Skip to main content

भंजाळलेल्या अस्मितांची दहशत आणि सेन्सॉरशिप

प्रस्तुत लिखाणाला संदर्भ फेसबुकावरील एका चर्चेचा आहे. चर्चा एका बंद गटात (closed group) मधे झालेली असल्याने मुख्य चर्चेचे दुवे देता येणं कठीण आहे, परंतु थोडी पार्श्वभूमी देऊन, थोड्या लिंका पुरवून संदर्भ देईन म्हणतो.

तर एकंदर थट्टामस्करीच्या सूरात सुरू झालेल्या या चर्चेचा विषय होता, फेसबुकावर "शिवाजी महाराज" या नावाने बनलेला नवा ग्रुप . (https://www.facebook.com/profile.php?id=100005602891170) या ग्रुपवर एक नजर टाकल्यानंतर हे लक्षांत येण्यासारखं आहे, की शिवाजीमहाराजांची विभूतीपूजा मांडून त्या निमित्ताने अस्मितांना चुचकारण्याचा प्रघात जो गेली पन्नासेक वर्षे महाराष्ट्रामध्ये रूढ झालेला आहे त्या परंपरेचा हा आणखी एक भाग असणार. प्रस्तुत काळाच्या संदर्भात या गटाला शिवसेनेच्या बाजूने प्रचार करण्याची दिशा मिळणार, की संभाजी ब्रिगेडच्या दिशेने हा गट जाणार इतकंच पहायचं.

तर उपरोक्त चर्चेच्या ठिकाणी या ग्रुपचा विषय निघाला आणि हा हा म्हणता, या प्रकाराची थट्टा उडवणारे डझनावारी प्रतिसाद जमा झाले. यातले बहुतांश प्रतिसाद हे, शिवाजीमहाराजांच्या नावाने आपली तळी उचलून दरणार्‍या, प्रादेशिकतेचं, धार्मिकतेचं आणि जातीपातीचं राजकारण करणार्‍या राजकारणाची यथेच्छ मस्करी या स्वरूपाचे होते. खुद्द शिवाजीमहाराजांचा निर्देश करणारा मजकूर अत्यल्प होता. काही मासलेवाईक प्रतिसाद इथे उधृत करतो म्हणजे या थट्टामस्करीचं स्वरूप समजेल :
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"अरे हो, ते "गोब्राह्मणप्रतिपालक" सध्या banned, नाही का ! तुझी मिशीने काटली आहे शेंडी असं कायसंसं.....असो असो." (या प्रतिसादाला संभाजी ब्रिगेडादि प्रकाराचा संदर्भ आहे )

"मूढ इतिहास-संशोधकांनो, तुम्हाला नोकर्या मिळाव्यात म्हणून मी स्वतः तोफेच्या तोंडी जायला तयार आहे, जन्मतिथीचा वाद स्वतःवर ओढवून घेते आहे, त्याचं काही कौतुक नाहीच."

"प्रोफाईलवर काय लिहिलंय पहा - Do you know शिवाजी? To see what he shares with friends, send him a friend request." (इथे "शिवाजी महाराज" हे एक फेसबुक प्रोफाईल म्हणून काढल्यानंतर दिसणार्‍या विसंगतींकडे निर्देश आहे. )

"आता मी 'अफझलखान', 'शायस्ता खान' वगैरे प्रोफाइल्स तयार करून शिवाजीला फ्रेंड रिक्वेष्ट पाठवणार आहे, म्हणजे शिवाजी काय 'शेअर' करतो ते मालाच्च समजणार - टुक टुक!"

"मी "गागा भट्ट" "दादोजी कोंडदेव" "वाघ्या कुत्रा" या नावाने बनवणार."

"जाहीर लिलाव : खालील लोकांची डुप्लिकेट प्रोफाईल्स या संदर्भात उपलब्ध आहेत. प्रत्येकी पाच हजार होनास.
"शिवधर्म"
"जेम्स लेन"
"ब मो पुरंदरे"
"आ ह साळुंखे"
"प्रवीण गायकवाड"

"खालील वाक्याचं सौंदर्यग्रहण लिहा :

शिवाचा शिष्य म्हणजेच शिवश्री ही पदवी शोभेल अशा साक्षात् परशुरामाच्या परशूतून एकाच वेळी शिवरायांच्या भवानी तलवारीचा खणखणाट आणि कोदंडाचा टणत्कार ऐकू येतो आहे."

"आधीच्या इतिहास-संशोधकांनीही 'तुम्ही नीट वाचत नाही' असे आरोप इतरांवर करून अनेक वादांना तोंड फोडले होते. 'इतिहासाची पुनरावृत्ती होत असते' ह्याचे इतके चांगले उदाहरण कुठे सापडणार?"
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तर एकंदर हा प्रकार चालू असताना, सोशल मिडियावर वावरणार्‍या काही जाणत्या सदस्यांनी चाललेला प्रकार गमतीचा असला तरी धोक्याचा आहे आणि याची खबर बाहेर गेली तर आफत ओढवेल अशा स्वरूपाचे प्रतिसाद दिले. ते दिल्यानंतर एखाद्या सभासदाने आपले स्वतःचे निखळ थट्टामस्करीचे प्रतिसाद काढून घेतले. यथावकाश ती चर्चा थांबली. ती कुणीही सेन्सॉर केली नाही आणि अजूनही त्या ग्रुपवर ती जशीच्या तशी अस्तित्वात आहेच.

ज्या सदस्यांनी असा सावधानतेचा इशारा दिला आणि ज्या सदस्यांनी आपापले प्रतिसाद काढून घेतले त्यांच्या हेतूंबद्दल किंवा प्रागतिक विचारसरणीबद्दल मला शंका उपस्थित करायची नाही.

मुद्दा आहे तो अशा घटकांच्या दहशतीचा. इथे निव्वळ वानगीदाखल एक दोन दुवे देतो :

मावळ्या तुझा शेंडीने कापलाय गळा" या नावाने वावरणारा हा ग्रुप पहावा. संभाजी ब्रिगेड्/शिवधर्म इत्यांदिच्या नावाने शपथ वाहणारा गट : https://www.facebook.com/bamanmaro?fref=ts या ग्रुपमधे वापरलेली भाषा , त्यात उच्चारल्या गेलेल्या गोष्टी पहाव्यात.

या विरोधातला "Anti Sambhaji Brigade" या नावाने वावरणारा हा ग्रुप पहावा. https://www.facebook.com/AntiSambhajiBriged?fref=ts
याही ग्रुपमधे वापरलेली भाषा , त्यात उच्चारल्या गेलेल्या गोष्टी पहाव्यात.

बाकी जेम्सलेन प्रकरण, दादोजी कोंडदेव इत्यादि प्रकरणे त्या आधीच्या तीस पस्तीस वर्षांमधलं शिवसेनाप्रणित राजकारण इत्यादि गोष्टी नव्याने सांगायची गरज नाहीच.

प्रस्तुत संदर्भात मला पडलेले प्रश्न असे की , ही "अशी मस्करी करण्यामागे काही एक धोका आहे" अशी सूचना दिली गेली, तो धोका काय असावा ? संभाजी ब्रिगेड, शिवधर्म , किंवा त्यांच्या विरोधातल्या संघटना, किंवा शिवसेना/मनसे सारखे राजकीय पक्ष यांच्या गटाकडून या अशा थट्टामस्करीवर दबाव येईल अशी काही शक्यता इथे वर्तवण्यात आलेली होती काय ? असल्यास, ती शक्यता नक्की काय ? प्रत्यक्ष आयुष्यात या विषयासंदर्भात चाललेली मनगटशाही आणि मुस्कटदाबी फेसबुक/सोशल मिडीयावरही येणार का ? याच बरोबर, सोशल मिडियावर नक्की कितपत थट्टा करता येणं योग्य किंवा कायद्याच्या चौकटीत बसणारं आहे ?

की जमाना थट्टामस्करीलासुद्धा गप्प बसवण्याचा आलेला आहे ?

नगरीनिरंजन Fri, 19/04/2013 - 08:08

वाचून मला कळले ते असे की काही एक धोका आहे हे कळल्यावर थट्टामस्करी करणार्‍या लोकांनी स्वतःहून गप्प बसण्याचा निर्णय घेतला आहे.
धमकी दिली गेली होती की कसे ते कळत नाही. कसेही असले तरी,

जमाना थट्टामस्करीलासुद्धा गप्प बसवण्याचा आलेला आहे?

हे थट्टामस्करी करणार्‍यांनीच ठरवायचे आहे.
हे म्हणजे "जंगलात फिरू नका, जीवाला धोका आहे" असं म्हटल्यावर दबकून घरात बसायचं आणि वर आमच्या जंगलात फिरण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येत आहे असा ओरडा करायचा असा प्रकार वाटतो.
ही असली प्रागतिक आचारसरणीच थट्टामस्करीचे सगळ्यात उत्तम आणि सुरक्षित लक्ष्य आहे.

बाकी थट्टामस्करीची पातळी ठरवणारा कायदा आहे की नाही, कायद्याच्या चौकटीत काय बसतं ते तज्ज्ञ सांगतीलच. (लेखात दिलेली दोन चेपु पाने कायद्याच्या चौकटीत बसतात म्हणजे चौकट बरीच सैल आहे हा आपला माझा अंदाज).

राजन बापट Mon, 22/04/2013 - 06:52

In reply to by नगरीनिरंजन

>>>ही असली प्रागतिक आचारसरणीच थट्टामस्करीचे सगळ्यात उत्तम आणि सुरक्षित लक्ष्य आहे.

ज्या दिवसापासून प्रागतिक आचारविचारणी "थट्टामस्करीचे" लक्ष्य होईल तो खरोखरच आनंदाचा दिन. मुद्दा हाच की, अशा विचारसरणीचा प्रतिवाद किंवा विरोध (किंवा जे काही असेल ते) या गोष्टी दहशतीच्या वाटे व्यक्त होतात. हाच मुद्दा मूळ लिखाणात मांडायचा आहे.

सहज Fri, 19/04/2013 - 10:41

"समाज नावाची गुंतागुंत" हा शब्दप्रयोग आठवला. याचे जनक कोण?

याच्या आधारे संस्थवर काय असावे काय नसावे तसेच कोण असावे कोण नसावे ठरवल्या गेल्याचे अंधुकसे आठवले.

मन Fri, 19/04/2013 - 10:51

कायद्याच्या चौकटीत बसणारं आहे
कायद्याच्या चौकटित बसणार्‍या गोष्टी केल्या तरी कायदाबाह्य दबावाने चर्चा थंडावली असे दिसते.
टेन्शन बेकायदेशीर ठरण्याचं नाहिच. तर कायदेशीर गोष्टी केल्या तरी "भावना दुखावल्या" म्हणून बेकायदेशीरपणे कानफटात खायला लागण्याची वेळ येउ शकते ह्याचं आहे.
भारतात हे सर्वत्र होतेच. कायद्यात बसणार्‍या गोष्टींनाही बाहेरचीच सेन्सॉरे बंदी घालतात. आपणा सर्वांचीच त्याला (नाइलाजानं , खुशीनं किंवा कशीही ) मूकसंमती आहेच.
बाकी तुमची आणि चिजं ची आणि इतर तथाकथित विचारजंतांची भूमिका http://www.misalpav.com/node/13219(जेम्स लेनच्या निमित्ताने उघडी पडणारी मराठी वैचारिक दिवाळखोरी) आणि http://www.misalpav.com/comment/214153#comment-214153http://www.misalpav.com/comment/213638#comment-213638 इथे व्यवस्थित मांडली गेलेली दिसते.
घाशीराम कोतवाल ते अगदि "मी नथुराम गोडसे बोलतोय" ह्यांच्यापासून ह्याबद्दल बोललं जातय. बोललं जात राहणार आहे. "संहिता किंवा सादरीकरण ही दोन्ही भिकारचोट आहेत" अशी टिका करण्यापेक्षा पब्लिक डायरेक दगड हाती घेते हा अनुभव आहे.
नव्याने अधिक सांगण्यासारखे बोलण्यासारखे ह्या विषयावर काय असू शकेल हे ही त्याचमुळे समजत नाही.

ऋषिकेश Fri, 19/04/2013 - 11:08

थट्टामस्करी ही टर्म अत्यंत व्यक्तीसापेक्ष आहे. त्यामुळे "की जमाना थट्टामस्करीलासुद्धा गप्प बसवण्याचा आलेला आहे ?" असे व तत्सम "हवेतले प्रश्न" व्यावहारिक पातळीवर गैरलागू आहेत.

फारतर "त्या बंद गटात झालेली चर्चा, सोशल मिडीयात करणे कायदेशीर आहे का?" किंवा "सोशल मिडियावर नक्की कितपत थट्टा करता येणं योग्य किंवा कोणत्या प्रकारची चर्चा कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे?" अश्या स्वरुपाचा प्रश्न त्यातल्यात्यात ग्राह्य प्रश्न असु शकेल असे वाटते.

मी Fri, 19/04/2013 - 11:25

खरं पहाता, चराचरात एकाच वेळी पोचण्यासाठी मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग पत्रकारांनी तोंड बांधलेल्या संपादकीय/वृत्तपत्रीय भुमिकेतून बाहेर पडण्यासाठी केला असता, व त्यातुन जनतेला राजकीय/सामाजिक भुमिका बनवण्यासाठी अधिक फायदा झाला असता आणि मग त्याची मुस्काटदाबी झाली असती तर ह्या प्रश्नांना अधिक अर्थ प्राप्त झाला असता. दुर्देवानं ह्या माध्यमाचा म्हणावा तितका उपयोग विचारवंत करत नाहीत असं मला वाटतं.

थट्टा-मस्करी हा उद्देश स्पष्ट असलेल्या संदर्भात मुस्काटदाबीचे प्रकार झाल्याचे मला आढळले नाही, पण तसा उद्देश एखाद्या प्रदिर्घ चर्चेचा असेलच असं नाही, तो वैयक्तिक असु शकतो.

आक्षेप नोंदवल्यावर कायद्याप्रमाणे कारवाई असे कायद्याचे स्वरुप असावे, अन्यथा ह्या सोशल देवाणघेवाणीचं आकारमान(volume) बघता त्यावर नियंत्रण ठेवणं फारसं सोप नाही आणि स्वातंत्र्याच्या दृष्टीनेही चांगलं नाही.

राजेश घासकडवी Sat, 20/04/2013 - 20:26

सेन्सॉरशिप हा एक गमतीदार प्रकार आहे. अजाणांवर होणाऱ्या अत्याचारांचं उदात्तीकरण करणाऱ्या गोष्टींवर सेन्सॉरशिप आणणं ठीक आहे, पण 'भावना दुखावल्या' या अत्यंत भोंगळ प्रकाराबद्दल अभिव्यक्तीवर सरसकट बंधन आणण्याची अश्लीलता दुर्दैवाने चालू आहे.

हे म्हणजे "जंगलात फिरू नका, जीवाला धोका आहे" असं म्हटल्यावर दबकून घरात बसायचं आणि वर आमच्या जंगलात फिरण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येत आहे असा ओरडा करायचा असा प्रकार वाटतो.

आसपास जंगल असणं, त्यात रानटी श्वापदं मोकाट माजलेली असणं, आणि त्यांनी एकट्यादुकट्यावर झडप घातली तरी त्यावर काहीही कारवाई होण्याची सूतराम शक्यता नसणं ही जास्त वाईट गोष्ट आहे. जीवाला धोका असल्यावर दबकून घरात बसणं तसं नैसर्गिकच आहे. या भीतीने आपल्या मर्यादा आकुंचित करायला लागणं ही वरवर स्वयंसेन्सॉरशिप वाटली, तरी ती बाहेरून लादलेली आहे.

लेखात जो प्रश्न उपस्थित केलेला आहे 'या असल्या साइट्सवर जी आक्रमक भाषा निर्धास्तपणे वापरली जाते, तिच्या दशांशही आक्रमक नसलेला नर्मविनोद वापरायला आपण का घाबरतो?' याचं उत्तर थोडंसं 'सगळे घाबरतात म्हणून आपण घाबरतो' या धर्तीचं आहे.

एखाद्या विभूतीचे दोष साधार दाखवल्यावर लोकं त्यावर शांतपणे विचार करतील तो सुदिन.

नगरीनिरंजन Mon, 22/04/2013 - 06:01

In reply to by राजेश घासकडवी

दबकून बसणे नैसर्गिकच आहे याच्याशी सहमत. पण त्याबद्दल तक्रार करणे नैसर्गिक नाही.
शिवाय ही सेन्सॉरशिप बाहेरून लादलेली असली तरी आपले रूटीन आयुष्य विस्कळीत होऊ नये म्हणून आपण तिला तात्पुरती मान्यता देतो असे नाही का?
मुळात सगळे समाजकंटक सभ्य झाले म्हणजेच आपण स्वतंत्र झालो असे नाही. असलेले स्वातंत्र्य न वापरण्याचे सबळ कारण आहे म्हणून ते आपण वापरत नाही.
कायदेशीर कारवाई होत नसेल तर व्यवस्था सुधारली पाहिजे ते खरे आहे, पण सध्या मिळणार्‍या फायद्यांपुढे त्यासाठी पुरेसा इन्सेन्टीव्ह नाही.
या विशिष्ट उदाहरणात तर बाहेरून धमकी वा मारहाण वा अन्य कारवाई असा प्रकार झालेला दिसत नाही, त्यामुळे ही निव्वळ शक्यते वरून स्वतःच घेतलेली काळजी वाटते.
या उदाहरणात धमकी, मारहाण वगैरे काही घडलेलेच नसल्याने कायदेशीर कारवाई होत नाही हा पूर्वग्रह वाटतो.

राजन बापट Mon, 22/04/2013 - 06:48

In reply to by नगरीनिरंजन

>>>दबकून बसणे नैसर्गिकच आहे याच्याशी सहमत. पण त्याबद्दल तक्रार करणे नैसर्गिक नाही.
शिवाय ही सेन्सॉरशिप बाहेरून लादलेली असली तरी आपले रूटीन आयुष्य विस्कळीत होऊ नये म्हणून आपण तिला तात्पुरती मान्यता देतो असे नाही का?

नेमकं नैसर्गिक काय आहे नि नाही ते मला सांगता येत नाही. मात्र याबद्दल तक्रार करणं मला योग्य मात्र वाटतं. बाहेरून लादलेल्या सेन्सॉरशिपला आपण - तात्पुरती किंवा कायमची, दबकून राहून किंवा ताठ मानेने असेल - मान्यता देतो यात अमान्य करण्यासारखं काहीच नाही. मात्र जीव/मालमत्ता वाचवण्याकरता दिलेल्या मान्यतेचा अर्थ, आहे त्या परिस्थितीबद्दल तक्रारही करू नये , अशी अध्याहृत सूचना असेल तर या सूचनेमागची मीमांसा मला जाणून घ्यायला आवडेल.

नगरीनिरंजन Mon, 22/04/2013 - 10:57

In reply to by राजन बापट

तक्रारीचा सूर "त्यांनी झुंडशाही, दडपशाही करू नये म्हणजे थट्टामस्करी करणार्‍यांना मोकळेपणे थट्टामस्करी करता येईल" आणि "कोणी गुंडगिरी करणार नाही याची हमी असणे किंवा सरकारने देणे म्हणजेच अभिव्यक्तीस्वातंत्र्य" असा असू नये असे वाटते.
मुळात त्यांची बौद्धिक कुवत, झुंडशाही आणि बालिश राजकारण हाच मस्करीचा विषय आहे ना?

नितिन थत्ते Mon, 22/04/2013 - 07:36

In reply to by नगरीनिरंजन

>>कायदेशीर कारवाई होत नसेल तर व्यवस्था सुधारली पाहिजे ते खरे आहे, पण सध्या मिळणार्‍या फायद्यांपुढे त्यासाठी पुरेसा इन्सेन्टीव्ह नाही.

आवडले. इतके फंडामेंटल कारण कोणी सहसा सांगत नाही.

Nile Mon, 22/04/2013 - 21:46

मला वाटतं मुद्दा प्राथमिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी निगडीत आहे.

या विशिष्ट उदाहरणात तर बाहेरून धमकी वा मारहाण वा अन्य कारवाई असा प्रकार झालेला दिसत नाही, त्यामुळे ही निव्वळ शक्यते वरून स्वतःच घेतलेली काळजी वाटते.
या उदाहरणात धमकी, मारहाण वगैरे काही घडलेलेच नसल्याने कायदेशीर कारवाई होत नाही हा पूर्वग्रह वाटतो.

असे म्हणणे १००% बरोबर नाही. भांडारकर, नियमीत म्हणता येतील असे वर्तमानपत्र किंवा इतर कार्यालायांवरील गुंडाचे हल्ले किंवा अगदीच परवा झालेल्या मुंबईच्या उदाहरणानंतर (फेसबुक वर कमेंट करणार्‍या मुलीच्या काका/मामाच्या दवाखान्याची नुकसानी), ही "निव्वळ शक्यता" आहे असे म्हणणे 'नाईव्ह' आहे असे म्हणेन.

तक्रारीचा सूर "त्यांनी झुंडशाही, दडपशाही करू नये म्हणजे थट्टामस्करी करणार्‍यांना मोकळेपणे थट्टामस्करी करता येईल" आणि "कोणी गुंडगिरी करणार नाही याची हमी असणे किंवा सरकारने देणे म्हणजेच अभिव्यक्तीस्वातंत्र्य" असा असू नये असे वाटते.

याही पेक्षा 'फंडामेंटल' मुद्दा आहे. मुळात कायदाव्यवस्था अशी असावी की अस्मितेने प्रेरीत (आणि अर्थातही इतर) गुंडगीरीला इंसेटीव्ह नसावेत. भावनेचे भांडवल केलेल्या गुंडगिरीला समाजाचे समर्थन अनेकदा मिळते (वेगवेगळ्या पण जाणवण्याइतक्या प्रमाणात) हे आपण पाहतोच, पण त्याच वेळी कायदा व्यवस्था जर निरपेक्ष असेल तर अशा स्वातंत्र्यावर गदा येणार नाही.