इतिहास

लीप इयर, अधिकमास इत्यादि.

आज २९ फेब्रुअरी २०१६ हा लीप दिवस आहे. ह्या संबंधात ख्रिश्चन कालगणनेमधील लीप दिवस, त्याचप्रमाणे हिंदु कालगणनेमधील अधिकमास, क्षयमास आणि तिथींची वृद्धि आणि क्षय ह्या संकल्पनांचा आढावा ह्या लेखाद्वारे घेण्याचा प्रयत्न केला आहे. दोन धर्मपरंपरांमधील ह्या संकल्पना वरवर पाहता भिन्न वाटल्या तरी त्यांची प्रेरणा एकच आहे आणि ती म्हणजे कालगणना ही ‍ऋतुचक्राबरोबर चालत राहील अशी योजना करणे. मुस्लिम कालगणनेमध्ये ह्या संदर्भात काय केले जाते ते अखेरीस काही शब्दात दाखवितो.

हिंदु परंपरा कशी विकसत गेली हे प्रथम पाहू. अतिप्राचीन कालामध्ये कालगणनेची पहिली संकल्पना नैसर्गिकपणे उद्भवलेली असणार ती म्हणजे दिवस, एका सूर्योदयापासून दुसर्‍या सूर्योदयापर्यंत लोटणारा काळ म्हणजे एक दिवस. त्या नंतरची निर्माण झालेली संकल्पना म्हणजे मास किंवा महिना. अमावास्या म्हणजे सूर्य-चंद्र युती किंवा सूर्य आणि चन्द्र ह्यांचे रेखांश सारखे असणे. अशा एका अमावास्येपासून पुढच्या अमावास्येपर्यंतचा कालावधि म्हणजे एक चांद्रमास होय. हा चांद्रमास वरवर पाहिल्यास ३० दिवसांचा असतो असे भासते. मास हा शब्दच ’मास्’ किंवा ’मास’ अशा चन्द्रदर्शक शब्दांतून बनलेला आहे. पौर्णमासी-पूर्णमासी-पूर्णिमा म्हणजे चन्द्र पूर्ण असण्याची तिथि. माहेमोहर्रम (मोहर्रमच्या महिन्यात) अशा मुस्लिम शब्दरचनेमध्ये असणारा ’माह’ हा शब्दहि अवेस्ताच्या प्राचीन भाषेमधून पर्शियन भाषेमध्ये आला आहे. अवेस्ताच्या भाषेचे आणि संस्कृतचे साम्य प्रसिद्धच आहे. असे बारा चान्द्रमास गेले म्हणजे एक ऋतुचक्र पूर्ण होते ही सहज निरीक्षणामधून कळलेली तिसरी संकल्पना. अतिप्राचीन काळातील असे वर्ष ३६० दिवसांचे होते असे ऋग्वेदातील उल्लेखावरून समजते.

अमावास्येपासून पहात गेले तर चन्द्र आणि सूर्यामधले कक्षावृत्तावरील रेखांश अंतर रोज १२ रेखांशांनी वाढत असते आणि असे ३० वेळा झाले की ३६० अंशांमधून चन्द्र फिरून पुन: चन्द्रसूर्यांची युति होऊन पुन: अमावास्या येते हे दिसून येते. ह्या तीस घटनांना ’तिथि’ असे नाव आहे. ह्या १२ अंशांच्या ह्या प्रत्येक वाढीनंतर तिथि बदलते. अमावास्येनंतर पहिल्या १२ अंश भागाचा प्रवास चन्द्र सुरू करतो आणि तदनंतर जो पहिला दिवस उजाडतो त्याच्या सूर्योदयक्षणापासून प्रतिपदा तिथि सुरू झाली असे म्हणतात. ह्या मार्गाने वाढत्या चंद्राच्या प्रतिपदा-द्वितीया अशा १५ तिथींना शुक्ल पक्ष म्हणतात आणि उतरत्या चन्द्राच्या १५ तिथींना कृष्ण पक्ष म्हणतात.

वेदकालानंतर कितीएक शतके लोटली आणि कालाचे अधिक सूक्ष्म मापन करता येणे शक्य झाले. त्यामुळे ऋतुचक्र पूर्ण होण्यास ३६० दिवस पुरे पडत नाहीत तर काही अधिक दिवस लागतात असे कळले असावे, यद्यपि त्या प्राचीन कालात बर्षाचे माप कितपत सूक्ष्म होते हे सांगणारे काहीच साधन उरलेले नाही. ह्या ऋतुचक्र काळामध्ये सूर्य एका संपातबिंदूपासून निघून रोज सुमारे १ अंश कक्षेमध्ये चालत पुन: त्या संपातबिंदूपाशी येतो. ह्याला सांपातिक सौर वर्ष अथवा सावन सौर वर्ष असे म्हणतात आणि ऋतुचक्र ह्या वर्षाशी बांधलेले असते. (’सांपातिक’ म्हणजे एका संपातबिंदूपासून निघून कक्षेत वर्षभर भ्रमण करून पुन: त्या संपातबिंदूपर्यंत सूर्य पोहोचण्यास लागणारा काळ.) ऋतुचक्राला बांधलेल्या ह्या वर्षाला ३६० दिवसांहून असा थोडा अधिक काळ जातो हे सहजी लक्षात येण्याजोगे नाही. १०००० वर्षांपूर्वी शेती करण्यास मानवाने प्रारंभ केला तेव्हा ३६० दिवस आणि बारा महिन्यांच्या चन्द्रावर बेतलेल्या गणनेचाच पेरणी आणि शेतीच्या अन्य कामांना उपयोग केला गेला असणार. शेतीला ही गणनापद्धति चालत नाही हे कोणाहि शेती करणार्‍याला एका आयुष्याच्या कालावधीत वैयक्तिक अनुभवामधून कळेल पण कैक पिढ्या आणि शतके लोटल्यानंतरच असे अनुभव सर्वमान्य झाले असणार. त्याचा उपाययोजना म्हणजे वेदकालातच निर्माण झालेली अधिकमासाची कल्पना. सूक्ष्म मापन अजून कैक शतके दूर होते पण अनुभवावरून हे लक्षात आले असणार की ३६० दिवसांच्या वर्षगणनेमध्ये आणि ऋतुचक्रामध्ये फरक आहे. तो फरक काढून टाकण्यासाठी केलेली उपाययोजना म्हणजे अधिकमास हे वेदांतच दिसते. यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेमध्ये तिचा स्पष्ट उल्लेख आहे.

कालान्तराने सूक्ष्म मापन शक्य झाल्यावर पुढील गोष्टी समजून आल्या. पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करीत असतांना पृथ्वीवरून सूर्याचे दिसणारे स्थान रोज बदलत असते. असे रोज स्थान बदलत सूर्याला परत पहिल्या स्थानी येण्यासाठी लागणारा काल, म्हणजेच एक ’सावन वर्ष’ अथवा tropical year, एक ऋतुचक्र पूर्ण होण्यासाठी लागणारा काल असे वर सांगितलेच आहे. ग्रीक विद्वान् हिप्पार्कसच्या मते ते वर्ष ३६५ दिवस ५ तास ५५ मिनिटे आणि १२ सेकंदांचे होते म्हणजेच ३६५.२४६६६ दिवसांचे होते. आर्यभटाच्या मते ते ३६५ दिवस १५ घटिका ३१ पळे १५ विपळे म्हणजेच ३६५.२५८६८ दिवस होते. सध्याच्या हिशेबानुसार ते ३६५ दिवस ५ तास ४९ मिनिटे आणि १९ सेकंदांचे आहे म्हणजेच ३६५.२४२५८ दिवस इतके आहे. चान्द्रमास (एका अमावास्येपासून दुसर्‍या अमावास्येपर्यंतचा काल) हाहि तीस पूर्ण दिवस नसून २९ दिवस १२ तास ४४ मिनिटे आणि ३ सेकंद म्हणजेच २९.५३०५८९ दिवस इतका आहे. ह्यावरून १२ चान्द्रमास म्हणजे ३५४.३६७०६८ इतके दिवस. साहजिकच एका सावन वर्षात १२ चान्द्रमास पूर्ण होऊन १३ व्या चान्द्रमासाचाहि काही काल - १०.८७५५१२ इतके दिवस - बसतो. चन्द्राचे भ्रमण अधिक सहजपणे लक्षात येणारे आणि मोजण्यास अधिक सुलभ असल्याने बहुसंख्य मानवी समूहांचे धर्मांशी निगडित आचार, सण इत्यादि चान्द्रवर्षाशी जोडलेल्या आहेत. आता चान्द्रवर्ष आणि सौरवर्षांची एकमेकात काही मार्गाने सांगड न घातल्यास धार्मिक बाबी, सणवार आदींचे ऋतूंशी काही नाते उरणार नाही. असे नाते टिकविण्यासाठी बहुसंख्य जुन्या कालगणनांमधून वेगवेगळ्या मार्गांनी चान्द्रवर्षामध्ये दिवस वाढवण्याचे मार्ग शोधले गेले आहेत. ह्याचा भारतीय प्रकार म्हणजे अधिकमास आणि क्षयमासांची योजना.

वेदकालापासून अधिकमास आणि क्षयमासाच्या संकल्पना होत्या असे आपण वर पाहिले पण ते मास केव्हा घालायचे ह्याचे जे काय गणित वेदकालामध्ये असेल ते लुप्त झालेले आहे. आपले सध्याचे गणित ह्या पुढे वर्णिल्यानुसार आहे.

सर्व ग्रह, चन्द्र आणि सूर्य हे आकाशामध्ये भ्रमण करीत असतांना पूर्वपश्चिम वृत्ताच्या दोन बाजूस ८+८=१६ अंश अशा पट्टयामध्ये असतात. त्या भागात दिसणार्‍या तारकापुंजामधून आकृतींची कल्पना करून बनविली गेलेली अश्विनी-भरणी-कृत्तिका-रोहिणी इत्यादि २७ नक्षत्रे आणि ३०-३० रेखांशांचे विभाग कल्पून ठरवलेल्या मेषादि १२ राशि इ.स. पूर्व कालापासून भारतीयांना तसेच चीन आणि पाश्चात्य विद्वानांना ज्ञात आहेत. ह्यापैकी नक्षत्रांचे उल्लेख वेदांमधून मिळत असल्याने नक्षत्रे भारतीय आणि वेदकालीन असावीत असे मत शं.बा. दीक्षित ’भारतीय ज्योतिषशास्त्राचा इतिहास’ ह्या ग्रंथात मांडतात. मात्र राशि आणि त्यांचे नावे पश्चिमेकडून आपल्याकडे इ.स.पूर्व २०० च्या पुढेमागे आली असेहि ते म्हणतात.

आकाशात भ्रमण करतांना सूर्य प्रतिदिनी सुमारे १ अंश चालतो आणि एक राशि ३० दिवसात पूर्ण करतो. त्यावरून चान्द्रमास, अधिकमास आणि क्षयमास पुढील प्रकारे निश्चित होतात: सूर्याने मेष राशीमध्ये प्रवेश केला की चैत्र मास, वृषभ राशीत प्रवेश केला की वैशाख मास अशा मार्गाने १२ राशिप्रवेशांवरून - १२ राशिसंक्रमणांवरून - चैत्रवैशाखादि १२ मासनामे निश्चित होतात. अशा रीतीने बहुतेक वर्षांमध्ये सूर्याचे एक राशिसंक्रमण आणि त्याच्या बरोबर एक चान्द्रमास असे बरोबरीने चालत राहतात.

एक सावन वर्ष आणि एक चान्द्रमास ह्यांची सूक्ष्म मापने वर उल्लेखिलेली आहेत. ह्यावरून दिसेल की साहजिकच एका सावन वर्षात १२ चान्द्रमास पूर्ण होऊन १३ व्या चान्द्रमासाचाहि काही काल बसतो. तीन ते साडेतीन वर्षांमध्ये तो जवळजवळ एका महिन्याइतका वाढून बसतो आणि कोठेतरी एक अधिकमास वाढविण्याची आवश्यकता पडते. पृथ्वी आणि चन्द्र ह्यांच्या भ्रमणकक्षा पूर्ण गोलाकृति नसतात. त्या लंबगोलाकृति असतात आणि त्यामुळे त्यांचा चलनाचा वेग हा स्थिरांक (constant) नसतो, तो बदलत असतो कारण कोपर्निकसचे ग्रहभ्रमणाविषयीचे नियम. ह्या सर्वांचा परिणाम म्हणून बारा संक्रान्ति आणि बारा चान्द्रमास ह्यांचे जुळून राहणे मधूनमधून तुटत राहते. त्यासाठीची योजना अशी. ज्या चान्द्रमासात सूर्याचे मेषसंक्रमण होते (सूर्य मेषराशीत प्रवेश करतो) तो चैत्र, ज्यात वृषभसंक्रमण होते तो वैशाख इत्यादि ह्याचा उल्लेख आलाच आहे. ज्या चान्द्रमासात कोठलेच संक्रमण होत नाही तो अधिकमास आणि त्याचे नाव पुढच्या मासावरून. त्यानंतरच्या पुढच्या संक्रमणाचा जो मास असेल तो निज (आणि तत्पूर्वीचा अधिक). ज्या चान्द्रमासात दोन संक्रमणे होतील त्यात दुसर्‍या संक्रमणाशी संबंधित जो मास असेल तो क्षयमास. ज्या वर्षी क्षयमास येतो त्याच वर्षी त्याच्या पुढेमागे दोन अधिकमास येऊन वर्ष १३ महिन्यांचेच राहते.

अधिक आणि क्षय महिना येणे हे सूर्यचन्द्रांच्या आकाशातील विशिष्ट स्थानांशी आणि त्यातून उत्पन्न होणार्‍या त्यांच्या गतींशी संबंधित असल्याने काही महिनेच अधिक किंवा क्षय येऊ शकतात. फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन हेच महिने अधिक येऊ शकतात आणि कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष ह्यांच्यातीलच एखाद्या महिन्याचा क्षय होऊ शकतो. माघ महिना कधी अधिकही येत नाही आणि त्याचा कधी क्षयही होत नाही.

आणखी एका विचाराने हा प्रश्न समजून घेता येतो. इ.स.पूर्व ४३२ सालापासून ग्रीक विद्वान मेटन ह्याला हा एक नैसर्गिक योगायोग माहीत होता की १९ सौर वर्षांत २३५ चान्द्रमास जवळजवळ पूर्णत: बसतात. त्याला माहीत असलेली दोन्हीची मूल्ये आजच्या अधिक सूक्ष्म मापनाहून थोडी कमी सूक्ष्म होती तरीहि आज आपण १९ सौर वर्षे = ६९३९.६०९०२ सावन दिवस आणि २३५ चान्द्रमास = ६९३९.६८८६५ सावन दिवस ह्या गणितावरून मेटनला दिसलेले जवळजवळ योग्यच होते हे ताळून पाहू शकतो. १९ वर्षांमध्ये पडणारा हा फरक ०.०७९६३ दिवस किंवा १.९१११२ तास इतका किरकोळ आहे.

मेटनच्या - किंवा ज्याने कोणी हा योगायोग पहिल्यांदा हेरला - त्याच्या ह्या शोधाचा उपयोग असा की १९ सावन वर्षांमध्ये चंद्राच्या सर्व तिथि एकदा मोजल्या की त्या पुढच्या १९ वर्षांसाठी त्या तिथि पुन: त्याच सौर दिवसांवर पडणार, तो हिशेब पुन: करण्याचे कारण नाही. १९ सौर वर्षांमध्ये २२८ चान्द्रमास नैसर्गिकत: पडतात आणि ७ चान्द्रमास अधिक पडतात. त्या ७ अधिक मासांना एकदा सोयीनुसार बसवले की तेच चक्र पुढच्या, त्याच्या पुढच्या अशा अनेक १९ वर्षांच्या चक्रांना लावता येते.

भारतीय पद्धतीत ही सोय राशिसंक्रमण आणि चान्द्रमास ह्यांची सांगड घालून करण्यात आले आहे आणि ३६० दिवसांचे, ३० तिथींचे आणि १२ महिन्यांचे हे आदिमकालीन चान्द्र वर्ष अजूनहि मधूनमधून अधिक मास, क्षयमास, तिथींचा क्षय आणि वृद्धि घालून आपण चालवत आहोत. तिथीचा क्षय आणि वृद्धि ह्या कशामुळे होतात ते आता थोडक्यात पाहू.

एक चान्द्रमास २९.५३०५८९ दिवसांचा (प्रत्येकी २४ तासांचा मध्यम मानाचा दिवस) असतो असे वर लिहिलेले आहे. तो तीस दिवसांहून सुमारे अर्धा दिवस कमी आहे. १२ रेखांश चालण्यासाठी चन्द्राला लागणारा काल म्हणजे एक तिथि आणि प्रत्येक चान्द्रमासामध्ये ३० तिथि असतात हे वर उल्लेखिलेले आहे. ह्याचा अर्थ म्हणजे प्रत्येक तिथि मध्यममानाने ०.९८४३ दिवसांइतकी असते. सूर्य-चन्द्रांच्या आपापल्या कक्षांमधील गति अनियमित आहेत ह्याचाहि उल्लेख आला आहे. चन्द्र पृथ्वीभोवती फिरतो तो लंबवर्तुळामध्ये (ellipse). त्यामुळे त्याच्या तिथी प्रत्यक्षामध्ये ५० ते ६८ घटिका (२० ते २७ तास) इतक्या कालाच्या असू शकतात. तिथिनामाचा असा नियम आहे की आकाशात चन्द्राने १२ अंश पार केले की त्या क्षणाला तिथि बदलायला पाहिजे पण प्रत्यक्षात तसे होत नाही. सूर्योदयाच्या वेळेस जी तिथि चालू असेल त्या नावाने तिथि पुढच्या सूर्योदयापर्यंत चालत राहते. आता एका सूर्योदयानंतर काही थोडयाच काळात आकाशात पुढची तिथि सुरू झाली आणि पुढच्या सूर्योदयापूर्वीच संपली तर ती पुढची तिथि पडणारच नाही, तिच्यामध्ये कोठलाच सूर्योदय न पडल्याने तिचा ’क्षय’ होईल. ह्याउलट एक तिथि चालू झाली आणि ती संपण्यापूर्वीच दुसरा सूर्योदय झाला तर तीच तिथि दोन दिवशी मोजली जाईल किंवा तिची वृद्धि होईल.

अशा रीतीने हिंदु पद्धतीमध्ये चंद्र आणि सूर्य ह्या नैसर्गिक घडयाळांची सांगड कशी घातली हे पाहिल्यावर आता ख्रिश्चन कालगणनेकडे जाऊ.

जगात सध्या सर्वत्र प्रचलित असलेले ख्रिश्चन कॅलेन्डर हे त्याच्या मुळात चन्द्रावरूनच सुरू झाले पण आता ते पूर्णपणे सूर्याशी जुळून चालणारे आहे. त्यात चन्द्र आणि सूर्य ह्यांच्या चलनाच्या जुळवणुकीचा प्रश्न उरलेला नाही. त्याचा प्रश्न वेगळाच आहे आणि त्याचे उत्तर काय आहे ते आता पाहू.

आकाशातील गोलांची दैनन्दिन गति हे एक कालगणनेचे निसर्गनिर्मित साधन आहे. त्यांपैकी चन्द्राची दैनंदिन गति ही अन्य कोठल्याहि गोलापेक्षा आणि आकलनाला सोपी असल्याने रोमन संस्कृतीच्या शेतीप्रधान काळातील कालगणना चान्द्रमासांच्या होत्या. त्यांमध्ये मार्च ते डिसेंबर असे दहा महिने होते. त्या महिन्यांपैकी मार्च, मे, जुलै आणि ऑक्टोबर ह्यांना प्रत्येकी ३१ दिवस आणि अन्य सहा महिन्यांना प्रत्येकी ३० दिवस असे एकूण ३०४ दिवस होते. त्या महिन्यांची नावे Martius, Aprilis, Maius, Iunius, Quintilis, Sextilis, Septembris, Octobris, Novembris, Decembris अशी होती (१० महिन्यांच्या ह्या कालगणनेची खूण आजहि टिकून आहे. Septembris पासून Decembris पर्यंतची नावे सातवा ते दहावा महिना ह्यांची निर्देशक आहेत आणि तो निर्देश सध्याच्या चालू नावांमध्येहि आपणास दिसतो, जरी सप्टेंबर ते डिसेंबर हे आता ७वा ते १०वा असे महिने नसून ९वा ते १२वा झाले आहेत. Martius ते Iunius ही चार नावे मार्स, जूनो ह्या देवतांशी वा शेतीकामाशी संबंधित आहेत.) उत्तर गोलार्धातील वसंतऋतूपासून हे दहा महिन्यांचे शेतीवर्ष सुरू होऊन हिवाळा सुरू होईपर्यंत चालत असे. हिवाळ्याच्या अशा उर्वरित सुमारे ६० दिवसांची गणति ह्या वर्षामध्ये केली जात नसे.

ह्यामध्ये पहिला बदल रोमचा दुसरा राजा नुमा पॉंपिलिअस (इ.पू. ७१५-६७३) ह्याच्या काळात झाला. ३०४ दिवसांच्या ह्या गणनेमध्ये ५० दिवस वाढवून आणि ३० दिवसांच्या सहा महिन्यांमधून प्रत्येकी एक दिवस कापून २८ दिवसांचे दोन नवे महिने निर्माण करण्यात आले आणि त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी - Januarius, Februarius - अशी नावे देण्यात आली आणि ते दोन महिने डिसेंबरच्या नंतर जोडण्यात आले. रोमन संस्कृतीमध्ये सम संख्या अशुभ आणि विषम संख्या शुभ मानीत असत तदनुसार जानेवारीचे २८ दिवस बदलून त्यालाहि २९ दिवसांचा महिना केले गेले. अशा रीतीने ३१ दिवसांचे ४ महिने, २९ दिवसांचे ७ महिने आणि २८ दिवसांचा एक महिना - फेब्रुवारी - असे ३५५ दिवसांचे वर्ष निर्माण करण्यात आले. हे वर्ष चन्द्राच्या पृथ्वीभोवतीच्या १२ महिन्यांच्या प्रदक्षिणाकालाशी - Synodic months - जवळजवळ सारखे आहे. तदनंतर केव्हातरी ह्याच प्राचीन काळात जानेवारी आणि फेब्रुवारी ह्यांना वर्षाच्या शेवटापासून काढून वर्षाच्या प्रारंभास जोडले गेले आणि वर्ष जानेवारीपासून सुरू होऊ लागले.

चान्द्रवर्षांची अशी गणना सूर्याच्या ३६५.२५ दिवसांच्या सौरवर्षाच्या गणतीशी जुळती नसल्याने त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. शेतीची कामे सुरू करण्याचा पारंपारिक मार्च महिना पेरणीला आवश्यक अशा हवामानात पडण्याची खात्री राहिली नाही आणि ह्या दोन्ही गणना एकमेकींच्या बरोबर राहाण्यासाठी चान्द्रगणनेमध्ये काही अधिक दिवस काही वर्षांनंतर वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली.

इ.स.पूर्व ४५० पासून असे महिने मधूनमधून घालण्याची प्रथा सुरू झाली, यद्यपि त्यासाठी सार्वकालीन नियम असा कोणताच निर्माण करण्यात आला नाही. वर्षगणनेचा प्रारंभिक हेतु वेगवेगळी धार्मिक कृत्ये, उत्सव वगैरे वेळच्यावेळी पार पाडली जावी असा असतो. सर्व इतिहासात जागोजागी हेच तत्त्व दिसून येते. तदनुसार अधिक मास केव्हा टाकायचा हा निर्णय धर्माधिकार्‍यांच्या अधिकारात होता. (अशा व्यक्तींना Pontifex म्हणत असत आणि त्यांच्या प्रमुखाला Pontifex Maximus - सर्वोच्च धर्माधिकारी - असे म्हणत असत. नंतरच्या काळात कॉन्सल वा सम्राट् हाच Pontifex Maximus असे आणि ख्रिश्चन पोपहि स्वत:ला हे बिरुद घेत आले आहेत.)

ह्या अधिक महिन्याला Mercedonius असे नाव होते. फ़ेब्रुवारी, जो सर्वसाधारणपणे २८ दिवसांचा महिना असे, त्यातील शेवटचे ५ दिवस वेगळे काढून त्यांना आणखी २२ दिवस जोडून हा महिना तयार होत असे आणि अशा रीतीने धर्माधिकार्‍यांच्या निर्णयानुसार मधूनमधून काही वर्षे ३५५+२२=३७७ दिवसांची असत. फेब्रुवारी (Februarius) हा शब्द februa - religious purification ह्यापासून निर्माण झाला असून त्या महिन्यात सर्व प्रकारचे शुद्धिविधि केले जात, Mercedonius चा तोच उपयोग होता.

आर्थिक व्यवहारांवर अशा अधिक महिन्याचा परिणाम होत असल्याने धर्माधिकारी असा महिना आपल्या सोयीने जोडत. त्या कारणाने अधिक महिन्यामुळे प्रश्न न सुटता अधिकच जटिल होऊन बसला. सुमारे ४०० वर्षे ही अंदाधुंदी चालू राहिल्यानंतर इ.स.पूर्व ४६ साली तेव्हाचा Pontifex Maximus ज्यूलिअस सीझरने अधिक शास्त्रीय पद्धतीने हा गुंता सोडवायचे ठरवले. (स्वत: Pontifex Maximus झाल्यावरहि प्रथम तो गॉल प्रदेशाच्या - आजचा फ्रान्स - मोहिमेवर असल्याने आणि नंतर रोममधील बंडाळ्य़ांमध्ये अडकून पडल्याने कित्येक वर्षे अधिक महिना घोषितच झाला नव्हता.) त्याच्या ह्या सुधारित पद्धतीस ’ज्यूलिअन कालगणना - Julian Calendar' असे म्हणतात आणि थोडया फरकाने तीच गणना आपण आज वापरत आहोत.

ह्या वेळेपर्यंत नैसर्गिक ऋतु आणि त्यांच्याशी संबंधित उत्सवांचे दिनदर्शिकेत दर्शविलेले दिवस ह्यांच्यामध्ये सुमारे तीन महिन्यांचे अंतर पडले होते. ज्यूलिअस सीझरच्या सुधारणेनुसार इ.स. पूर्व ४६ ह्या वर्षात फेब्रुवारीचे शेवटचे ४ दिवस कमी करून त्याला २७ दिवसांचा एक अधिक मास जोडण्यात आला, तसेच नोवेंबर आणि डिसेंबरच्या मध्ये ३३ आणि ३४ दिवसांचे दोन अधिक मास टाकण्यात आले. इ.स.पूर्व ४६ हे वर्ष अशा मार्गाने ३५५-४+२७+३३+३४=४४५ दिवसांचे झाले. तदनंतर जानेवारी १ ला इ.स.पूर्व ४५ हे वर्ष सुरू झाले. त्या वर्षापासून पुढे जानेवारी ३१ दिवस, फेब्रुवारी २८ दिवस, मार्च ३१ दिवस इत्यादि आपल्याला परिचित महिने ठरवून देण्यात आले आणि सर्वसाधारण वर्ष ३६५ दिवसांचे झाले. सांपातिक वर्षाचे प्रत्यक्ष मान सध्याच्या सूक्ष्म मापनानुसार ३६५.२४२५८ दिवस इतके आहे, म्हणजेच ३६५ दिवसांचे वर्ष पूर्ण सांपातिक वर्षाच्या तुलनेत सुमारे १/४ दिवसाने लहान आहे आणि तेच चालू राहिले तर त्याच्या तारखा ऋतूंच्या तुलनेने ४ वर्षांमध्ये १ दिवस, १०० वर्षांमध्ये २५ दिवस इतक्या आधी पडतील. असे होऊ नये म्हणून असेहि ठरले की इ.स.पूर्व ४५ पासून ४ ने भाग जाणारे प्रत्येक वर्ष ३६६ दिवसांचे असेल आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्यात २४ हा दिनांक दोनदा पडेल. दिनांक दर्शविण्याच्या रोमन पद्धतीनुसार हा दिवस VI Kal. Mar. - मार्च कॅलेंड्स् पूर्वीचा सहावा दिवस - असा ओळखला जात असे. तो दोनदा पडल्यामुळे अशा वर्षांना bissextile - सहावा दिवस दोनदा येणारे वर्ष - असे म्हणत असत. कालान्तराने हीहि पद्धति जाऊन अधिक दिवस फेब्रुअरी महिन्याच्या शेवटाला ’२९’ ह्या दिनांकाने जोडला जाऊ लागला. आपण इंग्लिशमध्ये त्या दिवसाला Leap Day आणि त्या वर्षाला Leap year म्हणतो. Leap year ह्या वर्णनाचे मूळहि मनोरंजक आहे. सर्वसाधारण ३६५ दिवसांच्या वर्षात ५२ पूर्ण आठवडे आणि १ दिवस असतो. एका वर्षाच्या १ मार्चला सोमवार पडला तर पुढच्या साधारण वर्षाच्या १ मार्चला मंगळवार पडतो. पण ते पुढचे वर्ष ’लीप’ असेल तर १ मार्चला बुधवार पडतो, म्हणजेच एका वारावरून ’उडी’ मारली जाते म्हणून ते ’लीप’ वर्ष.

ह्या ज्यूलियन गणनेनुसार १०० वर्षांत ३६५२५ दिनांक होतात. त्याच कालात ३६५२४.२५८ इतके सावन दिवस पडतात. ह्या दोनातील फरक १०० वर्षांमध्ये अदमासे ३/४ दिवस इतका छोटा असल्याने त्या काळात त्याच्यासाठी काहीच तरतूद करण्यात आली नाही. तितक्या प्रमाणामध्ये ज्यूलियन गणना सावन गणनेच्या पुढे जाते ही गोष्ट तशीच सोडून देण्यात आली.

ह्यानंतरचा महत्वाचा बदल म्हणजे दोन महिन्यांच्या नावांमध्ये बदल. ज्यूलिअस सीझरच्या सेनेटमधील प्राणघातक हल्ल्यानंतर सेनेटने Quintilis ह्या सातव्या महिन्याचे नाव बदलून ते ’जुलै’ असे केले. तदनंतर त्याचा वारस ऑगस्टस - पहिला रोमन सम्राट् - ह्याचा सन्मान म्हणून सेनेटने इ.स.पूर्व ८ साली Sextilis ह्या आठव्या महिन्याचे नाव बदलून त्याला ’ऑगस्ट’ असे नाव दिले.

१०० सांपातिक वर्षे १०० ज्यूलिअन वर्षांहून ३/४ दिवस ( सुमारे १८ तासांनी) छोटी असण्याचा परिणाम साठत जाऊन १५८२ इसवीपर्यंत जवळजवळ १६ शतके गेल्याने ज्यूलिअन कालगणनेच्या तारखा सांपातिक वर्षाच्या नंतर सुमारे ११/१२ दिवस पडू लागल्या होत्या.

ईस्टरचा दिवस कोणता मानायचा हा प्रारंभापासून एक गहन प्रश्न झाला होता आणि त्याबाबत अनेक मतमतान्तरे होती. सम्राट् कॉन्स्टंटाइनने सन ३२५ मध्ये बोलविलेल्या Council of Nicaea ची शिफारस अशी होती की वसंतसंपाताच्यानंतरच्या पहिल्या पौर्णिमेनंतरच्या रविवारी ईस्टर पडावा. वसंतसंपाताचा दिवस २१ मार्च असा ठरला होता. ह्या दिवसानुसार ईस्टर ठरविला तर तो खर्‍या (वेधावरून ठरविलेल्या) वसंतसंपाताच्या बराच नंतर पार पडला जाण्याची शक्यता होती. (ह्या काळापर्यंत खरा वसंतसंपात ११ मार्चपर्यंत मागे आलेला होता.) ही शक्यता दूर करण्यासाठी तेव्हाचा पोप १३वा ग्रेगरी ह्याने १५८२ साली कालगणनेमध्ये पुन: मोठी सुधारणा घडवून आणली. तिच्यानुसार १५८२ सालातील गुरुवार ४ ऑक्टोबर ह्या दिवसानंतरचे १० दिवस मोजण्यात आले नाहीत आणि शुक्रवार १५ ऑक्टोबरला गणना पुन: सुरू झाली. लीप वर्ष मानण्याचा नियमहि बदलण्यात आला आणि ’दर चौथे वर्ष लीप, पण ते वर्ष १०० ने भागले जात असल्यास ते लीप नाही, पण ते वर्ष ४०० ने भागले जात असल्यास ते लीप आहे’ असा नियम करण्यात आला. ह्यामुळे ४०० वर्षात ९७ लीप दिवस आणि १४६०९७ दिनांक पडतात. त्याच काळात ४०० सांपातिक वर्षांचे १४६०९७.०३२ इतके सावन दिवस होतात. आता सांपातिक वर्ष ग्रेगोरियन वर्षापेक्षा मोठे आहे पण दोनांतील फरक ४०० वर्षांमागे ०.०३२ दिवस इतका आहे. सांपातिक वर्षाला ग्रेगोरियन वर्षाहून पूर्ण एक दिवसाने मोठे होण्यासाठी सुमारे १२५०० वर्षे लागतील म्हणून सध्यापुरते ह्या प्रश्नाला येथेच सोडलेले आहे. (पृथ्वीचीच दैनंदिन आणि वार्षिक गती कमी होणे इत्यादि बाबी येथे विचारात घेतल्या गेलेल्या नाहीत.)

ह्या सुधारणा कॅथलिक पोपकडून आलेल्या असल्याने ख्रिश्चन धर्माच्या अन्य वेगवेगळ्या शाखांमध्ये त्यांना मान्यता मिळायला वेळ लागला. कॅथॉलिक भागांनी - इटलीतील राज्ये, पोर्तुगाल, स्पेन इत्यादींनी - ती लगेच मान्य केली पण प्रॉटेस्टन्ट ब्रिटनमध्ये ती मान्य व्हायला १७५२ साल उजाडले. तोपर्यंत फरक ११ दिवसांचा झाला होता आणि तेथे १७५२ साली बुधवार २ सप्टेंबर नंतर गुरुवार १४ सप्टेंबर हा दिवस घालण्यात येऊन मधले ११ दिवस गायब करण्यात आले. ऑर्थोडॉक्स चर्च मानणार्‍या रशियामध्ये ही सुधारणा पोहोचायला राज्यक्रान्ति व्हावी लागली. कम्युनिस्टांनी सत्ता प्राप्त केल्यावर १९१८ मध्ये ३१ जानेवारी नंतर १४ फेब्रुवारी हा दिवस आणून मधले १३ दिवस गायब करण्यात आले. ह्यातून एक मौज अशी झाली की २४ ऑक्टोबर १९१७ च्या ’महान् ऑक्टोबर क्रान्ती’चा ( The Great October Revolution) वार्षिक वाढदिवस सोवियट संघ अस्तित्वात असेतोपर्यंत नोवेंबरमध्ये साजरा होत असे. अशा सर्व देशांच्या त्या त्या दिवसातील ऐतिहासिक तारखा O.S./N.S. (Old Style/New Style) अशा दाखविण्याची प्रथा आहे.

आज पडलेल्या लीप दिवसाच्या मागे असा इतिहास आहे.

आता काही शब्द इस्लामच्या हिजरी दिनगणनेबद्दल. पवित्र कुराणातील सुरा ९.३६-३७ मध्ये असा आदेश आहे:

On the Day God created heaven and earth, He decreed that the numbr of months be twelve in number. Out of these four are sacred. That is the true religion. Do not wrong your souls in these months. Fight the polytheists all together, as they fight you all together, and know that the God is with the righteous.

The postponing (of sacred months) is but one more imstance of (their) refusal to acknowledge the truth - by which those who are bent on denying the truth are led astray. They declare this to be permissible in one year and forbidden in another year, so that they may adjust the months which God has sanctified, thus making lawful what God has forbidden. Their evil deed seems fair to them: God does not guide them who deny the truth. (मौलाना वहीदुद्दीन खान भाषान्तर.)

अल्बेरुनीने आपल्या The Chronology of Ancient Nations (tr. Dr. C. Edward Sachau) ह्या ग्रन्थामध्ये ह्याचा इतिहास पुढील शब्दांमध्ये दिला आहे.

Alberuni

अरेबिक महिन्यांची नावे इस्लाम-पूर्व काळात चालत होतॊ तीच चालू आहेत पण ही नावे इस्लाम-पूर्व चालीरीती, उत्सव इत्यादींची दर्शक होती. इस्लाम मानणार्‍यांना त्या चालीरितींपासून दूर ठेवण्यासाठी पैगंबराने कालगणनेमध्ये दिवस वाढविण्याची जुनी रीत इस्लामबाह्य ठरविली.

अशा रीतीने इस्लामचे हिजरी वर्ष ३५४ दिवसांचे असते. त्यामध्ये सर्व समसंख्यांक महिने २९ दिवसांचे आणि सर्व विषमसंख्यांक महिने ३० दिवसांचे असतात. ह्याची दरमहिना सरासरी २९.५ इतकी पडते. प्रत्यक्षामध्ये चंद्राचा महिना - पृथ्वीभोवती एक प्रदक्षीणा करण्याचा काळ २९.५३०५८९ इतके दिवस असतो. ही ०.०३०५८९ इतकी कसर भरून काढण्यासाठी दर ३० वर्षांमध्ये २,५,७,१०,१३,१६,१८,२१,२४, आणि २६ किंवा २९ ह्या ११ वर्षांमध्ये वर्षाचा शेवटचा महिना ३० दिवसांचा असतो. अशा रीतीने १९ वर्षे प्रत्येकी ३५४ दिवसांची आणि ११ वर्षे ३५५ दिवसांची होऊन ३० वर्षांमध्ये - ३६० महिन्यांमध्ये - १०,६३१ दिवस पडतात, ज्यांची दरमहाची सरासरी २९.५३०५५५ इतकी असते आणि ह्या मार्गाने दिनगणना आणि चन्द्राच्या प्रदक्षिणा ह्यांच्यामध्ये पुरेसा ताळमेळ राखला जातो.

इस्लामी दिनगणना सांपातिक वर्षाशी आणि ऋतुचक्राशी ताळमेळ राखत नाही ही गोष्ट राज्यकर्त्यांना नेहमीच गैरसोयीची वाटत आली आहे. करआकारणी ऋतूंशी ताळमेळ ठेवत नाही. ३० ऋतुचक्रांमध्ये १०,९५० दिवस पडतात. ३१ हिजरी वर्षांमध्ये १०,९८५ दिवस पडतात म्हणजे ३० वेळच्या पीकपाण्याच्या उत्पन्नामधून ३१ वर्षांचा शेतसारा रयतेला भरावा लागतो. ह्यावर इलाज म्हणून अकबराने ’फसली’ नावाची एक नवीन सौर कालगणना सुरू केली होती. त्याच्या कारकीर्दीपासून शहाजहानाच्या कारकीर्दीपर्यंत ती वापरात होती. तिचा उपयोग नंतरनंतर कमी होत गेला. निजामाच्या ताब्यातील हैदराबाद राज्यात मात्र ती अखेरपर्यंत टिकून होती आणि तेथून ती आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांच्या महसूल पद्धतीमध्ये आजहि पाहण्यास मिळते असे वाचनात आले आहे.

१. अमावास्येच्या दिवशी पृथ्वीवरून पाहिल्यास चन्द्र आणि सूर्य एकाच रेषेत असतात. त्यांच्या रेखांशांमध्ये फरक नसतो. ते जणू ’एकाच जागी’ राहतात. ’अमावास्या’ हा शब्द ’अमा’ एकाच जागी, एकत्र आणि ’वास्य’ वसति ह्यापासून निर्माण झाला आहे. ’अमावास्या’ म्हणजे dwelling together.)

२. द्वादशारं नहि तज्जराय वर्वर्ति चक्रं परि द्यामृतस्य।
आ पुत्रा अग्ने मिथुनासो अत्र सप्त शतानि विंशतिश्च तस्थु:॥ ऋग्वेद १.१६४.११
सत्य भूत आदित्याचे बारा आरे असलेले चक्र द्युलोकाभोवती सदैव भ्रमण करीत असते तरी नाश पावत नाही. हे अग्ने, ह्या चक्रावर पुत्रांची ७२० जोडपी आरूढ झालेली असतात. - शंकर बाळकृष्ण दीक्षित.
Formed with twelve spokes, by length of time, unweakened, rolls round the heaven this wheel of enduring Order. Herein established, joined in pairs together, seven hundred Sons and twenty stand, O Agni. - Ralf TH Griffith.)

३, मधुश्च माधवश्च शुक्रश्च शुचिश्च नभश्च नभस्यश्चेषश्चोर्जश्च सहश्च सहस्यश्च तपश्च तपस्यश्च। उपयाम गृहीतोऽसि संसर्पोऽसि।अंहस्पत्याय त्वा॥ तैत्तिरीय संहिता १.४.१४
(हे सोमा) तू मधु, माधव, शुक्र, शुचि, नभस्, नभस्य, इष, ऊर्ज, सहस्, सहस्य, तपस्, तपस्य आहेस. तू उपयामाने (स्थालीने) घेतलेला आहेस. तू संसर्प, तू अंहस्पति आहेस. (शंकर बाळकृष्ण दीक्षित)
Thou art Madhu and Madhava; thou art Shukra and Shuchi; thou art Nabhas and Nabhasya; thou art Isha and Urja; thou art Saha and Sahasya; thou art Tapa and Tapasya. Thou art taken with a support.
Thou art Samsarpa. To Anhaspatya thee! (AB Keith translation)

वरील उतार्‍यांमध्ये मधु ते तपस्य ही बारा महिन्यांची नावे आहेत आणि संसर्प आणि अंहस्पति हे अनुक्रमे अधिकमास आणि क्षयमास आहेत. पुढे राशिकल्पना आणि तत्संबंधी नक्षत्रकल्पना भारतीय ज्योतिषात प्रविष्ट झाल्यावर मासांची ही वेदकालीन नावे जाऊन त्यांच्या जागी सध्याची प्रचलित चैत्र-वैशाखादि नावे आली. तरीहि कालिदासाच्या काळापर्यंत जुन्या नावांची स्मृति जिवंत होती. कालिदासाने ’प्रत्यासन्ने नभसि दयिताजीवितालम्बनार्थी’ - ’श्रावण मास जवळ आल्यावर विरहव्याकुल प्रियेचे आयुष्य लांबावे अशी इच्छा करणार्‍या’ अशा शब्दांनी यक्षाचे वर्णन केले आहे. येथे ’श्रावण मास’ ह्यासाठी त्याने ’नभस्’ हे वेदकालीन नाव वापरले आहे.

४. १ दिवस = ६० घटिका = ६०*६० पळे = ६०*६०*६० विपळे

५. चैत्र-वैशाखादि नावे कशी ठरतात ह्याविषयीचा नियम विद्यारण्यकृत ’कालमाधव’ नावाच्या ग्रंथामध्ये आहे तो असा:

मेषादिस्थे सवितरि यो यो मास: प्रपूर्यते चान्द्र:।
चैत्राद्य: स ज्ञेय: पूर्तिद्वित्वेऽधिमासोऽन्त्य:॥

मेषेत सूर्य असतांना ज्या चान्द्रमासाची पौर्णिमा होते तो चैत्र आणि असेच पुढे. एका राशीत दोन मास पूर्ण झाले तर दुसरा अधिक. (दुसर्‍यामध्ये संक्रान्ति नाही.)

६. ही अधिकमास आणि क्षयमास घालण्याची पद्धति निश्चित केव्हा सुरू झाली ह्याचा काही पुरावा उरलेला नाही. भास्कराचार्यांच्या ’सिद्धान्तशिरोमणि’ ह्या ग्रन्थाचा एक भाग ’गणिताध्याय’. त्याच्या ’अधिकमासादिनिर्णय’ ह्या प्रकरणामध्ये पुढील श्लोक आहेत जे वर वर्णिलेली सध्याची पद्धति दर्शवितात. म्हणजे गेली सुमारे १००० वर्षे तरी ही प्रथा चालत आली आहे.

असंक्रान्तिमासोऽधिमास: स्फुट: स्यात्
द्विसंक्रान्तिमास: क्षयाख्य: कदाचित्।
क्षय: कार्तिकादित्रये नान्यत: स्यात्
तदा वर्षमध्येऽधिमासद्वयं च॥
ज्या चान्द्रमासामध्ये सूर्यसंक्रान्ति मुळीच होत नाही त्यास अधिमास असे म्हणतात. ज्या चान्द्रमासामध्ये दोन सूर्यसंक्रान्ति होतात त्यास क्षयमास म्हणतात. हा क्षयमास क्वचित् येतो आणि तो कार्तिक-मार्गशीर्ष-पौष ह्या तीन महिन्यांमध्येच येतो, अन्य महिन्यांमध्ये येत नाही. त्या वर्षामध्ये दोन अधिमास येतात.

गतोब्ध्यद्रिनन्दैर्मिते शाककाले
तिथीशैर्भविष्यत्यथाङ्गाक्षसूर्यै:।
गजाद्र्यग्निभूमिस्तथा प्रायशोऽयम्
कुवेदेन्दुवर्षै: क्वचिद् गोकुभिश्च॥
असा क्षयमास ९७४ ह्या शकामध्ये आला होता आणि १११५, १२५६, १३७८ ह्या शकांमध्ये येईल. हा बहुतकरून १४१व्या किंवा क्वचित् १९व्या वर्षी येतो.
(अवान्तर - ह्या श्लोकामध्ये ’अङ्कानां वामतो गति:’ आणि सांकेतिक शब्दांनी संख्यादर्शन पाहण्यास मिळते.)

(हा लेख शंकर बाळकृष्ण दीक्षितलिखित 'भारतीय ज्योतिषशास्त्राचा इतिहास' तसेच 'Encyclopedia of Religion and Ethics, Vol. III,' ed. James Hastings ह्या ग्रन्थांमधील माहितीवर आधारलेला आहे. ईस्टर रविवार, ख्रिस्ताब्द कालगणना आणि अन्य तसलेच useless knowledge... ह्या 'ऐसी'मधील लेखातील माहितीहि वापरण्यात आली आहे.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत ज्ञात, अज्ञातांचे योगदान.

शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत विरोध करणारे घरचे व स्वकीय होते. चंद्रराव मोरे, मंबाजी भोसले, बाजी घोरपडे, खंडोजी खोपडे, बजाजी निंबाळकर, गायकवाड, गणोजी शिर्क, सुर्याजी पिसाळ इ.
यातील गणोजी शिर्क हा संभाजी महाराजांचा मेव्हणा होता. वतन न मिळाल्यामुळे नाराज होता, मोगल सरदार संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी दक्षिणेत आला तेव्हा मोगलाला मिळाला. त्याने मोगल सरदाराला संगमेश्वरचा आ़डमार्गातला रस्ता दाखवला जो रस्ता फक्त मराठ्यांनाच माहित होता. मोगलांच्या 5000 सैन्याशी संभाजीच्या 200 सैन्या-चा निभाव लागला नाही. मोगलांनी संभाजी महाराजांना कैद करून नंतर त्यांचा वध केला.
--------------------

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पहिले बाजीराव पेशवे - अपराजित सेनापती

पहिले बाजीराव पेशवे - अपराजित सेनापती

पहिले बाजीराव पेशवे यांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 रोजी झाला. त्यांचे वडिल बाळाजी विश्वनाथ, आई राधाबाई, व भाऊ चिमाजीअप्पा. पेशवे बाळाजी विश्वनाथांच्या मृत्युनंतर केवळ वयाच्या 20 व्या वर्षी शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे, शिक्के व कट्यार बाजीरावांना दिली. हे मराठा साम्राज्याचे चौथे पेशवे होते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आनंद मार्ग

आनंद मार्ग ह्या पंथाची बिहारात (पुरुलिया,भागलपुर) येथे ५-१-१९५५ रोजी स्थापना झाली. सुरुवातीला ह्या पंथाचे स्वरूप आध्यात्मिक, धार्मिक आणि आत्मोन्नतीवर भर देणारे असे होते. या पंथात सुरुवातीला मद्य मांस, लसूण, कांदा निषिद्ध होते. (पुढे हा पंथ तंत्रमार्गाकडे वळला.) यांचे गुरु पुरुषांच्या सुंतेच्याही विरोधात होते. मार्गाची दीक्षा घेतल्यानंतरचे मार्गीयांचे आह्निक कडक होते. सोळा नियम त्यांना पाळावे लागत. पहिले पाच नियम स्वच्छताविषयक होते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

१ जुलै - कॅनडा दिन

१७६०-७० च्या दशकांमध्ये अमेरिकेतील १३ ब्रिटिश वसाहतींनी ब्रिटिश साम्राज्यातून बाहेर पडण्याचे घोषित केल्यावर जी युद्धसदृश स्थिति निर्माण झाली तिचा परिणाम म्हणून ब्रिटिश राजसत्ता मान्य करणार्‍या आणि United Empire Loyalists असे ओळखल्या जाणार्‍या सुमारे ५०,००० जनतेने अमेरिकेमधून उत्तरेकडे स्थलान्तर करून अमेरिका खंडाच्या पूर्वोत्तर भागात वसती केली आणि त्या वसतीला ब्रिटिश नॉर्थ अमेरिका असे नाव पडले. येथेच पूर्वेकडील भागामध्ये फ्रेंच सत्तेचा प्रभाव तत्पूर्वीपासून होता आणि त्या भागाला New France असे नाव होते आणि फ्रेंच प्रभाव त्या भागापासून सुरुवात करून आजचा ऑंटारिओ, महासरोवरांचा प्रदेश आणि १३ वसाहतींच्या पश्चिमेकडील सर्व प्रदेश व्यापून पार आजच्या लुइझिआना राज्यापर्यंत पसरलेला होता. फ्रेंच प्रभावाखालील ह्या विस्तृत प्रदेशाला अकेडिया (Acadia) असे सार्वत्रिक नाव आहे. ब्रिटनने व्यापलेल्या १३ वसाहती आणि तदनंतरची ब्रिटिश नॉर्थ अमेरिका ह्यांच्या अस्तित्वामुळे हे जवळजवळ मोकळे असलेले हे नवे खंड व्यापण्याची स्पर्धा ब्रिटन आणि फ्रान्स ह्यांच्यामध्ये सुरू झाली. प्रारंभी स्कॉटलंडमधून आलेल्यांनी सुरू केलेल्या नोवा स्कोशिया (New Scotland) ह्या वसाहतीमध्ये काही United Empire Loyalists लोकांना ब्रिटनने वसविले. नोवा स्कोशियाने अकेडियाचाच काही भाग व्यापला होता. १८व्या शतकापासून ब्रिटन आणि फ्रान्स, तसेच स्पेन, पोर्तुगाल, नेदर्लंड अशा राष्ट्रांमध्ये जगातील वेगवेगळ्य़ा भागांमध्ये आपला जम बसविण्याची जी तीव्र स्पर्धा चालू होती. १७१३ साली ह्या राष्ट्रांमध्ये यूट्रेख्ट ह्या गावी जो शान्तीचा करार झाला (Treaty of Utrecht) त्याअंतर्गत नोवा स्कोशिया ब्रिटिश सत्तेखाली आला आणि फ्रान्सशी प्रामाणिक असलेल्या सर्व अकेडियन प्रजेला तेथून निर्वासित केले गेले. १७६३ साली ब्रिटन आणि फ्रान्समधील सप्तवर्षीय युद्ध (Seven Year's War) पॅरिस तहामुळे संपले आणि New France चा भागहि ब्रिटिश सत्तेखाली आला. ह्या भागाला क्युबेक (Province of Quebec) असे नाव मिळाले. क्युबेकचा विस्तार पूर्व किनार्‍यापासून सेंट लॉरेन्स नदीच्या उत्तरेकडील भाग, आणि महासरोवरांचा भाग येथपर्यंत पसरला होता. १७८४ मध्ये नोवा स्कोशियाच्या पश्चिम भागामध्ये अमेरिकेतून स्थलान्तर केलेल्यांसाठी एक नवी वसाहत काढली आणि तिला न्यू ब्रुन्स्विक (New Brunswick) असे नाव दिले.

१७९१ सालच्या ब्रिटिश पार्लमेंटच्या Constitutional Act खाली क्युबेकचे दोन भाग करण्यात आले. पश्चिमेकडील भाग इंग्लिश भाषा बोलणारा आणि सेंट लॉरेन्स नदीच्या उगमाजवळचा म्हणून त्याला Upper Canada असे नाव मिळाले. पश्चिमेकडील भाग सेंट लॉरेन्स नदीच्या मुखाजवळचा म्हणून त्याला Lower Canada असे नाव मिळाले.

हे सर्व प्रान्त अजूनपर्यंत ब्रिटिश सत्तेच्याच अधीन होते आणि त्यांचा कारभाराची सूत्रे ब्रिटनहून आलेल्या गवर्नर जनरलच्या हातात होती. आपला कारभार आपण चालवायचे हक्क मिळविण्याच्या हेतूने १८३७ साली ह्या दोन्ही प्रांन्तांमध्ये सशस्त्र उठाव झाले आणि त्याचा परिणाम म्हणून दोन्ही प्रान्तांना पुन: एकत्र करून Province of Canada निर्माण करण्यात आला आणि वेस्टमिन्स्टर पद्धतीचे सरकार तेथे क्रमाक्रमाने अस्तित्वात आले. नोवा स्कोशिया आणि न्यू ब्रुन्स्विक ह्या प्रान्तांना, तसेच आणखी उत्तरेकडील प्रथमपासून ब्रिटनच्या ताब्यात असलेल्या New Foundland and Labrador ह्या प्रदेशालाहि अशी सरकारे मिळाली. अजूनहि हे चार प्रान्त स्वतन्त्रपणे ब्रिटनकडे तोंड करूनच होते.

मार्च २९, १८६७ ह्या दिवशी ब्रिटिश पार्लमेंटने British North America Act मंजूर केला. त्याला विक्टोरिया राणीची संमति १ जुलै. १८६७ ह्या दिवशी मिळाली आणि त्यामुळे Province of Canada, नोवा स्कोशिया आणि न्यू ब्रुन्स्विक ह्यांची ’कॅनडा’ असे नाव असलेली एक वसाहत (Domimion) निर्माण झाली. त्या घटनेची आधारभूत असलेली राणीची घोषणा अशी होती:

"We do ordain, declare, and command that on and after the First day of July, One Thousand Eight Hundred and Sixty-seven, the Provinces of Canada, Nova Scotia, and New Brunswick, shall form and be One Dominion, under the name of Canada."

कॅनडाच्या जडणघडणीमध्ये नंतरच्या वर्षांमध्ये अन्यहि महत्त्वाच्या घटना होत होत आजचा देश निर्माण झाला पण त्या सर्वाचे बीज जुलै १, १८६७ ह्या दिवशी रोवले गेले म्ह्णून हा दिवस कॅनडाचा जन्मदिवस मानला जातो आणि Canada Day ह्या नावाने सर्व कॅनडाभर साजरा होतो.

(आजचे Google Doodle कॅनडाविषयकच आहे.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

भारताला स्वातन्त्र्य भाग 2 - स्वातन्त्र्यपूर्व काळातील नेहरूंच्या दोन कृति.

भारताला स्वातन्त्र्य भाग 2 - स्वातन्त्र्यपूर्व काळातील नेहरूंच्या दोन कृति.

आज पंडित जवाहरलाल नेहरूंची पुण्यतिथि. घटना आणि त्या घडवून आणणारे ह्यांच्या आठवणी काळ जातो तशा निसर्गनियमानेच धूसर होऊ लागतात. भारताची स्वातन्त्र्यचळवळ आणि आणि तिच्या अग्रणी नेत्यांचे तेच झाले आहे. १९४०-५०च्या दशकात नेहरूंची जनमानसावर कमालीची पकड होती. त्यांचे स्वत:चे रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि गरीब देश असला तरी भारत हा जगातला एक महत्त्वाचा आणि पुढारी देश आहे हे जगापुढे मांडण्याची त्यांची सततची धडपड ह्यामुळे जनता भारावल्यासारखी झालेली होती.

ह्याला काही प्रमाणात ओहोटी १९६२च्या चीन युद्धातील अपयशामुळे लागली. ह्या युद्धामुळे स्वत: नेहरूहि थोडेसे खचल्यासारखे झाले. तदनंतर लवकरच त्यांचा मृत्यु झाला. त्यांचे डावीकडे झुकलेले आर्थिक धोरण, भारताला कोठल्याहि गटात दाखल न करता तटस्थ राष्ट्रांचा एक नवाच गट उभारण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा, काश्मीरच्या बाबतीत राष्ट्रसंघावर त्यांनी दाखविलेला विश्वास इत्यादि गोष्टींवर अधिक खुल्या आवाजात चर्चा होऊ लागली आणि त्यांवर टीका करणारे गटहि निर्माण होऊ लागले. एडविना माउंटबॅटन ह्यांच्याशी त्यांचे कसे संबंध होते हा एक चिरहरित चर्चेचा विषय झाला. सध्यातरी मला असे दिसत आहे की नेहरूंच्या भरीव कार्यापेक्षा त्यांचे कोठे आणि काय चुकले ह्या चर्चेमध्ये पुढच्या पिढयांना अधिक स्वारस्य असावे.

ही सर्व चर्चा स्वातन्त्र्यानंतरच्या ’नेहरू’ ह्या व्यक्तीविषयी अधिक करून असते. स्वातन्त्र्यापूर्वीच्या चळवळीत नेहरू हे एक आघाडीचे नेते होते हे काही नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. ह्या काळातील त्यांच्या दोन वेळच्या कृतींमुळे भारताला स्वातन्त्र्योत्तर काळात जो चेहरामोहरा मिळाला त्याचा मोठा लाभ देश आजवर उपभोगत आला आहे आणि तो लाभ अमर्याद काळापर्यंत टिकून राहणारा आहे असे मला वाटते. नेहरूंच्या स्वातन्त्र्यपूर्व काळातील ह्या दोन कृतींबाबत हा लेख आहे.

ह्या कृती नेहरूंनी जेव्हा केल्या तेव्हा २०१५ साली किंवा अशाच काही दशकानंतरच्या वर्षात त्यांचे परिणाम कसे दिसतील असा विचार अर्थातच त्यांच्या मनात नव्हता. गेल्या १५-२० वर्षामध्ये जागतिक राजकारणामध्ये उदयाला आलेल्या नव्या शक्ति आणि नवी समीकरणे १९४० च्या दशकात त्यांनी किंवा कोणीहि कल्पनेतहि आणलेल्या नसाव्यात. पण मी ज्या दोन कृतींबद्दल पुढे लिहिले आहे त्यांमुळे ह्या नव्या शक्तींना आणि नव्या समीकरणांना तोंड द्यायची शक्ति भारतामध्ये अंगभूतच उपजलेली आहे असे दिसून येईल.

मुंबईहून निघालेली आगगाडी कल्याणपर्यंत येते आणि तेथे डावीकडचा पुढला मार्ग घ्यायचा का उजवीकडचा अशी निवड करण्याची वेळ येते. डावीकडचा फाटा घेतला तर गाडी दिल्लीकडे जाणार आणि उजवा घेतला तर ती चेन्नईकडे जाणार. निवड करण्याच्या वेळी हा किंवा तो फाटा निवडणे सहज शक्य असते पण एकदा अशी निवड केली की तिचे दूरगामी परिणाम अगदी परस्परविरोधी असतात. नेहरूंच्या पुढे अशी निवड करण्याची वेळ दोनदा आली. त्या प्रत्येक वेळी उपलब्ध असलेल्या दोन पर्यायांपैकी नेहरू कोणताहि एक निवडू शकले असते कारण दोन्ही पर्यायांमागे समर्थक होतेच. भारताचे सुदैव असे की दोन्ही वेळा नेहरूंनी जो पर्याय निवडला तो भारताला दूरच्या भविष्यकाळामध्ये उपकारकच ठरला.

अशी पहिली वेळ आली कॅबिनेट मिशनचा प्रस्ताव स्वीकारण्याच्या वेळी. जून १९४८ च्या पूर्वी हिंदुस्तानला स्वातन्त्र्य दिले जाईल अशी घोषणा मजूर पक्षाच्या सरकारने फेब्रुअरी २०, १९४६ ह्या दिवशी लंडनमध्ये केली. हिंदुस्तानामध्ये कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग ह्यांच्यामध्ये पाकिस्तान निर्मितीच्या लीगच्या मागणीवरून बरेच मतभेद होते. हिंदुस्तान अखंड ठेवायचा, मुस्लिमबहुल प्रान्तांचा गट करून तो गट अखंड हिंदुस्तानामध्येच ठेवायचा, मुस्लिमबहुल प्रान्तांचा गट करून त्यांचे ’पाकिस्तान’ नावाचे स्वतन्त्र राष्ट्र बनवायचे म्हणजेच हिंदुस्तानचे विभाजन करायचे, मुस्लिमबहुल आणि हिंदुबहुल प्रान्तांमध्ये जर काही भूभाग निखालस दुसर्‍या धर्माच्या लोकांचे असले तर तेव्हढे भाग वगळून मग हिंदुस्तानचे विभाजन करायचे असे अनेक पर्याय उपलब्ध होते आणि ह्या प्रत्येक पर्यायामुळे कोठल्यातरी गटाचा लाभ आणि दुसर्‍या कोणाचा तरी तोटा होणार हे उघड होते. मुस्लिमबहुल अशा पश्चिमेकडील प्रान्तांमध्ये फार मोठया संख्येने शीख समाज होता त्याला कसा न्याय द्यायचा हाहि प्रश्न होता.

कॉंग्रेस, मुस्लिम लीग आणि अन्य पक्षांशी चर्चा करून सर्वसंमत असा काही तोडगा काढण्याच्या इराद्याने मजूर सरकारने पाठविलेले लॉर्ड पेथिक-लॉरेन्स, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, सर स्टॅफर्ड क्रिप्स, प्रेसिडेंट ऑफ द बोर्ड ऑफ ट्रेड आणि ए.वी. अलेक्झॅंडर, फर्स्ट लॉर्ड ऑफ अ‍ॅडमिरल्टी अशा तीन मन्त्र्यांचे शिष्टमंडळ (Cabinet Mission) २३ मार्च १९४६ ह्यादिवशी दिल्लीत येऊन पोहोचले.

कॉंग्रेस पक्षाचे त्या वेळचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे हिंदुस्तानचे विभाजन झाल्यास आणि त्यातून पाकिस्तान हे स्वतन्त्र राष्ट्र निर्माण झाल्यास त्यातून मुस्लिमांचेच अधिक नुकसान आहे अशा मताचे होते. अखंड हिंदुस्तानावर त्यांची श्रद्धा होती आणि मुस्लिमांना पुरेशा सुरक्षिततेचे आश्वासन अखंड हिंदुस्तानातच मिळाल्यावर ते आपला हेका सोडून राष्ट्रबांधणीच्या कार्यास वाहून घेतील असा त्यांचा आशावाद होता. आपल्या विचारांतून त्यांनी एक तोडगा काढला होता. हिंदुस्तानाच्या सर्व प्रान्तांचे एक संघराज्य (federation) बनवायचे, त्या संघराज्याच्या केन्द्राकडे संरक्षण, दळणवळण आणि परराष्ट्रव्यवहार हे तीनच विषय ठेवायचे आणि अन्य सर्व विषयांमधील अधिकार प्रान्तांकडे सोपवायचे, काही विषय उभय बाजूंच्या संमतीने केन्द्र आणि प्रान्त ह्यांच्यामध्ये समाईक ठेवायचे असे संघराज्य हा त्यांच्या मते ब्रिटिश सत्तेकडून एतद्देशीय जनतेकडे सत्ता कशी सोपवायची ह्या प्रश्नावरचा उत्तम तोडगा होता, जेणेकरून मुस्लिमबहुल प्रान्तांमध्ये मुस्लिमांना हवे ते अधिकार मिळून देशामध्ये बहुसंख्य असलेल्या हिंदूंमुळे आपली गळचेपी होईल अशी जी भीति मुस्लिम समाजाला वाटत असेल तिचे निराकरण होईल आणि तरीहि हिंदुस्तान अखंड राहील.

६ एप्रिल १९४६ ह्या दिवशी कॉंग्रेस अध्यक्ष मौलाना आझाद कॅबिनेट मिशनला भेटले आणि आपला वर वर्णिलेला आराखडा त्यांनी मिशनपुढे मांडला. मिशनला तो बराचसा पटला असे आझादांच्या लिहिण्यावरून दिसते. १२ एप्रिल ह्या दिवशी आपला हा आराखडा त्यांनी कॉंग्रेसच्या कार्यकारिणीपुढे (Working Committee) मांडला. थोडया प्रश्नोत्तरांनंतर आणि महात्मा गांधीनी आपली पूर्ण मान्यता दर्शविल्याने कार्यकारिणीनेहि आराखडयाला पाठिंबा दिला. हा आराखडा आझादांनी १५ एप्रिलच्या दिवशी सर्व जनतेच्या माहितीसाठी जाहीररीत्या मांडला. त्यातील महत्त्वाचा भाग पुढीलप्रमाणे होता:


कॅबिनेट मिशनकडून कॉंग्रेस आणि लीगच्या प्रतिनिधींशी वाटाघाटी चालूच होत्या आणि अखेर १६ मे ह्या दिवशी मिशनने आपली योजना जाहीर केली. तिचे स्वरूप सारांशाने असे होते: (सूचना - हा सारांश ह्या लेखाला आवश्यक आहे असा आणि इतकाच विशेषेकरून बनविला आहे. अन्य ठिकाणी असा सारांश वेगळ्या स्वरूपात दिसणे शक्य आहे. कॅबिनेट निशन योजना मुळातून पाहायची असेल तर ती येथे आहे.)

१) मुस्लिम लीगने मागितलेला पाकिस्तान (पंजाब, वायव्य सरहद्द प्रान्त, सिंध, बलुचिस्तान, आसाम आणि बंगाल) निर्माण झाला तर मोठया संख्येने बिगर-मुस्लिम लोकसंख्या (उदा. पंजाब १ कोटि १६ लाख मुस्लिम वि. १ कोटि १२ लाख हिंदु/शीख, बंगाल ३ कोटि ३० लाख मुस्लिम वि. २ कोटि ७३ लाख हिंदु) त्या पाकिस्तानात अडकून पडेल. हे बिगर-मुस्लिम भाग काढून टाकून उर्वरित भागांपासून केलेला पाकिस्तान लीगला मान्य नाही.
२) एकत्रित हिंदुस्तानामध्ये हिंदु बहुसंख्येच्या दबावाखाली आपले हितसंबंध सुरक्षित राहणार नाहीत ही मुस्लिम समाजाची भीतीहि अस्थानी नाही आणि तिच्यावरहि उत्तर शोधले गेले पाहिजे.
३) वरील मुद्दे लक्षात घेऊन पुढील शिफारसी केल्या जात आहेत.
अ) ब्रिटिशांच्या अमलाखालचा हिंदुस्तान आणि भाग घेऊ इच्छिणारी राज्ये ह्यांचे मिळून असे संघराज्य (Federation) असेल. संघराज्याच्या अखत्यारामध्ये परराष्ट्रसंबंध, संरक्षण आणि दळणवळण हे विषय असतील.
ब) अन्य सर्व विषय प्रान्तांच्या अखत्यारामध्ये असतील.
क) प्रान्तांचे तीन गट असतील - गट अ मध्ये मद्रास, मुंबई, संयुक्त प्रान्त, बिहार, मध्यप्रान्त आणि ओरिसा, गट ब मध्ये पंजाब, वायव्य सरहद्द प्रान्त, सिंध आणि बलुचिस्तान, गट क मध्ये आसाम आणि बंगाल असे प्रान्त असतील.
ड) तीनहि गटांतील प्रान्तांना आपल्या आपल्या गटाच्या अंतर्गत एकत्र येऊन प्रान्तांच्या अखत्यारामध्ये असलेल्या संमत विषयांच्या बाबतीत एकत्रित कारभार करता येईल.
इ) प्रान्तांच्या विधानसभांमधून निवडणुका घेऊन पाठविलेल्या प्रतिनिधींच्या घटनासमितीने ह्यापुढे संघराज्याच्या आणि प्रान्तांच्या घटनानिर्मितीचे कार्य सुरू करावे.

प्रान्तांचे अ, ब आणि क असे गट करायचे ही गोष्ट वगळता कॅबिनेट मिशनची योजना ही आझादांनी कॉंग्रेस वर्किंग कमिटीपुढे ठेवलेल्या आणि मान्य करून घेतलेल्या प्रस्तावाशी मिळतीजुळती होती. त्यामुळे ती योजना मान्य करणे कॉंग्रेसला शक्य झाले, यद्यपि अ, ब आणि क अशा गटनिर्मितीला त्यांचा विरोध होता. लीगला ही योजना पूर्णत: मान्य नव्हती तरीहि जे मिळत आहे त्याहून अधिक काही मिळणार नाही, तसेच ब आणि क गटांच्या निर्मितीमुळे मुस्लिमांना वाटणार्‍या हिंदु बहुमताच्या भीतीची धार कमी होणार आहे असे वाटल्यावरून लीगनेहि ६ जून ह्या दिवशी मिशनच्या योजनेला अनुमोदन दिले.

अशा रीतीने घटनासमितीच्या निर्मितीचा मार्ग खुला झाल्याने कॅबिनेट मिशनने सुचविलेले संघराज्य निर्माण होण्यात काही अडचण उरली नाही असे वाटू लागले. आझादांनी हाच विचार मांडला आहे. कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग दोघांकडून कॅबिनेट मिशनच्या योजनेचा स्वीकार झाला ह्या घटनेला त्यांनी ’a glorious event in the history of the freedom movement in India’ असे म्हटले आहे.

ह्या घटना होत असतांनाच कॉंग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वात महत्त्वाचे आणि दूरगामी बदल घडून येणार होते. कॉंग्रेस पक्षाच्या रामगढ येथे मार्च १९-२०, १९४० ह्या दिवशी भरलेल्या ५३व्या अधिवेशनामध्ये पक्षाध्यक्षपदी निवड झालेले आझाद घटनेनुसार एक वर्षाची अध्यक्षपदाची मुदत भरल्यानंतरहि सलग सहा वर्षांहून अधिक काळ त्या पदावर राहिले होते. ह्याची कारणे म्हणजे १९४० साली महायुद्धाचा प्रारंभ, तदनंतर वैयक्तिक सत्याग्रहांची चळवळ आणि पक्षाच्या नेत्यांना १९४० मध्ये अटक केले जाणे, १९४२ ची चलेजाव चळवळ आणि १९४५ पर्यंत सर्व नेत्यांची स्थानबद्धता. ह्या सर्वांमुळे अखिल भारतीय अधिवेशने होऊ शकली नाहीत आणि नव्या अध्यक्षाची निवड लांबणीवर पडत राहिली. आता १९४६ साली सरदार पटेलांना अध्यक्षपद दिले जावे असा एक विचारप्रवाह कॉंग्रेसजनांमध्ये निर्माण होऊ लागला होता. पुढच्या निवडणुकीला आपण उभे राहायचे नाही असा निर्णय आझादांनी एप्रिल १९४६ मध्ये घेतला आणि २६ एप्रिलच्या जाहीर पत्रकाने ते घोषित केले. तसेच पटेल आणि नेहरू ह्या दोन संभाव्य नेत्यांपैकी नेहरूंच्या बाजूने आपला पाठिंबाहि जाहीर केला. पुढे नेहरूंच्या हातून घडलेल्या काही गोष्टींमुळे ’आपण ही मोठी चूक केली’ असेहि १९८८ साली प्रकाशात आलेल्या आत्मचरित्राच्या वाढवलेल्या भागात ते म्हणतात. तेथे ते लिहितात:


कॉंग्रेसच्या कार्यकारिणीने मान्य केलेल्या कॅबिनेट मिशनच्या योजनेला अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी (AICC) ह्या पक्षाच्या अखिल भारतीय स्वरूपाच्या प्रातिनिधिक समितीची मान्यता मिळविण्यासाठी तशा अर्थाचा प्रस्ताव कमिटीच्या ७ जुलै १९४६ ह्या दिवशी मुंबईत बोलावलेल्या बैठकीपुढे मांडण्यात आला. बैठकीच्या प्रारंभी आझादांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडून जवाहरलाल नेहरूंचे नाव त्या पदासाठी सुचविले आणि अध्यक्षपदाची सूत्रे नेहरूंच्या हाती दिली. नंतरच्या चर्चेमध्ये कॅबिनेट मिशनविषयक मुख्य प्रस्तावाला युसूफ मेहेरअली ह्यांच्यासारख्यांच्या डाव्या विचाराच्या समाजवादी गटाकडून विरोध झाला परंतु प्रस्तावाच्या बाजूने आझादांनी भाषण केले. कॉंग्रेसच्याच सूचना कॅबिनेट मिशनने बहुतांशी मान्य केलेल्या असल्यामुळे कॅबिनेट मिशनने दिलेली योजना हा पक्षाचा मोठाच विजय आहे असे त्यांनी सभेला पटवून दिले आणि प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला.

ह्या मंजुरीनंतर तीनच दिवसांनी नेहरूंनी केलेल्या एका विधानामुळे ह्या मंजुरीचा सर्व परिणाम पुसला गेला. १० जुलैला मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये कॉंग्रेसकडून कॅबिनेट मिशनची योजना पूर्णपणे स्वीकारली गेली आहे काय असा प्रश्न एका वार्ताहराने विचारला असता नेहरूंनी असे उत्तर दिले की कॉंग्रेसने केवळ घटनासमितीमध्ये प्रवेश करण्याचे मान्य केले आहे, मिशनने सुचविलेली प्रान्तांची गटवार विभागणी कॉंग्रेसला मान्य नाही आणि मिशनच्या योजनेमध्ये आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो. (मिशनने सुचविलेल्या मार्गाने स्वातन्त्र्य स्वीकारले असते तर हिंदुस्तान ह्या संघराज्यामध्ये दुबळे केन्द्र आणि ब व क गटांमध्ये डोईजड लीग ह्यामुळे कायम तणावाची स्थिति राहिली असती असा त्यांचा विचार असावा.)

नेहरूंच्या ह्या विधानामुळे आतापर्यंतच्या घडलेल्या सगळ्या घटनांवर पाणी पडले. इतके दिवस स्वतन्त्र पाकिस्तानची मागणी ताणून धरल्यानंतर अचानक घूमजाव करून अखंड हिंदुस्तानच्या अन्तर्गतच राहण्याच्या मुस्लिम लीग आणि जिनांच्या निर्णयावर मुस्लिम कार्यकर्त्यांकडून टीका होतच होती. आता त्यातील गटांची निर्मिति हा लीगला आकर्षक वाटलेला भागच कॉंग्रेसने नाकारला. साहजिकच कॉंग्रेसच्य नकाराचे निमित्त साधून लीगनेहि मिशनच्या योजनेला दिलेला होकार मागे घेतला आणि कॅबिनेट मिशनला हात हलवीत परत जाणे भाग पडले. ह्या विषयात आझाद असे लिहितात


कोठल्याहि प्रयत्नाने स्वतन्त्र पाकिस्तानची मागणी पुढे सरकत नाही असे पाहिल्यावर २७ ते ३० जुलै १९४६ ह्या दिवसांमध्ये मुस्लिम लीगच्या कौन्सिलची मुंबईत बैठक होऊन कॅबिनेट मिशन योजना नाकारण्यात आली आणि पाकिस्तान प्राप्त करून घेण्यासाठी ’थेट कृति’ (Direct Action) करण्याचे ठरविण्यात आले. ह्याचाच परिपाक कलकत्त्याच्या १६ ऑगस्टच्या कत्तलीत झाला ज्यामध्ये दोन्ही जमातींचे मिळून ४००० लोक प्राणांस मुकले आणि १,००,००० बेघर झाले.

येथवर वर्णिलेल्या घटनाक्रमावरून दिसते की १० जुलैच्या पत्रकार परिषदेतील नेहरूंच्या एका विधानामुळे कॅबिनेट मिशनच्या योजनेचा आणि त्या योजनेखाली होऊ घातलेल्या दुबळ्या संघराज्याचा गर्भावस्थेतच अंत झाला. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या निर्णयाखाली असा सुरुंग लावून तो उधळण्यामागे नेहरूंचा काय विचार असावा?

१९२७ साली नेहरू पहिल्यांदा सोवियट युनियनच्या दौर्‍यावर गेले आणि त्या भेटीचा त्यांच्या वैचारिक जडणघडणीवर मोठा परिणाम झाला हे स्पष्ट आहे. त्याबद्दलचे विवरण येथे पहा. स्वतन्त्र भारताची बांधणी जर योजनाबद्ध पद्धतीने व्हायची असेल तर ते कार्य केवळ मजबूत आणि पुरेसे अधिकार हाती असलेल्या केन्द्राकडूनच घडू शकेल, तेथे दुबळ्या आणि ज्याच्यावर सारख्या तडजोडी करण्याची वेळ येते अशा लेच्यापेच्या केन्द्राकडून ते नेतृत्व मिळणार नाही अशी धारणा झाल्यामुळेच आपल्या डावीकडे झुकणार्‍या धोरणाचा भाग म्हणून त्यांनी कॅबिनेट मिशनची योजना उधळून लावली असावी.

असे घडले नसते आणि कॅबिनेट मिशनने सुचविलेले संघराज्य खरोखरच अस्तित्वामध्ये आले असते तर आज त्या हिंदुस्तानची स्थिति काय असती असा विचार करून पहावा. नेहरू-आझादांच्या स्वप्नातहि आल्या नसतील अशा शक्ति आज अस्तित्वात आलेल्या आहेत. ह्याच शक्तींनी दुबळ्या केन्द्राच्या हिंदुस्तानला आतून पोखरायला कमी केले नसते आणि देशभर दहशत आणि फुटीर चळवळींना ऊत आला असता. अशा शक्तींना फूस लावून बोलावणारे देशाचेच नागरिक असल्याने ते अस्तनीतले निखारे ठरले असते. प्रत्यक्षात निर्माण झालेल्या भारताचे केन्द्रशासन मजबूत असल्याने अशा शक्ति देशामध्ये फार पसरणार नाहीत हे पाहण्यास ते समर्थ आहे. नेहरूंच्या १९४६ सालच्या विचाराचीच ही गोड फळे आहेत असे म्हणता येईल.

ह्यानंतर पुढच्याच वर्षी मे-जून १९४७ मध्ये माउंटबॅटनचा ’प्लॅन बाल्कन’ नेहरूंना वेळीच समजला आणि तो राक्षस वेळीच बाटलीत बंद झाला ह्याचे सविस्तर वर्णन ह्या मालिकेतील ’भारताला स्वातन्त्र्य भाग १- अखेरचा अंक’ ह्या भागामध्ये आलेले आहेच. अशा रीतीने दोन प्रसंगांमध्ये चुकीचे वळण घेऊ पाहणारा देश सन्मार्गाला लागला हे नेहरूंचेच उपकार आहेत असे म्हणता येईल.

जाता जाता एक विचार. ’नेहरू-एडविना संबंध’ हा चघळण्यासाठी कायमचा विषय आहे असे सुरुवातीस म्हटले आहेच. ह्या संबंधामुळेच मे १९४७ मध्ये माउंटबॅटन कुटुंबासोबत काही दिवसांच्या सुटीसाठी सिमल्याला जाण्याचे निमन्त्रण नेहरूंना मिळाले आणि त्या मुक्कामात माउंटबॅटन ह्यांनी आपला गुप्त असा ’प्लॅन बाल्कन’ खाजगीरीत्या नेहरूंना दाखविला आणि तो मुळातच खुडण्याची संधि नेहरूंना मिळाली हे लक्षात असावे!



टीपा - ह्या लेखाचा प्रमुख आधार म्हणजे मौलाना आझादांच्या India Wins Freedom ह्या पुस्तकाची १९८८ साली प्रकाशित झालेली आवृत्ति. आझादांचे India Wins Freedom हे पुस्तक प्रथम ओरिएण्ट लॉंगमन्स ह्या प्रकाशनसंस्थेने १९५९ साली आझादांच्या मृत्यूनंतर प्रकाशित केले. पुस्तकाची नंतर अनेक पुनर्मुद्रणे झाली. १९५९ च्या प्रस्तावनेमध्येच असे स्पष्ट करण्यात आले होते की त्या वेळी उपलब्ध केला गेलेला मजकूर हा पूर्ण नसून काही मजकूर राखून ठेवला आहे आणि तो आझादांच्या तिसाव्या मृत्युदिनी २२ फेब्रुवारी १९८८ ह्या दिवशी खुला केला जाईल. नेहरू, कृष्ण मेनन, तसेच अन्य काही हयात व्यक्तींविषयींची आझादांची काही परखड मते पुरेसा काळ गेल्यानंतरच सार्वजनिक व्हावीत अशी त्यांची इच्छा होती आणि त्या इच्छेनुसार सुमारे ३० पाने भरतील इतक्या मजकुराचे प्रकाशन ३० वर्षे लांबणीवर टाकण्यात आले होते. ओरिएण्ट लॉंगमन्स ह्या प्रकाशनसंस्थेने १९८८ साली ह्या मजकुरासह पुस्तकाची नवी आवृत्ति काढली. तिच्यामध्ये हा लांबणीवर टाकण्यात आलेला मजकूर जागोजागी * * अशा खुणांच्या मध्ये दाखविण्यात आला आहे. पुढच्या टीपांमधील पृष्ठांक ह्या आवृत्तीमधील आहेत.

१. पृ. १४७-१४८.
२. पृ. १५२.
३. पृ. १५८.
४. पृ. १६२.
५. ह्या निवडणुकीच्या बाबतीत कॉंग्रेस पक्षाची घटना काय म्हणते ते मला सापडू शकले नाही पण अध्यक्षाची निवड ही खुल्या अधिवेशनामध्ये होते अशी माझी समजूत आहे. तदनुसार नोवेंबर २३-२४, १९४६ ह्या दिवशी मेरठ येथे भरलेल्या अधिवेशनात आचार्य कृपलानींची अध्यक्षपदी निवड झाली, नेहरूंची नाही. शक्यता अशी दिसते की २ सप्टेंबरच्या दिवशी अंतरिम सरकारचे नेतृत्व नेहरूंकडे आल्यामुळे कॉंग्रेसचे अध्यक्षपद न घ्यायचे त्यांनी ठरविले असावे.
६. पृ. १८३.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

इराण- अमेरिका संबंधांची पाळेमुळे - अंतिम

“The free peoples of the world look to us for support in maintaining their freedoms.”
–US President Harry Truman, 12 March 1947

भाग १
भाग २

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

इराण- अमेरिका संबंधांची पाळेमुळे - भाग २

(भाग १ पासुन पुढे)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

इराण- अमेरिका संबंधांची पाळेमुळे - भाग १

आधुनिक जगात राष्ट्रांमधील परस्परसंबंध दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत आले आहेत. दुसऱ्या महायुद्धाचा अस्ताची परिणीती नव्या राजकीय-भौगोलिक समीकरणात आणि तद्वत नव्या संघर्षांमध्ये झाली. येणाऱ्या काळात मध्यपूर्व आशिया महत्त्वाच्या जागतिक संघर्षांचे केंद्र होणार याची चिन्हे खूप अगोदर पासूनच दिसू लागली होती. मध्यपुर्वेचा राजकीय पडदा कितीही भरकटत गेलेला असला तरी त्यातले रंग मात्र कधी बदललेच नाहीत. तेल, इस्लाम आणि इस्राइल एवढ्या तीनच रंगानी हा कॅनवास रंगत आलेला आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - इतिहास