माण्साने ...
माण्साच्या शाळेतल्या प्रतिज्ञा खोट्या असतात, माण्साने 'सारे भारतीय माझे बांधव आहेत' असं नुसतंच म्हणावे पण मानू नये.
माण्साने हिंदू व्हावं, मुसलमान व्हावं, बौद्ध व्हावं, ख्रिश्चनही व्हावं पण भारतीय होऊ नये.
हिंदूंनी मुसलमानांचा द्वेष करावा आणि मुसलमानांनी हिंदूंचा द्वेष करावा.
बौद्धांनी ख्रिश्चनांचा आणि ख्रिश्चनांनी बौद्धांचा, उरलेल्या धर्मवाद्यांनीही एकमेकाचा मत्सर करावा.
माण्साने आपली जात गोंजारावी, दुसऱ्याच्या जातीचा दुस्वास करावा.
भाषीय, प्रांतीय अस्मितेची बांडगुळे आपल्या मस्तकात वाढवावीत,
शिकून सवरूनही शिव्या द्याव्यात, आईबहीण काढावी, खानदान उकरून काढावे, रोमरोमात नफरत भिनवावी.
उकिरडयावर जगणारया लुत भरलेल्या पोराठोरांवर थुकावे,
बायाबापड्या चुरगाळाव्यात अगदी पाळण्यातल्या पोरीलाही सोडू नये,
बाईच्या पोशाखावर मर्यादा आणताना स्वतः मात्र लिंगपिसाट व्हावे.
माण्साने नुसती टोलेजंग स्मारके उभी करावीत त्यात महापुरुषांना खोलवर चिणावे,
कावळ्यांनी त्यावर विष्ठण्यासाठी त्यांना बेवारस सोडून द्यावे,
त्यांच्या विचारांना काडी लावावी आणि त्यांच्या नावाची दुकाने लावावीत.
माण्साने जयंत्या कराव्यात, पुण्यतिथ्या कराव्यात तमाम सोंगे करावीत आणि त्यावर आपली पोळी भाजून घ्यावी,
महापुरुषांच्या पुतळ्यांना हार घालण्याचे ढोंग करावे, त्यांच्या कृतींचे खोटे अनुकरण करावे अन त्यांच्या मारेकऱ्यांचा जयघोष करावा,
जमलेच तर महापुरुषांना शिव्याही दयाव्यात.
उत्सवांचे स्तोम माजवावे, जातधर्माचे झेंडे मोठे करावेत, कोरडया प्रार्थनांचे गगनभेदी गजर करावेत.
माण्साने माणुसकी सोडावी, गायी बैलं जपावेत पण माणसं मारावीत.
पिचलेल्यास पायाखाली रगडावे, माजोरडयांच्या थुंक्या झेलाव्यात.
विवेक गहाण टाकावा, विरोधकास नेस्तनाबूत करावे, त्याच्या चितेवर आपले महाल उभारावेत.
खोटा इतिहास शिकवावा, सगळी साधने आपल्या ताब्यात ठेवावीत.
तरण्या पोरांचे रक्त उकळवावे, माथी भडकवावीत, दंगली घडवाव्यात, जाळपोळ लुटमार करावेत.
खऱ्यांवर खोटे सूड उगवावेत, वंचितांवर आसूड उगारावेत, बदफैल व्हावे.
गरीबांचा तळतळाट घ्यावा, शिव्याशापांचा पैसा कमवावा त्यातून इमान विकत घ्यावे.
सोशल मिडीयावर खोटे नाटे लिहावे, न वाचता फॉरवर्ड करावे.
एकमेकाचा तिरस्कार करावा, तो करताना निवडक भाऊबंदांची काळजी घ्यावी.
दुसऱ्याच्या घरादारावरून नांगर फिरवावा पण आपले उखळ पांढरे करावे.
माण्साने निवडणुका लढवाव्यात, खोटी आश्वासने द्यावीत, मते विकत घ्यावीत, दारू पाजावी, लालूच दाखवावी, बुद्धिभेद करावा.
वाट्टेल ते करावे पण सत्ताधारी जमात बनून राहावे.
भडक भाषणे द्यावीत जहाल विषाचे प्याले पाजावेत,
माण्साच्याच मान लटकणारया गळ्यात दुःख दैन्याच्या दास्यत्वाच्या शृंखला करकचून बांधाव्यात,
रक्ताळलेल्या वस्त्यांकडे हरीणडोळ्यांनी बघत राहावे, जमलेच तर थोडे विभाजनच करावे.
लंपट आस्थेच्या रांगोळ्या काढाव्यात, खोटया कीर्तीच्या नेभळट गुढ्या उभ्या कराव्यात.
जंगले कापावीत, चराचराचा विनाश करावा, पाषाणभेदी यंत्रांनी डोंगर पोखरावेत, गगनचुंबी इमारती बांधाव्यात त्यात आपली खुराडी तयार करावीत.
माण्साने आईबापांना वृद्धाश्रमात नेऊन सोडावे, नाती विसरावीत,
शेजारधर्म बुडीत काढावा, कृतघ्न व्हावे.
विज्ञान मोडीत काढावे, प्रार्थना आणि नमाज रस्त्यावर करावेत, देवांचा बाजार मांडावा त्यात माण्सालाच बळी द्यावे.
माण्साने देशासाठी काही करू नये, झेंडावंदनाच्या दिवशी ऐश करावी, पार्ट्या कराव्यात, आऊटींग करावे, झोपा काढाव्यात.
माण्साने माणसाला खंगवावे, दोन घासाला मौताज करावे झिजवावे कुथवावे.
माण्साने आतल्या गाठीचे असावे, खरे कुणाला सांगू नये अन भले कुणाचे करू नये, दुनियेस रखेल करावे तिच्या शोषणावर सुक्ते रचावीत,
अस्पृश्यतेचे धडे शिकवणाऱ्या अधम संस्कृतीला नव्याने गाभण करावे.
भूमीपुत्राला नागवावे, त्याच्या जमिनी हडप कराव्यात त्या धनदांडग्यांना कवडीमोल भावात विकाव्यात.
आडवं येणाऱ्यास बिनदिक्कत देशद्रोही म्हणावे, देशप्रेमाचे नक्राश्रू ढाळावेत,
माण्साने माण्सावर प्रेम करू नये, स्वार्थी व्हावे, आपल्याच सडक्या वंशाचे जीर्ण भग्नकाव्य जगाच्या माथी मारत आपलेच गुणगान करावे.
सरते शेवटी माण्साने किडामुंगी व्हावे, शेणातली अळी व्हावे, विष्ठा व्हावे मुत्र व्हावे पण माणूस होऊ नये !
- समीर गायकवाड.
प्रतिक्रिया
प्रतिक्रिया राखून
प्रतिक्रिया राखून ठेवत आहे. हाती कळफलक आल्यावर बडविण्यात येईल.
सध्या गोलपिठा वाचताय का? पण
सध्या गोलपिठा वाचताय का? पण ढसाळांची ही ७० च्या दशकातली माझी अतिशय आवडती कविता २०१७ मध्ये इथे संस्थळावर वाचताना एकदम गल्ली (अवकाश आणि काळ ह्या दोन्ही अर्थी) चुकलेली वाटतीये. सर्वंकष विद्रोहाचं वारं प्यायलेल्या त्या कवितेचा सैराटपणा मात्र शेवटी माणसाचंच गाणं गावं माणसाने अश्या प्रार्थनेवर संपतो हे फार महत्वाचं आहे. पुरुषसूक्ता सारखं ते एक माणूससुक्तच आहे. बाय द वे, अरुण कोलटकरांची "शेवटचा अश्रू" नावाची कवितासुद्धा ह्या निमित्ताने वाचा अशी शिफारस करतो. त्या दोन कवितेंची तुलनात्मक समीक्षा होणं राहून गेलंय.
தநுஷ்
जबरदस्त लिहिलेय.
जबरदस्त लिहिलेय.
ढसाळांचे साहीत्य वाचवत नाही.
ढसाळांचे साहीत्य वाचवत नाही. सत्य कटू असलं तरी पचत नाही किंबहुना म्हणुनच पचत नाही. माझा त्यांच्या साहीत्याशी परिचय मिपावरती झाला. तो लेख सापडला की लिंक देते. कारुण्याची मोठ्ठी झालर असलेल्या बीभत्स रसातील कविता असे मी वर्णन करेन
http://www.misalpav.com/node/376
प्लीSSSज मला त्यांचं मुम्बई
प्लीSSSज मला त्यांचं मुम्बई ही दीर्घकविता हवीय कुठे मिळाली तर.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
माफ करा. मिपावरील परिचय सोडता
माफ करा. मिपावरील परिचय सोडता मी ढसाळ यांचे साहीत्य वाचलेले नाही.
हे कोणत्या काळाचं वर्णन आहे?
हे कोणत्या काळाचं वर्णन आहे?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
जुन्या काळाचं.
जुन्या काळाचं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अजुन एक - सहेली तिज्जन या
अजुन एक - सहेली तिज्जन या वेश्येच्या दृष्टीकोनातून लिहीलेल्या कवितांवर ऐसीवर एकाही (मी सोडून) व्यक्तीची टिप्पणे नाही???? कवितांना कमीच रिस्पॉन्स असतो हे माहीत आहे. पण सगळे चिडीचुप्प. तेव्हा उदारमतवाद दिसला नाही, साधी कोणी दखल घेतली नाही हे लक्षात येण्याइतपत स्टार्क होते. (उदारमतवाद ही ऐसीचा खासम खास गुण आहे व प्रत्येक वेळी त्याचा परीणाम दिसलाच पाहीजे असे काही मला म्हणायचे नाही. पण एक सूज्ञ आणि अतिशय समंजस, मॅच्योर वर्गाकडून अपेक्षा एवढाच आहे.)
http://aisiakshare.com/user/1915
आता तर त्या व्यक्तीचा आय डी ही बॅनड दिसतोय. (कदाचित उपद्रव झाला असल्याने बॅनड असेल. मला अजिबात हिरोगिरी करायची नाही की कोणाची बाजू घ्यायची नाहीये. तेव्हा गैरसमज नको. फक्त नीरीक्षण नोंदवत आहे.)
____________
विद्रोही/हटके साहीत्य - नामदेव ढसाळांचे बरे उचलुन धरले जाते. मग अन्य का धरले जात नाही हे न उमगलेले कोडे आहे.
__________
काव्या हा माझा आय डी होता. त्या आय डी चा मिक्स अप तिज्जन या आयडी शी करु नये. माझ्या धाग्यात त्या कविता लंप केल्या गेल्या होत्या. का तर माझ्या इंग्रजी होत्या व तिज्जन यांच्या हिंदी होत्या. तिज्जन यांच्या कविता खालील दुव्यावरती वाचता येतील. त्या अंगावर येणार्याच आहेत.
http://aisiakshare.com/node/4043
एकूणच समाजातल्या सगळ्याच
एकूणच समाजातल्या सगळ्याच दाम्भिक प्रवृत्तींवर अगदी पोटतिडीकीने लिहीलेलं आहे. परंतु माझ्यामते ह्यात 'काव्य'मय काही नाही. पाडगांवकरांची 'सलाम'ही ह्याच धर्तीवर असूनही तिला अभिजात गणलं जाण्यामागे कारण आहे.
मलाही माहित नाही, परंतु मी म्हटलंय ते, आणि ह्यामागचं, ही दोन्ही कारणं समान आहेत.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.