इतिहास

सातारचे छत्रपति?

आजच्या दिनवैशिष्ट्यामध्ये पुढील उल्लेख आहे त्यावरून मला सुचणारे काही विचार येथे नोंदवीत आहे:

<१८१९ : मराठ्यांची एकेकाळची राजधानी असणारा सातारचा किल्ला इंग्रजांनी काबीज केला.>

२० फेब्रुअरी १८१८च्या अष्ट्याच्या लढाईत मराठा पक्षाचा पूर्ण पराभव झाला, सेनापति बापू गोखले लढाईत पडले आणि प्रारंभी मराठा बाजूला असलेले तत्कालीन छत्रपति प्रतापसिंह, त्यांच्या मातोश्री आणि त्यांचे कुटुंबीय इंग्रजांच्या स्वाधीन झाले. तदनंतर इंग्रजांनी फार लोकक्षोभ होऊ नये म्हणून ज्या अनेक योजना केल्या त्यांपैकी एक म्हणजे छत्रपतींना सातार्‍यात परत स्थानापन्न करून वारणेच्या उत्तरेकडील भाग कृष्णा-भीमासंगमापावेतोचा हा स्वराज्य म्हणून त्यांच्या स्वाधीन केला. त्याच वेळी त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी म्हणून कॅ.ग्रँटला रेसिडेंट म्हणून सातार्‍यात नेमले,

अशा रीतीने सातारचे १८१८ नंतरचे तथाकथित राज्य हे केवळ इंग्रजी मेहेरबानीने निर्माण झालेले संस्थान होते. त्याचा शिवाजीने स्वपराक्रमाने स्थापन केलेल्या राज्याशी काडीमात्र संबंध नव्हता. तेहि राज्य इंग्रजांना सोयीस्कर वाटले तोपर्यंत चालले. प्रतापसिंहास तो गैरसोयीचा वाटल्यामुळे इंग्रजांनी ४ सप्टेंबर १८३९ ह्या दिवशी पदच्युत करून बनारसला पेन्शनीवर पाठवले आणि त्याचा धाकटा भाऊ आप्पासाहेब ह्यास छत्रपतिपदावर बसविले. ते निपुत्रिक होते. त्यांव्या १८४८ मधील मृत्यूनंतर त्यांनी घेतलेला दत्तक नामंजूर करून इंग्रजांनी अखेर सातारचे संस्थान आणि शिवाजीच्या स्वनिर्मित राज्याचा अखेरचा दुवा १६ मे १८४९च्या जाहीरनाम्याने अखेरचा नष्ट केला आणि सातारा ब्रिटिश इंडियाचा भाग बनला. ईंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी निर्मिलेले हे राज्य त्यांना वाटले तोवर टिकले आणि नंतर त्यांच्याच इच्छेने विलयास गेले.

अशी परिस्थिति असतांना सातार्‍यातील तथाकथित छत्रपति घराणे आपली बेगडी बिरुदावलि मिरवत त्याचा राजकीय लाभ उठवत असतांना दिसते. छ.(?) उदयनराजे आणि छ.(?) शिवेन्द्रराजे हे राजेपणाचे किताब मिरवीत छत्रपतिपदाचा आपणास निसर्गदत्त अधिकार आहे असे मानतात. भोळसट जनताहि - त्यामध्ये छत्रपतींपुढे मुजरे करणारे बाबासाहेब पुरंदरेहि आले - ते मान्य करते आणि छत्रपतींचे छात्रतेज अजून कसे जाज्वल्य आहे ह्याचे गुणगान करतांना दिसते. सगळीच मौज आहे!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आइशमन इन जेरुसलेम : सामान्यांचा दुष्टपणा


एडॉल्फ आइशमन/आईशमन (जर्मन) एस.एस.चा सदस्य होता. त्याचं काम होतं, ज्यू आणि समलैंगिक, जिप्सी लोकांच्या 'प्रवासा'ची तजवीज करायची. हा प्रवास म्हणजे त्यांच्या राहत्या शहर/गावांतून परदेशात हकालपट्टी किंवा कोणत्याशा यातनातळाकडे रवानगी. यातनातळात नक्की काय होत असे, ह्याच्याशी त्याच्या कामाचा संबंध नव्हता.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

गोव्यातील इन्क्विझिशन

’इन्क्विझिशन’ ही रोमन चर्चमधील एक संस्था कॅथलिक चर्चचे पावित्र्य अबाधित ठेवण्याच्या हेतूने ९व्या ग्रेगरी - पोप असण्याचा काल १२२७ ते १२४१ - ह्या पोपने सुरू केली. पाखंड शोधून त्याचा नाश करणे हा त्याचा हेतु होता. त्या काळामध्ये युरोपात बहुतेक सर्व देशांमध्ये कॅथलिक चर्चचेच आदेश पाळले जात. प्रत्येक राजाने आपापल्या सत्तेच्या भागात इन्क्विझिटर नावाचे खास अधिकारी नेमून चौकशी करून शिक्षा देण्याचे विशेष अधिकार त्यांना द्यावेत आणि त्यांच्यासाठी विशेष सोयी निर्माण कराव्यात असा पोपचा आदेश होत. तदनुसार ’होली रोमन एम्परर’ दुसरा फ़्रेडेरिक आणि फ्रान्सचा राजा ९वा लुई ह्यांनी इन्क्विझिटर्स नेमले आणि संशयित पाखंडी व्यक्तींना पकडून अमर्याद काळापर्यंत तुरुंगात डांबून, तसेच त्यांना शारीरिक यातना देऊन त्यांच्याकडून पाखंड कबूल करवून घेण्याची अमर्याद सत्ता अशा इन्क्विझिटर्स कोर्टांना बहाल केली. पाखंड सिद्ध झाल्यास मृत्युदंड द्यायचे अधिकारहि त्यांना होते आणि राजसत्ता त्यांच्या कारभारात कसलाहि हस्तक्षेप न करण्यास बांधलेली होती.

लवकरच इन्क्विझिटर्स कोर्टांची ’न भूतो न भविष्यति’ अशी दहशत सर्व युरोपात पसरली. कबुली मिळेपर्यंत संशयिताचा छळ करणे, सांगोवांगीवरून किंवा कोणाच्या तक्रारीवरून संशयिताला ताब्यात घेणे असे प्रकार फैलावले. कोणाच्या पाखंडाची माहिती असतांनाहि ती कोर्टापुढे न आणणे हाहि गुन्हा ठरला आणि त्यामुळे स्वत:च्या सुरक्षिततेच्या भीतीमधून दुसर्‍यावर आरोप करणे असले प्रकार बळावले आणि इन्क्विझिटर्स कोर्टांची सत्ता आणि दहशत अमर्याद झाली.

ज्यू धर्म हा येशूच्या मारेकर्‍यांचा धर्म म्हणून आणि मुस्लिम धर्म ख्रिश्चनांची पवित्र स्थाने ताब्यात ठेवणारा प्रतिस्पर्धी धर्म म्हणून इन्क्विझिशनचे विशेष लक्ष्य ठरले. तसेच ख्रिश्चन धर्मविरोधी वर्तन, समलिंगी आणि अनैसर्गिक प्रकारचे लैंगिक वर्तन, एकाहून अधिक बायका असणे अशी गुन्ह्यांची संख्या वाढू लागली.

पश्चिम युरोपात, विशेषत: स्पेनमध्ये, मूरिश अरबांची सत्ता सुमारे ४०० वर्षे टिकून होती. फ्रान्सच्या सीमेपर्यंत त्यांचा प्रसार झाला होता. चार्ल्स मार्टेलने ७३२ मध्ये तूरच्या लढाईत अरबांचा फ्रान्समधील प्रसार थोपवला होता पण सर्व स्पेन अरबांच्या कमीअधिक ताब्यात होते. कास्तिलची राणी इझाबेला आणि आरगॉनचा राजा फर्डिनंड ह्याच्या विवाहानंतर स्पेनमधील ख्रिश्चन पक्षातील दुफळी मिटून आधुनिक स्पेनचा उदय होण्यास सुरुवात झाली - १५व्या शतकाचा दुसरा अर्धभाग - आणि त्यांच्या सत्तेच्या काळात इन्क्विझिशनला आणखीनच बळ मिळाले. अरब सत्तेचा शेवट करायला प्रारम्भ तर त्यांनी केलाच पण त्या बरोबरच सर्व ज्यू- धर्मियांची आपल्या देशातून त्यांनी हकालपट्टी केली. त्यांच्या ह्या कॅथलिक निष्ठेमुळे Their Most Catholic Majesties असे स्वत:ला म्हणवून घ्यायची मुभा पोपने त्यांना दिली होती.

वर वर्णिलेल्या पाखंडाला आणखी एक जोड ज्यू हकालपट्टीबरोबर मिळाली. ती म्हणजे relapsed christians असण्याचा आरोप. पुष्कळ ज्यू लोकांनी देश सोडण्याऐवजी धर्म बदलून कॅथलिक होणे पसंत केले होते. असे बाटगे हे धर्माशी खरेखुरे एकनिष्ठ नाहीत अशी शंका उपस्थित करून ज्यू लोकांना relapsed christians म्हणून त्रास देण्याचा नवा प्रकार सुरू झाला. कोणी असा ख्रिश्चन डुकराचे मांस खात नाही अशी शंका घेऊन त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची प्रथा पडली. (Goya's Ghosts नावाचा चित्रपट यूट्यूबर उपलब्ध आहे. गोया ह्या प्रख्यात स्पॅनिश चित्रकाराची मैत्रीण इनेस ही डुकराचे मांस खात नाही ह्या आरोपावरून इन्क्विझिशनने तिल्या ताब्यात घेतले. दरबारामध्ये आणि चर्चमध्ये असलेले आपले वजन वापरून तिची सुटका घडवण्याचे गोयाचे प्रयत्न हा ह्या चित्रपटाचा विषय आहे.

इन्क्विझिशनचे काम मोठ्या गंभीरपणे चालत असे. आरोपींची शारीरिक छळ, बनावट साक्षी असे सर्व मार्ग वापरून चौकशी झाल्यावर काही सुदैवी सुटून बाहेर येत पण गुन्हा सिद्ध झालेल्यांना मालमत्ता जप्तीपासून जळून मारण्यापर्यंत अनेक शिक्षा होऊ शकत. वर्षामधून एक किंवा दोन वेळा अशा शिक्षांची सार्वजनिक अमलबजावणी होत असे. माद्रिद शहरामध्ये Plaza Mayor हा शहरातील प्रमुख चौक ही तेथील इन्क्विझिशनची जागा आजचे महत्त्वाचे टूरिस्ट डेस्टिनेशन झाले आहे. गावातील प्रमुख चौकामध्ये चारी बाजूंनी प्रेक्षकांची बसायची सोय करून उच्चासनावर इन्क्विझिटर न्यायालय बसत असे आणि दंडित आरोपी तेथे समारंभाने आणले जात. त्यांच्या शिक्षा येथे त्यांना वाचून दाखवल्या जात पण आपापल्या शिक्षा दुर्दैवी दंडितांना आधीच ठाऊक असत कारण शिक्षेच्या वेळी त्यांनी वापरायचे कपडे त्या त्या शिक्षेनुसार ठरलेले असत. जाळून मारण्याची - burning at stake - san benito नावाची पिवळी उंच निमुळती टोपी घातलेली असे आणि त्यांच्या अंगावरच्या पिवळ्या लांब कपड्यावर क्रूस, विस्तवाच्या ज्वाला आणि सैतानाच्या दूतांच्या चित्रांनी वेढलेले त्याचे स्वत:चे चित्र असे. हाच वेष पण क्रूसाशिवाय असा वेष केलेले म्हणजे गुन्हा सिद्ध झालेले आणि तरीहि माफी मिळालेले. स्वत:च्याच कपड्यात आलेले म्हणजे दंड भरून सुटका करण्यायोग्य गुन्हेगार अशा त्यांच्या दर्जाप्रमाणे शिक्षा असत. शिक्षा वाचून दाखविल्यानंतर धार्मिक अधिकारी दंडिताचा आत्मा जीजसच्या काळजीवर सोपवला आहे असे जाहीर करून दंडितांना राजाच्या हवाली करत आणि राजाचे यमदूत तेथेच आधी उभ्या केलेल्या शेकोट्यांवर दंडितांना बांधून जागीच शिक्षेची अंमलबजावणी करत असत. अशा ह्या मोठया नाटकी आणि गंभीर देखाव्याला auto da fe - act of faith असे नाव होते. (किंचित् अवान्तर. औरंगजेबाने संभाजीराजाला हालहाल करून ठार मारण्याची शिक्षा सुनावली. तेव्हाचे जे वर्णन आहे त्यामध्ये उंटावर बसवून आणि दोक्यावर विदूषकाची उंच टोपी घालून त्यांची मुघल छावणीभर मिरवणूक काढण्यात आली असे वाचले आहे. तशीच ही उंच टोपी दिसते.)

पोर्च्युगाल आणि स्पेनने अशिया-अमेरिकेमध्ये पाय पसरायला सुरुवात केल्यावर इन्क्विझिशन राजसत्तेपाठोपाठ ह्या नव्या प्रदेशांमध्येहि पोहोचले

नव्याने ताब्यात आलेल्या मेक्सिकोमध्ये असे auto da fe होत असत. मेक्सिको शहरातील नॅशनल पॅलेसमध्ये दिएगो गार्सिया ह्या प्रख्यात म्यूरलिस्टने रंगविलेली आणि मेक्सिकोचा सर्व इतिहास चित्ररूपाने दाखविणारी एक म्यूरल चित्रांची मालिका उंच जिन्याच्या दोहो बाजूस रंगविलेली आहेत. त्यातील auto da fe चे चित्र येथे खाली पहा. उंच टोपीतील दंडित आगीत जळण्याची वाट पाहात तेथे दिसतात.

Inquisition in Mexico

असेच इन्क्विझिशन गोव्यातहि येऊन पोहोचले आणि जुन्या गोव्यात आदिलशहाच्या पूर्वकालीन वाड्यामध्ये त्याची जागा होती. डेलॉन - M Dellon - नावाचा एक फ्रेंच डॉक्टर दमणमध्ये असतांना इन्क्विझिशनमध्ये सापडला. पवित्र कुमारी मेरीच्या चित्राला त्याने पुरेसा आदर दाखविला नाही अशा आरोपावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. दमणमधील एका ख्रिश्चन बाईबरोबर त्याचे मैत्रीचे संबंध स्थापन होत होते ते दुसर्‍या एका प्रतिष्ठिताला आवडले नाही आणि त्याने डेलॉनला खोट्या आरोपात गोवले होते. आधी दमणमध्ये काही दिवस आणि नंतर सुमारे दोन वर्षे गोव्यामध्ये इन्क्विझिशनच्या कैदेत कष्टात काढल्यानंतर मोठ्या मुष्किलीने त्याची सुटका झाली आणि मोझांबिक-ब्राझील-पोर्च्युगालमार्गे तो अखेर मायदेशी म्हणजे फ्रान्सला पोहोचला. तेथे आपल्या गोव्यातील अनुभवावर एक पुस्तक लिहून १६८० साली प्रसिद्ध केले. ते आता भाषान्तररूपात उपलब्ध आहे. अनंत काकबा प्रियोळकरांनी गोवा इन्क्विझिशनच्या विषयावर जे पुस्तक लिहिले आहे त्यात डेलॉनचे अनेक संदर्भ मिळतात असे वाटते. (प्रियोळकरांचे पुस्तक मी पाहिलेले नाही.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

शिवराज्याचा राज्यव्यवहारकोश - भाग १.

कित्येक शतके लुप्त झालेला प्राचीन हिंदु पद्धतीमधील राज्याभिषेक समारंभ शिवाजीमहाराजांनी पुनरुज्जीवित केला आणि परकीय मूळ असलेल्या राजकीय वर्चस्वाला आह्वान दिले. सांस्कृतिक पातळीवर असेच करण्यासाठी परक्या शासकांबरोबर आलेल्या फारसी-उर्दू भाषांचे मराठीवरील आक्रमण थांबवून पुन: ह्या देशातील मूळच्या अशा मराठी भाषेला राज्यकारभारात योग्य स्थान देण्याचे त्यांनी ठरविले.

राज्याभिषेककालापर्यंत खरोखरच येथील जनतेची स्वत:ची मराठी भाषा फारसी-उर्दूच्या आक्रमणाखाली गुदमरून गेल्यासारखी दिसत होती. १४व्या शतकाच्या प्रारंभाला देवगिरीचे यादवांचे राज्य नष्ट झाले आणि खिलजी सल्तनतीचे अंमल सुरू झाला. शासक आपली भाषाहि आपल्याबरोबर आणतो ह्या नियमास धरून फरसी-अरबी शब्दांचे मराठीवरील आक्रमण तेव्हापासून सुरू झाले. १७व्या शतकापर्यंत प्रामुख्याने गद्य लेखनामध्ये हे आक्रमण जाणवण्या-खुपण्याइतपत वाढले होते. पद्य लेखनामध्ये ते त्यामानाने कमी दृग्गोचर होते कारण तत्कालीन पद्यलेखन हे सर्व धार्मिक-आध्यात्मिक स्वरूपाचे असल्याने त्याची परंपरा ही प्राचीन भारतीय दर्शने, पुराणे आणि रामायण-महाभारतासारख्या काव्यामधून आलेली होती. गद्य लेखन हे सरकारी कामकाज, महसूल गोळा करणे अशा हेतूने होत असल्याने शासकांच्या भाषेचा प्रभाव तेथे अधिक लक्षात येण्याजोगा होता. हा परकीय प्रभाव पुढील दोन उतार्‍यांच्या तुलनेतून स्पष्ट दिसतो. पहिला उतारा महानुभावांच्या ’लीळाचरित्र’ ह्या ग्रन्थातून घेतला आहे. ह्याचा काल १३व्या शतकाचा मध्य.

Lilacharitra
Lilacaritra

दुसरा उतारा इ.स. १७०० च्या पुढेमागे परशुरामपंत प्रतिनिधीने गोव्याच्या ’विजरई’ ला -Viceroy - पाठविलेल्या एका पत्रामधून घेतला आहे. पत्रामध्ये गोवेकरांच्या एका वर्तणुकीबद्दल नापसंती दर्शविली आहे. उतार्‍यातील वाक्यरचना आणि विभक्तिप्रत्यय वगळता येथे मराठी अभावानेच दिसते आहे.

Farsi

ही परिस्थिति बदलण्यासाठी आणि मराठीला तिचे नैसर्गिक स्वरूप मिळवून देण्यासाठी आणि राज्यकारभारातील फारसीचा अतोनात प्रसार ताब्यात आणण्याच्या दृष्टीने पाऊल म्हणून शिवाजीराजांनी आपला दक्षिण प्रान्तातील अधिकारी आणि तंजावरनिवासी रघुनाथ नारायण हणमंते ह्यांना फारसीच्या जागी देशी शब्द सुचविणारा ’राज्यव्यवहारकोश’ रचण्यास सांगितले. लगोलग कामाला लागून रघुनाथपंतांनी असा कोश रचून तो राजापुढे १६७८ च्या सुमारास सादर केला . ह्या साठी संस्कृत भाषेचा आधार घेण्यात आला आणि फारसी शब्दांच्या जागी समानार्थी संस्कृत शब्द सुचविण्यात आले.

१७व्या शतकात राजाचे कुटुंब, राज्यकारभार कसा चालत असे, राजसभेमध्ये शिष्टाचार कसा असे, राज्यातील शासकीय आणि सैनिकी अधिकारी कोण होते येथेपासून सुरुवात करून वापरातील शस्त्रे, अंगावरचे दागिने, राज्याचा अर्थव्यवहार, महसूल आकारणी, नाणी, व्यापार-उदीम, कापडचोपड आणि कपडे, मादक पेये, धूम्रपान, तांबूलद्रव्ये, सुगंधी तेले अशा आर्थिक आणि सामाजिक विचाराच्या दृष्टीने मनोरंजक आणि उद्बोधक वाटतील अशा वस्तूंचे उल्लेख येथे मूळ फारसी/उर्दू शब्द आणि त्यांच्यासाठी सुचविलेला संस्कृत शब्द ह्या मार्गाने मिळतात. असे सुमारे १३८० शब्द १० गटांमध्ये - अमरकोशाची भाषा उचलून त्यांना ’वर्ग’ असे नाव दिले आहे- आपणास येथे दिसतात.

ह्या कोशाच्या एकमेकापासून कमीअधिक प्रमाणात भिन्न अशा अनेक प्रती महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मिळाल्या आहेत. त्यापैकी कोल्हापूरहून का.ना. साने ह्यांनी मिळालेली प्रत १९२५ साली भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रकाशित केलेल्या ’शिवचरित्रप्रदीप’ ह्या ग्रंथामध्ये छापलेली आहे. ह्या प्रतीचे वैशिष्टय असे की मुख्य कोशापलीकडे तिच्यामध्ये ८४ संस्कृत श्लोकांचा उपोद्घात आणि अखेरीस ५ श्लोकांचा उपसंहार आहे, जो अन्य प्रतींमध्ये नाही. उपसंहारामध्ये कोशाच्या निर्मितीविषयी अधिक माहिती आहे. पुढील लेखन ह्या प्रतीवर आधारलेले आहे.

कोशातच अनेक ठिकाणी म्हटल्याप्रमाणे त्याची निर्मिति ही रघुनाथपंतांनी केली आहे. उपोद्घातामध्ये पुढील श्लोक दिसतात.

कृते म्लेच्छोच्छेदे भुवि निरवशेषं रविकुला-
वतंसेनात्यर्थं यवनवचनैर्लुप्तसरणीम्।
नृपव्याहारार्थं स तु विबुधभाषां वितनितुम्।
नियुक्तोऽभूद्विद्वान्नृपवर शिवच्छत्रपतिना ॥८१॥
सोऽयं शिवच्छत्रपतेरनुज्ञां मूर्धाभिषिक्तस्य निधाय मूर्ध्नि।
अमात्यवर्यो रघुनाथनामा करोति राज्यव्यवहारकोशम् ॥८२॥

सूर्यवंशाचा जणू तुराच अशा राजश्रेष्ठ शिवछत्रपतीने पृथ्वीवर म्लेच्छांचा समूळ उच्छेद केल्यानंतर यवनोक्तींनी झाकोळलेल्या देवभाषेला राज्यव्यवहारासाठी वाढविण्याच्या हेतूने एका विद्वानाला नियुक्त केले. ८१.
तो मी अमात्य रघुनाथ शिवछत्रपतीची आज्ञा मस्तकी धारण करून राज्यव्यवहारकोश करीत आहे. ८२.

प्रत्येक वर्गाच्या अखेरीस पुढील प्रकारचा समारोप आहे:

इति श्रीशिवच्छत्रपतिप्रियामात्येन नारायणाध्वरिसूनुना रघुनाथपण्डितेन शिवराजनियोगत: कृते राजव्यवहारकोशे पण्यवर्गो दशम: समाप्त:॥
(शिवछत्रपतीचा प्रिय अमात्य, नारायणाचा पुत्र अशा रघुनाथपंडिताने शिवाजीराजाच्या आदेशावरून केलेल्या राजव्यवहारकोशामध्ये पण्यवर्ग हा दहावा वर्ग समाप्त झाला.)

ह्याउलट उपसंहारामध्ये पुढील दोन श्लोकांमध्ये असे लिहिले आहे:

व्यासान्वयाब्धिचन्द्रेण लक्ष्मणव्याससूनुना।
कोशोऽयं ढुंढिराजेन रघुनाथमुदे कृत:॥१॥
यथामति विचार्यैव नामान्यर्थानुसारत:।
विहितानि मयाकार्यमार्यैरत्र मनो मनाक्॥२॥

(व्यासकुल हा सागर, त्यातून उत्पन्न झालेल्या चन्द्रासारखा असलेल्या, लक्ष्मण व्यासाचा पुत्र, अशा ढुंढिराजाने रघुनाथाच्या संतोषासाठी हा कोश केला. १.
बुद्धीने विचार करून अर्थानुसारी शब्द मी येथे योजिले आहेत. आर्य विद्वानांनी ह्याकडे थोडे लक्ष द्यावे. २.)

हे सर्व श्लोक एकत्रितपणे विचारात घेतले तर असे म्हणता येते की रघुनाथपंडिताला हे कार्य मिळाले. तो स्वत: तंजावरचा निवासी असून त्याच्याकडे शिवराज्यापैकी दक्षिणभागाचे शासन हे प्रमुख कार्य होते. पूर्ण कोश स्वत: करणे त्याला शक्य नसणार म्हणून त्याने ढुंढिराज नावाच्या परिचित विद्वानाला हे कार्य सोपविले. कोशनिर्मितीमध्ये असा दोघांचाहि काही वाटा आहे. ढुंढिराजाने शब्द गोळा करणे असे पहिले काम केले आणि दोघांनी मिळून त्याला हे अखेरचे स्वरूप दिले. (प्रख्यात पंडितकवि रघुनाथपंडित, नलदमयंतीस्वयंवराचा कवि आणि रघुनाथपंत अमात्य हे एक का दोन, ढुंढिराज व्यास कोण होता असे बरेच काही लिहिण्याजोगे आहे पण विस्तारभयास्तव ते येथे न लिहिता त्याचा नुसता उल्लेख करतो.)

ह्यापुढे प्रत्यक्ष कोशाचा धावता आढावा घेऊ. संस्कृत पंडितप्रथेला धरून शिवजन्मामागे ईश्वरी प्रेरणा आहे असे सुचविणारे, कोशकार्याची आवश्यकता काय आणि ते करण्यास रघुनाथपंडित कसा सर्वथैव पात्र आहे ह्याचे वर्णन करणारे आणि अतिशयोक्तीने भरलेले ८४ श्लोक उपोद्घातामध्ये आहेत. त्यांचा सारांश असा:

यवनाक्रान्त आणि त्यामुळे त्रस्त अशी पृथ्वी ब्रह्मदेवाकडे ’माझी यवनांपासून सोडवणूक कर’ असे सांगण्यासाठी गेली. हे कार्य करण्यास विष्णु अधिक योग्य आहे असे सांगून ब्रह्मदेव तिला बरोबर घेऊन विष्णूकडे गेला. आपल्यापेक्षाहि शंकराने हे कार्य केल्यास उत्तम होईल असे म्हणून सर्वजण कैलासावर शंकराकडे गेले. तेथे शंकर ’परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥’ असे तूच पूर्वी सांगितले होतेस अशी विष्णूला आठवण करून देतो आणि म्हणतो:

निहता भवता हरे पुरा ये पौलस्त्यमुखा: सुखाय भूमे:।
अहितान्पुनरेव जन्मभाजो जहि तान्प्राप्तनराकृतिस्त्वमेव॥४६॥
येषां कलौ दुर्नयमेव सोढुं बुद्धावतार: कलितो मयाऽभूत्।
तेषां विनाशं स्फुटमेव कर्तुमसाम्प्रतं मे मनुषे यदीत्थम्॥४७॥
उपायमप्यत्र वदामि भूमिमवाप्य मन्नामनिगूढभाव:।
साहाय्यमंशेन पुनर्भवान्या लब्ध्वापि त्तानाशु सुखेन हन्या:॥४८॥

हे हरे, पूर्वी भूतलावर सुख आणण्यासाठी तू रावणादींचा वध केलास. आता पुन: जन्म घेतलेल्या त्या शत्रूंना मनुष्यरूपाने तू नष्ट कर. ४६.
’ज्यांचा दुष्टपणा सहन करण्यासाठी मी कलियुगामध्ये बुद्धावतार धारण केला होता त्यांचा विनाश करण्यासाठी मी मनुष्यरूप धारण करणे अयोग्य आहे’ असे जर तुला वाटत असेल...४७.
...तर त्यावर मी उपाय सांगतो. गुप्तपणे माझे नाव धारण करून तू धरणीवर अवतीर्ण हो आणि सहजपणे त्यांचे हनन कर. ह्यामध्ये भवानीचेहि साहाय्य अंशत: तुला मिळेल. ४८.

विष्णूस असा आदेश दिल्यावर शंकर पुढे सांगतो...

अस्ति प्रशस्तविभवो भुवि भानुवंशे विख्यातभोसलकुलामृतसिन्धुचन्द्र:।
श्रीशाहवर्मनृपतिर्विधिपार्वतीशश्रीशा हवि: क्रतुषु नित्यमदन्ति यस्य ॥४९॥
तस्य प्रिया भूपतिभर्तुरार्या रूपेण संतर्जितकामभार्या।
साध्वी जिजूर्नाम सुलक्षणास्ते पत्नी दिलीपस्य सुदक्षिणेव॥५०॥
त्वं शाहपृथ्वीपतिवीरपत्न्यामस्यां समासाद्य मनुष्यजन्म।
म्लेच्छापहत्या सुखमाचरय्य भूमे: पुन: स्थापय वर्णधर्मान्॥५१॥
पार्थं प्रति प्राक्तव धर्महानौ सृजेयमात्मानमिति प्रतिज्ञा।
जगत्सु गीतैव तदत्र कार्षी: कार्येऽधुना माधव मा विचारम्॥ ५२॥

अर्थ - विख्यात भोसले कुलरूपी सागरातून वर आलेला चन्द्रच जणू असा शाहाजी नावाचा कीर्तिमान् राजा आहे ज्याचा यज्ञातील हवि ब्रह्मदेव, शिव आणि विष्णु नित्य ग्रहण करतात. त्याची प्रिय आणि दिलीपाची सुदक्षिणा असावी अशी जिजू नावाची सुलक्षणा रूपवती भार्या आहे. ४९-५०.
तिच्यापासून मनुष्यरूपाने जन्म घेऊन तू म्लेच्छविनाश करून पृथ्वीवर पुन: सुखसमाधान आण आणि वर्णाश्रमधर्माची पुन:स्थापना कर. ५१.
धर्महानि झाली असता मी पुन: जन्म घेऊन उतरेन असे तूच पूर्वी गीतेमध्ये सांगितले आहेस. तेव्हा आता अधिक विचार न करता तू हे कार्य अंगावर घे. ५२.

आदेशाप्रमाणे स्वत: श्रीविष्णूने ’शिव’ ह्या नावाने पृथ्वीवर जन्म घेतला आणि भवानीचा अंश असलेल्या जिजाबाईच्या पाठिंब्याने म्लेच्छांचा संहार केला.

क्रमेण जित्वा स दिशश्चतस्रो राजा शिवच्छत्रपति: प्रतापात्।
नि:शेषयन्म्लेच्छगणं समस्तं पाति स्म पृथ्वीं परिपूर्णकाम:॥६५॥

सर्व म्लेच्छगणांचा आपल्या पराक्रमाने नि:शेष करणारा परिपूर्णकाम राजा शिवछत्रपति चारी दिशा क्रमाने जिंकून सर्व पृथ्वीचे रक्षण करू लागला.

तदनंतर...

कृते म्लेच्छोच्छेदे भुवि निरवशेषं रविकुला-
वतंसेनात्यर्थंयवनवचनैर्लुप्तसरणीम्।
नृपव्याहारार्थं स तु विबुधभाषां वितनितुम्।
नियुक्तोऽभूद्विद्वान्नृपवर शिवच्छत्रपतिना ॥८१॥
सोऽयं शिवच्छत्रपतेरनुज्ञां मूर्धाभिषिक्तस्य निधाय मूर्ध्नि।
अमात्यवर्यो रघुनाथनामा करोति राजव्यवहारकोषम् ॥८२॥

अर्थ - सूर्यवंशाचा जणू तुराच अशा राजश्रेष्ठ शिवछत्रपतीने पृथ्वीवर म्लेच्छांचा समूळ उच्छेद केल्यानंतर यवनोक्तींनी झाकोळलेल्या देवभाषेला राज्यव्यवहारासाठी वाढविण्याच्या हेतूने एका विद्वानाला नियुक्त केले. ८१.
तो मी अमात्य रघुनाथ शिवछत्रपतीची आज्ञा मस्तकी धारण करून राज्यव्यवहारकोष करीत आहे. ८२.

आपल्या ह्या कोशकार्याची कुचेष्टाहि होऊ शकेल असे वाटून रघुनाथपंडित उपोद्घाताच्या अखेरीस सांगतो:

विपश्चित्संमतस्यास्य किं स्यादज्ञविडम्बनै:।
रोचते किं क्रमेलाय मधुरं कदलीफलम् ॥८४॥

विद्वन्मान्य अशा ह्या कार्याची अडाण्यांनी कुचेष्टा केली म्हणून काय बिघडते? उंटाला गोड केळ्याची चव कोठे कळते? ८४.

ह्यापुढे १० वर्गांमध्ये मिळून १३८० फारसी-उर्दू शब्दांना संस्कृत भाषेतील शब्द समानार्थी शब्द सुचविण्यात आलेले आहेत. कोशाचे १० वर्ग असे: १) राज्यवर्ग २) कार्यस्थानवर्ग ३) भोग्यवर्ग ४) शस्त्रवर्ग ५) चतुरंगवर्ग ६) सामन्तवर्ग ७) दुर्गवर्ग ८) लेखनवर्ग ९) जनपदवर्ग १०) पण्यवर्ग . ह्यापुढे ह्या लेखामध्ये कोशामधील कोणताहि शब्द दाखवितांना प्रथम राज्यव्यवहारकोशाने सुचविलेला पर्याय आणि नंतर कंसात मूळ फारसी शब्द अशी रचना ठेवली आहे.

हा राज्यव्यवहार पुष्कळसा पूर्वीच्या मुस्लिम पद्धतीमधून घेतला आहे. राज्याच्या कारभाराचे १८ कारखानेआणि १२ महाल असे विभाजन तेथूनच घेतले आहे, मात्र ते जसेच्या तसे ह्या कोशामध्ये उतरलेले नाही. कसे ते लवकरच दिसून येईल.

राज्याच्या १८ कारखान्यांची मुस्लिम राजवटीतील नावे आणि त्यांच्या कामाचे विषय असे- i) खजिना - कोशागार ii) जवाहिरखाना - रत्ने, दागिने iii) अंबरखाना - धान्यसाठा iv) शर्बतखाना - औषधे v) तोफखाना - तोफा, बंदुका इत्यादि vi) दफ्तरखाना - राज्यविषयक कागदपत्रे vii) जामदारखाना - वस्त्रप्रावरणे ह्यांची व्यवस्था viii) जिरातखाना - शस्त्रे, चिलखत, टोप इत्यादि ix) मुतबकखाना - पाकसाधना, रसोई इत्यादि, x) फीलखाना -हत्ती आणि त्यांचे सामान xi) उष्टारखाना - उंट आणि त्यांचे सामान xii) नगारखाना - नौबत, ढोल, शिंगे इत्यादि xiii) तालिमखाना - मल्लशाळा, xiv) फरासखाना तंबू, राहुटया, जाजमे इत्यादींची व्यवस्था, xv) आबदारखाना - पाणी अन्य पेयांची व्यवस्था xvi) शिकारखाना - पाळीव प्राणी (वाघ, सिंह इत्यादि) xvii) दारू खाना - तोफा-बंदुकांसाठी दारूगोळा xviii) शहदखाना - सफाई खाते.

१२ महाल असे: i) पोते - व्यय, ii) सौदागर - व्यापार उदीम, iii) पालखी, iv) कोठी, v) इमारत, vi) वहिली - रथशाळा, vii) पागा - अश्वदल, viii) सेरी - सुखसोयी, ix) दरुनी - अन्त:पुर, x) थट्टी - गाईम्हशींचा तबेला, xi) टांकसाळ, xii) सबीना - संरक्षक.

ह्या कारखाना आणि महालांपैकी कशाकशाची नोंद राज्यव्यवहारकोशामध्ये घेतली गेली आहे ते आता पाहू.

कारखान्यांपैकी कोशागार (खजिना), रत्नशाला (जवाहिरखाना) आणि वसनागार (जामदारखाना) ह्यांमधील वस्तु आणि तेथील अधिकार्‍यांची नावे ही क्रमाने वर्ग २ - कार्यस्थानवर्ग येथे मिळतात. पाकालय (मुतबकखाना). जलस्थान (आबदारखाना), सुधास्थान (शरबतखाना), पक्षिशाला (शिकारखाना), आस्तरणक (फरासखाना) हे कारखाने वर्ग ३-भोग्यवर्ग येथे आहेत. शस्त्रागार (जिरातखाना), अग्निचूर्णक (दारूखाना) आणि मल्लशाला (तालिमखाना) हे वर्ग ४ - शस्त्रवर्ग येथे आहेत. गजशाला (फीलखाना, ह्यामध्येच मन्दुरा - घोड्यांची पागा ह्या महालाचाहि समावेश केला आहे), रथशाला (वहिलीमहाल), उष्ट्रशाला (शुतुर्खाना म्हणजेच उष्टारखाना), वाद्यशाला (आलंखाना म्हणजेच नगारखाना) इतक्यांचा समावेश वर्ग ५ - चतुरंगवर्ग केला आहे. वर्ग ६ - सामन्तवर्गामध्ये सैनिकांचे प्रकार, अधिकार्‍यांची नावे. सैन्याची हालचाल आणि मुक्काम अशा सैन्याशी संबंधित शब्द आहेत. वर्ग ७ - दुर्गवर्गामध्ये प्रथम दुर्ग-किल्ले ह्यांच्याशी संबंधित परिभाषा दर्शवून त्यानंतर संभारगृह (अंबारखाना) हा कारखाना, इमारत हा महाल आणि अखेरीस मलस्थान (तारतखाना किंवा शहदखाना ह्यांच्याशी संबंधित श्ब्द दर्शविले आहेत. कोशातील सर्वात मोठा वर्ग म्हणजे वर्ग ८ - लेखनवर्ग. ह्यामध्ये लेख्यशाला (दफ्तरखाना) हा कारखाना, व्यय (वेतनादि खर्च) हा महाल आणि त्यानंतर पत्रव्यवहारात, वाटाघाटींमध्ये, राजसभेमध्ये, शिष्टव्यवहारामध्ये, कर्जव्यवहार आणि दोन पक्षांमधील आर्थिक विवादामध्ये वापरायचे अनेक फारसी शब्द आणि त्यांना प्रतिशब्द दिले आहेत. वर्ग ९ - जनपदवर्ग ह्यामध्ये नाना देशविभाग, त्यांचे अधिकारी, जमिनीचे महसूलासाठी प्रकार, महसूलाशी संबंधित शब्द, वजनेमापे, अशा गोष्टी दिसतात. अखेर वर्ग १० - पण्यवर्ग येथे उत्पादनाच्या आणि विक्रीच्या वस्तु आणि ते निर्माण करणारे ह्यांची नावे दिसतात.

(क्रमश:. पुढील भागामध्ये काही रंजक आणि लक्षणीय शब्द.)

आधार:
१) राज्यव्यवहारकोश - सं. का.ना.साने, शिवचरित्र प्रदीप, पृ.१३७ पासून पुढे.
२) Administrative System of the Marathas by Surendranath Sen पृ. ५९-६१

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

सावरकरांनी मराठीला दिलेल्या शब्दांबाबत

सावरकरांनी अनेक नवे शब्द मराठीला दिले.
त्या सर्वांची "अधिकृत" यादी आणि ते सर्व शब्द सावरकरांनी कोणत्या लिखाणातुन ( वर्तमानपत्र / पुस्तक ई.) जगासमोर मांडले त्यांचे अधिकृत स्त्रोत / संदर्भ मिळु शकतील काय?
मोघम संदर्भ नको. एखादे छापील पुस्तक / लेख / वर्तमानपत्र ई. प्रकारचे काही असेल तर चांगले.
आगाऊ धन्यवाद.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

जे एन यु. - ग्राउंड झीरो रिपोर्ट

नवी दिल्लीच्या महरौली-वसंतकुंज भागात वसलेलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात JNU सध्या देशभरात चर्चेचा विषय बनलं आहे. अर्थात ते आधी चर्चेचा विषय नव्हतं अशातला भाग नाही. ह्या वर्षात पहिल्यांदा चर्चेत राहिलं ते केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने उच्चशिक्षणासाठी फेलोशिप बंद केल्याच्या विरोधात “Occupy UGC” ह्या आंदोलनाबद्दल; दुसऱ्यांदा चर्चेत आलं ते हैदराबाद सेन्ट्रल विद्यापीठाच्या रोहीथ वेम्युला आत्महत्या (?) प्रकरणात केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयावर नेलेल्या मोर्चाबद्दल; तिसरा मुद्दा, दि. ९ फेब्रुवारीच्या संध्याकाळी JNU कैम्पसमध्ये झालेल्या देशविरोधी घोषणाबाजीमुळे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

फाळणी आणि ५५ कोटी

भारतीय प्रवृत्ती ईतिहासाचा गमजा करण्याची आणि त्यात अडकुन पडण्याची आहे हे झोबणारं असलं तरी सत्य आहे. मग ते सोन्याचा धुर असो, शिवरायांचा ईतिहास किंवा भारताची फाळणी.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत ज्ञात, अज्ञातांचे योगदान.

शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत विरोध करणारे घरचे व स्वकीय होते. चंद्रराव मोरे, मंबाजी भोसले, बाजी घोरपडे, खंडोजी खोपडे, बजाजी निंबाळकर, गायकवाड, गणोजी शिर्क, सुर्याजी पिसाळ इ.
यातील गणोजी शिर्क हा संभाजी महाराजांचा मेव्हणा होता. वतन न मिळाल्यामुळे नाराज होता, मोगल सरदार संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी दक्षिणेत आला तेव्हा मोगलाला मिळाला. त्याने मोगल सरदाराला संगमेश्वरचा आ़डमार्गातला रस्ता दाखवला जो रस्ता फक्त मराठ्यांनाच माहित होता. मोगलांच्या 5000 सैन्याशी संभाजीच्या 200 सैन्या-चा निभाव लागला नाही. मोगलांनी संभाजी महाराजांना कैद करून नंतर त्यांचा वध केला.
--------------------

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पहिले बाजीराव पेशवे - अपराजित सेनापती

पहिले बाजीराव पेशवे - अपराजित सेनापती

पहिले बाजीराव पेशवे यांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 रोजी झाला. त्यांचे वडिल बाळाजी विश्वनाथ, आई राधाबाई, व भाऊ चिमाजीअप्पा. पेशवे बाळाजी विश्वनाथांच्या मृत्युनंतर केवळ वयाच्या 20 व्या वर्षी शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे, शिक्के व कट्यार बाजीरावांना दिली. हे मराठा साम्राज्याचे चौथे पेशवे होते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - इतिहास