मी कोण?
का कधी केव्हा कुठे कशाला कोणासाठी...
सगळ्या प्रश्नांना तू पुरून उरलास
भव्यताः भव्यतेपेक्षा मोठी. विस्तारणारत जाणारी. अथांग
झपाटून टाकणा-या चेटुकासारखी.
म्हटलं तर तू नाहीस (तुला काहीच कळत नाही!)
आणि सगळीकडे पसरलेला
तुला मन नाही पण
तू खुबीने इन्स्टॉल केलंस माझ्यात
व लावून दिलीस किती लटांबरं मागे...
कोळ्याच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या माशीसारखा
मी अडकतोय सतत..
लक्षावधी पायांचा किडा मी.
अर्धे पाय जगण्यासाठी उत्सुक
अर्धे मरणाने घाबरलेले.
तू मात्र दगड.
कोणाशीही संबंध नसलेला. निश्चल.
आकाशगंगेला आलेल्या फोडाने
तुला दुखत नाही.
की तार्याला मुलगा झाल्यावर
तू आनंदित होत नाहीस.
मी कोण-
तुझी अर्थहीन सावली?
प्रतिक्रिया
जनुक.
जनुक आणि शरीर यांच्या संबंधावरची ही कविता फार आवडली.
अजून इतर कोणी याचे प्रकट रसग्रहण केले नाही किंवा साधी आवडल्याची पोच दिली नाही याचे आश्चर्य वाटले.
देवाशी चर्चा
देवाशी चर्चा करून मला करणारा तू कोण, आणि तू केलेला मी कोण असा प्रश्न कविता विचारते. बिनमनाचा, निश्चल, दगड ही देवाला दिलेली दूषणं. आकाशगंगेचा फोड आणि ताऱ्याची मुलं या उपमा आवडल्या.
अर्थहीन सावली मात्र एकंदरीत रूपकांमध्ये नीट जुळत नाही असं वाटलं. जिवाला जाळणारे प्रश्न निव्वळ उल्लेखलेले आहेत. 'फक्त तुझी जर दगडी भिवई' ची भव्यता आलेली नाही.
मी कोण?
'मी कोण' ही कल्पना साहित्यात असंख्यवेळा हाताळली गेलेली आहे. याविषयीची रचना खूपच वेगळी (मांडणी किंवा आशय याबाबत) असल्याशिवाय आस्वाद घेणे कठीण झाले आहे. यामुळे या कल्पनेला नव्याने हात घालणार्या प्रतिभावंतांवर नक्कीच अन्याय होतो पण माझ्यासारख्या आस्वादकाला असे वाटते खरे. कमीत कमी, शब्द किंवा इतर साधनांवर काही प्रयोग असल्याशिवाय अशा रचना माझ्यापर्यंत पोचतच नाहीत. यापेक्षा सकारात्मक न होऊ शकल्याबद्दल दिलगीर आहे.
धन्यवाद
सगऴ्यांचे आभार.
राजेश - बिनमनाचा किंवा निश्चल, दगड ही दूषणं नाहीत. तर तो मला तसाच वाटतो. जर देव हा सृष्टीचा निर्माता समजला तर त्यानेच आपल्याला निर्माण केलं आणि आपल्याला मारणार्या किंवा आपल्यावर जगणार्या व्हायरसलाही निर्माण केलं. मग अशावेळी तो कोणाचीच बाजू घेऊ शकत नाही. कारण दोन्ही बाजू त्यानेच निर्माण केलेल्या असतात. असे अनेक गुंते आपण दैनंदिन जीवनात पाहतो. अशावेळेला त्याला बिनमनाचा व्हावे लागते असे मला वाटतं.
देवाला मन नाही व त्याने ते आपल्याला दिलं हा मुद्दा या कवितेतला चर्चेत आला नाही असं मला वाटतं. मेंदू-मन इ. गोष्टी आपल्यात आल्या आणि या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टींची लटांबरं आपल्यामागे लागलीत, अन्यथा वाघ-सिंहालाही सफरचंद झाडावरून पडताना दिसतं. परंतु न्यूटन-माणूस त्याचे अर्थ शोधू पाहतो.
अर्थहीन सावलीमध्ये प्लेटोचा जो आयडियाचा सिद्धांत आहे त्याविषयी म्हणायचे आहे. आपण ओरिजनल आहोत का तर माझ्यामते नाही. आणि या सगळ्या पसार्यामध्ये आपण आणि आपला मेंदू सगळंच शेवटी अर्थहीन आहे असे मला वाटतं.
जास्त बोललो असल्यास चू.भू.द्या.घ्या.
प्रणव
जनुक आणि शरीर
नगरीनिरंजन यांनी मांडलेला जनुक आणि शरीर या अँगलेनेही ही कविता वेगळ्या वाटेने आस्वादता येईल असं वाटतं.
निरंजन आभार. वेगळा दृष्टिकोन तुम्ही दिलात.