गांधीगौरव

अहिंसा फक्त पुस्तकी शोभते, शांतीसाठी युद्ध होते
सत्य बोलायला झकास, मात्र सिद्ध करायला नाहक त्रास

अस्तेय गुणधर्म म्हणून श्रेष्ठ, पण इतिहासात बळकावणारेच वरिष्ठ
ब्रम्हचर्य सामाजिक प्रतिमेचे ध्यान, प्रत्यक्षात भोगवादी कायदेशीर सज्ञान

अपरिग्रहात असतात मिरवण्याचे छंद, काबीज करायला संपत्तीचा ताळेबंद
श्रमजीवी संघटीत होतात सत्पर, मजबूरीने गुलामगिरीत रमतात तत्पर

आस्वाद समर्थ अनुभुतीचे बळ, गरजेपेक्षा जास्त हव्यासाचे मूळ
निर्भय होणे प्रगतीचे लक्षण, भीती दाखवणे हे सत्तातुरांचे भक्षण

सर्वधर्मसमभाव आदर्शवत प्रमाण, शोषितांचे मात्र धर्मांतर गतिमान
अस्पृश्यता निर्मूलन सलोख्याचे अनुष्ठान, सत्तेसाठी मात्र जातीपातीचे अनुमान

स्वदेशीची स्विकृती करे राष्ट्र आत्मनिर्भर, सरंजामी घराण्यांचे होई चित्त सैरभैर
वर्चस्वासाठी गांधी लागतात, द्वेषासाठी नथुरामाचा पर्याय
आसुसलेल्या सत्तेत राहण्यासाठी, दोघेही जिवंत ठेवणं अपरिहार्य

©भूषण वर्धेकर

२९ जानेवारी २०२२

field_vote: 
0
No votes yet