पाणी, जड पाणी आणि मंतरलेले पाणी - उत्तरार्ध
पाणी, जड पाणी आणि मंतरलेले पाणी - पूर्वार्ध
अप्सरा ही भारतातली पहिली अणुभट्टी सुरू झाली तेंव्हा मी शाळेत शिकत होतो. या रिसर्च रिअॅक्टरचे नामकरण खुद्द स्व.पं.जवाहरलाल नेहरू यांनी त्याच्या उद्घाटनाच्या वेळी केले होते. या घटनेला त्या काळात चांगली प्रसिद्धी मिळाली होती. ही एक आगळ्याच स्वरूपाची भट्टी आहे. यात मध्यम आकाराच्या जलतरणतलावासारख्या (स्विमिंग पूल) एका टाकीमध्ये अत्यंत स्वच्छ आणि शुद्ध पाणी भरून ठेवलेले आहे आणि त्या पाण्याच्या तळाशी समृद्ध युरेनियम (एन्रिच्ड युरेनियम) हे इंधन ठेवलेले असते. न्यूक्लियर रिअॅक्शन चालली असतांना या इंधनामधून ऊष्णता बाहेर पडते. जळत्या लाकडावर पाणी टाकले की ती आग विझते, पण इथे पाण्यात बुडवून ठेवलेले इंधन त्याच्या अस्तित्वामुळे तापते. आजूबाजूचे पाणी ती ऊष्णता आणि त्यासोबत निघालेले रेडिएशन शोषून घेते आणि त्यामुळे तलावाबाहेरची किंवा त्याच्या काठावरची जागा माणसांना काम करण्यासाठी सुरक्षित राहते. पाण्याच्या तळाशी भट्टी असणे हा प्रकार विसंगत वाटत असला तरी आश्चर्यकारक नाही. माझ्या लहानपणी घराच्या भिंतींना लावायचा चुना घरीच कालवत असत. चुनाभट्टीमधून भाजून आणलेली चुनखडी डब्यातल्या पाण्यात टाकताच त्यातून स्स्स्स असा आवाज येत असे आणि गरम वाफा निघत असत. बीकरमधल्या थंडगार पाण्यामध्ये सोडियम धातूचा लहानसा खडा टाकताच तो उकळत्या तेलात टाकलेल्या भज्यासारखा कसा तडफडतो हे शाळेतल्या प्रयोगशाळेत एकदा दाखवले होते. समुद्राच्या पोटात एक वडवानल नावाचा अग्नि असतो असे वाचले होते. यामुळे अग्नि आणि पाणी यांचे नेहमीच हाडवैर नसते याचा थोडा अंदाज होता.
भारतातली दुसरी प्रायोगिक अणुभट्टी (रिसर्च रिअॅक्टर) कॅनडाच्या सहकार्याने उभारली गेली. त्यात 'जड पाणी' हे मंदलक (मॉडरेटर) आणि नैसर्गिक युरेनियम इंधन यांचे काँबिनेशन आहे. मी जेंव्हा या रिअॅक्टरची माहिती वर्तमानपत्रांमध्ये वाचली तेंव्हा मला या गोष्टीचे थोडेसे नवल वाटले होते. 'जड पाणी' (हार्ड वॉटर) पचायला जड, त्यात डाळी शिजत नाहीत यामुळे ते स्वयंपाकासाठी बाद, त्यात साबणाचा फेसच होत नसल्यामुळे कपडे धुवून स्वच्छ निघत नाहीत, त्यात आंघोळ केली तर शरीराला खाज सुटायची शक्यता, झाडांना दिले तर त्यांचीही नीट वाढ होत नाही वगैरे त्याच्यासंबंधी फक्त तक्रारीच ऐकल्या आणि वाचल्या होत्या. असे हे सगळ्याच दृष्टीने दुर्गुणी आणि कुचकामाचे वाटणारे पाणी रिअॅक्टरसाठी कशामुळे उपयोगी पडत असेल हे समजत नव्हते. "परमेश्वराने निर्माण केलेली कुठलीही वस्तू पूर्णपणे निरुपयोगी नसते, प्रत्येक वस्तूचा किंवा जीवाचा काही ना काही उपयोग असतोच." असे तात्पर्य असलेल्या काही बोधकथा वाचल्या होत्या त्यांची आठवण झाली. भारतात उभारल्या गेलेल्या त्या रिअॅक्टरसाठी लागणारे जड पाणी त्या काळात कॅनडामधून आयात केले होते ही आणखी एक बुचकळ्यात टाकणारी बाब होती. एवढ्या मोठ्या भारत देशात दोन चार टँकर 'जड पाणी' मिळाले नसते का? ते कॅनडामधून आणण्याची काय गरज होती? असे त्या वेळी वाटले होते.
पुढे अणुशक्तीखात्यात नोकरीला लागल्यानंतर 'जड पाणी' (हेवी वॉटर) या शब्दाचा खरा अर्थ समजला. हे जड पाणी कॅनडातल्या कुठल्याही विहिरीत किंवा तळ्यातदेखील मिळत नाही. जगात कुठेच जड पाण्याचा वेगळा साठा उपलब्ध नाही. पण हे खास प्रकारचे पाणी साध्या पाण्यामध्येच सूक्ष्म प्रमाणात अस्तित्वात असते. हैड्रोजन या मूलद्रव्याचे दोन अणू आणि ऑक्सीजनचा एक अणू यांच्या संयोगातून पाणी तयार होते. पृथ्वीच्या पाठीवरील कोणताही समुद्र, नदी, तलाव किंवा विहिरीमधल्या पाण्य़ात हेच अणू आणि याच प्रमाणात असतात, त्यामुळे इथून तिथून सगळे पाणी एकसारखे असते. चंद्रावर किंवा मंगळावर सापडलेल्या पाण्याचे पृथक्करण केले तर त्यातही हेच दिसेल. किंबहुना त्या ठिकाणी हे अणू आढळले म्हणून ''तिथे पाणी सापडले'' असे सांगितले जाते. पहायला जाता कोठल्याही मूलद्रव्याचे सगळे अणू एकसारखेच असतात, त्या प्रमाणे हैड्रोजनचेसुद्धा असतात, पण दर ६४२० हैड्रोजन अणूंमधला एक अणू जाड्या असतो, त्याला 'ड्युटेरियम' म्हणतात. मूलद्रव्यांच्या अशा भिन्न रूपांना 'आयसोटोप' म्हणतात. हैड्रोजनच्या इतर अणूंमध्ये एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन असतो, त्याच्या या जुळ्या भावंडाकडे प्रोटॉनच्या सोबतीला एक न्यूट्रॉनसुद्धा असतो. यामुळे त्याचे वजन इतर अणूंच्या मानाने दुप्पट असते. अशा ड्युटेरियमचे दोन अणू आणि ऑक्सीजनचा एक अणू यांच्या संयोगातून जड पाणी तयार होते. ते सगळीकडे मिळणार्या साध्या पाण्यात सूक्ष्म प्रमाणात असते. आपल्या घरातल्या बादलीभर पाण्यात काही थेंब जड पाणी असते, पण ते थेंब वेगळे नसतात, बादलीमध्ये सगळीकडे पसरलेले असतात. बादलीतले एक थेंबभर पाणी काढून घेतले तर त्यातलासुद्धा सूक्ष्म भाग जड पाण्याचा असतो. 'जड पाण्या'चा हा अर्थ 'हार्ड वॉटर'पेक्षा खूप वेगळा आहे. हे जड पाणी साध्या पाण्यामधून महत्प्रयासाने बाहेर काढावे लागत असल्यामुळे ते खास प्रकारच्या मोठ्या कारखान्यांमध्येच तयार केले जाते. आता असे काही कारखाने भारतात उभारले आहेत आणि या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे.
जड पाणी आणि साधे (हलके) पाणी यांचे बहुतेक सगळे गुणधर्म अगदी तंतोतंत एकसारखे आहेत आणि हे दोन्ही द्रव एकमेकांमध्ये अनिर्बंधपणे विरघळतात, त्यामुळे त्यांना वेगवेगळे करणे फार कठीण असते. सगळेच आयसोटोप्स रासायनिक क्रियांच्या बाबतीत अगदी एकच असतात. या दोन प्रकारच्या पाण्यांच्या कोणत्याही प्रकारच्या रासायनिक क्रियांमध्ये देखील काहीच फरक नसल्यामुळे त्यांचा उपयोग करून त्यांना वेगळे करणे अशक्य असते. जड पाणी हलक्या पाण्याच्या तुलनेत सुमारे साडेदहा टक्के जड किंवा वजनदार असते, पण ते साध्या पाण्यात संपूर्णपणे विरघळलेले असल्यामुळे गुरुत्वाकर्षणाने तळाशी जाऊन बसत नाही. त्याचा उत्कलन बिंदू (बॉइलिंग पॉइंट) फक्त एका अंशाने जास्त असतो. या सूक्ष्म फरकाचा उपयोग करून त्यांचे 'पार्शल डिस्टिलेशन' करतात. त्याच्या प्रत्येक स्टेजमध्ये जड पाण्याचे प्रमाण किंचित वाढते. याची अनेक वेळा पुनरावृत्ती करून ते वाढवत नेले जाते. ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया (कॉम्पेक्स प्रोसेस) आहे आणि ती खर्चिकही आहेच, शिवाय तिच्याबद्दल प्रचंड गुप्तता (कॉन्फिडेन्शियालिटी) बाळगली जाते.
जड पाण्याचा एक गुणधर्म मात्र साध्या (हलक्या) पाण्यापेक्षा खूप वेगळा आहे. साधे पाणी न्यूट्रॉन्सना पुष्कळ जास्त प्रमाणात नष्ट (कॅप्चर) करते, पण जड पाणी हे काम जवळ जवळ शून्याइतकेच करते. यामुळे रिअॅक्टरमधल्या न्यूक्लियर रिअॅक्शन्सची साखळी टिकवून ठेवण्यासाठी साध्या पाण्यापेक्षा जड पाणी अधिक उपयुक्त ठरते. इतर अनेक प्रयोग करून झाल्यानंतर आज जे रिअॅक्टर्स बांधले जात आहेत त्यात दोन मुख्य प्रकार आहेत. जगातील बहुसंख्य अणूभट्ट्यांमध्ये समृद्ध युरेनियम (एन्रिच्ड युरेनियम) आणि हलके पाणी (लाइट वॉटर) वापरतात, तर भारत आणि कॅनडा या देशांमध्ये जड पाणी आणि नैसर्गिक युरेनियम इंधन यांचा उपयोग केला जातो. नैसर्गिक युरेनियम आणि नैसर्गिक पाणी यांच्या उपयोगामधून चेन रिअॅक्शन करता येत नाही. निसर्गात मिळणार्या युरेनियमचा त्या एन्रिच न करता उपयोग करायचा असल्यास जड पाणी आवश्यक असते.
पुराणकालातल्या ऋषीमुनींच्या चित्रांमध्ये त्यांच्या हातात एक कमंडलू दाखवतात. केंव्हाही तहान लागताच लगेच पिण्यासाठी त्यात पाणी भरून घेतलेले असेल असे वाटत नाही, कारण अशा पौराणिक चित्रांमध्ये इतर कोणत्याच पात्राच्या हातात पाण्याने भरलेला एकादा तांब्या किंवा लोटा दाखवलेला दिसत नाही. या मुनीवर्यांच्या कमंडलूमधले पाणी सुद्धा सहसा साधेसुधे नसायचे. मंत्रोच्चाराने भारलेल्या त्या पाण्यामध्ये अद्भुत सामर्थ्य दडलेले असे. त्यातले दोन चार थेंब शिंपडताच माणसाचा दगड, भस्म किंवा साप होऊन गेला किंवा याच्या उलट झाले अशा कथा पुराणांमध्ये आहेत. अल्लाउद्दीनच्या दिव्यामधला राक्षस (जिन्न), परीकथांमधल्या पर्या आणि चेटकिणीसुद्धा क्षणार्धात होत्याचे नव्हते किंवा नव्हत्याचे होते करून टाकत असत. मी अगदी लहान असतांना मला या सगळ्याच सुरस गोष्टी खर्या वाटायच्या. आपल्यालाही एकादी जादूची अंगठी किंवा छडी मिळाली तर आपण कशी आणि कोणकोणती धमाल आणि गम्माडीगंमत करू हे तेंव्हा स्वप्नात दिसत असे. थोडे मोठे झाल्यानंतर काही गोष्टी कळायला लागल्या, त्यात अरेबियन नाइट्समधल्या सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथा आणि फेअरीटेल्स वगैरे सगळे काल्पनिक असते, प्रत्यक्षात असल्या जादूच्या कांड्या वगैरे कुठेही मिळत नाहीत हे समजले, पण ऋषीमुनींचे तपोबल आणि मंत्रांमधली शक्ती याविरुद्ध मात्र कोणीही काही बोलायला तयार नव्हते, त्यामुळे मंतरलेले पाणी कदाचित खरे असू शकेल असे आणखी काही काळ वाटायचे. आपणही ते मंत्र शिकून घ्यावेत आणि आपल्याला निष्कारण त्रास देणाच्या मुलांच्या किंवा मास्तरांच्या अंगावर मंतरलेल्या पाण्याचे थेंब उडवून त्यांना बेडूक किंवा पोपट बनवून टाकावे असे दुष्ट विचार त्या काळात मनात यायचे.
पण त्यात काही शंकासुद्धा येत. पुराणकालातल्या ऋषीमुनींच्या मंतरलेल्या पाण्यात जर इतके सामर्थ्य असायचे तर ते स्वतःचे रक्षण का करू शकत नव्हते? अरण्यातल्या त्यांच्या आश्रमांवर असुर, दैत्य, दानव वगैरे दुष्ट लोक वारंवार हल्ले करून मारामारी, अत्याचार आणि नासधूस करत असत, त्यांच्या तपश्चर्येत आणि यज्ञकार्यात बाधा आणत असत, यामुळे त्रस्त होऊन ते सगळे आश्रमवासी एकाद्या देवाची किंवा देवीची आराधना करत. मग ते देव किंवा देवी अवतार धारण करून त्या राक्षसांचा संहार करत अशा स्वरूपाच्या अनेक पौराणिक कथा आहेत. रामायणातसुद्धा राक्षसांच्या त्रासामुळे त्रस्त झालेले मुनीवर्य दशरथ राजाकडे जाऊन आपले गार्हाणे त्याला सांगतात, "ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा। यज्ञरक्षणात तोच श्रेष्ठ सर्वथा।।" असे सांगून धनुर्धारी राम आणि लक्ष्मण यांना सोबत घेऊन जातात. ते दोघे धनुष्यबाणांनीच दैत्यांचा संहार करून ऋषीमुनींना भयमुक्त करतात अशी कथा आहे. भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य या आचार्यांनीसुद्धा महाभारतातल्या युद्धात परंपरागत शस्त्रास्त्रांच्या सहाय्यानेच लढाई केली. त्यातली विशिष्ट अशी संहारक अस्त्रे, अमोघ शक्ती वगैरेंनाही बाणासारखे धनुष्याच्या दोरीला लावूनच सोडले जायचे, पण त्यावेळी तोंडाने एकादा मंत्र पुटपुटला जायचा असे सिनेमा आणि मालिकांमध्ये दाखवतात. कदाचित हे दिग्दर्शकांच्या कल्पनेमधून येत असेल. कुठल्याही युद्धात मंतरलेल्या पाण्याचा शस्त्रासारखा उपयोग केलेला मात्र मी कधी पाहिला किंवा ऐकला नाही. जर गरज पडलेली असतांना करता येत नसला तर मग त्या अद्भुत सामर्थ्याचा काय उपयोग?
पौराणिक कथा, ऋषी, मुनी वगैरेंचा संबंध हिंदू धर्मशास्त्रांशी जोडलेला असल्यामुळे मनात आलेल्या अशा शंका विचारायची परवानगी आमच्या लहानपणी नसायची, त्यातूनही कोणी धीर करून त्या विचारल्याच तर असे उत्तर मिळायचे की मंत्रशक्तीचा असा उपयोग करतांना कठोर तपश्चर्येमधून कमावून ठेवलेल्या पुण्याचा क्षय होतो आणि तो भरून काढण्यासाठी पुन्हा तशीच तपश्चर्या करावी लागते, ती करावी लागू नये म्हणून मंत्रशक्तीचा उपयोग अपवादास्पद परिस्थितींमध्येच केला जात असावा. मला तरी हे कधी समर्थनीय वाटले नाही, पण ते महत्वाचे नाही. मंतरलेले पाणी कसलाही चमत्कार घडवू शकते आणि प्राचीन काळातल्या त्या संबंधातल्या गोष्टी काल्पनिक नसून सत्यकथा आहेत यावर त्या काळातल्या अनेक लोकांचा गाढ विश्वास असायचा. असा विश्वास बाळगणारे आणि त्यावरून वाद घालणारे लोक आजसुद्धा भेटतात. गंमत म्हणजे ते लोक आता 'साउंड एनर्जी, व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सी, रेझॉनन्स, सिनर्जी' असले इंग्रजी शब्द फेकून त्यांचे सांगणे 'शास्त्रीय' आहे असे सिद्ध करू पाहतात.
बहुतेक सगळ्या धार्मिक विधींच्या सुरुवातीला पूजेची तयारी करतांना कलश आणि दीप यांची यथासांग पूजा केली जाते. नंतर मुख्य दैवताची पूजा चालली असतांना आयत्या वेळी त्या वस्तू न मिळाल्याने गोंधळ होऊन नये म्हणून कदाचित अशी व्यवस्था करून ठेवली असावी. कलश आणि दिव्याची पूजा करण्यासाठी आधीच त्यांना घासून पुसून चकचकीत केलेले असतेच. त्यांना गंधपुष्प वगैरे वाहून नमस्कार करतात. त्यानंतर मंत्रोच्चाराबरोबर दीपप्रज्वलन केले जाते आणि कलशामध्ये पाणी भरले जाते. त्यावेळचे मंत्र म्हंटल्यावर उत्तरेमधील गंगा, यमुना, सिंधू या नद्यांपासून दक्षिणेतल्या कृष्णाकावेरीपर्यंत भारतातल्या सगळ्या पवित्र नद्यांचे पाणी त्या कलशात आले आहे असे समजले जाऊन त्या पाण्याला एक वेगळे 'स्टेटस' प्राप्त होते. त्यानंतर ते पाणी साधे रहात नाही, ते 'मंतरलेले पाणी' पिण्यासाठी किंवा हात धुण्यासाठी घेतले जात नाही. त्या पवित्र पाण्याने इतर सगळ्या पूजासामुग्रीवर प्रौक्षण करून त्यांनाही पवित्र किंवा शुद्ध करतात तसेच स्वतः आणि तो विधी पहायला बसलेल्या लोकांच्या अंगावर या पवित्र पाण्याचे एक दोन थेंब पडले की सगळ्यांचे शुद्धीकरण होते. पूजाविधी संपल्यानंतरसुद्धा ते खास पाणी मोरीत किंवा बेसिनमध्ये ओतले जात नाही. ते एकाद्या झाडाला, शक्य झाल्यास तुळशीला वाहतात किंवा जलाशयात नेऊन टाकतात.
प्रत्येक पूजाविधी झाल्यानंतर त्याचे थोडे पुण्य इतरांनाही मिळावे यासाठी तीर्थ आणि प्रसाद वाटला जातो. यातला प्रसाद हा चांगला चविष्ट आणि मधुर असा खाद्यपदार्थच असतो. सर्वांच्या आधी तो देवाला अर्पण करण्यासाठी देवाला त्याचा नैवेद्य दाखवतात. प्रत्यक्षातले देव त्यातला कणभरसुद्धा खात नाहीतच, पण त्याला दिलेला नैवेद्य त्यानेच प्रसाद म्हणून आपल्याला बहाल केला आहे अशी सोयिस्कर समजूत करून घेऊन त्या प्रसादाचे भक्षण केले जाते. पूजाविधीतला हा भाग सर्वांना मनापासून आवडतो. पूजेच्या सुरुवातीला देवाच्या मूर्तीला ताम्हनात ठेवून त्याला पाण्याने न्हाऊ घालतात, दूध, दही, तूप, मध आणि शर्करा यांचे पंचामृत त्या मूर्तीवर वाहून, सुगंधित पाणी ऊष्ण पाणी वगैरेंनी तिला स्नान घालतात, त्या मूर्तीवर पाण्याचा अभिषेक करतात, तिला ताम्हनात ठेवलेले असतांनाच तुळशी, बेलाची पाने, दुर्वा, फुले वगैरेही वाहतात. या सगळ्यांनी युक्त असलेले ताम्हनामधले पाणी पूजा संपल्यानंतर तीर्थ बनते. ते प्राशन करतांना खालील श्लोक म्हंटला जातो.
अकालमृत्यूहरणम् सर्वव्याधीविनाशकम् । ... पादोदकम् तीर्थम् जठरे धारयाम्यहम्।।
ज्या देवतेची पूजा केली असेल तिचे नाव ... या जागी घेतात. ''शरीरातल्या सर्व व्याधींचा नाश व्हावा आणि अकालमृत्यू टळावा यासाठी त्या देवतेचा पदस्पर्श झालेले हे पाणी मी पोटात घालत आहे'' असा या श्लोकाचा अर्थ होतो. हा अर्थ समजला असो किंवा नसो, तो पटला असो किंवा नसो, बहुतेक सगळे हिंदू लोक पळीभर तीर्थ पिऊन घेतात. त्यामुळे आपल्याला पुण्य लागेल अशी एक अंधुक कल्पना कदाचित त्यामागे असते. अकालमृत्यू केंव्हा आला होता हेच माहीत नसते, तीर्थप्राशनामुळे तो टळला तरी ते कसे समजणार आणि नसला तर तसे का झाले याचे स्पष्टीकरण द्यायला इतर अनेक कारणे असतातच. अमक्या तमक्या देवाच्या पूजेचे तीर्थ प्यायल्यामुळे असाध्य रोग झालेला एकादा रोगी खडखडीत बरा झाला असे प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला दिसत नाही पण तसे सांगणारे भाविक भेटतात. ''जे विकार आपल्या आपणच किंवा इतर औषधोपचाराने ठीक होण्यासारखे असतात त्यांच्या बाबतीतसुद्धा रुग्णाच्या मनोधैर्याचा अनेक वेळा चांगला उपयोग होतो'' असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. किंबहुना त्यासाठी आंतरिक शक्तीची आवश्यकता असते. काही वेळा निराशाग्रस्त झालेला एकादा रोगी "हे तीर्थ घेतलेस ना? आता कसली काळजी करू नकोस." एवढ्या बोलण्यानेच बरा होण्याला सुरुवात होते. कशाने का होईना, पण त्याला बरे वाटणे महत्वाचे असते ना!
भारतातल्या एका कौटुंबिक कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांमध्ये एक परदेशातले ख्रिश्चन कुटुंब होते. त्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक धार्मिक पूजा होती. पूजा आरती वगैरे संपल्यावर सर्वांना तीर्थप्रसाद वाटला गेला. त्या परदेशी मंडळींनी प्रसाद तर आवडीने घेऊन खाल्ला, पण तीर्थाकडे पाहून "हे काय आहे?" असे विचारले. ते काय आहे हे सांगितल्यानंतर ते 'पवित्र पाणी' पिण्यायोग्य आहे हे सुद्धा त्यांना पटवून देणे अवघड होते.
स्वातंत्र्यपूर्व काळात जातीयतेचे महाभयंकर प्रस्थ असायचे. त्यात खाण्यापिण्यावर खूप कडक बंधने असायची. धान्ये, कडधान्ये, भाज्या, फळे वगैरे नैसर्गिक पदार्थ कोणाच्या शेतातून आले आहेत याचा विचार कोणी करत नसत, पण त्यांना पाण्यात शिजवून तयार केलेला भात, आमटी, भाजी किंवा पाण्यात पीठ भिजवून केलेल्या भाकर्या आणि पोळ्या मात्र कोणत्या जातीच्या माणसांच्या घरात केल्या आहेत हे पाहूनच त्या खाण्याबद्दल ठरवले जात असे. माणसांच्या जातीचा त्या पाण्यावर कोणता वाईट परिणाम होतो असे त्यांना वाटायचे कोण जाणे. गावातल्या कोणत्या पाणवठ्यावर कुणी पाणी भरायचे यावर कडक बंधने असत. परधर्माच्या, परजातीच्या लोकांनी, विशेषतः तथाकथित अस्पृश्यांनी भरलेले पाणी इतर लोक पीत नसत आणि त्यांना आपल्याबरोबर पाणी भरू देत नसत. या हक्कासाठी आंदोलने केली गेली. त्यात महाड इथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला चंवदार तळ्याचा सत्याग्रह प्रसिद्ध आहे. गोव्यामध्ये तर गावातल्या विहिरीत ख्रिश्चनांनी पाव टाकल्यामुळे ते सगळे पाणी अपवित्र झाले आणि ते पाणी पिऊन सगळे गाव बाटले अशा घटना घडल्या होत्या म्हणतात. आज शहरांमधली या बाबतीतली परिस्थिती बदलली असली तरी देशाच्या काही भागात अजूनही जुन्या चालीरीतींचे अवशेष शिल्लक राहिले आहेत.
मी शाळेत शिकत असतांनाची एक आठवण आहे. आम्ही ज्या मोठ्या गावात रहात होतो तिथून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या खेडेगावात माझ्या आजोबांनी तयार केलेली शेती आणि त्यांनी बांधलेले घर होते. ते घर एका वेगळ्या जातीच्या स्थानिक कुटुंबाला भाड्याने दिले होते. वीस किलोमीटरच्या अंतरामध्ये एक नदी नावेतून पार करावी लागत असे आणि वाहतुकीची साधने चांगली नव्हती, त्यामुळे तिकडे जाऊन परत यायला दोन दिवस लागत. खेडेगावामध्ये हॉटेल नव्हतेच आणि त्या काळात हॉटेलमधले खाणे चांगले मानले जात नव्हते म्हणून दोन दिवस टिकतील आणि पुरतील असे खाद्यपदार्थ माझ्या आईने मला बांधून दिले होते. तिथे गेल्यानंतर मी आपला डबा उघडून खाऊ लागलो तेंव्हा आमच्या भाडेकरूने मला मानवता आणि समानता यावर लेक्चर दिले आणि त्याच्या बायकोने केलेले ताजे गरम जेवण खायला बोलावले. माझ्या मनात कसला भेदभाव नव्हताच, मी आनंदाने त्यांच्या पंगतीला जाऊन बसलो. थोड्या वेळाने आमच्या शेतावर काम करणारा शेतकरी मला भेटायला तिथे आला. आमच्या भाडेकरूने आल्या आल्या आधी त्याची जात विचारली आणि त्याला दरवाजाबाहेरच बसायला सांगितले. एका खापराच्या मडक्यात त्याला पाणी प्यायला दिले, आपल्या घरातल्या भांड्यालासुद्धा स्पर्श करू दिला नाही. थोड्याच वेळापूर्वी मला दिलेले भाषण तो विसरून गेला होता किंवा कदाचित त्याचे इतर जातभाई याबद्दल त्याला काय म्हणतील याची त्याला काळजी वाटत असावी.
थोडक्यात सांगायचे झाल्यास पाणी म्हणजे पाणी म्हणजे नुसतंच पाणी नसतं, ते तुमचं आणि आमचं अगदी सेम नसतं. त्यात खारट, गोड, कठीण, जड, हलके, शुद्ध, अशुद्ध वगैरे प्रकार असतातच, पवित्र, अपवित्र वगैरेही असतात. काही शास्त्रीय आधारांवर असतात, काही जुनाट समजुती, अंधविश्वास वगैरेंना मानण्या, न मानण्यावर असतात.
. . . . . . . . . . . . . . . (समाप्त)
प्रतिक्रिया
लेख मस्त झालाय, रेंज फारच
लेख मस्त झालाय, रेंज फारच जबरदस्त आहे. आवडला.
लेख उत्तम आहे. जड पाण्याची
लेख उत्तम आहे. जड पाण्याची माहिती रोचक आणि मनोरंजक.
धन्यवाद..
दुसर्या कोणाचा लेख असता तर
दुसर्या कोणाचा लेख असता तर कमंडलूच्या उल्लेखानंतरच्या परीच्छेदात "कमंडलूतलं असं पाणी जड पाणीच असायचं. आपल्या ऋषीमुनीनी ते कधीच शोधून काढलं होतं" हे वाचायची तयारी ठेवली असती
पण पाण्याचं महत्व पूर्वीच्या कुठल्यातरी संस्थानिकाला / राजाला पुरेपूर पटलं होतं हे नक्कि - तो म्हणे प्रवासाला निघाला की गंगेच्या/कुठल्यातरी ठराविक नदिच्या पाण्याचे बुधले बरोबर घेतले जायचे!
घारेकाका, एक "How do they do it?" नावाची नेटफ्लिक्सवर सिरीज आहे. जमलं तर जरूर बघा, तुम्हाला आवडेल. कधी-कधी फारच वरवर विषय हाताळला जातोय असं वाटतं. पण तरीही विचाराला चालना मिळते हे नक्की. "तुम्हाला काय काय माहिती नाहीये हेच मुळात तुम्हाला माहिती नाहीये" याचं प्रत्यंतर येत रहातं.
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
नेट्फ्लिकनेट्फ्लिक्सक
नेटफ्लिक मोफफतत कका ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
वर वरचे हाताळणे
माझ्या पूर्वायुष्यात तांत्रिक विषयांवर सखोल संशोधन वगैरे थोडे फार करून झालेले आहे. आता ते करण्याचा विचार नाही. क्मीत कमी पारिभाषिक शब्द वापरून, कोणताही फॉर्म्यूला, समीकरण, चार्ट किंवा ग्राफ न वापरता फारसे बॅकग्राउंड नसलेल्या लोकांना समजू शकेल असेच लिहायचे मी ठरवले आहे. याला कोणी बालचित्रपट म्हंटले तरी हरकत नाही. त्यामुळे माझ्या लेखात खोली शोधल्यास ती मिळणारच नाही. लांबी रुंदी वाढवण्याचा किंचित प्रयत्न कदाचित असतो.
आपल्याला काय माहीत नाही याचीच कल्पना नसते यालाच बहुधा 'अज्ञानातले सुख' म्हणत असावेत. बहुसंख्य माणसे यामुळेच सुखी किंवा समाधानी असतात. माहीत नसलेले समजून घेण्याची जिज्ञासा असली तर ती स्वस्थ बसू देत नाही.
त्वरित प्रतिसादाबद्दल आभार
सुंदर लेख. जेनेटीक्सवर काही
सुंदर लेख.
जेनेटीक्सवर काही माहितीपट पाहिले होते, त्यातही कातडीचा रंग किंवा असाच काही मनुष्य शरीराचा बाह्य गुणधर्म घेऊन, आपण सगळे वरवर, skin deep वेगळे आहोत. आत सगळे सारखेच, असा शेवट होता. हे लेखनही तसंच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पूर्वार्ध आणि उत्तरार्ध
"पृथ्वीवरील पाण्याचा उगम कसा झाला?" या विषयावर या लेखाच्या पूर्वार्धावर चांगली चर्चा चालली आहे. या भागावर अजून पर्यंत तरी बरा, चांगला, उत्तम, सुमार अशा प्रकारचे अभिप्रायच आले आहेत. त्यातल्या कोणत्याच मुद्यावर काहीच प्रश्नोत्तरे झालेली नाहीत
तुमच्या या आणि वरील
तुमच्या या आणि वरील प्रतिसादावरुन कोणीतरी या लेखाला सुमार अशी प्रतिक्रियाही दिली आहे असं वाटलं आणि आश्चर्याने सर्व प्रतिक्रिया पुन्हा वाचल्या. कोणीही उत्तम लेख याखेरीज जराही उणी प्रतिक्रिया दिलेली नाही.
मला वाटते मिसळपाव यांच्या प्रतिसादाचे चुकीचे इंटरप्रिटेशन झालेले आहे. मला तुमच्या तिथल्या प्रतिसादावरुनही आधी असं वाटलं होतं.
अगदी उलट इंटरप्रिटेशन झाले असावे अशी मला शंका आहे. अर्थात मिसळपाव यांच्या प्रतिसादाविषयी मी लिहीणं म्हणजे आगाऊपणा होतोय, पण मला असं वाटतं की त्यांनी केलेली :
अशी टिप्पणी ही त्या हाउ डू दे डू इट या कार्यक्रमावर आहे, या लेखावर नव्हे अशी माझी पक्की समजूत आहे, कारण तो कार्यक्रम मी पाहिलेला आहे बर्याचदा.
+१
तुमच्या या आणि वरील प्रतिसादावरुन कोणीतरी या लेखाला सुमार अशी प्रतिक्रियाही दिली आहे असं वाटलं आणि आश्चर्याने सर्व प्रतिक्रिया पुन्हा वाचल्या. कोणीही उत्तम लेख याखेरीज जराही उणी प्रतिक्रिया दिलेली नाही.
मला वाटते मिसळपाव यांच्या प्रतिसादाचे चुकीचे इंटरप्रिटेशन झालेले आहे. मला तुमच्या तिथल्या प्रतिसादावरुनही आधी असं वाटलं होतं.
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
जराशी गंमत
माझ्या इतक्या लहानशा लेखाला कोणी चांगले, उत्तम वगैरे म्हंटल्याने खूष होऊन जाण्याचे माझे वय नाही आणि सुमार म्हंटले तरी त्याबद्दल काही वाटणार नाही. माझ्या लिखाणाला वरवरचे, स्किन डीप, बालचित्रवाणीतल्यासारखे वगैरे विशेषणे लावली तर ती योग्यच आहेत, कारण मी जाणून बुजून आणि मुद्दाम ठरवून तसे लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांचा सुमार असा अर्थ लावण्यात मी कदाचित चूक केली असेल. त्याबद्दल सॉरी. पण हा मुद्दाच महत्वाचा नाही.
मीच लिहिलेल्या एका लेखातल्या मुद्यांवर चर्चा होऊन ती पुढे चालत गेली आणि त्याच दुसरा भाग वाचून कुणालाही त्यातल्या कोणत्याच विधानांवर काही विचारावे किंवा सांगावे असे वाटले नाही याची मला जराशी गंमत वाटली.
हो, प्रश्नच नाही
हो, प्रश्नच नाही. ती टिप्पणी त्या हाउ डू दे डू इट या कार्यक्रमावर आहे, घारेकाकांच्या लेखावर नव्हे.
गवि, या
आगाउआश्वासक प्रतिसादाबद्दल धन्यवाद.मी अजूनही आपण वापरतोय ते पाणी करोडो कार्बोनेशीयस काँड्राईट्स मधनं जमवलंय हेच समजून घेतोय त्यामुळे ईथे प्रश्न नाही विचारले. आता आलोच आहे तर एक आहे तो विचारतो. ईराण 'सेंट्रिफ्युजेस वापरून युरेनियम संपृक्त (enrich) करतो आहे' हे ईराण - अमेरिका यांच्या सुंदोपसुंदिच्या बातम्यांमधे वाचलं. म्हणजे आयसोटोप्सच्या घनतेत (density) पुरेसा फरक असतो जेणेकरून ते वेगळे करता येतात. तुम्ही वर म्हंटलंय की जड पाणी / साधं पाणी डिस्टिलेशनने वेगळं करतात. पाणी उकळवायला लागणारी उर्जा हि सेंट्रिफ्यु़ज फिरवायला लागणार्या उर्जेपेक्षा बरीच जास्त असणार. तरीही डीस्टीलेशन का करतात? याबद्दल उत्सुकता आहे.
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
सेंट्रिफ्यूज आणि डिस्टिलशन
सायीचे दही घुसळून लोणी काढणे हे आपल्या परिचयाचे सेंट्रिफ्यूज आहे. दुधामधला स्निग्ध अंश त्यात विरघळलेला नसल्यामुळे सहजपणे वेगळा होतो. साखर कारखान्यांमधल्या सेंट्रिफ्यूजचा उपयोग उसाच्या रसामधला गाळ बाजूला काढण्यासाठी होतो. आणखी वेगवान सेंट्रिफ्यूज वापरले तर रसामधला अधिकाधिक गोड भाग कमी गोडवा असलेल्या पाण्यापासून वेगळा करता येईल, पण तसे करणे महाग पडेल, रसामधल्या पाण्याची वाफ करून त्याला साखरेपासून वेगळे करणे कमी खर्चाचे आणि सोपे असते. सेंट्रिफ्यूज आणि डिस्टिलशन यांच्यामधला फरक या उदाहरणामधून दिसेल. युरेनियम (किंवा इतर कोणत्याही मूलद्रव्याचे) आयसोटोप्स वेगळे करण्यासाठी आधी त्याचे रूपांतर त्यांच्या एकाद्या वायुरूप संयुगात करून त्यंना अतीशय वेगवान अशा अनेक यंत्रांच्या सा़खळीमधून फिरवले जाते. ही क्रिया अधिक गुंतागुंतीची, अवघड आणि खर्चिक असते.
'जावे त्यांच्या देशा'मध्ये
'जावे त्यांच्या देशा'मध्ये पाण्याचे संस्कृतीतील स्थान याभोवती (बहुदा कन्याकुमारी व युंगफाउबद्दल लिहिताना) एक छान मुक्तक आहे. पूर्वरंगमध्येही आशियायी "तीर्था"ची महती वर्णिली आहे. त्या विखुरलेल्या लेखनाची हा लेख वाचुन (खरंतर उगाच) आठवण झाली.
अर्थात लेखन आवडले.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!