ही बातमी वाचली का? ''टोकी मधील भानामतीचा पर्दाफाश - लोकमत 8 नोव्हेंबर 2014
मित्रांनो,
भानामती हा नेहमीच विचित्र व अघटित प्रकार म्हणून अंनिसच्या साठी आव्हानाचा भाग आहे. त्यात दरवेळी यांचा यशस्वीपणे पर्दाफाश केल्याचा दावा केला जातो. पुर्वीपासून असे दावे केले गेले आहेत त्यावर पुस्तके लिहिली गेली आहेत. सत्यशोधनाला आडकाठी नसावी. मात्र ते करताना सत्याऐवजी वैचारिक मते आधी ठरवून त्याला साजेल असे सत्य मांडण्याचा प्रयत्न केला जाऊ नये इतकी माफक अपेक्षा.म्हणून अगदी नुकत्याच घडलेल्या एका केसची बातमी वाचनात आल्यावर वर मला सुचलेले काही विचार, दै लोकमतला वा.प.मधे लिहिले. त्याची कितपत दखल घेतली जाईल कल्पना नाही. शिवाय,
इथे पुर्वी अशाच एका भानामतीच्या घटनांवर चर्चा झाली असल्याने या धाग्याला संपादकीय कात्री लागू नये अशी अपेक्षा. अनेक नवे वाचक आजकाल पाहतो त्यांना पुन्ःप्रत्ययाचा आनद मिळावा व काही विचारांना उजाळा मिळावा म्हणून हे पत्र सादर देत आहे.
पेपर मधील बातमी
'भानामती'मागे सावत्र मुलांचा हात!
8.11.2014 लोकमत.
प्रयोगानंतर अंनिस टीमने गावकऱ्यांशी बोलून सर्व शंकांचे निरसन केले. विनोद जाधव■ लासूर स्टेशन (औरंगाबाद)
घर बंद असताना घाण पडणे, अचानक कपड्यांना आग लागणे हा सर्व प्रकार त्यांचीच सावत्र दोन मुले करायची, अशी माहिती 'लोकमत स्टिंग ऑपरेशन'मधून शुक्रवारी उघड झाली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)च्या सहकार्याने 'लोकमत'ने हे कथित भानामतीचे 'भूत' उतरविले.
गंगापूर तालुक्यातील टोकी गाव एका अनामिक भीतीने काही दिवसांपासून हादरून गेले होते. घर बंद, तरीही घरात घाण येणे, अंगावरील तसेच घरातील कपड्यांनी पेट घेणे, घरातच फटाका फुटणे, अशा घटना घडत असल्याने कथित भानामतीचे भूत गावकर्यां च्या मानगुटीवर बसले होते. सखाहरी शेजवळ यांच्या घरातील या विचित्र प्रकारांमुळे संपूर्ण गाव दीड महिना त्रस्त होते. याबाबतचे वृत्त 'लोकमत'ने ५ नोव्हेंबर रोजी पसिद्ध केले होते. बातमी प्रसिद्ध करून न थांबता 'लोकमत'ने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पथकासह टोकी गावातील शेजवळ यांच्या घरात शुक्रवारी 'स्टिंग ऑपरेशन' करून भानामतीच्या नावाखाली चालणार्याी घटनेचा पर्दाफाश केला.
मांत्रिक म्हणून केली एन्ट्री
अंनिसच्या टीमने शेजवळ यांच्या घरात मांत्रिक म्हणून एन्ट्री केली. त्यांनी सुरुवातीला घरात कलशावर नारळ ठेवून पूजा मांडली. निर्मला सखाहरी शेजवळ यांना पाणी आणण्यास सांगितले. त्यांनी सर्वांना पाणी प्यायला दिले. ग्लासातील शिल्लक पाणी कलशावर ठेवलेल्या नारळावर टाकल्यानंतर नारळाने पेट घेतला. नारळावर सोडियम मेटल टाकलेले होते. (सोडियम मेटल हे नेहमी रॉकेलमध्ये ठेवतात. ते पाण्याच्या संपर्कात आले, की पेट घेते.) हाताच्या बोटांना सॅक्रिन लावले होते. ती बोटे पाण्यात मिसळल्याने पाणी गोड झाले. हेच पाणी सर्वांना पुन्हा प्यायला दिल्यावर त्यांना ते गोड लागले. अंनिसचा हा प्रयोग सर्वांना पटला. हे पाणी गोड लागल्यामुळे तुमच्या समस्येचे निराकरण होणार, असेही त्यांना पटवून देण्यात आले.
पहिला 'मांत्रिक' प्रयोग यशस्वी झाल्यावर एकाला बोलावून अंनिसच्या टीमने इन कॅमेरा चौकशी केली. यातून त्यांच्या नात्याचे दोर बाहेर पडले. सखाहरी शेजवळ यांच्या पहिल्या पत्नी हयात नाहीत. त्यांचीच ही ११ व १२ वर्षीय दोन मुले आहेत. निर्मला ही या मुलांची सावत्र आई. शेजवळ यांच्या घरात घडणार्याी विचित्र घटनांमागे हेच नाते कारणीभूत असल्याचे या स्टिंगदरम्यान उघड झाले. आपल्या आईला घाबरविण्यासाठी आकाश आणि लखन ही मुलेच हा सर्व प्रकार करीत होती. शहाजी भोसले यांनी या दोन्ही मुलांची वडिलांसमोर चौकशी केली तेव्हा हे सारे उघड झाले. या ऑपरेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शहाजी भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. अजित खोसरे, सदस्य गीता कोल्हटकर, सोनालिका नागभिडे, अतुल बडवे, गणेश लोखंडे हे सहभागी झाले होते.
माझे पत्र
पर्दा फाश केल्याचा आव...
वरील बातमी माझ्या वाचनात आली व त्यातील मजकुरावरून अंनिसचा खोटेपणा लक्षात आला. व अंनिचे काम धूमधडाक्यात चालू आहे असा आभास निर्माण करायला लोकमतने यात प्रमुख भूमिका घेतल्याचे साभिनाम उद्धृत केल्याने काही खुलासे आपल्या वार्ताहराकडून अपेक्षित...
1. अंनिस वाले मांत्रिकांचे सोंग घेऊन संबंधितांना गंगापुर तालुक्यातील टोकी खेड्यात घडलेल्या घटनांच्या सत्यतेला जनतेसमोर आणायच्या उद्देशाने ग्रामस्थांना व संबंधितांना भेटले. म्हणजे मांत्रिक बनलेल्या शहाजी भोसल्यांनी सखाहरी व त्यांच्या पत्नी निर्मला शेजवल यांना विश्वासात घेऊन काही नेहमीचेच हातचलाखीचे प्रयोग करून कसे बनवता येते याचे प्रात्यक्षिक दाखवले. व त्यांचा विश्वास संपादला. मात्र ते करताना त्यानी भानामती म्हणून घडणाऱ्या घटना उदा. विष्ठा पडणे, अचानक कप़डे जळणे आदि घटना कशा होतात किंवा त्यांना प्रत्यक्षात करावे लागले तर काय काय हात चलाखी करावी लागते याचे प्रात्यक्षिक वा स्पष्टीकरण सादर करून दाखवले असे बातमीत म्हटलेले नाही.
2. या प्रकरणात त्यांचीच दोन (सावत्र) मुले सामील असल्याचे त्या मुलांना वेगवेगळे बोलावून त्यांच्यावर मानसिक वा शारीरिक दबाव आणून तसे कबूल करायला लावले की हे कृत्य ते करत आहेत... कदाचित ते त्यांनी लेखीही नोंदवले असेल. पण त्याला प्रत्यक्षात काही महत्व नाही. कारण भानामतीच्या केसेसमधे या वयातील मुले माध्यम म्हणून उपयोगात आणली जातात. असा पुर्वानुभ आहे.
3. भानामतीत घडणाऱ्या घटना ह्या ज्या व्यक्तींच्या अवती भवती घडतात म्हणून साहजिक त्यांच्या वर आळ यावा असे भानामती करणाऱ्या शक्तीचा होरा असतो. ते बदनाम होतात. मार वा अन्य यातना व बोलणी ही खायला लागतात. ( जसे 1988च्या सुमारास कराडपासून जवळच्या कडेगावमधे अचानक काही मुलींच्या डोळ्यातून खडे येणाऱ्या घटनेच्या संदर्भात ती भानामती त्या शाळकरी मुलीं करत असा त्यांच्या वर तसा आळ येत असे.)
4. अशी मुले वा माध्यमे आपली बाजू कितीही समजाऊन सांगू लागली तरी ती प्रत्यक्षातील घटनांमुळे मान्य होण्यासारखी नसल्याने प्रथम दर्शनी तेच या मागचे हात वा आरोपी दिसतात. काही वेळा मात्र त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना हे कृत्य ह्या मुली- मुले करत नाहीत अशी खात्री असल्याने अनेकदा त्या मुलांवर मारहाणीचा वा तेच हे करत आहेत याचा ठपका ठेवला जात नाही. (जसे कडेगावच्या केसमधे मुलींचे पालक अंनिस वाल्यांनी या मुलांना अभ्यास वा घरकाम टाळायचा होता म्हणून त्या अशी युक्ती करत होत्या असे दणकून म्हटले तरी मानायला तयार नव्हते. कारण त्यांना त्यांच्या मुला-मुलींच्या वागणुकीचा प्रत्यय दररोज येत होता. तसे गावकऱ्यांनी अंनिसवाल्यांना प्रत्यक्षात म्हटले व नंतर वर्तमान पत्रातून लेखी निवेदन देऊन सिद्ध केले).
5. अशा लहान वयातील मुलांनी काही कारणाने रागावून जाऊन बदला म्हणून आपल्याच घरातील कपड्यांना आगी लावून आईवडिलांच्या विरुद्ध भीती व आतंकी कृत्ये करून घाबरवायसाठी केले होते असे घटकाभर मानले तर घरातील कपडे कसे पेटवायचे, प्राण्याची वा मानवाची विष्ठा आधीच कशी गोळा ठेवायची व ऐन वेळी एकदम प्रकट करायची आदी कृत्यांची पूर्व तयारी त्यांना किती व कशी करावी लागली असेल याचा कोणालाही अंदाज करता येईल. मुलांना कपडे पेटवायचे असतील तर अंनिसनें केलेल्या प्रात्यक्षिकाप्रमाणे कपडे,साड्या, चादरी वा अन्य कापडी सामान सोडियम मेटल मिसळलेल्या रॉकेलमधे आधी बुचकळून ठेवावे लागेल व ऐन वेळी ते पाण्याटाकून किंवा कपड्यांवर पाणी टाकून अचानक जाळ करावा लागेल. आता अंनिसवाल्यांना ते सोडियम मेंटल बाजारात कुठे मिळते, काय किंमत, जर असे महिनाभर करामती घडवायच्या तर किती किलो आणावे याची खूप माहिती असेल. पण या मुलांना ते नाव, त्याचे गुणधर्म, ते कुठे मिळतात व त्याला लागणारा पैसे कसा मिळवता येईल याचा खटाटोप करावा लागेल. सारासार विचार केला तर अशी तयारी करायला त्या मुलांना टोकी खेड्यातून शहरात येऊन माल खरेदी करून परत जाऊन, कसे कसे घडवले त्याचे प्रात्यक्षिक त्या आरोपी मुलांकडून अंनिसने केले असेलच किंवा निदान अंनिसच्या निष्णात मांत्रिकाने तरी अगदी सहजासहजी करून दाखवून आईवडिलांना व अन्य प्रतिष्ठित ग्रामस्थांसमोर करून वाहवाही मिळवली असेलच. मात्र तसे केल्याचा बातमी उल्लेख का नाही हे गूढ आहे. असे मानू या की समजा त्या शाळकरी व्रात्य मुलांना भानामती करायला सुरसुरी आली तर काय तजवीज करावी लागेल ? अंनिस जसे हातचलाखीचे प्रयोग करताना लागणारे सामान आधी खरेदी करून मग सर्व तयारीने भांडाफोड करायला गावात जाते तसे पण उघडपणे न जाता चोरून किंवा गावकऱ्यांच्या नकळत मागवायला किवा त्यांना परगावी जाऊन खरेदी करायला त्या मुलांना लागेल विष्ठेसाठी पायखान्यातील आडजागी चोरून जाऊन पिशवीतून साठवून ठेवावी लागेल. या सामानातील काही पदार्थांचा उग्र वा घाण वास तो पसरवायच्या आधी अशा रितीने बंद करून ठेवला पाहिजे की त्याची अजिबात कुणकुण वा गंध आला नाही पाहिजे. आता वरील मुलांच्या वयोगटाचा विचार करता अशी धमक त्यांच्यात अचानक कशी निर्माण झाली असेल याचा खुलासा अंनिसवाल्यांनी केला असेल. तो काय होता ते बातमीत प्रकर्षाने नमूद केले जायला हवे ते नेमके वाचायला मिळत नाही. म्हणूनही अशी अघोरी कृत्ये या वयोगटातील मुलांकडून घडतील का असे सामान्यतः विचारांती वाटत नाही. आतंकवादी कारवाया करायला प्रवृत्त विदेशी तरुणांना देखील दहशतीची कृत्ये करायला मोठी यंत्रणा मदत करत असते, नव्हे मागे लागून करवून घेते. असे आपल्याला बातम्यातून वाचायला वा पहायला मिळते. इथे मात्र असा आतंकी प्रकार करायला कोणाची मदत नसताना गुपचुप या शाळकरी मुलांना शक्य कसे व्हावे यावर विचार व्हायला पाहिजे. त्या दोन मुलांनी ती कृत्ये केली असे जाहीर करायच्या शिवाय अशी कोणती यंत्रणा त्यांच्या मागे उभी होती याचा कसून तपास लागेपर्यंत या प्रकरणाचा शेवट झाला असे मानले जाऊ नये. असो.
6. एक जागृत वाचक म्हणून या विषयातील सखोल माहिती व स्पष्टीकरण आपल्या प्रतिष्ठित पेपर मधे मोठ्या मथळ्यात सादर जावे ही विनंती केले.
प्रतिक्रिया
माझे दोन पैसे...
माझा स्वतःचा भानामती वगैरेंवर बिलकूल विश्वास नाही, घरामध्ये घर बंद असतांना आपोआप विष्ठा पडणे, कपडे आपोआप पेटणे अशासारख्या 'आपोआप' घटना होणे केवळ अशक्य आहे असे मला वाटते. असे काही खरोखरीच घडले होते ह्याचाच काही पुरावा, पंचनामा आहे काय? का 'लोकमत'ची बातमी हाच पुरावा?
येथे 'लोकमत' खबर्या, तपासणी करणारा आणि निर्णय देणारा अशा तिन्ही भूमिका स्वतःच बजावत आहे असे दिसते
नाहीतर अंनिस आणि लोकमत ह्यांची नसणार्या भुताला गाडण्याची कारवाई ही Don Quixote च्या tilting at the windmills सारखी वाटते. 'अगा जे घडलेचि नाही, तयाची वार्ता पुससी कायि' अशासारखा हा सर्व प्रकार वाटतो.
असल्या 'ट्रिक्स' करून लोकांची अंधश्रद्ध दूर करण्याऐवजी अंनिसने असे वर पहिल्या परिच्छेदात सांगितलेल्या मार्गाने अशा 'गोष्टी' होऊच शकत नाहीत हे दाखवले असते तर धाग्यातल्यासारखे फाटे - लहान मुले असे करू शकतील काय? त्यांच्यापाशी आवश्यक ती साधनसामुग्रीच नाही, त्यांच्यामागे कोणती यंत्रणा आहे हे शोधावे वगैरे - फुटू शकले नसते.
घटना मुळात घडतच नाहीत. असे म्हणावे... प्रश्न मिटला...
नमस्ते सर,
आणखी काहींनी प्रतिसाद दिला तर एकत्र प्रतिक्रिया व्यक्त करता येईल.
एका नजरेत - शशि ओक
.
.
आपल्या प्रतिसादातून
आपल्या प्रतिसादातून अंनिसची बाजू तर पटते / समजते पण धागालेखकाने विचारलेल्या प्रश्नाचे (क्रमांक ५) चे उत्तर मिळत नाही.
मित्रा
धन्यवाद...
एका नजरेत - शशि ओक
"पॅरा नॉर्मल - अनएक्सप्लेन्ड फिऩॉमिनल
मित्रा,
ज्यांनी समाजजीवनातून अंधश्रद्धांचे निर्मूलन व्हावे असा वसा घेतला आहे त्यांच्या लेखी आपल्या सुखीजीवनातील आरामाची जिंदगी महत्वाची नसून, खऱ्या अर्थाने समाजमनाला ढवळून काढायला खचता खायचे आनंदाने स्वीकारले आहे. ते करताना भले आपल्या जिवाला बरे वाईट-झाले तरी त्याची तमा ना बाळगता काम करीन असे म्हणणाऱ्यांच्या कडूनच भानामतीच्या सारख्या पॅरा नॉर्मल घटनातील सत्यता शोधली जाईल. म्हणून हातचलाखीचे प्रयोगकरून पुढे मूळ मुद्याला हात त्यांनी घालावा असे मी लोकमतच्या माध्यमातून सुचवले आहे.
आजच्या झी न्यूजमधे रात्री ८.३० नंतर तासाभराच्या कार्यक्रमात मेरठ कँट मधील एका सूनसान घरात जाऊन "पॅरा नॉर्मलवर काम करणाऱ्या भारतीय संस्थेने विविध आधुनिक उपकरणांच्या मदतीने त्या वास्तूत काहीतरी अॅबनॉर्मल अॅक्टिव्हिटी असल्याचे म्हटले आहे. हा शोध घ्यायला अमेरिकेतील एका तज्ज्ञाला पाचारण करून त्याने ही ते मान्य केल्याचे म्हटले गेले... एका बाजूला या कार्यक्रमातून भूत वगैरे सब झूठ आहे, तसे काही नसते. वगैरे म्हटले जात होते. ( असे कार्यक्रम आधी ही पाहण्यात आले होते त्यानंतर रॅशनॅलिस्टांनी त्यांच्या पॅरा नॉर्मल कामगिरीला खिल्ली उडवून, नाटके करतात लेकाचे, पॅरा नॉर्मल असे काहींनी नवे खूळ काढले आहे असे हिणवल्याचे वाचले व पाहिले होते आपण काही करायचे नाही व इतरांनी काही केले तर त्याला नाके मुरडायची, असे किती दिवस हे बुद्धिवादी करणार... म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असा सल्ला अनेक देतात)
पुर्वीपासून अशा अतार्किक घटनांना आपण सुटसुटीत 'भूत' अशी संज्ञा दिली आहे. त्यात कल्पना, सांगोवांगी, गाव गप्पा, अनेकांच्या मनातील भितीचेी विविध रुपे, चित्रकारांनी व सिनेमावाल्यांनी साकार करून आपापल्या परीने त्यात भर घालत भूत कसे असते किंवा असावे असे तर्क वितर्क करून एक असे भीषण रुप ढोबळ मानाने निर्माण झाले असे म्हटले गेले तर ते अधिक तार्किक नाही काय? अतार्किक घटनांना वा भूत ही संज्ञा दिलेल्याला उद्देशून इंडिया पॅरानार्मल सोसायटीचे तज्ज्ञ त्यांच्या वैज्ञानिक भाषेत अनएक्सप्लेन्ड फिऩॉमिनल म्हणजेच सध्याच्या विज्ञानाला न सुटलेले कोडे आहे असे म्हणत होते. ज्याचे सध्याच्या विज्ञानाला ठामपणे उत्तर देता येत नाही. घोस्ट हंटर संस्थेने अमेरिकेत जे काम करतात ते ही अमेरिकेतून आले होते. आपण कदाचित इथल्या अनेकांनी पाहिले असेल.
माझ्या उल्लेखात काही त्रुटी आढळल्यास त्या जरूर सुचवाव्यात कारण मी हा कार्यक्रम घरच्या अन्य सदस्यांच्या आवडींचा मान राखून पाहिला होता.
आम्हाला सगळे विज्ञान कळले आहे आता माहिती करायसारखे काही उरलेले नाही असा दंभ करून आपण निसर्गाच्या अनेक चमत्कृतींना "असे असू शकत नाही" असे लेबल लाऊन आपली आपण तरफदारी करण्या ऐवजी खरेच काय आहे याचा शोध विनम्रपणे घेत राहावे असे माझ्या आत्तापर्यंतच्या विचारानी वाटते मग ते नाडीभविष्य कथन ही का असेना...
माझ्या विचारांवर प्रा. अद्वयानंद गळतगे यांच्या विज्ञानवादी व सत्यशोधकाच्या वृत्तीचा प्रभाव आहे.सत्य कि तत्व यावर बाजू घ्यायची वेळ आली तर मी सत्याच्या बाजून उभा राहीन. माझ्या तत्वात ते बसत नाही म्हणून मी सत्याला अव्हेरू शकत नाही... असे त्यांचे म्हणणे कोणाही विचारी व्यक्तीला समजण्यासारखे आहे. म्हणून कदाचित बुद्धिवादीलोकांच्या हटवादी भूमिकेला त्यांचा कडाडून विरोध आहे. हे ओघाने आलेच...
एका नजरेत - शशि ओक
सामाजिक स्वास्थ्य सांभाळणे ...
आणि अघोरी उपायांची निरर्थकता यासाठी खटपट करणे.
उद्देश उदात्त आहेत याबाबत दुमत नसावे. पण ते करून दाखवताना ज्या गोष्टी माहिती करुन द्याव्यात असे अपेक्षित असते त्याला बगल दिली जाते आहे असे वाटते म्हणून लेखन केले गेले आहे. 5 क्रमांकाच्या शक्यतांवर अभ्यास व प्रात्यक्षिक करून कोणी का लिहीत नाही...
सध्या तरी तसेच वाटते.
एका नजरेत - शशि ओक
.
.
जास्त काही लिहित नाही. पण
जास्त काही लिहित नाही. पण रा.ज.गोखले यांचे लोकभ्रम आठवले
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
हे स्कॅन करावे असे वाटते.- थोडे अवान्तर
'लोकभ्रम' हे पुस्तक त्याच्या मुख्य विषयामुळे वाचनीय आहेच पण अशा चिकित्सक पुस्तकांतून बरीच तत्कालीन अवान्तर माहितीहि आलेली असते, जिचा कोठेतरी अन्यत्र उपयोग होऊ शकतो. हे पुस्तक छापील स्वरूपात तुमच्याकडे असावे असे वाटते कारण त्याच्या मुखपृष्ठाचा स्कॅन दाखविला आहे.
हे पूर्ण पुस्तक स्कॅन करून त्याची पीडीएफ प्रत करून ती archive.org अशा ठिकाणी चढवावी असे सुचवितो, जेणेकरून सर्वांनाच लाभ होईल आणि एका विस्मृत पुस्तकाचे पुनरुज्जीवन होईल. इतक्या जुन्या पुस्तकाचा प्रताधिकार आता संपलाच असेल. (लेखकाचा मृत्यु + ६० वर्षे.)
(असे काम हल्ली कोणीहि करू शकते असे मला वाटते पण त्यातूनहि काही साहाय्य हवे असल्यास मी ते देऊ शकेन.)
(ह्या सूचनेचा मुख्य धाग्याशी काही संबंध नाही म्हणून तिला 'अवान्तर' असे म्हटले आहे.)
सुंदर सूचना
सर, ज्यांनी ह्या पुस्तकाचा निर्देश केला त्यांनी हे काम अंगिकारले तर अनेक उत्सुक वाचकांची सोय होईल...
एका नजरेत - शशि ओक
मी हे पुस्तक
मी हे पुस्तक https://www.scribd.com/Prakash%20Ghatpande/documents इथे टाकले होते पण आता ते दिसत नाही. त्यांनी गायब केलेले दिसते. अजुन बरेच डॉ़क्युमेंट टाकले होते .ते ही गायब दिसताहेत. archive.org इथे टाकून पाहतो आता.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
पुस्तक आता
पुस्तक आता https://archive.org/details/Lokbhram इथे वाचता येईल.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
एक reservation
Paranormal phenomena आणि paranormal forces असतात किंवा नसतात ह्यबद्दल आज कोणीच खात्रीपूर्वक काही सांगू शकत नाही. असे म्हणतांना मी शक्यतेचे एक छोटे दार उघडे ठेवू इच्छितो.
विज्ञानाला एका विशिष्ट वेळी ज्या गोष्टी ठाऊक नसतात त्या काही काळानंतर अगदी सवयीच्या होऊन जातात. भिंतीवरचे बटन दाबले की छतावरचा दिवा पेटेल का असे १८व्या शतकापर्यंत कोणाहि शास्त्रज्ञाला विचारले असते तर त्याने छातीठोकपणॅ 'नाही' असेच उत्तर दिले असते पण नंतरच्या काळात विजेचा शोध लागला आणि असा दिवा पेटणे शक्य झाले. ही शक्ति त्या शास्त्रज्ञाला कल्पनाच करता येणार नाही अशा प्रकारची होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत एक जगाच्या एका टोकाला घडत असलेली घटना त्याच वेळी दुसर्या टोकावरील लोकांना दाखविता येईल हे अशक्य कोटीतील मानले गेले असते कारण हे कसे करता येईल हेच कोणाला सुचले नसते.
Paranormal phenomena आणि paranormal forces विषयी असेच म्हणता यावे.
असे धेडगुजरी नका करू...
सर,
असे धेडगुजरी नका करू. एक तर दरवाजा घट्ट बंद करा किंवा सताड उघडा ठेवा.
बंद मनाची कवाडे आपल्यासारख्या विचारकाची कोंडी करतील. म्हणून तो सताड उघडा ठेवणे प्रगल्भ वैचारिकतेचे द्योतक आहे हे आपण जाणता म्हणून ही विनंती...
एका नजरेत - शशि ओक
असे धेडगुजरी नका करू. एक तर
म्हणजे एकतर तर्ककर्कश नास्तिक व्हा किंवा अंधश्रद्धाळू अस्तिक व्हा असा काहीसा टोन वाटतो. खरा शास्त्रज्ञ नकारज्ञ नसतो ही भूमिका धेडगुजरी वाटते असे दिसते. फक्त कृष्णधवल द्वैतात जगाची मांडणी करायची. पाप किंवा पुण्य, राम किंवा रावण,चांगल किंवा वाईट, देव किंवा राक्षस,मित्र किंवा शत्रू अशा मालिकेत. विविध कोनातून बहुरंगी आकलन करण्याची दृष्टी म्हणा क्षमता म्हणा इच्छा म्हणा बहुसंख्य लोकांकडे नसते त्यामुळे मिडिया लोकांना आपल्या मर्जीनुसार हाकत असते. असो...
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
धन्यवाद
ज्यांना उद्देश्यून म्हटले त्यांना ठरवू द्या. आपला मजकूर त्यांनी वाचला असेल अशी अपेक्षा करतो.
एका नजरेत - शशि ओक
ज्यांना उद्देश्यून म्हटले
म्हणजे इतरांनी प्रतिक्रिया देउच नये असे आपल्याला म्हणायचे आहे काय?
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
मुळीच नाही!
मुळीच नाही!
एका नजरेत - शशि ओक
खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो
अन्य एके ठिकाणी आपण या घोषवाक्याचा अर्थ समजावून दिलेला वाचला.
मलाही वरील विचार मान्य. या धाग्याच्या संदर्भात अरविंद कोल्हटकरांनी सर्व शक्यतांचा विचार करावा यासाठी दार किलकिले करून नाही तर सताड ठेवून पहावे असे सुचवले आहे. वैचारिक किलकिल्या दरवाज्याने सर्व बाजूंचा विचार कारयला आडकाठी होऊ नये म्हणून तशी विनम्र विनंती होती. त्यात तरी प्रत्यावाद नसावा.
एका नजरेत - शशि ओक
हे असले प्रकार कुठल्यातरी
हे असले प्रकार कुठल्यातरी अघोरी, अधिभौतिक शक्तींमूळे घडतात, असे मानणारे आणि या प्रकारां मागे काही शास्त्रीय, सामाजिक अथवा मनोवैज्ञानिक कारणे असू शकतात, जी आपल्याला ज्ञात नाहीत ---- हे नाकारणारे लोक आहेत, त्यांचेच खरं तर निर्मूलन होणे गरजेचे आहे.
विज्ञानगंगेचा प्रवाह अडाविणारे हे तर झारीतले शुक्राचार्यच .
बर्याच वेळा असले प्रकार हे वैयक्तीक द्वेषातून अथवा दूसर्याला आपल्या अधीन करून , त्यांच्यावर वर्चस्व गाजविण्यासाठी केले जातात. सामान्यतः अडाणी, अंधश्रद्धाळू किंवा परिस्थितीने गांजलेले लोकं अशा प्रकारांना बळी पडतात.
श्री दाभोळ्करांची एक मुलाखत पाहिलेली/ ऐकलेली आठवते. त्यात त्यांनी सांगीतले होते, अशा प्रकारांना बळी पडणा-या लोकांबरोबर सहानुभूतीने वागले पाहिजे. कारण ते लोक अपराधी नसतात, तर कमकुवत असतात.
पण अशा प्रकारांचा हिरीरीने प्रचार आणि प्रसार करणा-यांवर मात्रं कठोर कारवाई करायलाच पाहिजे.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
मित्रांनो, बुद्धीला पटत नाही
मित्रांनो,
बुद्धीला पटत नाही म्हणून किंवा मनाला यातना देते म्हणून एकादी घटना घडते हे बुद्धिवाद्यांना मान्यच होत नाही. ती घडावी ही गोष्टच त्यांना आवडत नाही आणि जी गोष्ट आवडत नाही ती घडतच नाही असे काही लोक मानतात. अशा शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाविषयी काय बोलावे? अशा पद्द्धतीने काम करायला बुद्धिवाद्यांना आवडत असले तरी खऱ्या शास्त्रज्ञांनी तसे करणे विज्ञानवृत्तीशी प्रतारणा ठरेल. कारण बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी स्वीकारणे हे विज्ञानाचे पहिले कर्तव्य असल्याचे विज्ञानाच्या जन्माचा इतिहासच सांगतो.
बऱ्याच तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे अतींद्रिय विषयक धोरण आडमुठेपणाचे आहे... एक जीव शास्त्रज्ञ म्हणतात, "अतींद्रीय शक्ती खरी असली तरी शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन ती दडपून टाकली पाहिजे. किंवा ती सर्वांपासून लपवून ठेवली पाहिजे. कारण निसर्गाच्या एकवाक्यतेला (युनिफॉर्मिटी ऑफ नेचर)त्यामुळे बाधा येते व विज्ञानाचे कार्य चालणे अशक्य होते." संकलित उद्धरणे प्रा गळतगे यांच्या लेखनातून...
आता सांगा अशा बुद्धिवादी शास्त्रज्ञांच्या विचारांचा
कि नाही ...
एका नजरेत - शशि ओक
विज्ञानगंगेचा प्रवाह
सुंदर प्रतिसाद!
लेखकाची मुद्दा, डिटेल्स
लेखकाची मुद्दा, डिटेल्स मांडायची पद्धत आवडली आहे.
१. निसर्गातल्या काही गोष्टींचे स्पष्टीकरण अजून शेष असेल.
२. कोणाची हातचलाखी असेल.
३. घटनाच झालेली नसताना मानसिक भास होत असू शकतात.
४. घटनांचे स्पष्टीकरण असलेल्या शास्त्रीय ज्ञानातून संभव असेल. फक्त तज्ञ तेथे नसतील अंनिसमधे, लोकांमधे. घटनेचे अधिक चौकशी करण्यासाठी स्रोत नसतील.
५. अन्य काही.
आता हे काही का असेना, अंनिसची भूमिका समाजसुधारणेची आहे. अंततः लोकांना "सगळे" (अंनिसची एंट्री स्टाईल, कॄती धरून धरून) कळलेच असेल. मग लेखकाचा अंनिसवर टिका करण्याचा सूर का आहे? ग्रामीण भागातील लोकांची भानामतीवरची श्रद्धा जाणे गरजेचे आहे. लेखकाला अन्य काही सजेस्ट करायचे आहे का? अशा छोट्या केसेसमधे अनिंसने फार उर्जा का खर्चावी? असा कोणता "ओपन चॅलेंज" असेल तर अनिंस (+ शास्त्रज्ञ + डीडेक्टीव्स) भानामती प्रत्येक्ष करून दाखवू शकणारांचे संपूर्ण "समाधान" करू शकतात यात दुमत नसावे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सत्य शोधकाला हयगय करून चालणार नाही...
मित्रा,
खरे आहे. अशा फुटकळ घटनांचा एकत्रितपणे शोध घेऊन त्यावर तज्ज्ञांची कमिटी नेमून हा विषय हातावेगळा केला तर त्याला सार्वजनिकही मान्यता मिळेल असे वाटून असा प्रयत्न एच. नरसिहैया कमिटीने केला होता. पण त्यांना शोधायला सांगितले गेलेल्या कार्याकडे आधीच निकाल ठरवून समोऱ्या आलेल्या घटनांची ओढाताण करून त्यांचे हवे तसे अर्थ लावून निष्कर्ष काढले गेले असा प्रा. अद्वयानंद गळतगे यांनी त्यावर दिला गेलेल्या रिपोर्टचा सखोल अभ्यास करून आपले विचार मांडले व्यक्त केले आहेत. त्याला २ वर्षापुर्वी एका धाग्यातून सादर केले होते ते इथे समर्पक वाटतात म्हणून डकवत आहे.
"कर्नाटक सरकारचा भानामतीचा ‘बुद्धिवादी शोध’
केस कितीही छोटी किंवा आडगावातील असली तरी अंनिसने त्यात हयगय करून चालणार नाही कारण तो त्यांनी घेतलेला वसा आहे. अशा छोट्या छोट्या केसेमधेच अंनिसच्या खरेपणाची व सत्यशोधनाची कसोटी लागते असे वाटते.
लेखकाचा सूर टीकेचा का? याचे कारण अंनिसने निष्कर्ष आधी ठरवून तशा पद्धतीने केसेस हाताळायच्या पद्धतीमुळे.अतींद्रीय शक्ती मुळात अस्तित्वातच नाही असे अगोदरच गृहीत धरण्याचा विज्ञानवृत्तीला न शोभणारा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन स्वीकारून घटनांचा चुकीचा अर्थ लावून अभिनिवेशयुक्त प्रचार करायची वृत्ती.
एका नजरेत - शशि ओक
अतींद्रीय शक्ती मुळात
यात काही अवैज्ञानिक किंवा विज्ञानवृत्तीला न शोभणारं आहे असं मलातरी वाटत नाही.
अमेरिकेला, विज्ञानातला पहिला नोबेल पुरस्कार मिळाला तो मायकलसन-मोर्ले प्रयोगासाठी. त्या प्रयोगासाठी, सगळं जग जे मानतं तेच मानून प्रयोग सुरू केला. प्रयोगाच्या शेवटी आपलं गृहितक चूक होतं हे समजल्यावर संपूर्ण विज्ञान बदललं. आज बहुसंख्य लोक अतिंद्रीय शक्तींचं अस्तित्त्व मानत नाहीत म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन तसा ठेवण्यात 'विज्ञानवृत्तीला न शोभणारं' काही नाही. खरोखर प्रयोगान्ती वेगळे निष्कर्ष मिळाले तर ते बदलण्याची तयारी ठेवणं विज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.
---
प्रश्न क्रमांक पाचमध्ये बरीच गृहितकं आहेत. उदा: या सगळ्या गोष्टी रोज, महिनाभर, सतत होत होत्या. बातमीत असा काही उल्लेख नाही. एकदा कधीतरी असे प्रकार 'मॅनेज' करणं ११-१२ वर्षांच्या मुलांना सहज शक्य आहे. त्यातून त्या मुलांना आजूबाजूच्या इतर लोकांची मदत मिळत नसेलच असंही सांगता येत नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
निष्पक्ष पत्रकारिता हवी...
शोध पत्रकारितेनी त्या घटनांचा संबंध व स्पष्टीकरण मिळायला हवे. त्याच्याकडे फक्त अंनिसची बाजू घेऊन न पाहता सत्यता शोधायला हवी अशी अपेक्षा वा प मधे अपेक्षित आहे.
एका नजरेत - शशि ओक
पत्रकार निष्पक्ष असले पाहिजेत
पत्रकार निष्पक्ष असले पाहिजेत हे मान्यच आहे.
पण त्याचा अंनिसच्या वैज्ञानिक असण्या-नसण्याशी काही संबंध नसावा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
निष्पक्ष
पत्रकाराने कुठल्याही विचारधारेला बांधून घेऊन शोधपत्रकारिता करून नये. बातमीत अंनिसवाल्यांच्या कामगिरीतून झालेला परदा फाश त्यांनी जसा बातमीबद्ध केला तसा अंनिसच्या विना या प्रकरणाचा छडा लावावा. तरच त्याला खरी पत्रकारिता म्हणायला हवी. अंनिसची वैचारिक बैठक वैज्ञानिक आहे हा तर त्यांचा दावा आहे. पण तो दावा *खऱ्या शास्त्रज्ञाच्या इमानाशी प्रामाणिक आहे काय हा प्रश्न इतरांनी ठरवायचा आहे.
*संदर्भ - "अन्य प्रतिसादातून मिळालेले खऱ्या शास्त्रज्ञाचे वर्णन"
एका नजरेत - शशि ओक
प्रश्न क्रमांक पाचमध्ये बरीच
प्रश्न क्रमांक पाचमध्ये बरीच गृहितकं आहेत. उदा: या सगळ्या गोष्टी रोज, महिनाभर, सतत होत होत्या. बातमीत असा काही उल्लेख नाही. एकदा कधीतरी असे प्रकार 'मॅनेज' करणं ११-१२ वर्षांच्या मुलांना सहज शक्य आहे. त्यातून त्या मुलांना आजूबाजूच्या इतर लोकांची मदत मिळत नसेलच असंही सांगता येत नाही.
+१
---- म्हणजे पकडले गेले तरी 'मुलांचा खोडसाळ पणा ' या नावाखाली सारा प्रकार दडपता येतो आणि स्वतःला नामानिराळे ठेवून परिणामांची जबाबदारी झटकून टाकता येते.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
हेच तर शोधायला हवे ना...
भानामतीचा प्रादुर्भाव महिना - दीड महिना होता, असे असेल तर त्यात वर्णिलेले प्रकार एकदाच झाले कि वारंवार ? या खेळीत आणखी कोणी साथिदार सामिल होते का? किळसवाणा प्रकार अगदी एकदा जरी घडला असेल असे मानले तरी तो संबंधित मुलांच्या करवी पु्न्हा गावकऱ्यांच्या समक्ष करवून घ्यायला हवा ना? त्याला शोधायचे काम अंनिसच्या टीमने केले असेल तर त्याचा रिपोर्ट लोकमतच्या प्रतिनिधीने पेपरातून द्यायला हवा. तसा आपल्या वाचनात आला असेल तर सांगावा. नसेल तर त्यांनी तो करायला हवा हे आपणास निदान मान्य व्हावे. अंनिसच्या बिझी लिस्ट वर ही किरकोळ बाब म्हणून असेल पण जनहिताच्या जागरूकतेसाठी तत्पर लोकमत सारख्या प्रतिष्ठित पेपरने याची दखल घ्यावी असे वाटते.
एका नजरेत - शशि ओक
छापील वृत्तपत्रामध्ये
छापील वृत्तपत्रामध्ये कोणत्याही बातमीसाठी मर्यादित जागा उपलब्ध असते. त्यात त्यांना या बातमीसाठी योग्य वाटली तेवढी बातमी त्यांनी छापली.
इंटरनेट अजून खेडोपाडी कितपत पोहोचलं असेल याबद्दल शंका आहे; पण गावोगावी, घरोघरी फोन असतात. 'लोकमत'कडून अंनिसच्या संबंधित कार्यकर्त्यांचे फोन नंबर किंवा अन्य माहिती मिळवून, किंवा अंनिसच्या कार्यालयात, कार्यकर्त्यांकडे चौकशी करून, त्या लोकांना गाठून तपशील काय ते मागवता येतील. इथे (ऐसी अक्षरे किंवा अन्य संबंधित नसणारं कोणतंही संस्थळ, ब्लॉग, इ.) असणाऱ्या लोकांना या प्रकाराबद्दल मुळातच काही माहिती नसताना "त्यात वर्णिलेले प्रकार एकदाच झाले कि वारंवार?, साथीदार होते का? ठराविक गोष्ट का केली नाही?" असे प्रश्न विचारण्यात काय हशील आहे? (ज्या लोकांना माहिती नाही त्यांना प्रश्न विचारून माहिती मिळेल, काहीतरी घडेल, हे मानणं ही अंधश्रद्धाच नव्हे काय?)
अपूर्ण माहिती देणारी बातमी छापावी का आणि या घटनेतली भानामती खरी का खोटी हे दोन प्रश्न फारच वेगळे आहेत. ते एकत्र करून दोन्हींचं महत्त्व पातळ होतंय.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
वरी धाग्यातील विचार
पुन्हा टाकला गेलेला प्रतिसाद
एका नजरेत - शशि ओक
वरी धाग्यातील विचार
लोकमतसाठी लिहून पाठवल्या पत्रातील होते ते इथे वाचनार्थ सादर केले आहेत. त्या अनुषंगाने चाललेल्या टिपण्यातून ही विचारणा पुढे जात आहे.कदाचित लोकमतशी संपर्कात असलेले कोणी सदस्य इथे असतील तर न जाणो ते पुढाकार घेतील.
शिवाय पेपरमधील अपुऱ्या जागेमुळे जर ती बातमी छाटली गेली असेल तर आपण सुचवल्याप्रमाणे विविध मार्गाने त्या बातमीतील घटनेचा अन् कथनांचा सखोल शोध ही लागला तर फार उत्तम...
एका नजरेत - शशि ओक
अनिंसवरची टिका तरीही अयोग्य
शशिकांतजी, क्षणभर आपण असे मानू कि अतींद्रीय शक्ती अस्तित्वातच नाहीत असे नाही.
म्हणजे -
१. आजही काही निसर्गातली काही तत्त्वे मानवी इंद्रियांसाठी टेक्निकली "अति" आहेत. उदा. २० केएचझेडच्या पलिकडचा आवाज.
२. यंत्रांनी मानवाला यातल्या काही अतिंद्रीय बाबींचा उलगडा झाला असला तरी अन्य सजीवांना त्यांचा थांगपत्ता नाही. तद्वत मानवाची उत्क्रांतीच थोडी कमी झालेली असू शकते आणि त्याला निसर्गातली सर्व सत्ये "कशाही प्रकारे" कळणारच नाहीत असाही प्रकार माणसाच्या मूळ डिझाईनमधेच असू शकतो. असे सिद्ध झालेले नाही पण बेनेफिट ओफ डाऊट घेऊन असे मानू.
अनिंसने यापैकी काहीही "नसतेच" असे म्हटलेले नाही. मग त्यांच्यावर ते असे काही म्हणत आहेत असे गृहित धरून टिका का करावी? उपलब्ध स्रोतांनी उपलब्ध वेळात त्यांना एक स्ट्रॅटेजी वापरून एक केस हाताळली. तुमची त्यांच्या पद्धतीवरच्या छोट्याश्या अंगावरची टिका ग्राह्य असू शकते. पण तुम्ही म्हटलेले (मी काय कोट केलं आहे ते) अनिंसने म्हटलंच नाही.
म्हणून या केस मधे -
१. विज्ञानवृत्तीला न शोभणारा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन (अगदी अतींद्रीय शक्ती मुळात अस्तित्वातच नाही, हे देखिल एका विशिष्ट वैज्ञानिक अर्थाने धरून्)अनिंसचा आहे असे म्हणता येतच नाही.
२. "घटनांचा चुकीचा अर्थ लावून" हे म्हणणे तर अति (सामान्य अति, अतींद्रीयवाले अति नाही) झाले. "चूकीचा अर्थ" म्हणण्यासारखे अतिंद्रीय स्पष्टीकरच लागेल असे या केसमधे आजघडीला तरी काहीच आढळले नाही.
अर्थातच पुरोगाम्यांचा देव, धर्म, निसर्ग, त्यांची सम्यकता एकत्र गुंडाळण्याचा "अभिनिवेश" नेहमीच चीड आणणारा राहिला आहे. परंतु, इथे या केस मधे त्याचा संबंध येत नाही. "शुद्ध सेंद्रीय असे" या केसमधे काय काय झालेले असू शकते यावर महाभारता एवढी केस स्टडी लिहिता येईल.
अनिंस जनरली खूप तळागाळातले असे सत्कार्य करते, समाजसुधारणा करते. आपल्या बंदुका त्यांच्यावर रोखलेल्या नसाव्यात. टिका करायला मानवी मूल्यांची माती करायला निघालेले टुकार पुरोगामी ढिगानी पडलेले आहेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मित्रा, <अनिंसने ("अतींद्रीय
मित्रा,
एका नजरेत - शशि ओक
ज्ञातव्य
शशिकांतजी, अनिंस जर सर्वार्थाने
असे मानत असेल तर मी तुमच्या बाजूने आहे. पण अशी केस असायचे कारण नाही. प्रत्येक फोरम मधे केलेले प्रत्येक विधान हे एका संदर्भासकट येते. ब्रह्मांडातली सारी सत्ये मनुष्य स्वतःच्या इंद्रीयांनी थेट समजून घेऊ शकतो, वा मानवी यंत्रांनी ब्रह्म्मांडातली सारी सत्ये, त्यांचे अस्तित्व निदर्शित करणारे संकेत वा सिग्नल्स मानव स्वतःला कळून घेऊ शकतोच असे अनिंसला म्हणायचे असेल तर त्यांच्यासारखे मूर्ख तेच. पण त्यांना असे म्हणायचे नसते. सामान्य समाजासमोर अनिंस जाते तेव्हा सामान्य समाज ज्या घटनांना मानवी हॉरायझॉनच्या बाहेर समजत आहे त्या घटना मूळात मानवाने आजपावतो ब्रह्मांडाचा जो वैज्ञानिक इतिहास व नियम लिहिले आहेत त्यांच्याआधारे चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केल्या जाऊ शकतात असेच त्यांना म्हणायचे असते. अन्यथा ब्रह्मांडात मानवी बुद्धी सुप्रीम आहे असा त्याचा अर्थ होईल आणि असे मानायला काही आधार नाही. मानवापेक्षा प्रचंड इवोल्व झालेल्या स्पेसिसला कळलेले एक अवघड सत्य मानवाला त्यांनी चमच्याने पाजवले तरी ते मानवाला थोडेही कळणार नाही असेही असू शकते. आहे कि नाही याची आज कल्प्ना नाही. पण या विषयाचा आणि अनिंसचा तितका संबंध नाही. सामान्य भाषेत याला "अतींद्रीय असे काहीच नाही" असेच म्हणतात कारण या भाषा इतके काँप्लेक्स कंसेप्ट सांगायला जास्त वापरल्या जात नाही म्हणून नेहमीचे शब्द वापरले जातात. भाषेचे दौर्बल्य!!!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
काय हल्ली नाडी पट्ट्या बंद का
काय हल्ली नाडी पट्ट्या बंद का काय?
-थत्तो थत्थत्तो
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हे लेखन करायची सुरसुरी
जवळजवळ पाच वर्षांनी हा धागा उघडला तेव्हा यावर 5 हजारांवर क्लिक्सपाहून आठवले की एके दिवशी मी केशकर्तनालयात आपली पाळी यायच्यासाठी वाट पहात बसलेलो असताना सहज तिथे पडलेला जुना लोकमतचा अंक पाहाण्यात आला. एकव्ही मी कधी लोकमतचा वाचक नव्हतो. ते पान नंतर मला मोफत घेउन जायला परवानगी मिळाली व हे लेखन करायची सुरसुरी आली. ते आठवून गंमत म्हणून धागा उपसला.
यावर सध्या पुन्हा लिहायचा मूड नाही.
एका नजरेत - शशि ओक
अंनिसचा तो जीवन मरणाचा प्रश्न आहे... हे मोटीव्ह ...
अंनिसचा तो जीवन मरणाचा प्रश्न आहे... हे मोटीव्ह ...
एका नजरेत - शशि ओक
मी त्या मूळ प्रतिवादाबद्दल
मी त्या मूळ प्रतिवादाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तो प्रतिवाद मी मागे घेतो. मी तो हटवला आहे.
कृपया साद प्रतिसाद झाल्यानंतरही तोच मुद्दा पुन्हा पुन्हा अधोरेखित न केल्यास मी अत्यंत आभारी असेन. ही मनापासून विनंती आहे.
याठिकाणी स्पष्ट करु इच्छितो की
याठिकाणी स्पष्ट करु इच्छितो की अं. नि. स. किंवा अन्य संस्थांना कोणतेही समर्थन तर नाहीच, पण त्यांचा एखादा कार्यक्रमही कधी जाऊन पाहण्याची इच्छा झालेली नाही. बातम्यांखेरीज त्यांच्याविषयी काही माहिती नाही.
उलट कोणाच्याही श्रद्धा अथवा इव्हन अंधश्रद्धा याला इतर कोणी विरोध करण्याची अजिबात आवश्यकता नाही असंच मत आहे.
ज्यांना काही थेट नुकसान नाही त्यांनी तिसऱ्या कोणाच्या वैयक्तिक श्रद्धा आणि विधी यांविषयी सल्ला, निवाडा करू नये हे पूर्वीपासून मत आहे.
येथील मुद्दा कोणालाही सपोर्ट अथवा विरोध म्हणून नव्हता. त्यामुळे निष्कारण पुनरावृत्ती टाळण्यासाठी तो मागे घेत आहे.
.
.
एका नजरेत - शशि ओक