मुलगा की मुलगी?
'मला मुलगाच हवा' या हट्टापायी आपल्या देशात हजारो स्त्रीभ्रूणहत्या होत आहेत. मुलगा हवा यासाठी सांस्कृतिक, सामाजिक वा आर्थिक कारणं काहीही असोत, उत्क्रांती व विज्ञान मात्र यासंदर्भात फार वेगळे चित्र उभे करत आहे.
मुलीपेक्षा मुलगा त्याच्या आईला फार तापदायक ठरु शकतो. जन्माच्या वेळचे मुलाचे वजन, पुरूष जातीतील टेस्टोस्टेरॉन ग्रंथीस्रावाचा वाढता प्रभाव, वा मुलामधील जन्मत:च असलेला व्रात्यपणा इत्यादी गोष्टी मुलाला जन्म देणा-या आईच्या जिवावर उठू पाहत असतात. शेफिल्ड विद्यापीठात पुनरूत्पादन वर्तणूक या विषयावर संशोधन करत असलेल्या विर्पी लुम्मा या प्राध्यापिकेच्या मते जन्माला घातलेला प्रत्येक मुलगा सामान्यपणे चौतीस आठवड्यानी आईचे आयुष्य कमी करत असतो.
बेचाळीस वर्षाची ही संशोधिका फिनलॅंड देशातील चर्चने सांभाळून ठेवलेल्या गेल्या शंभर वर्षातील जन्म, विवाह व मृत्यु या नोंदीचा अभ्यास करत होती. या दाखल्यावरून या संदर्भात काही आश्चर्यजनक निष्कर्ष तिने प्रसिध्द केले आहेत.
मुलीपेक्षा मुलाचे वजन जास्त असल्यामुळे गर्भावस्थेतच आईच्या शारीरिक प्रकृतीवर जास्त ताण पडत असतो. मुलामधील टेस्टोस्टेरॉन ग्रंथीमुळे तिच्यातील रोग प्रतिकारक शक्तीलाच धक्का बसू शकतो. खास करून क्षय रोगासारख्या रोगाणूंचा ती प्रतिकार करू शकत नाही. मुलीच्या तुलनेने मुलाच्या संगोपनासाठी आईला जास्त किंमत मोजावी लागते. मुलासाठी म्हणून तिला जास्त कष्ट घ्यावे लागतात. मुलीप्रमाणे मुलं आईच्या घरकामात अजिबात मदत करायला तयार होत नाहीत. मुलाला वाढवणे आईला कायमची डोकेदुखी असते.
आईचे अगोदरचे अपत्य मुलगा असल्यास नंतर जन्माला येणारे अपत्य नेहमीच दुर्बल राहील. त्याच्यात कुठल्या तरी सांसर्गिक रोगाचे शिकार होण्याची शक्यता जास्त असेल. मुलींच्यापेक्षा मुलांना प्रत्येक बाबतीत झुकते माप दिले जाते, वा मुलांकडे वारस म्हणून बघितले जाते किंवा मोठा मुलगा इतर लहान भावंडावर अरेरावीपणा गाजवत असतो इत्यादी कारणं या संदर्भात नाहीत, असे त्या संशोधक गटाने स्पष्ट केले आहे. जरी पाचवे अपत्य मुलगा असला तरी नंतर जन्माला येणारे मुल (मुलगा किंवा मुलगी!) दुबळेच राहील.
या संशोधिकेने फिनलॅड येथे 1734 ते 1888 या कालवधीत जन्मलेल्या 754 जुळ्यांच्या अभ्यासावरून काही विशेष नोंदी केल्या आहेत. मुलगा किंवा मुलगी अशी जोडी जुळ्यात असल्यास त्यांच्या पैकी 25 टक्के स्त्रिया निपुत्रिक राहिल्या किंवा इतर स्त्रियाप्रमाणे जास्त अपत्यांना जन्म न देता केवळ दोन अपत्यांनाच त्या जन्म देऊ शकल्या. 15 टक्के स्त्रियांचे लग्न होऊ शकले नाही. भावाबरोबर जन्म घेतल्याचे घातक परिणाम गरीबाघरच्या स्त्रीलाच नव्हे तर श्रीमंतांच्या घरातील स्त्रियांनासुध्दा भोगाव्या लागल्या. तिच्या मते ही गोष्ट सांस्कृतिक, सामाजिक वा वर्गीय स्तर यावर अवलंबून नाही. एवढेच नव्हे तर जुळ्यापैकी जन्मानंतर तीन चार महिन्यातच मुलाचा मृत्यु झाला व मुलगीच फक्त जिवंत राहिली तरी या निष्कर्षात फार फरक जाणवला नाही.
जननक्षमतेतील उणीवांचा मागोवा घेत असताना गर्भाशयात जुळे वाढत असतानाच टेस्टोस्टेरॉनचे दुष्परिणाम दिसू लागतात. हे लुम्माच्या लक्षात आले. या स्रावाचा परिणाम केवळ मनुष्यप्राण्यातच नव्हे तर प्रयोगशाळेतील उंदिरांच्या बाबतीत व गायींच्या अभ्यासात सुध्दा आढळला. गायीच्या वासरात एक नर व दुसरे मादी असल्यास टेस्टोस्टेरॉनच्या दुष्परिणामामुळे मादीला वंध्यत्व येऊ शकते.
भाऊ-बहिण आणि बहिण-बहिण अशा जुळ्यांचा तुलनात्मक अभ्यास करताना पहिल्या प्रकारच्या जुळ्यातील स्त्रियांच्या नातवंड-पणतवंडांच्या संख्येत दुस-या प्रकारच्या तुलनेने 19 टक्के घट झालेले आढळले. यावरून उत्क्रांती बहिण-बहिण अशा जुळ्यांना झुकते माप देत असावे. पुरूष व स्त्रिया याच्यांमधील शारिरीक व्यत्यास केवळ जन्मत:च प्राप्त झालेल्या X-Y रंगसूत्रावर अवलंबून नसतात. रंगसूत्राबरोबरच पुनरूत्पादन क्षमता व उत्क्रांतीचे वैशिष्ट्य यांच्यावरसुध्दा त्या निर्भर असावेत. मुळातच जुळ्यांना जन्माला घालणे हे उत्क्रांतीच्या दृष्टीने उपयुक्त नसल्यास ही आनुवंशिकता लाखात वा कोटीत एक अशी विरळ प्रमाणातच असायला हवी होती. पंरतु मनुष्य प्राण्यासकट इतर काही प्राणी सर्रासपणे जुळ्यांना जन्म देत असतात. त्यामुळे प्राध्यापिकेने काढलेले निष्कर्ष अचूक वाटत असले तरी जनन क्षमतेच्या संदर्भात काही तरी घोळ आहे, अशी प्रतिक्रिया कुझावा या मानववंशशास्त्रज्ञाने व्यक्त केली आहे.
जननक्षमतेचाच पुनर्विचार करत असल्यास वर्तमान परिस्थितीचाही अभ्यास करणे रंजक ठरेल. परिणामकारक गर्भनिरोधक साधनांची सहज उपलब्धता, मुबलक प्रमाणात मिळत असलेले सत्वयुक्त आहार पदार्थ, व बालमृत्युच्या दरातील घट या गोष्टी औद्योगिकीकरणपूर्व परिस्थितीतील उत्क्रांतीच्या कल्पनांना छेद देणारे आहेत. शंभर-दीडशे वर्षापूर्वी बाल मृत्युचा दर चाळीस टक्क्यापेक्षा जास्त होता, यावर पुराव्यासहित सांगूनही विश्वास बसणार नाही.
परंतु अजूनही जगातील बहुतांश राष्ट्रे औद्योगिकीकरणपूर्व परिस्थितीतूनच जात आहेत. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. ज्यांच्याकडे जास्त मुलं, त्यांचाच मोठा परिवार व त्यांच्याच पिढीचा जास्त विस्तार यात बदल झालेला नाही. यावरुन उत्क्रांतीचा सिद्धांत अजूनही लागू होत आहे. फिनलँडसारख्या अतिविकसित देशांचेच फक्त उदाहरण न घेता आफ्रिकेतील गॅम्बियासारख्या मागासलेल्या देशातील कौंटुबिक आरोग्य व जनन-मरणासंबंधीची माहिती यांचे विश्लेषण करुन निष्कर्ष काढणे योग्य ठरेल.
लुम्मा व तिचे सहकारी अजून एका मुद्यावर भर देत आहेत. फिनलँडच्या नोंदीवरुन आजी-आजोबा व उत्क्रांतीचा सिद्धांत यांच्यात घनिष्ट संबंध आहे हे दिसून येते. या नोंदीवरून नातवंडांचे दीर्घ आयुष्य व त्यांची जनन क्षमता यात आजीचा फार मोठा वाटा आहे. नोंदींचे विश्लेषण करत असताना वडील व आजोबा या संदर्भात काही मदत करत नाहीत, हे स्पष्ट झाले. वडिलामुळे मुलाचे लहान वयात लग्न व त्यामुळे जास्त संख्येने अपत्य ही शक्यता असली तरी नातवंडाच्या संख्येत लक्षणीय प्रमाणात भर पडत नाही हे लक्षात आले. कदाचित संस्कृती-पंरपरा यांचा प्रभाव असू शकेल. पुरुष-प्रधान कौटुंबिक व्यवस्थेत पुरुषांचा - विशेषकरुन वयोवृद्धांचा - वाटा जास्त असण्याची शक्यता आहे. कदाचित लहान नातवांच्या तोंडातील घास हिसकावून म्हाता-या आजोंबाच्या तोडांत दिले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजोबापेक्षा आजीचे दीर्घायुष्य उत्क्रांतीला जास्त पूरक असावे या विधानाच्या बाबतीत दुमत नसावे. आजच्या स्त्रिया एक-दोन बांळतपणातच गळितगात्र होतात. त्या तुलनेने पूर्वीच्या स्त्रिया दरवर्षीचे गर्भारपण कसे काय सहन करत असावेत याची कल्पना न केलेली बरी!
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती व जननक्षमता यांचा आढावा घेतल्यास पूर्वीच्या काळी गरीबांच्यापेक्षा श्रीमंतांचीच मुंल दीर्घकाळ जगत होती, त्यांचा वंशविस्तार होत असे. आता मात्र श्रींमत राष्ट्रामधील लोकसंख्या लक्षणीय प्रमाणात कमी होत आहे. कदाचित पूर्वीप्रमाणे संख्यात्मक वाढीवर भर न देता संततीच्या गुणात्मक वाढीकडे लक्ष दिले जात असावे. परंतु या प्रश्नाला अजूनही नीट उत्तर सापडले नाही.
उत्क्रांतीची ही अडथळ्याची शर्यत मुलांना कितीही प्रतीकूल असला तरी “मुलगा हवाच” या हट्टाला बळी पडलेल्या आधुनिक समाजात पुरुषांची कमतरता कधीच भासणार नाही. जनुकीय दृष्ट्या एका ‘चांगल्या’ मुलाला जन्म दिल्यास त्यातून अनेक अपत्यांचा जन्म होऊन जनुकीय वाढ, वितरण व सातत्य टिकत असल्यास अशा मुलाला जन्माला घालण्याचे कष्ट हवेत विरून जातील व स्त्रीचे जीवन सार्थकी होईल हा साधा सरळ हिशोब त्या मागे असावा. जास्त काही मिळवण्यासाठी अगोदर आपल्याला काही गुतंवणूक करावी लागते. म्हणून तर मुलीपेक्षा मुलाकडे जास्त ओढ असू शकेल!
प्रतिक्रिया
रोचक माहिती.. या अनुशंगाने
रोचक माहिती.. या अनुशंगाने होणारी चर्चा वाचायला उत्सुक आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
संशोधन रोचक आहे पण निष्कर्ष
संशोधन रोचक आहे पण निष्कर्ष अजिबात पटत नाहीयेत..
हार्मोन्स, जेनेटिक्स, मधेच सामाजिक अशी मिसळ लावून हा रिसर्च पेपर लिहीलेला आहे असं वाटलं. खूपशी वाक्यं एकेक करुन विचार करण्यासारखी आहेत. फक्त नमुन्याला काही:
जन्मतःच असलेला व्रात्यपणा जिवावर कसा काय उठतो बुवा? .. जन्मपूर्व व्रात्यपणा असता तर समजू शकतो. जन्मल्यावर व्रात्यपणा असला तर पहिली काही वर्षं तो बाळ आईच्या जिवावर उठण्याइतका ताकदीचा तरी असतो का?
दोन शास्त्रीय मुद्द्यांसोबत त्याच माळेत सामाजिक, चाईल्ड अपब्रिंगिंगचा मुद्दा बेमालूम मिसळला गेला आहे. मुलग्याने घरकामात मदत करणं ऑर अदरवाईज हे जन्मल्यानंतर आईच्या हाती असतंच. का तेही जन्मजात आहे हे मान्य करायचं? मग पुरुषांनी बायकांना कामाला लावून खुशाल लोळत पडलं तरी ते शास्त्रशुद्ध आणि नैसर्गिकच ठरेल.
पुन्हा वैद्यकीय, जेनेटिक, सामाजिक अशी एकमेकांशी न जुळलेली संदर्भमालिका. शिवाय मुलगा जन्मला की त्याच्या मागून जन्मलेलं अपत्य नेहमीच दुबळं? आपल्या आसपास पाहिलं तरी हा नेहमीच शब्द निखालस अतिशयोक्त आहे हे म्हणायला संशोधन आणि डेटा लागू नये. दोनदोन किंवा अगदी तीनतीन एकाचढ एक धट्टेकट्टे मुलगे असलेली कितीतरी उदाहरणं माझ्या पाहण्यात आहेत. माझ्या नातेवाईकांमधे जवळजवळ सर्वांना मुलगा आणि मुलगी (भाऊबहीण) अशी अपत्यं आहेत. यात भाऊ मोठा, बहीण धाकटी, बहीण मोठी, भाऊ लहान, एक भाऊ, एक बहीण, मागून पुन्हा एक भाऊ आणि एक बहीण अशी अनेक कॉम्बिनेशन आहेत, पण त्यातलं कोणीही मुलग्याच्या पाठीवर झाल्याने दुर्बळ किंवा मुलगीच्या पाठीवर झाल्याने सबल झालेलं नाही.
चर्चने सांभाळून ठेवलेल्या जन्म-विवाह्-मृत्यू यांच्या नोंदणीवरुन १७३४ ते १८८८ या काळातल्या लोकांवर आधारित निष्कर्ष आहेत ही गोष्ट एकदमच रोचक आहे. म्हणजे संशोधनाचा सँपल रिट्रोस्पेक्टिव्ह आणि बराच जुना आहे. इनडायरेक्ट आहे. असं म्हटलं आहे की भाऊ-बहीण जुळ्यातल्या २५% स्त्रिया एकतर निपुत्रिक राहिल्या किंवा जास्त अपत्यांना जन्म न देता २ च अपत्यांना जन्म देऊ शकल्या. तरीही यातून हे स्पष्ट होत नाही की त्यामधे नेमक्या निपुत्रिक किती आणि २ अपत्यवाल्या किती.. शिवाय त्यांना दोनच अपत्ये होती याचा अर्थ तेवढीच होऊ शकली (अधिक अपत्यांचा गर्भच राहू शकला नाही, की राहिला पण जगला नाही...) की अन्य काही कारण होतं? कारण त्या वेळच्या अनियंत्रित भरपूर मुलं होण्याच्या काळात २ ही अपत्यसंख्या तुलनेत लहान वाटली तरी त्याचा अर्थ "दुबळेपणा" असा काढता येईल का याविषयी शंका राहते.
बाकीही तसंच, अर्थात संशोधन कितपत जेन्युईन आहे हा एक प्रश्न आणि त्याची मांडणी कितपत व्यवस्थित आहे हा दुसरा प्रश्न.
टंकण्याचे श्रम वाचले.
टंकण्याचे श्रम वाचले..धन्यवाद, गवि.
मूळ संशोधनात (अथवा त्याच्या येथल्या मांडणीत) बरेच अनमानधपक्या ठोकताळे वापरलेले वाटले.
गविंचा प्रतिसाद आवडला.
गविंचा प्रतिसाद आवडला. धागाकर्त्यालाही आवडला असेल.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
नेमके
नेमके विच्छेदन. हेच विस्तृतपणे झाले की, संशोधनाचं शव शिल्लक राहील.
सहमत
व्यवस्थितपणे केलेले विश्लेषण!
धन्यवाद.
रोचक विषय आहे
गविंनी विचारलेल्या प्रश्नांसोबत अन्य काही प्रश्न आहेत. (या प्रश्नांची उत्तरं जालावर सापडली तर देईनच.)
पुरुष आणि स्त्री अर्भकांमधे टेस्टोस्टीरॉनचं प्रमाण किती असतं? प्रत्येक मनुष्याच्या शरीरात टेस्टोस्टीरॉन (आणि इस्ट्रोजेन) असतंच, स्त्री असो वा पुरूष. अर्भकांमधलं टेस्टोस्टीरॉन स्त्रियांमधे जेवढं टेस्टोस्टीरॉन सामान्य समजलं जातं, त्यापेक्षा कमी असतं का नाही असा प्रश्न आहे. हे प्रमाण कमी असेल तर स्त्रियांवर त्याचा जाणवण्याइतपत परिणाम होतो का? जास्त असेल तर किती जास्त होतो?
वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीमुळे अलिकडच्या काळात अनेक स्त्रियांमधे अंतःस्रावांचा तोल ढळल्याचं सापडतं (पूर्वी चाचण्याच नव्हत्या). या विकाराचा प्रभाव ५-१० टक्के स्त्रियांवर असेल असं विकीपिडीया म्हणतो. या स्त्रियांमधे टेस्टोस्टीरॉनचं प्रमाण अधिक असतं. त्यांच्यात संसर्गजन्य रोगांची लागण अधिक होण्याचं प्रमाण किती याचा अभ्यास केला गेला आहे का?
भाषांतरातली गडबडः
मूळ इंग्लिश लेख वाचून माझा असा समज झाला:
जुळा भाऊ असणार्या स्त्रियांमधे संतानहीन असण्याचं किंवा (सरासरीपेक्षा) दोन कमी मुलं असण्याचं प्रमाण जुळा भाऊ नसणार्या स्त्रियांपेक्षा २५% अधिक आहे. (जुळा भाऊ असणार्या स्त्रियांची गर्भधारणक्षमता अन्य स्त्रियांपेक्षा २५% कमी आहे.) जुळा भाऊ असणार्या स्त्रियांमधे लग्न होण्याचं प्रमाण जुळी बहीण असणार्या स्त्रियांशी तुलना करता १५% कमी आहे.
मूळ इंग्लिश वाक्यः
Of 754 twins born between 1734 and 1888 in five towns in rural Finland, girls from mixed-gender pairs proved 25 percent less likely to have children, had at least two fewer children, and were about 15 percent less likely to marry than those born with a sister.
निष्कर्ष ग्राह्य मानले तरीही:
हा विदा १७३४ ते १८८८ मधला आहे. ह्या काळापेक्षा आजचं वैद्यकीय विज्ञान फार अधिक प्रगत आहे. वर उल्लेख केलेल्या पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोममुळे स्त्रियांमधे वंध्यत्त्व येऊ शकतं. आज वैद्यकीय विज्ञानाच्या मदतीने या सिंड्रोमच्या बळी असणार्या स्त्रियाही माता बनू शकतात. बालमृत्युचं प्रमाण झपाट्याने खाली आल्यामुळे स्त्रियांची जननक्षमता ताब्यात ठेवण्याकडेच स्त्री-पुरुषांचा कल असतो. सरासरीपेक्षा दोन मुलं कमी होणं, हे विधान आजच्या काळात फार लागू पडणार नाही कारण आहे ती जननक्षमताच पूर्ण वापरली जात नाही.
त्या काळात ट्यूबरक्युलॉसिस हा (बहुदा) हमखास जीवघेणा रोग होता, आज या रोगाविरोधात लस उपलब्ध आहे. (या रोगाचे सर्वाधिक बळी भारतीय आहेत.) विकिपीडीयाच्या मते टीबीमुळे मरणाची शक्यता २००८ साली ४% होती; १९९५ साली ही शक्यता ८% होती.
अशा प्रकारच्या वैद्यकीय प्रगतीमुळे 'आता' हे चित्र कितपत ग्राह्य मानावं असाही एक प्रश्न आहेच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
संशोधनाची ग्राह्यता?
>>अशा प्रकारच्या वैद्यकीय प्रगतीमुळे 'आता' हे चित्र कितपत ग्राह्य मानावं असाही एक प्रश्न आहेच.<<
चर्चेसाठी एक चांगला विषय म्हणून हा लेख लिहिला होता.
भाषांतरातील चूक दुरुस्त केल्याबद्दल आभारी आहे.
वेगळे मत.
मुलीपेक्षा मुलगा जास्त तापदायक ठरू शकतो. : कदाचित संख्याशास्त्रीय दृष्टिने सत्य असावे.
बाकी, गर्भातले मूल हे या जगातले सर्वात जास्त सक्सेसफुल बांडगुळ आहे असा एक वाक्प्रचार वैद्यक शिकताना ऐकला होता. मग तो मुलगा/मुलगी हे इम्मटेरियल आहे. अगदी या बाळाला हाडे बनवायला कॅल्शियम हवा, तर आईच्या हाडांतून तो मोबिलाईज होऊन बाळाला दिला जातो. तिला डाएटमधून मिळो, न मिळो. हे ब्रेस्टफीडींग दरम्यानही सुरूच रहाते. मग तिचे शरीर ऑस्टिओपोरोसिसने ग्रस्त झाले तरी हरकत नसते.
इतके करूनही, अन इतक्या प्रसव वेदना सहन करूनही ते बाळ त्या आईला प्रिय ठरते, हा चिमित्कार पाहून अनेकदा मला बुचकळ्यात पडायला झालेलं आहे.
असो. पुरुष अन स्त्री अर्भकाबद्दल रिसेंटली काही वाचले नाहीये, पण मोठे होऊन मुलगे आईबापांना जास्त त्रासदायक ठरतात, अन त्यासाठी त्या सुना (स्त्री मुलग्या) जबाबदार असतात, असे काहिसे सोशल इन्टरप्रिटेशन भारताच्या संदर्भात कुठेसे वाचल्याचे आठवते आहे..
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-