अनावर जखमा......
काच फुटावी तशी
भावना जेव्हा असंख्य तुकड्यानी फुटतात,
मग त्या प्रत्येक तुकड्यात आपलंच प्रतिबिंब दिसतं.....
आपल्याच भावना नंगा नाच करतात त्या तुकड्यातून,
त्यांचं ते खिजवण...
जिव्हारी लागतं,
काचांचे तुकडे फक्त पायात घुसतात,
ह्या भावनांचे मात्र थेट हृदयात,
काचांच्या जखमांतून रक्तच येतं फक्त,
भावनांच्या जखमांतून अजून भावना बाहेर पडतात,
चांगल्या वाईट ते ज्याचं त्यानी ठरवावं,
प्रत्येकाचा pattern वेगळा असतो ना म्हणे,
मग ह्या जखमांचाही.
मला लागतात, खूप खोलवर लागतात,
जा म्हणता घालवता आल्या असत्या तर?
पण त्यांचे थैमान चालूच असते,
भिरभिरतो मी त्या वादळात,
हेलकावे खाऊन, नाका तोंडात सगळा धुराळा भरला,
कि कुठेतरी धपकन जमिनीवर पडल्यावर जाग येते,
मग पुन्हा उचलतो ते तुकडे,
पुन्हा जोडतो एकमेकाला,
प्रेमाचा बिलोरी ऐना तयार करतो,
त्यात पुन्हा स्वतःला पाहायला जातो,
कोणा दुसऱ्याला दाखवायला लागतो तो आरसा,
आणि असं वाटतं सामावले आहोत आपण त्या प्रतिबिंबात,
तेव्हा.....
पुन्हा तडे जायला सुरुवात होते,
आणि तडकतो परत तो,
पुन्हा तुकडे, पुन्हा जखमा, पुन्हा गोळा करणं,
ह्यातच आयुष्य सामावलं आहे आता.....
कारण, प्रेम असतं ना, मलमपट्टी करून,
पुन्हा दुसऱ्या जखमा झेलायची ताकद देण्यासाठी....
प्रतिक्रिया
मूलभूत शंका
जखमा अनावर कशा काय होऊ शकतात?
होतात, अतोनात झाल्या की अनावर
होतात, अतोनात झाल्या की अनावर पण होतात, हा माझा दृष्टिकोन
सिद्धार्थ