढेल (किंवा कमी होईल), पुढच्या वीस वर्षांत कार्बन डायॉक्साइड वाढल्यामुळे अन्नउत्पादन वाढेल (किंवा कमी होईल), पुढच्या पंधरा वर्षांत सायक्लोन्सची संख्या तितकीच राहील (किंवा वाढेल), पुढच्या वीस वर्षांत कुठचंच मेजर शहर पाण्याखाली बुडणार नाही (किंवा बुडतील), पुढच्या तीस वर्षांत कार्बन फूटप्रिंट आजच्या एक तृतियांश असेल (किंवा त्यापेक्षा प्रचंड मोठी असेल)... वगैरे वगैरे.

नगरीनिरंजन Wed, 20/01/2016 - 08:58

In reply to by राजेश घासकडवी

तीस वर्षात काहीच होणार नाही हे मान्य आहे पण आपल्याला पुढची ३० वर्षेच इंडस्ट्रीयल सिव्हिलायझेशन चालवायची नाहीये ना.
अजून १००-२०० वर्षाचा प्लॅन सुद्धा लॉंगटर्म प्लॅन म्हणता येणार नाही मानवी अस्तित्वाच्या स्केलवर. जिओलॉजिकल स्केलवर तर जाऊ द्या.
२०० वर्षांत काय होईल हे तेव्हाचे लोक बघून घेतील अशी भूमिका असेल तर प्रश्नच मिटला.

पिवळा डांबिस Sat, 16/01/2016 - 00:19

In reply to by रुची

आम्ही नुकतीच लावून घेतली.
मागे ह्या विषयावर घासकडवींची मरतुकडे दिवे लावून घ्यायची योजना वाचल्यानंतर ह्या विषयाचा थोडा अभ्यास केला. जर तुमची जागा एका ठराविक मर्यादेच्या वर असेल तर तो उपाय फारसा प्रभावी ठरत नाही असं दिसून आलं.
जर तुमच्याकडे २४ तास वीज वापरणारी उपकरणं/यंत्र असतील (रेफ्रिजरेटर्स, फ्रीझर्स, पूलपंप्स वगैरे) तर नुसते दिवेच मिणमिणते ठेऊन काही फारशी बचत होत नाही.
सर्व इतर पर्याय अभ्यासल्यानंतर सौरउर्जा हाच त्यातल्या त्यात प्रभावी पर्याय वाटला. पे फॉर द प्लान्ट, रॉ मटेरियल इज फ्री.
शिवाय जागतिक प्रदूषण कमी करण्यात आपला थोडातरी हातभार आहे हे समाधान.
बसवणार्‍या कंपनीच्या इंजिनियर्सच्या एस्टिमेटप्रमाणे विजेचं बिल ९०% कमी होईल असा अंदाज आहे. १००% कधीच कमी होणार नाही कारण वीज कंपनीचे इतर चार्जेस, टॅक्सेस वगैरे असतात. पण हेही नसे थोडके.
बाकी आमचा वीजेचा मीटर उलट फिरतांना पाहून गंमत वाटते! :)

ओ नाम्या Sun, 17/01/2016 - 08:03

In reply to by राजेश घासकडवी

तुम्हाला लेख आवडला त्याबद्दल धन्यवाद, या विषयावर साधक-बाधक चर्चा होणं महत्वाचं आहे असं वाटतं.

जगातली २५ टक्के लोकसंख्या ७५ टक्के ऊर्जा वापरते. अशा परिस्थितीत या ऊर्जाबचतीचं ओझं गरीब ७५ टक्क्यांवर टाकणं अन्याय्य ठरलं असतं.

तुमचा हा मुद्दा कळला नाही; हे ध्येय जर UNFCC ने सर्व देशांवर लादले असते तर मग ते अन्यायकारक ठरले असते पण हे INDCज प्रत्येक देशाने स्वतः ठरवले आहेत, त्यांना साध्य न करण्यावर शिक्षा करणे अन्यायकारक कसे ठरले असते? शिवाय या INDCज त्या-त्या देशांच्या अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या प्रमाणात आहेत, मग तक्रार काय आहे?

चिमणराव Thu, 14/01/2016 - 20:38

#"मुंबईला ईंडस्ट्रियल पोल्युशनमुळे जो काही कायमचा घाणेरडा दुर्गंध--------"

अगदी थोडक्यात उदा० सांगायचे तर स्विस औषधे करणारे अगोदरचे शंभर किलोंवर जबरी रासायनिक प्रक्रिया करून सहा किलो केलेले इंटरमिडिएट भारतातून घेतात.त्यावर लॅब लेवलला सिक्रट प्रक्रिया करून अर्धा किलो ड्रग बनवतात.घाण तुमच्या देशात ( आम्चा सगळा माल एक्सपॅार्ट होतो कॅालर टाइट).ती घाण नदीत सोडून ( उल्हास नदी )फॅक्टरी इन्स्पेक्टरनेच सांगितल्याप्रमाणे खड्डे दाखवून सही घेतात पोलुशन कंट्रोलचे.या सर्वावर परदेशातल्या लेखकांनी बेस्टसेलर लिहिले असते.

पिवळा डांबिस Thu, 14/01/2016 - 23:27

In reply to by चिमणराव

अगदी थोडक्यात उदा० सांगायचे तर स्विस औषधे करणारे अगोदरचे शंभर किलोंवर जबरी रासायनिक प्रक्रिया करून सहा किलो केलेले इंटरमिडिएट भारतातून घेतात.त्यावर लॅब लेवलला सिक्रट प्रक्रिया करून अर्धा किलो ड्रग बनवतात.घाण तुमच्या देशात ( आम्चा सगळा माल एक्सपॅार्ट होतो कॅालर टाइट).ती घाण नदीत सोडून ( उल्हास नदी )फॅक्टरी इन्स्पेक्टरनेच सांगितल्याप्रमाणे खड्डे दाखवून सही घेतात पोलुशन कंट्रोलचे.

मग हे थांबवणं तरी भारतीयांच्याच हातात आहे की नाही?
अहो, एफ्लुएंट पूर्ण ट्रीट करून, त्याचं सॅम्पल फिशटॅन्कमध्ये भरून, त्यात मासे सोडून, जर ते ४८ तास जिवंत राहिले तरच ते एफ्ल्युएंट रिलीज करणार्‍या एका जर्मन फार्मा कंपनीत मी स्वतः काम केलेलं आहे.
(तरी देखील इन्स्पेक्टर्सचा मदिरोचित सन्मान करावा लागायचा ती गोष्ट वेगळी!)
बंद पडली ती कंपनी. सहाजिकच आहे!
तुम्ही वर सांगितलेल्या कॉम्पिटीशनमध्ये तिचा टिकाव कसा लागणार होता?

चिमणराव Fri, 15/01/2016 - 07:12

"मग हे थांबवणं तरी भारतीयांच्याच हातात आहे की नाही?-----------कॉम्पिटीशनमध्ये तिचा टिकाव कसा लागणार होता?"
हेच उत्तर आहे.भ्रष्टाचाराच्या दोन बाटल्या कॅास्ट अव प्रॅाडक्शन खाली आणतात.

आता या मसुद्यावर सही केल्यावर भारतातल्या कोळसा खाणी पुन्हा सुरू करणार का नाही?

चिमणराव Fri, 15/01/2016 - 07:23

फिशटॅन्कमध्ये "टिलापिलिया" मासे ठेवण्याचे आमच्याच लॅबमध्ये होते.आणि ९९टक्के नियम पाळणाय्रा कंपनीतच आपण कामाला होतो परंतू तसे एमआइडिसीतल्या इतर कंपन्यात नाही।एका निळा डाय बनवणाय्रा कंपनीत गेटवरच्या वॅाचमनच्या ( भैया तिथेच राहतो)फॅम्लीसकट सर्व जमीन निळी आहे आणि शेजारच्या लाल डाइ बनवणाय्रा कंपनीत लाल वॅाचमन..
तरी अजून भिवंडी/श्रीपुर/नोइडा हे बालेकिल्ले राहिलेच.

चिमणराव Sun, 17/01/2016 - 11:01

१०० किमी गाडी चालली की सामान्यपणे ८ किलो ( अथवा अधिक) कार्बन डायॅाक्साइड तयार होतो ना?अशा हजारो गाड्यांचा रोजचा वायू शोषण्याकरिता काय करता येईल?

नगरीनिरंजन Sun, 17/01/2016 - 20:28

तंत्रज्ञानाचे ट्रॅक रेकॉर्ड खरच फार प्रभावी आहे. अगदी आदिम काळात दगडी हत्यारांनी शिकार करायला लागल्यापासून तंत्रज्ञानाचे फायदे दिसायला लागले आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने सरप्लस अन्न मिळवता येऊ लागले. मग टेकडीवर मॅस्टॉडॉन आणि मॅमथचे कळपच्या कळप पळवत नेऊन त्यांचा कडेलोट करुन गरजेपेक्षा कितीतरी अधिक मांसाचे ढीगच्या ढीग मिळू लागले. आधीच्या छोट्या-मोठ्या प्राण्यांची शिकार करुन व कंदमुळे गोळा करुन जगण्यापुढे ही फारच मोठी प्रगती होती. लवकरच या एफिशियंट तंत्रामुळे मॅस्टॉडॉन्स आणि मॅमथ नामशेष झाले. तंत्रज्ञानाची प्रगती होत गेली तसे तसे मानवी तंत्रज्ञानाच्या मारण्याच्या वेगापेक्षा ज्यांची ब्रीडिंग सायकल्स मोठी होती ते सगळे प्राणी आणि पक्षी हळू-हळू नामशेष होत गेले. माणसांची संख्या मात्र वाढत गेली. (संदर्भः"द सिक्स्थ एक्स्टिन्क्शनः ॲन अननॅचरल हिस्ट्री" - एलिझाबेथ कोल्बर्ट)
शेवटी सहज मिळणारे अन्न संपले आणि वाढलेल्या लोकसंख्येला पोसायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला. मदतीला तंत्रज्ञानच धावले आणि शेतीचा उदय झाला. ज्यांनी शेतीच्या कणामोडू कामाला विरोध केला त्यांना रानटी, आळशी आणि अगदी राक्षसही ठरवले गेले. शेतीमुळे गावे वसू लागली. छोट्या-छोट्या गटात विभागलेली माणसे मोठ्या संख्येने एकत्र येऊन राहू लागली. लवकरच हुशार माणसांना यातले फायदे दिसायला लागले. खाजगी मालकीची कल्पना निर्माण झाली आणि आधी प्रत्येकाला दोन्ही हातांनी देणार्‍या देवाचे स्वघोषित दलाल निर्माण झाले. चलाख लोकांनी बहुसंख्य स्रोत ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालवले. शोषक आणि शोषित अशी विभागणी झाली. निसर्गात स्वतःच्या कुवतीनुसार जगणारी-मरणारी माणसे आता या नव्या दलालांच्या कृपेवर जगू-मरु लागली. खेड्यांची मोठी गावे आणि मोठ्या गावांची शहरे होत सिव्हिलायझेशन अस्तित्वात आली. दाट लोकसंख्येमुळे आणि राहतो तिथेच घाण करत राहिल्याने साथीचे रोग निर्माण झाले. पूर्वीचा प्रोटीन व फायबरसंपृक्त वैविध्यपूर्ण आहार जाऊन तीन-चार प्रकारच्या धान्यांचाच आहारात प्रामुख्याने समावेश होऊ लागला. त्यामुळे एकीकडे जमिनीचा सुपीकपणा कमी होत गेला आणि मानवी माद्यांचा सुपीकपणा वाढत गेला. वयात येण्याचा काळ कमी होऊ लागला आणि पाळीव प्राण्यांमध्ये दिसणारे गुणधर्म स्वत:हून पाळीव झालेल्या माणसांमध्ये दिसू लागले. लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली आणि त्याबरोबर मालकीहक्क, सत्ताकांक्षा आणि त्यासाठी होणारी युद्धेसुद्धा. तरीही हीच व्यवस्था सर्वोत्तम मानून त्यातच आनंदी राहणे; वरच्यांची गुलामगिरी करणे आणि खालच्यांवर गुरगुर करणे हा पाळीव माणसांचा स्वभावधर्म झाला. सगळ्यात वरच्या स्तरातल्या लोकांनी खालच्यांना नियंत्रणात ठेवण्याची वेगवेगळी तंत्रे शोधली. परावलंबी झालेल्या माणसांची भरमसाठ पिलावळ निर्माण होऊ लागली आणि त्यातली बहुतांश संतती माणसानेच पोसलेल्या रोगजंतूंना बळी पडू लागली. दहाहजार वर्षांतच ज्याला अंधारयुग म्हणावे असे दिवस आले. यातून मार्ग काढायला परत तंत्रज्ञानच धावले. मरण टाळायचे असेल तर फक्त मोठ्या प्राण्यांनाच नाही तर सूक्ष्म जीवजंतूंनाही मारले पाहिजे हे माणसाच्या लक्षात आले. (पुन्हा मागे जाऊन छोटे गट करून वेगवेगळे स्थानिक स्रोतांवर जगून राहणे शक्यच नव्हते; ती अधोगती झाली असती).
तेलाचा शोध लागल्यावर तर अनेक प्रकारची रसायने तयार करून म्हणाल त्याचा नाश करण्याची शक्ती प्राप्त झाली. नुस्त्या भाल्या-बरच्यांनी मोठमोठे प्राणी संपवणाऱ्या माणसाच्या हातात आता तर सगळे जगच नष्ट करण्याची शक्ती आली. काही माणसांच्या हातात अतिप्रचंड शक्ती आली. पृथ्वीवरील जंगले दोन-तीनशे वर्षांत निम्म्यावर आली. प्राणी माणसाच्या दयेवर जगू लागले. नैसर्गिक जीवसंस्थांची गरज नाही; सगळं आम्ही तंत्रज्ञानाने मॅनेज करू असा आत्मविश्वास आला. त्यासाठी फक्त लोकांनी विशिष्ट प्रकारे जगावे एवढीच गरज होती. नोकरीधंदा करावा, चार पैसे कमवावे, मुलांना जन्म द्यावा, शॉपिंग करावे, शहरात राहावे, दुकानातून मिळते ते अन्न घ्यावे, बाकी सगळे मोठमोठ्या कॉर्पोरेशन्स व त्यांचे मालक असलेल्या मूठभर लोकांवर सोपवावे. ज्या लोकांनी हे मनापासून स्वीकारले ते प्रगत म्हणवले गेले. त्यांना तंत्रज्ञानाने उदार मनाने याच गोष्टी परतपरत करण्यासाठी "सरासरी" चाळीस वर्षांचे वाढीव आयुष्य आणि भविष्यात मरण कायमचे टाळण्याचे स्वप्न दिले. जगातल्या फक्त पंधरावीस देशातल्या लोकांना हे पुरवता पुरवता पृथ्वीचे हवामान बदलण्याइतकी वेळ आली. ते मिळालेल्या लोकांसाठी इतर अनेक लोकांना पाळीव जनावरांसारखे आयुष्य जगावे लागते. पण ते मिळालेले लोकही अगदी स्वर्गात आहेत असेही नाही. एकलकोंडेपणा आणि आपली संपत्ती आपल्याला मरेपर्यंत पुरणार नाही या भीतीने तेही ग्रासलेलेच आहेत. तरीही जगात सगळीकडे सुख येणार आणि तंत्रज्ञान आपल्याला काही कमी पडू देणार नाही असा प्रचार करणे तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या अजस्त्र यंत्रणेवर हुकुमत गाजवणाऱ्यांची गरज आहे. यात काहीही बदल होणार नाही; अब्जावधी वर्षांत आपोआप निर्माण झालेल्या व दैवी चमत्कारापेक्षा कमी नसलेल्या विश्वातल्या कदाचित एकमेव असलेल्या जीवसृष्टीचे अतोनात नुकसान झाले, सगळी माणसे गुलाम झाली, कोणत्या तरी एकाच जीवजंतूला फोफावण्यासाठी एकजिनसी स्ट्रॅटम निर्माण करत राहिली तरी परिस्थिती गोंडस आहे असाच प्रचार होत राहील हेच दु:ख आहे.
फॉरबिडन ॲपल खाल्ले म्हणून माणसाला नंदनवनातून हाकलले अशी गोष्ट आहे. त्याचा सूड म्हणून माणसाने सगळीकडे सफरचंदाची झाडे लावून नंदनवनच नष्ट केले असा त्याचा पुढचा भाग आहे.

अतिशहाणा Fri, 22/01/2016 - 20:02

In reply to by नगरीनिरंजन

प्रतिसाद आवडला. पण समजा पृथ्वी सगळ्या प्राण्याबिण्यांसकट (मनुष्यासह) नष्ट झाली तरी काय हरकत आहे बॉ? परत एकदा बिग ब्यांग वगैरे होईलच की ;)

स्वधर्म Thu, 21/01/2016 - 11:41

राजेश यांची भूमिका व ननि यांचा प्रतिसाद वाचून:
डेव्हीड अाॅर यांची अाठवण झाली. त्यांनी उच्चशिक्षण या विषयाबाबत असलेले भ्रम सांगितले अाहेत. त्यापैकी एक असा की “We can manage anything, even if we don’t know it today”. तंत्रज्ञानाची वकीली करणार्या लोकांचा असाच काही भ्रम असावा असे अनेकदा वाटते.
समजा अापल्याला उत्तरेला जायचे अाहे, पण अापण चुकून दक्षिणेला जाणार्या रेल्वेत बसलो अाहोत, व ते अापल्या सर्वांच्या लक्षातही अाले अाहे. पण अाता गाडी न थांबवता, अापण गाडीतच इंजिनाकडून गार्डाच्या डब्याकडे चालून असे समाधान मानत अाहोत, की अांंम्ही बरोबरच करत अाहोत. अशी काहीशी नवतंत्रज्ञानाचाच वापर करून sustainability बाबत काम करणार्या संस्था, कंपन्या व सरकारे यांची अवस्था अशी झाली अाहे असे वाटते. उतरून योग्य दिशेला जाण्यासाठी, गाडी कुणालाच थांबवायची नाहीय. एलइडी दिवे, सोलर पॅनेल इ मुळे जोपर्यंत जगाचा एकूण उर्जा वापर कमी करता येणार नाही तोपर्यंत त्यांचा बेफाम वेगाने उलट चाललेल्या गाडीत सुलट दिशेने चालल्याचे भ्रामक समाधान देण्यासाठीच उपयोग अाहे.